Halloween Costume ideas 2015

सदैव प्रकाशणारा दिवा : पैगंबर मुहम्मद (स.)

प्रेषितांचे कार्य म्हणजे मानवजातीला ऐहिक आणि नैतिक विकासाचा मार्ग दाखवणे, उदात्त आणि उच्च दर्जाच्या भावना उत्पन्न करणे आणि स्त्रीपुरुषांमध्ये अशा संवेदना निर्माण करणे  ज्या त्यांची ईश्वराशी जवळीक निर्माण करतात. अशा प्रकारे प्रेषित्व एक पद्धतच नाही ज्याद्वारे ईश्वर मानवजातीला आपला संदेश पोहचवतो, तर त्याची कृपा आणि दयेचाही तो एक  संकेत आहे.
प्रेषित्वाच्या पवित्र इतिहासामध्ये इस्लामचा एकेश्वरी धर्माचा सिद्धान्त सातत्याने चालत आला आहे. आदम (अ.) हे सर्वप्रथम प्रेषित होते आणि मुहम्मद (स.) अंतिम प्रेषित आहेत.  कुरआनमध्ये आणखीन २४ प्रेषितांचा उल्लेख आलाय. प्रेषित मुहम्मद (स.) यांची अंतिम प्रेषित म्हणून निवड करून आणि पवित्र कुरआनच्या माध्यमाने आपल्या अवतरणांची सांगता  करून ईश्वराने स्वत: आणि मनुष्याशी संवाद साधण्यासाठी कायमचा दुवा स्थापन केला आहे. तसेच मार्गदर्शनासाठी सदैव प्रकाशणारा दिवा उभारला आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी  शेवटचा धर्मग्रंथ पवित्र कुरआन मानवजातीस समर्पित केला, ज्यामध्ये ईश्वराच्या प्रेषितांच्या अलौकिक दर्जाचा उल्लेख आहे. संदेश पोहोचविणारा, मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तित्व.  त्यांनी आपल्या विधात्याकडून प्रेरणा घेऊन त्या अवतरणांच्या प्रकाशात या जगात बदल घडवून आणला. ते मानवजातीसाठी एक आदर्श मार्गदर्शक होते. मुहम्मद (स.) याच्या  आयुष्यातील घटनांद्वारेदेखील दुसऱ्या प्रकारचा बोध घडू शकतो.
इ. सनाच्या सातव्या शतकातील विशिष्ट अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणात प्रेषितांनी इस्लामच्या नीतीमत्तेनुसार श्रद्धा आणि मानवी समाज त्यांच्यातील  घटनांच्या अनुषंगाने कृती केली, प्रतिक्रिया दिली आणि स्वत:स अभिव्यक्त केले. त्यांचे आचरण आणि त्यांच्या वचनांचे विशिष्ट ऐतिहासिक व भौगोलिक परिस्थितींमध्ये अध्ययन केले असता त्यांचा मानवांबाबत बंधुभाव, स्नेह, अडीअडचणी, सामाजिक जीवन, न्याय, कायदे आणि युद्धाबाबत बऱ्याच सिद्धतांवर प्रकाश पडतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन आम्हांस  आध्यात्मिकतेचे आमंत्रण देते आणि आम्हांवर असे संस्कार घडवते ज्याद्वारे जगातल्या सध्याच्या घडामोडी, त्यातून उदयास येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हृदयापासून द्यावयाची आहेत,  फक्त बुद्धिमत्तेने नव्हे. ज्यास प्रेमाची जाणीव नसते त्याकडे सामंजस्य नसते. मुस्लिमांना कुरआन अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करण्यास सांगतो, ज्या मुस्लिमांशी असभ्यपणे वागतात.  आपल्या साहित्यामध्ये, चित्रपट आणि टी.व्ही.वरील कार्यक्रमांद्वारे रानटी, दहशतवादींच्या भूमिकांमध्ये दाखवतात. प्रेषितांचे कार्टून बनवतात आणि मीडियाद्वारे त्यांचा अपमान करतात.  (प्रेषित आणि इस्लामची) निंदानालस्ती, अवाजवी टीकाटिप्पणी किंवा गंभीर स्वरूपाचा विरोध होत असेल तर, श्रद्ध लोकांनी नैतिक संयम ठेवावा आणि आता संवेदनशील होऊ नये अशी  कुरआनची अपेक्षा आहे. प्रेषित मुहम्मद (स.) अत्यंत प्रभावशाली प्रवर्तक होते. त्यांच्या शिकवणींचा अभ्यास केला जातो. मार्गदर्शनाचे अनुसरण केले जाते. एक आदर्श ज्याचे अनुकरण लोक करतात आणि ज्यांची वचने. ज्यांच्या कृती आणि शांतपणा सर्वांना आवडतात आणि यावर मनन केले जाते. आपल्या जीवितकार्याच्या २३ वर्षांच्या काळात मुहम्मद (स.) यांनी  आध्यात्मिक आणि ऐहिक स्वातंत्र्याची वाट शोधत होते. त्यांना टप्प्याटप्प्यांनी ईश्वरी अवतरणे प्राप्त होत होती. दैनंदिन जीवन जगत असताना जणू सर्वशक्तिमान सर्वोच्च अल्लाह  त्यांच्याशी सर्वकाळ अनंतकालीन ऐतिहासिक संभाषण करत होता. ते आपल्या प्रियजनांबरोबर हसत खेळत राहात. एखाद्या गुलामास त्यांना काही बोलायचे झाल्यास ते त्याचे ऐकायचे.  शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्याबरोबर जायचे आणि त्याच्यावर प्रेमही करायचे. ते अल्लाहच्या मालकीत होते. कुणाच्या हातात हात दिला तर ते कधी प्रथम स्वत:चा हात मागे  घ्यायचे नाहीत आणि एखाद्याशी मवाळ वाणीने, प्रेमभावनेने बोलल्यास त्याच्या मनाला शांतता स्पर्श करते हे त्यांना ठाऊक होते. ते स्वत्वापासून मुक्त होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी  आवश्यक दोषरहित जबाबदाऱ्या पार पाडणे आणि नीतीमूल्याचे पालन करणे या अटी त्यांनी शिकविल्या. शांततेसाठी न्याय अपरिहार्य आहे आणि प्रेषितांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे की इतरांचा आदरसन्मान करू शकत नाही अशी व्यक्ती समता अनुभवू शकत नाही. कुरआनच्या अवतरणांनी प्रेषितांना मार्ग सुचविला आणि जसं आपण पाहतो, त्यांनी गुलाम, गरीब  आणि खालच्या स्तराच्या लोकांकडे विशेष लक्ष पुरविले. त्यांना प्रेषितांनी आपली प्रतिष्ठा व्यक्त करणे, आपल्या अधिकारावर हक्क सांगणे आणि न्युनगंडाच्या भावनेपासून सुटका करून  घेण्यास सांगितले.
लोकांना धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याकडे बोलविणारा त्यांचा संदेश होता. प्रेषितांच्या जीवितकार्याची सांगता झाली त्याप्रसंगी दयेच्या पर्वता (जबलर्रहमा) च्या पायथ्याशी  असलेल्या मैदानात सर्व जाती-वंशाचे, सभ्यतासंस्कृतीचे, सधन आणि निर्धन लोक उपस्थित होते. त्यांनी इस्लामचा संदेश ऐकून घेतला आणि तो संदेश म्हणजे मनुष्याची प्रतिष्ठा जात-जमात, संस्कृतीसभ्यता, रंगभेदावर आधारित नाही.

-शाहजहान मगदुम
( मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget