Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२५) ...मग त्यांनी कोणताही संकेत पाहिला तरी त्यावर ते श्रद्धा ठेवणार नाहीत. यावर परमावधी अशी की जेव्हा ते तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी भांडतात तेव्हा त्यांच्यातील ज्या  लोकांनी सत्य नाकारण्याचा निर्णय घेतला आहे ते (सर्व गोष्टी ऐकल्यानंतर) हेच सांगतात की या तर पुरातन कथांशिवाय इतर काहीच नाहीत.१८
(२६) ते या सत्य गोष्टीला मान्य करण्यापासून लोकांना प्रतिबंध करतात आणि स्वत:देखील त्यापासून दूर पळतात (ते समजतात की अशा कृतीमुळे ते तुमचे काही वाईट करीत आहेत.)  खरे पाहता मुळात ते स्वत:च्याच विनाशाची सामग्री तयार करीत आहेत परंतु त्यांना याचे भान नाही.
(२७) किती बरे झाले असते जर तुम्ही त्यावेळेची परिस्थिती पाहू शकला असता जेव्हा ते नरकाच्या काठावर उभे केले जातील. त्या वेळी ते म्हणतील, एखादा मार्ग असा निघावा की  आम्हाला पृथ्वीवर पुन्हा परत पाठविले जावे आणि आपल्या पालनकर्त्याच्या संकेतवचनांना आम्ही खोटी लेखूू नये आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांमध्ये सामील व्हावे, तर किती बरे होईल!
(२८) खरे पाहता ही गोष्ट ते केवळ या कारणास्तव म्हणतील की ज्या सत्यावर त्यांनी पडदा घातला होता ते त्या वेळी उघड होऊन त्यांच्यासमोर आलेले असेल.१९ अन्यथा जर त्यांना  पूर्व आयुष्याकडे परत पाठविले गेले तर पुन्हा ते तेच सर्वकाही करतील ज्यांची त्यांना मनाई करण्यात आली आहे. ते तर आहेतच लबाड, (म्हणून आपल्या या इच्छेच्या  अभिव्यक्तीतदेखील लबाडीचाच आधार घेतील.)
(२९) आज हे लोक सांगतात की जीवन जे काही आहे ते फक्त हेच आमचे लौकिक जीवन आहे आणि आम्ही मृत्यूनंतर मुळीच पुन्हा जिवंत उठविले जाणार नाही.
(३०) जर तुम्ही ते दृश्य पाहू शकाल तर किती छान होईल, जेव्हा हे आपल्या पालनकर्त्यासमोर उभे केले जातील, त्यावेळी त्यांचा पालनकर्ता त्यांना विचारील, ‘‘काय हे वास्तव नव्हे?’’   हे म्हणतील, ‘‘होय, आमच्या पालनकर्त्या ही वास्तवच आहे.’ तो म्हणेल, ‘‘बरे! तर आता आपल्या सत्य नाकारण्याबद्दलच्या प्रकोपाचा आस्वाद घ्या.’’
(३१) नुकसानीत आहेत ते लोक ज्यांनी अल्लाहशी आपल्या भेटीच्या वार्तेला खोटे लेखले. जेव्हा आकस्मित ती घटका येऊन ठेपेल तेव्हा हेच लोक म्हणतील, ‘‘अरेरे! आमच्याकडून कशी   चूक झाली.’’ आणि यांची दशा अशी असेल की त्यांनी आपल्या पाठीवर आपल्या पापाचे ओझे घेतले असेल. पाहा किती वाईट ओझे आहे जे हे उचलत आहेत.
(३२) या जगातील जीवन तर एक खेळ-तमाशा आहे.२० वास्तविक पाहता मरणोत्तर जीवनाचे ठिकाणच त्या लोकांकरिता अधिक उत्तम आहे जे दुराचारापासून अलिप्त राहू इच्छितात.  मग काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करणार नाही?


१८) नादान लोकांचा साधारणत: नियम असतो की जेव्हा एखादा त्यांना सत्याकडे बोलावितो तेव्हा ते म्हणू लागतात की तुम्ही काय नवीन सांगितले? या सर्व जुन्या गोष्टी आहेत ज्यांना  आम्ही ऐकत आलो आहोत. या मूर्खांचा दृष्टिकोन जणू हा आहे की एखादे सत्य होण्यासाठी ते नवीन असणे आवश्यक आहे आणि जे जुने आहे ते सत्य नाही. खरेतर सत्य प्रत्येक   युगात एकच आहे आणि सदासर्वदा एकच राहील. अल्लाहच्या दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर जे कोणी मनुष्यांच्या मार्गदर्शनासाठी पुढे सरसावले आहेत ते सर्व गतकाळापासून एकाच  सत्याला जगापुढे ठेवत आले आहेत आणि पुढेही जो कोणी सत्याच्या या स्त्रोतापासून लाभान्वित होवून जे काही प्रस्तुत करील तो त्याच जुन्या सत्याची पुनरावृत्ती करील. नवीन गोष्ट  तर तेच लोक सांगू शकतात जे ईशमार्गदर्शनाने वंचित आदिकालिक व सर्वकालिक सत्याला जाणत नाहीत. परिणामी स्वत:च काही विचारप्रणालींची रचना करुन सत्याच्या नावाखाली लोकांपुढे मांडतात. असे लोक नि:शंक अशा अनोळखी गोष्टी ज्या गोष्टी ते सांगतात ज्या पूर्वी जगात कोणीच सांगितल्या नसाव्यात.
१९) हे कथन खरे तर बुद्धी आणि विवेकाचा योग्य निर्णय आणि मतातील वास्तविक बदलाचा परिणाम नव्हे तर तो केवळ सत्य प्रत्यक्ष पाहण्याचा परिणाम असेल. यानंतर स्पष्ट आहे  की कठोराहून कठोर विरोधकसुद्धा नकार देण्याचे धाडस करू शकणार नाहीत.
२०) याचा वास्तविक अर्थ आहे की परलोकच्या वास्तविक आणि स्थायी जीवनाच्या तुलनेत या जगातील जीवन असे आहे की एखादा मनुष्य खेळ आणि मनोरंजनात काही काळ   आपल्या मनाला विरंगुळा देतो आणि नंतर मूळ कामाकडे गंभीरतापूर्वक वळतो. जगाला खेळ आणि तमाशाची उपमा यासाठीसुद्धा दिली आहे की जगात वास्तविकता गुप्त् ठेवलेली आहे.  अशा स्थितीत दूरदृष्टी न बाळगणारे आणि केवळ वरवरच्या गोष्टींना पाहून गैरसमजुतीत पडणाऱ्या व्यक्तींना मार्गभ्रष्ट होण्यासाठी अनेक कारणे आहेत. या गैरसमजूतीत आणि  मार्गभ्रष्टतेत फसून लोक मूळ वास्तविकतेविरुद्ध विचित्र पद्धत स्वीकारतात. यामुळे अशा लोकांचे जीवन एक खेळ तमाशाच बनून राहाते. उदा. एक मनुष्य या जगात बादशाह बनून  बसला आहे परंतु त्याची स्थिती त्या कठपुतलीच्या खेळाच्या बादशाहपेक्षा वेगळी नसते, जो मुकुट धारण करून हुकूम चालवतो, जणूकाही तो खराच बादशाह आहे. तो तर एक बनावटी बादशाह असतो. त्याला खऱ्या बादशाहाची हवासुद्धा लागलेली नसते. निर्देशकाच्या एका इशाऱ्याने तो बादशाह पदच्युत होतो, तुरुंगात टाकला जातो किंवा त्याला ठार केले जाते.  अशाप्रकारचे खेळ-तमाशे या जगात चहुकडे होत आहेत. कुठे एखाद्या पीराच्या किंवा देवीच्या दरबारातून इच्छापूर्ती होत आहे, तिथे खरेतर इच्छापूर्तीच्या शक्तीचा ठिकाणा मुळीच  नसतो. कुठे कोणी परोक्षीय चमत्कार दाखवितो परंतु तिथे परोक्षाचे ज्ञान कणभरसुद्धा नसते. कुठे लोकांना उपजीविका पुरविणारा कोणी बनून बसला आहे परंतु तो स्वत:च आपल्या  उपजीविकेसाठी दुसऱ्यावरच आश्रित आहे. कुठे कोणी सन्मान, अपमान तसेच लाभ आणि हानी पोहचविणारा बनून बसला आहे आणि आपल्या महानतेचे डंके वाजवित आहे, जणूकाही  आजुबाजूंच्या सर्वांचा तोच ईश्वर आहे. खरेतर त्याच्या कपाळावर तर ते चिन्ह अंकित आहे की तो एक तुच्छ दास आहे. भाग्याचा एक लहानसा धक्का त्याला महानतेच्या पदावरून  खाली लोळवितो आणि त्या लोकांच्या पायांशी तो लोटांगण घालू लागतो, ज्यांचा तो ईश्वर होऊन बसला होता. हा सर्व खेळ जो या जगातील जीवनाच्या मोजक्या दिवसांसाठी खेळला  जात आहे, मृत्यूघटिका येताच क्षणार्धात नष्ट होईल. मृत्यूपश्चात मनुष्य या जगातील जीवनातून परलोक जीवनात प्रवेश करील जेथे सर्व सत्याधिष्ठित असेल. तिथे या जगातील  जीवनातील सर्व संभ्रम नष्ट होतील आणि तिथे दाखविले जाईल की सत्याची पुंजी त्याने किती प्रमाणात आपल्याबरोबर आणली आहे त्याला तोलून दाखविले जाईल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget