Halloween Costume ideas 2015

जिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ

प्रचाराच्या शुभारंभाचे शक्तीप्रदर्शन बेफामपणे सुरू झाले आहे. सोशलमीडियातून आभाळभर प्रसार होतोय. सत्ताधीशांच्या अंधभक्तांसोबतचा कित्ता आता सर्वपक्षीय अनुयायी भक्तांनी गिरवलाय. भारतीय निवडणूक प्रणाली केवळ अंधभक्तांनीच भरून राहीलीय. बावळटपणाचा अतिरेक, शहाणपणा उसना आव आणि अस्मितांचा कट्टर चेव यांनी कागदांची रद्दी टम्म सुजत आहे. सुजाण-सामान्य नागरीला मात्र सगळेच एकसारखे दिसताहेत, सेम सेम.
    ”सगळीसोंग काढता येतात, पैशाची नाही रे” म्हणत उमेदवार पक्षपार्टी दलबदल दलदलीत काम करायला गरीब कार्यकर्ता उन्हांत उतरला आहे. लोकशाहीची जत्रा गोंधळानं सुरूवात झालीय. आता आधीच्या आभासी वैरत्वाला तिखट तीव्रता लाभेल. आपले म्हणनेच योग्य, खरेपणाच्या स्वतःच्या कसोट्या लावून स्वतःच सत्य प्रसवणार्‍यांचे वारसदार संख्येने वाढताहेत. काहीतरी खूप ग्रेट वगैरे सांगून आपण कलात्मक बदल घडवतोय, या आवेशाने बायोपिक्सचा पसारा सिनेमांतून पसरत आहे.
    अलिकडे ’केसरी’ सारख्या मुव्हीमधून ध्रुवीकरणाचा धागा गडद करण्याचा मस्त प्रयत्न झाला. शूरसैनिकांना वंदन करताना, लांबलेल्या वेळेत केवळ मुस्लिमव्हीलनत्व ठाशिव करण्याचा सहेतूक प्रयत्न झाला. असे प्रयोग किती यशस्वी होतील पण नवी पिढीच्या डोक्यांना द्वेषपेरणीचे निमित्त मात्र मिळत राहते. उन्हाळ्यातल्या झळांची तीव्रता सहन करत एसी सिनेमा हॉलमध्ये मित्रांसोबत मी ही घुसलो. सिनेमास्क्रिनवर ’राम की जन्मभूमी’ अशी अक्षरे झळकू लागली.
    अख्खा दोनतासांच्या काळात कुतथ्यांनी भरलेला मुस्लिमद्वेषी अंजेडा बेमालूमपणे प्रेक्षकांच्या माथी मारला जातो. आधीच न्यायप्रविष्ठ असणार्‍या, विवादीत जागेविषयीच्या जनभावना तीव्र असताना, त्यातही ’कोड ऑफ कंडक्ट’ असताना, असा फालतू सिनेमा रिलीज कसा केला जातो, याच विचाराने डोके तापले. गावसंस्कारातल्या नव्या पिढीने विसरलेल्या किंवा ज्यांना या प्रश्‍नांची जाणीवच नाही अशा बाबरी विध्वंसानंतरच्या पिढीला धार्मिकद्वेषाचे सरळ ज्ञान (?) देणारा हा बावळटी एकांगी सिनेमा. लेखक, अभिनय, दिग्दर्शनातून मुस्लिम वसिमचे नाव झळकत राहते त्याचवेळी शेजारी बसलेला एखादा हिंदू नावाचा मित्र मात्र माझ्याकडेच संशयी डोळ्यांनी पाहू लागतो. हेच या पिक्चरचे यश.
    थिल्लर सवंग म्हणूनच याची समीक्षा केली पाहिजे. कलेच्या कोणत्याच अंगानी किंवा कॅमेरा स्क्रिप्ट या अंगाने हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या ’सी’ ग्रेड कॅटेगरीत ही बसत नाही. शरिया, तलाक, हलाला, क्रुरपणा या बाबतची सगळीच अपूर्ण, चुकीची आणि चीड आणणारी चित्रणं यात सर्रास धुमाकूळ घालतात. याला दुर्लक्ष कसे करावे? एकतर ’अशा’ नावांनी आलेला सिनेमा आधिच तब्लीगी झालेला तरूण पाहत नाही. त्यात भबताचे भयताल अस्वस्थ करणारे असताना, शौकीन असणारा सामान्य तरूणही इकडे फिरकत नाही नेमके याच कारणाने, मुस्लिम सोडून ज्या नव्या पोर पीढिने हा सिनेमा बघीतलाय त्यांच्या डोक्यात पुनःविषपेरणीची बीज नकळत रोवली जातायेत.
    मानवी कल्पनेच्या पलिकडे जाऊन नेटीझन, तंत्रज्ञानी पिढीला सर्वतोपरी मीडिया विश्‍वासाचा आणि माहितीचा साठा ठरतो. म्हणून अशी सांस्कृतिक कलाक्षेत्र जी उजव्या बाजूचा विचार सरळस्पष्ट पसरवतायत यावर त्वरीत बंदी किंवा कायदेशीर अमान्यता मिळवायला हवी.
    वर्षानुवर्षे सहिष्णूतेचा प्रयत्न करून सहनशीलतेचा स्वभाव पक्का करत राहणार्‍या छोट्या गावातल्या अनेक पदरी बहुजनी एकतेतून अलग मुस्लिमाला वेगळे करण्याचे चाणक्यीडाव सातत्याने सुरूयत.
    हातातल्या मोबाईल ते टीव्हीतल्या न्यूजरूम, मालीकापासून, कचरागाडीच्या सकाळच्या देशभक्ती वाटणार्‍या अरोळीपासून, मोठ्या डीजीटल पोस्टरपर्यंत, सिंगल स्क्रिनच्या छोट्या थेटरपासून मल्टीफ्लेक्स मॉलपर्यंत, परवा लताबाईच्या नव्या गाण्यापासून स्पेशल एटीएसच्या जाहीरातीपर्यंत फ्रंट किंवा बॅकला एक समाज दोषी बनवून ऑलरेडी उभाच केला जातोय.
    सर्वांनी सातत्याने दोषी ठरवून टाकले, कितीही कशीही आदळ-आपट करून खरे सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिक केला तरी ’गळ्याला नख’ लावलाय.. किंवा ’कान भरलेले’ त्यांच्या मग उरत काहीच नाही. उरतो गोंधळ. येणार्‍या दिडेक महिन्यात उन्हांच्या झळा वाढतील, तयवर उपाय करता येतील. पण प्रेमस्नेहएकतेची पानगळ सुरूय मातीमाणसांचा लळा कमी होत होत.. जिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ...
    जपून, खरच जपून !!
    टीप ः सिनेमा किंवा जाहिरात पाहावीच असे नाही. आपण सिनेमा आणि आपली जाहिरात व्हायला हवी. अशा क्षेत्राची धडपड करू... मी करतोय.. सहनशिलतेची बरकत वाढत राहो.

- साहिल शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget