Halloween Costume ideas 2015

सूरह अल् आअराफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)

 


(९६) जर वस्त्यांतील लोकांनी श्रद्धा ठेवली असती व त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगीकारले असते तर आम्ही त्यांच्यावर आकाश व पृथ्वीतील समृद्धीची दारे उघडली असती, पण त्यांनी तर हे खोटे लेखले, म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरले, जी ते गोळा करीत होते. 

(९७) मग काय वस्त्यातील लोक आता यापासून निर्भय झाले आहेत की आमची धाड कधी अचानक त्यांच्यावर रात्रीच्या वेळी पडणार नाही जेव्हा ते झोपलेले असतील? अथवा 

(९८) काय ते निश्चिंत झाले आहेत की आमचा जबरदस्त हात कधी आकस्मिक त्यांच्यावर दिवसा पडणार नाही जेव्हा ते खेळत असतील? काय हे लोक अल्लाहच्या गुप्तउपायपासून निर्भय आहेत? 

(९९) खरे पाहता अल्लाहच्या गुप्तउपाय७८ पासून तोच जनसमुदाय निर्भय बनतो ज्याचा विनाश होणार असेल. 

(१००) आणि काय त्या लोकांना जे पूर्वीच्या भूवासियानंतर पृथ्वीचे वारस बनतात, या वस्तुस्थितीने त्यांना कोणताही धडा दिलेला नाही की जर आम्ही इच्छिले तर त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडू शकतो?७९ (पण ते उद्बोधक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात). आम्ही त्यांच्या हृदयाला मोहरबंद करून टाकतो, ते काहीच ऐकू शकत नाही.८० 

(१०१) हे जनसमूह ज्यांच्या हकीगती आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत (तुमच्यासमोर उदाहरणस्वरूप उपस्थित आहेत) त्यांचे पैगंबर त्यांच्याजवळ स्पष्ट संकेतचिन्हे घेऊन आले. पण ज्या गोष्टीला त्यांनी एकदा खोटे लेखले होते परत त्यांना ते मानणारे नव्हते. पाहा अशाप्रकारे आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांची हृदये मोहरबंद करून टाकतो.८१ 

(१०२) आम्हाला त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये करारपालनाची आस्था आढळली नाही बहुतेकजण अवज्ञाकारीच आढळले.८२ 

(१०३) मग त्या लोकसमुदायानंतर (ज्यांचा उल्लेख वर करण्यात आला आहे) आम्ही मूसा (अ.) ला आपल्या संकेतवचनांसह फिरऔन८३ आणि त्याच्या जनसमुदायाच्या सरदाराकडे पाठविले परंतु त्यांनीदेखील आमच्या संकेत वचनांशी अन्याय केला,८४ मग पाहा, त्या उपद्रव माजविणाऱ्यांचा काय शेवट झाला. 

(१०४) मूसा (अ.) ने सांगितले, ``हे फिरऔन!८५ मी सृष्टीच्या स्वामीकडून पाठविला गेलो आहे. 

(१०५) माझा पदाधिकार हाच आहे की अल्लाहचे नाव घेऊन कोणतीही गोष्ट सत्याशिवाय मी सांगू नये, मी तुम्हा लोकांपाशी तुमच्या पालनकर्त्याकडून नियुक्तीचे स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, म्हणून तू बनीइस्राईलना माझ्याबरोबर पाठव.''८६ 

(१०६) फिरऔनने सांगितले, ``जर तू एकतरी संकेत आणला असशील आणि तू आपल्या दाव्यात खरा असशील तर तो सादर कर.'' 

(१०७) मूसा (अ.) ने आपली काठी खाली फेकताक्षणीच तो एक साक्षात अजगर होता. 

(१०८) त्याने आपल्या खिशातून हात बाहेर काढला तर सर्व पाहणाऱ्यांसमोर तो चकाकत होता.८७ 



७८) येथे अरबी ``मक्र'' हा शब्दप्रयोग झाला आहे. याचा अर्थ `गुप्त् उपाय' असा होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध अशी चाल खेळणे की जोरपर्यंत निर्णायक टोला त्याच्यावर पडत नाही तोपर्यंत त्याला माहीत होऊ नये की त्याच्यावर काही बेतणार आहे. त्याला असेच वाटत राहावे की आता सर्व ठीकठाक आहे.

७९) म्हणजे एक कोसळणाऱ्या राष्ट्राच्या जागी दुसरे राष्ट्र उभे राहाते. त्याच्यासाठी पूर्वीच्या राष्ट्रपतनात पर्याप्त् मार्गदर्शन असते. त्याने बुद्धीने काम घेतले तर कळून येते की काही वर्षांपूर्वी जे लोक येथे थाटमाटात होते, त्यांच्या महानतेचा झेंडा या भूमीत फडकत होता, त्या राष्ट्राला त्यांच्या चुकीच्या विचारसरणीने आणि जीवनपद्धतीने बरबाद करून टाकले. निर्माणकर्त्या अल्लाहने सरतेशेवटी त्यांना पकडले आणि हे वैभव त्यांच्या हातातून हिसकावून घेतले. तोच अल्लाह आज कुठे गेलेला नाही किंवा त्याच्यापासून कोणी हे सामर्थ्यसुद्धा हिसकावून घेतले नाही. आज जे लोक या वैभवशाली पदावर आरूढ आहेत, त्यांनी पूर्वीच्या लोकांप्रमाणेच चुकीची जीवनपद्धती स्वीकारली तर यांच्याकडूनसुद्धा अल्लाह ते वैभवशाली पद हिसकावून घेईल.

८०) म्हणजे इतिहासापासून आणि बोधप्रद निशाण्यांपासूनसुद्धा ते बोध ग्रहण करत नाहीत आणि स्वत:ला संभ्रमात टाकतात तेव्हा अल्लाहसुद्धा त्यांना चिंतन मनन करण्याची आणि उपदेश देणाऱ्याचा उपदेश ऐकण्याची संमती देत नाही. अल्लाहचा नैसर्गिक नियम आहे की जो आपले डोळे बंद ठेवतो, त्याला प्रकाशमान सूर्यसुद्धा दिसू शकत नाही आणि जो स्वत: ऐकू शकत नाही त्याला कोणीही ऐकवू शकत नाही.

८१) मागील आयतमध्ये सांगितले गेले होते, `आम्ही यांच्या मनावर मोहर लावतो तेव्हा ते काही ऐकत नाही' याचा खुलासा अल्लाहने स्वत: या आयतमध्ये केला आहे. या तपशीलाने स्पष्ट होते की मनावर मोहर लावणे म्हणजे मानवाच्या मानसिकतेला मनोवैज्ञानिक नियमांच्या पकडीत घेणे आहे. यानुसार एकदा अज्ञानतापूर्ण दुराग्रह आणि मनोकामनांच्या आधारावर सत्यापासून तोंड लपविण्याने मनुष्य आपल्या जिद्दीत आणि अधर्मीपणात जखडला जातो तेव्हा फक्त तर्क, एखादे निरीक्षण आणि एखाद्या अनुभवाने त्याच्या मनाचे द्वार सत्य स्वीकारण्यास उघडत नाही.

८२) ``करारपालनाची आस्था आढळली नाही'' म्हणजे कोणत्याच प्रकारच्या प्रतिज्ञेचा निर्वाह होताना दिसला नाही. त्या नैसर्गिक प्रतिज्ञेचा निर्वाह ज्यात मनुष्य जन्मताच अल्लाहचा दास आहे व अल्लाह मनुष्याचा पालनकर्ता आहे. त्याच्या सामूहिक प्रतिज्ञेचे निर्वाह ज्यात प्रत्येकजण मानव समाजाचा सदस्य असल्याने बांधलेला आहे आणि वैयक्तिक प्रतिज्ञेचे निर्वाह जो माणूस आपल्या अडचणी आणि संकटसमयी किंवा एखाद्या सद्भावनेप्रसंगी अल्लाहशी स्वयम बांधला गेला आहे. या तिन्ही प्रतिज्ञा (साक्षी) भंग करण्यास येथे `अवज्ञा' (फिस्क) म्हटले आहे.

८३) वर ज्या घटनेचा उल्लेख आला आहे त्याने ही गोष्ट मनावर ठसविणे उद्देश होता की जे राष्ट्र अल्लाहच्या संदेशप्राप्तीनंतरसुद्धा त्यास रद्द करते, अशा राष्ट्राला (लोकसमूहाला) अल्लाह नष्ट करून टाकतो. यानंतर आता मूसा (अ.) आणि फिरऔन तसेच बनीइस्राईलींच्या घटनांचा उल्लेख होत राहातो. त्यामध्ये या विषयाव्यतिरिक्त आणखी विशेष शिकवण अनेकेश्वरवादी कुरैश, यहुदी आणि ईमानधारकांना दिली आहे. अनेकेश्वरवादी कुरैश लोकांना येथे समजाविण्याचा प्रयत्न केला की सत्य संदेश पोहचविण्याच्या आरंभिक काळात सत्य व असत्य शक्तींचा अनुपात दिसतो त्यापासून धोका खाता कामा नये. सत्यासाठी पूर्ण इतिहास साक्षी आहे की सत्याची चळवळ प्रथमत: राष्ट्रात आणि जगात अल्प प्रमाणात सुरु होते आणि साधनसामुग्रीविना असत्याविरुद्ध लढाई सुरु करते. या असत्याच्या बाजूने जगातील मोठे राष्ट्र आणि शासनसत्ता असते, तरीसुद्धा शेवटी सत्याचाच विजय होतो. येथे त्यांना हेसुद्धा दाखविण्यात आले आहे की सत्यसंदेश देणाऱ्याच्या विरोधात ज्या चाली खेळल्या जातात आणि सत्यसंदेश दाबून टाकण्याचा जो प्रयत्न केला जातो, ते सर्व अयशस्वी ठरतात. अल्लाह सत्याचा अस्वीकारणाऱ्यांना सवलत देत राहातो की ते सरळमार्गावर यावेत आणि सत्याचा स्वीकार करावा. परंतु जेव्हा या संधीचा, चेतावणीचा, स्पष्ट निशाणीचा आणि बोधप्रद घटनांचा ते लोक बोध घेत नाहीत तेव्हा तो त्यांना शिक्षा देऊन दुसऱ्यासाठी त्यास बोधप्रध सिद्ध करतो. ज्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान आणले होते त्यांना या घटनेद्वारा दुहेरी शिकवण दिली गेली. पहिली शिकवण ही की आपली अल्पसंख्या आणि कमजोरीला तसेच सत्य विरोधकांच्या बहुसंख्येला आणि प्रभावाला पाहून हिंमत सोडू नका. तसेच अल्लाहची मदत येण्यास विलंब होतांना पाहून हताश होऊ नका. दुसरी शिकवण म्हणजे ईमान धारण केल्यानंतर जो लोकसमूह यहुदी लोकांचे वर्तन अवलंबितो तर तो यहुदी लोकांप्रमाणेच अल्लाहच्या धिक्कारास योग्य बनतो. बनीइस्राईलींच्या समोर त्यांच्या स्वत:चा बोधप्रद इतिहास ठेवून त्यांना असत्यवादाच्या दुष्परिणांमापासून सचेत केले आहे. त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान आणण्याचे आवाहन करण्यात आले. यापूर्वीच्या पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्मातील (दीन) सर्व भेसळींना दूर करून आदर्श जीवनधर्म (मूळ रूपात) लोकांसमोर ठेवत आहे. 

८४) निशाण्यांबरोबर अन्याय केला म्हणजे त्यांना मान्य केले नाही आणि त्यांना जादू समजून टाळले. एखादी कविता जी उत्तम काव्यांचा नमूना असेल, तिला शब्दांचा खेळ समजून चेष्टा करणे फक्त त्या कवितेचाच नव्हे तर संपूर्ण काव्याचा आणि काव्य अभिरूचीवर अन्याय आहे. अल्लाहकडून असलेल्या निशाण्यांची स्पष्ट साक्ष देण्यात येत आहे तसेच एक बुद्धीमंत व्यक्ती ही जादू आहे असा विचारसुद्धा करू शकत नाही. जादूगारांनी याविषयी साक्ष दिली आहे की ही जादू असूच शकत नाही कारण ही जादूकलेच्या बाहेरची गोष्ट आहे. अशा स्थितीत अल्लाहच्या निशाण्यांना जादू ठरविणे केवळ निशाण्यांविरुद्धच नव्हेतर सद्विवेकबुद्धी आणि सत्यतेवर केलेला घोर अन्याय आहे.

८५) फिरऔन या शब्दाचा अर्थ `सूर्यदेवतेची संतान' (सूर्यवंशी) असा होतो. इजिप्त्चे प्राचीन काळातील लोक सूर्याला महादेव समजत होते आणि फिरऔन सूर्याशी आपला संबंध जोडून होता. इजिप्शियन लोकांच्या विश्वासानुसार एखाद्या शासकाच्या प्रभुत्वासाठी याशिवाय दुसरा आधार नव्हता की तो `रअ' (सूर्य) चा शारीरिक प्रतीक आणि त्याचा जमिनीवरील प्रतिनिधी म्हणून स्वत:ला घोषित करतो. म्हणून प्रत्येक इजिप्त्चा शासकवंश स्वत:ला सूर्यवंशी घोषित करीत असे आणि प्रत्येक शासक जो सिंहासनावर आरूढ होत असे तो `फिरऔन'ची पदवी धारणकरून प्रजेला विश्वासात घेऊन पटवून देत असे की तुमचा `महादेव' (रब्बे आला) मी आहे. येथे हे जाणून घेतले पाहिजे की कुरआनमध्ये पैगंबर मूसा (अ.) यांच्या घटनेसंबंधी दोन फिरऔनांचा उल्लेख आला आहे. एक म्हणजे तो ज्याच्यावेळी मूसा (अ.) यांचा जन्म झाला होता आणि ज्याच्या घरात त्यांचे संगोपन झाले आणि दुसरा फिरऔन ज्याच्याकडे पैगंबर मूसा (अ.) यांनी इस्लामचे आवाहन केले होते आणि बनीइस्राईलच्या सुटकेची विनंती त्याच्यासमोर केली होती आणि जो सरतेशेवटी समुद्रात बुडाला होता. आधुनिक काळातील अन्वेषकांचा विचार आहे की पहिला फिरऔन रामसेस द्वितीय होता. त्याचा शासनकाळ इ. स. पूर्व १२९२ ते १२२५ असा होता. दुसरा फिरऔन ज्याचा उल्लेख येथे आला आहे त्याचे नाव `मिनीफताह' होते तो आपले वडील रामसेस द्वितीयच्या काळातच शासनात भागीदार बनला होता आणि पित्याच्या मृत्यूनंतर राज्याचा स्वामी बनून बसला. हा अनुमान (निष्कर्ष) संदिग्ध वाटतो कारण इस्राईली इतिहासानुसार पैगंबर मूसा (अ.) यांच्या मृत्यूचे वर्ष इ. स. पूर्व १२७२ आहे. परंतु हे ऐतिहासिक अनुमान आहेत. इजिप्शियन कालगणना, इस्राईली कालगणना आणि इसवी कालगणना विचारात घेऊन अचूक तिथीचा अचूक हिशेब लावणे कठीण आहे.

८६) पैगंबर मूसा (अ.) दोन गोष्टींचा संदेश घेऊन फिरऔनकडे पाठविले गेले होते. एक म्हणजे अल्लाहची भक्ती (इस्लाम) स्वीकारावी.  दुसरे  म्हणजे  इस्राईली  जे  प्रथमपासून  मुस्लिम होते  त्यांना  अत्याचारापासून  स्वतंत्र केले जावे. कुरआनमध्ये या दोन्ही संदेशांचा कुठे एकत्र उल्लेख आला आहे तर कुठे परिस्थितीनुरूप केवळ एका संदेशाचा उल्लेख करणे पर्याप्त् समजले गेले.

८७) या दोन निशाण्या पैगंबर मूसा (अ.) यांना यासाठी देण्यात आल्या होत्या की ते त्या अल्लाहचे प्रतिनिधी आहेत जो सृष्टी निर्माणकर्ता आहे आणि सृष्टीचा शासकसुद्धा आहे. यापूर्वीसुद्धा संकेत केला आहे की पैगंबरांनी जेव्हा स्वत:ला सृष्टीनिर्मात्याचा पैगंबर म्हणून प्रस्तुत केले होते तेव्हा लोकांनी त्यांच्याशी चमत्कार करण्याची मागणी केली होती. जर तुम्ही खरोखर अल्लाहचे पैगंबर आहात तर तुमच्या हातून असा चमत्कार जो अनैसर्गिक आहे, घडला पाहिजे आणि ज्यामुळे स्पष्ट जाहीर व्हावे की अल्लाहने तुमचे पैगंबरत्व सत्य ठरविण्यासाठी हा चमत्कार अल्लाहकडून प्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे झाल्याने लोक त्या चमत्काराला पैगंबरत्वाची निशाणी म्हणून प्रत्यक्ष अल्लाहने प्रकट केली असे मानतील. याच मागण्यांच्या उत्तरांत पैगंबरांनी निशाण्या दाखविल्या होत्या ज्यांना कुरआनच्या परिभाषेत `आयती' म्हणतात आणि (संबोधकाच्या भाषेत) चमत्कार (मोजिजा) म्हणतात. अशा निशाण्यांस (मोजिजे) जे लोक नैसर्गिक सामान्य गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ते खरे तर ईशग्रंथाला मान्य करणे आणि अमान्य करणे यामध्ये एक वेगळा मार्ग काढतात, ज्याला उचित ठरविले जाऊ शकतच नाही. कारण कुरआन यास स्पष्टपणे अनैसर्गिक घटना घोषित करीत आहे. जे लोक ईशग्रंथांवर श्रद्धा ठेवित नाही ते लोक अशा घटनांना संदर्भाच्या अगदी विपरीत अनैसर्गिक घटना सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. असे प्रयत्न फक्त तेच लोक करतात जे ईशग्रंथावर ईमान आणत नाही. ज्या ग्रंथात अनैसर्गिक तथ्य आणि प्रसंगाचा उल्लेख होतो त्यावर ते ईमान ठेवत नाहीत. आणि दुसरीकडे पूर्वजांच्या धर्मावर जन्मजात श्रद्धा असल्याने त्या ईशग्रंथाला नाकारू शकत नाही ज्यात अनैसर्गिक घटनांचा उल्लेख आहे. चमत्कारच्या (मोजिजा) विषयी मूळ निर्णायक प्रश्न आहे की काय अल्लाह सृष्टीव्यवस्थेला एका नियमावर चालविल्यानंतर निष्क्रिय बनला आहे? आणि आता या सृष्टीव्यवस्थेत कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही? किंवा व्यावहारिक रूपात आपल्या राज्याचा प्रबंध आणि व्यवस्था आपल्या हातात ठेवतो आणि क्षणोक्षणी त्याचे आदेश सृष्टीव्यवस्थेत लागू आहेत. त्याला अधिकार आहे की वस्तूरूपात आणि घटनांपैकी नैसर्गिक गतीमध्ये अंशत: किंवा पूर्णत: बदल वाटेल तेव्हा करावा? जे लोक या प्रश्नांच्या उत्तरात पहिल्या प्रश्नाचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी चमत्कार मान्य करणे असंभव आहे. कारण हे त्यांच्या ईशधारणेशी मेळ खात नाही की सृष्टीसंबंधी त्यांच्या कल्पनांशी! परंतु अशा लोकांसाठी उचित आहे की ते कुरआनच्या स्पष्टीकरणात व तपशीलात जाण्याऐवजी त्याचा स्पष्ट इन्कार करून टाकातात. कारण कुरआनने आपली वर्णनशक्ती अल्लाहविषयी वरील पहिल्या धारणेचे (प्रश्न) खंडन करण्यात आणि नंतरचा उल्लेख (प्रश्न) सिद्ध करण्यात लावली आहे. याविरुद्ध जो  कोणी  कुरआनच्या  तर्क  आणि  प्रमाणांशी  संतुष्ट  होऊन  दुसऱ्या  धारणा  आणि  कल्पना  तर स्वीकारतो, त्याच्यासाठी चमत्कार (मोजिजे) समजून घेणे आणि मान्य करणे अशक्य नाही. स्पष्टत: जेव्हा एखाद्याचा विश्वास असेल की साप ज्याप्रकारे जन्मतात त्याचप्रकारे ते जन्माला येऊ शकतातच, त्याव्यतिरिक्त दुसऱ्या पद्धतीने सापाला जन्म देणे अल्लाहच्या सामर्थ्यापलिकडची गोष्ट आहे. असे म्हणणाऱ्याला तुम्ही सरळ खोटे ठरविता की जो म्हणतो एक लाठी साप बनली आणि नंतर सापाची लाठी बनली. परंतु याविरुद्ध आपला विश्वास आहे की निर्जीव पदार्थात अल्लाहच्या आदेशाने जीव निर्माण होतो आणि अल्लाह एखाद्या वस्तूला जीवन बहाल करू शकतो. अशा माणसासाठी अल्लाहच्या आदेशाने लाठीचा साप बनणे तितकीच शक्य गोष्ट आहे जितकी निर्जीव अंड्यातून साप जन्माला येणे. फरक केवळ हाच आहे की एक घटना सतत होत राहाते आणि दुसरी घटना केवळ तीनदा घडली. हे एकाला विचित्र आणि दुसऱ्याला अविचित्र बनवू शकत नाही.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget