Halloween Costume ideas 2015

टिपूच्या राक्षसीकरणामागे कुठली शक्ती?

-कलीम अजीम, अंबाजोगाई
 भाजपने सुरु केलेल्या इतिहासाच्या राक्षसीकरणाच्या मोहिमेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चांगलंच उत्तर दिलंय. २५ ऑक्टोबरला कर्नाटक विधानसभेत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपतींनी टिपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले. ‘टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सेनानी होता, इंग्रजांशी लढताना त्याला वीरमरण आलं.
टिपू सुलतानने रॉकेटच्या विकासात सर्वांत मोठे योगदान दिलं आहे’ राष्ट्रपतींच्या या भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच टिपू सुलतानच्या जयंतीला केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी विरोध केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही टिपू सुलतानबद्दल अपशब्द काढले होते. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे भारतात पुन्हा एकदा स्वातंत्र्य व स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम प्रतीकं पुसून टाकण्याच्या षङ्यंत्रावर चर्चा सुरु आहे.
ताजमहाल संबधी इतिहाच्या विकृतीकरणाचा थांबत नाही, तोवर टिपू सुलतानच्या स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टिपू सुलतानबद्दल अपशब्द काढले. हेगडे यांनी केलेली टीका काही नवीन नाही. याआधीही भाजप नेते व हिंदुत्ववादी संघटनांनी टिपू सुलतानच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल शंका उत्पन्न केली होती. त्यामुळे हेगडे यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्यची गरज नाही. मुळात भाजप सरकारचा हा अजेंडा राहिला आहे. किंबहुना भाजपच काय तर अन्य पक्षातील सरकारचाही हाच अजेंडा आहे की, आर्थिक व राजकीय क्षेत्रात पक्षाची पिछेहाट सुरु झाली की लोकांना भावनिक मुद्द्यावरुन भडकवायचे व त्यातच त्यांना गुंतवून ठेवायचे. भारतीय राजकारण्यांची ही जुनीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वादात वेळ व शक्ती वाया घालवण्यापेक्षा सरकारला ‘जेब की बात’वर जाब विचारायची गरज आहे. त्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण हा चर्चेचा मुद्दा न होता देशाची आर्थिक घसरण का होतीय याबद्दल चर्चासत्र घेण्याची गरज आहे.
येत्या १० नोव्हेंबरला कर्नाटक सरकार टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहे. यानिमित्तानं राज्य सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना निमंत्रण पाठवलं होतं. हेगडे यांनी कार्यक्रमाला येण्यस नकार देत सरकारच्या पत्रासह टिपू सुलतानबद्दल अपशब्द ट्विटरवर पोस्ट केले. यामुळे देशभरातील राजकारण पुन्हा एकदा मुस्लिम-हिंदू असं झालं आहे. या प्रकरणावर सुरु असलेल्या वादामुळे पुन्हा एकदा भाजपची हिंदू-मुस्लिम दूहीचं राजकारण काहीअंशी यशस्वी झाल्याचं दिसतंय. वरील राजकारण पाहता मला पुन्हा एकदा ‘दी इकॉनॉमिस्ट’ची जूनमधील कव्हर स्टोरी आठवतेय. या स्टोरीत पत्रिकेनं भाजप सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली होती. यातून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी भाजप धार्मिक ध्रूवीकरणाचं राजकारण खेळू शकतं, असा दावा ‘दी इकॉनॉमिस्ट’नं केला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय. टिपू जयंती वादाला भाजपनं हिंदू-मुस्लिम रंग दिलाय. टिपूचं ऐतिहासिक पात्र २०० वर्षानंतर पुन्हा भाजपकृपेनं जीवंत झालंय.
२०१५ साली कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं शासकीय खर्चातून ‘टिपू सुलतान जन्मोत्सव’ सोहळा साजरा करण्याची घोषणा केली. याला भाजपनं विरोध केला. या वर्षीपासून दरवर्षी केवळ विरोध करायचा म्हणून टिपू सुलतानबद्दल वाद उकरुन काढला जातोय. अठराव्या शतकातील पराक्रमी म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्याविरोधात अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री हेगडे यांच्याविरोधात पहिली तक्रार नोंदवण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर हैदराबाद, नागपूर इत्यादी ठिकाणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासह माननीय राष्ट्रपतींना हेगडेविरोधात कारवाईसाठी हजारो पत्र पाठवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त देशभरातील इतिहासप्रेमींना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. टिपू सुलतानहबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल हेगडे यांनी माफी मागावी अशी मागणी देशभरातून इतिहासप्रेमी नागरिक करत आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून भारतात इतिहासाचं मोडतोड करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. अर्थातच सत्ताबदलाचं हे प्रयोजन आहे. त्यामुळे मागील सरकारने ही आपल्या सोयीप्रमाणे इतिहास वळविला होता. या सरकारने मुस्लिम शासक किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेला धक्का लावला नव्हता. पण सध्याच्या भाजप सरकारने सत्तेवर येताच दिल्लीतील औरंगजेब रोडचं नामकरण केलं. हा मुस्लिम प्रतीकांचा इतिहास पुसून टाकण्याची पहिली पायरी होती. यानंतर राष्ट्रीय पातळीवर मुघलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळण्यची चर्चा सुरु झाली. यासाठी नियोजितपणे मुस्लिम प्रतीकांना हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी सिद्ध करण्याचा आटापिटा सुरु करण्यात आला. कोणीतरी सुमार नेता उठून मुस्लिम प्रतिकांबद्दल अपशब्द वापरतो. पक्षातील वरीष्ठ मंडली काही न बोलता फक्त वाद कसा वाढेल याबद्दल काळी घेतात. अखेर वाद विकोपाला गेला तर काहीतरी सौम्य भूमिका घेऊन वादावर पडदा टाकायचा ही पद्धत सत्ताधारी पक्षाने सुरु केली आहे. मागे मुघलांसंदर्भात वाद सुरु असताना पीएम अचानक म्यानमारमधील अखेरचा मुघल बादशहा व स्वातंत्र्य सेनानी बहादूरशहा जफर यांच्या मजारीवर गेले. त्यामुळे हा वाद शमला. काही दिवसापूर्वी ताजमहल वादावर यूपीचे सीएमने ताज परिसरात झाडू मारुन वाद शमवला.  
भाजप हा मुस्लिमद्वेशी पक्ष असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळे तेही आता उघडपणे भूमिका घेत आहेत. किंबहूना ते मुस्लिमांना एका प्रकारे आव्हान देत आहेत. स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही सहभाग नसलेला वर्ग आज मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींना विलन ठरवण्यात अग्रेसर आहे. यातून कधी टिपू सुलतान तर कधी मुघलांना हिंदूविरोधी सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतात. सत्तेत आल्यानंतर इतिहासाचं भगवेकरण करण्याचा सुनियोजित डाव भाजपनं सुरु केलाय. या कटशाहीवर आतापर्यंत बरंच लिखाण झालंय. तरीही मुस्लिम विरोधकांचे कुत्सित मनसुबे सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून 'ताजमहल' वादाकडे बघण्याची गरज आहे. ताजमहल संदर्भात सुरु असलेल्या वादावर अनेकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. 'ताजमहलचं बाबरी होता कामा नये' असा सूर एकंदरीत सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. ताजमहलचे ऐतिहासिक दस्ताऐवज चुकीच्या पद्धतीनं सादर केले जात आहेत. याला पूर्वग्रहदूषित इतिहासाचे संदर्भ दिले जात आहेत.
भारतात इतिहास लेखनाची परंपरा मुळातच द्वेशधारी राहिलेली आहे. इतिहास लिहणाऱ्या वर्गाने सबंध इतिहास द्वेश व कमी लेखण्यातून रचला आहे. यातून इस्लाम व मुस्लिमद्वेशी राजकारण जन्माला आलं आहे. यावर अभ्यासक राम पुनियानी म्हणतात, 'भारतात गेली काही दशके मुस्लिम शासकांचे दानवीकरण करुन हिंदुत्ववादी इतिहासकार प्रस्थ माजवताना दिसत आहेत, जमातवादी शक्ती नेहमी इतिहासातील घटनांचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करुन घेताना दिसतात. त्याच सूत्रांद्वारे भूतकाळातील मुस्लिम शासकांचेच प्रतिनिधी आजच्या मुस्लिम समाजाला ठरवून, आजचे हिंदू हे त्या मुस्लिम शासकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंचे वंशज आहेत असे मांडून मुस्लिमांचे दानवीकरण करण्यात येत आहे'
भारतात टिपू सुलतानला एक महान योद्धा म्हणून ओळखलं जातं. पण अलीकडे हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. इतिहास संसोधक सरफराज शेख याला स्वातंत्र्य आंदोलनाची प्रतीकं मोडून टाकण्याचं षङ्यंत्र म्हणतात, ‘स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लिमांचा सहभाग मोठा होता, याउलट संघानं स्वातंत्र्य विरोधी धोरणं आखली होती, हे पुराव्यातून सिद्ध झालंय, अशा वेळी शत्रूपक्ष आमच्यापेक्षा वरचढ ठरता कामा नये यातून मुस्लिमांची ऐतिहासिक प्रतीकं नष्ट करण्याचा कट राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आखत आहे.’
सरफराज शेख यांच्या वक्तव्याला राम पुनियानीदेखील दुजोरा देतात, साहित्यिक राजन खान यावर एकदा म्हणाले होते, ‘सुधारणावादी इतिहास लेखकाची आज समाजाला गरज आहे. त्यामुळे तरुण अभ्यासकांनी समतोल इतिहास लेखनाची जबाबदारी स्वीकारावी.’
टिपू सुलतानच्या राक्षसीकरण सुरु असल्याने ही जाहीर चर्चा सुरु झाली आहे. पण अंतर्गत पातळीवर ऐतिहासिक प्रतीकं बदलण्याचं षङ्यंत्र हाणून पाडावं लागेल. इतिहासाच्या भगवीकरणामुळे आगामी काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, मुस्लिम शासकाचं दानवीकरणारचं षडयंत्र भारतात विवेकशील समाजनिर्मितीला बाधा पोहचवणारं आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेतलेली बरी, अन्यथा ताजमहलचंही बाबरी व्हायला वेळ लागणार नाही.  

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget