Halloween Costume ideas 2015
September 2020


रात्रीचा समय आहे. राजा बुद्धिगुप्त आपल्या महालातल्या मंचकावर पहुडले आहेत. सकाळपासून पंधरा पंधरा मिनिटांच्या तीन व्ही सी करून त्यांना प्रचंड थकवा आला आहे. चोवीस तासातला तब्बल पाऊण तास आपण राज्यासाठी दिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. त्या समाधानात राजे डोळे मिटून पडले असतांनाच मोबाईलची बेल वाजते. राजे सहसा कोणाचा फोन उचलत नसतात, पण त्या स्वांतसुखाय अवस्थेत अनावधानाने त्यांच्याकडून फोन उचलला जातो.
राजा बुद्धिगुप्त (डोळे मिटलेल्या अवस्थेत) - हॅलो, कोण बोलतंय ?
दुबईचा भाई - दुबई से भाई बोलता भिडू.
राजा बुद्धिगुप्त - अरे, ही काय चेष्टा करण्याची वेळ आहे का ? तू तर शिवाजी नगरला राहतोस ना, तिकडे दुबईला काय शॉपिंगला गेलास की काय ?
दुबईचा भाई - मजाक मत कर भिडू. हम दुबईवाला भाई बोल रयला है. वो तेरा शिवाजीनगरवाला भाई नही.
राजा बुद्धिगुप्त - बरं. बरं. तुम्ही जे कोणी असाल ते असाल, पण जरा मातृभाषेत बोला आणि असं एकेरीत काय बोलता, राजे आहोत आम्ही इथले. जरा मानपान देत चला.काही संस्कार वगैरे केलेत की नाही आई-बापांनी ? तुम्ही काय टी व्ही अँकर आहात की सिनेमातली नटी आहात ?
दुबईचा भाई - भिडू, मातृभाषा बोले तो यईच तो आपुन की मातृभाषा है. एक बात पुछु ? तुम्हारा बेटा मातृभाषा में पढा क्या ? और माफ करना भिडू, वो क्या है ना के आजकल सब तुमरेकू ऐसाची बोलते ना, तो आपुन भी बोल गया.
राजा बुद्धिगुप्त - बरं. बरं. आता तुमचं काय जे काम असेल ते आमच्या प्रवक्त्याला सांगा. मी असा फोन उचलत नसतो कोणाचा. आज चुकून उचलला गेला. हवं तर त्या बिहारी नागपूरकरांना विचारा.
दुबईचा भाई - प्रवक्ता ? ये क्या होता है ?
राजा बुद्धिगुप्त - प्रवक्ता माहीत नाही तुम्हांला ? अरे, प्रवक्ता म्हणजे जो आमचे निरोप दुसऱ्यांपर्यंत पोहचवतो, आमच्या वतीने बोलतो, आमच्यासाठी कोणाच्याही अंगावर धावून जातो, कोणालाही अंगावर घेतो, आमच्यावतीने सेटलमेंट करतो, तो.
दुबईचा भाई - अच्छा. अच्छा. बोले तो पंटर. हम लोग ऐसे आदमी को पंटर बोलते है.पर हम तुम्हारे पंटर से क्यू बात करे ? हम को तो तुमको धमकी देनी है.
राजा बुद्धिगुप्त - अरे, वेडा की खुळा तू ? आता तर मागच्या आठवड्यात धमकी दिली होतीस ना ? अशी परत परत काय धमकी देतोस, असं करायला तू नागपूरकर आहेस का रे ? आणि हे बघ तू मागच्या वेळेस धमकी दिलीस ना, तेंव्हाच आमच्या मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं की त्यांनाही अशा धमक्या येत असतात,पण ते घाबरत नाही कधी.
दुबईचा भाई - राजा बुद्धिगुप्त, भाई की बातोंको मजाक में मत लेना. हम तुम्हारा राजमहल बमसे उडा देनेवाले है.
राजा बुद्धिगुप्त - अरे, जोपर्यंत माझे तुंबई पोलीस आहेत ना, तोपर्यंत तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस . माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या तुंबई पोलिसांवर. हवं तर त्या नटमोगरी अंगणाला विचार. किती लोकांनी तिला धमक्या दिल्या होत्या तुंबईला येऊ नकोस म्हणून, तिचं थोबाड फोडणार होते, शिवाय ती माझ्या तुंबई पोलिसांवर खारसुद्धा खात होती ; तरीसुध्दा त्यांनी तिला खारपर्यंत सुखरूप पोहचवली !
दुबईचा भाई - तुमको सचमुच डर नही लगता ?
राजा बुद्धिगुप्त - अरे, मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे. मी तर म्हणीन की, मी असा लढाऊ असणार होतो म्हणूनच आमचे पिताश्री लढाऊ होते ! तुला मी अजिबात घाबरत नाही. नाहीच घाबरत मुळी. आणि घाबरणार तरी कसा तुला ? तू दुबईला राहतोस ना, दिल्लीला नाही ना राहत ?
तिकडून फोन कट केला जातो.

- मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
संपर्क -७८७५०७७७२८


Democracy

विधानसभेबाबत आपण फक्त आमदार निवडून देतो ज्या पक्षाच्या आमदार जास्त तो पक्ष विजयी होतो. त्यातील एकाची मुख्यमंत्री म्हणून निवड होते. कधी-कधी  तर दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात तर कधी दोन पेक्षा अधिक पक्षांचे राजकारण हे आम्हाला कळत नाही. राजकारण्यांचा अंतिम उद्देश सरकार स्थापन करणे हाच असतो. मंत्रिमंडळात मंत्रिपद कसे मिळेल यासाठी ते शत्रूलाही मित्र मानतात. निवडणुकीनंतर त्यांचे वैर संपते परंतु आम्ही मूर्ख कट्टर कार्यकर्ते म्हणून लोकांशी, आपल्याच  बांधवांशी राजकीय वाद विवाद करतो. आम्ही निवडणुकांत विवेकी नसतो हे मान्य करावे लागते. मागील दोन पिढ्यांपासून जे मतदारसंघाची दूर्दशा करतात विकासाऐवजी धर्मांधतेचे डोस देतात त्यांनाच आम्ही पुन्हा-पुन्हा निवडून देतो कारण काय असेल? मतदारसंघातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या सुटतात का? तरीपण निवडून देतो आम्हाला आमचे नेतृत्व दर पाच वर्षाला बदलण्याचे स्वातंत्र्य असते कदाचित लोकांना याचा विसर पडतो. जर तुमचा नेता काम करीत नसेल तर तो बदलण्याचा अधिकार निवडणुकीत मतदारानां मिळालेला आहे पण या अमुल्य मताचा वापर आम्ही करतो का? समाजाचे नेतृत्व करणारे नेते निवडताना आम्ही त्यांची योग्यता पाहत नाही.
    युवकानी जागृत झाले पाहिजे व विचार केला पाहिजे, पुरोगामीही युवकांची दिशाभुल करतात. अनेकांचे लिखान जमातवादाकडे झुकत चालले आहे. आज महाराष्टात जमातवादी लिखान पुरोगामी लेखनीतून मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या पुरोगाम्यांच्या विचारांची ही चिकित्सा होणे गरजेचे आहे. धर्मनिरपेक्ष देशात विचारांची सूट असते. पुरोगाम्यात समाजवादी, मार्क्सवादी, गांधीवादी, अंबेडकरवादी इत्यादि विचारधारा आहे व यांच्यात खुप वैचारिक मतभेद आहेत. ज्यातून हल्ली वाद निर्माण होत राहतात. या मतभेदातून प्रतिगामी विचारधारा भक्कम होत आहे.
    युवकांनी विवेकवादी व मानवतावादी असायला हवे . प्रतिगामी विचारधारेने पुरोगाम्यात फुट पाडण्याचा सफल प्रयत्न केला आहे. आज फुटाफुटीचे राजकारण होत आहे, ज्या प्रकारे प्रत्येकजण आपला महापुरुष निवडून त्याचीच जंयती साजरी करतात व एकसंघ राहण्याऐवजी जातीत विखरतात. त्याच प्रमाणे प्रत्येक विचारधारेने आपले स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले आहे .
    भारतीय राजकारणांची दूसरी बाजू अशी ही आहे. आज ही भारतात काही प्रमाणात का असेना कायद्याचे रक्षणकर्ते आहेत. आज ही काही प्रमाणात प्रामाणिक व कर्तृत्वान नेते आहेत.  ज्यांचे चरित्र निष्कलंक असून ज्यांच्यात स्वार्थी भावना नाही. समाजात त्याना मान ही मिळते, हे राजकारणी जरी असले तरी ते समाजकारणी असतात व ते नेहमी समाजाचाच विचार करतात. असे थोडेच मोजके लोक आहेत जे चांगले आहेत. नेतृत्व समाजाला लाभते म्हणून आज आमचा लोकशाही व निवडणुका यावर विश्‍वास आहे. हे राजकारणी समाजाकडे विकासाच्या दृष्टीने बघतात. शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिकस्थिती सुधारून लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल याचा विचार करतात. असे राजनेते कमी आहेत पण  अनेक  समाजसेवक राजकारणात येण्यास उत्सुक असतात. त्यांना आपले नेतृत्व करण्याची संधी द्या .समाजसेवी लोकांना निवडणुकीत उभे करा .त्यांना निवडून आणा ते तुमच्या स्थिती बदल करू शकतील.
    आजच्या माझ्या या युवा पिढीला सांगु इच्छितो की, आज युवा पिढी धर्मांध नेत्यांच्या विचारांच्या आहारी गेली तरी अनेक युवक हे समाज प्रबोधन करतात. लोकांना जागृत करून त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देतात., असे युवक कमी असले तरी त्यांचे काम हे उल्लेखनीय आहे.
    आपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा. हुकूमशाही पेक्षा लोकशाही कधीही श्रेष्ठ आहे. पैशाच्या व गुंडगिरीच्या आधारे लोक निवडून येतात परंतु निस्वार्थी समाजसेवा करणारे ही आहेत व नविन नेतृत्व करण्यासाठी लोक पुढे येत आहेत.
     वरील सर्व लिखाणातून मी देशात धर्मांधता वाढत आहे हे  सांगीतले. परंतु धर्माची निंदा केली नाही. सर्वधर्म मला सारखे आहेत. परंतु जेव्हा चिकित्सा करतो तेव्हा पक्षपात करीत नाही. व्यक्तिगत जीवनात  धर्माला मी महत्त्व देत नाही, परंतु लोकांनी ही देेऊ नये असा आग्रह नाही . भारताला समाजसुधारकांची एक दीर्घ परंपरा लाभली. ज्यात त्यांनी धर्मातील रूढी- परंपरा वर टीका केली व सुधारणा केली, परंतु त्या काळी लोकांनी त्याचा थोडा का होईना स्वीकार केला परंतु आज धर्माची चिकित्सा करणे शक्य नाही त्यातील एक म्हणजे लोकांची मानसिकता  की धर्म कसेही असो यावर बोलूच नये.
    मुळ वाद हा नाही की लोक धार्मिक आहेत. सांगायचे हेच की लोकांच्या श्रद्धेचा, भावनांचा , राजकारण्यांनी फायदा उचलवू नये. आज भारताचे जे काही राजकारण होते ते धर्माच्या आधारे होत आहे. विशिष्ट धर्मातील एक व्यक्ती किंवा एक व्यक्ती समूहाने सामाज विघातक कृत्य किंवा देशद्रोही कृत्य केले, तर सबंध समाजाला वेठीस धरणे धरले जाते. परंतु तो व्यक्ति किंवा समूह हा संपूर्ण धर्म व त्या धर्मातील संपूर्ण व्यक्ती नाहीत हे लक्षात घेतल्या घेतल्या जात नाही,  त्यामुळे राजकारणी या मुद्द्यांच्या आधारे आपले स्वार्थ साध्य करीत असतात.
    गाव शहरापासुन पासून पाचशे ते हजार किलोमीटर दूर एक शहरात जातीय संघर्ष निर्माण झाला तर याचे पडसाद व परिणाम या गावापर्यंत येतात. वर्षानुवर्ष एकत्र  राहिलेल्या लोकांत दुरावा निर्माण होतो. कारण त्या गावातील लोक जाती-धर्माच्या व्यक्तीचे समर्थन करतात ते पण वास्तविकता माहिती नसताना. मुळात गरजच काय असते?
    भारत हा एकमेव असा देश आहे की जेथे विविधता तर पहावयास खूप मिळेल पण एकता ही आहे. प्रत्येक व्यक्तिला स्वधर्माचा अभिमान आहे धार्मिकआचरण स्वातंत्र्य सर्वांन च असतात. त्यामुळे कोणीही स्वधर्म अभिमान व इतर धर्मीयांकडे संशयित नजरेने पाहू नये. असो भारतात धार्मिक विविधता तर आहे त्याच बरोबर सांस्कृतिक विविधता आहे मैल-मैल अंतरावर भाषा व संस्कृती बदलते. त्याचबरोबर भारतात जातीय विविधता आहे , भारतीय समाज अनेक जातीत विखरललेला आहे.  धर्म, जात ,भाषा, संस्कृती इत्यादींचा लोकांना अभिमान असतो व असायलाच हवा गेल्या हजारो वर्षा पासुन  यातील अनेक मूल्यांनी समाजाला एकसंघ केले आहे.
     जगात कोणताही असा धर्म नाही जो नैतिकता सांगत नाही.  मुळ धर्मांची निर्मिती ही नैतिक मूल्यांची व सद्गुणांची शिकवण देण्यासाठीच झाली. धर्माच्या नावाखाली लोक हिंसेच्या मार्गाचा अवलंब करी असतील तर त्याच लोकांच्या श्रद्धेचा , आस्थेचा उपयोग मूठभर लोक आपल्या स्वार्थासाठी करीत असतील तर हे योग्य नाही.
    भारतीय लोकांत धर्म जात खोलवर रूजल्या गेली आहेत.  हिंदू- मुस्लिम  किंवा इतर कोणत्याही धर्माचे अनुयायी असो त्यांच्या मनात हे  रुजवले गेले की, आपला धर्म आपली श्रद्धास्थाने आपली उपासनागृहे संकटात आहेत. वास्तविकपणे सामान्य लोकांना दोन वेळच्या अन्नाची गरज असते परंतु जेव्हा हे विचार त्यांना सांगितले जातात त्यांच्या श्रद्धेला धक्का बसतो व ते त्या विचारधारेच्या समर्थनात पुढे येतात.
    कट्टरवादी ,धर्मांध व जातीयवादी लोक प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे अशा धार्मिक गोष्टींकडे लक्ष देऊ नये. विवेक बुद्धी आता तरी लोकांनी वापरून यांच्या राजकारणांची व विचारांची चिकित्सा करावी.
    आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. हजारो खाजगी शाळा उघडल्या जात  आहेत. त्याच बरोबर सरकारी शाळेचा दर्जा खालावला आहे असा समज समाजात निर्माण झाला असून हे पुर्णता: सत्य नाही.
    जरी काही प्रमाणात दर्जा खालावला असला तरी सरकारी शाळेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी,सेमी यातुन श्रीमंत व मध्यमवर्गीय मुले शिकत आहेत परंतु गरीब मुलाना पर्याय नाही. या व्यवस्थेत गरीबांची मुले तर दर्जेदार शिक्षण घेण्यापासुन वंचित आहेत.
 सरकार ने शिक्षण सक्तीचे व मोफत केले तरी अनेक गरीब कामगार वर्ग व अल्पभुधारक यांची मुले जरी शाळेत जात असले तरी त्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण खुप कमी  आहे. बाल मजुरी कायदा असुन ही लहान मुले काम करतात.ही समाजातील विषमता राजकारण्यांना व पुरोगाम्याना दिसत नाही का?
    या कोरोना संकटामध्ये कामगार हजारों किलोमीटर पायी चालले, लोक मेले लोकांची उपासमार झाली, तरी या व्यवस्थेतील लोकांच्या काळजाला पाजर फुटले नाही. मार्क्सवादी विचारधारेच्या लोकांनी तर विषमता व वर्ग संघर्ष यावर बोलावे परंतु पाहिजे त्या प्रमाणे मार्क्सवादीही या व्यवस्थेला प्रश्‍न करतांना दिसत नाही. त्यांच्यात धाडसी मोजकेच लोक आहेत.
    आज लोकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे प्रत्येक धर्म जातीतील लोक एकमेकांच्या कडे संशयित नजरेने पहात आहेत .अशा प्रकारे संशयित नजरेने  पाहतात तेव्हा आमच्या सारख्याना चिंता व खूप :ख होते. म्हणून लेख लिहीत रहावे लागते थोडे का होइना लोक विचार करतील. पूर्वी काही प्रमाणात का असेना धर्मांधता व जातीयता होती लोक होते, परंतु आता खूपच भयानक परिस्थिती निर्माण झाली. यास धर्मांध राजकारण काही प्रमाणात कारणीभुत आहे पण यासाठी जास्त जबाबदार आमची मानसिकता आहे.     
    धर्मांध लोकांनी येथील सामान्य लोकांची मने दुषित केली. पुर्वी  खेड्या गावात तर पूर्वी लोक गणपती उत्सवात आनंदाने सामील व्हायचे एकत्र दिपावली साजरी करायचे. ईद असो वा इतर  मुस्लिम सन हिंदू बांधव आनंदाने एकत्र यायचे. भारतीय सण हे एकात्मतेचे प्रतीक होते जे आज वादाचे मुद्दे झालेत.
    मी  दर वर्षी  राखी बांधून घेतो. हे आमच्या अभिमानाच्या जागा नष्ट करून पाहणार्‍या लोकांची मानसिकता लवकरात लवकर लोकांच्या लक्षात यावीत नाही तर   खूप वेळ निघून जाईल. तेव्हा ह्या आमच्या  अभिमानाच्या जागा नष्ट करू पाहणारे लोक सर्रास समाजात दिसून येतात परंतु आम्हीच का  बदलून गेलो यांच्यामुळे? का एकमेकांकडे संशयित नजरेने पाहतो? मैत्री स्नेह व एकमेकांच्या सुख-:खात सहभागी झालेले विसरून गेलोत व जात आहेत. पूर्वी शिक्षणाचे प्रमाण कमी होते स्वातंत्र्यापूर्वी तर हे प्रमाण खूपच कमी होते  पुर्वी अडाणी लोक होते  परंतु ते कधी इतक्या प्रमाणात धर्मांध व जातीय राजकारणाला बळी पडलेले दिसत नाही. आज आम्ही पदव्युत्तर शिक्षण घेऊनही व समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढूनही वैचारिकदृष्ट्या निरक्षरच आहोत, या शिक्षण प्रणालीतुन आम्ही विवेकवाद शिकलोच नाही असे जाणवते. मानवतावादी मूल्यं आजच्या युवा पिढीला माहीत नाहीत काय ? फायदा काय त्या शिक्षणाचा ज्यातून राष्ट्राच्या विकासाला हातभार लागत नाही उलट धर्मांध राजकारणाला बळी पडून आम्ही मानवता विसरून गेलो.

- नजीर महेबूब शेख  
9561991736


Education

आज सोशल मिडीया व विज्ञान तंत्रज्ञान युगात संगकण, मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, किंडल, प्रिंटर, इत्यादी साक्षर असणे आवश्यक झाले आहे तसेच व्हाट्सअप, फेसबुक,  युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर व ई-मैल वापरण्याची क्षमता देखील. सोशल मिडीयाचा वापर आज अभ्यास करतांना होत आहे. इंटरनेटवर लाखो-करोडो ई-स्वरूपातील वाचन साहित्य उपलब्ध आहे. आज विध्यार्थी, शिक्षक आणि ग्रंथपाल ई-साहित्य हे संगणक, मोबाईल किंवा किंडलवर वाचतांना दिसत आहे. संगणकाचा किंवा इंटरनेटचा वापर परीक्षा घेतांना होत आहे. उदा. नेट-सेट, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., नीट, गेट, रेल्वे, एस.एस.सी. अशा वेगवेगळ्या परीक्षा हे ऑनलाइन घेतल्या जात आहे. खंरतर संगणक व इंटरनेटचा वापर वाढतच चालला आहे तसेच भविष्यात पण ते वाढतच जाण्याची शक्यता आहे; यात काहीच शंका नाही. त्यामुळे संगकण, इंटरनेट, मोबाईल यांचा वापर किंवा यांच्याशी मैत्री करणे आवश्यक झाले आहे. सोशल मिडीयाचा वापर करायला शिकणे व वापर करणे हे खंरतर आपल्या हितासाठीच असणार आहे. 

स्मार्ट विध्यार्थी
आज विद्यार्थांचा विचार केलात तर अभ्यास करणे, फार्म भरणे, परीक्षा देणे, निकाल पाहणे इत्यादी ऑनलाईन पध्दतीने होत आहे. मग ते यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. असो किंवा ईतर कोणतीही. यासर्व परीक्षा आता ऑनलाइन स्वरुपात घेण्यापासून तर निकाल लावे पर्यंत ऑनलाइन माध्यमातूनच चालत आहे. याच बरोबर प्रवेशपत्र काढणे, मुलाखती पत्र पाहणे, ई-मैल पाठवणे, एस.एम.एस.पाठवणे, डाऊनलोड करणे इत्यादी आता ऑनलाइन मार्फत केल्या जात आहे. याचबरोबर निवड झाली कि नाही. झाली असेल तर पुढे जाऊन प्रशिक्षण, वेळापत्रक, होमवर्क हे ई-मैल वर पाठवले जातात. त्याच बरोबर ऑनलाइन वर्ग, ऑनलाइन सेमिनार, व्याख्याने, कार्यशाळा, प्रात्यक्षिक इत्यादी ऑनलाइन माध्यमातूनच घेतल्या जात आहे. पुढे प्रशासनात, शिक्षणिक क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात किंवा ईतर क्षेत्रात संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट, डेस्कटॉपचा वापर वाढतच चालला आहे. ई-गव्हर्नंस, ई-साहित्य, ई-मैलचा जमाना आला आहे. त्यामुळे या साधनांचा किंवा  गोष्टींचा वापर आपण आतापासून करायला हवा. आपण जर आज विध्यार्थी, लेखक, शिक्षक, संपादक किंवा ईतर लोकांच्या मुलाखती, लेख वाचल्या तर सामाजिक दृष्ट्या ऑनलाइन क्षेत्रात वाढच होतांना दिसत आहे. आज शाळा पासून तर विध्यापीठ पर्यंत आणि सरकारी ऑफिसेस पासून तर बाजारपेठ पर्यंत मोबाईल, इंटरनेट किंवा संगणकाचा वापर होत आहे. 

संगणक व स्मार्टफोनचा वापर
आज लहान बाळा पासून तर वयोवृध्द पर्यंत सगळ्यांकडेच मोबाईल, संगणक, इंटरनेट किंवा स्मार्टफोन आहेत. त्यात आपण व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटवर व ई-मैल इत्यादीसाठी इंटरनेटचा वापर कायम करतच असतो. पत्र व्यवहारचे युग मागे पडून स्मार्टफोन व इंटरनेटचे नवेयुग आले आहे. म्हणजेच माहिती मिळवणे आपल्यासाठी आता कठीण राहिलेलं नाही. आपल्याला हवी ती माहिती आपण कुठेही, केव्हाही आणि कधीही मिळवू शकतो. संपूर्ण समाजाच आज गुगलमय झाला आहे. मात्र  आपल्याला नको इतकी माहिती सतत मिळतच  असते. ही आपली आज समस्या  झाली आहे. मात्र नेट-सेट, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., नीट, गेट, रेल्वे, एस.एस.सी. असा बऱ्याच परीक्षांमधील अनेक प्रश्न व उत्तरे हे पुस्तकातून न येता ते थेट काही ठराविक किंवा महत्वाच्या वेबसाईट्स वरून येतात असे दिसून आले आहे. आज सवर्च ठिकाणी इंटरनेट व संगणकाचा सर्रास वापर होत आहे. यामध्ये न्यूजपेपर, न्यूज, मासिके इत्यादी. वर्तमानपत्र, न्युज, मासिकेसाठी स्वातंत्र्य वेबसाईट आहेत. दैनदिन वर्तमानपत्र, मासिके वाचण्यासाठी वेगवेगळे अॅप आहे. उदा. वर्तमान पत्रातील लेख, संपादकीय, विशेष लेख इत्यादी. याच बरोबर बातम्या पाहण्यासाठी वेबसाईट किंवा चैनल आहे. कशा प्रकारे इंटरनेटचा परिणाम कारक वापर कसा करता येईल. ब्लॉग, सरकारी-खाजगी वेबसाईट्स, ई-पुस्तके किंवा अॅप यांचा संदर्भात विचार करू. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थांना काही ब्लॉग किंवा काही सरकारी वेबसाईट्स आहेत. उदा. महा पोर्टल, एस.एस.सी. पोर्टल इत्यादी. याचबरोबर काही वेबसाईट्स यशस्वी लोकांच्या मुलाखती, व्याख्याने, व्हिडीओ, महत्वाच्या पुस्तकांची सुची किंवा मार्गदर्शन पत्र उपलब्ध आहे. अर्थात या वेबसाईट्सवर अर्थशास्त्र, विज्ञान, चालु घडामोडी, भुगोल, इतिहास, राज्यशास्त्र, गणित इत्यादी विषयांची माहिती किंवा व्याख्याने असतात. पण याचबरोबर इंटरनेट वर जास्त वेळ घालू नाही हे कायम लक्षात ठेवावे. आज सरकारी खात्याच्या, खाजगी खात्याच्या, मनोरंजनात्मक, मार्केट खात्याच्या अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट्स आहे. उदा. अर्थ खात, डिफेन्स, यु.जी.सी., ग्रंथालय, सिनेमा, महिला खात, बिग-बाजार, डी-मार्ट इत्यादी. अशा अनेक वेबसाईट्सवर उपयुक्त अशी महत्वाची माहिती असते. विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न शक्यतो या वेबसाईट्स वरून येत असतात. पुस्तका शिवाय आपण या वेबसाईट्स वरील माहिती वाचून अभ्यास करू शकतो. उदा. एन.टी.ए., नेट-सेट, राज्यसेवा आणि लोकसेवा यांच्या वेबसाईट्सवर प्रश्न प्रत्रिका, उत्तर प्रत्रिका, अभ्यासक्रम इत्यादी उपयुक्त माहिती असते. याचबरोबर जनगणने नुसार लिंग गुणोत्तर, स्त्री-पुरुष, लोकसंख्या, इत्यादी माहिती मिळतात. सरकारने राबविलेल्या विविध योजना व त्या योजनाची तपशील माहिती ह्या पण वेबसाईट्सवरच असतात. समाजातील चालुघडामोडी आपण लोकराज्य, योजना, अशा विविध मासिकांतून माहिती मिळवू शकतो. यासर्व मासिकांच्या स्वतंत्र वेबसाईट्स आहे. एक तर आपण ऑनलाइन किंवा पी.डी.एफ. फाईल मध्ये डाऊनलोड करून वाचन करू शकतो. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र इत्यादी हातात घेऊन वाचण्याचा आनंदच वेगळा असतो. पण अनेकदा आपण प्रवास करतांना, वाट पाहतांना, रिकाम्या वेळेत, पायी जातांना किंवा ईतर बऱ्याच वेळी आपल्याकडे पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र नसतात. त्यावेळी ई-न्यूजपेपर, बातमी, व्हिडीओ, संपादकीय लेख, विशेष लेख, हास्य कथा, बाल कथा इत्यादी ऑनलाइन पाहू शकतो किंवा वाचू शकतो. म्हणजेच कोणत्याही वेळी, कुठेही, केव्हाही, कधीही यास्वरूपातील माहिती वाचुन आपला वेळ वाचवू शकतो. काही ठिकाणी वेबसाईट्सवर आपण सूचना पण देऊ शकतो, त्यामध्ये बदल करू शकतो, डाऊनलोड करू शकतो. आपल्या कडील स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट, मोबाईल यांचा सर्वोत्तम वापरून करून घेण्यासाठी आपण किंडल सारखे पी.डी.एफ. रिडर डाऊनलोड करून सगळ्या प्रकारचे ई-साहित्य वाचू शकतो. कितीतरी महत्वाचे सरकारी, शैक्षणिक, खाजगी इत्यादी स्वरूपातील रिपोर्ट-अहवाल पी.डी.एफ. स्वरुपात वेबसाईट्सवर उपलब्ध असतात. याशिवाय अनेक ग्रंथालय ई-स्वरुपात आहे उदा. एन.डी.एल. डी.ओ.ए.जे. इत्यादी. याचप्रमाणे एन.सी.ई.आर.टी., इग्नू, वाय.सी.एम.ओ.यु. सारख्या संस्था-विद्यापीठ. लाखो-करोडो ई-स्वरूपातील पुस्तके, लेख, मासिके, प्रबंध इत्यादी हे ग्रंथालय नेटवर्कवर उपलब्ध आहे उदा. इन्फ्लीबनेट, डेलनेट, ओ.सी.एल.सी. इत्यादी. विध्यार्थांना किंवा शिक्षकांना संदर्भासाठी किंवा वाचालायला ह्या ई-स्वरूपातील साहित्य पी.डी.एफ स्वरुपात डाऊनलोड करून हार्डडिस्क किंवा स्मार्टफोन वर सेव/स्टोर करू शकतात. आता तर विधयार्थांनी वेगळाच अभ्यास करण्याचा मार्ग शोधला आहे. उदा. इंटरनेटवर, स्मार्टफोनवर, ई-ग्रंथालाय मध्ये ऑडीओ-व्हिडीओ व्याख्याने ऐकतात-पाहतात. त्याचबरोबर ऑनलाइन व्याख्याने, कार्यशाळा, प्रात्याक्षित ऐकतात. ऑनलाइनच नोट्स काढतात व वाचतात. पी.डी.एफ. फाईल डाऊनलोड करतात उदा. चालू घडामोडी समजावून देतांना अशा व्हिडीओजचा फायदा अनेकदा होतो. अतिशय गुंतागुंतीचे, अवघड, कठीण प्रश्न सोडवतांना किंवा समजाऊन सांगतांना या ऑनलाइन व्हिडीओ चांगले उपयुक्त पडतात. उदा. गणित सोडवतांना सूत्रे, भागाकार,गुणाकार, वर्गमूळ, वर्गसंख्या इत्यादी. 

स्मार्टफोन व इंटरनेटच्या वापरातील अडथळे
कोणतीही चांगली गोष्ट करायला गेलो कि अडथळे येतातच. आपल्याला एखादया चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर त्या वाटेवरचे अडथळे आपल्याला माहित असायला पाहिजे. उदा. आपला पाय घसरू शकतो, खड्डे कसु शकतात इत्यादी. त्याचप्रमाणे स्मार्टफोन, इंटरनेट, संगणक इत्यादी अभ्यासाठी वापरात असतांना अडथळे माहित असायला पाहिजे. इंटरनेट वरील माहिती कोणती योग्य किंवा अयोग्य आहे; माहिती ओळखणे. इंटरनेटवर माहितीचा वाढता विस्फोट पाहता आपण त्या माहितीच्या भांडारात गोंधळून जाऊ शकतो. म्हणुनच माहिती शोधतांना योग्य बुलेटिन्स वापरून माहिती शाधावे. दर सेकंदाला लाखो-करोडो माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध होत आहे. कायम काही मिनिटात आपण वर्तमानपत्र, मासिके, बातम्या, चालु घडामोडी, सरकारी, खाजगी इत्यादी वेबसाईट्सवर फेरफटका मारून चेक करत असतो. याचप्रमाणे व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटवर व ई-मैल या अॅप किंवा वेबसाईट्सवर जाऊन चेक करणे. अशा विविध गोष्टीमुळे आपण अभ्यासात अपयशी ठरू शकतो. कायम आपल्या डोक्यात इंटरनेट कशासाठी वापर करावा? हा उद्देश ठेऊन आपण इंटरनेटचा वापर योग्यप्रकारे करावे. नाहीतर इंटरनेटवर वेगवेगळ्या आकर्षक वेबसाईट्स आहेत. उदा. सिनेमा, गाणे, फिल्म स्टार्सच्या बातम्या, कब्बडी, कुस्ती, पोर्नोग्राफिक इत्यादी अनेक वेबसाईट्सवर करमणुकीचे व्हिडीओ आहेत. म्हणुन या चक्रात आपला वेळ न घालवता योग्य व अयोग्य मधला फरक समजून माहितीचा वापर करावा. नाही तर याचक्रात वेळ कसा गेला तो आपल्याला समजणारच नाही. एकदा जर का परीक्षेत अपयशी झालोत तर पुन्हा कमीत कमी तरी एकवर्ष आपल्याला वेळ व लक्ष देऊन पुन्हा अभ्यास करावा लागतो. खंरतर इंटरनेटवर जातांना आपल्याला नक्की कोणती माहिती पाहिजे किंवा किती वेळ लागेल. हे आधी ठरवले पाहिजे. एकदा जर का माहिती मिळाली कि पुन्हा अभ्यासात परत येणे हि सवय लावणे. अन्यथा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स आहे. आपण एका वेबसाईट्स वरून दुसऱ्या-तिसऱ्यावर कधी पोहचतो ते आपल्याला पण कळत नाही. नुसत माहिती शोधण्यामध्ये उड्या मारत बसतो. व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटवर व ई-मैलवर टाकले जाणारे प्रश्न किंवा व्हिडिओ कामाचे आहे कि बिनकामाचे हे ठरवणे. नाही तर आपला बऱ्हाच वेळ जाऊ शकतो. शक्यतो ठराविक माहितीच्या वेबसाईट्स, लिंक, प्रश्नच ग्रुपवर शेअर किंवा दुसऱ्याला पाठवावे. अर्थात कारणा शिवाय इंटरनेटवर किंवा स्मार्ट फोनवर फेरफटका करत बसण्याची सवय लागल्यास आपण आपल्या उद्दिष्ट किंवा धैय्य पासुन दूर जाण्याची शक्यता आहे. नेहमी हेतुपूर्वक, हवी असलेली माहिती इंटरनेट वरून गोळा करणे महत्वाचे.  
  
वैयक्तिक अनुभव
“मी आता पर्यंत पाच हजार ग्रंथालयांना भेटी दिल्या आहे”आतापर्यंत मला एकही ग्रंथालय असा आढळून आला नाही कि तिथे या साधनांचा वापर होत नाही. मी स्वत: शाळा, महाविद्यालय, कॉलेज, विध्यापीठ, सार्वजनिक ग्रंथालय, संस्था, विशेष ग्रंथालय किंवा ईतर ठिकाणी प्रात्यक्षिक, कार्यशाळा किंवा परिषेदमध्ये हजारापेक्षा जास्त व्याख्याने आज पर्यंत दिले आहे. आज विध्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये, शैक्षणिक परीक्षेत यश मिळवण्यासाठी मोबाईल, संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर करत आहे. त्यांना फायदेशीर पण ठरत आहे हे सिद्ध झालेले आहे.

प्रा. राहुल भिमराव राठोड (पुणे)
मो. नं. ९५०३२०३६९५


Student

सध्या कोविड 19 या आजाराने थैमान घातलं असतांना काही देश,   शाळाचालक,  विद्यापीठ  शाळा सुरु करण्याची घाई करतं आहेत. किंवा त्यावर  विचार करतं आहेत. नुकतंच अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्स ने. एका अहवालात आकडेवारी जाहीर केली कि जुलै च्या शेवटच्या  फक्त पंधरा दिवसात अमेरिकेत 97000 हजार मुलांना कोरोना लागण झाली.  फक्त पंधरा दिवसात वरील आकडा आला. आज पर्यंत अमेरिकेत  एकूण संक्रमित 50 लाख लोकां मध्ये  तीन लाख अडतीस हजार मुलं कोविड संक्रमीत झालीय. याचा अर्थ संक्रमण मुला मध्ये पण वेगाने पसरतंय.   जर शाळा सुरु करण्याची भारतात घाई झाली तर. विध्यार्थी जीवाशी खेळ होईल असंच वाटतं कोरोना पूर्ण नियंत्रण मिळाल्या शिवाय परिस्थिती आटोक्यात आल्या शिवाय मुलांच्या जीवाशी खेळू नये असं वाटतं. ठोस औषध, लस तयार झाल्या शिवाय शाळा सुरु करण्याचं मनात आणलं तरी येणारी पिढी तारुण्यात, लहानपणी आजाराच्या खाईत लोटल्या सारखं होईल. शासनाने या गोष्टी चा विचार पूर्वक निर्णय घ्यावा. शाळा संस्था शाळा सुरु करण्याचा विचार करतं आहेत. ते चुकीचंच ठरेल असं वाटतं. अगोदरच लहान मुलांची मानसिक स्थिती कशी झालीय या लॉकडाऊन मुळे आपण सांगू शकत नाहीत. गेले चार महिने मुलं घरात आहेत त्यांच्या मनाचा विचार कोणी करतांना दिसतं नाही. सर्वात जास्त लॉकडाऊन नियम पाळले असतील तर लहान मुलांनी आणि  तरुण पिढीने. जरी कंटाळलीत मुलं पण याही वयात परिस्थिती जाण एक अनामिक भीती युक्त वातावरणात जगत असतांना. छान घरातच अभ्यास विविध घरगुती कलाकृती साकारत आहेत. सकारात्मक विचार करतांना मुलं दिसताय. हट्ट कमी झाला मुलांचा असं वाटतं ज्या वयात खेळण शाळेत जाण हवंय त्या वयात घरात आहेत बिचारी. पण संयम त्यांच्या कडूनच शिकायला आज मिळतोय हि जमेची बाजू दिसतेय. परिस्थिती बरोबर लढाई कशी करायची आजच गुण त्यांच्या अंगात दिसतात असंच वाटतं. जरी आईवडील मानसिक तणावात असतील तरी मुलांनी धीर सोडला नाही. हि सर्वा साठी जमा बाजू. शिक्षणाचं होतंय नुकसान ग्रामीण भागात, गरीब कुटूंबातील विध्यार्थी आज सुरु असलेली ऑनलाईन शाळा काय असते हे हि त्यांना माहित नसेल किंवा नाही  कदाचित. पण ज्यांच्या कडे मोबाईल आहे त्यांच्या घरी मुलांचा अभ्यास सुरु झाला काही प्रमाणात. अभ्यासात झालेलं नुकसान भरून काढता येईल विविध मार्गाने अतिरिक्त जादा अभ्यास करून  पण जीवाचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. त्याच साठी संयम ठेवून निर्णय व्हावेत. आजच लॉकडाऊन पूर्ण  उपयोगी ठरला नाही काही अंशी त्यात  नियम पूर्ण क्षमतेने पाळले गेले नाहीत  म्हणून रुग्ण संख्या झपाट्याने वाटतेय देशात.पुन्हा पुन्हा लॉकडाऊन निर्णय घेतले जातं आहेत.  सापसीडी सारखं झालं पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येऊन पडतो. जितकं वरती जायचा प्रयत्न  तितकं खाली येऊन पडतो शिडी चढलो कि साप गिळनकृत करतो चडतच नाहीत आपण. शाळा सुरु झाल्या तर लहान मुलांना येणाऱ्या पिढीला महामारीत स्वता हुन ढकलून देण्या सारखं होईल. म्हणून सरकारी निर्णय घेतांना घाई होणार नाही खात्री आहे.केंद्र राज्य  सरकार मध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक तज्ञ आहेत योग्य विचाराअंती निर्णय होईल यात शंका नाही. पण "अति घाई संकटात नेई "  हे लक्षात ठेवून निर्णय व्हावेत शाळा सुरु करण्या बाबत असं माझं मतं मांडले. अमेरिकेत मुलांन मध्ये वाढत असलेलं संक्रमण चिंतेची बाब तेथे घडतं असलेली चूक ईतर देशात किंवा भारतात होऊ नये म्हणून लिहण्याचा प्रपंच..

प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
9922239055.


स्वातंत्र्य ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते. कुठेही राहण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे, हवा तो जीवनसाथी निवडण्याचे, हवे ते वाचण्याचे, लिहिण्याचे, प्रकटीकरणाचे असेही स्वातंत्र्य हवे असते. स्वातंत्र्याची कल्पना कितीही विस्तारता किंवा आक्रसता येते.
माणूस ज्या कुठल्या परिस्थितीत असतो, त्यात तो सतत स्वत:ला घडवत, बदलत राहण्याचा प्रयत्न करतो. हे मनुष्यप्राण्याचे वैशिष्ट्यच आहे. यासाठी त्याला जे पर्याय असतील, त्यातील हवा तो पर्याय निवडता येत असेल, तर तो मनुष्य स्वत:ला स्वतंत्र अथवा मुक्त समजतो. भोवतालची परिस्थिती किंवा अन्य व्यक्ती त्याच्यासाठी पर्याय ठरवत असेल, तर तो स्वत:ला स्वतंत्र किंवा मुक्त समजत नाही. स्वातंत्र्याची कल्पना ही व्यक्तीगणिक वेगळी असते. हजारो वर्षे माणूस म्हणून उत्क्रांत होताना झालेले संस्कार आणि एक व्यक्ती म्हणून समाजात वाढताना, वावरताना होत राहणारे संस्कार यांतून स्वातंत्र्याची कल्पना निर्माण होते. कधी कधी एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र्याची कल्पना हीच अनेक प्रकारचे बंधकत्व दाखवत असते; पण ते त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी म्हणून वावरणारी व्यक्ती म्हणेल, की माझ्या मनावर अमुकच भाजी करण्याचे दडपण नसते; कारण मला आमच्या घरी कुठलीही भाजी करण्याचे स्वातंत्र्य आहे. एखाद्या पिंजऱ्यातील पक्ष्याला आपल्याला पिंजऱ्यात कुठेही बसण्याचे स्वातंत्र्य आहे, असे वाटण्याचे स्वातंत्र्य असू शकतेच की! असे लहानमोठ्या पिंजऱ्यांत माणसे स्वातंत्र्य उपभोगत असतात. एखाद्या व्यक्तीला घरामधे, कामाच्या किंवा इतर ठिकाणी जाणवणारे स्वातंत्र्य आणि बंधकत्व जेव्हा लक्षात येते, तेव्हा तो अंतर्मुख होतो. एका समग्र अशा स्वातंत्र्याचा विचार करू लागतो. त्याच्या लक्षात येते, की दिसण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे बाह्य स्वातंत्र्य जसे आहे, तसेच आपल्या आतही एक स्वातंत्र्य किंवा मुक्ती माणसाला हवी असते. मनातील वेगवेगळ्या प्रकारचे भय, मनाला झालेल्या जखमा, चिंता, दु:ख, काळज्या यांपासूनही मुक्तता हवी असते. यासाठी मानसिक शक्तीची गरज असते. ती कमी पडली, की माणूस गुरू, ईश्वर नाहीतर समुपदेशक अशा कुणाकडे तरी वळतो.
कधी कधी एखाद्या व्यक्तीला स्वत:साठी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नको वाटते. स्वत: घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जाण्याची जबाबदारीही घ्यावी लागते. अशा निर्णय भयातून सुटका करून घेण्यासाठी ती व्यक्ती दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीला आपल्यासाठी निर्णय घ्यायला सांगते. आपल्यासाठी दुसऱ्याने निर्णय घ्यावेत, हा निर्णय त्याच व्यक्तीने घेतलेला असतो. याचा अर्थ निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यापासून सुटका होतच नाही! त्यामुळे अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सार्त्र म्हणतात, 'माणसाला स्वातंत्र्याचा अभिशाप मिळालेला आहे.' जे. कृष्णमूर्तींसारखे तत्त्वज्ञ म्हणतात, 'माणसाला सर्व ज्ञातापासून मुक्त होण्याची गरज आहे.' अर्थात, या गोष्टी समजून घेण्यासाठी अभ्यासपूर्वक चिंतनाची गरज आहे. सर्वसामान्य माणसाकडे बघितल्यावर प्रश्न पडतो, स्वातंत्र्य म्हणजे काय? माणसाला खरेच स्वातंत्र्य हवे आहे का? हवे असेल, तर ते कशापासून आणि कशासाठी हवे आहे? कारण स्वातंत्र्य हवे असते, तर मुळात माणूस संसार, घरदार यांच्या फंदात पडला असता का? माणसाला संसाराचे पाश हवे वाटतात. त्यांच्यासाठी तो धडपड करतो; पण या पाशांचे बंध कधीतरी काचायला लागतात. तो काचही त्याला नको वाटायला लागतो. त्यातून सुटण्यासाठी तो प्रयत्न करतो; त्यामुळे खास स्वत:चे स्वत:साठी असे अवकाश असले, की त्याला पुरेसा मोकळेपणा वाटतो. स्वत:च्या स्वातंत्र्याविषयी जागरुक असणारी व्यक्ती दुसऱ्याच्याही स्वातंत्र्याविषयी तितकीच जागरूक राहिली, तर अनेक प्रश्न सुटतील. त्यासाठी स्वत:चे अवकाश जपायला हवे, तितकाच दुसऱ्याच्या अवकाशाचाही आदर करायला हवा.

लेखक :प्रा.भगवान केशव गावित
ग्रंथपाल
मो.नं.९६०४०११०२६
इमेल-bhagvangavit@gmail.com


एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) ने 2019 मध्ये भारतीय नागरिकांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. ही आकडेवारी भीतीदायक आहे. या आकडेवारीनुसार 2019 मध्ये 1 लाख 39 हजार लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 93 हजार 061 तरूण होते. 1 ते 45 वर्षे वयोगटातील 67 टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. हा वयोगट तरूण वयोगट मानला जातो व देशाच्या भरभराटीमध्ये मोलाची कामगिरी बजावणारा असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरूणांनी केलेल्या आत्महत्यांमुळे देशाची अपरिमित हानी झाली याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मागच्या म्हणजे 2018 च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये आत्महत्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे. गळफास लावून घेणे ही आत्महत्येची सर्वसामान्य पद्धत आहे. 2019 मध्ये 53.6 टक्के लोकांनी गळफास लावून आपले जीवन संपविले.
    युवकांच्या आत्महत्यांच्या प्रमुख कारणांचे विश्‍लेषण एनसीआरबीने पुढील प्रमाणे केलेले आहे - कौटुंबिक कलह, प्रेम, मादक पदार्थांचे सेवन आणि मानसिक आजार ही प्रमुख कारणे आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेली आहेत. कौटुंबिक कलह आणि मानसिक आजारामुळे आत्महत्या केलेल्या लोकांमध्ये पुरूषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. कौटुंबिक कलह आणि हुंडाबळी यासारखी कारणे महिलांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेली आहेत. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलेल्यांपैकी 62 टक्के लोक अमली पदार्थ आणि दारूच्या आहारी गेलेले होते.
    या आकडेवारीवरून एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, भारतीय समाजामध्ये कौटुंबिक कलह आणि व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढलेले आहे. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये तर कोविडने माणसांच्या जीवनावर खोलवर परिणाम केलेला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून देश कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेला आहे. यात पुरूषांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांच्यात विचित्र असे मानसिक बदल झालेले आहेत. सातत्याने घरात राहणे ही पुरूष प्रवृत्ती नव्हे. नाइलाजाने घरात रहावे लागत असल्याकारणाने पुरूषांमध्ये आळशीपणा, व्यसनाधिनता आणि हिंसक वृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता जेव्हा लॉकडाऊन जवळ-जवळ संपलेला आहे. बदलत्या परिस्थितीशी स्व:ला जुळवून घेणे पुरूषांना कठीण जात आहे.
    लॉकडाऊनमुळे अनेकांना मानसिक आजार उत्पन्न झालेले असून, त्यातूनच स्व:ला इजा करून घेणे आणि आत्महत्या करणे यासारखे टोकाचे पाऊल अनेक लोकांनी उचललेले आहे. उदाहरणादाखल लॉकडाऊनच्या एप्रिल ते जुलै या काळात गुजरातमध्ये 108 आपात्कालीन रूग्णवाहिका सेवेकडे स्व:ला जखमी केलेल्या 800 तर आत्महत्या केलेल्या 90 घटनांची नोंद झालेली आहे. एकट्या गुरूग्राममध्ये 160 लोकांनी या काळात मानसिक तणाव सहन न झाल्याने आत्महत्या केलेल्या आहेत.
    नैराश्य येण्याच्या प्रमुख कारणांमध्ये आपल्याला कोरोना होईल, ही प्रमुख भीती आहे. साधा ताप जरी आला तरी अनेक लोक खचून जात आहेत. अनेक कोविडग्रस्त रूग्णांनी रूग्णालयाच्या इमारतीवरून उड्या मारून आत्महत्या केलेल्या आहेत. या काळात व्यापार आदीमध्ये झालेले नुकसान, गेलेल्या नोकर्‍या व त्यामुळे वाढलेली आर्थिक चणचण, बँकांचे थकलेले ईएमआय, भविष्यातील अनिश्‍चितता, बंद पडलेले शिक्षण, कठीण झालेले विवाह इत्यादी कारणांमुळे लोकांमध्ये विशेष: तरूणांमध्ये आत्महत्या करण्याइथपर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.

- उपाय -
    कुरआन एक ईश्‍वरीय ग्रंथ असून, त्यामध्ये जगातील सर्व माणसांच्या जीवनात उत्पन्न होणार्‍या सर्व समस्यांचे उपाय देण्यात आलेले आहेत. फक्त प्रश्‍न विश्‍वास ठेवण्याचा आहे. कोविड काळामध्ये स्व:ला सांभाळण्यामध्ये श्रद्धावान मुस्लिमांना कुठलीच अडचण आलेली नाही, असे एकंदरित चित्र आहे. याचे कारण त्यांची इस्लामी श्रद्धा आहे. कुरआनमध्ये अल्लाहने फरमाविले आहे की, 


    1.”स्व:चा आत्मघात करू नका. खात्री बाळगा अल्लाह दया करेल” (संदर्भ : सुरह निसा,आयत क्र. 29).
    2. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले की, ”नाउमेदी कुफ्र है” 


 तसे पाहता कुरआनमध्ये माणसांना जीवंत राहण्याची उर्मी निर्माण करणार्‍या अनेक आयती आहेत. शिवाय, याच अर्थाची अनेक प्रेषित वचने आहेत, उदाहरणादाखल फक्त एक आयत आणि एक प्रेषित वचन वर नमूद केलेले आहेत. फक्त श्रद्धावान मुस्लिमांनाच या दोन्ही आदेशांमध्ये जीवंत राहण्याची ऊर्जा किती ठासून भरलेली आहे, याची अनुभूती होईल. इतरांसाठी मात्र ते फक्त दोन वाक्य आहेत.
    नैराश्य आणि हताशपणा येणे सामान्य बाब आहे. तो सर्वांच्याच जीवनामध्ये येत असतो. किंबहुना तो जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मात्र इस्लामी इबादतीतून मिळणार्‍या उर्जेमुळे श्रद्धावान मुस्लिम त्यावर लिलया मात करू शकतात. सातत्याने होणार्‍या जातीय दंगली, त्यातून घरादारांची होणारी राख रांगोळी आणि जीवहानी, न केलेल्या बॉम्बस्फोटामध्ये झालेल्या अटका, युएपीएच्या दुरूपयोगामध्ये अडकलेली तरूणाई, पावलोपावली होणारा भेदभाव, मॉबलिंचिंग, घोर दारिद्रय, उठसूठ पाकिस्तानला निघून जा म्हणून केली जाणारी अवहेलना, संसाधनाची प्रचंड उणीव आणि शिक्षणाचा अभाव, एवढ्या प्रचंड समस्या पाचवीला पुजलेल्या असतांनासुद्धा देशातील मुस्लिम समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण नगण्य आहे. त्याचे कारणच कुरआनमधून मिळालेली शिकवण, त्यातून निर्माण झालेली आशा, इस्लामी इबादतींमधून निर्माण झालेली ऊर्जा. वरील सर्व संकटावर मात करण्यासाठी सातत्याने धैर्य देण्यामध्ये यशस्वी झालेली आहे. म्हणूनच  लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अनेक संकटांना पचवून मुस्लिम समाज पुन्हा उभारी घेईल, यात एक इस्लामचा विद्यार्थी या नात्याने किमान माझ्या मनात तरी शंका नाही. इस्लाम विषयी असलेल्या गैरसमजाला तिलांजली देऊन, पक्षपाती दृष्टीकोण बाजूला ठेऊन, किमान देशाच्या तरूणाईला वाचविण्यासाठी तरी इस्लामचा प्रत्येकाने अभ्यास करावा, एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

- एम.आय. शेख

मुस्लिम जग दोन विभागात विभाजित

Baharin Israel

युएईनंतर बहरीनने या आठवड्यात इजराईलला राजकीय मान्यता देऊन त्याच्याशी आपले सर्व संबंध सामान्य करण्यासाठी मान्यता दिली. यासंदर्भात इजराईल बहरीन या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने ऐतिहासिक करार झाला. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेला, ”नव्या मध्यपुर्वीची सुरूवात” अशा शब्दात संबोधित केले. त्यांनी दोन्ही देशांचे तोंडभरून कौतुक केले.
    ट्विटरवर प्रकाशित केलेल्या आपल्या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, कित्येक दशकांच्या विभाजनवादी नीति आणि संघर्षानंतर आज आम्ही एका नवीन मध्यपुर्वीची सुरूवात केलेली आहे. इजराईल, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीनच्या जनतेचे अभिनंदन. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.” त्यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये या कराराची पार्श्‍वभूमी व्यक्त करतांना ट्रम्प म्हणाले की, आज या दुपारी आपण इतिहास बदलण्यासाठी एकत्रित झालेले आहोत. इजराईल युएई आणि बहरीन आता एकमेकांच्या देशात दुतावास सुरू करतील. राजदूत नियुक्त करतील आणि एकमेकांचे सहयोगी देश म्हणून काम करतील. आता आपण सगळे मित्र आहोत.     ईराणच्या वाढत्या शक्तीची भीती दाखवून अमेरिकेने मध्यपुर्वेतील देशांना इजराईलच्या जवळ जाण्यास भाग पाडत असल्याचा इस्लामी जगतातील काही देशांचा आरोप आहे. इजराईलला मान्यता देण्याच्या विषयावर इस्लामी जगत स्पष्टपणे दोन भागामध्ये विभाजित झालेले असून, काही देशांचा इजराईल बरोबर संबंध सामान्य करण्यासाठी पाठिंबा आहे. तर काहींचे मत असे आहे की, इजराईल आणि अमेरिका या दोघांवर कधीच विश्‍वास ठेवता येत नाही. आज जरी ट्रम्प आपल्या निवडणुकींवर डोळा ठेऊन ’टू स्टेट सोल्युशन’ सादर करीत आहेत. तरी बेंजामिन नेतनयाहू यांनी वेस्ट बँकमध्ये ज्यूंच्या अनाधिकृत बांधकामांना तूर्त स्थगित केल्याची घोषणा करून भविष्यात ते काम नक्कीच केले जाईल, अशी घोषणा युएई बरोबर झालेल्या करारानंतर करून फारसा वेळ झालेला नाही. इजराईलला फक्त पॅलिस्टीनच हवा आहे, असे नाही तर ग्रेटर इजराईलच्या त्याच्या विस्तारवादी नीतीमध्ये मध्यपुर्वेतील अनेक मुस्लिम देशांचा समावेश आहे. इजिप्त आणि जॉर्डन यांच्याबरोबर झालेल्या करारानंतरही इजराईलने त्यांची बळकावलेली भूमी सोडली नाहीच. उलट आपल्या विस्तारवादी नीतिचा विस्तारच केला. बहरीनने इजराईलबरोबर केलेल्या कराराचे पडसाद पॅलिस्टीनमध्ये उमटले. पॅलिस्टीनच्या संघर्षरत मुस्लिमांनी या कराराचा विरोध केला आहे. याउलट इजराईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतनयाहू यांनी या कराराचे स्वागत करताना म्हटले आहे की, ”आज इतिहासाने कूस बदललेली आहे. हा करार शांतीची नवीन पहाट घेऊन येईल.

Prashant Bhushan

प्रशांत भूषण यांच्या गेल्या काही दिवस चाललेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मानापमान नाट्यावर त्यांनी प्रतिकात्मक एक रुपया दंड भरल्याने तात्पुरता पडदा पडला आहे. पण या नाट्यामुळे स्मरण झाले ते सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीसमधील अथेन्स येथे अशाच घडलेल्या एका ऐतिहासिक नाट्याचे. प्राचीन ग्रीसमध्ये नाटके लिहिली जात आणि त्यांचे भव्य अशा खुल्या नाट्यगृहात प्रयोगही होत. या नाट्य प्रकारांमध्ये ग्रीक शोकांतिका हा प्रकार अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता. पण त्यावेळी अथेन्समध्ये या ‘शोकांतिकेचे नाट्य’ लोकशाहीच्या रंगमंचावर प्रत्यक्ष घडले. हे नाट्य एक महान शोकांतिका होती. या नाट्याचा महानायक होता थोर तत्त्वज्ञ सॉक्रेटीस. सॉक्रेटीस अथेन्समधील तरुणांमध्ये हिंडत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना विचार करायला आणि प्रश्न विचारायला प्रवृत्त करीत असे. सॉक्रेटीसचे म्हणणे होते की, ‘समाजाभिमुख आणि समाजनिष्ठ वर्तनातच माणसाचे भले आहे.
समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी स्पष्ट दृष्टी आणि चांगुलपणाची गरज आहे. पण शासन हाच एक गोंधळ असेल, जनतेला मदत न करता तो फक्तसत्ता गाजवीत असेल आणि नेतृत्व न करता आज्ञा देत असेल तर अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला कायदा पाळण्यासाठी प्रवृत्त कसे करता येईल? शहाणपणा शिवाय फक्तसंख्येच्या जोरावर राज्य कसे करून चालेल? उलट गर्दीत माणसे अधिक मूर्ख, हिंसक आणि क्रूर बनतात. फक्त पोकळ वक्तृत्वाच्या जोरावर सत्ता मिळवता येणे ही गोष्ट शरमेची आहे. राज्य चालविण्यासाठी अतिबुद्धिमान माणसांची गरज नाही पण शहाण्या माणसांची निश्चित गरज आहे.’ अथेन्समध्ये त्यावेळी प्रचंडअनागोंदी होती. अथेन्स त्यावेळी  युद्धाच्या तोंडावरही उभे होते. दुसरीकडे राज्यकर्त्यांवर नाराज असणारे लोक क्रांती घडवण्याचे षड्यंत्र रचित होते. आणि अशा वेळेला सॉक्रेटीस आदर्श राज्यव्यवस्थेची आणि राज्यकर्त्यांची मांडणी करीत हिंडत होता. अथेन्समधील लोकशाही व्यवस्था ही कल्याणकारी नाही हे जनतेला कळून चुकले होते. शेवटी क्रांतीचा प्रयत्न झालाच आणि तो अपयशी   ठरला. ‘लोकशाही’चा विजय झाला. लोकशाही राज्यव्यवस्थेने सॉक्रेटीसवर खटला भरला. न्याय मंडळ होते राज्यकर्त्यांच्याच समर्थकांचे. आरोप होता तरुणांमध्ये राज्यकर्त्यांच्याविरुद्ध असंतोष भडकावून त्यांना क्रांतीला उद्युक्त करण्याचा. न्याय मंडळाने सॉक्रेटीसला भरभक्कम दंड भरून सुटण्याची मुभा दिली. पण हा दंडभरणे म्हणजे आपण जे तत्त्वज्ञान मांडत आलेलो आहोत ते चूक आहे असे मान्य करण्यासारखे होईल असे त्याला वाटले. त्याने फुटकळ दंड भरण्याची तयारी दाखवली.
न्यायमंडळाने चिडून त्याला हेमलॉक या विषाचे प्राशन करून मृत्युदंड स्वीकारण्याची शिक्षा ठोठावली. शिष्यांशी वाद-विवाद, चर्चा करीत त्याने विषप्राशन  केले आणि मृत्युला कवटाळले. प्रशांत भूषण हे सॉक्रेटीस असल्याचा कोणताही दावा येथे  करण्याचा आमचा हेतू नाही. त्यांनी घेतलेल्या अनेक राजकीय निर्णयांशी आम्ही असहमत राहिलेलो आहोत. पण तरी देखील त्यांची लोकशाही आणि भारतीय संविधान यांच्यावरील निष्ठा आणि बांधीलकी निर्विवाद आहे असे आम्हाला वाटते. सत्याग्रहाच्या तत्त्वांनुसार दंड देण्यास नकार देऊन कारावासाची शिक्षा स्वीकारण्यापेक्षा प्रतिकात्मक दंड भरण्याचा आधुनिक काळाला योग्य असा व्यावहारिकपणा त्यांनी दाखवला आहे. पण हे करण्यापूर्वी त्यांनी माफी मागण्यास मात्र ठाम नकार दिला. हा नकार देताना त्यांना होणाऱ्या शिक्षेचा कोणताही अंदाज नव्हता हे पण लक्षात घ्यावे  लागेल. खरा मुद्दा ‘प्रशांत भूषण आणि दंड’ हा नसून त्यानिमित्ताने ‘देशापुढे आलेले प्रश्न’ हा आहे. भारताची लोकशाही किंवा त्या लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या संविधानाने ज्या न्यायव्यवस्थेच्या खांद्यावर टाकलेली आहे त्या न्यायव्यवस्थेच्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांवर विचारमंथन झाले नाही आणि या प्रश्नांची  उत्तरे दिली गेली नाहीत तर आपली लोकशाही धोक्यात येईल. पण देशाची सत्ता जेव्हा लोकशाहीची चाड नसणाऱ्या, हुकुमशाही प्रवृत्ती असणाऱ्या लोकांकडे असते तेव्हा त्यांना प्रश्न विचारणारे नको असतात. त्या पुढे जाऊन लोकशाहीचे ज्यांना स्तंभ मानले जाते ते सारे स्तंभ अशा राज्यकर्त्यांचे लांगूलचालन करू लागतात तेव्हा त्यांना अडचणीत आणणाऱ्या लोकांना संपवण्याचे प्रयत्न हे सारे स्तंभ एक होऊन करू लागतात. यातील कोणत्याही स्तंभाला प्रश्न विचारण्याचा अधिकार देशाचे संविधान; देशातील प्रत्येक व्यक्तीला देते.
प्रश्न येतो, जेव्हा यातील ‘न्यायसंस्था’ या स्तंभाला प्रश्न विचारले जातात तेव्हा. कारण न्यायव्यवस्था हा असा एक स्तंभ आहे की ज्याच्या अवमानाचा मुद्दा उभा राहतो. यामुळे न्यायव्यवस्थेचा सन्मान नक्की कोणत्या गोष्टीमुळे राहतो आणि कोणत्या गोष्टीमुळे अवमान होतो याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. हा मान-अपमान न्यायालयाचा होतो, का न्यायाधीशांचा होतो, का हुकुमशाही सत्ताधाऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या व्यक्तींना या आडून धडा शिकवण्याचा प्रयत्न केला जातो याचाही विचार करावा लागेल.
हा वादंग उभा राहिला तो सरन्यायाधीश शरद बोबडे  यांच्या संदर्भात प्रशांत यांनी केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे. या ‘ट्वीट’चा पहिला भाग आहे न्या. बोबडे यांच्या संदर्भात एका छायाचित्रातून अप्रत्यक्षरीत्या केलेल्या व्यक्तीगत टिपणीचा. न्या. बोबडे हे त्यांच्या ‘हॅपी गो लकी’ जीवनशैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांचे मोटरसायकल प्रेमही सर्वज्ञात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्यावरही ते मोटरसायकल चालवत असताना त्यांना अपघात होऊन त्यांच्या पायाला इजा झालेली आहे. या अपघाताने त्यांचे मोटरसायकल प्रेम आटलेले नाही.
कोरोना लॉकडाऊनमुळे सारा देश होरपळून निघत होता. एकीकडे मृत्यूचे थैमान आणि दुसरीकडे जगण्याची भीषण लढाई. लाखो गोरगरीब अनवाणी पायांनी, थंडी, ऊन वारा यांचा सामना करीत, पोरेबाळे खांद्यावर घेऊन शेकडो मैल चालत आपापल्या गावांना पोहोचत होते. जगण्याच्या या लढाईत अनेकांनी प्राण गमावले. कोट्यवधी चुली बंद होत्या. अशा काळात देशाचे सरन्यायाधीश उन्हाळी सुट्टीसाठी त्यांच्या  गावी नागपूरला पोहोचले. तेथे त्यांना ‘हार्ले डेव्हिडसन’ ही मोटरसायकल पाहण्याची इच्छा झाली. भाजपाच्या कोणत्यातरी लोकप्रतिनिधीच्या चिरंजीवांची एकावन्न लाख रुपयांची बाईक ट्रायलसाठी आणण्यात आली. चेहऱ्यावर मास्क न घालता (तो त्यांच्या गळ्यातही नाही) देशाचे सरन्यायाधीश त्यावर आरूढ झाले. (त्यांच्या डोक्यावर हेलमेटही नव्हते पण बाइक त्यांनी चालवली नाही म्हणून हे स्वीकारू). फोटो काढण्याचा उपस्थितांना मोह होणे स्वाभाविक होते. न्या. बोबडे यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. हे फोटो व्हायरल होणेही स्वाभाविक होते. सोशल मिडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. त्यात टीका करणारे थोडे आणि कौतुक करणारे अधिक होते. शोभा डे सारखे अनेक हा फोटो पाहून अस्मानात उडाले. त्यांना तर ‘वयाच्या चौसाष्टीतही न्या. बोबडे यांच्या डोक्यावर असणारा केशसंभार पाहून ते ‘रॉकस्टार’ वाटले. त्यांनी लिहिले की आजच्या तरुण पिढीला बोबडे हे ‘ड्युड’ वाटतील. मोठ्या पदावरील लोकांना त्यांचे व्यक्तिगत आयुष्य मोकळेपणाने जगता यायला पाहिजे, त्यांना त्यांच्या आवडी उघड करण्यात कोणताही संकोच वाटायला नको. उलट हे करता येणे हे समाज प्रौढ झाल्याचे लक्षण आहे’ असे त्यांनी एक मोठ्या वृत्तपत्रात लिहिले आहे. अनेक मुलींनी ते ‘सेक्सी’ वाटतात असे लिहिले. यातील कोणत्याही गोष्टीने न्यायालयाचा अवमान झाला नाही किंवा त्याची प्रतिष्ठा कमी झाली नाही. ती कमी झाली ती भूषण यांच्या ‘ट्वीट’वर, न्यायालयाच्या देशातील लोकशाही बद्दलच्या गेल्या  सहा वर्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यामुळे. यामुळे  स्वत: न्यायालयाने ‘सू मोटो’पद्धतीने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.
आता न्यायालयाचा अवमान म्हणजे काय हे समजावून घेतले पाहिजे. 1971 सालच्या ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अ‍ॅक्ट’नुसार न्यायालयाच्या अवमानाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार हा साधा, ‘सिव्हिल कंटेम्प्ट’ म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे किंवा न्यायालयाला दिलेला शब्द न पाळणे. पण दुसरा प्रकार हा गंभीर मानला जातो आणि तो म्हणजे ‘क्रिमिनल कंटेम्प्ट’, याचा अर्थ न्यायालयाच्या प्रक्रियेत काही भानगड असल्याचा आरोप (न्यायालयाला स्कँडलाईज करणे), ज्यामुळे न्यायालयाची प्रतिमा मलीन होईल किंवा न्यायप्रक्रियेत किंवा न्यायदानात अडथळा आणणे. 8 मार्च 2018 रोजी न्याय खात्याने भारताच्या कायदे आयोगाला या तरतुदीचा फेर विचार करून स्कँडलाईज करणे हा मुद्दा वगळावा अशी सूचना केली होती. इतर दोन मुद्देच फक्तन्यायालयाच्या अवमानासाठी ग्राह्य धरावेत असे न्याय खात्याचे म्हणणे होते. हे केल्याने न्यायालयाच्या अधिकारात घट होणार नाही कारण हे केल्यावरही सर्वोच्च न्यायालयाला कलम 142(2)नुसार कोणत्याही व्यक्तीची अवमानाच्या मुद्यावर तपासणी करण्याचे आणि शिक्षा करण्याचे अधिकार अबाधित राहतात. पण ही सूचना स्वीकारण्यात आली नाही. यामुळे प्रशांत यांचे ट्वीट हे पहिल्या प्रकारात मोडते असे मानण्यात आले. इतकेच नाही तर यामुळे देशातील जनतेचा न्यायालयावरील विश्वास कमी होईल आणि देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण होईल असा अर्थ काढण्यात आला.
वास्तविक जानेवारी 2018 मध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात न्या. चेलामेस्वर, गोगोई, लोकुर आणि कुरिअन या इतर चार न्यायधीशांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रार केली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे यापूर्वी घडलेले नव्हते. याचा अर्थ सर्वो च्च न्यायालयात सर्व काही आलबेल नव्हते. बोबडे यांनी मध्यस्ती करून हा वाद मिटवला होता. पुढे गोगोई सरन्यायाधीश झाले. ते निवृत्त होण्यास थोडा काळ राहिलेला असताना अचानक एका माजी कर्मचारी महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला. या आरोपांची चौकशी समिती बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. या समितीने हे सर्व आरोप निराधार म्हणून फेटाळले होते. अयोध्या राम मंदिराचा निकाल गोगोई निवृत्त होण्याच्या काही दिवस आधी 9 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांच्या बेंचने दिला. ज्याचे बोबडे एक सदस्य होते. हा निकाल जनतेला अनपेक्षित पण सत्ताधारी पक्षाला अपेक्षित होता. गोगोई निवृत्त होताच सत्ताधारी पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतले. 2016 मध्ये ज्या पीठाने अमित शहा यांना सोहाराबुद्दीन केसमध्ये निर्दोष सोडले त्या पीठाचेही बोबडे सदस्य होते. इतर अनेक निर्णय त्यांच्या सदस्यतेखाली घेण्यात आले. गेल्या काही वर्षांमधील न्यायालयाचे अनेक निर्णय अनेकांना आश्चर्यकारक आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणारे वाटले. खरा मुद्दा हाच आहे.
देशातील सुजाण आणि निष्ठावान नागरिकाला न्यायालयाचे निर्णय हे लोकशाहीचे रक्षण करण्यास कमी पडत आहेत असे वाटले तर हा मुद्दा उपस्थित करण्याचा त्या व्यक्तीस अधिकार आहे का नाही? देशाची घटना हा अधिकार देत असेल तर तो नाकारण्याचा अधिकार कोणाला कसा प्राप्त होतो? घटना ही सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्था घटनेच्या वर मानून चालणार नाही. जे.एफ.के. या शीर्षकाचा अमेरिकेचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या खुनाच्या तपासावर आधारित गाजलेला हॉलीवूडपट आहे. जिम गरिसन हे न्यू ओरलीन्सचे डिस्ट्रिक्ट अ‍ॅटरनी; जॉन केनेडी यांचा खून हे एक अमेरिकी सरकारमधील अनेक घटकांनी त्यांचे युद्धाच्या अर्थकारणातील हितसंबंध जपण्यासाठी केलेले षडयंत्र होते अशी मांडणी न्यायालयात करतात. त्यांचे न्यायालयातील शेवटचे भाषण हा या चित्रपटाचा कळस आहे. आपल्या भाषणात ते एडवर्ड इबे या अमेरिकी विचारवंताचे वाक्य उधृत करतात. हे वाक्य आहे.  
आज देश हुकूमशाहीच्या सावटाखाली उभा आहे. कोरोनाची महासाथ मृत्युचे थैमान घालीत आहे. हजारो लोक या साथीत बळी पडत आहेत. आधीच घसरणारी अर्थव्यवस्था आता कोलमडली आहे. कोट्यवधी लोक बेकार झाले आहेत. चीन गलवाणमध्ये ठाण मांडून बसला आहे. सर्व शेजारी देशांशी संबंध बिघडले आहेत. जगभर गुंतवणुकीसाठी हिंडून हाती काहीही न लागल्याने ‘आत्मनिर्भरता’ सुचली आहे. या सर्व  अपयशावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी राम मंदीर पायाभरणी आणि बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी सुशांत सिंग नावाचा हुतात्मा उभा करण्यात माध्यमे मशगुल आहेत. बिहारच्या सतरा सैनिकांचे गलवाणमधील हौतात्म्य कमी पडले म्हणून हा आधार घेण्यात येत असावा. एका विचित्र कोंडीत देश सापडला असताना प्रशांत यांच्या एका निर्भय ट्वीटने ही कोंडी फोडली आहे हे निश्चित. लोकशाही प्रेमी सर्वांना ही हाक आहे. ‘देशाचे रक्षण करण्यासाठी’  

डॉ.अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com
(साभार : पुरोगामी जनगर्जना)


माध्यमांमध्ये एकप्रकारे आत्म-नियमन व्हायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. इंदू मल्होत्रा ​​आणि न्या. के एम जोसेफ यांचा समावेश असलेल्या आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्या मंगळवारी सुदर्शन टीव्हीच्या ‘यूपीएससी जिहाद’ या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करतांना, सरकारी सेवेत मुसलमानांच्या घुसखोरीचे षडयंत्र केल्याचा चॅनलचा खुलासा देशहितासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. काही माध्यम संस्था ज्या पद्धतीने वादविवाद करीत आहेत, ही चिंताजनक बाब आहे कारण सर्व प्रकारच्या बदनामीकारक गोष्टी बोलल्या जात असल्याचे मत व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने ‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक लगावली आहे. या कार्यक्रमासंदर्भात तक्रारी केल्याबद्दल वकील फिरोज इकबाल खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र, भारतीय प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशन आणि सुदर्शन न्यूज यांना नोटीस बजावली होती. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक परिसंस्था विकसित केली आहे जिथे खोटे बोलणे, छेडछाड करणे, छेडछाड करणे, थट्टा करणे, लिंच किंवा अन्यथा त्यांना आवडत नसलेल्या किंवा तिरस्कार न करणाऱ्या लोकांना किंवा समाजाला लक्ष्य करणे स्पष्टपणे पूर्वनियोजित आहे. आज सुरू असलेल्या जामिया मिलिया इस्लामिया, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठांमधील मुस्लिम विद्यार्थी उच्च स्कोअरने देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात- त्यांना त्यांची डॉक्टरेटही मिळते, ते नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे पूर्वी अत्यंत सांप्रदायिक, अश्लील आणि अगदी बॉर्डरलाइन अश्लील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशिष्ट दूरचित्रवाणी वाहिनीने केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या देशातील प्रमुख घटनात्मक संस्थांना लक्ष्य केले पाहिजे आणि मुस्लिम उमेदवारांच्या भरतीचे वर्णन केले तर आश्चर्य वाटायला नको. हिंदू-मुस्लिम जोडप्यांमधील मिश्र विवाहांना लक्ष्य करणारी 'लव्ह जिहाद' ही हास्यास्पद मोहीम अपयशी ठरल्यानंतर यावेळी कट्टरपंथी खूप दूर गेले आहेत. आयपीएस असोसिएशनने गेल्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या या शोचा निषेध करण्याची मागणी केल्याने प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि प्रक्षोभक कार्यक्रमाच्या प्रसारणाला स्थगिती देण्यात दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाला वेळ लागला नाही. भाषण स्वातंत्र्य हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, पण कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक आणि सांप्रदायिक सलोखा या चिंतांमुळे तो पूर्णपणे अधिकार असू शकत नाही. यूपीएससी आणि नागरी सेवेत कास्टिंग करण्याव्यतिरिक्त उमेदवारांच्या समानतेला बाधा आणणे, त्यांना द्वितीय श्रेणीच्या नागरिकांसारखे वाटणे आणि त्यांचे यश कसेतरी कमी करणे हा या विशिष्ट कार्यक्रमाचा उद्देश होता. आपले सनदी अधिकारी, हिंदू किंवा मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही समाजातील लोकांना अपवादात्मक मन असते आणि अशा प्रकारे ते त्या परीक्षा उत्तीर्ण होतात. जिहादच्या काही राजकीय चुकीच्या कल्पनेपर्यंत हे यश कमी करण्याचा आपल्याला अधिकार नाही. जानेवारी २०२०च्या अखेरपासून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली असल्याचे निरीक्षण भारतातील माहिती क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे. मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल सिव्हिलिटी निर्देशांक २०१९ च्या अनुसार खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीला (बातम्यांना) सर्वाधिक बळी पडणारे भारतीय नागरिक होते. खोट्या (किंवा दिशाभूल करणाऱ्या) माहितीचे संकट नवे नाही. कोरोना जिहादचा खोटेपणा, ज्यातून मार्च महिन्याच्या सुरुवातीला मोठा वाद निर्माण झाला. या कपोलकल्पित गोष्टींमधून लोकांच्या भावना बदलता येतात, नकारात्मक पूर्वग्रहांना खतपाणी मिळते, ज्यातून विषारी मते बनतात आणि समाजातील विद्वेषाला उत्तेजन मिळते. एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग बळावला, तर दुसरीकडे त्याचवेळी चुकीच्या माहितीची महासाथही प्रचंड फोफावली. या दोन्ही साथींनी अक्षरशः हैराण केले. जातीयवादी मजकूर, असहिष्णुरित्या केलेली शेरेबाजी, सत्याला मुरड घालणारी वैद्यकीय माहिती, राजकीय चिखलफेक यापासून विविध समूहांमध्ये प्रत्यक्ष वाढलेला तणाव इथपर्यंत पडलेली विश्वासार्हतेतील दरी सर्वांनीच पाहिली. हे सारे या माहितीच्या चुकीच्या प्रसाराचे परिणाम होते. युरोपीय महासंघाने २०१८ साली जगात प्रथमच ‘कोड ऑफ प्रॅक्टिस ऑन डिसइन्फर्मेशन’ नावाने तंत्रज्ञान कंपन्या आणि जाहिरातदारांसाठी एक ऐच्छिक, स्व-नियमित मानकांची यादी लागू केली. ज्यातून खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवता येईल. याच्या जोडीला युरोपीय महासंघाने खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी डिजिटल मीडिया ऑब्झर्वेटरीची स्थापन केली असून त्याद्वारे खोट्या माहितीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवले जाते. त्यातून संशोधनाल चालना मिळते, अभ्यासकांच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण होते, लोकांसाठी तसेच सरकारी संस्थासाठी खोट्या माहितीचा मुकाबला करणारे व्यासपीठ उपलब्ध होते. कोव्हिड महासाथीदरम्यान चुकीच्या माहितीचा जो महापूर आला आहे, त्याला अनुलक्षून महासंघाने एक संयुक्त पत्रक जारी केले ज्यायोगे खोट्या माहितीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. सनदी अधिकारी आणि न्यायपालिका यांच्यासारख्या जलद प्रतिक्रिया आता अपवाद ठरण्याऐवजी आदर्श बनतील अशी आशा आहे.


कोविडमुळे उर्दू जगताची अपरिमित हानी झालेली आहे. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी पाठोपाठ कोरोनाने दुसर्‍या एका उमद्या शायरचा बळी घेतला. अशोक साहिल तुलनेने जरी राहत इंदौरी एवढे प्रसिद्ध नव्हते तरी त्यांची शायरी राहत इंदौरीपेक्षाही सरस होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उदाहरणादाखल त्यांचे खालील निवडक साहित्य पहा - 


रसूलों की भी अक्सर देर से ताईद करती है
ये दुनिया हर नई आवा़ज पर तनकीद करती है


    हा शेर कुठल्या श्रद्धावान मुस्लिम शायरचा नसून अशोक साहिल यांचा आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही. या शेरचा संक्षिप्त अर्थ असा की, एकेश्‍वरवादाची दीक्षा देण्यासाठी या पृथ्वीवर जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित आले. मात्र लोकांनी त्यांना आणि त्यांच्या शिकवणीला त्यांच्या जिवंतपणी फारसे महत्त्व दिले नाही मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सन्मान दिला. विशेष: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनावर हा शेर अतिशय चपखलपणे बसतो. याशिवाय, खालील शेर पहा...


    ऩजर ऩजर में उतरना कमाल होता है
    ऩफस ऩफस में बिखरना कमाल होता है
    बुलंदीयों पे पहूंचना कोई कमाल नहीं
    बुलंदीयों पे ठहरना कमाल होता है


    गुणवत्तेच्या दृष्टीने उर्दू काव्याच्या इतिहासामध्ये अशोक साहिल यांचा हा शेर मैलाचा दगड ठरलेला आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. त्यांच्या मृत्यूसंबंधी त्यांचे मित्र महेमूद रियाज हाश्मी लिहितात, ” मला लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. उर्दू मुशायरे ऐकण्याचा छंद होता. मला चांगलं आठवतं जवळ-जवळ 25 वर्षापूर्वी अशोक साहिल यांना सहारणपूरच्या एका अखिल भारतीय मुशायर्‍यामध्ये मी त्यांना पहिल्यांदा ऐकलं होतं. 


    कमंद चाँद-सितारों पे डाल सकता हूं
    समंदरों को तहोंतक खंगाल सकता हूं
    मेरे वजूद को इंचों में नापनेवालो
    मैं बूंद-बूंद से दरिया निकाल सकता हूं


    त्यांचा हा शेर माझ्या कायम स्मरणात राहून गेला. त्यानंतर मी वेड्यासारखा त्यांच्या शायरीचा मागोवा घेत राहिलो. त्यानंतर मी आवर्जून त्यांची अनेकवेळा भेट घेतली. उत्तरप्रदेशाच्या सहारनपूर जिल्ह्याच्या सरकारी रूग्णालयामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी अधिकारी पदावर होत्या. व ते त्यांच्यासोबतच इस्पीतळाच्या आवासीय परिसरामध्ये राहत होते. अतिशय फकिरासारखा मिजा़ज असणारा हा शायर विचारांचा बादशाह होता. उर्दू साहित्याची त्यांनी केलेली सेवा कधीही न विसरण्यासारखी आहे. रघुपती सहाय उर्फ फिराख गोरखपुरी या महान हिंदू शायरनंतर उर्दू साहित्याची उच्च परंपरा कायम ठेवण्यामध्ये अशोक साहिल यांचा फार मोठा वाटा आहे.”
    त्यांच्या मनाला मोहून टाकणार्‍या अनेक शेरपैकी खालचा एक शेर वाचकांच्या कोर्टात सादर करण्यात येत आहे.
जहाँ हर गाम पर आतिशफिशाँ लावा उगलते हैं 


हम उन रास्तों पर रोज नंगे पांव चलते हैं
तारीख गवाह है हमारे अहेद की
क़जा आने से पहले चिटीयों के पर निकलते हैं


    कुठल्याही अश्रद्ध माणसाच्या मनामध्ये श्रद्धेचे स्फुलिंग फुलविण्यामध्ये त्यांची खाली दिलेली रचना :संशयपणे यशस्वी होऊ शकेल. 


ना सबूत है ना दलिल है, मेरे साथ रब्बे जलील है
तेरे रहेमतों में कमी नहीं , मेरे एहतियात में ढील है
तेरा नाम कितना है मोतबर, तेरा जिक्र कितना तवील है
मुझे कौन तुझसे जुदा करे, मैं अटूट प्यास तू झील है
तेरे फैसलों से हूं मुतमईन, न मुतालबा न अपील है


समाजातील उच नीचतेच्या भावनेवर कठोर शब्दातून टिका करताना ते लिहितात, 


वो खुदकुशी के सलीबों पे झूल जाती है
जो कौम अपने रिवायात को भूल जाती है.
फकीरे शहर जरा इस तरफ से धीरे चल
अमीरे शहर के बंगले में धूल जाती है.
त्यांचा आणखीन एक दिलखेचक शेर असा की,
दुनिया की रौनकों ने यहीं का बना लिया
हम जिस जमीं पे काटने आये थे एक रात

इस्लामच्या मरणोपरांत जीवनाच्या संकल्पनेला अधोरेखित करणारा एवढा जबरदस्त शेर उर्दू साहित्यात आभावानेच मिळतो. त्यांची एक अशीच बहारदार रचना - 


अब इससे पहले की मैं दुनिया से गुजर जाऊं
मै चाहता हूं के कोई नेक काम कर जाऊं
खुदा करे मेरे किरदार को नजर न लगे
किसी सजा से नहीं मैं खता से डर जाऊं
जरूरतें मेरी गैरत पे तंज करती हैं
मीरे जमीर तुझे मार दूं की मर जाऊं
बहुत गुरूर है बच्चों को मेरी हिम्मत पर
मैं सर झुकाए हुए कैसे आज घर जाऊं
मेरे अ़जी़ज जहाँ मुझसे मिल नहीं सकते
तो क्यूं न ऐसी बुलंदी से खुद उतर जाऊं
    त्यांची आणखीन एक गजल पहा -
मेरी तरह जरा भी तमाशा किए बगैर
रोकर दिखाओ आँख को गिला किए बगैर
गैरत ने हसरतों का गरेबां पकड लिया
हम लौट आए अर्जे तमन्ना किए बगैर
चेहरा हजार बार बदल लिजिए मगर
माजी तो छोडता नहीं पीछा किए बगैर
कुछ दोस्तों के दिल पे तो छुर्रियाँ सी चल गई
की उसने मुझसे बात जो परदा किए बगैर


एकंदरित अशोक साहिल यांच्याबद्दल फक्त एवढेच म्हणावेसे वाटते, अलविदा अशोक तुम बहोत याद आओगे...


मलकापूर (जि. सातारा) 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांवर ताण पडत आहे. कऱ्हाडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त चांगले रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयाचा सर्व समाजातील लोकांना फायदा होईल. मुस्लिम समाजाचे राज्यासाठी आदर्शवत उदाहरण असून, त्यांचा आदर्श घेऊन अन्य सामाजिक संस्था पुढे येतील, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे व्यक्त केला.

येथील वारणा हॉटेलमधील मुस्लिम समाज संचलित वारणा कोविड सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मजहर कागदी, फारुख पटवेकर, अल्ताफ शिकलगार, राजू इनामदार, इसाक सवार, रफिक मुल्ला, इफान सय्यद, अरुण तांबोळी, बरकत पटवेकर, मुनीर बागवान, शाहिद बारस्कर, बिलाल पठाण यांच्यासह मुस्लिम समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, "जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारणा कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी असल्यामुळे रुग्णांना योग्य व तातडीचे उपचार मिळतील.'' जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, "कोविड सेंटर उभारण्यासाठी मुस्लिम बांधवांची धडपड चांगली आहे. जनतेच्या सोयीसाठी शासनाने सर्वोतोपरी मदत केली. यासाठी इतर संस्थांनी अशा कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावे. त्यांनाही मदत करू.'' श्री पटवेकर म्हणाले, "हे सेंटर सर्व समाजासाठी खुले असेल. 24 साधे बेड असून, 28 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास 100 रुग्णांसाठीही जागा उपलब्ध होऊ शकेल.'' या वेळी कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार करण्यात आला.


(१४१) ....शेती उगविली ज्यापासून विविध प्रकारची खाद्यान्ने प्राप्त होतात. त्याने जैतून (ऑलिव्ह) आणि डाळिंबाची झाडे निर्माण केली ज्यांची फळे बाह्यस्वरूपात सदृश्य बाळगतात आणि स्वादात विभिन्न असतात. खा, यांची फळे जेव्हा ही बहरतील आणि अल्लाहचा हक्क अदा करा जेव्हा त्याची कापणी कराल आणि मर्यादेचे उल्लंघन करू नका. अल्लाह मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना पसंत करीत नाही.
(१४२) मग तोच तर आहे ज्याने, चतुष्पादांपैकी ती जनावरेदेखील निर्माण केली ज्यांच्याकडून स्वारी व ओझे वाहण्याची कामे घेतली जातात आणि ती जनावरेदेखील जे खाण्यासाठी आणि बिछान्यासाठी उपयोगी पडतात.११७ खा त्या वस्तूंतून ज्या अल्लाहने तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि शैतानचे अनुकरण करू नका की तो तुमचा उघड शत्रू आहे.११८
(१४३) या आठ नर व माद्या आहेत, दोन मेंढ्यांच्या जातीचे आणि दोन शेळयांच्या जातीचे. हे पैगंबर (स.)! यांना विचारा की अल्लाहने  त्यांचे  नर निषिद्ध केलेले आहेत की माद्या अथवा ती कोकरे जे मेंढ्या व शेळयांच्या पोटात आहेत? ठीकठीक ज्ञानाच्या आधारे सांगा जर तुम्ही सत्यवचनी असाल.११९
(१४४) आणि अशाच तऱ्हेने दोन उंटाच्या जातीचे आणि दोन गाईच्या जातीचे. विचारा, यांचे नर अल्लाहने निषिद्ध केलेले आहेत अथवा माद्या की ती वासरे जी सांडणी व जी गाईच्या पोटात आहेत?१२० तुम्ही त्यावेळी हजर होता काय जेव्हा अल्लाहने हे निषिद्ध केल्याची आज्ञा तुम्हाला  दिली होती? मग त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी दुसरा कोण असेल ज्याने अल्लाहशी संबंधित खोटी गोष्ट सांगावी जेणेकरून ज्ञानाविनाच लोकांना चुकीचे मार्गदर्शन करावे. नि:संशय अल्लाह अशा अत्याचाऱ्यांना सन्मार्ग दाखवीत नसतो.
(१४५) हे पैगंबर (स.)! यांना सांगा की जे दिव्य प्रकटन (वह्य) माझ्याजवळ आले आहे त्याच्यात तर मला कोणतीही वस्तू अशी आढळत नाही जी एखाद्या खाणाऱ्यासाठी निषिद्ध आहे. याखेरीज की ती मृत असेल किंवा सांडलेले रक्त असेल अथवा डुकराचे मांस ते अपवित्र आहे अथवा असा मर्यादाभंग की अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने प्राणी बळी दिला गेला असेल.१२१ मग एखाद्याने नाइलाजाने (यांच्यातील एखादी वस्तू खाल्ली) आणि तो मर्यादाभंग करण्याची इच्छा बाळगत नसेल, आणि तो गरजेच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नसेल तर नि:संशय तुमचा पालनकर्ता क्षमा करणारा व दया दाखविणारा आहे.
(१४६) आणि ज्या लोकांनी यहुदी धर्म अवलंबिला त्यांच्यासाठी आम्ही नखधारी सर्व प्राणी निषिद्ध केले होते आणि गाय व बकरीची चरबीदेखील याव्यतिरिक्त की त्यांच्या पाठींना व त्यांच्या आतड्यांना लागलेली असावी अथवा हाडांना लागलेली असेल. ही आम्ही त्यांना त्यांच्या दुर्वर्तनाची शिक्षा दिली होती.१२२ आणि हे जे काही आम्ही सांगत आहोत अगदी खरे सांगत आहोत.



११७) मूळ अरबी शब्द फर्श (बिछाना) आला आहे. जनावरांना फर्श म्हणणे यासाठी आहे की ते उंचीने लहान असतात आणि जमिनीशी लागून चालतात किंवा त्यांना (कापतांना) जमिनीवर पाडले जाते किंवा त्यासाठी की त्यांच्या कातडीपासून आणि केसांपासून बिछाना (गालिचा इ.) बनविले जाते.
११८) वार्ताक्रमाला पाहिल्यास माहीत होते की येथे अल्लाह तीन गोष्टींना मनात रूजवू इच्छितो. एक म्हणजे या बागा, शेती व जनावरे जी तुम्हाला प्राप्त् आहेत ही सर्व अल्लाहने तुम्हाला दिलेली आहेत. दुसऱ्या कोणाची या देणगीमध्ये भागीदारी नाही. म्हणून या देणगीच्या कृतज्ञतापूर्तीमध्येसुद्धा दुसऱ्याचा वाटा मुळीच नाही. दुसरे म्हणजे त्या सर्व वस्तू अल्लाहची देणगी आहेत तर त्यांच्या उपयोगासाठी फक्त अल्लाहच्याच नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. दुसऱ्या कुणाला हा अधिकार नाही की त्यांच्या वापरावर आपल्यातर्फे काही मर्यादा घालाव्यात. अल्लाहशिवाय इतरांच्या निश्चित केलेल्या मर्यादेचे पालन करणे आणि अल्लाहशिवाय इतरांसाठी भेट, नजराणे व आहुती कृतज्ञतापूर्तीसाठी देणे म्हणजेच मर्यादा भंग करणे आहे आणि हेच शैतानाचे अनुपालन आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्या सर्व वस्तू अल्लाहने मनुष्याला खाण्यापिण्यासाठी व वापरासाठी निर्माण केल्या आहेत. त्यासाठी अल्लाहने त्यांना निर्माण केले नाही की तुम्ही नाहक त्यांना हराम ठरवावे. आपल्या अंधविश्वासांवर आणि कल्पनांच्या आधारावर जे प्रतिबंध लोकांनी अल्लाहच्या दिलेल्या उपजीविकेवर आणि दिलेल्या वस्तूंवर लावलेले आहेत ते सर्व अल्लाहच्या इच्छेविरुद्ध आहेत.
११९) म्हणजे अनुमान, अंधविश्वास किंवा पूर्वजांची रूढी-परंपरा नव्हे तर ज्ञान पुढे ठेवा जर ते तुमच्याजवळ असेल.
१२०) हा प्रश्न त्या विस्ताराने त्यांच्यासमोर यासाठी केला आहे की त्यांच्यावर स्वत: त्यांच्या त्या अंधविश्वासाचे अनुचित होणे स्पष्ट व्हावे. एका जनावराचे नर हलाल (वैध) आणि मादी हराम (अवैध) किंवा मादी हलाल आणि नर हराम किंवा पशु स्वत: तर वैध मात्र त्यांची पिल्ले हराम हे स्पष्ट अनुचित प्रकार आहेत. बुद्धीविवेकाविरुद्ध आहेत कारण अल्लाह अशाप्रकारचे व्यर्थ आदेश देऊ शकतो हे बुद्धीला पटतच नाही. ज्याप्रकारे कुरआनने अरबांना त्यांच्या या अंधविश्वासांना अनुचित असल्याचे समजाविण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे जगातील इतर लोकसमूहांना त्यांच्या अंधविश्वासपूर्ण व्यर्थ गोष्टीवर सचेत केले जाऊ शकते ज्यांनीसुद्धा खाण्यापिण्यात हराम व हलालचे अनुचित प्रतिबंध लावले आहेत आणि स्पृश्य-अस्पृश्यतेची भेदनीती स्वत:हून स्वीकारली आहे.
१२१) हा विषय कुरआनमध्ये सूरह २, आयत १७३ आणि सूरह ५, आयत ३ मध्ये आलेला आहे आणि पुढे सूरह १६, आयत ११५ मध्ये येणार आहे. सूरह २ ची आयत आणि या आयतमध्ये प्रत्यक्ष मतभेद आहे की तिथे केवळ `रक्त' म्हटले गेले आहे. आणि येथे `रक्त' सह `मस्फूह' ची अट घातली आहे.  म्हणजे असे  रक्त  जे एखाद्या जनावराला जखमी करून किंवा जुबह करून निघाले असेल.  परंतु  वास्तविकपणे हे मतभेद नाहीत तर त्या आदेशाचा तपशील आहे. याचप्रकारे सूरह ५ च्या आयतमध्ये या चार गोष्टीपैकी आणखीन काहींचा निषेधोल्लेख आला आहे. ते जनावर जे गळा दाबून किंवा जखमी होऊन किंवा वरून पडून किंवा टक्कर खाऊन मेले असेल किंवा ज्याला हिंस्त्र पशुने फाडले असेल. परंतु वास्तवात हासुद्धा मतभेदाचा मुद्दा नाही तर हा तपशील आहे. याने ज्ञात होते की जी जनावरे या पद्धतीने ठार झालीत ती सर्व मुर्दाडच्या व्याख्येत मोडतात.
    इस्लामी धर्मविद्वानांपैकी एक गट त्या मताचा आहे की पशु आहारांपैकी याच चार गोष्टी हराम आहेत आणि त्यांच्याव्यतिरिक्त सर्व खाऊ शकता. हेच मत माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) आणि माननीय आएशा (रजि.) यांचे होते. परंतु अनेक हदीसकथनांनी माहीत होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी काही गोष्टींना खाण्यापासून मनाई केली आहे किंवा त्यास अप्रिय ठरविले आहे जसे पाळीव गाढव, हिंस्रपशु आणि पंजाधारक पक्षी इ. म्हणून अनेक धर्मविद्वानाच्या मतानुसार त्यावरील चार गोष्टींपर्यत हराम होण्यासाठी सीमित करीत नाहीत तर त्यास विस्तृत करतात. परंतु त्यानंतर अनेक वस्तू हराम व हलाल होण्यात धर्मविद्वानांमध्ये मतभेद आहेत. जसे पाळीव गाढवाला इमाम अबू हनीफा, इमाम मलिक व शाफई (रह.) हराम ठरवितात, परंतु इतर धर्मविद्वानाच्या मते ते हराम नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी काही कारणांनी एके ठिकाणी त्यास निषिद्ध ठरविले होते. हिंस्र पशु, शिकारी पक्षी आणि मुरदाड खाणारी जनावरे यांना हनफिया पूर्णत: हराम ठरवितात, परंतु इमाम मलिक आणि औजाई यांच्या मते शिकारी पक्षी हलाल आहेत. लैसच्या मते मांजर हलाल आहे. इमाम शाफईच्या मते फक्त तेच हिंस्त्र पशु हराम आहेत जे मनुष्यावर हल्ला करतात. उदा. सिंह, चीता, लांडगा इ. इक्रिमाच्या मते कावळा आणि बिज्जू (एक प्रकारचा मांसाहारी प्राणी जो दिवसभर बिळात राहतो आणि रात्री बाहेर पडतो. त्याचे डोळे खूप लहान असतात) हलाल आहे. याचप्रकारे हनफिया यांचे मते कीडेमकोडे सर्व हराम आहेत, परंतु इब्ने अबी लैला, इमाम मलिक व औजाई यांच्या मते साप हलाल (वैध) आहे. त्या सर्व तर्क आणि गोष्टींवर विचार केल्यानंतर स्पष्ट कळून येते की अल्लाहने हराम केलेले फक्त चारच प्रकार आहेत ज्यांचा उल्लेख कुरआनमध्ये आला आहे. त्याशिवाय दुसऱ्या पशुमांसात विभिन्न श्रेणीची अप्रियता आहे. ज्यांची अप्रियता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारा प्रमाणित आहे, ते हराम होण्याच्या श्रेणीच्या निकट आहेत आणि ज्यात धर्मविद्वानांचे मतभेद आहेत त्यांची अप्रियता, संदिग्ध आहे. स्वाभाविक घृणेपोटी काही लोक काही वस्तूंना खाऊ इच्छित नाही. तसेच वर्गीय घृणा, सामाजिक घृणामुळे काही वर्ग आणि लोक विशिष्ट वस्तूंना खाणे पसंत करत नाहीत. यासाठी अल्लाहची शरियत लोकांना सर्वच अशा वस्तू खाण्याची सक्ती करत नाही, की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्या सर्व वस्तूं खाणे आवश्यक आहे ज्या अवैध (हराम) नाहीत. त्याचप्रमाणे शरियत एखाद्याला हा अधिकारही देत नाही की जे त्याला अप्रिय आहे त्याला कायदा बनवून ते सर्वांसाठीच निषिध्द (हराम) ठरवावे व त्या लोकांना अपराधी घोषित करावे जे अशा वस्तू खातात.
१२२)     त्याविषयी कुरआनमध्ये तीन ठिकाणी उल्लेख आला आहे. सूरह ३ मध्ये सांगितले गेले, ``खायच्या त्या सर्व वस्तू (ज्या मुहम्मदी शरियतनुसार वैध आहेत) बनीइस्राईलसाठीसुद्धा हलाल होत्या. काही वस्तू अशा  होत्या ज्यांना तौरात अवतरणापूर्वी इस्राईलींनी स्वत: आपल्यावर हराम केले होते. यांना  सांगा  की आणा तौरात आणि दाखवा त्याचे एखादे वाक्य जर तुम्ही (आपल्या आक्षेपात) खरे असाल.'' (आयत ९३) नंतर सूरह ४ मध्ये सांगितले गेले की बनीइस्राईलच्या अपराधांमुळे ``आम्ही त्या अनेक पवित्र वस्तू त्यांच्यावर हराम ठरविल्या ज्या पूर्वी त्यांच्यासाठी हलाल होत्या.'' (आयत १६०) आणि येथे सांगितले जात आहे की यांच्या उदंडतेमुळे (दुर्वर्तन) आम्ही यांच्यावर सर्व नखधारी जनावरे हराम केली आणि बकरी व गायीची चरबीसुद्धा त्यांच्यासाठी हराम ठरविली.'' या तिन्ही आयतींना एकत्रित करण्याने कळून येते की मुहम्मदी शरियत आणि यहुदी धर्मशास्त्र यांच्यामध्ये पशु आहाराविषयी हराम व हलालबद्दल जे अंतर आहे त्याची दोन कारणे आहेत.
१) तौरात अवतरणाच्या शेकडांे वर्षांपूर्वी आदरणीय पैगंबर याकूब (अ.) यांनी काही वस्तूंचा वापर करण्याचे सोडून दिले होते आणि त्यांच्यानंतर त्यांच्या संततींनीसुद्धा त्या वस्तूंचा वापर केला नाही. परिणाम हा झाला की यहुदी धर्मविद्वानांनी त्या वस्तूंना हराम ठरवून टाकले आणि त्यांचे हराम होणे तौरात मध्ये लिहून ठेवले. यात उंट, ससा आणि साफान यांचा समावेश आहे. आज बायबलमध्ये तौरातचे जे अंश सापडतात त्यात त्या तिघांचा हराम होण्याचा उल्लेख आहे. (अहबार ११:४६, इस्तिस्ना १४:७) परंतु कुरआनमध्ये यहुदींना जे आव्हान केले होते की आणा तौरात आणि दाखवा त्या वस्तू कोठे हराम केलेल्या आहेत? यावरून माहीत होते की तौरातमध्ये त्या आदेशांची वाढ त्यानंतर केली गेली आहे कारण त्या वेळी तौरातमध्ये हा आदेश असता तर बनीइस्राईलींनी त्वरीत तौरात आणून दाखविला असता.
    दुसरे कारण म्हणजे अल्लाहने अवतरित शरियतशी  यहुदींनी जेव्हा विद्रोह केला आणि स्वत: नियम निर्माता (धर्मशास्त्र बनविणारे) बनून बसले त्या वेळी त्यांनी अनेक पवित्र वस्तूंना आपल्या कीस काढण्याच्या संशयित वृत्तीने हराम ठरविले होते. अल्लाहनेसुद्धा शिक्षेखातर त्यांना या भ्रमात राहू दिले. या वस्तूंमध्ये एक तर नखधारी प्राण्यांचा समावेश आहे, उदा. बदक, शहामृग, काज इ. आणि तद्वतच गाय व बकरीच्या चरबीचासुद्धा बायबलमध्ये त्या दोन्ही प्रकारच्या हराम केलेल्या प्राण्यांचा तौरातच्या आदेशामध्ये समावेश केला गेलाआहे. (अहबार ११:१६-१८,  इस्तिस्ना १४:१५,  अहबार ३:१७, २२-२३) परंतु कुरआन सूरह ४ अनुसार माहीत होते की या गोष्टी तौरातमध्ये हराम नव्हत्या. मात्र आदरणीय इसा (अ.) यांच्यानंतर त्या हराम ठरविल्या गेल्या. इतिहास साक्षी आहे की आजचे यहुदी धर्मशास्त्र इ. सनाच्या दुसऱ्या शतकाच्या शेवटी रिब्बी यहुदाह त्याने निर्माण केले आहे.
    राहिला हा प्रश्न की मग या गोष्टींच्या बाबतीत येथे आणि कुरआन सूरह ४ मध्ये अल्लाहने ``हर्रमना''(आम्ही हराम केले) हा शब्दप्रयोग का केला? याचे उत्तर हे आहे की अल्लाहचे हराम ठरविण्याची हीच एक पद्धत नाही की त्याने एखाद्या पैगंबराद्वारा आणि ग्रंथाद्वारा एखाद्या वस्तूला हराम करावे. तर त्याची एक पद्धत हीसुद्धा आहे की तो आपल्या विद्रोही दासांवर बनावटी धर्मशास्त्र बनविणाऱ्यांना आणि खोटे कायदे करणारांना वचर्स्व बहाल करतो   आणि   ते   त्यांच्यावर   पवित्र   वस्तूंना   हराम   ठरवितात.  पहिल्या प्रकारचे हराम करणे अल्लाहतर्फे कृपास्वरूपात आहे आणि दुसऱ्याप्रकारे हराम करणे अल्लाहतर्फे धिक्कार आणि शिक्षेस्वरुपात आहे.


सध्या महाराष्ट्र  विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.या अधिवेशनात अनेक नवनवीन मुद्दे चर्चला येतील आणि त्यातून जनतेच्या प्रश्नाला वाचा फुटेल अशी शक्यता असताना त्या दृष्टीने कुठलेही पाऊल सरकारकडून पडताना दिसत नाही.कोरोनाचे संकट,नव्या कररचनेमुळे राज्यासमोरील महसुलाचा प्रश्न असे अनेक संकटे पुढ्यात असून सरकारला आर्थिक  बाबीवर मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्टपणे दिसत असतानाही यादृष्टीने आगामी काळात आपल्याला  काय पावले उचलावी लागतील याची कुठेही चर्चा वा तसे गांभीर्य  सत्ताधारी दाखवताना दिसत नाहीत.यात विरोधी पक्षही आता सामील झाल्याचे दिसत आहे.आपली सत्ता गेली ती उन्मादामुळे याचे पुरेसे गांभीर्य फडणवीस महोदयांना अजूनही आलेले नाही असे म्हणायला जागा आहे.याचे कारण विरोधी पक्ष म्हणून ज्या जबाबदारीने वागायला पाहिजे त्याची जाण आणि धाक सत्तेवर निर्माण करायला हवा तो होताना दिसत नाही.अशा वातावरणात आपल्या राज्यात सध्याला तीन मुद्दे राष्ट्रीय समस्या  म्हणून चर्चीले जात आहेत.ते अनुक्रमे सुशांत राजपूत आत्महत्याप्रकरण,कंगणा रानावत आणि शिवसेना वाद,त्यानंतर रिपब्लीकन टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आपल्या कार्यक्रमात मंत्रीमहोदयांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन दाखल झालेला हक्कभंग.यातील पहिल्या  प्रश्नांवर आपल्या माध्यमांनी भरपूर चर्चा घडवून आणली.त्यातून आपली  माध्यमे आणि राजकारणी जनतेच्या प्रश्नांवर किती सजग आहेत हेच दिसून आले.बिहारमधून आलेला सुशांत राजपूत नावाचा एक बिहारी तरुण,मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात अल्पावधीत त्याने मिळवलेले यश आणि सगळे यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना त्याने केलेली अचानक आत्महत्या हे सगळे एक चटका लावणारे असले तरी त्याची हत्या कि आत्महत्या हे मुद्दे पोलीस चौकशीचा भाग असले तरी ती एक समस्या  म्हणून चर्चीले जाणे हे काही चांगले लक्षण नव्हे.तसे यातही आता भाजपा विरुध्द महाराष्ट्रातील सत्ताधारी असा वाद आहे हे लपून राहिलेले नाही.सध्याला बिहार विधानसभेची निवडणूक  तोंडावर येऊन ठेपली असताना आपली राजकीय कामगीरी दाखवण्याइतपत हाती काहीही नसल्यामुळे अस्मितांचा मुद्दा उभा करुन जनभावनांना आपल्या मतात कसे रुपांतरीत करता येतील यासाठीचा हा केवळ भाजपाचा फुटकळ प्रयत्न आहे.सुशांतशी भाजपाला तिळमात्रही ममत्व नाही.ममत्व आहे ते बिहारमधील राजकारणाशी ते कसे यशस्वी करता येईल हाच या प्रकरणाचा पुढचा आलेख असणार आहे.तेव्हा आपले राजकारण किती खालच्या आणि हिन पातळीचे झाले आहे हे भाजपाने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे त्यात सुशांत प्रकरणाची नव्याने भर पडली इतकेच ते काय.तेव्हा गाय,गौरक्षण, राष्ट्रवाद आदी मुद्दे हेच अस्मितांचे शुद्र राजकारण निर्देशीत करतात.यात राम मंदीर उभारणीमुळे अजून एक पाऊल पुढे पडले आहे.तेव्हा कोरोना काळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,स्थलांतरीत मजुरांचे प्रश्न,युवकांचा रोजगाराचा प्रश्न,धार्मीक दहशत महिला सुरक्षा आदी मुद्यांवर बोलायला आणि काम करायला सत्ताधारी भाजपाला कदापीही आवडणार नाही आणि त्यातून त्यांची मतपेढी सुधारणारही नाही हे उघड सत्य आहे.असे असताना सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारने दाखवलेली तत्परताही अजब म्हणावी लागेल.सुरुवातीला प्राथमीक अहवाल नोंदवायला तयार नसणारे मुंबई  पोलीस त्यानंतर मात्र वेगाने यावर काम सुरु केले.त्यात आपल्याला प्रसिद्धी  मिळावी असाही कयास होता.मुंबई पोलीसांचा तपास योग्य दिशेने चालू असतानाच अचानक हा तपास केंद्रीय  तपासयंत्रणेकडे देण्यात आला.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपासही याच संस्थेकडे देऊन सात वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मूळ आरोपीपर्यत पोहचण्यात या यंत्रणेला अद्यापही  यश आलेले नाही तेव्हा  सुशांत प्रकरणात ही तपास संस्था काय जावईशोध लावणार हे उघड आहे.हे कमी म्हणून की काय आता मुंबईवरील एका वक्तव्यावरुन कंगणा रानावत आणि शिवसेना यात नवा वाद पेटला आहे.एका फुटकळ अभिनेत्रीच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे हे सोडून ती मुंबईत  कशी येते अशी दबंगगीरीची भाषा शिवसेनेकडून सुरु आहे.मुळात मुंबई आणि मराठी  माणूस ही शिवसेनेची राजकीय अस्मीता .शिवसेनेचे संपूर्ण  राजकारणच या मुद्यांवर उभे आहे त्यालाच घाला घातला जात आसताना शिवसेना गप्प बसणार नाही हे उघड आहे.यात माध्यमांनी तेल ओतून कंगणा हे शिवसेनेपुढचे मोठे आव्हान आहे असे भासवल्यामुळे शिवसेनेला आक्रमक व्हावे लागले.यात भर टाकली ती अर्णव गोस्हेवामींची.हे  गोस्वामी मूळात कोणाचे स्वामी आहेत हे उघड आहे.हे काय संपादक म्हणायच्या लायकीचे तर मुळीच नाहीत.साध्या वार्ताहराचीही अर्णव गोस्वामीची लायकी नाही.भाजपाच्या सांगण्यावरुन नाचणारा बोलका पोपट हेच त्यांचे वास्तव आहे.आणि त्यांनी मजेशीर त्याचा बाजार मांडला आहे.इंडीया पुछता है हा त्यांचा कार्यक्रम परंतू त्यात भाजपा क्या पुछता है हेच अनेकदा दिसून येते.खरेच इंडीया क्या पुछता है हे मोदींना विचारले तर बरे झाले असते.सगळी आश्वासने फोल ठरली देश रसातळाला गेला लोकांचे हाल होताहेत,लोक देशोधडीला लागले आहेत.दलीत,शोषीत,कामगार,महिला,शेतकरी होरपळून निघत असताना ते काय प्रश्न विचारतात हे जरा या संपादक महोदयांनी आपल्या शोमधून प्रधानसेवकांना दाखवले तर बरे होईल तेवढी हिम्मत अर्णव गोस्वामीमध्ये आहे का? विकलेली आणि भूमीकाहीन पत्रकारीता करणारे गोस्वामी लोकशाही पायदळी तुडवली जात असताना सत्ताधारी वर्गाचे हस्तक म्हणून काम करीत आहेत हे लाज वाटावे इतके अशोभनीय आहे.ज्या नावांनी त्यांनी ही वाहिनी चालवितात ती रिपब्लीक टिव्ही नावाप्रमाणे रिपब्लीक आहे का हा प्रश्न त्यांनी सद्सदविवेकबुद्धीने आपल्या मनाला विचारावा.केवळ अततायीपणा,आक्रमक भाषाशैली आणि पक्षीय संकुचीत दृष्टीकोन घेऊन केली जाणारी भाटेगीरी ही पत्रकारीता होऊ शकत नाही.आपल्या कर्तृत्वाने सत्ताधारी वर्गाला घाम फुटावा आणि आदरयुक्त भिती सत्ताधारी वर्गात निर्माण व्हावी ही खरी पत्रकारीता आहे.तो पत्रकारीतेचा राजधर्म आहे तो गोस्वामी कितपत पाळतात हा खरा प्रश्न आहे.काही सन्माननीय माध्यमे वगळता बहुतांश माध्यमे सत्ताधारी पक्ष्यांची गुलाम झाली आहेत.२०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून  देशभरात अघोषीत आणीबाणी सुरु झाली आहे.विरोधी आवाज पूर्णपणे दडपून टाकून आपल्याला आव्हान निर्माण होऊ नये अशी त्यांची रणनिती आहे.त्यामुळेच जनभावना मांडणाऱ्या अनेक संपादकांची मुस्कटदाबी करुन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.आणि पध्दतशीरपणे त्या जागी आपल्याला रुचेल पचेल अश्या भाडोत्री संपादकांची नेमणूक करण्यात आली.अर्णव गोस्वामी त्या वर्गाचे प्रतिनिधी असल्यामुळे  ते वेगळी काय भूमीका घेतील हे उघड आहे.केवळ मोदीनामाचा जयघोष करण्यावाचून दूसरे काहीही त्यांच्या पत्रकारीतेत दिसत नाही.तेव्हा  त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सरकारवर मोदींना खुश करण्यासाठी आगपाखड करणारच हे वेगळे सांगायला नको.त्यामुळेच त्यांनी कंगणा रानावतचा मुद्दा हाती घेऊन त्याअडून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाला एकप्रकारे बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला आहे.तेव्हा  त्याकडे कितपत लक्ष द्यायचे हे विवेकी जाणकार समजू शकतात.तेव्हा अर्णव गोस्वामीवर महाराष्ट्र  विधानसभेने हक्कभंगाचा प्रस्ताव आणला हेही एक राजकीय प्रक्रियेचा भाग आहे.मूळात हक्कभंग कोणाचा हा खरा प्रश्न आहे.आपल्याला जी मते देतात ते मतदार आणि त्यांच्याप्रती असलेली आपली बांधीलकी विसरुन त्यांच्या प्रश्नाला वाचा  फोडण्याऐवजी अश्या फुटकळ गोस्वामीवर आपल्या सभागृहाचा बहुमुल्य वेळ कशासाठी वाया घालवायचा याचाही विवेकी विचार सत्ताधारी पक्षांनी केला पाहिजे.खरेतर हा प्रकार हक्कभंगात येतो का तर तो येत नाही याचे कारण सभागृहात आपले मत सदस्याला निर्भयपणे मांडता यावे म्हणून केलेली ती विशेष संरक्षणासाठीची तरतूद आहे.आता प्रश्न उरतो सत्ताधारी वर्गाला यापासून गोस्वामीने आडवले का तर नाही केवळ एकेरी उल्लेख केला अश्या शुल्लक कारणावरुन जर हक्कभंग आणले जात असतील तर त्या सभागृहाचे पावित्र्य  भंग होणार नाही का याचाही विचार सत्ताधारी वर्गाने केला पाहिजे.आणि हे पहिल्यांदा  घडलेले नाही याआधी २०१३ साली मवाली असा आपला उल्लेख केल्यांच्या कारणावरुन तत्कालीन दोन संपादक राजीव खांडेकर ,निखील वागळे यांच्यावर असा प्रस्ताव तेव्हाच्या काँग्रेस  आणि राष्ट्रवादीच्या सरकारने आणला होता.निमीत्य होते क्षितीज ठाकूर या आमदाराने भरधाव वेगात वरळी वाद्रे पुलावरुन वाहन चालवल्यामुळे त्यांना सुर्यवंशी नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांने ठोठावलेला दंड. पुढे त्या अधिकाऱ्यांना विधानसभेत बोलावून मारहाण झाल्यानंतर विचारलेल्या  प्रश्नावर आगपाखड घेऊन या दोन संपादकावर हक्कभंग प्रस्ताव दाखल हौऊन सभागृहात दोन तास राज्यभर दुष्काळ आदी मुद्दे असताना ते बाजूला टाकून झालेली चर्चा.तेव्हा  राजकारणी आणि माध्यमे हा संघर्ष नेहमीच होताना दिसतो.विरोधी पक्षात असताना माध्यमांची मदत घ्यायची माध्यमस्वातंत्र्यावर गप्पा करायच्या पुन्हा  सत्ताधारी झालो की आपसुकच सगळे विसरुन माध्यमांची गळचेपी करायची हे राजकीय  धोरण राहीलेले आहे.त्यामुळे हक्कभंगाआडून माध्यमांची मुस्कटदाबी करणे हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण नाही.आज अर्णव गोस्वामी काय बोलला यापेक्षा तो काय बोलू नये हे संघटीतपणे कार्यकारी मंडळ ठरवत असेल तर ते जिवंत लोकशाहीचे लक्षण नाही.विरोधी विचाराला आदराने आणि संयमाने स्विकारणे हेच खर्या लोकशाहीचे लक्षण आहे.ताज्या हक्कभंगाने त्याला गालबोट लागले हे यानिमीत्ताने वेगळे सांगायला नको.सरतेशेवटी लोकशाही स्वातंत्र्याचा  उपभोग घेऊन आपले प्रश्न सडेतोडपणे विचारतानाच निर्भय आणि निरंकूश पत्रकारीता करणे हे प्रत्येक पत्रकारीतेचा राजधर्म आहे.तो गोस्वामीसारख्यांनी पाळावा आणि लोकशाही संस्थाचा आदर निर्माण होऊन भारतीय लोकशाहीचा पाया अधिक मजबूत होण्यासाठी स्वतः ला वाहून घ्यावे यातच देशहित आहे हे यानिमीत्ताने लक्षात घेणे महत्वाचे ठरते.

- हर्षवर्धन घाटे, नांदेड ९८२३१४६६४८

(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)


आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे निराकरण नसून स्वतःला दुर्बल समजण्याची भीती बाळगून जीवन संपविणे होय. आयुष्यात कोणाला त्रास नाही? कोणाला कमी तर कोणाला अधिक असतो आणि वेळ नेहमीच सारखी राहत नाही, वेळ बदलत असतो, आणि बदलतच राहणार. आयुष्य प्रत्येकाला संधी देते कधी लवकर तर कधी उशीरा, फक्त कठोर परिश्रम करणे, हे आपले काम आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण फारच वाढत आहे. दर वर्षी, दशलक्षाहूनही अधिक लोक स्वतचे जीवन संपवतात. डब्ल्यूएचओच्या मते, दररोज सुमारे 3000 लोक आत्महत्या करतात आणि आपल्या देशातील सुमारे चारशे लोक दररोज नैराश्याने ग्रस्त होवून दुःखाने आत्महत्या करतात. सर्वाधिक आत्महत्या करण्याचे प्रमाण असलेल्या देशांमध्ये भारत मोजला जातो. 78 टक्के जागतिक आत्महत्या कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. भारतातील आत्महत्येचे प्रमाण जागतिक सरासरीच्या 60 टक्क्यांहून अधिक आहे. आतातर कोरोना काळात आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. भारतात दर एक लाख लोकांमध्ये 11 लोक आत्महत्या करतात, यात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात होतात.
आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या संदर्भात ”जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” देश, संस्था, समुदाय आणि व्यक्तींकडून संयुक्त प्रयत्नांसाठी कारवाईचे आवाहन आहे. जगातील आत्महत्येच्या वाढत्या प्रवृत्तीवर या समस्येबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या उद्दीष्टाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन सुरुवात केली होती. 2003 पासून प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबर रोजी “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” म्हणून साजरा केला जातो. या वर्षी “आत्महत्या रोखण्यासाठी एकत्र काम करूया” ही थीम आहे.
आधुनिक जीवनशैलीत आत्महत्येचे प्रमाण फार वाढले :- आजच्या आधुनिक युगात माणूस धावपडीच्या जगात व्यस्त आहे आणि आपल्या आदर्श, संस्कृती, निसर्गापासून दूर होत आहे. सगळीकडे स्वार्थीपणा, अभिमान, देखावा, द्वेष, चिडचिडेपणा, प्रदूषण, शोर व सर्वांना शॉर्टकट मार्गाने लवकर पैसे कमवायचे, नशा, भेदभाव, भेसळ, निकृष्टता, भ्रष्टाचार, तणाव, नकारात्मक विचार, भीती, नैराश्य यासारख्या कारणांमुळे मानवाची मानसिकता खराब होत आहेत. मानसिक रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ज्यामुळे सध्या मानवांमध्ये लवकरच राग येतो आणि सहनशीलता कमकुवत आहे. मानवांवर अशी वाईट परिस्थिती येणासाठी फार प्रमाणात मानवच जबाबदार आहे. आज एखाद्याच्या आनंदात आनंदी होण्याऐवजी माणसाला हेवा वाटतो आणि ही प्रवृत्ती सतत वाढतच जात आहे. माणसाचे आयुष्य मौल्यवान आहे, त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. माणूस गेल्यानंतर त्याच्या कुटुंबात त्याचे स्थान कायमचे रिक्त राहते. आत्महत्या केलेल्या व्यक्तिच्या गेल्यावर त्याचा कुटुंबाची काय अवस्था असते हे शब्दात सांगणे कठीण आहे.
जगात प्रत्येक चाळीस सेकंदाला आत्महत्या होतात. आर्थिक संकटातून शेतकरी आत्महत्या, घरगुती महिलांची आत्महत्या, परीक्षेत नापास, बेरोजगारीमुळे, प्रेम प्रकरणात अपयश, गंभीर आजारपण, वाईट वर्तन, हुंडा, वाद, संघर्ष, अत्याचार, कौटुंबिक कलह यासारख्या समस्या आत्महत्यांचे प्रमाण वाढवतात. बहुतांश आत्महत्येचे प्रमाण तरूणात अधिक आहेत आणि आता अगदी अल्पवयीन मुलांमध्येही आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल उग्र होणे, निर्बुद्धिपणा, राग येणे, अपयशावर स्वताला कमी लेखणे, कमजोर समझणे, अयोग्य गोष्टिसाठी हट्ठपणा, इंटरनेटचे व्यसन हे देखील आत्महत्या वाढविण्यात जबाबदार आहे. आतातर देशात वृद्धाश्रम सतत वाढत आहेत आणि लोकांना स्वतः साठी मोकळेपणा ऐकटेपणा मिळावा म्हणून संयुक्त कुटुंब सोडून दूर छोट्या-छोट्या घरात शिफ्ट होत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मन व विचारही लहान होत चालले आहेत.
आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे निराकरण नाही :- जगात कोणाला दुखं नाही, पण ज्याने समाधान मानले तोच सुखी. मोठे व्यापारी, अगदी नोकरी करणारे लोकही काळजीत आहेत, फरक इतकाच आहे की कोणी आपल्या समस्या सांगतो तर कोणी मनात ठेवतो. जेव्हा आपण स्वतःला कमकुवत समजतो तेव्हा लक्षात ठेवा की जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक अधिक दुःखी आहेत, त्यांचासमोर आपले दुःख काहीही नाही. जगाचा एक मोठा भाग जगण्यासाठी भुकेला झोपतो, डोक्यावर छप्पर नसते, फुटपाथवर लाखो लोक जगतात, अनेक लहान मुले लावारीस जगतात, दोन वेळचा जेवनाची सोय करण्याकरीता आई-बाबा आपल्या चिमुकल्या लेकरांना झोपडीत सोडून कामासाठी हिंडतात. जगातील अनेक दुष्काळी भागात पाण्यासाठी स्त्रिया दररोज कित्येक किलोमीटर कडक उन्हात फिरतात, आजही दुर्गम खेड्यातील लहान मुले शालेय शिक्षणासाठी उबड-खाबड रस्ते, नदी, नाले, वन येथून बरेच किलोमीटर चालतात. दरवर्षी जगातील लाखो गावे पावसाळ्यात पाण्यामध्ये असतात आजही जगात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लहान मुलांना देखील रोज पोटभर अन्न मिळत नाही. पण हे लोक देखील जीवनासाठी संघर्ष करतातच, आपल्या जीवनाशी अपयश स्विकारून थांबणार नाहीत. आज जगात दिव्यांगांनी क्रीडा, विज्ञान, शिक्षण तसेच प्रत्येक क्षेत्रात, नाव उज्जवल केले आहे. आपण त्यांचापासून आत्मविश्वास आणि सशक्त जीवन जगणे शिकले पाहिजे कारण ते शारीरिकदृष्ट्या अपूर्ण असून सुद्धा एक सामान्य माणसापेक्षा अधिक यशस्वीरित्या जगतात आणि स्वतचे कार्य चांगल्यारीत्या करतात.
आजच्या युगात जर आपल्यावर एखादी अप्रिय घटना घडली तर आपण त्वरीत तुटून जातो मनाचे खच्चीकरण करतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याचे धाडसच करत नाही. पण, हे चुकीचे आहे. लहानशी मुंगी सुद्धा वारंवार अपयशी झाली तरीही ते आपले लक्ष्य सोडत नाही, मग तर आपण माणूस आहोत, आपण का प्रयत्न सोडायचे. आयुष्यातील प्रत्येक छोटीशी गोष्ट आपल्याला मार्गदर्शन करते तेव्हा चांगली गोष्ट होईपर्यंत आपले प्रयत्न सोडू नका, आव्हान म्हणून समस्या स्वीकारा आणि समस्यांपासून पळ काढण्याऐवजी त्यास दृढ लढा द्या. इतिहास साक्ष देतो की जगात अशी हजारो व्यक्तिमत्त्वे होती ज्यांनी लाखो संकटांना आणि अपयशाला पराभूत करून जगात किर्तीमान रचलाय आणि आयुष्यात नेहमी अशाच लोकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा.
आत्महत्या नियंत्रणाचे काही उपायः-
⦁    परिस्थिती कितीही वाईट असली तरीही राग आणि तणावात नकारात्मक निर्णय घेऊ नका कारण त्यावेळी आपल्याला योग्य आणि चुक यातील फरक चांगल्यारित्या समजत नाही, बर्याच वेळा आपण रागाचा भरात चुकीचे निर्णय घेतो नंतर आपल्याला आपली चूक समजते, तेव्हा खूप वेळ झालेला असतो, तेव्हा पश्चाताप आणि दुःख व्यतिरिक्त काहीच उरले नसते.
⦁    वाईट सवयी आणि नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर रहावे, आनंदाच्या वातावरणात जगावे, हसत-खेळत रहावे. नैराश्यावर किंवा कोणत्याही शारीरिक, मानसिक समस्येवर डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलावे व तज्ञाद्वारे आपल्या समस्येचे निराकरण करावे.
⦁    आपल्या द्वारे झालेल्या चुकांपासून शिकावे, सतत एकटेपणात राहू नका, आपल्या लोकांसोबत मनातील बोला, शक्य असल्यास नेहमीच कुटुंबातच रहावे.
⦁    स्वतःची काळजी घेणे, र्निव्यसनी लोकांशी संपर्क साधणे, ध्यान-योगा करणे, स्वतसाठी वेळ काळावे. सात ते आठ तासांची झोप, वेळेवर जेवण हे खूप गरजेचे आहे. खेळ, व्यायाम आणि निरोगी छंद विकसित करावे, निसर्ग आणि पाळीव प्राणी त्यांच्याबरोबर वेळ घालवणे देखील तणावमुक्त जीवन प्रदान करते.
⦁    पालकांनी खासकरून आपल्या मुलावर मित्रांसारखी वागणूक दिली पाहीजे लहानपणापासूनच चागल्या आणि वाईट गोष्टिंची समझ दिली पाहीजे. लहान मुलांना सोशल मिडीयापासून नेहमी दूर ठेवावे, मोठे व्यक्ति, वयोवृद्ध महिलांचा सन्मान करणे आणि असहाय्यांना मदत करणे, चांगले संस्कार, योग्य वातावरण चांगली शिकवण मुलांना द्यावी.
⦁    नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवावी आणि आपल्या कुटुंबातील लोक, त्यांचे आनंद, त्यांच्याप्रती आपले कर्तव्य, जबाबदारी लक्षात ठेवावी.
⦁    लोक, गट, मित्रांशी संपर्कात रहावे जे तणाव सोडण्यास प्रवृत्त करतात आणि स्वतला नेहमी व्यस्त ठेवावे.
⦁    कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जबाबदारी समझणे आणि आपले कर्तव्य पार पाळणे सोबतच मानवांमध्ये परोपकाराची भावना असणे खूप महत्वाचे आहे, म्हणजेच, कोणत्याही स्वार्थाशिवाय लोकांचा चेहरेवर हसू आणणे मनाला खूप समाधान देते.
-डॉ. प्रितम भी. गेडाम, भ्रमणध्वनी क्रमांक- 82374 17041

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget