Halloween Costume ideas 2015

सूरह अल् आअराफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(८५) ....आणि सुधारणा झालेल्या या भूतलावर हिंसाचार माजवू नका,७१ यातच तुमचे भले आहे जर खरोखरीच तुम्ही ईमानधारक असाल.७२

(८६) (आणि जीवनाच्या) प्रत्येक मार्गावर वाटमारे बनून बसू नका की तुम्ही लोकांना भयग्रस्त करावे आणि श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना अल्लाहच्या मार्गापासून तुम्ही प्रतिबंध करावा आणि सरळमार्गाला वाकडे बनविण्यासाठी तुम्ही उत्सुक व्हावे. आठवा तो काळ जेव्हा तुम्ही थोडेसे होता. मग अल्लाहने तुमची संख्या वाढविली आणि डोळे उघडून पाहा की जगात उपद्रव माजविणाऱ्या लोकांचा काय शेवट झाला.

(८७) जर तुमच्यापैकी एक गट त्या शिकवणुकीवर, ज्याच्यासहित मला पाठविण्यात आले आहे, ईमान धारण करतो आणि दुसरा गट ईमान धारण करत नाही तर संयमाने पाहात राहा इथपावेतो की अल्लाहने आपल्या दरम्यान निर्णय करावा आणि तोच सर्वोत्तम न्यायनिवाडा करणारा आहे.''

(८८) त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी जे आपल्या मोठेपणाच्या दर्पात पडले होते, त्याला सांगितले, ''हे शुऐब! आम्ही तुला व त्या लोकांना ज्यांनी तुझ्यासमवेत श्रद्धा ठेवली, आपल्या वस्तीतून हाकलून लावू अन्यथा तुम्हा लोकांना आमच्या संप्रदायात परत यावे लागेल.'' शुऐबने उत्तर दिले, ''काय बळजबरीने आम्हाला परतविले जाईल, आम्ही तयार नसलो तरी?

(८९) आम्ही अल्लाहवर कुभांड रचणारे ठरू, जर आम्ही तुमच्या संप्रदायात परत आलो जेव्हा अल्लाहने त्यापासून आमची सुटका केली आहे. आमच्यासाठी त्याकडे परतणे आता कोणत्याही प्रकारे शक्य नाही याव्यतिरिक्त की आमच्या पालनकर्ता अल्लाहने तशी इच्छा केली.७३ आमच्या पालनकर्त्याचे ज्ञान प्रत्येक वस्तूवर व्याप्त आहे. त्याच्यावरच आम्ही भिस्त ठेवली. हे पालनकर्त्या! आमच्या व  आमच्या  देशबांधवांच्या  दरम्यान  ठीक-ठीक  निर्णय कर  आणि  तूच  सर्वोत्तम  निर्णय  करणारा  आहेस.''

(९०) त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी, ज्यांनी त्याच्या गोष्टी स्वीकार करण्यास नकार दिला होता, एकमेकांस सांगितले, ''जर तुम्ही शुऐबचे अनुयायित्व स्वीकारले तर नष्ट व्हाल.''७४

(९१) परंतु घडले असे की एका थरकांप उडवून देणाऱ्या संकटाने त्यांना गाठले व ते आपल्या घरांत पालथेच्या पालथेच पडलेले राहिले.

(९२) ज्या लोकांनी शुऐब (अ.) ला खोटे लेखले ते नाश पावले जणूकाही कधी त्या घरांत ते राहिलेच नव्हते. शुऐबला खोटे लेखणारेच शेवटी नष्ट झाले७५

(९३) व शुऐब (अ.) असे सांगून त्यांच्या वस्त्यांतून बाहेर पडला की, ''हे देशबांधवांनो! मी आपल्या पालनकर्त्याचे संदेश तुम्हाला पोहोचविले आणि तुमच्या हितचिंतकाचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले, आता मी सत्य नाकारणाऱ्या लोकांबद्दल खेद तरी कसा व्यक्त करणार?''७६

(९४) कधी असे घडले नाही की आम्ही एखाद्या वस्तीत पैगंबर पाठविला आणि त्या वस्तीतील लोकांना त्याआधी अडचणीच्या व कठीण परिस्थितीत टाकले नाही जेणेकरून ते विनम्र व्हावेत. (९५) मग आम्ही त्यांच्या दुरावस्थेला सुस्थितीत परिवर्तीत केले इतके की ते खूप संपन्न झाले व म्हणू लागले, ''आमच्या पूर्वजांवरदेखील बरे-वाईट दिवस येतच राहिले आहेत.'' सरतेशेवटी आम्ही त्यांना अचानक पकडले त्यांना कळलेसुद्धा नाही.७७ 


७१) या वाक्याचा सविस्तर अर्थ याच सूरहच्या टीप -४४ व ४५ मध्ये आला आहे. येथे मुख्य रूपात पैगंबर शुऐब (अ.) यांच्या कथनाचा संकेत याकडे आहे की सत्यधर्म आणि सत्चरित्रावर आधारित जीवनाची व्याख्या मागील पैगंबरांनी आपल्या मार्गदर्शन व नेतृत्वात पूर्ण केली होती, आता तुम्ही आपल्या विश्वास आणि आस्थेच्या मार्गभ्रष्टतेत आणि नैतिक पतनात त्यास बरबाद करू नका. 

७२) या वाक्याने स्पष्ट होते की हे लोक स्वत: ईमानचे दावेदार होते. याविषयी वर उल्लेख आला आहे. वास्तविकपणे जीवनव्यवस्थेत बिघाड झालेले मुुस्लिम होते. अवधारणात्मक तसेच नैतिक आणि चारित्र्यिक बिघाड आणि मार्गभ्रष्टतासह त्यांच्यात फक्त ईमानचा दावाच नव्हता तर यावर त्यांना गर्वसुद्धा होता. म्हणूनच पैगंबर शुऐब (अ.) यांनी सांगितले की तुम्ही ईमानधारक असाल तर तुमच्याकडे भलाई, चांगुलपणा, सत्यत आचरणात दिसले पाहिजे. तुमच्याजवळ भलाई आणि दुष्टतेचा  आदर्श  त्या  भौतिकवाद्यांपासून  वेगळा असला पाहिजे जे अल्लाह व परलोकला मानत नाहीत.

७३) हे वाक्य त्याच अर्थाने आहे. त्यात 'ईन्शा अल्लाह' (अल्लाहने इच्छिले तर) बोलले जाते. याविषयी सूरह १८ (कहफ) आयत २३-२४ मध्ये स्पष्ट केले आहे, ''एखाद्या गोष्टीविषयी दाव्याने सांगू नका की मी असे करीन.'' परंतु असे म्हणा की ''अल्लाहने इच्छिले तर असे करीन.'' कारण खरा ईमानधारक अल्लाह प्रभुत्वशाली असण्याचा व आपण त्याचे दास असून सर्वस्वी त्याच्याच अधीन आहोत, याची सतत जाणीव ठेवणारा आहे. तो आपल्या सामर्थ्यावर कधीही असा दावा करू शकत नाही की मी ही गोष्ट करूनच राहील किंवा हे काम कदापि करणार नाही. परंतु जेव्हा तो सांगेल तर म्हणेल की माझी इच्छा असे करण्याची किंवा न करण्याची आहे. परंतु माझी इच्छापूर्ती माझ्या स्वामीच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्याने सौभाग्य दिले तर सफल होईन नाही तर असफल राहीन.

४) या लहानशा वाक्याकडे वरवरची नजर टाकली जाऊ नये. हे वाक्य म्हणजे येथे थांबून गहण विचार करण्याची जागा आहे. मदयनचे सरदार आणि नेतागण तर सांगतच होते आणि आपल्या राष्ट्राला विश्वासात घेत होते की पैगंबर शुऐब (अ.) ज्या ईमानदारी आणि सत्यतेकडे बोलवित आहे तसेच चारित्र्य आणि आचरणाच्या या सिद्धान्ताची पाबंदी करण्यास सांगत आहे, त्यांना आम्ही स्वीकारले तर आमचा सर्वनाशच होईल आणि आमचा व्यापार चौपट होईल, जेव्हा आम्ही पूर्णत: सत्य बोलू लागलो आणि सच्च व्यवहार करू लागलो तर आमचा व्यापार चौपट होईल. आम्ही आता जगाच्या सर्वात मोठ्या राजमार्गाच्या चौफुलीवर वसलेलो आहोत तसेच इजिप्त् आणि इराकच्या सुसभ्य व भव्य राज्यांच्या सीमालगत आबाद झालेलो आहोत. आम्ही काफिल्यांना लुटणे बंद केले आणि साधेभोळे शांतीप्रिय लोक बनून राहिलो तर जे आर्थिक आणि राजनैतिक लाभ आपल्याला वर्तमान भौगोलिक स्थितीपासून मिळतात, ते सर्व नष्ट होतील. इतर शेजारील राष्ट्रांवर आमचा आज जो प्रभाव आहे तो नष्ट होईल. हे सर्व पैगंबर शुऐब (अ.) यांच्या राष्ट्रातील सरदारांपर्यंतच सीमित नव्हते तर प्रत्येक युगातील बिघडलेल्या लोकांनी सत्य आणि प्रामाणिकपणाच्या आचरणात याच संकटांना तोंड दिले. प्रत्येक युगातील बिघडलेल्या लोकांचा बिघाड निर्माण करण्यासाठी हाच विचार होता. व्यापार-उदिम, राजनीती आणि जगातील इतर व्यवहार अनैतिकतेविना,  झुठशिवाय आणि लबाडीविना चालूच शकत नाहीत. प्रत्येक ठिकाणी सत्यसंदेशांविरुद्ध जोरदार अपवाद आणि विवशता पुढे ठेवल्या गेल्या, त्यांच्यापैकी एक हीसुद्धा आहे की, जगाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन या संदेशाचे पालन करीत राहिले तर राष्ट्र आणि त्याचे नागरिक नष्ट होऊन जातील. 

७५) मदयनचा हा विनाश बराच काळ जवळच्या राष्ट्रांत म्हणीच्या रूपात प्रसिद्ध होता. पैगंबर दाऊद (अ.) वर अवतरित `जबूर' मध्ये एके ठिकाणी उल्लेख आहे, ''हे अल्लाह! अशा अशा राष्ट्रांनी तुझ्याविरुद्ध प्रण केला आहे म्हणून तू त्यांच्याशी तोच व्यवहार कर जसा मदयानशी तू केला होता.'' (८३ : ९-१५) यशाहयाह पैगंबर एके ठिकाणी  बनीइस्राईलींना  सांत्वन  देत  म्हणतात, ''आशूरवाल्यांशी  भिऊ  नका  जरी   ते   तुमच्याशी    इजिप्त्  लोकांसारखा  अत्याचार  करीत  आहेत.  काही   काळानंतर  सेनांचा  प्रभु त्यांच्यावर  आपला वार करील आणि त्यांचा परिणाम तोच होईल जो मदयानचा झाला होता.'' (यशाहयाह - १० : २१-२६)

७६) या सर्व ऐतिहासिक घटनांचा येथे उल्लेख केला आहे, त्या सर्वांच्या माध्यमाद्वारा आपल्या ''प्रियतमच्या रहस्याचा उल्लेख'' ही शैली स्वीकारली गेली आहे. प्रत्येक घटना या मामल्याशी सुयोग्य बनते जी आज पैगंबर मुहम्मद (स.) आणि आपल्या अनुयायांशी घटित होत होती. प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा केंद्रबिंदू एक पैगंबर आहे. पैगंबरांची शिकवण, त्यांचे संदेश आणि उपदेश, त्यांची हितैषिता, त्यांचे वैश्विक कल्याणकार्य अशाप्रकारे सर्वकाही ठीक त्याचे आहेत जे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे होते. या ऐतिहासिक घटनांचा दुसरा पक्ष सत्याला नाकारणारी मंडळी आणि राष्ट्र आहे. त्यांच्या धारणाविषयीची मार्गभ्रष्टता, नैतिक दोष, अज्ञानतापूर्ण हठधर्मीपणा, त्यांच्या सरदारांचा व नेत्यांचा अहंभाव, तसेच मार्गभ्रष्ट लोकांचा आपल्या मार्गभ्रष्टतेवर गर्व व आग्रह इ. सर्व तेच आहे जे कुरैश लोकसमूहात आढळत होते. प्रत्येक घटनेतील नाकारणाऱ्या राष्ट्राचा जो परिणाम झाला तोच परिणाम कुरैश लोकांच्या पुढे ठेवून त्यांना बोध घेण्याचे आवाहन केले. याद्वारे कुरैश लोकांना सचेत केले गेले. त्यांना सांगितले गेले की तुम्ही अल्लाहने पाठविलेल्या पैगंबराची शिकवण स्वीकारली नाही आणि तुमच्या जीवनपद्धतीला सुधारण्याची जी संधी तुम्हाला उपलब्ध आहे, तिला तुम्ही अज्ञानात वाया घालू नका. अन्यथा तुम्हालाही त्याच विनाशाला सामोरे जावे लागेल जे नेहमी पथभ्रष्ट आणि बिघाडावर गर्व करणाऱ्या आणि आग्रह धरणाऱ्या राष्ट्राला सामोरे जावे लागलेले आहेत. 

७७) एक एक पैगंबर आणि एक एक राष्ट्राच्या घटनांचा वेगवेगळा उल्लेख केल्यानंतर आता हा व्यापक नियम  सांगितला जात आहे. ज्याला अल्लाहने प्रत्येक युगात पैगंबरांना पाठवितांना अवलंबिला आहे. तो नियम म्हणजे जेव्हा  एखाद्या राष्ट्रात  पैगंबर  पाठविला  गेला  तेव्हा  प्रथमत: त्या राष्ट्राच्या बाह्य वातावरणाला संदेश  स्वीकार करण्यास पूर्णता अनुकूल बनविले. म्हणजे त्या राष्ट्राला संकटात आणि कठीण परिस्थित टाकले गेले. अकाल (दुष्काळ) महामारी, युद्ध, कारभारातील घाटा, लढाईतील पराजय इ. विपदा त्या राष्ट्रांवर टाकल्या गेल्या जेणेकरून समाजमन मृदु व्हावे. गर्वाने आणि हठधर्मीपणामुळे अकडलेली मान ढीली व्हावी, त्याचे सामर्थ्यांचे घमेंड आणि संपत्तीचा नशा उतरावा, आपली साधनसामुग्री आपली शक्ती आणि आपल्या योग्यतांवर त्याचा विश्वास डगमगावा. त्या राष्ट्राला जाणीव व्हावी की वर एक अशी शक्ती आहे जिच्या हातात त्या राष्ट्राचे भाग्य आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी राष्ट्र तयार होते. ते राष्ट्र आपल्या निर्माणकर्ता प्रभु अल्लाहपुढे नतमस्तक होण्यास तत्पर होते. अशा अनुकूल वातावरणातसुद्धा सत्य स्वीकारण्यास जे राष्ट्र तयार होत नाही तेव्हा त्याला समृद्धीच्या परीक्षेत टाकले जाते आणि येथून त्याच्या विनाशाची सुरुवात होते. जेव्हा ते राष्ट्र अल्लाहच्या देणग्यांनी मालामाल होते तेव्हा आपले वाईट दिवस विसरतात. त्या राष्ट्राच्या समाजमनात तेथील अल्प शिक्षित मार्गदर्शक इतिहासाचा विपर्यास करून टाकतात. ते पटवून सांगू लागतात की परिस्थितीचा हा उतार व चढाव आणि भाग्य, विकास, बिघाड निर्माणकर्त्याच्या प्रबंधातील नैतिक आधारावर होत नाही तर हे असे चालत राहाते तेसुद्धा अनैतिक कारणांमुळे. म्हणून संकटे आणि कठीण स्थिती येण्यामुळे नैतिक बोध घेणे आणि उपदेश करणाऱ्यांचा उपदेश ऐकून अल्लाहची क्षमायाचना करणे एक मानसिक दुर्बलता आहे, असे लोकांना पटविण्याचे कार्य ते तथाकथित दार्शनिक करत राहातात. याच मूर्ख मनोवृत्तीचा आलेख एका हदीसकथनाद्वारे दिला आहे. ``विपत्ती, संकट ईमानधारकांना सुधारत जाते जेव्हा ईमानधारक या भट्टीतून तावून सुलाखून तसेच असत्यापासून पवित्र होऊन बाहेर पडतो. परंतु दांभिकाची दशा मात्र गाढवासारखी असते. गाढवाला समजत नाही की त्याच्या स्वामीने त्याला का बांधले आहे आणि त्याला का सोडून दिले?'' जेव्हा एखाद्या राष्ट्राची स्थिती अशी बनते की संकटांनी तेथील समाजमन विरघळत नाही आणि अल्लाहपुढे नतमस्तक होत नाही, देणग्यांमुळे ते राष्ट्र अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करीत नाही की सुधार करण्यास प्रवृत्त होत नाही. अशा स्थितीत त्या राष्ट्राचा विनाश अटळ बनतो. तो त्या राष्ट्रावर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. या आयतींमध्ये अल्लाहने ज्या नियमांचा उल्लेख केला आहे, ठीक तेच नियम पैगंबर मुहम्मद (स.) यांना पैगंबरत्व बहाल करते वेळीसुद्धा अवलंबिले गेले. दुर्भाग्याने पीडित राष्ट्राच्या ज्या कार्यनीती व जीवनव्यवहाराकडे संकेत केला आहे, ठीक तीच कार्यनीती सूरह ७ (आअराफ) अवतरणावेळी कुरैश लोकसमूहात प्रकट होत होती. हदीसमध्ये अब्दुल्लाह बिन मसऊद आणि अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांचे कथन आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्व बहालीनंतर कुरैशच्या लोकांनी त्यांच्या संदेशविरुद्ध मोहीम उघडली तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रार्थना केली.  ``हे अल्लाह! यूसुफच्या काळात जसा सात वर्षे दीर्घकाळ दुष्काळ पडला होता त्याच दुष्काळाद्वारा या लोकांविरुद्ध माझी मदत कर.'' म्हणून अल्लाहने कुरैशच्या राष्ट्राला दुष्काळग्रस्त केले. दशा ही झाली की लोक मृत जनावरे खाऊ लागले, कातडी, हाड आणि लोकर खाऊ लागले. मक्का येथील लोकांनी अबू सुफियानच्या नेतृत्वात पैगंबर मुहम्मद (स.) यांना विनंती केली की आमच्यासाठी अल्लाहशी प्रार्थना करा. परंतु जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या प्रार्थनेमुळे अल्लाहने ते संकट दूर केले आणि खुशालीचे दिवस आले तेव्हा ते लोक अधिकच गर्विष्ठ बनले आणि ज्यांची मन विरघळली त्यांनासुद्धा राष्ट्रातील दुष्ट लोकांनी ईमानापासून रोखले. ते म्हणू लागले की हे तर कालचक्र आहे. पूर्वी दुष्काळ पडतच होते. ही काही नवीन गोष्ट नाही की या वेळी  मोठा  दुष्काळ  पडला.  म्हणून  यापासून  धोका  खावून  पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या  फंद्यात अडकू नये. हे भाषण त्या वेळी होत होते जेव्हा हा अध्याय आअराफ अवतरित झाला. म्हणून कुरआनच्या या आयती ठीक प्रसंगानुरुप आहेत आणि याच पार्श्वभूमीला डोळयांसमोर ठेवून त्यांची सार्थकता लक्षात येते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget