Halloween Costume ideas 2015
November 2018

पुढची वाटचाल करण्याच्या प्रक्रियेस लोकशाही आणि विकासाचे मानक म्हटले जाते. ही धारणा खरे तर अमेरिकन प्रसिद्ध लेखक होरेटिओ अल्जर यांच्या नैतिक मिथकांपैकी एक आहे.  त्यांच्या मते कोणत्याही सामाजिक-आर्थिक वातावरणात एखादा युवक अथक परिश्रम व अल्पशा नशिबाच्या बळावर श्रीमंत बनू शकतो. इतकेच नव्हे तर बेंजामिन फ्रॅंकलिन यांचे विचारदेखील समाजाचा स्तर वाढविण्यास सूचक ठरतात. पूर्वी कथा-कहाण्यांद्वारे प्रगतीच्या गोष्टी सांगितल्या जात असत. मात्र आता ती नियम व सिद्धान्तांवर आधारलेली परेड आहे.  सुखद बदलाचे प्रामाणिक मानक कोणते आहे? यावर सध्या तीव्र गतीने कार्य सुरू आहे. दरम्यान, सॅम आशेर (जागतिक बँक), पॉल नोवोसाद (डार्टमाउथ कॉलेज) आणि चार्ली राफकिन  (एमआयटी) यांनी ‘इंटर जनरेशनल मोबिलिटी इन इंडिया’ नामक एक सर्वेक्षण केले आहे. याद्वारे प्रगती म्हणजेच पुढे जाण्यासंदर्भात एक नवीन प्रकाशकिरण आढळून येतो. दोन  पिढ्यांच्या दरम्यान घडून येणाऱ्या प्रगतीवर हे सर्वेक्षण आधारित आहे आणि याचा निष्कर्ष गंभीर चर्चेची मागणी करतो.
वास्तविक पाहता या सर्वेक्षणात राजकीय अर्थदेखील शोधले जाऊ शकतात. हे सर्वेक्षण उत्पन्नावर नव्हे तर शैक्षणिक प्रगतीवर करण्यात आले आहे. याच्या तीन निष्कर्षांवर निश्चितपणे  चर्चा व्हायला हवी. पहिला निष्कर्ष- मुस्लिम आणि अनुसूचित जाती/जमातींना जर एकूण लोकसंख्येतून वेगळे केले गेले तर उर्वरित लोकांच्या वाढत्या सामाजिक स्तराची तुलना  आनंदाने अमेरिकेशी केली जाऊ शकते. दुसरा निष्कर्ष- अनुसूचित जाती/जमातींचा सामाजिक स्तरात उल्लेखनीय स्वरूपात प्रगती झाली आहे. यात जवळपास जे काही बदल घडले  आहेत ते सर्व राजकीय आंदोलनाची उपज आहे. मात्र उच्चवर्गावर याचा काहीही प्रभाव पडलेला नाही, कारण त्याने सकारात्मक आंदोलनाचा विरोध केला. परंतु या सर्वेक्षणाचा तिसरा  निष्कर्ष अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. यात म्हटले आहे की मुस्लिमांमध्ये अंतरपिढीतील बदल नगण्य स्वरूपाचा आहे. म्हणजे मुस्लिमांच्या दोन पिढ्यांच्या दरम्यान झालेली प्रगती अत्यल्प आहे. यावरून हे स्पष्ट होते की निवडणुकीत लाभ उठविण्यासाठी लोकशाहीने अन्य मागासवर्ग आणि अनुसूचित जाती/जमातींसाठी केलेल्या कार्यापेक्षा मुस्लिमांच्या हितासाठी  केलेले कार्य नगण्य आहे. उदारीकरण आणि लोकशाहीद्वारे मुस्लिमांना विशेष काही लाभलेले नाही. शैक्षणिक क्षेत्रात झालेली प्रगती उत्पन्नात झालेल्या प्रगतीच्या तुलनेत उत्तम प्रकारे  मोजली जाऊ शकते.
सद्य:स्थितीतील आकडेवारीनुसार ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडले आहेत. शहरे आणि गावांच्या दरम्यान असलेला फरक उच्च जाती  आणि अनुसूचित जातींच्या दरम्यान असलेल्या फरकाइतकाच आहे. इतकेच नव्हे तर दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेत हा फरक अधिक आढळून येतो. या अध्ययनाद्वारे स्पष्ट होते की  ऐतिहासिक आणि राजकीय स्वरूपात मुस्लिम समुदाय आजदेखील अस्तित्वहीन आहे. समुदायाच्या सभोवताली उभारण्यात आलेली राजकीय आंदोलने स्पष्टपणे मुस्लिमांच्या विरूद्ध कार्यरत आहेत. यांत उघडपणे भेदभाव केला जातो. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याशी संबंधित सध्याच्या शासनाची नीतीधोरणे एक प्रकारे धार्मिक अल्पसंख्यकांसाठी अलाभकारी सिद्ध  होतात. अंतरपिढीच्या भावनेसंदर्भात पाहिले तर मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाही. यावरून मुस्लिमांच्या शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची नीती आणि त्यास  राजकीय अर्थव्यवस्थेशी जोडण्याची नीती, दोन्हींचा अभाव असल्याचे स्पष्ट होते. या विचारसरणीच्या रूपात लोकशाही मुस्लिमांच्या बाबतीत अपयशी सिद्ध होते. अशा तुच्छ  विचारसरणीच्या लोकशाहीवरील आघातामुळे देशात धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे.
ज्या  लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताने निर्णय घेतला जातो, जेथे अधिकारांचे विभाजन, स्वतंत्र न्यायपालिका, कायद्याचे राज्य आणि निष्पक्ष मीडियाचा अभाव असे तेथे अल्पसंख्यकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असते. ही स्थिती बहुसंख्यकांच्या हुकूमशाहीकडे वाटचाल करते. ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’मध्ये प्रकाशित झालेल्या एका  सर्वेक्षणानुसार धरणग्रस्त लोकांच्या विस्थापनापेक्षा अधिक विस्थापन दंगलपीडितांचे होत असते. विशेषत: गुजरात दंगलींच्या अध्ययनावरून आढळून येते की धरणग्रस्त विस्थापित पुन्हा  परत येतात मात्र दंगलग्रस्त विस्थापित परतत नाहीत. हिंसा पीडितांच्या फक्त आशाआकांक्षांवरच घाला घालत नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्यादेखील दुर्बल करते, आणि हीच प्रगतीची  महत्त्वाची अट आहे. या हिंसेविरूद्ध कार्य करण्याबरोबरच उत्तम सामाजिक नीतीधोरणे आखण्याचीदेखील अत्यंत आवश्यकता आहे. मुस्लिम समुदायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून  कोणतीही परिणामकारक योजना या सर्वेक्षण करणाऱ्या गटाला आढळून आली नाही. या मुद्द्यावर सामाजिक विश्लेषकांनी गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे. सध्या भारतीय मुस्लिम  समुदाय विकासाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे आढळून येतो. द्वेषपूर्ण वातावरणामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु हे वातावरण बदलण्यासाठी मुख्य प्रवाहातील  सध्याच्या राजकारणात फार मोठ्या बदलाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य भारतीय नागरिकांची मानसिक स्थितीतदेखील बदलण्याची अत्यंत गरज आहे. मुस्लिम समाज  फक्त गत काळातील भारताचे प्रतीकच नव्हे तर लोकतांत्रिक भविष्यासाठीदेखील त्याची आवश्यकता आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वातावरणात होत असलेल्या विचित्र बदलांमुळे आगामी काळात महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती राज्य आरोग्य  विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. पुण ए आणि नासिक जिल्ह्यात प्रामुख्याने ही लागण मोठ्या प्रमाणात होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची  भीती व्यक्त करण्यात आली आहे. पण राज्यातील देवेंद्रीय पेशवाई सरकार झोपेच्या गुंगीत असल्याचे जाणवते. राज्यात १७ लाख ८३ हजार ७१ रुग्ण स्वाइन फ्लूचे संशयित होते,  त्यापैकी ३५ हजार ८०५ रुग्णांवर ‘ओसेल्टव्हीर’ औषधांद्वारे यशस्वी उपचार करण्यात आला. यातील १७२६ लोकांना स्वाइन फ्लूचे झाल्याचे शंभर टक्के निदान (पॅझिटिव्ह) झाले तर या  वर्षात या रोगामुळे २१६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे राज्यात यंदा ४ हजार ६६७ लोकांना डेंग्यू रोगाची लागण झाली व त्यात १८ जण दगावले. आरोग्य खात्याकडून अशा वातावरण  बदलीय रोगांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त झाली असताना राज्य सरकारकडून मात्र आरोग्य विभागालाच कृत्रिम श्वासोच्छवासा (ऑक्सिजन) वर ठेवण्याचे बोटचेपे धोरण  राबविण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागच अत्यवस्थ होत असल्याचे जाणवत आहे. राज्य आरोग्य विभागाने २०१८-१९ सालाकरिता ४१११ कोटी ४५ लाख रुपयांची वार्षिक योजना  राज्य वित्त विभागाकडे सादर केली असता वित्त विभागाने अवघ्या १६७४ कोटी ९९ लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद करून आरोग्य विभागालाच अत्यवस्थ अवस्थेत सोडले आहे. मूळ  मागणीपेक्षा २ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला कात्री लावून देवेंद्र सरकार राज्यातील गोरगरीब जनतेसाठी किती संवेदनशील आहे, हेच दाखवून दिले आहे. राज्याने मंजूर केलेल्या  निधीच्या तुलनेत केंद्र सरकारकडून निधी मिळत असल्याने केंद्र सरकार पुरस्कृत आरोग्य योजना राबविताना आरोग्य विभागाचा बोजवारा वाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून राज्यातील हजारो गोरगरीब रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. यासाठी प्रतिरुग्ण दीड लाख रुपये खर्च मंजूर करण्यात येत असून या  योजनेसाठी किमान येणारा वार्षिक खर्च हा १३७५ कोटी रुपयांचा असताना राज्य सरकारच्या वित्त विभागाने यासाठी केवळ ३४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण व  शहरी आरोग्य योजना, वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य, तंबाखू नियंत्रण, राष्ट्रीय कर्करोग, मधूमेह, हृदयरोग, पक्षाघात आदिंसाठी ९२६ कोटी  ९७ लाख रुपयांची मागणी आरोग्य विभागाने नोंदविली असताना वित्त विभागाने अवघे ६१७ कोटी रुपये मंजूर करून वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. कुटुंबकल्याण योजनेअंतर्गत  २९४ कोटी ४९ लाख रुपयांची आवश्यकता असताना केवळ १३० कोटी ७२ लाख मंजूर करून ‘बच्चे – दोही अच्छे’ याची जरुरी नसल्याची प्रचिती दिली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागात सध्या डॉक्टरांसह वेगवेगळी १२ हजार पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंबंधी ‘चुनावी जुमले’ही नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार  सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान चार टक्के रक्कम आरोग्यावर खर्च केली पाहिजे, असे निकष आहेत. पण ‘महा’राष्ट्र म्हणून प्रसिद्ध राज्यात मात्र आजघडीला राज्य उत्पन्नाच्या  केवळ ‘सव्वा टक्का’ रक्कम आरोग्यावर खर्च करण्यात येत असल्यामुळे परिणामकारक आरोग्य सेवा देण्यात अडचणींचा सामना आरोग्य विभागाला करावा लागतो. प्रत्येक  अर्थसंकल्पाच्या वेळी पुरवणी मागण्यांचा कटोरा घेऊनच राज्य आरोग्य विभागाला राज्याच्या वित्त विभागात ‘दे दान, गिराणचे दान’ दारात उभे राहावे लागते. अर्थसंकल्पात मंजूर  झालेली पूर्ण रक्कमही वित्त विभागाने नियमाच्या बेड्या अडकविल्याने आरोग्य विभागाला खर्च करता येत नाही. २०१५-१६ मध्ये मंजूर रकमेपैकी ८३.८३ टक्के रक्कमच खर्च करण्यात  आली. २०१६-१७ सालात ८१.४२ टक्के तर २०१७-१८ मध्ये ८१.४२ टक्के इतकी रक्कम खर्च करण्यात आली. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य भारतीय संविधानानुसार हे पाच  मूलभूत हक्क येथील नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहेत. पण फेकूगिरीत एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा भाजप सरकारची राज्ये आणि केंद्र सरकार यांना भारतीय नागरिकांच्या या  मूलभूत हक्काविषयी काही देणेघेणे नाही. बिग बॉस प्रधानसेवकाला हजारो कोटी रुपयांची बुलेट ट्रेन तरीही मुंबई अहमदाबादसाठी हवी आहे. मग राज्यातील पेशवाई सांभाळणारे  मुख्यसेवक तरी मागे का राहावा? मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय आंग्रीया क्रूझला मुख्यमंत्र्यांनी २० ऑक्टोबर रोजी हिरवा  झेंडा दाखविला. ६ ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आकारण्यात येणार आहे. ४०० पर्यटकांसाठी १०४ खोल्या असून या क्रूझवर डेकबार, रेस्टाबार, डिस्कोबार, आदि बारची सोय करण्यात आली आहे.
या क्रूझच्या उद्घाटनावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील बंदर आणि रस्ते विकासाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे  सांगितले. राज्यातील ४ कोटी जनतेच्या आरोग्यासाठी भाजप शासनाकडे ४१११ कोटी नाहीत, पण राज्याच्या बंदर आणि रस्त्यांसाठी मात्र ७ लाख कोटी रुपये आहेत? सरकारचे डोके  ठिकाणावर आहे का? असे टिळकांना स्मरून पुन्हा एकदा विचारावेसे वाटते. प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यावे याचे साधे सामान्यज्ञानसुद्धा या भाजपप्रणित सरकारला आहे की नाही?  शेवटी हे ठरले सूटबुटातील सरकार! धोती, पायजमा नेसणाऱ्यांशी त्यांचा काय संबंध? शेवटी खिन्नतेने म्हणावे

– वकार अलीम
(मो.: ९९८७८०१९०६)

पैगंबर मुहम्मद (स.) यांची विविधांगी रूपे जगासमोर आली आहेत. गोरगरिबांचे कैवारी, शूरवीर योद्धे, सेनापती, हुशार व्यापारी, तत्त्वज्ञान व उपदेशाचे सागर, लोकहिताय राजनीतिज्ञ,  तसेच अनाथ, दीनदलितांचे व गुलामांचे कैवारी, स्त्री-जातीचे उद्धारक, न्यायप्रिय, आजीवन मानवतेचे व मानवांच्या कल्याणातच जीवनाचे ध्येय रुजविणारे अशी त्यांची विविध रूपे आहेत.  त्यांचे कार्यक्षेत्र अफाट होते. अंधारमय जगाला आकाशात ध्रूवाप्रमाणे चमकणारा तारा बनून अवतरले होते. पैगंबरांची श्रेष्ठ सामाजिक सुधारणा म्हणजे शिक्षणप्रसार होय. मानवास सुसंस्कृत बनविणयाचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे, हे त्यांनी ओळखले होते. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘ज्ञान संपादन करा. कारण नीती व अनीती, न्याय व अन्याय, पाप व  पुण्य यामधील फरक ज्ञानामुळे कळतो. शिक्षण घेणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.’’ त्यांनी मदीना शहरात पहिले विद्यापीठ ‘अल सुफ्फा’ या नावाने सुरू केले. तो चबुतरा आजही  मदीना शहरातील मस्जिद-ए-नबवी अर्थात पैगंबरांची मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे. ते स्त्रीजातीचे उद्धारक होते. त्यांचा स्त्रीभ्रूण हत्येला विरोध होता. अशा विघातक प्रवृत्ती पैगंबरांनी समाजप्रबोधन करून बंद केल्या. पैगंबरांनी पुरुषाइतकेच हक्क स्त्रीला दिले होते. ते म्हणतात, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. आईवडिलांशी सद्व्यवहार करा, असा त्यांनी सर्व मानवजातीला उपदेश दिला आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश अखिल मानवजातीसाठी आहे. वर्ण, वंश, भाषा, उच्चनीच, गरीब, श्रीमंत, काळा, गोरा अशा सर्व प्रकारच्या  भेदभावांना मूठमाती देऊन प्रत्येकाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. अखिल मानवजात एक आहे आणि सर्वांचे ईश्वर एकच आहे. अल्लाहजवळ सर्व समान आहेत. मानवांत  हीच खरी इस्लामची जीवपद्धती आहे. मानवांची सेवा हीच अल्लाहची सर्वश्रेष्ठ सेवा होय, असे जो मान्य करेल तो विश्वव्यापी मुस्लिम समुदायाचा घटक आहे. मग तो कोणत्याही पंथाचा किंवा जातीचा असो.
पैगंबरांनी समता व बंधुता या तत्त्वांना अनुसरून आचरण करण्याची शिकवण दिली. सद्वर्तन ही अल्लाहची उपासना होय, असे त्याचे विचार होते. बंधुत्वाचे हे नाते समतेपेक्षाही अधिक एकमेकांशी जवळीक निर्माण करणारे आहे आणि हे नाते पैगंबरांनी केवळ मुस्लिमांपुरतेच मर्यादित ठेवले नाही. जर कुणाचा शेजारी उपाशी असेल तर असा मानव मुस्लिम होऊच शकत नाही. मग तो शेजारी कोणत्याही जातीधर्माचा का असेना. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याची चिंता करावी. म्हणजे एखाद्या वस्तीतली सारी माणसं एकमेकांचे शेजारी आणि त्या वस्तीला लागून दुसऱ्या वस्तीचे लोक त्या वस्तीचे शेजारी होतील. याचा विस्तार होत एका राष्ट्राचे सारे नागरिक आणि राष्ट्राला लागून असलेल्या राष्ट्राचे सारे नागरिक एकमेकांचे शेजारी होतील. लोकांशी चांगलं बोलणं, त्यांना क्षमा करणं, कुणास पाहताना स्मितहास्य करणं, आपल्यापासून दुसऱ्याला नुकसान होईल असे वर्तन न करणं, रस्त्यातून त्रासदायक वस्तू बाजूला सारणं  अशी परोपकारी कामं म्हणजे ईश्वराच्या (अल्लाहच्या) उपासना आहेत. आपसातल्या संबंधांमध्ये आपुलकीचा व्यवहार करणं, विधवा स्त्रीची मदत करणं, गोरगरीब, गरजू, वंचित,  पीडितांच्या हक्कासाठी झटणं हीदेखील अल्लाहची उपासनाच आहे. एवढंच नव्हे तर एकदा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, आपसातले संबंध जोपासणं ही श्रेष्ठ उपासना आहे.’’
समता व बंधुता या दोन वैश्विक तत्त्वांवर आधारलेली सद्वर्तन आचरणाची इस्लामची जीवनपद्धत पैगंबरांनी आपल्या वचनांतून अनेक ठिकाणी जाहीर केलेली आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, दुसऱ्याच्या अंत:करणात प्रेम निर्माण होईल अशा तऱ्हेने आचरण ठेवा. तुमचा कट्टर शत्रू असला तरीही त्याच्याशी प्रेमाने वागा. तुमच्या हृदयात द्वेषबुद्धीस थारा देऊ नका. अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने जीवन जगणं, लग्न कार्य करणं, गाजावाजाला प्रतिबंध पैगंबरांनी घातले आहेत. सावकारी, लाचखोरी, व्यसनाधिनता,  व्यभिचार, वेश्याव्यवसाय या सर्व बाबींस पैगंबरांनी मनाई केली आहे.
समाजातील धर्मगुरू, राजकीय नेते, हाजी लोक यांना एकत्र येऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे विचार आणि आचार तळागाळातील सर्व मानवांपर्यंत पोहचविणे ही आजच्या काळाची गरज  आहे.

-जमीर मौला नरदेकर
कसबे डिग्रज, सांगली.
९६२३२७३६४१

विवेकानंद, सर सय्यद, रविंद्रनाथ टागोर, शिबली नोमानी, अरविंद घोष, मौलाना आझाद हे आधुनिक भारतातील काही धर्मचिंतक आहेत. या पूर्वकालीन आणि समकालीन दार्शनिकांत इक्बालांनी ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाह वलिउल्लाह यांच्यानंतर बुध्दी आणि तर्काच्या आधारे तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात  इस्लामचा अर्थ सांगणारे इक्बाल हे पहिले दार्शनिक आहेत. इक्बाल स्वतः तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी इस्लामी तत्त्वज्ञानाचा अर्थ तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांच्या आणि  दार्शनिकांच्या तुलनेत सादर करण्याचा प्रयत्न केला. इक्बाल मूलतः कवी म्हणून चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या कविता या फक्त कल्पनेचा परिपोष नाहीत. त्यांच्या काव्याचा विषयदेखील  मूलतः तत्त्वज्ञान हाच आहे. जावेदनामा, असरारे खुदी, अरसगाने खुदी ही त्यांची काही प्रख्यात महाकाव्ये आहेत. यापैकी जावेदनामा हे दार्शनिक पाश्र्वभूमीवर आधारित ‘संवादी’ फारसी  महाकाव्य आहे. ३५ विभिन्न पात्रांशी संवाद साधत हे महाकाव्य पुर्ण होते. या महाकाव्यात इक्बाल यांनी १०० हून अधिक दार्शनिकांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करताना त्यांच्या तत्त्वज्ञानाशी, मतांशी वाद घातला आहे. यासाठी त्यांनी महाकाव्यात आपले आध्यात्मिक गुरू रुमी यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभे केले आहे. त्यांच्या विचारांच्या आधारे इस्लामचे  तत्त्वज्ञानीय रूप स्पष्ट करत ते दार्शनिकांच्या कार्याची समीक्षा करतात. दांते हे महान विचारवंत होते. ते इक्बालांच्या अभ्यासाचा विषय. डिवाईन कॉमेडी ही त्यांची लॅटीन साहित्यकृती  आहे. त्यामध्ये दांतेने वर्जिन ला आपला मार्गदर्शक म्हणून उभे केले आहे. तीच पध्दत इक्बाल यांनी जावेदनामात रुमींसाठी वापरली आहे. इक्बालांच्या या महाकाव्यात ३२ मुख्य पात्रे  आहेत. त्यापैकी १२ पात्रे ही कवी, विचारवंत, तत्त्वज्ञांची आहेत. याच महाकाव्यात इक्बाल यांनी मार्क्सचे हृदय आस्तिक आणि बुध्दी नास्तिक होती, असा उल्लेख केला आहे. ( कल्बे  ऊ मोमीन दिमगश काफिर) इक्बाल हे मार्क्सचे कठोर टिकाकार होते. त्यांनी जमालुद्दीन अफगानी या आपल्या काव्यातील पात्राच्या साहाय्याने मार्क्सच्या चिंतनाला टिकेचे लक्ष्य बनवले  आहे.
इक्बालांचे मार्क्सच्या शोषणविरहित समाजाच्या संकल्पनेशी मतैक्य होते. मात्र वर्गसंघर्षाचा सिध्दान्त मांडून माणसाला नैसर्गिक अवस्थेची समता स्थापित करता येणार नाही, असे त्यांचे  ठाम मत होते. ‘खुदी’ ( self ) चा विकास केल्याशिवाय माणूस शोषणाचा सामना करण्यासाठी सिध्द होऊ शकत नाही, असे इक्बालांचे चिंतन होते. समतेसाठी सांगितलेल्या मार्क्सचा पाया, इमला सिध्दान्ताच्या पुढे जाऊन इक्बाल अतिनिसर्गवादी भूमिका मांडत होते. मार्क्स ईश्वराच्या अधिसत्तेला आव्हान देत असल्याची टिकादेखील इक्बाल यांनी त्यांच्या काव्यातून  केली आहे. इक्बालांनी मांडलेली ‘खुदी’ची संकल्पना नित्शेच्या ‘अधिमानव’ ( Super Man ) संकल्पनेसारखी असल्याची टिका केली आहे. मात्र मुहम्मद शिस खान या आरोपात तथ्य  नसल्याचे सांगतात.
इक्बाल यांनी इसा मसीह (अ.) यांचा अनुयायी म्हणून टॉल्सटॉयचा गौरव करणारी एक दीर्घकविता या महाकाव्यात समाविष्ट केली आहे. टॉलस्टॉय हे सैनिकी जीवन जगलेला तत्त्वज्ञ  होता. त्याने आयुष्यभर इसा मसिह (अ.) यांच्या समाजक्रांतीचा इतिहास चिंतनासाठी विषय म्हणून निवडलेला होता. त्यानंतर आपल्या महाकाव्यातील बहुतांश पाश्चात्य तत्त्वज्ञांना  इशारा देताना ते एका शेर मध्ये म्हणतात,
‘‘तुम्हारी तहजीब अपने खंजर से आप ही खुदकुशी करेगी ।
जो शाखे नाजुक पे आशियाना बनेगा, नापाएदार होगा ।।’’

समतेचा मार्ग ‘खुदी’च्या विकासात
कोणताही तत्त्वज्ञ चिंतनाच्या क्षेत्राकडे सामाजिक हिताच्या परिस्थितीच्या शोधासाठी वळतो. इक्बालांचे चिंतन याहून वेगळे नव्हते. माणसाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘खुदी’च्या विकासाची भूमिका घेतली. यासंदर्भात त्यांनी जगातील अनेक तत्त्वज्ञांच्या विचारांचा आधार घेतला. ‘असरारे खुदी’ इक्बालांची फारसी मसनवी आहे. त्यामध्ये प्लेटोच्या ‘रिपब्लिक’च्या  मांडणीचे इक्बालांनी कौतुक केले आहे. प्लेटोचा गौरव करताना ते आपल्यावर प्लेटोचा प्रभाव असल्याचे सांगतात,

‘‘बर तखय्युलहाए मा फर्मारिवास्त
जामे ऊ ख्वाब आवरो गेतीरुबास्त ।।’’

(आमच्या विचारांवर तो पसरलेला आहे. पेला आहे त्याचा निद्राकारक आणि इंद्रिय जगताचा याचक.)
इक्बाल यांनी ‘असरारे खुदी’मध्ये ‘मऱ्हलए दोम जब्ते नफ्स’ भोगीवृत्ती, वासना यांना वेसण घालून ‘खुदी’चा विकास कसा करायचा याचे विश्लेषण केले आहे.

इक्बालांच्या काव्यात कामगार हिताचा एल्गार
कष्टार्जन हा भूमिपुत्रांचा राष्ट्रधर्म. पण वसाहतिक मूल्यांनी भांडवलदारी आसूयेने मजुरांना वेठीस धरलं. त्यांचं शोषण केलं. इक्बालांनी त्या अन्यायाविरोधात आपल्या शब्दांची शस्त्र उगारली. ‘बांगे दिरा’ हा इक्बालांचा काव्यसंग्रह. इतिहास आणि कल्पनांचं मिश्रण त्यात आहे. भावना आणि बुध्दिवादाची सांगड घालून इक्बालांनी आपल्या चिंतनाला त्यात शब्दबद्ध  केलंय. ‘सरमाया व मेहनत’ म्हणजे भांडवल आणि मेहनत ही त्या काव्यसंग्रहातली इक्बालांची एक कविता. सांप्रत भांडवलदारी मानसिकतेचा प्रत्यय त्यातून येतो. भांडवलादारी  मानसिकतेला उघडे पाडून इक्बालांनी मजुरांच्या जागृतीचा एल्गार त्यातून पुकारला आहे. त्यात इक्बाल म्हणतात,

‘‘बंदाये मज्दूर को जाकर मेरा पैगाम दे
खिज्र का पैगाम क्या, है ये पयामे कायनात।।१।।

अय तुमको खा गया के सरमायादारे हीलागर
शाखे आहू पर रही सदियोंतलक तेरी बरात।।२।।’’

मजुरांचे दुःखी कष्टी जिणे इक्बालांना पाहावत नाही. त्यांच्या हळव्या मनाला त्यामुळे वेदना होतात. ते मजुराला संदेश देतात. म्हणतात, मजुराला या स्थितीतून सावरता यावं यासाठी  हा माझा संदेश आहे. माझा हा संदेश त्यांना द्या. हा फक्त माझाच नाही तर साऱ्या सृष्टीचा संदेश आहे. (हे मजुरांनो, श्रमिकांनो) त्या धूर्त भांडवलदारांनी (सरमायादार) तुम्हाला संपवले  आहे. तुझ्या क्षमतांना गिळंकृत केले आहे. त्यांच्या इच्छेवर तुझी मजुरी ठरत आहे. कार्ल मार्क्सने श्रममूल्य आणि वस्तूचे बाजारमूल्य यातील तफावत सांगितली. कोणत्याही वस्तूचे  वरकड मूल्य ( अतिरिक्त मूल्य / सरप्लस व्हॅल्यू) हे भांडवलदाराकडून श्रमिकांच्या होणाऱ्या शोषणाचे प्रतीक असल्याचे तत्त्व त्याने शोधून काढले. वरकड मूल्यात मजुरांनाही वाटा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे मार्क्सचे स्वप्न म्हणता येईल.

‘‘दस्ते दौलत आफरी को मुज्दायौ मिलती रही
अहले सरवत जैसे देते है गरीबोंको जकात ।।३।।

साहीरे अल्मुतने तुझ को दिया बर्गे हशीश
और तु अय बेखबर समझा उसे शाखे नबात ।।४।।’’

मजूर हा श्रीमंताची गरज असतो. पण त्या गरजेचं प्रदर्शन मात्र श्रीमंत भांडवलदार कटाक्षानं टाळतात. मजुराला काम देऊन जणू काही ते मजुरावर उपकार करत आहेत. अशा  अविर्भावात वागतात. श्रीमंतांनी गरीबाच्या तोंडावर जकात फेकावी त्यापध्दतीने श्रीमंतांची संपत्ती आपल्या कष्टातून उभी करणाऱ्या मजुरांना मजुरी मिळत असते. या अन्यायाची जाणीव  कामगारांना होत नाही. जणू काही अल्मुत नावाच्या पर्वतावरील जादूगाराने त्यांना हशीशचे मादक द्रव्य देऊन गुंग केले आहे. त्यामुळेच ते हशीशसारख्या मादक द्रव्याला ते कल्पवृक्ष  समजत आहेत. म्हणजे मजूर हे त्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांनाच आपला मुक्तिदाता मानत आहेत.
‘‘ नस्ल, कौमीयत, कलिसा,सल्तनत,तहजीब,रंग ‘खाजगी’ ने खूब चुनचुनकर बनाये मुस्कीरात।।५।।

कट मरा नादां खियाली देवतांओ के लिये सुक्र कि लज्जत में तु लुटवागया लज्जते हयात।।६।।’’

मजुरांना भुलवण्यासाठी त्यांना त्यांच्या कल्याणाच्या मार्गापासून भटकवण्यासाठी नेत्यांनी मोहमयी विषयांची निर्मिती केली आहे. वंश, राष्ट्रवाद, मठ, राज्य, संस्कृती, वर्ण ही सर्व त्या नेत्यांनी मजुरांसाठी बनवलेली मादक द्रव्ये आहेत. नादान मजुरा तू या खोट्या दैवतांच्या (मादक द्रव्यांच्या) व्यर्थ मागे पडला आहेस. त्यातूनच तुझं मरण ओढावलयं. समाधिसुखासाठी  तू ऐहिक जीवन मात्र गमावलंस. त्याला तुझ्या नादानपणामुळे उद्ध्वस्त करून घेतलंस.

‘‘मक्र की चालों से बाजी ले गया सरमायादार इंतिहाये सादगीसे खा गया मज्दूर मात ।।७।।

उठ के बज्में जहां का और ही अंदाज है मशरीक व मगरीब में तेरे दौर का आगाज है।।८।।’’

भांडवलदार हे धूर्त आहेत. त्यांनी आपल्या धूर्त खेळीने विजय मिळवला. त्यांच्या धूर्तपणामुळेच श्रमिकांनी अत्यंत साधेपणाने पराभव स्वीकारला. पण हे मज्दूरा आता उठ. ही पराभूत मानसिकता त्याग. पूर्व आणि पश्चिमेत तुझ्या युगाची नांदी सुरू झाली आहे.

‘‘हिंमते आली तो दरिया भी नहीं करती कुबूल गुंचा सैं गाफील तरे दामन मे शबनम कबतलक।।९।।

नग्मायें बेदारीये जमहूर है सामाने ऐश किस्साये खाबआवरे इस्कंदारो जम कबतलक।।१०।।’’

श्रमिक आहे म्हणून मजुरांनी किती दिवस न्युनगंडात राहावे. त्यांनी क्रांतीची मशाल पेटवावी. मजुरांनी क्रांतिप्रवण व्हावं म्हणून इक्बाल भांडवलदारांच्या विरोधात मजुरांना धैर्य देतात. इक्बाल मजुरांना म्हणतात, दृढनिश्चय असेल तर कोणतीही बाब असाध्य नाही. किती दिवस फुलात दवबिंदू असावेत त्याप्रमाणे तू आसवांनी आपले कपडे भिजवत राहाशील.  बहुजनांमध्ये बेदारी (जागृती) निर्माण करणारे गीत आनंददायी आहे. तुला मोहीत करणाऱ्या सिकंदर आणि जमशेदच्या गोष्टी तू किती दिवस ऐकत बसणार आहेस.

- सरफराज अहमद
गाजियोद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांचे पुत्र अब्दुर्रहमान यांच्या कथनानुसार, सुफ्फावाले गरीब लोक होते. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याच्या घरात दोन मनुष्यांचे  अन्न आहे त्याने येथून तिसऱ्याला घेऊन जावे आणि ज्याच्याजवळ चार मनुष्यांचे अन्न आहे त्याने एक अथवा दोन मनुष्यांना घेऊन जावे.’’ तेव्हा माझ्या वडिलांनी (अबू बक्र (रजि.)  यांनी) आपल्या घरी तीन लोकांना आणले आणि पैगंबरांनी आपल्या घरात दहा लोकांना नेले. (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांचे नेता व सेनापती होते. जर त्यांनी त्यांच्या घरी दहा लोकांना घेऊन गेले नसते तर सर्वसामान्य लोक दोन, चार, सहा आणि आठ लोकांना आनंदाने का  घेऊन जातील. कायद्यानुसार जबाबदार लोकांनी त्याग व बलिदान केले तर त्याच्या मागे चालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक त्याग व बलिदानाची भावना उद्दिपित होईल. पुढे चालणारेच जर मागे राहिले तर मागे चालणाऱ्यांमध्ये आणखीन मागे जाण्याच्या भावनेस चालना मिळेल.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, इस्लामकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना देत होते. पैगंबरांना जे काही मागण्यात आले, त्यांनी मागणाऱ्याला  ती वस्तू अवश्य दिली. एकदा एक मनुष्य पैगंबरांकडे आला तेव्हा पैगंबरांनी त्याला दोन टेकड्यांदरम्यान चरणाऱ्या सर्व शेळ्या देऊन टाकल्या. तो मनुष्य आपल्या कबिल्यात गेला आणि  म्हणाला, ‘‘हे लोकहो! इस्लामचा स्वीकार करा कारण दारिद्र्य व उपासमारीला न घाबरणाऱ्या मनुष्यासारखे मुहम्मद (स.) देतात.’’
कथनकार (माननीय अन रजि.) पुढे म्हणतात की मनुष्य फक्त जगाच्या इच्छेपोटी ईमान बाळगतो, परंतु अधिक काळ लोटला नाही तोच इस्लाम त्याच्या आत्म्यामध्ये पैगंबरांच्या  शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे प्रवेश करतो आणि जग व जगातील साधनसामुग्रीपासून इस्लामच्या दृष्टीने अधिक प्रिय बनतो. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, एका ‘नबी’ (पैगंबर)चा परिचय करून देताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर आहे.’’  पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा प्रसार (आवाहन) करण्याच्या अपराधापोटी त्या ‘नबी’च्या समुदायातील लोकांनी त्यांना इतके मारले की ते रक्तबंबाळ केले आणि ‘नबी’ची स्थिती अशी होती की त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रक्त पुसत पुसत म्हणायचे की हे अल्लाह! माझ्या समुदायाचा हा अपराध क्षमा कर. (आणि आता यांच्यावर प्रकोप कोसळवू नकोस.) कारण हे लोक  अज्ञान आहेत, सत्य स्थिती जाणत नाहीत.’’ (हदीस : बुखारी)
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘तुम्हाला कधी उहुदच्या दिवसापेक्षा अधिक कठीण व त्रासदायक एखादा दिवस कंठावा लागला  आहे काय?’’ पैगंबर म्हणाले की आएशा (रजि.)! तुमच्या कुरैश समुदायाकडून मला खूप त्रास झाला आणि सर्वांत अधिक कठीण व त्रासदायक दिवस कंठावा लागला तो उ़कबाचा दिवस होता. त्या दिवशी मी स्वत:ला अब्द या लैल इब्ने अब्द किलालसमोर सादर केले, परंतु जे काही मला हवे होते ते देण्यास त्याने नकार दिला. तेव्हा मी बेचैन होऊन आणि विचार करीत  तेथून निघालो. जेव्हा मी करनुस्सआलिब पोहोचलो तेव्हा दु:ख थोडे कमी झाले, मग मी आकाशाकडे पाहिले तेव्हा मला जिब्रिल (अ.) दिसले. त्यांनी मला हाक मारून म्हटले, ‘‘तुमच्या समुदायाने जे काही तुम्हाला सांगितले आणि ज्याप्रकारे त्यांनी तुमच्या वक्तव्याचे उत्तर दिले आहे ते अल्लाहने ऐकले आणि अल्लाहने तुमच्याकडे डोंगरांचे नियोजन करणारे देवदूत  पाठविले आहेत. तुम्हाला वाटेल तो यांना आदेश द्या, ते सत्याला नाकारणाऱ्यांच्या बाबतीत तुमचा आदेश स्वीकारतील.’’ मग मला डोंगरांच्या देवदूताने हाक दिली, सलाम केला आणि  म्हटले, ‘‘अल्लाहने ऐकले आणि मला डोंगरांच्या नियोजासाठी पाठविण्यात आले आहे आणि माझ्या पालनकर्त्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे जेणेकरून तुम्ही मला जो आदेश  इच्छित असाल तो द्या आणि जे काही तुम्हाला हवे आहे ते सांगा. हवे तर दोन्हीकडील डोंगरांना मी अशाप्रकारे जवळ करीन की हे लोक त्यांच्या दरम्यान चिरडले जातील.’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही. त्याऐवजी मला अशी अपेक्षा आहे की त्यांच्या अपत्यांपैकी असे लोक असतील जे फक्त अल्लाहची भक्ती करतील, त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनविणार  नाहीत.’’
(हदीस : बुखारी, मुस्लिम)

(२) अनाथांची संपत्ती त्यांना परत करा. चांगल्या मालाला वाईट मालाने बदलू नका, आणि त्यांचा माल आपल्या मालात मिसळून खाऊ नका, हा फार मोठा गुन्हा आहे.
(३) आणि जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी दोनदोन, तीन-तीन, चार-चारशी विवाह करा.  परंतु जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही तर मग एकच पत्नी करा. किंवा त्या स्त्रियांना आपल्या दांपत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात  आल्या आहेत, अन्यायापासून वाचण्यासाठी हे औचित्याच्या अधिक निकटचे आहे.
(४) आणि स्त्रियांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वत: स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता.


२) म्हणजे जोपर्यंत ते लहान मुले आहेत तोपर्यंत त्यांची संपत्ती त्यांच्याच हितासाठी खर्च करा आणि ते मोठे झाले तर त्यांना त्यांचा हक्क परत करा.
३) हे मोठे व्यापक वाक्य आहे. याचा एक अर्थ आहे की वैध कमाई करण्याऐवजी हरामखोरी करू लागू नये. दुसरा अर्थ आहे की अनाथांच्या चांगल्या संपत्तीला आपल्या वाईट संपत्तीने बदलू नका.
४) टीकाकारांनी याचे तीन अर्थ सांगितले आहेत.
(१) माननीय आएशा (रजि.) याच्या तपशीलात म्हणतात, अज्ञानकाळात ज्या अनाथ मुलीं लोकांच्या संरक्षणात असत, त्यांची सुंदरता आणि संपत्ती पाहून अथवा त्यांचा कोणी पालक  नाही म्हणून आम्ही वाटेल तसे त्यांना वागवू, ते त्या अनाथ मुलींशी स्वत: विवाह करीत असे आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार करीत असत. म्हणून सांगितले गेले की तुम्हाला शंका  असेल की अनाथ मुलींबरोबर न्यायपूर्ण व्यवहार तुम्ही करू शकणार नाही तर दुसऱ्या स्त्रिया जगात आहेत. त्यांच्यापैकी ज्या तुम्हाला पसंत पडतील त्यांच्याशी लग्न करा. /याच  अध्यायातील आयत १२७ याची पुष्टी करीत आहे.
(२) इब्ने अब्बास (रजि.) आणि त्यांचे शिष्य इक्रीमा याचा तपशील सांगतात की, अज्ञानताकाळात लग्न करण्याची सीमा निश्चित नव्हती. एक मनुष्य दहा-दहा पत्नीं करीत होता. या  साऱ्या पत्नींचा संभाळ करणे जेव्हा अशक्य होई तेव्हा तो मनुष्य विवश होऊन आपल्या अनाथ नातेवाईकांच्या हक्कांवर ड़ल्ला मारत असे. यासाठी अल्लाहने चार पत्नींची सीमा निश्चित केली आणि सांगितले की अत्याचार आणि अन्यायापासून वाचण्यासाठी एक ते चारपर्यंत एवढे विवाह करा ज्यांच्याशी तुम्ही न्यायाने वागावे.
(३) सईद बिन जुबैर, कतादा आणि इतर टीकाकारांच्या मते अज्ञानी लोकसुद्धा अनाथांशी अत्याचार व अन्यायपूर्ण व्यवहार करण्यास चांगले समजत नसत. परंतु स्त्रियांच्या मामल्यात  त्यांची मनं न्यायपूर्ण नव्हती. जितके मनात येईल तितके लग्न करत होते आणि नंतर त्यांच्याशी अन्याय, अत्याचारपूर्ण व्यवहार करीत असत. म्हणून सांगितले गेले की तुम्ही अनाथांबरोबर अन्यायपूर्ण व्यवहार करण्यास घाबरता तर स्त्रियांशीसुद्धा अन्यायपूर्ण व्यवहार करू नका. एक तर चारपेक्षा जास्त लग्न करूच नका आणि या चारच्या मर्यादेत तितक्याच  पत्नी करा जितक्यांशी तुम्ही न्यायोचित व्यवहार करू शकाल. आयतच्या शब्दप्रयोगात या तिन्ही तपशीलांना वाव आहे आणि संभवत: तात्पर्य तिघांशीही असू शकतो. याव्यतिरिक्त एक  अर्थ असाही होऊ शकतो की जर तुम्ही अनाथांबरोबर तसा न्यायोचित व्यवहार करू शकत नाही तर या अनाथांच्या मातांशी विवाह करा. (नोट : मौलाना मौदूदी (रह.) यांनी `तर्जुमा कुरआन मजीद' मध्ये खालील टीप दिली.)
``लक्षात ठेवा ही आयत एकापेक्षा जास्त पत्नी करण्याची परवानगी देण्यासाठी अवतरित झालेली नाही. कारण याच्या अवतरणापूर्वी हे कार्य वैध होते आणि स्वत: अल्लाहचे पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या एकापेक्षा जास्त पत्नीं होत्या. ही आयत या हेतुने अवतरित झाली होती, की युद्धात शहीद होणाऱ्यांची मुले अनाथ होत होती. त्यांच्या समस्येला सोडविण्यासाठी  सांगितले गेले की तुम्ही या अनाथांचे हक्क अदा करू शकत नाही तर त्या स्त्रियांशी लग्न करा ज्यांची अनाथ मुले आहेत.''
५) यावर मुस्लिम समुदायाचे सर्व फिकाहशास्त्री सहमत आहेत की या आयत द्वारा पत्नींची संख्या निश्चत करण्यात आली आणि एकाच वेळी चारपेक्षा जास्त पत्नी बाळगण्यावर मनाई  करण्यात आली. हदीसद्वारासुद्धा याची पुष्टी होते. तसेच ही आयत बहुपत्नीत्वाला न्यायाच्या अटीवर मान्यता देते. जो मनुष्य न्यायाची अट पूर्ण करीत नाही परंतु एकापेक्षा जास्त पत्नी  करण्याच्या परवानगीने फायदा उठवितो, तो अल्लाहबरोबर दगाबाजी करतो. इस्लामी राज्यातील न्यायालयांना अधिकार आहे की ज्या पत्नीशी अथवा पत्नींशी तो न्यायोचित व्यवहार  करीत नसेल, त्यांना न्याय द्यावा. काही लोक पश्चिमी विचारसरणीशी प्रभावित होऊन, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की कुरआनचा मूळ उद्देश बहुपत्नीत्व परंपरेला (जी पश्चिमी  दृष्टीने वाईट पद्धत आहे) नष्ट करणे होते. परंतु ही समाजात खोलवर रुजलेली परंपरा होती म्हणून त्यावर फक्त प्रतिबंध लावून सोडून दिले. परंतु या गोष्टी मानसिक दासतेचे लक्षण  आहेत. बहुपत्नीत्व विवाह स्वत: वाईट असणे, हे मान्य करण्यायोग्य नाही कारण काही परिस्थितीत ही नैतिक तथा सांस्कृतिक गरज बनते. कुरआनने स्पष्ट शब्दात बहुपत्नीत्वाला योग्य ठरविले आहे. संकेत करूनसुद्धा त्यावर टीका केली नाही, की या प्रथेला नष्ट करण्याकडे इशारासुद्धा केला नाही.
६) तात्पर्य दासी आहेत म्हणजे त्या स्त्रिया ज्या युद्धकैदी म्हणून आल्या आणि युद्धकैद्यांची अदलाबदल न होण्याच्या स्थितीत राज्याकडून लोकांत वाटून दिल्या. अर्थ हा आहे की एक  स्वतंत्र, खानदानी पत्नीचे ओझे तुम्ही वाहू शकत नसाल तर मग दासींशी विवाह करा. जसे आयत नं. २५७ मध्ये आले आहे की एकापेक्षा जास्त पत्नींची तुम्हाला आवश्यकता असेल  आणि स्वतंत्र, खानदानी पत्नींमध्ये न्यायोचित व्यवहार करणे तुमच्यासाठी अशक्य असेल तर दासींशी लग्न करा कारण तुलनात्मकपणे कमी ओझे तुमच्यावर येऊन पडेल.
७) माननीय उमर (रजि.) आणि काझी शुरैहांचा निर्णय आहे, की जर एखाद्या पत्नीने आपल्या पतीला पूर्ण मेहर अथवा मेहेरचा काही भाग माफ केला आणि नंतर तिने पुन्हा त्याची  मागणी केली तर पतीने ते दिले पाहिजे. कारण त्याची मागणी करणे म्हणजे ती आपल्या स्वखुशीने महेर अथवा त्याचा काही भाग सोडण्यास तयार नाही.

सरकार शेतकर्यांच्या प्रश्नासंबंधी असंवेदनशील आहे का हतबल?
अलिकडे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्याच्या तराई गावातील शेतकरी पोतन्ना पल्लेवाड यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून स्वत:च्या हाताने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केली आहे. पाथरी, पाथरगव्हान येथील शेतकरी शिवाजी बाबासाहेब घाडगे (55) यांनीही बँकेच्या 3 लाखाच्या कर्जापोटी विष पिऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा जामगाव ता. उमरी येथील शेतकरी पांडुरंग शंकर सावंत (60) यांनीही कर्जामुळे विष पिऊन आत्महत्या केली आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र पुन्हा नव्याने सुरू झाले आहे की काय? अशी रास्त भिती वाटत आहे. स्वत:च्या हाताने स्वत:च्या चिता रचून आत्महत्या करणे यापेक्षा आत्महत्येचे दूसरे रौद्ररूप असूच शकत नाही असे वाटते. शेतकर्यांनी या टोकाच्या भूमिका घेण्यामागे त्यांची विवशता किती आहे, याचा अंदाज येतो.
    गेल्या साडेचार वर्षात शेतकर्यांनी अनेक उग्र आंदोलने केली. मेलेले उंदीर तोंडात घेवून, अर्धनग्न होवून दक्षीण भारतातील शेतकर्यांनी दिल्लीला जावून आंदोलन केल्यानंतरही निबर कातडीच्या शासनाला काही फरक पडलेला दिसून येत नाही.   येत्या 29 आणि 30 नोव्हेंबरला पुन्हा एक लाँगमार्च काढण्यात येईल, अशी घोषणा मुंबईमध्ये शेतकर्यांमार्फत करण्यात आलेली आहे. यात शेतकर्यांच्या जुन्याच मागण्या परत शासनास पुढे मांडण्याचा शेतकर्यांचा मानस आहे. एकतर पिकांना हमीभाव देणे दूसरे पिकांची खरेदी व्यवस्था दलालांच्या हातातून काढून घेणे. शासनाने शेतकर्यांना खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा अनेकवेळा केली. एवढेच नव्हे तर असेही घोषित केले की, शासनातर्फे दीडपट भाव देण्यात सुद्धा आलेला आहे. मात्र इंडियन एक्सप्रेसमध्ये हरिष दामोदरन यांनी यासंंबंधी सविस्तर लेख लिहून शासनाचा दुटप्पीपणा उघडा पाडला आहे. योगेंद्र यादव यांनीही यावर विपुल लेखन केलेले आहे. मध्यप्रदेशात शेतकर्यांवर झालेला पोलीसी हल्ला किंवा दिल्लीमध्ये प्रवेश करू पाहणार्या शेतकर्यांवर झालेला पाण्याचा जबरदस्त मारा या दोन्ही घटनांची चित्र लोकांच्या स्मृती पटलामधून अदृश्य झालेली नाहीत. त्यात येत्या 29 आणि 30 नोव्हेंबरला निघणार्या लाँगमार्चमध्ये शेतकर्यांसमोर काय वाढून ठेवले आहे? याचा अंदाज येत नाही. राज्य आणि केंद्र सरकारने अनेक पॅकेजेसची घोषणा करूनही शेतकर्यांचे आत्महत्यासत्र थांबत नसल्यामुळे व त्यात दिवसेंदिवस तीव्रता येत असल्यामुळे हे पॅकेजेस कोठे हवेत विरतात हे समजेनासे झालेले आहे. या घोषित पॅकेजेसमध्ये शेतकर्यांचा कमी आणि बँकांचा जास्त फायदा झाल्याचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. शरद जोशी यांनी शेती नियंत्रणमुक्त करावी, अशी मागणी करून अनेक वर्षे लोटली मात्र सरकारी नियंत्रणातून शेतीकाही सुटत नाही.
    यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या अपुर्या पर्जन्यवृष्टीमुळेसुद्धा शेतकर्यांचे काळीज तोंडाला आलेले आहे. खरीपामधील अनेक पिकांना अतोनात नुकसान झालेले आहे. उतारा कमी आलेला आहे. रबीच्या पिकांची कुठलीही खात्री नाही. कांदा यावर्षीही रडवणार की काय? अशी भिती वाटत आहे. येणारा उन्हाळा शेतकर्यांसाठी पुन्हा जीवघेणा ठरतो की काय? याची रास्त भिती वाटत आहे. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आधीपासूनच आ-वासून उभी आहे. त्यात पुन्हा हा उन्हाळा कसा जाईल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे. इंधनविहिरींना पाणी आतापासूनच कमी झाले आहे. अनेकठिकाणी बोअर बंद पडण्यात सुरूवात झालेली आहे.
    पर्यावरण बदलाचा फटकासुद्धा शेतकर्यांना बसत आहे. गेल्या आठवड्यापासून दिवसा तीव्र उष्णता आणि रात्री तीव्र थंडी असा वातावरणातील अजब बदल पहायला मिळत आहे. यामुळे विशेषत: मुलं आणि वृद्धांना या बदलाचा फटकाचा बसून ते आजारी पडत आहे. ग्रामीण भागात पुरेशा आरोग्या सुविधा नाहीत. जी आरोग्य केंद्रे आहेत ती स्वत: आजारी आहेत. त्यात औषधांचा तुटवडा हा कायमचा विषय आहे. अशात आजारी लोकांना खाजगी रूग्णालयात दाखविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी वेगळीच कसरत शेतकर्यांना करावी लागत आहे. महागडी औषधे घेण्याची ऐपत नसल्यामुळे अनेक वृद्ध शेतकरी व शेतमजूर आजार अंगावर काढीत आहेत, असे काळीज हेलावणारे एकंदरित चित्र मराठवाड्यातल्या ग्रामीण भागामध्ये आतापासूनच दिसून येत आहे. सरकार शेतकर्यांच्या प्रश्नासंबंधी असंवेदनशील आहे का हतबल आहे, हेच कळायला मार्ग नाही. शेवटी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी आर्त हाक महाराष्ट्रातील नागरिक सरकारकडे लावत आहेत.
 
- मीना नलवार
9822936603

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इन्क्लाब, उर्दू टाईम्स या मुंबईहून प्रकाशित होणार्या दोन वर्तमानपत्रामध्ये अब्दुल रशीद नावाच्या अनाथ मुलाची प्रेरणादायक बातमी प्रकाशित झाली आहे. ज्याला गेल्या दहा वर्षांपासून एका ब्राह्मण कुटुंबाने सांभाळले आहे. प्रा. सुचित्रा अश्विन नाईक व त्यांचे पती यांनी मिळून अ. रशीदचे संगोपन केले आहे. नुकताच  अ.रशीदचा विवाह झाला. त्यानिमित्त त्याने वरील वर्तमानपत्रातील बातमीदाराला सांगितले की, ”माझी आई आणि वडील अर्थात नाईक ब्राह्मण दाम्पत्यांनी मिळून माझे जसे संगोपन केले तसे संगोपन देशातील प्रत्येक मुलाला मिळो. मला माहित नाही की माझे जन्मदाते आई-वडिल आणि नातेवाईक कोण आहेत. पुण्याच्या बालगृहामधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उल्हासनगर येथील अनाथालयामध्ये बारावीपर्यंत मी शिक्षण घेतले होते. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मला अनाथालयामधून काढून टाकण्यात आले. तेव्हा मी ठाण्याच्या के.जी. जोशी कॉलेजच्या कला शाखेमध्ये पदवीसाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला. जेथे माझी पहिल्यांदा भेट प्रा. सुचित्रा नाईक यांच्याशी झाली. त्यांना मी माझी अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी माझा प्रामाणिकपणा आणि प्रखर बुद्धीमत्ता याचा विचार करून माझा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. माझ्या राहण्या-खाण्याची सोय केली. अल्पावधीतच मी त्यांच्या घराचा एक सदस्य झालो. यासंबंधी सुचित्रा नाईक यांनी इन्क्लाबला सांगितले की, अब्दुल रशीद हा माझ्या घराचा एक सदस्य आहे. माझ्या मुलांप्रमाणेच मला त्याच्यावर विश्वास आहे. त्याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी मिळविलेली आहे. नोकरी मिळाल्यानंतर आम्हाला त्याच्या लग्नाची काळजी होती. तेव्हा महाराष्ट्र कॉलेजचे प्राचार्य सिराजुद्दीन चौगुले यांच्या मध्यस्थीने अंजुमन-ए-इस्लामच्या अनाथालयामधील एका मुलीबरोबर त्याची त्यांनी सोयरीक जुळविली. 4 नोव्हेंबर 2018 ला त्याचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. 11 नोव्हेंबरला दादरमध्ये वलीमाचे भोजन देण्यात आले. आम्ही तर एका मुलाला आश्रय दिला, अंजुमन-ए-इस्लाम  तर शेकडो मुलांचे पालन पोषण करीत आहे. ही बातमी खरोखरच आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा पुरावा ठरावी, अशीच आहे.
    हैद्राबादच्या ऐतेमाद व इतर वर्तमानपत्रामध्ये कर्नाटकच्या पोटनिवडणुकीच्या निकालांचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले आहे. या वृत्तात भाजपचा पराभव आणि त्याचे विश्लेषण देण्यात आले आहे. काँग्रेस आणि जनतादल एस. यांनी मिळून दोन लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागा जिंकलेल्या आहेत. शिवमोगा मतदार संघातून फक्त भाजपला आपला उमेदवार निवडून आणता आला आहे. हा निकाल भाजपसाठी पुढील लोकसभा निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो अशी टिप्पणी जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रांनी केलेली आहे.
    9 नोव्हेंबरच्या जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रात 26/11 ला मुंबईत झालेल्या बॉम्बहल्ल्यातील शहिदांच्या घरच्या दु:खाच्या छायेत साजर्या होणार्या दिवाळी संबंधीच्या बातम्या दिलेल्या आहेत. ज्यात आजही ती कुटुंबे दु:खामध्ये कशी दिवाळी साजरी करतात याचे वर्णन आहे. शीतल यादव जी आता 10 वर्षाची झाली आहे. 26/11 - 2008 ला झालेल्या हल्ल्यावेळी ती अवघी तीन महिन्याची होती. सध्या ती वाराणसीच्या हॅप्पी मॉडेल स्कूलमध्ये शिकते. भविष्यात डॉक्टर बनू इच्छितो. शितल आपले वडिल आणि मामासोबत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून गाझीपूरला जाण्यासाठी स्टेशनवर आली होती. हा प्रवास सुरू होण्यापूर्वीच तिच्या वडिलांच्या जीवनाचा प्रवास थांबला. ते रेल्वेची वाट पाहत होते. तेव्हा सीएसटीवर बेछूट गोळीबार झाला आणि पाहता-पाहता प्रेतांचा खच पडला. त्यात शीतलच्या वडिलांचा देहही निपचित पडला होता. शीतलला आजही प्रश्न पडतो की, तिच्या वडिलांची काय चूक होती? ज्यामुळे आतंकवाद्यांनी त्यांचा बळी घेतला.
    याशिवाय, या आठवड्यात उर्दू वर्तमानपत्रांमध्ये ’अयोध्येमध्ये मंदिर होता, आहे आणि राहणार’ असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे ठासून केलेले विधान प्रमुखपणे प्रकाशित करण्यात आलेले आहे. शिवाय, श्रीरामाची एक भव्य मूर्ती अयोध्येत उभारण्याच्या त्यांच्या संकल्पाचीही वर्तमानपत्रांनी दखल घेतली आहे. शिवाय, फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केल्याचे पडसादही उर्दू वर्तमानत्रातून उमटलेले आहेत. योगी आदित्यनाथ यांचे हे वागणे घटनेची शपथ घेऊन घटनेच्या विरोधात वागण्याचे वाईट उदाहरण असल्याचे वर्तमानत्रांत म्हटलेले आहे.
    13 नोव्हेंबरच्या उर्दू टाईम्समध्ये आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या कुटुंबांना 50 हजार रूपयांची केलेल्या मदतीची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्याच्या तराई गावामध्ये शेतकरी पोतन्ना पल्लेवाड यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून स्वत:च्या हाताने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केली आहे. सरकारची मदत मिळालेली नसतांना काँग्रेस पक्षाने मात्र या कुटुंबाची मदत केलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेवून 50 हजार रूपयांची मदत या कुटुंबाला केलेली आहे. ही बातमी प्रामुख्याने प्रकाशित झालेली आहे.
    उर्दू टाईम्सच्या 13 तारखेच्या अंकात माझा एक लेख  ’लग्न करतांना रंग-रूप आणि संपत्ती न पाहता चांगले चारित्र्य पहावे’ या प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या हदिसच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला होता. ज्यात मुस्लिम समाजात सध्या लग्नामध्ये चालू असलेल्या कुरीतींवर प्रकाश टाकून निकाह अगदी साधा करावा तसेच निकाह करताना मुला-मुलींच्या चारित्र्याला प्राधान्य देण्यात यावे, याबद्दलचे विवेचन केलेले आहे.
 

- फेरोजा तस्बीह
9764210789
(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)

मुझे तराशना है मेरे कौम की बच्चों का किरदार, बिना तराशे हीरे मुझे अच्छे नहीं लगते

ज्यानैतिकतेला जग हिमालयाच्या खोर्यात, साधूंच्या मठात, सुफिंच्या आस्तान्यात, बाबा लोकांच्या शरणात जावून शोधतो, इस्लाम त्या नैतिकतेला संसारी लोकांत, घरात, बाजारात, शासनात, प्रशासनात, कोर्टात, शैक्षणिक संस्थांत, रूग्णालयात आणि प्रत्येक माणसात उत्पन्न करू इच्छितो. हे शक्यही आहे आणि आवश्यकही. नसता जग नरकासमान होऊन जाईल, किंबहुना झालेले आहे. माणसाची वर्तवणूकच या जगाला एक तर स्वर्गासमान बनविते किंवा नरकासमान. जगाला नरकासमान बनविणार्या सवयींपैकी सर्वात वाईट सवय म्हणजे खोटारडेपणा. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी खोटारड्या व्यक्तींची तीन वैशिष्ट्ये विषद केलेली आहेत.
एक - जेव्हा बोलेल तर खोटे बोलेल,  दोन- वायदा करील तो पूर्ण करणार नाही. तीन - त्याच्याकडे विश्वासाने काही अमानत ठेवली असेल तर त्यात विश्वासघात करील.
    खोटारड्यापणापासूनच समाज नासविण्याची प्रक्रिया सुरू होते. खोटारडेपणा हाच सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या मुळात असतो. असे असले तरी आज खोटे बोलण्याला फारसे वाइट मानले जात नाही. माणसं अगदी सहजपणे खोटं बोलत असतात. तरीपण खोटारड्या माणसाच्या खोटेपणाचा अंदाज येतोच. अशा लोकांपासून इतर लोक हळू-हळू लांब राहू लागतात. खोटे बोलण्याचा सर्वात वाईट परिणाम हा होतो की, खोटारड्या माणसाची विश्वासर्हता संपून जाते. लोग त्याला टाळू लागतात. त्याच्याशी व्यवहार टाळले जातात. तो अल्पावधीतच समाजात उघडा पडतो. समाज त्याचा अघोषित बहिष्कार करतो. हा बहिष्कार खोटारड्या माणसाच्या सुरूवातीला लक्षात येत नाही. खोटे बोलून मिळविलेल्या लाभामध्ये तो खुश असतो. जेव्हा त्याच्या लक्षात येते की, आपल्या खोट्यारड्यापणामुळे लोक आपल्याला टाळत आहेत, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चारही बाजूंनी त्याची कोंडी झालेली असते. त्याची विश्वासर्हता संपलेली असते. अशा परिस्थितीत तो जरी खरं बोलायचा प्रयत्न करू लागला तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही. एकंदरित अशा लोकांचे आयुष्य फक्त खोटारड्यापणामुळे अयशस्वी होऊन जाते. त्यातून निर्माण होणार्या तणावामुळे विजय माल्या, मेहूल चोकसी, निरव मोदी, ललित मोदी सारखे लोक देश सोडून पळून जातात. ज्यांना हे जमत नाही ते आत्महत्या करून आपली सुटका करून घेतात.
माणूस खोटे का बोलतो?
    माणूस खोटे का बोलतो? याचे उत्तर कुरआनने खालीलप्रमाणे दिलेले आहे. ”ज्या लोकांचा अल्लाहवर विश्वास नाही तेच (लोक) खोटे रचत असतात आणि तेच लोक खोटारडे आहेत. ” (सुरे नहल आयत नं. 105). ही आयत कुठल्याही सश्रद्ध मुस्लिमाच्या अंगावर शहारे आणण्यासाठी पुरेशी आहे. या आयातीचा अर्थ सोप्या शब्दात सांगायचा असेल तर असे म्हणता येईल की, ”माणूस खोटे तेव्हाच बोलतो जेव्हा त्याचा या गोष्टीवर ठाम विश्वास असतो की, खरे बोलल्यास (नाऊजुबिल्लाह)अल्लाहची मदत येणार नाही.” झाले! येथे सारेच संपले. इस्लामची इमारत मुळात खरेपणाच्या पायावर उभी आहे. मुस्लिम एकवेळेस गुन्हेगार असू शकेल, भित्रा असू शकेल मात्र तो कधीच खोटारडा असू शकत नाही. या गृहितकालाच खोटारड्यापणामुळे सुरूंग लागतो. माणसात खरेपणा, स्वत:चे नुकसान होण्याची शक्यता गृहित धरून वर्तन केल्यानेच येते. खरेपणामुळे होणारे नुकसान  अल्लाह मोठ्या फरकाने भरून काढणार आहे, असा विश्वास ज्याच्या मनात असतो तोच खरे बोलू व वागू शकतो. म्हणून अनेक इस्लामी विद्वानांचे असे मत आहे की, खोटारडा माणूस इस्लामच्या परिघाबाहेर निघून जातो. म्हणजे तो मुस्लिम राहत नाही. जरी नावाने मुस्लिम वाटत असता तरी.
    खरे बोलण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी साधारणपणे माणसं खोटं बोलत असतात. परंतु असे नेहमी होत नाही. खोटारडेपणा एक मानसिक आजार आहे. खोटारडा माणूस लाभ मिळविण्यासाठीच खोटे बोलेल असं नाही. एकदा का खोटं बोलण्याची सवय लागली की ती त्याची प्रवृत्ती बणून जाते. मानसिक आजार बळावत जातो. मग तो लहान-सहान बाबतीतही सराईतपणे खोटे बोलू लागतो. कुठलाही लाभ होणार नसेल तरीही खोटे बोलू लागतो. 
खोटारडेपणाचे परिणाम
    साहजिकच जेव्हा एखाद्या समाजात खोटारड्यांची संख्या वाढते तेव्हा इतर समाजातील लोकांच्या मनात त्या समाजाबद्दल शंका निर्माण होते. मग प्रत्येक लहानसहान गोष्ट तपासून पाहिल्याशिवाय कोणीही त्यांच्याशी व्यवहार करीत नाही. या तपासणीमुळे लोकांवर अतिरिक्त ताण पडतो. कोणाचाच कोणावर विश्वास राहत नाही. पतीचा-पत्नीवर तर पत्नीचा-पतीवर, वडीलांचा-मुलावर तर मुलांचा- वडिलांवर विश्वास राहत नाही. अशी परिस्थिती ज्या समाजात उत्पन्न होते तो समाज वेगाने रसातळाला जातो. माणसाच्या अंगी खोटेपणा एकटाच येत नाही तो सोबत अनेक वैगुण्यांना घेऊन येतो. त्यामुळे सामुहिक चारित्र्याचा र्हास होतो. समाजात गुन्हेगारी वाढत जाते.
    आजकाल अगदी लहानपणापासून म्हणजे ’जॉनी-जॉनी यस प्पपा’ पासून ते ’एप्रिल फूल’ पर्यंत खोटे बोलण्याचे एकप्रकारचे प्रशिक्षणच मिळत आहे. त्यामुळे खोटे बोलणे हे वाईट असते हे अनेकांच्या गावीच नसते. त्याला ते सामान्य बाब समजतात. अलिकडे भारतीय जनजीवनातही अशी प्रवृत्ती फोफावल्याने खोटारडेपणा हा बाय डिफॉल्ट वाढत चाललेला आहे. किंबहुना काही लोकांच्या अंगात भिनलेला आहे. सर्वच समाज घटकात या आजाराची लागण झालेली आहे. कित्येक मुस्लिम सुद्धा या रोगाने पीडित आहेत. आजमितीला भारतात असे कोणते क्षेत्र आहे ज्यात खोटारडी माणसे नाहीत. आरोग्या सारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा खोटारड्या माणसाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. त्यामुळे बहुतेक खाजगी रूग्णालयांचे खाटीक खाण्यात रूपांतर झालेले आहे. याचा अनुभव तेथे जाणार्यांना नेहमीच येतो. आपल्या राजकारणाचा डोलारा तर खोटारडेपणाच्या पायावरच उभा आहे. नगरसेवकांपासून प्रधानमंत्र्यांपर्यंत सर्वच खोटे बोलत असतात. म्हणूनच निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली वचने पाळण्यासाठी असतात असे कोणालाच वाटत नाही. निवडणुकांच्या वेळी दिलेल्या वचनांना, ”जुमला” म्हणून नाकारण्यात कोणालाही वाईट वाटत नाही.
    भारतातच ही परिस्थिती आहे असेही नाही. अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी अनेकवेळा खोटे बोलल्याचे सिद्ध झालेले आहे. याची सुजाण वाचकांना जाणीव आहे. त्यावर विवेचन करण्याची गरज नाही. फक्त एक उदाहरण देऊन थांबतो की, इराकला बेचिराख करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ’वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन्स’ सद्दाम हुसेननी बाळगलेली आहेत, असे धादांत खोटे विधान केले होते, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे.
    आज परिस्थिती अशी आहे की, कुठल्याही संस्थेतील अगदी मोठ्या पदावरील व्यक्तीही रेटून खोटे बोलतांना दिसत आहेत. सीबीआय सारख्या प्रिमीअर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या पहिल्या दोन पदावरील व्यक्तींपैकी कोणीतरी एक नक्कीच खोटे बोलत आहे. मीडियामध्ये खोट्या बातम्या प्रसारित करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. सोशल मीडियावर तर कोणती बातमी खरी आणि कोणती खोटी? याचा मागोवा स्वतंत्ररित्या घेतल्याशिवाय विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
    खरे पाहता अल्लाहने माणसाची रचनाच अशी केलेली आहे की, त्यांनी खरे बोलावे व खरे वागावे. त्याशिवाय जगाचे व्यवहारच सुरळीत चालणे शक्य नाही. तरी सुद्धा बहुतांशी लोक खोटे बोलतात व खोटे वागतात. म्हणून जगात जीवन जगणे कठीण झालेले आहे.
    इस्लाममध्ये खोटारडेपणाचे स्थान
    इस्लाममध्ये खोटारडेपणाला अजिबात स्थान नाही. ही बाब सिद्ध करण्यासाठी मी खालीलप्रमाणे पुरावे आपल्या सेवेत सादर करीत आहे. 1. ”हे श्रद्धावंत लोकांनो! अल्लाहची भिती बाळगा आणि जे सत्यवान आहेत त्यांची साथ द्या” (सुरे तौबा : आयत नं. 119)    या आयातीमध्ये दोन आदेश आहेत. एक - अल्लाहचे भय बाळगण्याचे व दोन - खर्या लोकांच्या सानिध्यात राहण्याचे.                 हे दोन्ही आदेश समजण्यासाठी सोपे आहेत. परंतु, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी हा प्रश्न आहे. त्यासाठी दोन ट्रिक्स (युक्त्या) अशा आहेत की, कुरआनला समजून घेतल्याशिवाय अल्लाहचे भय बाळगता येत नाही आणि कुरआन समजण्यासाठी त्याला समजून नियमितपणे वाचने आवश्यक आहे. शिवाय, हदीसचा सुद्धा कुरआन समजण्यासाठी मोठा उपयोग होतो. आजकाल कुरआनचे सविस्तर भाष्य (तफसीर) जवळ-जवळ सर्वच प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या वाचनाने अल्लाहला समजणे प्रयत्नांती शक्य आहे.
    लक्षात ठेवा मित्रांनो! आज माणसं शरिराने जरी सदृढ दिसत असली तरी समाजातील एक मोठा वर्ग आत्मिकदृष्ट्या आजारी आहे. अशा आजारी आत्म्यांवरच खोटारडेपणाचा सैतानी वार सहज शक्य होतो. ज्यांची नाळ कुरआन-हदिस आणि नमाजशी जुळलेली असेल त्यांच्यावर सैतानचा हा वार होऊच शकत नाही. त्यांचे रक्षण फरिश्ते (ईशदूत) करीत असतात. मात्र अनेक माणसं अगदी क्षुल्लक आणि क्षणिक लाभासाठी स्वत:हून खोटे बोलण्यास व वागण्यास तयार असतील तर हे फरिश्ते त्यांच्यापासून दूर जातात. यासंबंधी प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी फारच सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. ते म्हणतात, (अ) ”ज्या गोष्टी संबंधी विश्वसनिय माहिती असेल की ही गोष्ट पुण्यकर्म आहे तीच बोलली जावी. राहिलेल्या इतर गोष्टींबाबत अजिबात बोलू नये.” (ब)”माणसाच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द फरिश्ते त्याच्या नामे आमाल (प्रगती पुस्तक) मध्ये नोंद करीत असतात.” प्रेषित सल्ल. यांनी एके ठिकाणी एका वाक्यात मानवी जीवनाला समृद्ध करण्याची गुरूकिल्ली सांगितलेली आहे. पण बरेच लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. प्रेषित सल्ल. म्हणतात की, ”जो व्यक्ती मला आपल्या जीभ आणि गुप्तांगाच्या सदुपयोगाचा जामीन देईल मी त्याला जन्नतचा जामीन देतो” एकदा एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना प्रश्न केला की, अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाला नरकामध्ये नेण्यासाठी कारणीभूत ठरेल? तेव्हा प्रेषित (सल्ल.) यांनी सांगितले की, ”जीभ आणि गुप्तांग” (तिर्मिजी) अर्थात या दोन्ही अवयवांचा दुरूपयोग.
    आजकाल कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्डच्या जमान्यात अहले ईमान (मुस्लिमां)साठी पुढील हदीस अतिशय मार्गदर्शक अशी आहे. प्रेषित (सल्ल.) म्हणतात,”माणसाला खोटारडा ठरविण्यासाठी एवढीच गोष्ट पुरेशी आहे की, माणूस प्रत्येक ऐकीव गोष्ट (खरेपणाची खात्री न करता) इतर लोकांना सांगेल.”
    आजकाल अनेक ठिकाणी नियमितपणे गप्पांचे फड रंगत असल्याचे आपण पाहू शकतो. तेथे सगळ्याच गोष्टी, खर्या आणि चांगल्या चर्चिल्या जात असतील असे नाही. अवाजवी बडबड करण्याचा काही लोकांना जणू रोगच जडलेला आहे. नको तिथे व नको ते बोलण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. हा सुद्धा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. पण या आजारापासून सुटका सहज शक्य आहे. त्यासाठी एक सोपी युक्ती प्रेषित सल्ल. यांनी सांगितलेली आहे. ती अशी की, ” जो अल्लाह आणि निवाड्याच्या दिवसावर विश्वास ठेवतो त्याने एक तर चांगले बोलावे किंवा गप्प रहावे.” (बुखारी).
लक्षात ठेवा मित्रांनों! मनोरूग्णाचे एक मोठे लक्षण अनावश्यक बोलणे, सतत बडबड करत रहाणे हे सुद्धा आहे. वर नमूद हदीसवर जर निश्चयपूर्वक अंमल केला गेला तर आपण वेडे होण्यापासून सुरक्षित राहू शकतो. तासन्तास मोबाईलवर बोलणार्यासांठी ही हदीस वरदान सिद्ध होऊ शकते. पानपट्या, कट्टे (चबूतरे), चौक, हॉटेल, नाके, कॅरमहाऊस इत्यादी ठिकाणी आजकाल अनेक लोक, विशेषत: मुस्लिम युवक रात्री उशीरापर्यंत अनावश्यक गप्पा मारतांना दिसून येतात. अशा निरूपयोगी मैफिलींबाबत डोक्यात तिडीक उठेल अशी एक चेतावनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी देऊन ठेवलेली आहे. जगातील सगळ्यात खरी व्यक्ती अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. म्हणतात की, ” जे लोक अशा मैफिलीतून उठतील जिच्यामध्ये अल्लाहचा उल्लेख झालेला नसेल तर ते अशा ठिकाणाहून उठलेत असे समजावे जेथे मेलेले गाढव पडलेले होते. आणि याच मैफिली त्या लोकांसाठी निवाड्याच्या दिवशी पश्चातापाचे कारण बनतील.” (अबु दाऊद).
उपाय
    कुरआन आणि हदीसचा विषय मनुष्य आहे आणि मनुष्यासाठी उपयोगी अशाच आज्ञा त्यामध्ये दिलेल्या आहेत. प्रेषित सल्ल. यांचे वरील नमूद सर्व आदेशसुद्धा अंमलबजावणीसाठी अगदी सोपे आहेत. मात्र जरा काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
    मित्रांनों लक्षात ठेवा! ज्या माणसाला एकदा का खरे बोलण्याची आणि खर्याने वागण्याची सवय झाली की तो समाजात ठळकपणे उठून दिसतो. लोक आपोआपच त्याचा सन्मान करावयास लागतात. त्याच्यावर विश्वास ठेऊ लागतात. तो आपोआपच प्रतिष्ठित होऊन जातो. एवढे की लोक आपले तंटे सोडविण्यासाठी त्याच्याकडे येतात. त्याने दिलेला निर्णय प्रमाण मानला जातो. त्यामुळे परत खरे बोलण्याची ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होते. ज्याप्रमाणे एका दिव्याने हजारो दिवे प्रज्वलित होतात मात्र मूळ दिव्याचा प्रकाश कमी होत नाही, अगदी त्याच प्रमाणे तुम्ही खरे बोलण्या/वागण्याचा निश्चय करा, मग पहा तुमच्या संपर्कात येणारी सर्व माणसे आपोआप खरे बोलायला / वागायला सुरूवात करतील व समाज सत्य प्रकाशाने उजळून निघेल. सातव्या शतकात मध्य-पूर्वेत अरबी टोळ्यांनी खोटे बोलण्याची सीमा ओलांडून गुन्हेगारी जीवनात प्रवेश केला होता. एका बदू (खेडूत) अरबीला ज्याने नव्यानेच इस्लामची माहिती घेतली आहे, लक्षातच येत नव्हते की, खोटे बोलण्यात, वागण्यात आणि दुसर्या टोळीला लुटण्यात काय वावगे आहे? अशा रानटी अरबी टोळ्या जेव्हा इस्लामच्या प्रकाशाने न्हाऊन निघाल्या तेव्हा त्याच रानटी लोकांचे अद्भूत अशा सभ्य समाजामध्ये ट्रान्सफार्मेशन (रूपांतरण) झाले. इतके की, याच लोकांनी 100 वर्षात एका तृतीयांश पृथ्वीवर सत्ता मिळविली व जगाला एका नव्या कल्याणकारी सभ्यतेची देणगी दिली.
    प्रेषित सल्ल. यांच्या अद्भूत मार्गदर्शनाची देणगी लाभलेल्या आम्हा मुस्लिमांनीही त्या देणगीची म्हणावी तशी कदर केलेली नाही एवढे निश्चित. त्यामुळे आपल्यामध्येही खोटारड्या लोकांची संख्या कमी नाही. प्रेषित सल्ल. यांचे जबाबदार वारसदार या नात्याने ही परिस्थिती बदलावयाची असेल आणि आपल्या प्रिय भारताला कल्याणकारी इस्लामी सभ्यतेची देणगी द्यावयाची असेल तर खरेपणाची सुरूवात स्वत:हापासून करावी लागेल. आमच्यासाठी ही शरमेची बाब आहे की, 1300 वर्षापासून येथे राहून सुद्धा आपल्या देशबंधूंना इस्लामची ओळख, ” ईद-मिलन” चे कार्यक्रम आयोजित करून द्यावी लागते. याचा दूसरा अर्थ असा की, आपण भारतीय मुस्लिम इस्लामला अपेक्षित असलेल्या सामुहिक चारित्र्याचे ते स्तर अद्याप गाठू शकलेलो नाही, ज्या स्तराची अपेक्षा इस्लामने आपल्याकडून केलेली आहे. इस्लामच्या या उपेक्षेचे काय परिणाम होत आहेत? हे आपण सुजाण जाणूनच आहात. अजूनही वेळ गेलेली नाही.
    मित्रानों! मनाच्या पाटीवर आज लिहून घ्या की, तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ असते. आजच निश्चय करा आणि त्यावर कायम रहा की, आजपासून बोलेन तर बोलेन आणि वागेन तर खरे वागेन. मग भलेही त्यासाठी कोणतेही मुल्य चुकवावे लागो. मग पहा अल्लाहची मदत किती वेगाने येते. तुम्ही स्वत: अचंभित व्हाल. अल्लाह मला, तुम्हाला आणि आपल्या देशबांधवांना खरेपणे बोलण्या-वागण्याची सद्बुद्धी देओ. आमीन.

- एम. आय. शेख

ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन - भाग-1


भारतात, मध्यपूर्वेत उदयास आलेल्या, सेमिटीक धर्ममतासंबंधी झालेले लिखाण, एकांगी स्वरुपाचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, सेमिटीक धर्ममतासंबंधी गैरसमजच जास्त दिसून येतात. अलिकडच्या काळात, महाराष्ट्रात तात्त्विक स्वरुपाच्या चर्चा करणारी नियतकालिके फारशी नाहीत. परंतु नागपुरवरुन ‘आजचा सुधारक’ या नावाने तत्त्वज्ञानाची चर्चा करणारे मासिक काढले जाते. त्यात मुलभूत स्वरुपाची तात्विक चर्चा आणि विवेकवाद यांना प्राधान्य देणारे लिखाण प्रसिध्द केले जाते. त्यामध्ये विवेकवादावर चर्चा करीत असताना एका महाराष्ट्रातील समिक्षकाने, इस्लामच्या संदर्भात, इस्लाम हा सेमिटीक धर्म असल्याने त्यात विवेक, बुध्दीवाद आणि कसलीही मूलभूत तात्विक सुत्रे नसून, इस्लाम केवळ पोथीनिष्ठता असलेला धर्म आहे, अशा प्रकारचे प्रतिपादन केलेले होते. थोडक्यात, इस्लामच्या बाबतीत केले जाणारे लिखाण केवळ अज्ञानापोटी नसून मोठ्या प्रमाणावर मुद्दाम गैरसमज पसरविणारे असते. वास्तविक, इस्लाम हा धर्म ग्रंथावर आधारलेला ग्रंथवादी आणि साक्षात्कारवादी धर्म असला तरी, त्यात केवळ शब्दप्रामाण्य नसून विवेकवाद आणि मुलभूत स्वरुपाचे व्यापक तत्वज्ञान आहे.
    एका अर्थाने, इस्लाम म्हणजे अल्लाह आणि मानव यांच्या प्रतिकात्मक भेटीचे साकार रुप आहे. येथे अल्लाह याचा अर्थ एका विशिष्ट काळात, एका विशिष्ठ प्रकारे, व्यक्त होणारे परमेश्वराचे स्वरुप, असा होत नाही, तर काळ, इतिहास व घटना यांच्यापासून अलग आणि स्वतंत्र असा परमेश्वराचा, मुलभूत स्वरुपाचा, सृजनशील आत्मप्रत्ययकारी अविष्कार, असा त्याचा अर्थ होतो. मानव म्हणजे केवळ एक अधःपतित व ईश्वरी चमत्काराची प्रतिक्षा करणारा सामान्य प्राणि, असा त्याचा अर्थ नसून, आपल्या बुध्दीसामर्थ्याच्या जोरावर ‘अल्लाहच्या पूर्णत्त्वाचे’ स्वरूप देणारा सत्याविष्कार आणि ईश्वराचे सनातन व चिरंतन मूल्य व अस्तित्व यांची जाणीव करुन देणारे सत्य-कथन, असे मानले गेले आहे. त्या अर्थाने, इस्लाममध्ये मनुष्य आणि ईश्वरी साक्षात्काराकडे वेगळ्या प्रकारे पाहिले गेले.
    इस्लामच्या तत्वज्ञानात, अल्लाह म्हणजे ईश्वर आणि माणूस आणि ज्ञानाचा सिध्दांत, यांचे स्वरुप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात ईश्वरी साक्षात्काराला विशेष महत्त्व आहे. इस्लामने ‘अवताराची’ किंवा ‘प्रत्यक्ष ईश्वराच्या अवतरणाची’ संकल्पना स्विकारलेली नाही. कारण, इस्लामी तत्वज्ञानानुसार, ईश्वरी अवताराची कल्पना, मानव, मानवी स्वरुप, ईश्वराच्या सर्वव्यापी, सर्व कल्याणकारी अनंत स्वरुपावर, एकप्रकारे मर्यादा घालणारे असते किंवा ख्रिश्चन धर्मामधील ईश्वराच्या व्यक्तिकरणाचे स्वरुपदेखील, परमेश्वराच्या अनंतत्वामध्ये, त्याच्या विश्वव्यापी चेतना शक्तीला मर्यादा घालणारेच आहे. म्हणून या मुलभूत सुत्राच्या परिणामातून, इस्लामने साक्षात्काराचा सिध्दांत मांडलेला आहे. इस्लामच्या प्रतिपादनानुसार, प्रत्येक काळात परमेश्वरच माणसाच्या उध्दारासाठी प्रेषित पाठवतो. कारण, मानवी प्रज्ञेला मानवी माध्यमातूनच जास्त प्रत्ययकारी स्वरुपात प्रबुध्द केले जाऊ शकते. इस्लामनुसार, प्रत्येक काळात पाठविलेले संदेश माणसाला योग्य प्रकारे सुरक्षित ठेवता न आल्याने किंवा त्यांचे योग्य प्रकारे ग्रहण करता न आल्याने, ईश्वराच्या संदेशात विकल्प निर्माण होउन मानवी समाजाचे अधःपतन होत राहिले. म्हणूनच, पुन्हा एकदा हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.)आणि कुराण यांच्या स्वरुपात, मानवी समाजाच्या मार्गदर्शनासाठी साक्षात्कार-रुपाने पाठविले गेलेले संदेश म्हणजे इस्लाम होय.
    इस्लामच्या प्रतिपादनानुसार कुरआन हे ईश्वरी संदेशाचे व्यक्त स्वरुप आहे. आणि म्हणून कुरआनमधील तत्वे, मूलभूत प्रेरणा आणि शिकवण यांचे स्वरुप अनादी व चिरंतन आहे. त्यामध्ये जसे तात्कालिक व प्रादेशिक संदर्भ आहेत, त्याचप्रमाणे, आनंदी प्रेरणांची सूत्रेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात आहेत.
    इस्लामच्या तत्वज्ञानात, ‘साक्षात्काराच्या संकल्पनेला’ एक विशेष महत्त्व आहे. पैगंबर (सल्ल.) यांना ईश्वरी साक्षात्कार ताबडतोब किंवा अचानक झालेला नाही. त्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्षे संसारात आणि चिंतनात घालविल्यानंतर आणि ‘सत्यवादी’ व ‘परोपकारी’ म्हणून समाजाची मान्यता मिळविल्यानंतर, टप्प्या-टप्प्याने, ईश्वरी संदेशाचे अवतरण झाले आहे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर पैगंबर (सल्ल.) अंतर्मुख बनत गेले. चिंतनासाठी हिराच्या डोंगरावरील गुहेत बसू लागले. अशा प्रक्रीयेत, 41 वे वर्ष सुरु झालेल्या रमजान महिन्यात ‘लैलतुल कदर’ च्या रात्री त्यांना ‘अल्लाह’ चा संदेशवाहक ‘जिब्राईल अलै.’ चे दर्शन झाले. परिणामी पैगंबर (सल्ल.) यांच्या भावविश्वात आणि मानसिक प्रक्रियेत प्रचंड उलथापालथ झाली. त्यांचे जीवन नखशिखांत ढवळून निघाले. आपल्याला झालेल्या साक्षात्काराच्या प्रत्ययकारी आणि चेतनामय जाणिवेने पैगंबर (सल्ल.) विव्हळ झाले. त्या प्रत्यकारी अनुभवासाठी तळमळू लागले. देवदूत जिब्राईलने त्यांच्या ज्ञानचक्षूंचा मार्ग मोकळा करुन, जीवनाला स्थैर्य प्राप्त करुन दिले.
    दुसरे म्हणजे ईश्वरी संदेश पैगंबर (सल्ल.) यांना एकाचवेळी प्राप्त झाले नाहीत, तर त्यांच्या 23 वर्षाच्या पुढील कालखंडात वेगवेगळ्या प्रसंगी अनेक प्रश्नांची उकल करीत असतांना, त्यांना साक्षात्कारी संदेश दिले गेले आहेत. या सर्व संदेशांचे एकत्रित व लिखित स्वरुप म्हणजेच कुरआन होय. याचा अर्थ असा की, इस्लाममधील ईश्वरी संदेश आणि तत्त्वे ही केवळ अधिभौतीक, अगम्य, रहस्यमय सुत्रे, या स्वरुपात दिलेली नाहीत. किंवा सर्वसमावेशक नीतितत्वे किंवा प्रमेये या स्वरुपात दिली गेली नाहीत. कारण, सर्वसमावेशक, नीतितत्वे किंवा प्रमेये यांचा वापर करीत असताना, माणसांनी त्यात, सर्व प्रकारचे घोटाळे नंतरच्या काळात केल्यामुळे आणि त्या प्रमेयांचे सोयीस्कर अर्थ लावल्यामुळे, अध्यात्मिक अराजकच निर्माण झाले होते. म्हणून मानवी जीवनात निर्माण होणारी एखादी प्रत्यक्ष समस्या आणि त्या समस्येची कालसापेक्ष व विवेकनिष्ठ उकल करण्यासाठी साक्षात्कार रुपाने दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन, म्हणजे कुरआन आणि इस्लाम आहे. म्हणजे इस्लाममधील साक्षात्काराचे स्वरुप दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन, म्हणजे कुरआन शरीफ आणि इस्लाम आहे. म्हणजे इस्लाममधील साक्षात्काराचे स्वरुप समस्याप्रधान व व्यावहारिक जसे आहे, तसेच त्यात अनादी चिरंतन स्वरुपाची प्रमेये देखील दिसून येतात. त्या अर्थाने, कुरआन हा ईश्वराने दिलेला शेवटचा धर्मग्रंथ मानला गेला आहे. कारण अज्ञेय अधिभौतिक प्रमेयापासून सुरुवात करुन, मानवी जीवनातील प्रत्यक्ष प्रश्नांची इश्वरी मार्गदर्शनानुसार उकल करण्यापर्यंतची ही प्रक्रिया आहे. त्यात जसा अनादी प्रेरणांचा अंश आहे. तसाच मानवी जीवनातील उणीवा आणि माणसाची दुर्बलता आणि विवेकनिष्ठ क्षमता यांचा समन्वय साधून करण्यात आलेले मार्गदर्शन देखील आहे.  हा प्रवास अव्यक्तापासून ते व्यक्त मानवी जीवनापर्यंतचा आहे. त्यात परमेश्वराची प्रचंड अविष्कारी चेतना आणि परमेश्वराचा अंश असणार्या, परंतु विकारी, तसेच विवेकाची क्षमता असलेल्या, मानवी चेतनेचा समन्वय आहे.
    याच कारणासाठी हे संदेश पैगंबर (सल्ल.) याना तीन प्रकारे प्राप्त झाले. इस्लामनुसार, ईश्वराच्या संदेशाचे प्रक्षेपण प्रत्यक्षपणे होत नाही तर प्रेषितांच्या मनात जाणिवांच्या माध्यमातून संदेश प्रक्षेपित केले जातात. स्फूर्तिद्वारे ईश्वराच्या संदेशांची जाणीव करुन देण्यात येते. त्याचे स्वरुप खूपच गूढवादी आणि संपूर्णपणे व्यक्तीगत आत्मजाणिवेचे असते. दुसर्या प्रकारात, प्रेषिताला निद्रित अवस्थेत, स्वप्नांच्या माध्यमातून किंवा त्याच्या आत्मचक्षूंना होणार्या भासातून, ईश्वरी ज्ञानाची जाणीव होत असते. तिसर्या प्रकारामध्ये ईश्वराच्या देवदूताकडूनच प्रेषिताला साक्षात्कार रुपे मार्गदर्शन केले जाते.
    इस्लामी तत्वज्ञानात, प्रेषित आणि साक्षात्कार यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मुळात, वर म्हटल्याप्रमाणे, प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना ईश्वरी ज्ञानाची जाणीव अचानक झालेली नाही. तर अनेक वर्षाच्या चिंतनानंतर आणि तसेच जीवनाच्या व्यावहारिक अनुभवांनी परिपक्वता आल्यानंतर त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी ईश्वरी ज्ञान आणि मानवी जीवन यांना जोडणारे तत्व दिसून येते. म्हणून इस्लाम हा केवळ ग्रांथिक आणि साक्षात्कारी धर्म राहत नाही तर मानवी मनाच्या परिपक्वतेतून प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून प्रेषितांंना ईश्वरी ज्ञानाची जाणीव साध्य होते. म्हणजे इश्वराने सांगितलेल्या ज्ञानासोबतच प्रज्ञा, चिंतन, अनुभव आत्मप्रत्यय आणि विश्वभान यांच्या संकल्पीत परिणामातून हे ज्ञान प्रेषितांना झालेले दिसून येते. इस्लाममधील ही तात्विक प्रक्रियाच मोठी विलक्षण आहे. इस्लाममध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे मानवीपण आग्रहाने वारंवार प्रतिपादन केले आहे. मुहम्मद सल्ल. तुमच्या सारखे एक सर्वसामान्य माणूसच होते, हे आग्रहाने मांडलेले आहे. तसेच ते केवळ संदेशवाहकच होते हे ठासून सांगितलेले आहे.  यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एकतर ईश्वरी ज्ञान आणि यासर्व विश्वाच्या रहस्यांचे आकलन माणूसच करु शकतो. अवतार किंवा आणखीन दुसरी कोणतीही गोष्ट पुढे आणली की मानव बुध्दी , प्रज्ञा आणि जाणीव यांचे अवमुल्यन केल्यासारखे होते. कारण या सृष्टीत मनुष्यप्राण्याइतका श्रेष्ठ अन्य कोणीही नाही. म्हणून अवतार कल्पना इस्लामने नाकारुन मानवी श्रेष्ठत्त्वाचा सिध्दांत मांडला आहे. त्याचबरोबर इश्वर अवतार घेतो, या संकल्पनेत मानवी दोषासहित इश्वराचे चित्रण करणे म्हणजेच इश्वराचे मानवीकरण करणे हे ईश्वर संकल्पनेला आणि पावित्र्याला बाधा आणणारे असते. हे इस्लामचे सुत्र आहे. म्हणूनच इस्लाम आग्रहाने प्रेषितत्वाचा पुरस्कार करतो.
    दुसरी गोष्ट म्हणजे इस्लामने कुरआनमधून श्रेष्ठ बुध्दीवान माणसे आणि सर्वसामान्य माणसे असा भेद ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीत अमान्य केलेला आहे. ईश्वरी ज्ञान हे खरोखरच जाणीवांचा प्रकाश असेल तर त्याचा बोध सर्वांनाच झाला पाहिजे हि इस्लामची धारणा आहे. म्हणून त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे साधेपण आणि सामान्य आणि सर्वसाधारण माणसात असणारी प्रज्ञा, यावर भर देण्यात आला आहे. इस्लामचे हे सुत्रच विलक्षण प्रगल्भ आहे. यात समतेचा एवढा खोलवर विचार केला आहे की त्यामध्ये बुध्दीमान आणि सर्वसाधारण माणूस असाही भेद ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीत इस्लाम मानत नाही.
    म्हणूनच कुरआन शरीफ नुसार परमेश्वराने प्रत्येक विभागात सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शनासाठी संदेश पाठविले. म्हणूनच कुरआनमध्ये एक वचन येते की, ‘परमेश्वर प्रेषितांत भेद करीत नाही. त्याचबरोबर या प्रेषितांच्या सर्वसामान्यत्त्वाच्या सिध्दांतातून इस्लाम श्रेष्ठीजनाचा सिध्दांत नाकारतो. त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. हे शेवटचे प्रेषित म्हटले गेले आहेत. ते शेवटचे प्रेषित याचा अर्थ असा की, इश्वरी ज्ञान जर आतापर्यंत श्रेष्ठीजनांची मक्तेदारी होती. ते ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविले गेले आहे. म्हणजे ज्ञान हे जेंव्हा सर्वसामान्य माणसांपर्यंत येते, तेंव्हा ज्ञानाचे एक वर्तुळ पुर्ण होते. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे सर्वसामान्य माणसाचे प्रतिक आणि प्रतिनिधी होते. आणि ज्ञान पुन्हा जेंव्हा सामान्य स्तरापर्यंत येउन पोहचते तेंव्हा परमेश्वराला पुन्हा वेगळा प्रेषित पाठवण्याची गरजच भासत नाही. कारण, आता मानवी बुध्दी आणि प्रज्ञा, यांचा विकास एवढा प्रगल्भ झाला आहे की, स्वतंत्रपणे साक्षात्काररुपाने किंवा अन्य कोण त्याही प्रकारे ज्ञान पाठविण्याची गरज शिल्लक राहत नाही. आणि म्हणूनच इस्लाममध्ये त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना शेवटचे प्रेषित म्हटले आहे. एका अर्थाने, या सुत्रातून इस्लामने मानवी श्रेष्ठत्वाचा सिध्दांतच मांडला आहे. (क्रमशः)

- मरहूम प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफराज अहमद)

नाव बदल” प्रकरणाला उधाण आलंय. सर्वसकट धार्मिक अस्मिता चिकटवत, चिथावण्याचा कर्मठ मार्ग खुला झालाय. गाव, वाड्या, रस्ते, पूल, पुतळे योजना, शहरे यांची नावे बदलून ’मासपिपल’ वर सातत्याने ’माकड’ होण्याची प्रक्रिया लादली जातेय. माध्यमाच्या उथळ चर्चेचा मारा करून फेक न्यूजचा सुळसुळाट होत आहे. टी.व्ही. मालिका, सिनेमा ही प्रभावी माध्यम द्वेष उदात्तीकरणातून प्रचंड बळकट होत आहेत. नको त्या मुल्यप्रतिमांचा गोडवा अति षडयंत्री हुशारीने समाजमनापर्यंत पोहचवला जातोय. राफेल असो किंवा नोकरी रोजगाराचे प्रश्नावर अस्मितेची चादर टाकून केवळ नारील्या धर्मांधतेची झापडं / चष्मे फुकटात विकले जात आहेत. एकूण 2019 च्या राजकीय प्लॅटफॉर्मची रंगीत तालीम आणि तयारीचं महानाट्य रंगलय. या महानाट्यावर आपण सगळे मूक प्रेक्षक बनून राहिलोय.
    बरं यावर बोलण्यासाठी लिहिण्यासाठी सरसावणार्या हातांना बळ देण्याऐवजी चळवळींच्या फसव्या मुखवट्यांतून आपण बहुतेक अशा चांगल्या मंडळीचे हे खच्चीकरण करतोय. सर्वच मुद्दे, खोटे रेटून बोलणारे हिंदूत्वापर्यंत आणि पर्यायाने फॅसिझमपर्यंत नेतायेत. मौनाची मुक संमती भयभीतपणे आपण यांचे गुलाम होतोय.
    कोणत्याही खर्या समस्यावर, देशाची असहिष्णुता, असमतोलपणावर न बोलता, ध्रुवीकरणाच्या मुद्याला खतपाणी घालणारी बेताल वक्तव्य दोन्हीकडून होताहेत. बहुजन प्रतिके, महामानव, विचारवंतांना संपवून किंवा त्यांना समरसतेच्या बाजूने वळवून विवेकी विचाराला मुर्खत्वात काढणार्या अंधभक्तीच्या गर्दीत आपण हरवतोय. अलिकडेच पुतळे आणि शहरांच्या नामकरणातून तसेच मौलाना मदनी ते ओवेसींच्या नेतृत्वाबद्दलच्या सहेतूक वक्तव्यातून अभिजन बहुजनाचा वाद चव्हाट्यावर येतोय. दाक्षिणात्य पेरूमल मुरूगन पासून सडेतोड बोलणार्या अभिनेता प्रकाशराजच्या पाठीशी आपण किती कसे उभे राहिलो? बच्चनच्या पिक्चरला गर्दी करून हजारोंची दिवाळी करणार्यांनी कधी जनआंदोलनाचा उडालेला बोजवारा पाहिलाच नाही का? टिळकांपासून डॉ. घाणेकर काशिनाथच्या बायोपिक फिल्मस् मधून उजव्या नव्या मुल्यांना सर्वमान्य बनविणार्या कृतीतून आपण तारीफ करत राहिलोय. तर ’स्वतःला’ ’अर्बननक्सल’ म्हणून पुढे येणार्या गिरिश कर्नाड वगैरे प्रभूतीचे काय? पर्यावरण, सिंचन, बेरोजगारी, महागाई, भगवी पाठ्यपुस्तके, सामाजिक सुरक्षा आणि उद्योग, नोटबंदी यासारख्या मुद्दयांवर योग्य न बोलता.. केवळ संवैधानिक तरतुदींशी जमेल तेवढी प्रताडणा करत दुस्वास करण्याचा पायंडा घट्ट होतोय. सनातनी प्रतिगाम्यांचे मुद्दे खोडून टाकताना देखील व्यवस्थापुरक बुद्धीवादी उथळपणात मश्गुल करण्यात येताहेत. दोनेक दिवसात नव्या फसव्या मुद्दयांचा बाजार भरविला जातो. हळूहळू चर्चा रंगविली जाते. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनपासून मल्टीप्लेक्सच्या महागड्या उच्चभ्रू मुव्हीजपर्यंत आणि साध्या बॅनरपोस्टरपासून डिजीटली फ्लेक्सपर्यंत नवीन प्रश्नांकित मुद्दा पेरला जातो. मुद्दे बळकट करून, जाहिरातींचा पाऊस मोठा, पैसा मोठा आणि सत्य खोटे होतेय. वाचनाचा अभाव, इतिहासाबद्दलची निव्वळ भावनिक मिमांसा, गुलामीनशेची बेहोशी यामुळे सध्याच्या स्थिती आणि येणार्या पिढींच्या भविष्याची आपण वाट लावतोय. आता सजगसुजाण असणार्यांनी सरळ मुद्दयांवर व्यक्त व्हावं..भावनिकतेच्या टेंपररी मृगजळापाठी लागून ’एकता’ संपविण्याच्या कटात आपण नाही, एवढंच समाधान न माणता या संघी षड्यंत्राला मोडून काढण्यास्तव विवेकी संयमित व्यवस्थेचे वाहक होण्यासाठीचे प्रवासी ठरू.नाहीतर काल्पनिक मनोरे रचत, रंजनाचा खूळखूळा भुलत, उलट्या भूतमय प्रवासाची वळण आपल्याला खाऊन टाकतील हे नक्की!
मुख्तसर सा गुरूर भी जरूरी है जीने के लिए,
ज्यादा झूक के मिलो तो पीठ पायदान बन जाती है
 
- साहिल शेख
8668691105

आदरणीय सहल बिन साद (रजि.) उल्लेख करतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘जो कोणी मला दोन जबड्यांमधील अवयव (जीभ) आणि दोन टांगांमधील अवयव  (जननेंद्रिय) या दोहोंची जमानत देईल तर मी त्याला जन्नतची हमी (गॅरंटी) देतो.’’ (बुखारी)

निरुपण
चारित्र्य सावरण्यासाठी माणसाचे जिव्हेवर नियंत्रण असणे अपरिहार्य आहे. जिभेवर नियंत्रण नसलेला माणूस चारित्र्यसंपन्न असू शकत नाही. खोटारडे बोलणे, लावालावी करणे, खोटी  आश्वासने देणे, मगरुरीने बोलणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे इ. सर्व जिव्हेवर नियंत्रण नसल्याची लक्षणे आहेत. कुरआनात आहे, ‘‘हे ईमानधारकांनो, सत्य तेच बोला आणि मोजूनमापून शब्द वापरा.’’
न्यायनिवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणसाला जिभेविषयीदेखील जाब द्यावा लागेल. निर्मिकाने माणसाला मुळात बोलण्याची क्षमता दिली ती सत्य बोलण्यासाठी आणि सत्याच्याच  प्रचारासाठी. न्यायनिवाड्याच्या दिवशी बहुतांशी लोकांना नरकाग्नीची कठोर सजा सुनावली जाईल ती जिव्हेच्या वाईट वापरामुळे. जिव्हेवर नियंत्रण जरी अवघड असले तरी सातत्याने  प्रयत्न केल्यास ते अशक्य नाही.
चारित्र्यसंपन्न माणूस जिव्हेविषयी सदैव जागृत असतो. तो मितभाषी असतो. जिव्हेनंतर उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी जनेनेंद्रियाचा उल्लेख केला आहे. कुरआनात आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळपासही फिरकू नका.’’
कामवासनेवर नियंत्रण खूप खूप महत्त्वाचे आहे. कामवासनेच्या परिपूर्तीसाठी केवळ एकच मार्ग अल्लाहने वैध ठरवला आहे आणि तो आहे विवाह! विवाहबाह्य संबंध इस्लामला  अजिबात मान्य नाही. तो व्यभिचारच आहे आणि कुरआनचा सार असा आहे की व्यभिचारी माणूस कदापि जन्नतमध्ये जाणार नाही. इस्लामी कायदेशास्त्राप्रमाणे व्यभिचाऱ्याला
जगातही दगडांनी ठेचून मारण्याची कठोर शिक्षा प्रयुक्त केली आहे, तीसुद्धा समाजादेखत! वरवर ही शिक्षा कठोर वाटत असली तरी एक-दोन व्यभिचाऱ्यांनादेखील ही शिक्षा समाजादेखत  दिली गेली तर परिणामस्वरूप हजारो-लाखो भगिनींची इज्जत-अब्रू सुरक्षित होईल आणि माणसे स्वप्नातदेखील व्यभिचार करण्याचा विचारही करणार नाहीत. जिव्हेवर आणि  कामवासनेवर संपूर्णत: नियंत्रण असलेल्या माणसाचे उर्वरित जीवनही साहजिकच अत्यंत इमानी व उदात्त असेल. अशा माणसाला पैगंबरांनी याच जीवनात मरणोत्तर जीवनात जन्नत  (स्वर्ग) प्रदान करण्याचीजमानत, हमी, गॅरंटी दिली आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

(१९५) उत्तरादाखल त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले, ‘‘मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांत सहजाती  आहात,१३९ म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व  मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि  सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’१४०
(१९६) हे पैगंबर (स.)! या जगात अल्लाहच्या अवज्ञाकारींची धावपळीमुळे तुमची दिशाभूल होता कामा नये.
(१९७) ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौज आहे, नंतर ते सर्वजण नरकामध्ये जातील जे अत्यंत वाईट ठिकाण आहे.
(१९८) याउलट जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगून जीवन व्यतीत करतात त्यांच्यासाठी अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहतात, त्या उद्यानांत ते सदैव राहतील,  अल्लाहतर्फे ही त्यांच्यासाठी पाहुणचाराची सामग्री होय, आणि जे काही अल्लाहजवळ आहे सदाचारी लोकांकरिता तेच सर्वोत्तम आहे.
(१९९) ग्रंथधारकांमध्येसुद्धा काही लोक असे आहेत जे अल्लाहला मानतात, या ग्रंथावर श्रद्धा ठेवतात जो तुमच्याकडे पाठविण्यात आला आहे आणि त्या ग्रंथावरदेखील श्रद्धा ठेवतात जो  याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठविण्यात आला होता. अल्लाहच्या समोर विनम्र झालेले आहेत आणि अल्लाहच्या संकेतवचनांना अल्पशा किंमतीला विकून टाकीत नाहीत. त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावीत नाही.
(२००) हे श्रद्धावंतांनो, संयम पाळा, असत्यवाद्यांविरूद्ध दृढता दाखवा,१४१ सत्याच्या सेवेसाठी कटिबद्ध राहा व अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की तुम्ही सफल व्हाल.


 अन्निसा

(मदीनाकालीन, एकूण १७६ आयती)
अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची जोडी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त  पुरुष व स्त्रीया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर  राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.


१३९) म्हणजे तुम्ही सर्व माणसे आहात आणि माझ्या दृष्टीत एकसमान आहात. माझ्या येथे असा शिरस्ता नाही की स्त्री व पुरुष, मालक आणि गुलाम, काळे आणि गोरे, उच आणि नीच इ. साठी न्यायाचे निकश वेगवेगळे असावेत.
१४०) काही मुस्लिमेतर लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आले आणि विचारले की आदरणीय मूसा (अ.) लाठी आणि चमकदार हात घेऊन आले आणि इसा (अ.) आंधळयांना दृष्टी देत असत आणि महारोग्याना निरोगी करीत असत. तसेच इतर पैगंबरांनी काहीनाकाही चमत्कार आणले होते. आता दाखवा की आपण कोणता चमत्कार (मोजिजे) आणला आहे? यावर  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आयत नं. १९० पासून इथपर्यंत आयतींचे वाचन केले आणि सांगितले, `मी तर हे आणले आहे.'
१४१) मूळ अरबी शब्द `साबिरु' आहे. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे असत्यवादी आपल्या असत्यावर जी दृढता दाखवित आहेत आणि जुलमी व्यवस्थेला प्रतिष्ठा बहाल करण्यासाठी  जी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहेत, तुम्ही त्यांच्या मुकाबल्यात त्यांच्यापेक्षा जास्त दृढता आणि धैर्य दाखवा. दुसरा अर्थ म्हणजे त्यांच्या मुकाबल्यात एक दुसऱ्यापेक्षा जास्त दृढता दाखवा.
१) पुढे माणसातील परस्परांचे हक्क वर्णन करावयाचे असल्याने आणि मुख्यत्वे कौटुंबिक व्यवस्थेचे उत्कर्ष आणि दृढतेसाठी आवश्यक कायदे घोषित करावयाचे असल्याने सुरवात  अशाप्रकारे करण्यात आली आहे. एकीकडे सर्वप्रथम अल्लाहचे भय आणि अल्लाहच्या नाराजीपासून वाचण्याची ताकीद करण्यात आली. दुसरीकडे हे लोकांच्या मनात रूजविले की समस्त  मानवांचे एकच मूळ आहे आणि एकाच मुळातून सर्वांचे हाड मांस व रक्त बनले आहे. ``तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले'' म्हणजेच मानवाचा जन्म प्रथमत: एका व्यक्तीपासून  झाला. दुसऱ्या एके ठिकाणी कुरआन याविषयी तपशील देत आहे की आदम (अ.) हेच प्रथम मानव होते ज्यांच्यामुळे जगात मानव वंश फैलावला. ``त्याच जीवापासून त्याची जोडी  बनविली.'' याचा तपशील आमच्या माहितीत नाही. टीकाकार सामान्यत: जे स्पष्टीकरण देतात आणि बायबलमध्येसुद्धा ज्याचे वर्णन आले आहे ते म्हणजे आदमच्या बरगडीपासून हव्वा  (स्त्री) चा जन्म झाला. (तलमुदमध्ये अधिक तपशील दिला आहे की हव्वा यांना आदम (अ.) यांच्या उजवीकडची तेरावी बरगडीपासून निर्माण केले) परंतु अल्लाहचा ग्रंथ कुरआन   याविषयी खामोश आहे. ज्या हदीसी याच्या समर्थनात सांगितल्या जातात त्यांचा अर्थ तो नाही जे लोक समजतात. म्हणून उत्तम हे आहे की हे वर्णन तसेच केले जावे जसे अल्लाहने  केले आहे. ज्याप्रमाणे अल्लाहने त्यास अस्पष्ट ठेवले आहे. याच्या विस्तारात जाऊन वस्तुस्थिती निश्चित करण्यासाठी वेळ नष्ट केला जाऊ नये.

प्रेषितांचे कार्य म्हणजे मानवजातीला ऐहिक आणि नैतिक विकासाचा मार्ग दाखवणे, उदात्त आणि उच्च दर्जाच्या भावना उत्पन्न करणे आणि स्त्रीपुरुषांमध्ये अशा संवेदना निर्माण करणे  ज्या त्यांची ईश्वराशी जवळीक निर्माण करतात. अशा प्रकारे प्रेषित्व एक पद्धतच नाही ज्याद्वारे ईश्वर मानवजातीला आपला संदेश पोहचवतो, तर त्याची कृपा आणि दयेचाही तो एक  संकेत आहे.
प्रेषित्वाच्या पवित्र इतिहासामध्ये इस्लामचा एकेश्वरी धर्माचा सिद्धान्त सातत्याने चालत आला आहे. आदम (अ.) हे सर्वप्रथम प्रेषित होते आणि मुहम्मद (स.) अंतिम प्रेषित आहेत.  कुरआनमध्ये आणखीन २४ प्रेषितांचा उल्लेख आलाय. प्रेषित मुहम्मद (स.) यांची अंतिम प्रेषित म्हणून निवड करून आणि पवित्र कुरआनच्या माध्यमाने आपल्या अवतरणांची सांगता  करून ईश्वराने स्वत: आणि मनुष्याशी संवाद साधण्यासाठी कायमचा दुवा स्थापन केला आहे. तसेच मार्गदर्शनासाठी सदैव प्रकाशणारा दिवा उभारला आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी  शेवटचा धर्मग्रंथ पवित्र कुरआन मानवजातीस समर्पित केला, ज्यामध्ये ईश्वराच्या प्रेषितांच्या अलौकिक दर्जाचा उल्लेख आहे. संदेश पोहोचविणारा, मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तित्व.  त्यांनी आपल्या विधात्याकडून प्रेरणा घेऊन त्या अवतरणांच्या प्रकाशात या जगात बदल घडवून आणला. ते मानवजातीसाठी एक आदर्श मार्गदर्शक होते. मुहम्मद (स.) याच्या  आयुष्यातील घटनांद्वारेदेखील दुसऱ्या प्रकारचा बोध घडू शकतो.
इ. सनाच्या सातव्या शतकातील विशिष्ट अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणात प्रेषितांनी इस्लामच्या नीतीमत्तेनुसार श्रद्धा आणि मानवी समाज त्यांच्यातील  घटनांच्या अनुषंगाने कृती केली, प्रतिक्रिया दिली आणि स्वत:स अभिव्यक्त केले. त्यांचे आचरण आणि त्यांच्या वचनांचे विशिष्ट ऐतिहासिक व भौगोलिक परिस्थितींमध्ये अध्ययन केले असता त्यांचा मानवांबाबत बंधुभाव, स्नेह, अडीअडचणी, सामाजिक जीवन, न्याय, कायदे आणि युद्धाबाबत बऱ्याच सिद्धतांवर प्रकाश पडतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन आम्हांस  आध्यात्मिकतेचे आमंत्रण देते आणि आम्हांवर असे संस्कार घडवते ज्याद्वारे जगातल्या सध्याच्या घडामोडी, त्यातून उदयास येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हृदयापासून द्यावयाची आहेत,  फक्त बुद्धिमत्तेने नव्हे. ज्यास प्रेमाची जाणीव नसते त्याकडे सामंजस्य नसते. मुस्लिमांना कुरआन अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करण्यास सांगतो, ज्या मुस्लिमांशी असभ्यपणे वागतात.  आपल्या साहित्यामध्ये, चित्रपट आणि टी.व्ही.वरील कार्यक्रमांद्वारे रानटी, दहशतवादींच्या भूमिकांमध्ये दाखवतात. प्रेषितांचे कार्टून बनवतात आणि मीडियाद्वारे त्यांचा अपमान करतात.  (प्रेषित आणि इस्लामची) निंदानालस्ती, अवाजवी टीकाटिप्पणी किंवा गंभीर स्वरूपाचा विरोध होत असेल तर, श्रद्ध लोकांनी नैतिक संयम ठेवावा आणि आता संवेदनशील होऊ नये अशी  कुरआनची अपेक्षा आहे. प्रेषित मुहम्मद (स.) अत्यंत प्रभावशाली प्रवर्तक होते. त्यांच्या शिकवणींचा अभ्यास केला जातो. मार्गदर्शनाचे अनुसरण केले जाते. एक आदर्श ज्याचे अनुकरण लोक करतात आणि ज्यांची वचने. ज्यांच्या कृती आणि शांतपणा सर्वांना आवडतात आणि यावर मनन केले जाते. आपल्या जीवितकार्याच्या २३ वर्षांच्या काळात मुहम्मद (स.) यांनी  आध्यात्मिक आणि ऐहिक स्वातंत्र्याची वाट शोधत होते. त्यांना टप्प्याटप्प्यांनी ईश्वरी अवतरणे प्राप्त होत होती. दैनंदिन जीवन जगत असताना जणू सर्वशक्तिमान सर्वोच्च अल्लाह  त्यांच्याशी सर्वकाळ अनंतकालीन ऐतिहासिक संभाषण करत होता. ते आपल्या प्रियजनांबरोबर हसत खेळत राहात. एखाद्या गुलामास त्यांना काही बोलायचे झाल्यास ते त्याचे ऐकायचे.  शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्याबरोबर जायचे आणि त्याच्यावर प्रेमही करायचे. ते अल्लाहच्या मालकीत होते. कुणाच्या हातात हात दिला तर ते कधी प्रथम स्वत:चा हात मागे  घ्यायचे नाहीत आणि एखाद्याशी मवाळ वाणीने, प्रेमभावनेने बोलल्यास त्याच्या मनाला शांतता स्पर्श करते हे त्यांना ठाऊक होते. ते स्वत्वापासून मुक्त होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी  आवश्यक दोषरहित जबाबदाऱ्या पार पाडणे आणि नीतीमूल्याचे पालन करणे या अटी त्यांनी शिकविल्या. शांततेसाठी न्याय अपरिहार्य आहे आणि प्रेषितांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे की इतरांचा आदरसन्मान करू शकत नाही अशी व्यक्ती समता अनुभवू शकत नाही. कुरआनच्या अवतरणांनी प्रेषितांना मार्ग सुचविला आणि जसं आपण पाहतो, त्यांनी गुलाम, गरीब  आणि खालच्या स्तराच्या लोकांकडे विशेष लक्ष पुरविले. त्यांना प्रेषितांनी आपली प्रतिष्ठा व्यक्त करणे, आपल्या अधिकारावर हक्क सांगणे आणि न्युनगंडाच्या भावनेपासून सुटका करून  घेण्यास सांगितले.
लोकांना धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याकडे बोलविणारा त्यांचा संदेश होता. प्रेषितांच्या जीवितकार्याची सांगता झाली त्याप्रसंगी दयेच्या पर्वता (जबलर्रहमा) च्या पायथ्याशी  असलेल्या मैदानात सर्व जाती-वंशाचे, सभ्यतासंस्कृतीचे, सधन आणि निर्धन लोक उपस्थित होते. त्यांनी इस्लामचा संदेश ऐकून घेतला आणि तो संदेश म्हणजे मनुष्याची प्रतिष्ठा जात-जमात, संस्कृतीसभ्यता, रंगभेदावर आधारित नाही.

-शाहजहान मगदुम
( मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)


आजपासून सुमारे १४५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरबस्थानच्या वाळवंटामध्ये लोक कबिले (समूह) बनवून राहायचे. प्रत्येक कबिल्याचा एक सरदार असे. वर्ण, वंश, व्यवसाय यावरून  प्रत्येकाची आपापली एक ओळख होती. प्रत्येक कबिला एकदुसऱ्यांवर आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असे. यातूनच त्यांच्यात युद्धाच्या ठिणग्या पडायच्या. अज्ञानाचा अंधकार  पसरलेला होता. मर्जीत आले तोच कायदा. दिवसाढवळ्या चोऱ्या, दरोडे पडायचे. अशा या परिस्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाले. एका मार्गभ्रष्ट   समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ज्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती ते या कुरआनच्या शिकवणीतून देण्यात येत होते. तसेच समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी कुरआनच्या  स्वरूपात एक संविधान ईश्वराने प्रेषितांच्या स्वाधीन केले. ज्याच्या माध्यमाने पैगंबरांनी समाज पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले.
समाजातील उच्चनीचता, भेदभाव, अन्याय, अत्याचार दूर करून त्या जागी न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित करण्याचा पैगंबरांनी प्रयत्न केला. लोकांमध्ये एकतेची भावना वृद्धिंगत करून  कुरआनमधील कायद्याची कठोर अंमलबजावणी केली. हळूहळू लोकांची मानसिकता बदलत होती, जीवनाचे वास्तविक ज्ञान वाढत होते, जीवन जगण्यासाठी काही नीतिनियम असले  पाहिजेत याची जाणीव निर्माण झाली होती. या सर्व मानवी प्रकृतीला अनुकूल गरजांची कुरआनच्या माध्यमातून पूर्तता करण्यात येत होती. चोरीची शिक्षा ठरविण्यात आली. जो चोरी  करेल त्याचे मनगटापासून हात छाटण्याचे आदेश देण्यात आले. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली. चोऱ्या दरोड्यांचे प्रमाण कमी होऊ लागले. या काळात मदीनेत बनू मक़्जुम  नावाच्या उच्चभ्रू काबिल्यातील फातिमा नावाच्या स्त्रीकडून चोरीचा गुन्हा घडला होता! चोरीचे हे प्रकरण पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या न्यायालयात दाखल झाले! साहजिकच आता  कुरआनच्या कायद्यानुसार त्या स्त्रीला शिक्षा होणार होती; तरीसुद्धा लोकांमध्ये ही उत्सुकता लागली होती की पैगंबर (स.) आता काय न्याय देतील? कारण ही स्त्री एका उच्चभ्रू  कबिल्याची सदस्य आहे आणि त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. कबिल्यामध्ये अस्वस्थता वाढू लागली! त्या स्त्रीच्या शिक्षेमध्ये काही कपात व्हावी यासाठी प्रयत्न होऊ लागले.  पैगंबरांच्या जवळच्या लोकांना मध्यस्तीसाठी विनवणी केली गेली, शेवटी एक शिष्टमंडळ त्या स्त्रीची शिफारस घेऊन पैगंबरांच्या न्यायालयात पोहचला व शिक्षा कमी करण्याची मागणी  केली. पैगंबर (स.) काही वेळ शांत राहिले, चेहरा लाल झाला होता. थोड्या वेळाने पैगंबरांनी त्या शिष्टमंडळाला उत्तर दिले; नव्हे तर आपला निकाल सांगितला. पैगंबर (स.) म्हणाले,  ‘‘मला अल्लाहने न्याय प्रस्थापित करण्यासाठी या जगात पाठविले आहे, तुम्ही शिक्षा कमी करण्याची शिफारस करता!’’ पुढे पैगंबर (स.) जे म्हणाले ते अगदी मन सुन्न करणारे आहे.  पैगंबर (स.) शेवटी म्हणाले, ‘‘हा चोरीचा अपराध जर या फातिमाऐवजी माझ्या फातिमाच्या (पैगंबरांची प्रिय मुलगी) हातून जरी घडला असता तर तिलासुद्धा मी हीच शिक्षा दिली  असती.’’ आता यापुढे कोणाची हिंमत होती शिफारस करण्याची? सर्व जण निमूटपणे निघून गेले. न्यायानुसार त्या स्त्रीला शिक्षा करण्यात आली.
(संदर्भ:- बुखारी (हदीस संग्रह) खंड क्र.२, पान क्र. १००३)
आज आमच्या समाजाला अशा प्रकारच्या न्यायाची नितांत गरज आहे. जेणेकरून अपराधांचे प्रमाण कमी होतील. न्यायदान करताना जर ही भावना निर्माण झाली की, कोणत्याही  परिस्थितीत कोनावरही अन्याय होऊ नये, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवारिल विश्वास नक्कीच वाढेल. न्यायालयात न्यायदान करणाऱ्यांकडूंन हीच अपेक्षा!!

-संकलन : शेख अब्दुल हमीद, मो.: ७३८५३१४१४३

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget