Halloween Costume ideas 2015

शेतकरी आणि शरद जोशी

शेतकरी आणि शरद जोशी यांचे नाते सांगण्याइतके सोपे नाही. शिर्डी येथे शेतकरी संघटनेच्या 14 व्या अधिवेशनाला मला पण हजर राहण्याची संधी मिळाली. याच महिन्याच्या 10,11 आणि 12 तारखेला शरद जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. हे आवर्जुन लिहिण्याचे कारण हे की, शरद जोशी नंतर शेतकरी संघटना संपली असा गैरसमज असणार्यांसाठी हे अधिवशेन धक्का ठरावे इतके देखणे ठरले. राज्यातील सर्व भागातून हजारो शेतकरी स्वखर्चाने आले होते. त्यात तरूण शेतकरी व महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती.
    महाराष्ट्र वगळता पंजाब, मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा मधूनही शेतकरी आले होते. या अर्थाने हे अखिल भारतीय अधिवेशन होते. हे सर्व शेतकरी आणि त्यांचे नेते के.के.सी. अर्थात किसान कोऑर्डिनेशन कमिटीचे सदस्य आहेत. शरद जोशींनी के.के.सी.च्या बॅनरखाली 17 राज्यांच्या शेतकरी नेत्यांना एकत्र आणले होते.
    शरद जोशी नसताना आणि कोणताही वलयांकित नसताना केवळ त्यांच्या विचारांच्या निष्ठेवर इतके लोक जमतात ही शेतकरी चळवळीसाठी खूप आश्वासक बाब आहे. त्यातही मधल्या काळात काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदांच्या मोहात संघटना सोडून गेले. काहींनी इतर शेतकरी संघटना उभारल्या. पण मूळ शेतकरी संघटना आणि त्यातले शरद जोशींचे विचार यांच्याशी त्यांच्या कार्यकर्त्यांचे असलेले एकनिष्ठतेचे नाते अजूनही टिकून आहे. मुळात खुल्या व्यवस्थेची मांडणी ही अपारंपारिक असल्याने तिचे आकर्षण वाटणे कठिणच आहे. आरक्षण, शासकीय मदत या सगळ्या कुबड्या न घेता शेतकर्यांना स्वातंत्र्य मागणारी ही मांडणी पेलने कठीण होते व आहे. पण खुल्या व्यवस्थेच्या या मांडणीला हजारो शेतकरी शरद जोशींच्या निर्वाणानंतरही प्रतिसाद देतात, हे अविश्वसनीय आहे.
    शेतकरी संघटनेत प्रत्येक शेतकरी शरद जोशींच्या विचारांचा आदर करणारा आहे. स्वतःची कामे मागे टाकून शेतकरी स्वातंत्र्याकरिता तीन दिवस अधिवेशनात स्वखर्चाने आलेला होता. तीन दिवस घराला कुलूप लावणे शेतकरी परिवाराला परवडण्यासारखे नसते. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतरच असे करणे शक्य असते. आजच्या युगात राजनेता आणि इतर संघटनांच्या कार्यक्रमामध्ये येण्याजाण्याची, जेवणाची, राहण्याची अशी सर्व व्यवस्था असतांनासुद्धा शेतकरी परिवार तिकडे जाण्यास नकार देतो. कारण या सर्वांवर शेतकर्यांचा विश्वास राहिलेला नाही. याशिवाय, सुरक्षे संबंधी सुद्धा प्रश्न निर्माण होतात. शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता वैचारिक पातळी परिपूर्ण पद्धतीने गाठलेला असतो. अधिवेशनाला येणार्या प्रत्येक भावा-बहिणींचे तो सन्मानपूर्वक स्वागत करतो. त्यांना कोणताही त्रास होवू नये, याची संपूर्ण काळजी घेतो. शेतकरी संघटनेत येणार्या प्रत्येकाची जात ही फक्त आणि फक्त शेतकरी असते.
जाती मतभेद फेक-फेक... शेतकरी तीतूका एक-एक
    प्रत्येक शेतकर्याच्या मनात ही भावना रूजलेली असते. कोणतीही अपेक्षा न करता आपल्या श्रमातून निर्माण केलेल्या हक्काच्या संपत्तीतून खर्च करून प्रत्येक शेतकरी आलेला असतो आणि त्याचा शेतकरी संघटनेला सार्थ अभिमानही वाटतो.    
    हजारोंच्या संख्येने तीन दिवस मुला-बाळांना सोबत घेऊन कडाक्याच्या थंडीत घर सोडून खुल्या मैदानात राहणे ही एक आश्चर्यकारक बाब आहे आणि असे फक्त देशाचा पोशिंदाच करू शकतो.
    एकीकडे वक्त्यांची वैचारिक मांडणी आणि दूसरीकडे श्रोते तृप्त होऊन ऐकत असलेले दृश्य पाहून माझे मन भरून आले. अधिवेशनात वैचारिक मांडणी करणार्या सर्वच वक्त्यांनी चांगली तयारी केलेली होती. त्यामुळे हजर असलेले सर्व शेतकरी बांधव समाधानी झाल्याचे जाणवत होते. शरद जोशी नसतांनासुद्धा त्यांचा विचार मांडणारी समर्थ लोकांची फळी संघटनेकडे आहे, याचा जणू पुरावाच या अधिवेशनात मिळाला. या अधिवेशनाचे मोठे वैशिष्ट्ये म्हणजे कृषि विषयक निराशा चरमस्थानी असतांनासुद्धा तरूण शेतकरी आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. सर्वच सत्रांमधील चर्चा अभ्यासपूर्ण आणि खरंच गर्व वाटावा अशी झाली.
    मी शरद जोशींची मानसकन्या या नात्याने फक्त त्यांच्या विचारांनी भारलेल्या कार्यकर्त्यांना भेटायला व साहेबांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त त्यांची आठवण करण्याकरिता शिर्डीला गेले. पण डोळ्याचे पारणे फिटावे असे दृश्य डोळ्यात घेऊन आणि उत्साह वाढविणारे विचार डोक्यात घेऊन घरी परतले. कोट्यावधी शेतकर्यांच्या हृदयात राहणार्या शरद जोशींना माजी भावपूर्ण श्रद्धांजली. वैचारिक आणि भावनिक दोन्ही पातळीवरील शेतकरी संघटनेचे संतुलन पाहूने मन तृप्त झाले.

- मीना नलवार
9822936603

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget