Halloween Costume ideas 2015

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एकमेव शहीद बादशाह टिपू सुलतान

- जुबेर शेख - लातूर

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात हजारो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. मात्र 562 संस्थानिकांपैकी ह. टिपु सुलतान (रहे.) हे एकमेवाद्वितीय असे राजे होऊन गेले की ज्यांना इंग्रजांशी लढताना शहादत प्राप्त झाली. हा सन्मान दूसर्‍या कोणत्याही संस्थानिकास लाभलेला नाही. बाकी सगळ्यांनी इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारलेले होते.
टिपु सुलतान संबंधी लिहितांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हंटले आहे की, ”त्यावेळेसचे राजे महाराजे यांनी जर का टिपु सुलतानची साथ दिली असती तर पुढचा दीडशे वर्षाचा इंग्रजांच्या गुलामगिरीचा इतिहासच लिहिण्याची गरज पडली नसती.” टिपु सुलतानच्या राज्याला सलतनत-ए-खुदादाद म्हणजे सर्वशक्तीमान अल्लाहने दिलेले राज्य म्हंटले जायचे. म्हैसूर राज्याला असे नाव पडण्याचे कारण असे की, त्या काळी अस्तित्वात असलेल्या भारतातील सर्व संस्थांनामध्ये म्हैसूर राज्य एक संपन्न राज्य म्हणून गणले जात होते. हे एकमेव असे राज्य होते जे अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होते.
    मागील दोन वर्षांपासून या कल्याणकारी राजाच्या जयंतीनिमित्त कर्नाटक सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. सरकारी स्तरावर जयंती साजरी करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे काही दक्षिणपंथी संघटनांच्या पचनी हा निर्णय पडलेला नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात उग्र प्रदर्शने केली. गेल्यावर्षी या संदर्भात झालेल्या हिंसेत 3 लोक ठार झाले. मागच्या साडेतीन वर्षांपासून मुस्लिमांच्या राष्ट्रीय चारित्र्यालाही उजाळा देण्याचे प्रयत्नही काही लोकांना सहन होईनासे झालेले आहेत. या लोकांनी इंग्रजांद्वारे -(उर्वरित पान 7 वर)
लिहिलेला इतिहास वाचलेला आहे. ज्यात इंग्रजांनी टिपू सुलतानला एक जुल्मी राजा म्हणून रंगवलेला आहे. त्यात लिहिलेले आहे की, टिपु सुलतानने अनेक हिंदूचे जबरीने इस्लाममध्ये धर्मांतरण करवून घेतले होते. त्यांनी अनेक मंदिरे उद्धवस्त केलेली होती. या लोकांना एवढे समजत नाही की, ज्या राजाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, त्यांच्या नाकी नऊ आणून सोडले होते, ते इतिहास लिहितांना आपला शत्रू टिपू सुलतान याच्याविषयी चांगले कसे लिहीतील? या मंडळींनी भारतीय इतिहासकारांनी, त्यातल्या त्यात हिंदू इतिहासकारांनी टिपु सुलतान बद्दल काय लिहिले आहे? हे वाचावयास हवे. जर का त्यांनी ते वाचले असते तर टिपू सुलतान यांच्या जयंतीला विरोध केला नसता. यावर्षी तर केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे जे स्वतः कर्नाटकचे राहणारे आहेत यांनी टिपु सुलतानबद्दल अतिशय आक्षेपार्ह असे विधान केलेले आहे. त्यांना शिष्टाचार म्हणून राज्य सरकारने जयंतीनिमित्त सहभागी होण्याचे निमंत्रणपत्र पाठविले. आता या कार्यक्रमाला जायचे की नाही त्यांनी ठरवायला हवे होते. मात्र त्यांनी टिपु सुलतान रहे. यांना अत्याचारी व बलात्कारी राजा असे संबोधले. एका शहीद स्वातंत्र्यसैनिकाचा एका केंद्रीय मंत्र्याकडून एवढा मोठा अपमान कधीच झाला नसेल. टिपु सुलतान यांनी अनेक मंदिरे तोडल्याचा जे आरोप करतात त्यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर द्यावे की म्हैसूरमधील त्यांच्या महालासमोर आजही उभे असलेले रंगनाथ स्वामी यांचे मंदीर तोडायचे ते कसे काय विसरले? खोटे बोलण्याचीही मर्यादा असते. एका शहीदाबद्दल एवढे खोटे बोलून स्वतःला हास्यास्पद करून घेऊ नये.   
    अशा या उलट सुलट प्रतिक्रियेच्या वातावरणात, वाचकांना टिपु सुलतान बद्दल थोडक्यात माहिती सांगणे आजमीतिला गरजेचे झालेले आहे. याच महिन्याच्या 10 तारखेला टिपु सुलतान यांची जयंती होती. नव्या पिढीला टिपु सुलतान बद्दल काहीच माहिती नाही. ती माहिती थोडक्यात देण्याचा हा अल्पसा प्रयत्न वाचकांनी स्वीकारावा.
    ह. टिपु सुलतान (रहे.) यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1750 साली झाला. ते एक सहृदयी, न्यायप्रीय, समतावादी आणि खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष राजे होते. ते इतके दयाळू होते की, अनेकवेळा चुका केलेल्या लोकांनाही ते क्षमा करायचे. ते अत्यंत प्रामाणिक आणि आधुनिक विचारसरणीचे राजे होते. युद्धात अग्नीबाणांचा (मिजाईल) उपयोग करणारे ते एकमेव राजे होते. म्हैसूर राज्यातील लोक इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत सुखी होते. टिपु सुलतान यांचा पारख करण्यामध्ये हतकंडा होता. हिंदूवर अत्याचार करणे तर दूर त्यांनी हिंदूंच्या हितामध्ये असे काही निर्णय घेतले होते की, त्यांची माहिती घेतली असता आपल्या सर्वांचा अभिमानाने ऊर भरून येईल व मान गर्वाने ऊंच होईल. त्यांना हिंदू आणि मुस्लिमांच्या संयोगातून निर्माण झालेली भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान होता. तिला जपण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते. त्यांचे प्रधानमंत्री एक ब्राह्मण व्यक्ती पुर्णिया पंडित तर अर्थमंत्री कृष्णाराव होते. श्याम्या अयंगर पोस्ट आणि पोलिस विभागाचे प्रमुख होते. यांच्याशिवाय, अनेक तहसीलदार, पेशकार, फौजदार, न्यायाधिश यांच्यासारखी पदे अनेक हिंदू अधिकार्‍यांकडे होती. याशिवाय विदेशांमध्ये त्यांनी अनेक पात्र हिंदूंना राजदूत म्हणून त्यांनी नियुक्त केलेले होते. एका ब्राह्मण सरदाराला त्यांनी मलबार विभागप्रमुख केले होते. दिल्लीच्या दरबारात म्हैसूर राज्याचे राजदूत म्हणून मूलचंद आणि दिवाण राय यांना नेमले होते. त्यांच्या काळात प्रत्येकाला आप-आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. एवढेच नव्हे तर अनेक हिंदू सणांसाठी, मठांसाठी, मंदिरांसाठी त्यांनी सरकारी तिजोरीतून मदतही केलेली होती. मराठा सैन्यांनी उध्वस्त केलेल्या श्रृंगेरी मठाचे पुनर्निमाणही त्यांनी सरकारी खर्चाने केलेले होते. हे सत्य सर्वच इतिहासकार स्विकारतात. त्यांनी श्रृंगेरीच नव्हे तर कोल्लूर आणि मलकोट सारख्या मंदिरांसह अनेक मठांना सरकारी खजीन्यातून नियमितपणे मदद केलेली होती. अशा महान भारत भूमीच्या सुपूत्राला केवळ त्यांच्या धर्मश्रद्धेमुळे नाकारले जात असेल तर ही अत्यंत दुःखद बाब आहे.
    1916 मध्ये म्हैसूर राज्याचे पुरातन विभाग प्रमुख राव बहादूर यांना श्रृंगेरीच्या मठात मठाधिशांना उद्देशून लिहिलेली टिपु सुलतान यांनी काही पत्रे मिळाली होती. त्यातून हिंदू प्रजेविषयीचे त्यांचे प्रेम आणि सद्भावना ठळकपणे जाणवत होती. राव बहादूर या पत्रांना ऐतिहासिक दस्तावेज मानतात. जातीयतेचा चष्मा उतरवून जर का या पत्रांचे अवलोकन केले तर निश्‍चितपणे टिपु सुलतान यांच्या सद्भावना आपल्या मनाला साद घातल्याशिवाय राहणार नाहीत. हे सत्य आहे, काही वेळा त्यांनी गैरमुस्लिमांना अतिशय कठोर वागणूक दिली. मात्र ती वागणूक प्रशासकीय कारणांमुळे दिली गेली होती. ते एक कठोर प्रशासक होते. सरकारी आदेशांची अवहेलना करणार्‍यांसोबत ते कधीच दयामाया दाखवित नव्हते. मग अशी अवहेलना करणारे हिंदू असोत का मुसलमान. नियमभंग करणार्‍या, शासकीय आदेशाची अवहेलना करणार्‍या मुस्लिमांप्रतीही त्यांनी अतिशय कठोर धोरण स्वीकारलेले होते. मात्र राज्याचे हित त्यांच्याकडे सर्वतोपरी होते. त्यांच्या शासकीय नितीत कुठल्याही धर्माविषयी राग होता ना लोभ.
    इंग्रजांसारखा बलाढ्य शत्रु समोर असतांना कुठलाही राजा आपल्या प्रजेमध्ये भेदभाव करून घरातून स्वतःच्या विरूद्ध आव्हान उभे करणार नाही, एवढी साधी जाण टिपु सुलतान यांचा विरोध करणार्‍यांना नाही. ही दुःखाची बाब आहे. त्यांनी जर हिंदू मुस्लिमांमध्ये भेदभाव केला असता तर राज्यात तणाव निर्माण झाला असता. सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असता. मग सैनिक एकदिलाने इंग्रजांविरूद्ध कसे लढले असते? म्हणून एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांच्यावर लावण्यात आलेले जातीयवादाचे आरोप निखालस खोटे आहेत. त्यांच्या सैन्यांमध्ये हिंदू सैनिकांची संख्या मुस्लिम सैनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. ते जर जातीयवादी असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू सैनिकांनी त्यांना कधीच साथ दिली नसती. मुळात तलवारीच्या बळावर धर्मांतरण केले जाऊ शकते ही संकल्पनाच चुकीची आहे. असे करणे शक्य असते तर आज तर अनेक देशांकडे ए.के. 47 आहेत. त्याची भिती घालून अनेक देशांनी आपल्या मर्जीप्रमाणे जनतेचे धर्मांतरण करून घेतले असते. पण हे शक्य नाही. जेव्हा एके 47 ने अणुबॉम्बने धर्मांतरण शक्य नाही तर तलवारीने मग कसे शक्य होते? त्यांनी स्वतःच्या धर्माचा कधीही प्रशासनावर प्रभाव पडू दिला नाही. हे ही सत्य नाकारण्यासारखे नाही. त्यांच्या काळात अपवादात्मकरित्या काही लोकांनी इस्लाममध्ये धर्मांतरण केलेले होते हे सत्य आहे. पण ते स्वेच्छेने केलेले होते, जसे आजकाल होतात. पीयू रिसर्च सेंटरच्या अहवालाप्रममाणे आजही जगात रोज अडीच हजार लोक इस्लाम धर्मात प्रवेश करतात. इस्लामी विचारधारा, मुस्लिमांचे चारित्र्य, त्यांच्यातील चांगूलपणा इत्यादी गोष्टीमुळे प्रभावित होवून, तसेच राजाची मर्जी प्राप्त करण्यासाठी काही लोकांनी धर्मांतरण केले होते. पण धर्मांतरण करणे ही टिपू सुलतान यांची नीति कधीही नव्हती.
    इंग्रजांच्या शक्तीची पुरेपूर कल्पना असूनसुद्धा त्यांच्याविरूद्ध ठामपणे उभे राहणारे भारतभूमीचे ते एकमात्र सुपूत्र होते. 100 वर्षाच्या गिधाडाच्या जीवनापेक्षा एक दिवसाच्या सिंहाचे जीवन बेहतर हे त्यांचे वाक्य इतिहासात अजरामर झालेले आहे. त्यांच्या याच वाक्याने त्या काळात सैनिकांच्या आणि जनतेच्या मनामध्ये उत्साहाचा संचार घडविला होता. अवघे 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये या मर्द-ए-मुजाहिद (स्वातंत्र्य सैनिका) ने भारताच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवले आहे. इंग्रजांशी लढता-लढता 4 मे 1799 रोजी ते शहीद झाले. त्यांच्या पार्थिवाजवळ उभे राहून इंग्रजांच्या फौजेचा कमांडर जनरल जॉर्ज हॅरिस याने म्हंटले होते की, आज मी हिंदुस्थान जिंकला आहे. जनरल हॅरिसचे हे वाक्य या गोष्टीचा पुरावा आहे की, टिपु सुलतान हेच इंग्रजांच्या मार्गातील प्रमुख अडसर होते. भारत भूमीच्या अशा या वीर पुत्रास विनम्र आदरांजली. ज्यांना या स्वातंत्र्यसैनिकाच्या शहादतीची किंमत नाही त्यांनी खुशाल लॉर्ड कॉर्नवॉलिस जो त्या काळात कंपनी सरकारचा प्रमुख होता त्याची जयंती साजरी करावी.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget