Halloween Costume ideas 2015

नामकरण सोहळे

हा सांस्कृतिक बदल केवळ या चार वर्षातला किंवा केशरीलाटेचा नाही...!

पायाला भिंगरी बांधून फिरतीची लागलेली सवय ’गाव तिथं एक तरी आपल घरं असावं’ याप्रमाणे जिव्हाळा जपत - जोपासत, भटकंती सुरू आहे. या भटकंतीला प्रवास म्हणावे असं एवढे मोठे काहीच नाहीच. नाहीतरी भटकंतीपेक्षा हल्ली सत्ताधीशाचे भ्रमण हा चर्चेचा विषय राहीलाय. कदाचित उद्या कुणी भक्तलेखक किंवा मीडियासेलमुळे सिनेमा डायरेक्टर झालेला कुणी उजवा कलाकार ’भ्रमणध्वनी’ म्हणून पुस्तक किंवा फिल्मही बनवेल एखादी. विदेशातली ही भटकंती सध्यातरी राफेलच्या गदारोळात मंदावली आहे. आणि संरक्षणमंत्री मात्र फ्रान्सचे दौऱ्यावर दौरे करताहेत. आमचा सध्या माणसांचा दौरा लालडब्यातला लाडातला. परवा एसटीच्या सीटवर बसलेल्या भारतीय नागरिकबंधूने सत्ताभक्तीचे पारायण सुरू केले. 2022 ला सगळे रस्ते कसे सुशोभित होतील आणि बुलेटट्रेनच्या समान बुलेट एस्ट्या येतील याची अतार्किक मांडणी सुरूच होती. ’कुठे जायचंय?” मी. ” अमृतलाटेला” त्याचं उत्तर... या नावाने कोणतेही गाव माझ्या जिल्ह्यात तरी नव्हते, नाहीच. मी म्हणालो” तुम्ही कदाचित चुकीच्या एसटीत बसलात” त्याने छान हसून उत्तर दिले” ” अहो... तुम्ही नवीन आहात का? येथून तीसेक किमीवर तर आहे गाव.. अमुकतमूक येथे जवळ...  मी गप्प. नावबदलायाचा योगीरोग संसर्गजन्य झाल्याचे हे उदाहरण... आब्दुललाट या गावाच्या नावाला हळूहळू नष्ट करण्याचा हा प्रयत्न... मी पुढील संभाषण टाळून... बदललेल्या गावशहरांची नावे आठवू लागलो. अचानक प्रयागराज आठवले... अलाहाबादचे बारसे! आत्ता गुजरात जाहिरातीचा ब्रँड अॅम्बेसेडर ’बच्चन अलाहाबादी’ नव्हे तर ’श्रीवास्तव प्रयागराजी’ या नावाने मिरवणार असा भाषिक विचार भासमान झाला. माझ्या गावाजवळच्या अशा अनेक ठिकाणांची नामकरणे विनाकारणे झालेली आहेत... होताहेत. तुमच्याही आसपास हे घडलं किंवा घडत असेल...
    हा सांस्कृतिक बदल केवळ या चार वर्षातला किंवा केशरीलाटेचा नाही. पूर्वापार हे हळूहळू रूजवणं चाललंय. त्याचे फलीत आता तीव्रपणे समोर येतयं इतकंच! महाराष्ट्राच्या किंवा देशभरातल्या अशा बदललेल्या गाव, शहरे, रस्ते, वस्त्यांचा विषय प्रचंड अभ्यासाचा आहे. यावर कुणी संशोधक अभ्यासपूर्वक सिद्धताही करेल; पण या सगळ्या बदलांना परिवर्तन म्हणून गप्प बसणारे किंवा केवळ उथळ प्रतिक्रिया देणारे यांच्या बाजूचे काय शिल्लक?
    अगदी सरकारी योजना, जनकल्याणाची शासकीय कामे, साधे गल्लीबोळातल्या चौकाचौकात हे नामकरण सोहळे ऊधाणले आहेत. ज्या विचारांची सत्ताप्रणाली, त्याच विचारांची एकूण सांस्कृतिक उठाठेव, त्याच मुल्यांची घट्ट सरमिसळ करत एकूण सामान्य सहजीवनाला ढासळवण्याचे कार्य लोकशाही देशात राजरोस सुरू आहे. रोज नव्या फेकू इतिहास संदर्भाचा कचरा, नव्या प्रश्नांची रद्दी, खोट्या बातांचा कहर करीत कमळ फोफावत आहे. या सगळ्या बारसे प्रोग्रामला नागरिक म्हणून मुकपणे संयमित शांतता ही मौनसंमती आहे.
    साध्यासरळ जीवनाचे प्रश्‍न किचकट करून नको तेवढ्या धर्मांधचिखलफेकीला साफ करण्यातच वेळ वाया जातोय. देशभक्तीच्या सगळ्या बड्याबाता मारून झाल्यावर, पुन्हा नवीन प्रश्नांचे ढीग उपसत आपण उत्तर - प्रतिक्रियावादात अडकून पडलोय. असहिष्णूता, धर्मांधता, कट्टर अस्मिता, अंधभक्ती, व्यक्तीपूजा, सणांचे बदलले उग्र रूप, संवादाच्या बदललेल्या धारदार भाषा.. यातून एक युद्धलीपीच निर्माण झालीय. या युद्धलिपीत जात-धर्म, गोरक्षा, नामकरण, मंदिर, राष्ट्रहित अशा मुल्यांची ठासून अफूगोळी भरलीय. रणांगण तयार झालंय, युद्ध सुरू होण्यापूर्वीची उपरी सहिष्णूशांतता तणावपूर्ण आहे. आता मौन सोडायला हवे. ठासकून उध्वस्त झालेल्या माणुसकीला पश्चातापाची झळ सोसवणार नाही... या रखरखत्या बाभळउन्हात गुलमोहोर होऊन पेटायलाच हवे. गप्प राहिलो तरी सामान्यजनच चिरडला जाईल... आवाजी कोरस सामुदायिक उठायलाच हवा. अस्वस्थता खुंटीवर टांगून निरर्थक मरणे शापदायकच!!
    बाकी ज्यांना हे बदल परिवर्तन उत्क्रांतीच्या खुणा वाटताहेत... त्यांना मुबारक चांदवा पूरणमासीचा. मला मात्र चांदण्याचा दुधाळ रंग गडद गहिऱ्या चुनेरी कबरीरंगाचा दिसतोय...
“लेकिन अब जुल्म की मीआद के दिन थोडे हैं,
इक जरा सब्र, की फरियाद के दिन थोडे हैं ...
 
- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget