Halloween Costume ideas 2015

सूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)


(१) अलिफ लाऽऽम रा. ही त्या ग्रंथाची वचने आहेत जी विवेक व बोधपूर्ण आहेत. 

(२) लोकांकरिता ही एक अजब गोष्ट झाली काय की आम्ही खुद्द त्यांच्यातीलच एका माणसावर दिव्य प्रकटन (वह्य) पाठविले, की (गफलतीत पडलेल्या) लोकांना सावध करावे, आणि जे श्रद्धा ठेवतील त्यांना शुभवार्ता द्यावी की त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकत्र्याजवळ खराखुरा मानसन्मान व प्रतिष्ठा आहे? (यावर) इन्कार करणाऱ्यांनी म्हटले की ही व्यक्ती तर उघडपणे - जादूगार आहे.

(३) वस्तुस्थिती तर अशी आहे की तुमचा पालनकर्ता तोच अल्लाह आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले, मग राजसिंहासनावर विराजमान होऊन सृष्टीची व्यवस्था चालवीत आहे. कोणीही शिफारस करणारा नाही त्याच्या परवानगीशिवाय. हाच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे, म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती (इबादत) करा. मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही? 

(४) त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परतावयाचे आहे, हे अल्लाहचे पक्के वचन आहे. नि:संशय निर्मितीचा प्रारंभ तोच करतो, मग तोच दुसऱ्यांदा निर्माण करील, जेणेकरून ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी सत्कृत्ये केली त्यांना न्यायपूर्ण मोबदला द्यावा, आणि ज्यांनी इन्कार करण्याची पद्धत अवलंबिली त्यांनी उकळते पाणी प्यावे व दु:खदायक शिक्षा भोगावी, सत्याच्या त्या इन्कारापायी जे ते करीत राहिले.१०

(५) तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही त्यापासून वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. अल्लाहने हे सर्वकाही सत्याधिष्ठित निर्माण केलेले आहे. तो आपले संकेत उघड करून करून प्रस्तुत करीत आहे त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. 

(६) नि:संशय रात्र व दिवसाच्या आलटून पालटून येण्यात व त्या प्रत्येक वस्तूमध्ये जी अल्लाहने पृथ्वी व आकाशांत निर्माण केली आहे त्या लोकांकरिता संकेत आहेत जे (चुकीची दृष्टी व चालीपासून) दूर राहू इच्छितात.११



१) अज्ञानी लोक हे समजत होते की पैगंबर (स.) कुरआनच्या नावाने जी वाणी त्यांना ऐकवत आहे, ती केवळ भाषेची जादूगरी आहे. तसेच ती काव्यकल्पनेची भरारी आहे आणि ज्योतिषासारखे वरील जगाचे कथन आहे. यावर त्यांना चेतावनी दिली जात आहे की ज्याचे तुम्ही अनुमान करीत आहात, ते हे नाहीत. या तर तत्त्वदर्शी ग्रंथाच्या आयती आहेत. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष पुरविणार नसाल तर तत्त्वदर्शिता आणि ज्ञानापासून तुम्ही वंचित राहाल.

२) म्हणजे यात विचित्र असे काय आहे? माणसांना सचेत करण्यासाठी माणूस नियुक्त न करता देवदूत, जिन्न किंवा पशुंना नियुक्त केले असते? विचित्र हे आहे की  त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे किंवा त्यांच्या (वास्तविकतेपासून गाफील माणसांना) मार्गदर्शनाची काही व्यवस्था त्याने करावी? तसेच अल्लाहकडून मार्गदर्शन आले तर ज्यांनी त्याला स्वीकारले त्यांच्यासाठी मान सन्मान आणि सफलता असावी की त्या नाकारणाऱ्यांसाठी?

३) पैगंबर (स.) यांना जादूगार ते या अर्थाने म्हणत होते की जो कोणी कुरआन ऐकून आणि आपल्या प्रचाराने प्रभावित होऊन ईमानधारक बनत असे, तो जीवावर खेळण्यासाठी जगाशी संबंध तोडण्यास आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यास तयार होत असे. जादूगाराचा आरोप त्यांनी लावला खरा परंतु त्यांनी विचार केलाच नव्हता की तो आरोप चपखल बसतो की नाही? एक व्यक्ती माणसांच्या मनाला आणि बुद्धीला आपल्या उच्च्तम वक्तव्याने वशीभूत करतो म्हणून त्यावर जादूगार असण्याचा आरोप लावणे  अयोग्य  आहे. याऐवजी  त्यांनी  हा  विचार  केला  पाहिजे  की  या वक्तव्यांत पैगंबर मुहम्मद (स.) काय म्हणतात आणि कोणत्या उद्देशासाठी भाषण शक्तीचा वापर पैगंबर मुहम्मद (स.) करत आहेत. तसेच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उच्च्तम वक्तव्याने जो प्रभाव ईमानधारण करणाऱ्यांवर पडत आहे, तो कशाप्रकारचा प्रभाव आहे? तुम्ही पाहात आहात की पैगंबर मुहम्मद (स.) जी वाणी प्रस्तुत करीत आहे त्यात बुद्धिमत्ता आहे, विचार करण्याची एक संतुलित व्यवस्था आहे. तसेच उच्च्श्रेणीचे संतुलन आणि सत्याची अनिवार्यता आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या भाषणात अल्लाहच्या सृष्टीत सुधारणा करण्याच्या उद्देशाला सोडून इतर कोणताच उद्देश तुम्हाला सापडणार नाही. पैगंबर मुहम्मद (स.) फक्त हाच एकमेव विचार करतात की लोकांनी चुकीच्या मार्गाला सोडून कल्याणकारी मार्गाचा स्वीकार करावा. त्यांच्या भाषणाचा प्रभाव ज्यांच्यावर पडला आहे, त्यांचे कल्याणच झाले आहे. आता तुम्ही स्वत: विचार करा काय जादूगार असेच सांगतात आणि त्यांच्या जादूचा असाच परिणाम होतो?

४) म्हणजे निर्माण करून ईश्वर (निर्माणकर्ता) निष्क्रिय बनला नाही तर आपल्या निर्माण केलेल्या सृष्टीच्या राजसिंहासनावर स्वयंभू विराजमान आहे. सर्व जगाचे प्रबंध आता ईश्वराच्याच हातात आहे. (पाहा सूरह ७, टीप ४०-४१)

५) म्हणजे जगाची व्यवस्था आणि प्रबंधामध्ये इतरांचे हस्तक्षेप तर दूरची गोष्ट आहे. एखाद्याला हासुद्धा अधिकार नाही की अल्लाहशी शिफारस करून त्याचा निर्णय बदलावा किंवा एखाद्याचे भाग्य उजळवावे किंवा नष्ट करावे. फार काही एखादा करू शकतो ते म्हणजे तो अल्लाहशी प्र्रार्थना करू शकतो. परंतु त्याची प्रार्थना स्वीकारणे अथवा अमान्य करणे सर्वस्वी अल्लाहच्या मर्जीवर अवलंबून आहे.

६) म्हणजे ही वास्तविकता आहे की सृष्टीचा पूर्णत: पालनहार अल्लाहच आहे तर त्याची अपेक्षा आहे की तुम्ही त्याचीच उपासना करावी. अरबीतील शब्द `रब' मध्ये तीन अर्थ सम्मीलीत आहेत. एक म्हणजे निर्माणकर्ता स्वामी, दुसरा पालनकर्ता आणि तिसरा अर्थ शासनकर्ता आहे. याचप्रमाणे `इबादत' या शब्दामध्ये तीन अर्थ सम्मीलीत आहेत. म्हणजे उपासना, गुलामी (दासता) आणि आज्ञापालन.

(१) एकमेव अल्लाह, पालनकर्ता आहे. याचा अर्थ होतो की मनुष्याने फक्त अल्लाहचेच कृतज्ञ बनून राहिले पाहिजे. अल्लाहशीच फक्त प्रार्थना करावी आणि त्याच्याच पुढे प्रेमाने आणि श्रद्धाशीलतेने झुकावे. उपासनेचा हा पहिला अर्थ आहे.

(२) एकमेव अल्लाह, निर्माणकर्ता स्वामी आणि मालक आहे. याचा अर्थ होतो की मनुष्याने अल्लाहचाच गुलाम आणि दास बनून राहावे. इबादत (उपासना) चा हा दुसरा अर्थ आहे.

(३) एकमेव अल्लाह शासनकर्ता आहे म्हणजे मनुष्याने त्याच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे. मनुष्याने स्वत:चा शासक बनू नये किंवा अल्लाहशिवाय दुसऱ्या कुणाची प्रभुता (सार्वभौमत्व) स्वीकारू नये. इबादत (उपासना) चा हा तिसरा अर्थ आहे.

७) म्हणजे वास्तविकतेच्या या खुलाशानेसुद्धा तुमचे डोळे उघडणार नाहीत? काय तुम्ही याच गैरसमजुतीत पडून राहाल ज्यांच्या आधारावर तुमचे जीवनव्यवहार आतापर्यंत सत्याविरुद्ध आहेत?

८) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीचा हा दुसरा मूलभूत सिद्धान्त आहे. पहिला मूलभूत सिद्धान्त म्हणजे तुमचा `रब' (निर्माणकर्ता स्वामी, पालनकर्ता आणि शासनकर्ता) केवळ अल्लाह आहे. म्हणून त्याचीच उपासना, गुलामी आणि आज्ञापालन (इबादत) करा आणि दुसरा सिद्धान्त म्हणजे तुम्हाला या जगातून परत जाऊन आपल्या `रब' पुढे पूर्ण जीवनव्यवहाराचा हिशेब द्यावा लागणार आहे. 

९) हे वाक्य दावा आणि प्रमाण दोघांचा योग आहे. दावा आहे की अल्लाह दुसऱ्यांदा मनुष्याला जन्म देईल. याचे प्रमाण म्हणजे अल्लाहनेच मनुष्याला पहिल्यांदा निर्माण केले. जो मनुष्य स्वीकार करतो की अल्लाहने ब्रम्हांड निर्माण केले आहे तो मनुष्य हे असंभव कसे समजेल की अल्लाह या सृष्टीचे पुन: निर्माण करेल.

१०) ही ती आवश्यकता आहे ज्याच्या कारण अल्लाह मनुष्याला दुसऱ्यांदा जिवंत करील व जो तर्क दिला आहे त्यावरून हे सिद्ध होण्यास मदतच होते की या सृष्टीची पुनरावृत्ती संभव आहे आणि यास असंभव समजणे असत्य आहे. आता हे दाखविले जात आहे की सृष्टीची ही पुनरावृत्ती बुद्धी आणि न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. (ईमान, आज्ञापालन आणि उपासना पद्धतीचा स्वीकार करणारे आणि अवज्ञा करणारे, अस्वीकार करणारे दोन्ही याचे हकदार आहेत की त्यांना आपापल्या कृत्याचा पूर्ण मोबदला मिळावा) ही आवश्यकता वर्तमान जीवनात जर पूर्ण होत नसेल (प्रत्येकाला ज्ञात आहे की ही आवश्यकता येथे पूर्ण होत नाही) तर यास पूर्ण करण्यासाठी निश्चितरुपेण दुसऱ्यांदा जीवन अनिवार्य आहे. (तपशीलासाठी पाहा सूरह ७, टीप ३०, सूरह ११ टीप १०५)

११) परलोक विश्वासाचा हा तिसरा पुरावा (प्रमाण) आहे. सृष्टीत अल्लाहची जी कामे चहुकडे दिसतात ज्यांची मोठमोठी चिन्हे म्हणजे सूर्य, चंद्र, रात्रंदिवसाचे चक्र प्रत्येकासमोर आहेत. यावरून या गोष्टीचे स्पष्ट प्रमाण मिळते की या सृष्टीला निर्माण करणारा कोणी एखादा मुलगा (बाळ) नाही व त्याने या सृष्टीला खेळण्यासाठी बनविले नाही. बाळ खेळता खेळता खेळणीला जसे मन भरल्यानंतर तोडून टाकतो तशी ही सृष्टी खेळणी नाही की उबग आल्यावर तोडून फोडून टाकावी. येथे आपणास स्पष्ट दिसून येते की सृष्टीनिर्मात्याच्या प्रत्येक कामात सुव्यवस्था आहे, तत्त्वदर्शिता आहे आणि कणाकणाच्या निर्मितीत एक मोठा उद्देश आहे. म्हणून या तत्त्वदर्शितेची आणि निहित उद्देशांची चिन्हे सृष्टीत तुमच्यासमोर विद्यमान आहेत. यावरून तुम्ही ही आशा कशी ठेवू शकता की मनुष्याला त्याच्या निर्माणकर्त्या स्वामीने बुद्धी, नैतिक चेतना, स्वतंत्र दायित्व आणि उपयोगाचे अधिकार प्रदान केले आहेत तरी तो मनुष्याच्या जीवन व्यवहारांचा  हिशेब  कधीही  घेणार नाही!  तसेच  बुद्धीविवेकपूर्ण  आणि  नैतिक  दायित्वाच्या  आधारावर मोबदला आणि शिक्षेसाठीचा अधिकार अनिवार्यत: निर्माण होतो, त्यांना तो असाच व्यर्थ घालविल!

याविषयी एक महत्त्वपूर्ण विषय येथे विशद करण्यात आला आहे ज्यासाठी गंभिरतापूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सांगितले गेले, अल्लाह आपल्या निशाण्या स्पष्ट उघड करीत आहे त्या लोकांसाठी जे ज्ञानी आहेत. (जे बुद्धी ठेवतात) `आणि अल्लाहने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे चुकीच्या विचारांपासून आणि चुकीच्या वर्तणुकीपासून वाचू इच्छितात.' याचा अर्थ म्हणजे अल्लाहने अत्यंत विवेकपूर्ण पद्धतीने जीवनाच्या प्रत्येक वस्तूत चोहोकडून निशाण्या ठेवल्या आहेत जे या प्रत्यक्ष वस्तूंमागे लपलेल्या तथ्याचा स्पष्ट उल्लेख करतात. परंतु या निशाण्या पाहून तथ्यांपर्यंत केवळ तेच लोक पोहचू शकतात ज्यांच्या जवळ खालील दोन गुण आहेत -

एक म्हणजे अज्ञानतापूर्ण पक्षपातापासून पवित्र होऊन म्हणजेच पूर्वग्रहदूषितपणा सोडून ज्ञानप्राप्तीच्या त्या साधनांना स्वीकारावे जे अल्लाहने त्यांना दिले आहेत.

दुसरे म्हणजे त्यांच्याजवळ स्वत: ही इच्छा प्रकट होणे आवश्यक आहे की दुराचारापासून परावृत्त व्हावे आणि सदाचाराचा त्यांनी स्वीकार करावा आणि जीवनाच्या सत्य मार्गावर चालण्यास तयार व्हावे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget