एका निश्चित भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना त्या क्षेत्रात एका व्यवस्थेची गरज असते जेणेकरून एक समाज सामूहिक जीवन जगण्यासाठी व्यवस्थेने त्या समूहाच्या दैनंदिन गरजा, अडीअडचणी, त्यांचे राहणीमान, अनेक प्रकारच्या सोईसुविधा अशा क्षेत्रात पुरविल्या जाव्यात यासाठी जगात निरनिराळ्या राजकीय व्यवस्था अस्तित्वात आहेत. कुठे राजेशाही आहे, कुठे एकाधिकारशाही तर कुठे संमिश्र व्यवस्था आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक विचारांचा उदय झाला. यात लोकशाही राज्यपद्धतीला सर्व जगातल्या संस्कृती-सभ्यतांनी मानवी कल्याणासाठी सर्वोत्तम शासनपद्धती म्हणून मान्यता दिली. आज आपण पाहतो की जगभर या आधुनिक विचारधारेखाही लोकशाहीप्रणित राज्य आणि शासनव्यवस्था कार्यरत आहे. म्हणजे लोकसमूहांना त्यांच्या आवडीची राजकीय पद्धत म्हणजे लोकशाही असा समज. या व्यवस्थेद्वारे ज्यांनी सत्ता काबिज केली आणि ज्या लोकांनी त्यांना लोकशाहीतील महत्त्वाचे अंग म्हणजे निवडणुकीद्वारे त्यांना सत्ता दिली - दोघांना यात समाधान वाटले. कोणत्याच प्रकारची राजकीय सत्ता ज्या देशात असेल त्याच अनुषंगाने तिथल्या लोकांची म्हणजेच नागरिकांची विचारधारा असते. असे नाही की सर्व नागरिकांची विचारधारा एकच असते. काहींची विचारधारा दुसऱ्या प्रकारची असते. म्हणूनच निवडणुकांचे प्रयोजन करण्यात येते. बहुसंख्येने ज्या नागरिकांना जी विचारधारा मान्य असते त्यांच्या मर्जीचे सरकार निवडणुकीद्वारे सत्ता संपादन करते.
या सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना काय हवे असते तर सर्व नागरिकांमध्ये संसाधनांची न्याय्य वाटणी आणि हे त्या व्यवस्थेअंतर्गत राजकीय आणि सामाजिक स्थिती कितपत समाधानी आहे हे ठरवते. याशिवाय त्यांच्या भौतिक गरजा म्हणजे अन्न, वस्तू आणि निवारा यापलीकडे रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या सोयी, आरोग्य व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी समाधानीचे जीवन जगत असतानाच बेहतर भविष्यही हवे असते. नागरिकांच्या या समस्या बिनदिक्कत पूर्ण केल्या गेल्या तर नागरिकांमध्ये सत्तेविरुद्ध आक्रोश निर्माण होत नाही. कोणत्याही समाजाच्या रचनात्मक स्थितीचे हे निकष आहेत. जर उपरोल्लेखित गरजा पूर्ण होत राहिल्या तर समाजात तेढ निर्माण होत नाही. फॉल्ट लाइन्स निर्माण होत नाहीत. अशा प्रकारे लोकसमूह एका राजकीय आधुनिक संस्थेची निर्मिती करतात. आपसातील संमतीने अशा प्रकारे एक राजकीय समाजाचा आविष्कार होतो. सध्या जगभर बहुसंख्येने अशाच प्रकारचे लोकसमूह आहेत ज्यांनी आपसातील सल्लामसलतीने लोकशाही पद्धतीचे राज्य निर्माण केले आहे. डाव्या विचारसरणीचे जे राष्ट्र आहे ते सुद्धा स्वतःला लोकशाहीवादी म्हणवतात. खरे पाहता तिथे सरकारचेच उमेदवार ठरवायचे असतात आणि नागरिकांना त्यांनाच मते द्यावी लागतात. त्यांच्या मर्जीनुसार काही नसते. लोकसाहीत नागरिकांची मंजुरी नसणे म्हणजे त्यास लोकशाही म्हणता येईल काय? असो.
आज प्रश्न असा आहे की ज्या लोकशाहीचा जगभर इतका गाजावाजा आहे ती खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे काय? सध्या नवनवीन माहिती जगासमोर येत आहे. सर्वांत महत्त्वाची म्हणजे इस्रायलमध्ये ताल हन्नान नामक एक व्यक्ती आहे जो खोट्या माहिती पसरवून लोकशाही पद्धती असलेल्या देशांतर्गत होणाऱ्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करतो आणि कोट्यवधी रुपये घेऊन सत्ताधाऱ्यांना त्यांचे सरकार निवडून येण्यासाठी मदत करतो. माहितीनुसार तीस राष्ट्रांमध्ये त्याने निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून सरकार निवडून आणण्यात तेथील राजकारणीवर्गाची मदत केली आहे. याचा अर्थ असा की सबंध लोकशाही विचारधारेलाच त्याने हायजॅक करुन टाकले आहे. अशात ज्या नागरिकांनी आपल्या मर्जीतील सरकार निवडण्यासाठी मदते दिली होती त्यांना तेच सरकार मिळाले का असा प्रश्न उपस्थित होतो. खोट्या माहितीद्वारे जनतेची फसवणूक करण्याच्या या प्रकरणात हन्नान हा एकटा की इस्रायलचा त्याला पाठिंबा किंवा त्याचे साहाय्य लाभले का, हा एक प्रश्न. तसे असेल तर जगातल्या ३० देशांमध्ये इस्रायलधार्जिने सरकार असणार. आर्थिक क्षेत्रात हिंडेनबर्ग नावाची संस्था वाटेल त्या उद्योगपतीला लक्ष्य करून त्याची नासधूस करू शकते, जॉन सोरोस नावाची व्यक्ती इतर देशांच्या चलनाची किंमत ठरवू शकते, इतकी आर्थिक शक्ती या लोकांकडे कशी येते? याचा अर्थ एकच लोकशाहीचा सर्वच स्तरांवर नाश होत आहे. जगासमोर ह्या गंभीर समस्या आहेत. सध्या नागरिकांनी तर संमतीचे सरकार आपले हक्काधिकार या गोष्टी विसरून गेलेलेच बरे. हे जग कोणत्या वळणावर आलेले आहे?
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment