मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा...
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा...
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा...
बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा...
वाझे नावाच्या कोणा दुय्यम दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचे ओझे गोविंदाग्रजांच्या स्वप्नातील राकट महाराष्ट्र देशाला पेलता न यावे हे भारतीय राजकारणाच्या अधःपतनाचे ताजे उदाहरण आहे. कोण हे वाझे? याचे उत्तर एव्हाना सर्वांनाच कळालेले आहे. ह्या आणि ह्याचसम वर्दीधारी मारेकऱ्यांनी देशभरात अनेक गुन्हेगारांची (?) हत्याकरून न्यायव्यवस्थेलाच आव्हान दिलेले आहे. या सर्व मारेकऱ्यांच्या पाठीमागे सर्वपक्षीय सरकारांचे समर्थन होते हे नग्ण सत्यही नाकारण्यात अर्थ नाही. जातीयवादाचा चष्मा बौद्धिक डोळ्यावर चढवला गेला की, ’आपल्या धर्मातील आपले मग ते कितीही वाईट असोत व दुसऱ्या धर्मातील वाईट मग ते कितीही चांगले असोत’ हे समीकरण मनात घट्ट होवून जाते. पोलीस अधिकारी असो का लष्करी अधिकारी. एकदा सत्तेच्या जवळ गेले की त्यांच्यातील शिस्त आपोआप लोप पावते हे सत्य वाझे व इतर सरकारमान्य मारेकऱ्यांपासून ते रोज 20 च्या सरासरीने स्वतःच्या नागरिकांचे मुडदे पाडणाऱ्या म्यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या वर्तनातून सिद्ध होते.
हे अधिकारी निरंकुश का होतात व आपल्या राजकीय मानसपित्यांसाठी वाट्टेल ते करण्याचे धाडस का करतात? या प्रश्नाचे उत्तर दोघांचेही नैतिक अधःपतन हेच आहे. आता प्रश्न उरतो तो हा की, हे अधःपतन का होते? तर त्याचे उत्तर हे की, हे लोक स्वतःला निरंकुश समजतात, जिवंतपणे व मरणोपरांत आपल्या कृत्याचा हिशोब द्यावा लागेल, या संकल्पनेपासून कित्येक योजने लांब असतात.
मुळात आपल्या लक्षातच येत नाही की, ज्या गोष्टी आपल्या सभोवताली घडतात त्याला प्रामुख्याने तीन घटक कारणीभूत असतात. एक - आपण निवडलेली श्रद्धा (जीवनपद्धती), दोन- आपण निवडलेले मित्र व सहकारी, तीन - आपण निवडलेली राजकारणाची पद्धत व राजनेते. जीवनपद्धती जर स्पष्ट, सहज आणि पवित्र असेल तर लोकांचे वैयक्तिक जीवन यशस्वी होते. मित्र चांगले निवडले तर जीवन सुसह्य होते आणि राजनेते चांगले निवडले तर प्रगती चांगली होते. या तीन घटकांपैकी आपण तिसऱ्या घटकांसंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत.
भारतीय राजकारणाची उत्तरोत्तर होणारी दुरवस्था काही लपलेली गोष्ट नाही. स्वातंत्र्यापूर्वीच्या राजकीय नेत्यांचे चारित्र्य आणि त्यानंतर आलेल्या राजकीय नेत्यांचे चारित्र्य यांची तुलना केली तर एक गोष्ट स्पष्ट होते की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या नेत्यांच्या चारित्र्याचा आलेख दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. स्वातंत्र्यांनतर आलेली सर्व सरकारे आणि बहुतेक नेते भ्रष्ट आहेत. भ्रष्टाचाराचा हा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. या राजकीय दुरवस्थेचे मूळ अपात्र लोकांना मताधिकार दिल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात आहे. आपली तब्येत बिघडली तर आपल्याला तज्ञ डॉ्नटर लागतो, घर बांधावयाचे असल्यास तज्ञ वास्तुविशारद लागतो, कोर्टात केस लढवायची असल्यास तज्ञ वकील लागतो मात्र देश चालवायला कुठलीच पात्रता लागत नाही, हे राजकारणाच्या अधःपतनाचे दूसरे कारण आहे. खरे तर देश चालविणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ लोक निवडून देणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे. मात्र एक खर्जुली कोंबडी, देशी दारूचा एक पव्वा व सोबत पाचशे रूपयाची नोट यावर मतदार जर विकले जात असतील तर ज्या लायकीचे नेते निवडले जातील व निवडून आल्यावर ते जे करतील तेच आज कमी अधिक प्रमाणात देशात होत आहे.
महत्प्रयासाने व लाखो लोकांच्या बलीदानाने मिळालेल्या या स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी लोकशाही प्रगल्भ करण्याच्या दिशेने नेत्यांचे व मतदारांचे जे प्रशिक्षण व समुपदेशन करणे गरजेचे होते त्याकडे लक्ष दिले गेले नसल्याकारणाने आज खालपासून वरपर्यंत राजकीय भ्रष्टाचाराने थैमान घातलेले आहे. ज्या प्रमाणात व आकारात राजकीय भ्रष्टाचार होत आहे तो देशाला गरीबीच्या खाईत लोटण्यासाठी पुरेसा आहे. आणि हेच कारण आहे की स्वातंत्र्यानंतर उत्तरोत्तर देशातील गरीबी वाढत आहे. नेत्यांचे भ्रष्ट आचरण ही देशाची प्रमुख समस्या आहे. हे कमी की काय म्हणून त्यांच्यातील अनेकांची नितीमत्ताही दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे, हे सत्य नयना सहानी पासून ते पूजा चव्हाण पर्यंत नेत्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक महिलांच्या गेलेल्या बळीतून सिद्ध झालेले आहे.
कोणत्याही समाजाची तीन प्रमुख शक्तीस्थळे असतात. 1. राजसत्ता 2. अर्थसत्ता 3. ज्ञानसत्ता. आणि ही शक्तीस्थळे कोणत्या व्यक्ती आणि समुहाच्या हाती आहेत यावर त्या समाजाची प्रगती अवलंबून असते. या तीनी शक्तीस्थळांवर आपल्या देशात भ्रष्ट लोकांचे नियंत्रण आहे हे सत्य कोणालाही नाकारता येण्यासारखे नाही. म्हणूनच शिक्षण, चिकित्सा, अर्थव्यवस्था आणि राजकारण हे गरीबांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. यात शक्तीस्थळांवर दुष्ट, बदमाश आणि लुटारूवृत्तीचे लोक (अपवाद खेरीज करून) विराजमान झालेले आहेत. ब्रिटिश संसदेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यासंबंधीची चर्चा जेव्हा टिपेला गेली होती तेव्हा त्याला विरोध करतांना ब्रिटिश संसदेमध्ये स्वातंत्र्याच्या अवघ्या पाच महिन्यापूर्वी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल याने जे म्हटले होते आणि ज्याचा पुनर्रउल्लेख न्यायमूर्ती मार्कडेंय काटजू यांनी जानेवारी 2015 मध्ये केला होता ते म्हणने भारतीय राज्यकर्त्यांनी तंतोतंत खरे ठरविले आहे. चर्चिल म्हणाले होते, ’’भारताला स्वातंत्र्य दिल्यास सत्ता दुष्ट, बदमाश आणि लुटारूंच्या हाती जाईल. भविष्यातील सर्व नेते निम्न क्षमतेचे आणि भुस्कटासारखे असतील. त्यांची जीभ जरूर गोड असेल मात्र त्यांची मनं कठोर असतील. ते सत्तेसाठी एकमेकांशीच भांडतील आणि एकदिवस असा येईल की भारतात वाऱ्यावर आणि पाण्यावर सुद्धा कर लावला जाईल.’’
अशा नेत्यांमुळे स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा ऱ्हास एवढ्या तीव्र गतीने झाला यात आश्चर्य ते कोणते? बरे ! जनतेने पक्ष बदलूनही पाहिले. काँग्रेस, भाजपाच नव्हे तर इतर अनेक प्रादेशिक पक्ष या सर्वांना संधी देवून पाहिली. परंतु कोणताही पक्ष जनकल्याणासाठी समर्पित नाही, हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. यासाठी नेेते आणि त्यांना निवडणारे लोक दोघेही सारखेच जबाबदार आहेत. प्रचलित व्यवस्थेमध्ये चांगली माणसं निवडून येवूच शकत नाहीत, याला शेवटी जनताच जबाबदार आहे. भारतीय राजकारणाने देशाची अशी अवस्था करून टाकलेली आहे की, लोकांना आनंदाने जगता येणे तर सोडा सन्मानाने मरताही येत नाही. झाडावर लटकून शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, एवढी दारून परिस्थिती निर्माण झालेली आहे. हजारो आत्महत्या होवूनही गेंड्याच्या कातडीच्या बहुतेक नेत्यांना याचे काहीच वाटत नाही, याचेच आश्चर्य वाटते. भारतीय राजकारणाने संवेदनहीन समाज निर्माण केलेला आहे. गरीबांच्या दुःखाची श्रीमंतांना जाणीव नाही. मुलभूत सुविधा ग्रामीण आणि नागरी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत.
भारतीय राजकारणाच्या अधःपतनाचे तीसरे कारण यात झालेला जातीयवादाचा शिरकाव आहे. भारतीय प्रतिनिधीत्वाचा कायदा 1957 अन्वये कोणताही पक्ष धर्माच्या आधारे मतं मागू शकत नाही. वाचकांना आठवत असेल की मागील शतकाच्या आणि 70 आणि 80 च्या दशकात शिवसेनेसह अनेक खासदारांच्या खासदारक्या निवडून आल्यानंतरही उच्च न्यायालयाकडून याच कारणाने रद्द ठरविल्या गेल्या होत्या. मात्र लवकरच जातीयवादी राजकारण्यांनी भ्रष्ट वकिलांच्या सहकार्याने कोर्टाकडून असे निर्णय येणार नाहीत, याची व्यवस्था करवून घेतली. निवडणूक आयोगानेही या संदर्भात आपली जबाबदारी (टी.एन. शेषन यांचा अपवाद खेरीज करून) खंबीरपणे पार पाडली नाही. परिणामी आज जनहिताच्या मुद्यांऐवजी धार्मिक मुद्यांवर निवडणुका जिंकल्या जातात व त्यातून अपात्र नेते निवडून येतात. आज भारतीय राजकारणाची अवस्था अशी आहे की, बहुतेक नेत्यांकडे नैतिक मुल्यही नाहीत, नीतीही नाही आणि चांगली नियतही नाही. पक्ष बदलून उपयोग नाही, नेते बदलून उपयोग नाही, मात्र मुळापासून राजकारणात सकारात्मक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. जबाबदार नागरिकांना हे जरी कळत नसले तरी भारतीय मुस्लिमांशिवाय, दुसऱ्या कोणाकडेच हे अमुलाग्र परिवर्तन कसे करावे, याचा रोडमॅप नाही. मुस्लिमांचे सौभाग्य आहे की, त्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याचा रोडमॅपच नाही तर अशा परिवर्तनाचे एक यशस्वी मॉडेलही त्यांच्याकडे प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि मदीना येथे त्यांनी केलेल्या व्यवस्था परिवर्तनाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने मुल्याधारित राजकारणाचा परिचय भारतीय मुस्लिमांनी करून दिल्यास भ्रष्ट राजकारणाच्या घुप्प अंधारात ती एक प्रकाशाची किरण ठरेल यात किमान मलातरी शंका नाही. ही मुस्लिमांची दुहेरी जबाबदारी आहे. एक धार्मिक तर दूसरी राष्ट्रीय. परंतु त्यांच्याकडून एवढी मोठी अपेक्षा करण्यापूर्वी त्यांचे सध्याचे राजकारण कसे आहे? हे अगोदर पाहू व त्यानंतर ते कसे असायला हवे यावर चर्चा करू.
भारतीय मुस्लिमांचे राजकारण
भारतीय मुस्लिमांचे स्वतंत्र असे राजकारण कधीच राहिले नाही. ते स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये विभाजीत होते. स्वातंत्र्यानंतरही ते तसेच विभागलेले आहे. कथित धर्मनिरपेक्ष (?) पक्ष आणि मुस्लिमांचे राजकारण करणारे पक्ष अशी ही विभागणी आहे. धर्मनिरपेक्ष पक्षात काँग्रेस सहीत बीएसपी, स.पा., आप इत्यादी पक्षांना मुस्लिमांचे मोठे समर्थन प्राप्त आहे. तर मुस्लिम लीग, मजलिस, पीस पार्टी आणि युडीएफ अशा मुस्लिम राजकारण करणाऱ्या पक्षांकडे ही मुस्लिमांचा छोटासा गट आकर्षित झालेला आहे. शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाल्यास मुस्लिमांनी सुद्धा अनेकवेळा भाकरी फिरवून पाहिली पण प्रत्येकवेळा त्यांची भाकरी करपली. कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षांने प्रामाणिकपणे त्यांची साथ दिली नाही. किंबहुना हिंदुत्ववादी पक्षांच्या तुलनेत धर्मनिरपेक्ष पक्षांनीच मुस्लिमांचे अधिक नुकसान केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मुस्लिमांचे राजकारण करणाऱ्या पक्षांना सुद्धा फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मुस्लिम बहुल भागापुरतेच त्यांचे राजकारण मर्यादित राहिल्याने त्यांचे यशही मर्यादित राहिलेले आहे. म्हणून राष्ट्रीय राजकारणावर त्यांना आपला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. एकंदरित परिस्थिती अशी आहे की, धर्मनिरपेक्ष पक्ष, मुस्लिमांचे पक्ष आणि काही प्रमाणात हिंदुत्ववादी पक्ष यामध्ये मुस्लिम मतदार विभागले गेलेले आहेत. म्हणून 72 वर्षाच्या मुस्लिम राजकारणाचा गोषवारा पाहता मुस्लिमांच्या वाट्याला निराशाच जास्त आलेली आहे व ती येणे स्वाभाविक आहे.
मुस्लिमांची राजकीय कोंडी
प्रत्येक राजकीय पक्षाने 20 कोटींपेक्षा जास्त संख्येने असलेल्या मुस्लिमांची दखल घेऊ नये हे सहज घडत असेल असे ज्याला वाटत असेल त्याला वाटो पण मला खात्री आहे की सहज घडत नाहीये. यामागे ईश्वरीय इच्छा आहे. मुद्दामहून या लोकसमुहाला दंडित करण्याचा ईश्वरीय मन्सुबा असावा, असे समजण्यास भरपूर वाव आहे. कारण की या समुहाला जी पैगंबरीय जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडण्यास हा समूह असमर्थ ठरत आहे. आता प्रश्न हा आहे की ती जबाबदारी कोणती? तर कुरआन त्याचे स्पष्ट उत्तर देतो की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.’’ (सुरे आलेइम्रान आयत नं.110)
स्पष्ट आहे, वर प्रमाणे भारतीय मुस्लिमांना सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यात बहुतेक मुस्लिम अयशस्वी ठरलेले आहेत. किंबहुना ते स्वतः वाममार्गाला लागलेले आहेत. असे कोणते वाईट वर्तन नाही की जे भारतीय मुस्लिमांमध्ये नाही, याचा विचार ज्याचा त्यांनी करावा. कुरआनमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यात ईश्वरीय आदेशाची अवहेलना करणाऱ्या अनेक लोकसमुहांना जबर शिक्षा करण्यात आलेली आहे. बनी इस्राईल नावाचा ईश्वराचा एक लाडका जनसमुह होता. इतका लाडका की, त्यांना ’रिज्क’ (अन्न) कमवावे लागत नसे. ते थेट आकाशातून (मन-सलवा) जमीनीवर अवतरित होत असे. त्या समुहाने जेव्हा ईश्वरीय आज्ञेचा अव्हेर सुरू केला तेव्हा ईश्वराने त्यांचे काय हाल केले, याचे सविस्तर वर्णन कुरआनमध्ये अनेक पानांवर पसरलेले आहे. भारतीय मुस्लिम सुद्धा तीच चूक करत आहेत जी बनी इसराईलने केली होती. म्हणून एवढ्या मोठ्या जनसमुहाची कोंडी झालेली आहे. ही ईश्वरीय कोंडी आहे. ही तेव्हाच फुटू शकेल जेव्हा भारतीय मुस्लिम हे ईश्वराच्या आदेशाचे मनापासून पालन सुरू करतील व व्यवहारात नैतिकता आणतील आणि मुल्याधारित राजकारण करून जनतेसमोर खरे राजकारण कसे असते याचे उदाहरण प्रस्तुत करतील. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, आम्हा भारतीय मुस्लिमांना नैतिक राजकारण करण्याची समज आणि शक्ती दे. आमच्या हातून या प्रिय भारत देशाची सेवा घडू दे. आमीन.
- एम.आय.शेख
Post a Comment