Halloween Costume ideas 2015

गांधी जयंतीनिमित्त आपली प्रतीमा उजळवण्याचा प्रयत्न

अलिकडेच राष्ट्रपिता महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. याप्रसंगी माध्यमांमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या व बोलल्या जात आहेत. काही लोक प्रामाणिकपणे गांधीजींच्या शिकवणीवर आपले मत प्रदर्शित करीत आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आज जगाने चालणे कसे आवश्यक आहे, गांधींचे विचार कसे प्रासंगिक आहेत, हे समजावून सांगण्यावर जोर देत आहेत. परंतु काही लोक या संधीचा वापर करून आपली प्रतीमा संवर्धन करून स्वतःची स्वीकार्हता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी मोठ्या कुटिलतेने ते बापूच्या लेखनाचा, त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या वक्तव्यांचा वेचून उपयोग करीत आहेत.
    यामध्ये सर्वात पुढे हिंदू राष्ट्रवादी आहेत. विशेषतः संघ परिवार. संघाने आधीच गांधींच्या जातीय सलोख्याच्या मूळ संदेशाला बाजूला करून त्यांना केवळ स्वच्छतेचे प्रतीक म्हणून सादर केले आहे. आणि आता ते हे ही दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत की, संघाची शिस्त आणि तिच्या स्वयंसेवकांमध्ये असलेल्या एकात्मतेच्या भावनेने गांधीजी खूपच प्रभावित होते. संघाच्या संकेतस्थळावर सरसंघचालक मोहन भागवत लिहितात, ”फाळणीनंतर तात्काळ निर्माण झालेल्या कष्टदायक काळात महात्मा गांधी हे दिल्लीमध्ये त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या संघाच्या शाखेत पोहोचले होते व त्यांनी स्वयंसेवकांशी चर्चा केली होती. त्यांच्या या भेटीसंबंधीचा अहवाल हरिजनच्या 27 सप्टेंबर 1947 च्या अंकात प्रकाशित झाला होता. गांधीजींनी संघाच्या स्वयंसेवकांच्या शिस्तीवर आनंद प्रकट केला होता आणि म्हटलं होतं की, मला प्रसन्नता आहे की, स्वयंसेवकांच्या दरम्यान जातीच्या भिंती नाहीत.”
    मुळात हरिजनच्या ज्या अंकाचा भागवत यांनी उल्लेख केलेला आहे तो 27 सप्टेंबरचा नसून 28 सप्टेंबरचा आहे. गांधींचे उद्गारही खरे आहेत. परंतु या विधानाच्या पार्श्‍वभूमीबद्दल भागवत गप्प आहेत. ते मुळीच सांगत नाहीत की, गांधींनी पुढे काय म्हटले?
    खरे पाहता गांधीजी 1936 मध्ये वर्धा येथे असताना जमुनालाल बजाज यांच्यासोबत आरएसएसच्या त्या शाखेसंबंधी बोलत होते जिथे त्यांनी भेट दिली होती. गांधींनी 28 सप्टेंबरच्या आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलेले होते की, ”तेव्हापासून आरएसएस एक मोठी संघटना बनलेली आहे. परंतु कोणत्याही संघटनेला वास्तविक रूपाने उपयोगी होण्यासाठी बलिदानाच्या भावनेसोबत पवित्र उद्देश्य आणि खर्‍या ज्ञानाची गरज असते. ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की, या दोहोंच्या शिवाय केवळ बलिदान समाजाला नष्ट करून टाकतो.”
    गांधीजी मुस्लिमांच्या तक्रारी ऐकूण 16 सप्टेंबरला संघाच्या या शाखेमध्ये पोहोचले होते. यावरून हे स्पष्ट होते की, गांधी संघाच्या स्वयंसेवकांना कोणता संदेश देऊ इच्छित होते?
    गांधींनी संघाबद्दल हे काही एकदाच विधान केलेले नव्हते. हरिजनच्या 9 ऑगस्ट 1942 च्या अंकात गांधीजींनी लिहिले होते की, ”मी आरएसएस आणि त्यांच्या गतिविधींबद्दल ऐकूण आहे आणि मला हे ही माहित आहे की, ही एक जातीयवादी संघटना आहे.” गांधींनी ही टिप्पणी त्यांना पाठविण्यात आलेल्या तक्रारींच्या नंतर केली होती. ज्यात एका विशिष्ट धार्मिक समुहाबद्दल नारेबाजी करणे, भाषण देणे याबाबत तक्रार केली गेली होती. गांधींना सांगण्यात आले होते की, संघाच्या स्वयंसेवकांनी व्यायामाच्या सत्रानंतर असे नारे बुलंद केले होते की, हा देश केवळ हिंदूंचा आहे आणि इंग्रज गेल्यानंतर बिगर हिंदूंना गुलाम बनविण्यात येईल. जातीय संघटनांद्वारे दिल्या जाणार्‍या त्रासांवर प्रतिक्रिया देतांना गांधींनी लिहिले होते की, ”मी संघाच्या बाबतीत ऐकूण आहे की, या सर्व गोष्टींच्या मुळामध्ये संघ आहे.” (संदर्भ ः गांधी खंड, 98 पृष्ठ 320 ते 322).
    स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात राजमोहन गांधी (मोहनदास ः पृष्ठ क्र. 642) मध्ये लिहितात की, ”गांधीजींनी संघाचे प्रमुख गोळवलकरकडे संघाच्या हिंसक कारवायामध्ये सहभागाबद्दल संबंधी विचारणा केली होती. तेव्हा गोळवलकरांनी इन्कार करत म्हटलं होतं की, संघाला मुस्लिमांना मारण्यात रस नाही. तेव्हा गांधींनी त्यांना सांगितले होते की, गोळवलकरांनी ही बाब सार्वजनिक स्वरूपात स्पष्ट करावी. तेव्हा गोळवलकर उत्तरले होते की, गांधी त्यांना आपल्या लेखनात बोलण्यात उधृत करू शकतात. तेव्हा गांधींनी त्याच दिवशीच्या संध्याकाळच्या प्रार्थनासभेमध्ये गोळवलकरांकडून केल्या गेलेल्या विधानाचा हवाला दिला होता. त्यांनी गोळवलकरांना हे ही सांगितले होते की, संघाने या संदर्भात स्वतः एक जाहीर वक्तव्य करण्याची आवश्यकता आहे. नंतर गांधीजींनी नेहरूंशी बोलताना म्हटले होते की, त्यांना गोळवलकरांचे बोलणे फारसे विश्‍वासार्ह वाटले नाही”
    गांधींचे संघाच्या बाबतीत काय आकलन होते, याचा सर्वात मोठा पुरावा यांचे सचिव प्यारेलाल यांनी दिलेला आहे. प्यारेलाल लिहितात की, ”सन 1946 च्या दंगलीनंतर गांधींच्या काफिल्यामधील एका सदस्याने पंजाबमधून आलेल्या शरणार्थ्यांसाठी वाघामध्ये बनवलेल्या एका कॅम्पची स्तुती करताना सांगितले होते की, संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमता, शिस्त, साहस आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे. तेव्हा गांधी उद्गारले होते की, मात्र हे विसरू नका की हिटलरचे नाझी सैनिक आणि मुसोलीनीचे फॉसिस्ट कार्यकर्ते हे सुद्धा असेच होते” गांधीजींची अशी धारणा होती की, संघाचा दृष्टीकोन एकाधिकारवादी आहे आणि ती एक जातीयवादी संघटना आहे. (संदर्भ : प्यारेलाल, महात्मा गांधी द लास्ट फेज, अहेमदाबाद, पृष्ठ क्र. 440).
    संघ सध्या हे दर्शविण्यासाठी प्रयत्नशील आहे की, संघाच्या कार्यक्रमाला गांधीजी पसंत करत होते. खरं पाहता संघ परिवार संकीर्ण हिंदू राष्ट्रवादाचा पोषक आहे, या उलट गांधी सर्वसमावेशी भारतीय राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. तरी परंतु, संघ आपल्या काळातील एका महान हिंदूंकडून प्रमाणपत्र घेऊ इच्छित आहेत. गांधीजी निर्विवादपणे जगातील सर्वात प्रसिद्ध भारतीय व्यक्ती आहेत. देशात जस-जसा संघाचा प्रभाव वाढत आहे तसा-तसा संघाचा प्रयत्न आहे की, तो स्वतःला अशा महान नेत्यांशी जवळीक दर्शवावी ज्यांची विचारधारा संघाच्या विचारधारेविरूद्ध होती. संघ सरदार पटेल आणि सुभाष चंद्रबोस यांनाही स्वतःशी जोडू इच्छितो. हे माहित असतांनासुद्धा की पटेल आणि बोस यांची विचारधारा संघाच्या विचारधारेशी थोडीसुद्धा जुळत नव्हती. गांधीजी स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे शिर्षतम नेते होते आणि त्यांची हत्या संघाच्या एका नथुराम गोडसे नावाच्या प्रचारकाने केली होती. गोडसेची ही कुत्सित कृती हिंदू राष्ट्रवादाचा भारतीय राष्ट्रवादावर सुनियोजित वैचारिक हल्ला होता.
    संघ राष्ट्रवादाचा एक नवीन अध्याय रचू पाहत आहे. तो भारतातील मध्यकालीन मुस्लिम शासकांना हिंदूंचे दमन करणारे शासनकर्त्यांच्या रूपात सादर करत आलेला आहे. संघ हे दाखवू इच्छितो की, जेथे हिंदू धर्म भारतीय आहे तसा इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्म भारतीय नाहीत तर विदेशी आहेत. ही गोष्ट शाबित करण्यासाठी संघ जबरदस्त प्रयत्नशील राहिलेला आहे. काहीही करून आर्य भारताचे मूळ निवासी होते, हे ही त्याला पटवून द्यायचे आहे. एवढेच नव्हे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रत्येक उपलब्धी ही प्राचीन भारताची जगाला देणगी असल्याचे तो सांगत असतो. मुळात तो भारताच्या कथित गौरवशाली हिंदू भूतकाळ आणि त्या काळात असलेल्या जातीगत आणि लैंगिक असमानतेचे महिमामंडन करू इच्छितो. गांधींशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. मागच्या काही वर्षांमध्ये संघाच्या या वैचारिक कसरतींमध्ये गति आलेली आहे. आपल्याला गांधींच्या विचारांच्या या विकृतीकरणाला रोखावे लागेल. आपल्याला गांधींच्या विचारावर होणार्‍या अन्यायाच्या विरूद्ध संघर्ष करावा लागेल. राष्ट्र आणि समाजाच्या प्रश्‍नांना मानवीय पद्धतीने सोडविण्यासाठी गांधींच्या प्रयत्नांना प्रकाशात आणावे लागेल.

- राम पुनियानी
(लेखक : आयआयटी मुंबईत शिकवित होते आणि 2007 च्या नॅशनल कम्युनिल हार्मोनी अ‍ॅवॉर्ड ने सन्मानित आहेत.)
(मूळ इंग्रजी लेखाचे हिंदी भाषांतर अमरीश हरदेनिया यांनी केले तर हिंदीतून मराठी भाषांतर बशीर शेख, एम.आय. शेन यांनी केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget