(१३) हे या कारणास्तव की या लोकांनी अल्लाह व त्याच्या पैगंबरांचा विरोध केला, आणि जो अल्लाह व त्याच्या पैगंबराचा विरोध करतो, अल्लाह त्याच्यासाठी अत्यंत कठोर पकड करणारा आहे.११
(१४) ही आहे१२ तुम्हा लोकांची शिक्षा, आता याचा आस्वाद घ्या, आणि तुम्हाला माहीत व्हावे की सत्याचा इन्कार करणाऱ्यांसाठी नरकाची यातना आहे.
(१५) हे श्रद्धावंतांनो, जर तुमची एक लष्कराच्या रूपात शत्रूंशी (काफिर) गाठ पडली तर त्यांच्या मुकाबल्यात पाठ दाखवू नका.
(१६) ज्यांनी अशा प्रसंगी पाठ दाखविली - याव्यतिरिक्त की युद्धाचा पवित्रा म्हणून अथवा एखाद्या दुसऱ्या फौजेस जाऊन मिळण्यासाठी - तर तो अल्लाहच्या कोपात वेढला जाईल. त्याचे ठिकाण नरक असेल, आणि ते अत्यंत वाईट परतण्याचे ठिकाण आहे.१३
(१७) तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही त्यांना ठार केले नाही तर अल्लाहने त्यांना ठार केले, आणि हे पैगंबर (स.)! तू फेकले नाहीस तर अल्लाहने फेकले.१४ (आणि श्रद्धावंतांचे हात जे या कार्यात वापरले गेले) तर हे अशासाठी होते की अल्लाहने श्रद्धावंतांना एका उत्तम परीक्षेतून यशस्वीपणे पार पाडावे. खचितच अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.
(१८) असा व्यवहार तर तुमच्याशी आहे आणि विरोधकांशी (काफिर) व्यवहार असा आहे की अल्लाह त्यांची कारस्थाने निष्प्रभ करणारा आहे.
(१९) (या काफिरांना सांगा), ‘‘ज्याअर्थी तुम्हाला निर्णय हवा होता तर घ्या, निर्णय तुमच्यासमोर आलेला आहे.१५आता परावृत्त व्हा, हे तुमच्याचसाठी उत्तम आहे, अन्यथा पुन्हा परतून त्याच मूर्खपणाची तुम्ही पुनरावृत्ती केली तर आम्हीदेखील त्याच शिक्षेची पुनरावृत्ती करू व तुमचा जमाव मग तो कितीही मोठा असो तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही. अल्लाह श्रद्धावंतांच्या समवेत आहे.’’
(२०) हे श्रद्धावंतांनो! अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करा. आणि आज्ञा ऐकल्यानंतर तिच्यापासून पराङ्मुख होऊ नका.
(२१) त्या लोकांसमान होऊ नका ज्यांनी म्हटले की आम्ही ऐकले; वास्तविक ते काही ऐकत नाहीत.१६
(२२) नि:संशय अल्लाहजवळ सर्वात वाईट प्रकारची जनावरे बहिरे व मुके ते लोक आहेत१७ जे बुद्धीचा उपयोग करीत नाहीत.
(२३) जर अल्लाहला माहीत असते की त्यांच्यात थोडादेखील चांगुलपणा आहे तर त्याने जरूर त्यांना ऐकण्याची सद्बुद्धी दिली असती. (परंतु चांगुलपणाविना) जर त्याने त्यांना ऐकविले असते तर त्यांनी विमुखतेने पाठ फिरविली असती.१८
(२४) हे श्रद्धावंतांनो! तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या हाकेला प्रतिसाद द्या जेव्हा की पैगंबराने तुम्हाला अशा गोष्टीकडे बोलवावे जी तुम्हाला जीवन प्रदान करणारी असेल. आणि लक्षात ठेवा, अल्लाह मनुष्य व त्याच्या हृदयाच्या दरम्यान आड बनून आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्र केले जाल.१९
(२५) आणि सावध राहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम प्रामुख्याने फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही ज्यांनी तुम्हापैकी पाप केलेले असेल२० आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.
११) येथपर्यंत बदर युद्धातील एकएक घटनेला स्मरण करून सांगितले गेले आहे. याचा वास्तविक उद्देश शब्द `अनफाल' ची सार्थकता स्पष्ट करणे आहे. प्रारंभी सांगितले गेले होते की युद्धसंपत्तीला आपल्या वीरतेचा परिणाम समजून त्याचे मालक कोठे बनले जात आहात. ही तर अल्लाहची देन आहे आणि दाता स्वत: आपल्या संपत्तीचा मालक आहे. याच्या पुराव्यात त्या घटनांचे स्मरण करून देण्यात आले आहे की या विजयात तुम्ही स्वत: हिशोब लावून पाहावे की तुमची मेहनत, वीरता आणि धाडसाचा किती भाग होता आणि अल्लाहच्या कृपेचा किती वाटा होता. म्हणून युद्धसंपत्ती वाटपाचे निर्णय घेणे अल्लाहचे काम आहे तुमचे नव्हे.
१२) या वाक्यात कुरैश शत्रूंना संबोधित करण्यात आले आहे. कुरैशचा बदरच्या युद्धात पराजय झाला होता आणि ते शिक्षेस पात्र असण्याचा वरील वाक्यात उल्लेख आला आहे.
१३) शत्रूच्या जबरदस्त दबावानंतर व्यवस्थितपणे मागे हटणे अवैध नाही जर याचा उद्देश आपल्या मागील केंद्राकडे वळणे किंवा आपल्या सैन्याच्या दुसऱ्या तुकडीशी जाऊन मिळणे असेल. जे अवैध (हराम) केले आहे ते म्हणजे गोंधळ, भगदड माजविणे आहे जे सैनिकी उद्देशासाठी नव्हे तर भीतीपोटी आणि पराजित भावनेने होते. या स्थितीत पळपुट्या माणसाला आपल्या ध्येयापेक्षा स्वत:चा जीव प्रिय असतो. या पळपुटेपणाला महापाप म्हटले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात की तीन पाप असे आहेत की ज्याच्याबरोबरीने नेकी (सदाचार) फायदेशीर ठरत नाही. एक शिर्वâ (अनेकेश्वरत्व) दुसरे म्हणजे आईवडिलांचे हक्क मारणे आणि तिसरे अल्लाहच्या मार्गात होणाऱ्या युद्धातून पळ काढणे. आणखी एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आणखी सात मोठ्या पापांचा उल्लेख केला आहे. जे मनुष्यासाठी विनाशक आणि परलोकातसुद्धा विनाशकारी ठरतात. त्यांच्यापैकी एक म्हणजे मनुष्य कुफ्र आणि इस्लामच्या युद्धात शत्रूसमोर पळ काढतो. याला मोठे पाप म्हणण्याचे कारण हे नाही की हे एक डरपोक कार्य आहे. याचे कारण आहे की हे एका माणसाची पळपुटेपणा कधी कधी सर्व सैन्याला पळण्यास बाध्य करतो. एकदा एखाद्या सैन्यात भगदड माजली तर विनाश कल्पनेपलिकडे होतो. ही भगदड सेनेसाठीच नव्हे तर देशासाठीसुद्धा विनाशकारी ठरते.
१४) बदर युद्धात मुस्लिम आणि इस्लाम शत्रूंचे सैन्य समोरासमोर आले आणि युद्ध सुरु होण्याची वेळ आली तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मूठभर वाळू हातात घेऊन ``शाहतिलवजूह'' म्हणजे त्यांचे चेहरे काळे पडोत म्हणत शत्रूकडे फेकली. यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आदेशावरुन मुस्लिम सैन्य एकसाथ शत्रूवर तुटून पडले. याच घटनेकडे हा संकेत आहे. म्हणजे हात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा होता परंतु प्रहार अल्लाहकडून होता.
१५) मक्का येथून निघताना कुरैशच्या अनेकेश्वरवादींनी काबागृहाचा पडदा हातात धरून प्रार्थना केली, ``हे प्रभु! दोन्ही गटातून जो चांगला आहे त्याला विजयी कर.'' अबू जहल म्हणाला होता, ``हे प्रभु! आमच्यापैकी जो सत्यावर असेल त्याला विजयी कर आणि जो असत्यावर असेल त्याला पराजित कर.'' अल्लाहने त्यांनी मागितलेली प्रार्थना शब्दश: पूर्ण केली आणि निर्णय करून दाखविला की दोघांपैकी कोण चांगला आहे आणि सत्यावर आहे.
१६) येथे ऐकणे याचा अर्थ जो मान्य करणे आणि स्वीकार करण्याच्या अर्थाने होतो. संकेत त्या दांभिकांकडे आहे जे ईमानला स्वीकार तर करतात परंतु आदेशांच्या पालनासाठी तोंड फिरवितात.
१७) म्हणजे जे सत्य ऐकत नाहीत की सत्य बोलत नाहीत. त्यांचे कान आणि तोंड सत्यासाठी बहिरे आणि मुके आहेत.
१८) म्हणजे या लोकांत स्वत: सत्यवादिता आणि सत्यासाठी काम करण्याची भावना नाही. अशा स्थितीत युद्धासाठी निघण्याचे सौभाग्य यांना प्राप्त् जरी झाले असते तर हे संकटाला पाहून त्वरित रणांगण सोडून गेले असते. अशा स्थितीत यांचा तुम्हाला लाभ तर सोडा परंतु हानिकारक साथ ठरली असती.
१९) दांभिकता (कपटाचारी) पद्धतीपासून मनुष्याला वाचविण्यासाठी सर्वाधिक प्रभावी उपाय म्हणजे दोन धारणा मनुष्याच्या मनात रूजविले जावेत. एक म्हणजे अल्लाहवरील दृढ विश्वास. अल्लाह मनातील सर्वकाही जाणतो. तो माणसाच्या मनातील इच्छा, स्वार्थ, उद्देश, विचार जो मनुष्य लपवितो त्यांनासुद्धा अल्लाह जाणतो. दुसरे म्हणजे सर्वांना अल्लाहसमोर हजर व्हायचे आहे. अल्लाहशी पळून कोठेही तुम्ही जाऊ शकत नाही. या दोन्ही धारणा जितके अधिक दृढ होतील तेवढ्या प्रमाणात मनुष्य दांभिकतेपासून दूर राहील. म्हणून दांभिकतेविरुद्ध उपदेश करताना कुरआन या दोन धारणांचा उल्लेख नेहमी करतो.
२०) म्हणजे तो सामुदायिक बिघाड (फितना) आहे जो महामारीप्रमाणे फैलावतो. त्यात फक्त पापी लोकच सापडत नाही तर ते लोकसुद्धा मारले जातात जे पापी समाजात राहतात. उदाहरणस्वरुप शहरात घाण काही ठिकाणी असते त्याचा प्रभाव सीमित असतो, परंतु जेव्हा ही घाण पसरत जाते आणि शहरात साफसफाई करण्यास कोणीही पुढे येत नाही तेव्हा अशा स्थितीत वायु, जल, धरती अशा प्रत्येक ठिकाणी विषाणू फैलावतो व शहरात महामारी सुरु होते. याच्या प्रभावाखाली घाण फैलावणारे, घाण राहाणारे आणि घाणीत जीवन व्यतीत करणारे सर्वजण येतात. अशाच प्रकारे नैतिक घाणींची स्थिती आहे. ही नैतिक घाण (अनैतिकता) काही लोकांत विद्यमान असेल तर त्याचा परिणाम काही काळ सीमित असतो. परंतु जेव्हा समाजमन दुर्बल बनते तेव्हा नैतिक दोषांना दाबून ठेवण्याची क्षमता त्यात नसते. तेव्हा अशा स्थितीत समाजातील दुष्ट, निर्लज्ज आणि दुराचारी लोक आपल्या मनाच्या घाणीला सार्वत्रिक करतात. अशा वेळी चांगले लोक आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाने आपल्या व्यक्तिगत चांगल्या स्थितीला सर्वकाही समजून असतात आणि सामुदायिक दुष्टतेवर गप्प राहातात. परिणामत: पूर्ण समाजात बिघाड फैलावतो त्यात सर्वजण घेरले जातात. म्हणून अल्लाहच्या कथनाचा उद्देश आहे की पैगंबर मुहम्मद (स.) ज्या सुधारकार्यासाठी उठले आहेत आणि तुम्हाला मदतीचा हाथ पुढे करण्यास सांगत आहेत, त्यात वास्तविकपणे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनात तुमच्यासाठी जीवन आहे. यात मनापासून निष्ठापूर्वक तुम्ही भाग घेतला नाही आणि समाजात फैलावलेल्या दुष्टतेला सहन करीत राहिले तर सार्वजनिक बिघाड निर्माण होतो. या सार्वजनिक बिघाडाच्या लपेटामध्ये समाजातील सर्वजण येतात. अशा स्थितीत सदाचारी लोक तुमच्यात विद्यमान असतील आणि त्यांनी समाजात दुष्टता फैलावण्याचे काम केले नसेल आणि आपल्या वैयक्तिक जीवनात सदाचार केला असेल ते सर्व बिघाडाच्या महामारीत सापडतात, कुरआनने सूरह ७ आयत १६३-१६६ मध्ये शनिवार वाले यांचे ऐतिहासिक उदाहरण याच प्रकारचे दिले आणि वर्णन केले. या दृष्टिकोनास इस्लामचा सुधारात्मक युद्धाचा मूळ सिद्धान्त म्हटले जावू शकते.
Post a Comment