ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर्सच्या अभावाने हकनाक मृत्यू
कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेनासा झाला आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधा, बदलता स्ट्रेन, पक्का उपचार माहित नसल्यामुळे रूग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच कोरोना वॅक्सीनमुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी त्याच्याही अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण थांबले आहे. अशा चोहोबाजूंनी कचाट्यात महाराष्ट्राची जनता सापडल्याने मोठी हानी होत आहे. कोविड सेंटर समोरील चित्र पहावेनासे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक शासकीय नियमांचे पालन करणे हेच सध्यातरी कोरोनाला थांबविण्याचे एकमात्र उपाय आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही, असे प्रिंसिपल सायंटिफिक अॅडव्हायझर विजय राघवन यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देताना विजय राघवन म्हणाले, कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही. मात्र, केव्हा येणार? कसा इफेक्ट करेल? हे सांगणे सध्या अवघड आहे. मात्र, यासाठी आपल्याला तयार रहावे लागले.
24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्थिती कठीण -
24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. छोट्या शहरांत विशेष लक्ष देण्याची आश्यकता आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील 12 राज्यांत 1 लाखहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 7 राज्यांत 50 हजार ते 1 लाखदरम्यान सक्रिय रुग्ण आहेत आणि 17 राज्यांत 50 हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात 1.5 लाख सक्रिय रुग्ण आहेत, असे लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.
भारतात कोरोना लसीकरण अभियानापासून ते आतापर्यंत 16 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 109 दिवसांचा कालावधी लागला आहेत. केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्यान मंत्रायलाने यासंदर्भात माहिती दिली. या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारताच्या तुलनेत अमेरिकेला 111 दिवस, तर चीनला 116 दिवस लागले आहेत.
5 मे रोजी देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.
Post a Comment