Halloween Costume ideas 2015
August 2018

कुर्बानीचा (बलिदानाचा) अर्थ सर्वसाधारणपणे ‘ईद-उल-अजहा’ म्हणजेच बकरीदच्या दिवशी बकरे, उंट वगैरे प्राणांच्या बलिदानाशी संबंधित आहे. हे जरी खरे असले तरी इस्लाम धर्माला  आपल्या अनुयायांकडून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बलिदानाची अपेक्षा असते. यात संपत्ती व जीवनाचे बलिदान, दारिद्र्यात खितपत असलेल्या गोरगरीब लोकांच्या सेवेस जीवन वाहून  घेण्याचे बलिदान महत्त्वाचे ठरते. इतरांसाठी दिले जाणारे बलिदान हाच कुर्बानीचा खरा अर्थ आहे.
प्राण्याचे बलिदान हे फक्त एक प्रतीक आहे. प्रेषित इब्राहीम (अ.) यांनी अल्लाहकरिता प्रत्येक प्रकारचे बलिदान दिले. इतकेच काय आपल्या लाडक्या पुत्राचेदेखील बलिदान दिले, परंतु  ईश्वरकृपेने त्यांचा पुत्र जिवंत राहिला. प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्या निष्ठेला सलाम करण्याचा सण म्हणजेच बकरीद होय. त्यांच्या या भावनेमध्येच संपूर्ण समाजाचे कल्याण आणि  पालनकर्त्याची प्रेरणा सामावलेली आहे. कुर्बानीचा मूळ अर्थ ‘संरक्षणासाठी सदासर्वदा तत्पर राहाणे’ असा आहे. अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, प्रत्येक व्यक्तीने आपले  कुटुंब, समाज, शहर अथवा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.
इस्लाममध्ये सर्व कर्म ईशनिष्ठेसाठीच केले जातात. परंतु बकरीदद्वारा सामाजिक एकता आणि समाजकल्याणाची कामना केली जाते आणि यात समाजाचे ऐक्य अबाधित राखण्याचे  कार्य पार पाडले जाते. इस्लाममध्ये ‘कुर्बानी’चा अर्थ आहे ‘आपला वेळ, आपली संपत्ती आणि इतकेच नव्हे तर स्वत:चे बलिदानदेखील ईशमार्गात देणे. ईशमार्गात खर्च करण्याचा संबंध सत्कर्माशी आहे. समाजकल्याण हाच याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे रमजान ईदसारखीच बकरीदलादेखील गरीब व गरजवंतांना मदत केली जाते. इस्लाम प्रत्येकास आपले कुटुंब,  आपला समाज व आपले राष्ट्राचे दायित्व पूर्णपणे पार पाडण्याचा आदेश देतो.
ईद-उल-अजहा हा सण प्रेषित इब्राहीम यांच्या  बलिदानाची आठवण करून देणारा आहे. सर्व जगातील मुस्लिम बांधव तो साजरा करतात. लाक्षणिक रूपाने ते जनावरांचे बलिदान करून  कृतीने ही गोष्ट सिद्ध करतात. प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्या कुर्बानीच्या आठवणीने आमच्या आत्मिक मूल्यांची वृद्धी होते. ईशप्रेमाची भावना वाढत जाते आमि अल्लाहच्या मार्गात आपले  प्राण व धनसंपत्ती कुर्बान करण्याची भावना दृढ बनते. सर्वश्रेष्ठ अल्लाहचे काटेकोर आज्ञापालन करणे, त्याने दिलेली कर्तव्ये सच्च्या मनाने पार पाडणे आणि त्याचे नाव चिरकाल  राखण्यासाठी आपले अस्तित्व संपविण्याचाही निर्धार करणे; ही उपासनेची व आराधनेची सर्वोच्च श्रेणी ठरते. मानवी जीवन हे ईश्वराकडे मानवाने केलेल्या प्रवासाची गोळाबेरीज आहे. त्या  प्रवासाची अशी निकड आहे की जर वेळ आली आणि तशी गरज भासली तर सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या दिशेने हिजरत करावी. भौतिक जीवनाचे आस्वाद  सौंदर्य यांचे कसलेही आकर्षण बाळगू नये. एक अधिक शक्तिमान आकर्षण त्याला ईश्वराकडे ओढत नेत असावे. आपल्याला इच्छा-वासनांचा मोह घालून दिशाभूल करणाऱ्या शैतानाच्या  कारवायांवर मात करावी व त्याच्यावर विजय मिळवावा. कुर्बानी त्याग हा एक असा उच्चतम गुण आहे ज्यामुळे मानवी जीवन उन्नतीच्या, सफलतेच्या शिखरावर पोहोचू शकते. प्रत्येक  प्रकारच्या सफलतेसाठी कुर्बानी व त्याग यांची निकडीची गरज असते. ही एक अखंडनीय वास्तवता आहे. मग ती कुर्बानी ऐहिक उद्देशांसाठी दिलेली असो की आत्म्याच्या उद्धारासाठी  आणि पारलौकिक जीवनाच्या सफलतेसाठी असो. थोडक्यात म्हणजे जे कुर्बानी देतात, त्याग करतात त्यांनाच सफलता प्राप्त होते. ही गोष्ट आपण दररोज आपल्या डोळ्यांनी पाहात  असतो.
आपल्या सभोवतालच्या घटनांचे व परिस्थितीचे जेव्हा अवलोकन करतो, तेव्हा आपणास स्पष्टपणे दिसून येते की ज्या कोणी माणसांनी ज्या क्षेत्रात विकास व उन्नती प्राप्त केली आहे,  यशाच्या शिखरावर पोचले आहेत, ते त्यांच्या कुर्बानी व त्यागाचेच फळ आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हटले जाऊ शकते की कुर्बानी व त्याग हेच यशाचे मूळ आहे. माणूस  आपला व्यापारधंदा यशोशिखरावर नेण्यासाठी रात्रंदिवस सतत प्रयत्नशील असतो. एक दिवस असा येतो की आपल्या या सर्व त्यागांच्या फलस्वरूप, तो एक मोठा व्यापारी म्हणून  भरभराटीस येतो. आपल्या उद्दिष्टांत तो पूर्णत: यशस्वी होतो. हीच स्थिती विद्यार्जन करणाऱ्यांची, शेतकऱ्यांची, वर्तमानकाळातील वैज्ञानिकांची, धार्मिक व राजकारणी नेत्यांची असते.  मानवी जगामध्ये प्रेषितांचे स्थान व दर्जा सर्वापत उच्च आहे, म्हणून त्यांना अतिशय खडतर कसोट्यांतून व अग्निदिव्यांतून जावे लागते आणि त्यांनी जो असीम व अतुलनीय त्याग व  बलिदाने दिली, ती तितकीच आश्चर्यकारक आहेत. त्यांच्यापैकी प्रेषित इब्राहीम (अ.) यांचा त्याग व त्यांनी दिलेली बलिदाने अतुलनीय आहेत.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

मा. अबू हुरैरा (र.) कथन करतात की, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही, अल्लाहची  शपथ! तो मोमिन नाही, अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही!’’ लोकांनी आश्चर्याने विचारले, ‘‘कोण? हे पैगंबर (स.)’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तो माणूस कदापि ईमानधारक नव्हे जो शेजाऱ्यांना त्रास देत असेल वा छळत असेल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरूपण
माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची एक ओळख त्याचा शेजाऱ्यांशी व्यवहारसुद्धा आहे. जो शेजाऱ्यांना, मग ते कुठल्याही जातिधर्माचे असोत, त्रस्त करीत असेल, छळत असेल तो मुळीत  ईमानधारकच नाही अशी ठाम भूमिका पैगंबर (स.) घेतात. ईमानच नसेल तर चारित्र्य ते कुठले?
पैगंबर मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ‘‘अल्लाहची शपथ! तो मोमिन अर्थात मुस्लिम नाही जो स्वत: तर पोटभर जेवतो मात्र त्याचा शेजारी उपाशी झोपतो.’’ (मिश्कात)
‘ईमान’ खरे तर माणसाच्या मनात वास करतो. त्याचे उदाहरण असे आहे जणू मनात एक बीज रोवावे, ज्याचे एका महान वृक्षात रूपांतर व्हावे, ज्यापासून मानवजातीला गोड फळे  लाभावीत, सावलीही लाभावी आणि इतरही लाभ व्हावेत.
शेजाऱ्यापाचाऱ्यांशी सद्व्यवहार करणे, त्यांच्या सुखदु:खात सहकार्य करणे ही ‘ईमान’ची लक्षणे आहेत. या उलट शेजाऱ्यांना त्रास देणे, छळणे ही ‘ईमान’ नसल्याची लक्षणे आहेत. आपल्या  देशात जवळपास वीस कोटी मुस्लिम राहातात. उर्वरित ऐंशीनव्वद कोटी मुस्लिमेतर बांधव त्यांचे शेजारी आहेत. पैगंबरांचा शेजारधर्माचा हा एक उपदेश जरी मुस्लिमांनी अंमलात आणला  तरी इतर धर्मीयांमध्ये त्यांच्याविषयी  द्वेष, घृणा, मत्सर राहील का?
म्हणून कवीने म्हटलंय,
‘‘जुबां से कह भी दिया ला इलाह तो क्या हासिल?
दिलो निगाह जो मुसलमाँ नहीं, तो कुछ भी नहीं।’’
अर्थात- निव्वळ इस्लामचा उच्चार
करण्याला काहीच अर्थ नाही. आचारविचार, चारित्र्यात
इस्लाम नसेल तर सारे व्यर्थ आहे.
(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

(८२) यानंतर जो आपल्या करारापासून पराङ्मुख होईल तो अवज्ञाकारी (फासिक)आहे.’’७०
(८३) आता काय हे लोक अल्लाहच्या आज्ञापालनाची पद्धत (अल्लाहचा दीन) सोडून इतर एखादी पद्धत इच्छितात? वास्तविक पाहता आकाश व पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते  आपणहून किंवा अपरिहार्यपणे अल्लाहला समर्पित (मुस्लिम) आहेत.७१ आणि त्याच्याकडे सर्वांना रुजू व्हायचे आहे
(८४) हे पैगंबर (स.)! सांगा , ‘‘आम्ही अल्लाहला मानतो, त्या शिकवणींना मानतो जी आम्हांवर उतरली आहे. त्या शिकवणीलादेखील मान्य करतो ज्या इब्राहीम (अ.), इस्माईल (अ.),  इसहाक (अ.), याकूब (अ.) आणि याकूब (अ.) च्या संततीवर उतरल्या होत्या आणि त्या आदेशांवरदेखील श्रद्धा ठेवतो जे मूसा (अ.) व इसा (अ.) आणि इतर पैगंबरांना त्यांच्या  पालनकर्त्याकडून दिले गेले. आम्ही त्यांच्यापैकी एकाच्यामध्ये भेदभाव करीत नाही.७२ आणि आम्ही अल्लाहच्या आदेशांच्या अधीन (मुस्लिम) आहोत.’’
(८५) या आज्ञाधारकते (इस्लाम)  शिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपद्धत) अंगीकारत असेल, त्याची ती जीवनपद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये
तो अयशस्वी व विफल होईल.
(८६) कसे शक्य आहे की, अल्लाह त्या लोकांना मार्गदर्शन प्रदान करील ज्यांनी श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर पुन्हा द्रोहाचा (नाकरणे) अंगीकार केला. वास्तविक पाहता त्यांनी स्वत: या  गोष्टींची ग्वाही दिलेली आहे की हा पैगंबर सत्याधिष्ठित आहे. आणि त्यांच्याकडे उज्ज्वल संकेतवचनेदेखील पोहचली आहेत.७३ अल्लाह तर अत्याचाऱ्यांना मार्गदर्शन करीत नसतो.
(८७) त्यांच्या अत्याचाराची योग्य शिक्षा तर हीच आहे की त्यांच्यावर अल्लाह आणि दूत व समस्त माणसांचा शाप आहे.
(८८) अशाच स्थितीत ते सदैव राहतील, त्यांच्या शिक्षेत सूटही मिळणार नाही किंवा त्यांना सवडदेखील दिली जाणार नाही.
(८९) तथापि ते लोक वाचतील जे लोक यानंतर तौबा (पश्चात्ताप) करून आपल्या आचरणात सुधारणा करतील, अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आहे.
(९०) परंतु ज्या लोकांनी श्रद्धा ठेवल्यानंतर अश्रद्धेचा अंगीकार केला आणि अश्रद्धेतच पुढे जात राहिले७४ त्यांचा पश्चात्ताप कदापि स्वीकारला जाणार नाही, असले लोक तर पक्के  मार्गभ्रष्ट आहेत.
(९१) खात्री बाळगा, ज्या लोकांनी अश्रद्धेचा अंगीकार केला आणि अश्रद्धेच्या स्थितीतच प्राण सोडले, त्यांच्यापैकी एखाद्याने स्वत:ला शिक्षेपासून वाचविण्यासाठी पृथ्वी भरून जरी सोने  मोबदल्यात दिले तरी ते स्वीकारले जाणार नाही. अशा लोकांसाठी दु:खदायक शिक्षा तयार आहे आणि त्यांना आपला कोणीही साहाय्यक आढळणार नाही.
(९२) तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.७५ जे काही तुम्ही खर्च कराल त्याविषयी अल्लाह सर्वज्ञ आहे.




७०) याचा उद्देश ग्रंथधारक लोकांना सचेत करणे आहे की तुम्ही लोक अल्लाहच्या वचनाला तोडत आहात. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा विरोध करून आणि त्यांना अमान्य करून तुम्ही  वचनभंग करीत आहात, जे तुमच्या पैगंबरांकडून घेतले गेले होते. म्हणून आता तुम्ही विद्रोही बनून राहिला आहात आणि अल्लाहच्या आज्ञापालनाशी विमुख झाला आहात.
७१) अर्थात संपूर्ण सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक वस्तूचा धर्म तर इस्लाम आहे. म्हणजेच अल्लाहचे आज्ञापालन आणि अल्लाहची बंदगी आता तुम्ही या सृष्टीत राहून इस्लामव्यतिरिक्त  दुसऱ्या कोणत्या जीवनपद्धतीला शोधत आहात?
७२) आमची पद्धत ही नाही की आम्ही एखाद्या पैगंबराला मानावे आणि एखाद्याला मानू नये. एखाद्या पैगंबराला खोटे ठरवावे आणि दुसऱ्याला खरे ठरवावे. आम्ही तर भेदभाव आणि  अज्ञानतापूर्ण पक्षपातापासून मुक्त आहोत. जगात कोठेही अल्लाहचा दास अल्लाहकडून सत्य घेऊन आला, आम्ही तो सत्याधिष्ठित असण्याची ग्वाही देतो.
७३) येथे पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली आहे ज्याला या अगोदर अनेकदा सांगितले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात अरब यहुदी -जानकार पूर्ण ओळखून होते  आणि त्यांनी तोंडी ग्वाहीसुद्धा दिली होती, की मुहम्मद (स.) खरे पैगंबर आहेत आणि जी शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत आहे; तीच शिकवण पूर्वींच्या पैगंबरांची होती. तरीसुद्धा त्या  यहुदी विद्वानांनी जे काही केले ते पक्षपात, दुराग्रह आणि सत्याशी शत्रुत्वाच्या जुन्या सवयीचा परिणाम होता ज्याविषयी ते शतकानुशतके अपराधी बनून राहिले आहेत.
७४) म्हणजे केवळ नकार देण्यावरच थांबले नाहीत तर व्यावहारिकतेत त्यांचा कडाडून विरोध केला, अडथळे निर्माण केले. लोकांना अल्लाहच्या मार्गापासून (इस्लाम) रोखण्यासाठी जीवाचे  रान केले. शंकाकुशंका काढल्या व लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला. त्यांनी (यहुदी) कुटिल डावपेच रचले, जोडतोड केली जेणेकरून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मिशन कशाही प्रकारे  सफल होऊ नये.
७५) येथे त्यांची ही भ्रांति दूर केली गेली आहे जे हे लोक सदाचाराविषयी (नेकी) बाळगत होते. त्यांच्याजवळ नेक कामाची श्रेष्ठ कल्पना हीच होती की पूर्वजांच्या चालत आलेल्या  परंपरांतून जे बाह्य स्वरूप त्यांच्याजवळ होते त्यालाच पूर्णत: जीवनात उतरवावे. यांच्या धार्मिक नेत्यांच्या कायद्याचा कीस काढण्याच्या वृत्तीच्या परिणामस्वरुप एक भली मोठी  विधीव्यवस्था बनली त्यानुसार जीवनयापन करीत राहावे. अशा या मानवनिर्मित व्यवस्थेच्या प्रचलनामागे यहुदींच्या मोठमोठ्या धर्ममार्तंडाची संकुचित वृत्ती, लोभ, कंजूषी, सत्य  लपविणे आणि सत्य विकणे अशासारखे अवगुण लपविलेले होते आणि सर्वसाधारण लोक यास नेकी (सदाचार) समजत होते. हाच भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी त्यांना स्पष्टत: सांगितले  जात आहे की सदाचारी (नेक) मनुष्य बनण्याची कसोटी तुम्ही समजता त्यापेक्षा उच्च्तर आहे. नेकीचा (सदाचाराचा) मूळ आत्मा अल्लाहशी प्रेम आहे. असे प्रेम की अल्लाहला प्रसन्न  करण्याच्या मुकाबल्यात जगातील कोणतीच गोष्ट प्रिय नसावी. ज्या गोष्टीचे प्रेम मनुष्याच्या मनात इतके घर करून राहावे की जिला अल्लाहच्या प्रेमाखातर तो त्यागू शकत नाही. तर  हीच आसक्ती त्याचे दैवत आहे. जोपर्यंत मनुष्या या मूर्तीला दैवताला नष्ट करत नाही, सदाचाराचे द्वार त्याच्यासाठी बंद असते. या भावापासून रिक्त झाल्यानंतर बाह्य धार्मिकता तर  त्या चमकणाऱ्या रंगा सारखी आहे; ज्याने वाळवी लागलेले लाकूड रंगविण्यात आले आहे. मनुष्य अशा चमकदार गोष्टींनी धोका खाऊ शकतो परंतु अल्लाह कदापि अशा धोक्यात येऊ  शकत नाही.

अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातील सुधारणांचे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने अनेक राजकीय मंडळींनी आता राजकारणाचे पुढचे पाऊल टाकत त्यांनी अल्पसंख्याकांना  आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी करून मोदी सरकारसमोर नवा पेच निर्माण केला आहे. गरीब मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था असायला हवी अशी मागणी पुढे  येत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे. सरकारी सेवकांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. त्यात जनजीवन विस्कळीत होऊन सरकारी कायालये बंद  असल्यामुळे अनेक ठिकाणी कामकाज बंदच होते. अशा प्रतिकूल वातावरणात जळगाव आणि सांगली महापालिका निवडणुकांचे निकाल मात्र भाजपला नवे बळ देणारे ठरले.  मुख्यमंत्र्यांनी फारसा जोर न लावता अथवा तेथे हजेरी न लावतासुद्धा दोन्ही महापालिकांमध्ये भाजपचे कवळ उमलले आहे. म्हणजे राज्यात मराठा आंदोलकांनी सरकारविरोधी मोर्चे  काढून आरक्षणाची मागणी करत भाजपवर टीका केली आहे तर दुसरीकडे तीच जनता सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे आढळून येते. यात अनेक प्रकारच्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे.
ईव्हीएमच्या गैरवापरापासून ते विविध राजकीय पक्षांच्या गटातटांमधील नाराजीपर्यंत अनेक कयास लावले जात आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलने, संपाचे इशारे, त्यातच  निवडणुकांचे निकाल अशा भरगच्च घडामोडींनी हा सप्ताह गाजला. येत्या १५ नोव्हेबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस पाऊल उचलता येणार नाही असे सरकारतर्फे सांगितले जात आहे.  राज्यातील ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यासाठी विनावापर इमारती, खासगी इमारती घेऊन ऑगस्टअखेरपर्यंत वसतिगृहे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. असे करून आता सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना  तुष्टीकरणाचे गाजर दाखविण्यास सुरूवात केली आहे. यामागचे खरे कारण येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दडलेले आहे. हे सारे मराठा आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सरकार करीत  असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यातच धनगर समाजानेही आरक्षणासाठी कंबर कसली आहे. धनगर समाजातील विविध संघटनांनी १५  ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उच्च न्यायालयानेही त्याची दखल घेत आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान निष्पापांचे  बळी जाऊ देऊ नका अशी मराठा आंदोलनकर्त्यांना सूचना दिली आहे. याच कालखंडात राज्यात मराठा आंदोलकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, तर धनगर आंदोलक आणि ओबीसी संघटनांनीदेखील सरकारला इशारा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारची आणखी एक सत्वपरीक्षा नव्याने घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  राज्यात मराठा आंदोलनामुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजप सरकारला मोठी उभारी व आत्मविश्वास जळगाव आणि सांगलीत महापालिका निवडणूक निकालाने मिळाला आहे. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी प्रचाराला न जाताही राज्यातील जळगाव व सांगली महापालिका जिंकून यशस्वी झाले आहेत. आज आंदोलने होत आहेत. त्या मागण्या रास्त असून सरकार त्या  मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. सांगली-कुपवाडमध्ये शिवसेनेला खातेदेखील खोलता आले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला जळगावात खाते उघडता आले नाही. मराठा आरक्षणाचा  विचार करताना वरील पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. तसे पाहता ही मागणी अलीकडील काळातील नसून १९९७ पासून ती होत आहे. यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमण्यात गेल्या  असून त्यांचे अहवालही प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी एक असणार्या न्या. आर. एन. बापट समितीने मराठा समाज हा मागासवर्गीय प्रवर्गात येतो हे मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला  होता.
नारायण राणे समितीने १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला द्यावे असे सांगितले. मात्र राज्यातील आरक्षण हे ७३ टक्क्यांच्या वर जाते आहे असे कारण देत उच्च न्यायालयाने त्याला  स्थगिती दिली. त्यानंतर हा मुद्दा अधिक प्रमाणात चर्चेत येण्याची सुरुवात झाली. आताच्या सरकारने आरक्षण देण्यासंदर्भातील आश्वासन दिल्यामुळे आणि ते अद्यापही पूर्ण न  झाल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ बनला. ते आता आरक्षण केवळ जातीच्या निकषावर द्यायचे की निव्वळ आर्थिक निकषावर, याचा विचार कधीतरी करावाच लागेल. मतपेढ्यांच्या  सवंग राजकारणापोटी देशाला दुहीच्या आगीत ढकलण्याच्या राजकीय प्रवृत्तीकडून ही हिंमत दाखविली जाण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. केवळ २०१९ चा विचार करुन भूमिका  घेतल्या जाणे हे निश्चितच जनतेच्या हिताचे ठरणार नाही.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

मा. अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात की, आम्हाला पैगंबरांनी उपदेश केला, ‘‘तरुणांनो, वैवाहिक पात्रता असणाऱ्यांनी जरूर विवाह करावा. त्यामुळे दृष्टी-संयम प्राप्त होतो आणि  माणूस चारित्र्यसंपन्न होतो. मात्र पात्रता नसणाऱ्यांनी रोजे (उपवास) ठेवावेत. रोजा वासनांवर नियंत्रण ठेवण्यात गुणकारी आहे.’’ (मुस्लिम व बुखारी)
निरुपण-
वैवाहिक पात्रता असणाऱ्याने अविवाहित राहणे कदापि योग्य नव्हे. त्याने जरूर विवाह करावा. वैध मार्गाने लैंगिक गरजेची परिपूर्ती केल्याने माणूस व्यभिचारापासून सुरक्षित होतो. अविवाहित व्यक्ती सदैव सैतानाच्या जबड्यात असते. विषयसुखाची भूक माणसाला वाममार्गाकडे नेऊ शकते.
तरुण मुलामुलींना अधिक काळ वैवाहिक जीवनापासून वंचित ठेवल्याने समाजात अनेक घृणास्पद व अनैतिक समस्या फोफावतात. विषयसुखाचा एकमेव वैध मार्ग म्हणजे विवाह आहे. मानवजातीची जोडप्याच्या स्वरूपात निर्मिती ही अल्लाहची महान कृपाच आहे, असे कुरआन म्हणतो. पती-पत्नी एकमेकांच्या पोषाखासमान आहेत, असेही कुरआनात वर्णन आहे.  इस्लाम माणसाला चारित्र्यसंपन्नतेच्या उच्चतम शिखरापर्यंत पोहचवू इच्छितो. त्यासाठी विवाह अनिवार्य आहे. चारित्र्यसंपन्न व्यक्ती, चारित्र्यसंपन्न कुटुंब व चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीमध्ये विवाहाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र काही लोक विवाह करणे, संसार करणे इ. बाबींना अध्यात्मापासून वेगळे समजतात. हे कदापि योग्य नव्हे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा स्पष्ट सांगितले की, पत्नीशी संभोग करणेदेखील पुण्यच आहे. त्यावर एकाने आश्चर्याने विचारले की, ते कसे? पैगंबरांनी त्याला प्रतिप्रश्न केला की  जर तो व्यभिचार करत असेल तर ते पाप नव्हे काय? तो म्हणाला होय, ते पापच! मग पैगंबर म्हणाले की जर व्यभिचार करणे पाप असेल तर पत्नीशी संभोग करणे पुण्य का नसावे?
खरे तर अविवाहित माणसाची नीतिमत्ता कधी ढासळेल याचा नेम नाही. म्हणूनच आपण पाहतो आज समाजात तथाकथित चांगली वाटणारी माणसे, अगदी बुवा-बापूदेखील  व्यभिचारामुळे तुरुंगात खितपत आहेत.
(संकलन : डॉ. सय्यद रफीक)


(७७) उरले ते लोक जे अल्लाहशी केलेला करार व आपल्या शपथा अल्पशा किमतीवर विकून टाकतात तर त्यांच्यासाठी पारलौकिक जीवनात कोणताही वाटा नाही. अल्लाह कयामतच्या  दिवशी त्यांच्याशी बोलणारही नाही, त्यांच्याकडे पाहणारही नाही आणि त्यांना पवित्रही करणार नाही६५ किंबहुना त्यांच्यासाठी तर अत्यंत यातनादायक शिक्षा आहे.
(७८) त्यांच्यात काही लोक असे आहेत जे ग्रंथ वाचताना अशाप्रकारे जीभ वेडीवाकडी वळवितात की तुम्ही समजावे जे काही ते वाचत आहेत ते ग्रंथातीलच मजकूर होय, वास्तविक  पाहता तो मजकूर ग्रंथातील नसतो.६६ ते म्हणतात की हे जे काही आम्ही वाचत आहोत हे अल्लाहकडून आहे. खरे पाहता ते अल्लाहकडून असत नाही, ते जाणूनबुजून असत्य गोष्टीचा  संबंध अल्लाहशी जोडतात.
(७९) कोणत्याही माणसाचे हे काम नव्हे की अल्लाहने त्याला ग्रंथ आणि विवेकपूर्ण निर्णय शक्ती व पैगंबरत्व प्रदान करावे आणि त्याने लोकांना म्हणावे की अल्लाहऐवजी तुम्ही माझे  दास बना. तो तर हेच म्हणेल की खऱ्या अर्थी रब्बानी६७ (धर्मोपदेशक) बना, जशी त्या ग्रंथाच्या शिकवणीची अपेक्षा आहे ज्याचे तुम्ही पठण करता व पाठ देता.
(८०) तो तुम्हाला कदापि असे सांगणार नाही की अल्लाहच्या दूतांना अथवा पैगंबरांना आपला पालनकर्ता माना. हे शक्य आहे का की एखाद्या पैगंबराने तुम्हाला ईशद्रोहाची आज्ञा द्यावी  जेव्हा तुम्ही मुस्लिम (आज्ञाधारी) असाल.?६८
(८१) स्मरण करा, अल्लाहने पैगंबरांकडून वचन घेतले होते, की आज मी तुम्हाला ग्रंथ, विवेक व बुद्धिमत्तेने उपकृत केले आहे. उद्या जर एखादा दुसरा पैगंबर तुमच्याजवळ त्याच  शिकवणीची ग्वाही देणारा आला जी शिकवण अगोदरपासूनच तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला त्याच्यावर श्रद्धा (ईमान) ठेवावी लागेल आणि त्याला सहकार्य द्यावे लागेल.६९ असे  फर्मावून अल्लाहने विचारले, ‘‘काय तुम्ही हे मान्य करता आणि यावर माझ्यातर्फे कराराची मोठी जबाबदारी उचलता?’’ त्यांनी सांगितले, ‘‘होय, आम्ही मान्य करतो.’’ अल्लाहने  फर्माविले, ‘‘मग साक्षी राहा आणि मीदेखील तुमच्याबरोबर साक्षी आहे.




६५) कारण हे आहे की हे लोक (ज्यू) असे मोठमोठे नैतिक अपराध करूनसुद्धा समजून आहेत की प्रलयाच्या दिवशी हेच अल्लाहचे प्रियदास असतील व अल्लाहची कृपादृष्टी त्यांच्यावरच  असेल. जगात जे थोडे-फार पाप त्यांनी केले असतील ते सर्व बुजूर्गांच्या कृपेने धुवून निघतील जेव्हा की परलोकात अगदी विरोधी मामला त्यांच्याशी केला जाईल.
६६) याचा अर्थ असा जरी होतो की ते ईशग्रथांच्या अर्थात फेरबदल करतात किंवा शब्दांचे उलटफेर करून अर्थाचा अनर्थ करतात, परंतु याचा खरा अर्थ होतो की ते ईशग्रंथाला वाचतांना  एखाद्या विशेष शब्दाला किंवा वाक्याला जे त्यांच्या स्वार्थाच्या आड येते किंवा स्वयंरचित धारणा व सिद्धान्ताच्या विरोधात जाते; त्याच्या उच्चरात हेराफेरी करून अर्थाचा अनर्थ करतात.  याचे उदाहरण कुरआनला मानणाऱ्या ग्रंथधारकांतसुद्धा सापडतात. उदा. काही लोक जे पैगंबर मनुष्य असल्याचे नाकारतात ते या आयती मधील ``कुल इन्नमा अना बश रूम मिस्लुकुम''  `इन्नमा' या शब्दाचा उच्चर `इब्न-मा' करतात आणि त्याचे अनुवाद अशाप्रकारे करतात, ``हे पैगंबर! सांगा, नि: संदेह, मी तुमच्या सारखा मनुष्य नाही.''
६७) यहुदी (ज्यू) लोकांमध्ये विद्वान लोक धार्मिक पदाधिकारी होते. त्यांचे कार्य धार्मिक मामल्यात लोकांचे मार्गदर्शन करणे, इबादत व उपासनाचे आयोजन करणे आणि धार्मिक  आदेशांना लागू करणे होते, त्यांच्यासाठी शब्द `रब्बानी' वापरला जात असे. कुरआनात देखील हा उल्लेख आहे ``यांचे रब्बानी आणि विद्वान त्यांना अपराध करण्यापासून आणि हरामाचा  माल खाण्यापासून का रोखत नव्हते.''(५ : ४४) तसेच खिश्चनांच्या जवळ ’Divine' हा शब्द `रब्बानी' च्या समानार्थी आहे.
६८) हे त्या सर्व चूकीच्या गोष्टीचे व्यापक खंडन आहे जे जगातील विभिन्न समुदायांनी पैगंबरांना संबोधून आपल्या धार्मिक ग्रंथात समाविष्ट केले आहे आणि ज्यांच्या आधारावर  एखाद्या पैगंबर वा फरिश्त्याला येनकेनप्रकारे `ईश्वर' व `उपास्य' ठरविले जाते. या आयतीद्वारा हा मूलभूत नियम सांगितला गेला आहे, की अशी एखादी शिकवण ज्यात  अल्लाहशिवाय इतरांची बंदगी व उपासना करण्यास सांगितले जाते; तसेच दासाला दासत्वाऐवजी ईशत्व बहाल केले जाते; ती शिकवण पैगंबरांची कदापि असू शकत नाही. एखाद्या  धार्मिक ग्रंथात अशी चुकीची शिकवण आढळली तर समजून घ्यावे की हा पथभ्रष्ट लोकांच्या फेरबदलाचा परिणाम आहे.
६९) म्हणजे प्रत्येक पैगंबराकडून हे वचन घेतले जात होते आणि जे वचन पैगंबराकडून घेतले गेले ते अनुयायींवर अनिवार्यत: आपोआप लागू होते की जो पैगंबर अल्लाहकडून त्या  धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठविला जातो ज्याच्या प्रचार, प्रसार व स्थापना करण्यासाठी तुम्ही नियुक्त केले गेले आहात, त्याची तुम्हाला साथ द्यावी लागेल. त्याच्याशी पक्षपात करु  नये, स्वत:ला धर्माचा ठेकेदार समजून बसू नये, सत्याचा विरोध करू नये. परंतु जेव्हा कोठे एखादा मनुष्य आमच्याकडून सत्याचा ध्वज उंचावण्यासाठी पुढे आला तर झेंड्याखाली जमा  होऊन सर्वांनी त्याला सहकार्य करावे. येथे हेसुद्धा स्पष्ट जाणून घेतले पाहिजे की आदरणीय पैगंबर महुम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या प्रत्येक पैगंबरांकरवी हे वचन घेण्यात आले आणि याच  आधारावर प्रत्येक पैगंबराने आपल्यानंतर येणाऱ्या पैगंबराची खबर आपल्या अनुयायांना दिली होती आणि येणाऱ्या पैगंबराला साथ देण्यास सांगितले होते. परंतु कुरआन आणि हदीसमध्ये  कोठेच असे नाही की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून असे वचन घेण्यात आले आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायांना आपल्यानंतर येणाऱ्या पैगंबराची खबर दिली  आणि येणाऱ्या पैगंबरावर ईमान आणण्यास सांगितले असावे. किंबहुना कुरआनमध्ये स्पष्ट शब्दांत पैगंबर मुहम्मद (स.) यांना `खातमुन्नबीयीन' म्हणजे `शेवटचे पैगंबर' म्हटले गेले  आहे. तसेच अनेक हदीसकथनांत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की त्यांच्यानंतर कोणी दुसरा पैगंबर येणार नाही.

आसाममधील जनतेची ओळख व नागरिकत्वाचा प्रश्न फार जुना आहे. या समस्येची सुरूवात अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळात झाली. या राज्यात राहाणाऱ्या अधिकांश मुस्लिम लोकसंख्या या  समस्येने मोठ्या प्रमाणात ग्रासलेली आहे. त्याचप्रमाणे बंगाली व आसामी भाषा बोलणारे हिंदू आणि आदिवासी लोकांनाही या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आसामची लोकसंख्या  ३ कोटी २० लाख आहे. यातील जवळपास तिसरा हिस्सा मुस्लिमांचा आहे. काश्मीर नंतर सर्विाधक मुस्लीम संख्या ही आसाममध्ये आहे. यातील बरेच जण ब्रिटिश काळात इथे  स्थिरावलेले स्थलांतरित आहेत. परंतु शेजारील बांगलादेशातून होणारे बेकायदेशीर स्थलांतर हा काही दशकांपासून काळजीचा विषय बनला आहे. सहा वर्षांच्या सततच्या आंदोलनानंतर  १९८५ला केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्या समझोता झाला होता. या आंदोलनात अनेक लोक मारले गेले होते. २४ मार्च १९७१नंतर जे योग्य कागदपत्रांशिवाय आसाममध्ये राहात असतील त्यांना परदेशी ठरवण्यात येईल, असे या समझोत्यामध्ये मान्य करण्यात आले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या वादग्रस्त नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ने  आसाममधील सुमारे ४० लाख नागरिक बेकायदेशीरपणे राहणारे परदेशी असल्याचे म्हटले आहे. यामध्ये ३० वर्षे भारतीय सेनेत कार्यरत असलेल्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यासह  माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबियांचाही समावेश आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या कामाच्या पद्धतीवर अगदी सुरूवातीपासून अनेक प्रकारचे गंभीर  आरोप लावण्यात आले आहे. याद्वारे बांगला भाषिक विशिष्ट समाजाला लक्ष्य केलाचा आरोप करण्यात आला आहे. एनआरसी भाजप-आरएसएसच्या दबावाखाली कार्यरत असून तेथील  जनतेला त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आसामच्या ३३पैकी १५ जिल्ह्यांत ही संख्या जास्त आहे. जवळपास १०० विशेष न्यायालयांनी १९८५ पासून ८५ हजार जणांना परदेशी नागरिक ठरवले आहे. यात बंगाली भाषिक मुस्लिमांची संख्या सर्विाधक असून यांची रवानगी छावण्यांमध्ये (डिटेन्शन कॅम्प) करण्यात आली आहे. अशा सहा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. अमेरिकेत ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणामुळे कागदपत्र नसलेल्या पालक आणि मुलांना वेगवेगळे करण्यात आले तशाच पद्धतीने आसाममध्ये अनेक कुटुंब विभक्त होत आहेत. अशा पद्धतीने लाखो  लोकांना एका रात्रीत एनआरसीने 'देशहीन' ठरवल्याने आसाममध्ये हिंसाचार उफाळण्याची भीती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. भाजप तिथे सत्तेत  आहे. भाजपने यापूर्वी बेकायदेशीर स्थलांतरित मुस्लिमांनी परत पाठवण्यावर भर दिला होता. भारतात अशा देशहीन लोकांची फौज तयार होऊन स्थानिक संकट निर्माण होण्याची स्थिती  आहे. नागरिकत्व काढून घेतलेले हे लोक जे इथे दशकांपासून राहतात. आता त्यांना मतदान करता येणार नाही, लोककल्याणकारी योजनांचा आणि स्वत:च्या मालमत्तेचाही लाभ घेता  येणार नाही. ज्यांची मालमत्ता आहे त्यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संस्थेने जगभरातून देशहीन प्रजा हा प्रकार संपवण्याचे  ठरवले आहे. आज जगभरात १ कोटी लोक असे आहेत जे देशहीन जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत ही भारतासाठी मोठी नामुष्की ठरणार आहे. जे लोक त्यांचे नागरिकत्व सिद्ध  करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी छावण्यांची उभारणी करण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीमुळे अल्पसंख्याक समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होईल. तथाकथित परदेशी लोकांपैकी अनेकजण शेतीशी संबंधित कामात आहेत. बेकायदशीरीत्या आलेल्या हिंदूनी राहावे आणि बेकायदेशीररीत्या आलेल्या मुस्लिमांना परत पाठवावे अशी मांडणी  करून मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने या समस्येचा वापर करून धार्मिक तणाव वाढवून निवडणुकीतले लाभाचे गणित पाहिले असा प्रतिवादही अनेक जण करतात. १९७५-७६ च्या  दरम्यान बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली. त्यामध्ये हिंदूंचे प्रमाण मोठे होते. बांगलादेशात २५० आदिवासींचा समूह होता. तेही मोठ्या संख्येने आसामात आले.  भविष्यात चीनकडून हल्ले होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. हे टाळायचे असेल तर बांगलादेशाशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. त्यादृष्टीनेच आसामच्या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.  या मुद्द्याच्या बाबतीत राजकीय पक्षांमध्ये परस्पर सहमती गरजेची असते. पण ते परस्परांशी लढण्यातच व्यग्र असून त्यांचे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होते आहे. पन्नासच्या दशकात आपली  व्होट बँक वाढवण्यासाठी काँग्रेसनेच या घुसखोरीला प्रोत्साहन दिले, असे म्हटले जाते. या प्रश्नांमध्ये राजकीय पक्षांसह कोणाला आर्थिक इंटरेस्ट असतील तर त्याचे गंभीर परिणाम  साऱ्या देशाला भोगावे लागतील. ‘उद्या देश वाचवायचा असेल तर आधी आसाम वाचवा’ याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

- बदनापूर
सध्याच्या शिक्षणपद्धतीतून मानवतावादी दृष्टिकोनाचा ऱ्हास होत आहे. मानवी जीवनाचा नेमका उद्देश काय? याबाबत शिकविले जात नाही. मानवाने संपत्तीऐवजी जीवनात किती सत्कर्मे केली याची गोळाबेरीज केल्यास निश्चितच समाजात चांगला बदल घडेल, असे प्रतिपादन संत साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांनी येथे व्यक्त  केले.
जामा मस्जिदीत नुकत्याच पार पडलेल्या ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कीर्तनकार निवृत्ती महाराज घोडके, नगराध्यक्ष प्रदीप साबळे, सुरेशकुमार तापडिया, व्यापारी  महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोककुमार संचेती, निरंकारी ग्रुपचे परमेश्वर नाईकवाडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, सत्यनारायण गेलडा, जालना येथील जमाअत ए इस्लामी हिंदचे  शहराध्यक्ष शेख अब्दुल मुजीब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सय्यद म्हणालो की आपल्या देशात विविध धर्म असले तरी सर्वांना माणुसकीच्या नात्याने एकत्र गुंफले आहे. प्रत्येकाने आपले जीवन चांगल्या कार्यासकाठी खर्ची केले पाहिजे.  प्रत्येकाने एकमेकांचा आदर करून आदर्श जीवन जगावे, अशी कुरआनची शिकवण आहे, असे ते म्हणाले.
निवृत्ती घोडके महाराज म्हणाले, की राजकारणात आता जातियवाद व धार्मिकवाद समाविष्ट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात असंख्य मुस्लिम बांधव होते, तसेच  सम्राट औरंगजेब यांच्या सैन्यदलातही असंख्य हिदू बांधवदेखील होते. त्यावेळी कोणताही जातियवाद नव्हता. मात्र आता राजकीय फायद्यासाठी एकमेकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे  षङयंत्र रचले जात आहे. अशा षङ्यंत्रापासून हिंदू मुस्लिम बांधवांनी वेळीच सतर्क होत बंधुभावाने राहावे, असे मत व्यक्त केले.
सुरेशकुमार तापडिया, गजानन गिते, अशोककुमार संचेती, परमेश्वर नाईकवाडे व प्रदीब साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. मुक्तार खान यांनी केले. शेख आजम यांनी  आभार मानले. कार्यक्रमासाठी मिर्झा हाजी बशीर बेग, मिर्झा हाजी यूसुफ बेग, हाजी शेख सरदार, हाजी अब्दुल मजिद खान, शेख खालेक, शेख अजहर, मिर्झा अफरोज, शेख नसीर,  मिर्झा आसेफ, शिकुर बेग मिर्झा आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास सर्वधर्मिय बांधवांची उपस्थिती होती.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी चारित्र्यसंपन्नतेला उच्चतम शिखरावर पोहचवावे.’’ (मुअत्ता इमाम मालिक)

निरुपण
चारित्र्यसंपन्नता हाच धर्माचा उद्देश आहे. ईश्वराने तमाम पैगंबरांकरवी अखिल मानवजातीला चारित्र्यसंपन्नतेचीच ताकीद केली आहे. चारित्र्यहीन माणूस जीवनाचे सार्थक करू शकत  नाही. उलट तो जीवनाचा सत्यानाश करतो. इस्लाममध्ये ‘तकवा’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तकवा अर्थात ईशभीरूता असेल तरच चारित्र्यसंपन्नता निर्माण होईल.
कुरआनात नमाजसंबंधी म्हटले आहे, ‘‘नि:शंक, नमाज माणसाला वाईट कृत्यांपासून आणि निर्लज्जतेपासून दूर करते.’’
(कुरआन, २९ : ४५)
तद्वतच रोजांचा उद्देश विषद करताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले,
‘‘रोजा म्हणजे केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी सोडणे नव्हे! रोजा जिव्हेचा पण आहे, डोळ्यांचासुद्धा आहे, कानांचाही आहे आणि हातापायांचासुद्धा!’’
अर्थात खोटारडे न बोलणे, शिवीगाळ न करणे, निंदानालस्ती न करणे हा जिव्हेचा रोजा आहे. अश्लीलता व नग्नतेपासून दूर राहणे व जगाकडे वाईट नजरेने न पाहणे हा डोळ्यांचा रोजा  आहें. कोणावर अन्याय-अत्याचार न करणे, भ्रष्ट आचार न करणे हा हातांचा रोजा आहे.
जकातचाही वास्तविक उद्देश माणसाच्या चित्ताचे शुद्धीकरणच आहे.
सार्थक हज्ज (हज्जे मबरूर) संबंधी म्हटलेले आहे की त्यामुळे हाजीचे चारित्र्य अधिकाधिक शुद्ध व्हावे त्याने हर वाईट कृत्यापासून स्वत:ला रोखावे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘आता तरी पुढे हाची उपदेश! नका करू नाश आयुष्याचा!
सकळांच्या पाया माझे दंडवत! आपुलाले चित्त शुद्ध करा!’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेचा केवळ उपदेशच केला नाही तर त्यांचे स्वत:चे जीवनच आता अखिल मानवजातीसाठी जगाच्या अंतापर्यंत सर्वांगांनी चारित्र्यसंपन्नतेचे एक  श्रेष्ठतम व आदर्श उदाहरण आहे.
(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

(७०) हे ग्रंथधारकांनो, का अल्लाहचे संकेत नाकारता, वास्तविक पाहता तुम्ही स्वत: त्यांचे निरीक्षण करीत आहात?६०
(७१) हे ग्रंधारकांनो, सत्यावर असत्याचा रंग चढवून त्याला का शंकास्पद बनविता? जाणूनबुजून सत्याला का लपविता?
(७२) ग्रंथधारकांपैकी एक गट म्हणतो की या पैगंबराला मानणाNया लोकांवर जे काही अवतरले आहे, त्यावर सकाळी श्रद्धा ठेवा व  संध्याकाळी ते नाकारा. कदाचित या युक्तीने हे लोक आपल्या ईमानपासून परावृत्त होतील.६१
(७३) तसेच हे लोक आपापसात म्हणतात की स्वधर्मीयांशिवाय कोणाचेही ऐकू नका. हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘वास्तविक  मार्गदर्शन तर अल्लाहचेच मार्गदर्शन होय. आणि ही त्याचीच देणगी आहे की एखाद्याला तेच काही दिले जावे जे कधी तुम्हाला दिले  गेले होते किंवा असे की इतरांना तुमच्या पालनकत्र्यापुढे रुजू करण्यासाठी तुमच्याविरूद्ध भक्कम प्रमाण मिळावे.’’ हे पैगंबर (स.)!  यांना सांगा, ‘‘प्रतिष्ठा आणि सन्मान अल्लाहच्या अखत्यारित आहे. हवे त्याला प्रदान करावे. तो उदार दृष्टीचा आहे.६२ व तो सर्वज्ञ  आहे.६३
(७४) आपल्या कृपेसाठी हवे त्याला निवडतो आणि त्याची उदारता व कृपा अतिमहान आहे.’’
(७५) ग्रंथधारकांमध्ये कुणी असा आहे की तुम्ही त्याच्या विश्वासावर गडगंज संपत्ती दिली तरी तो तुमची संपत्ती तुम्हाला अदा करील, आणि कुणाची अवस्था अशी आहे की तुम्ही एका  दीनारच्या बाबतीत जरी त्याच्यावर विश्वास ठेवला तरी तो याशिवाय अदा करणार नाही की तुम्ही त्याच्या मानगुटीवर बसाल. त्यांच्या या नैतिक अवस्थेचे कारण असे आहे की ते  सांगतात, ‘‘उम्मी (यहुदी-ज्यूखेरीज इतर लोक) लोकांच्या बाबतीत आमची काही विचारणा होणार नाही.’’६४ आणि ही गोष्ट ते केवळ खोटी रचून तिचा संबंध अल्लाहशी जोडतात. खरे  पाहता त्यांना माहीत आहे की अल्लाहने अशी कोणतीही गोष्ट फर्माविली नाही.
(७६) बरे त्यांची विचारणा का होणार नाही? जो कोणी आपले वचन पूर्ण करील व वाईट गोष्टींपासून दूर राहील तो अल्लाहचा प्रिय बनेल. कारण ईशपरायण लोक अल्लाहला प्रिय आहेत.


६०) दुसरा अनुवाद याचा हासुद्धा होतो, ``तुम्ही स्वत: ग्वाही देत आहात.'' दोन्ही स्थितीत अर्थात काहीच फरक पडत नाही. वास्तविकपणे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि  सहाबा (रजि.) यांच्या जीवनांवर यांच्या शिकवणीचा आश्चर्यकारक प्रभाव आणि कुरआनातील उच्च् शिकवण, हे सर्व अल्लाहच्या स्पष्ट निशाण्या आहेत. जो कोणी पैगंबरांचे इतिहास  आणि ईशग्रंथांच्या शैलीला जाणतो, त्याच्यासाठी या निशाण्या पाहून आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वावर संशय घेणे कठीण होते. परंतु हे सत्य आहे की अनेक  ग्रंथधारक विद्वानमंडळींना कळून चुकले होते की मुहम्मद (स.) तेच पैगंबर आहे ज्यांच्याविषयी पूर्वीच्या पैगंबरांनी भाकित केले होते. येथपावेतो की कधीकधी सत्याच्या प्रबळ शक्तीने  विवश होऊन पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचा संदेश सत्य असल्याचे ते मान्यही करत असत. म्हणून कुरआन अशा लोकांना पुन्हा पुन्हा आरोपित करतो की अल्लाहच्या ज्या  निशाण्या तुम्ही डोळयांनी पाहता व ज्यांच्या सत्य होण्यावर तुम्ही ग्वाही देता; तेव्हा तुम्ही जाणून उमजून आपल्या मनातील विकारामुळे सत्य स्वीकारण्यास नकार देत आहात.
६१) ही त्या चालींपैकी एक चाल होती जी मदीना शहरालगतचे यहुदी (ज्यू) लीडर आणि धर्मगुरू इस्लामच्या आवाहनाला कमजोर करण्यासाठी खेळत होते. त्यांनी मुस्लिमांना संभ्रमित  करण्यासाठी आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी जनसामान्यांत गैरसमज पसरविण्यासाठी गुप्तरीत्या लोकांना प्रशिक्षित करून कामाला लावले. जेणेकरून प्रथम जाहिररित्या इस्लामचा स्वीकार करावा नंतर त्याचा त्याग करावा, ठिकठिकाणी लोकांमध्ये अपप्रचार करीत फिरावे की आम्ही इस्लाम आणि मुस्लिमांमध्ये आणि त्यांच्या पैगंबर मुहम्मद (स.)  यांच्यात अमुक अमुक अवगुण पाहिले; म्हणून तर आम्ही त्यांच्यापासून विलग झालो आहोत.
६२) मूळ अरबी शब्द `वासि़अ' आला आहे. हा शब्द सर्वसाधारणपणे कुरआनमध्ये तीन प्रसंगी उपयोगात आणला जातो. एक तो प्रसंग जिथे मनुष्याच्या एखाद्या समुहाच्या संकुचित  विचार आणि संकुचित दृष्टिकोनाचा उल्लेख होतो आणि त्या समुदायाला वास्तविकतेपासून सचेत करण्याची आवश्यकता भासते की अल्लाह तुमच्यासारखा संकुचित दृष्टिकोनाचा नाही.  दुसरा प्रसंग जिथे एखाद्याची कृपणता आणि कंजूषी वृत्तीची भर्त्सना करताना उल्लेखित करायचे असते की अल्लाह सढळ हाताचा आहे तुमच्यासारखा कंजूष नाही. तिसरा प्रसंग जिथे  लोक आपल्या संकुचित आस्थांमुळे अल्लाहसाठी काही प्रकारच्या मर्यादा लावतात अशा वेळी दाखविणे आवश्यक ठरते की अल्लाह असीम आहे.
(पाहा, सूरह - २ (अल्बकरा) टीप नं. ११६)
६३) म्हणजे अल्लाहला माहीत आहे की कोण प्रतिष्ठा आणि सन्मानप्राप्त् आहे.
६४) हा केवळ सर्वसामान्य यहुदी (ज्यू) लोकांचाच अज्ञानतापूर्ण विचार नव्हता तर त्यांची धार्मिक शिकवणसुद्धा हीच होती आणि त्यांच्या थोर धार्मिक पंडितांचे आदेशसुद्धा असेच होते.  बायबल कर्ज आणि व्याजाच्या आदेशांत इस्राईल आणि इस्राईलेतर यांच्यात स्पष्ट फरक करतो. (व्यवस्था विवरण १५ : १-३, २३ : २०) तलमूदमध्ये उल्लेख आहे की जर इस्राईलचा  बैल एखाद्या गैरइस्राईलच्या बैलाला जखमी करतो तर त्याच्यासाठी काही दंड नाही. परंतु इस्राईलेतरच्या बैलाने जर इस्राईलच्या बैलाला जखमी केले तर त्याच्यासाठी दंड व शिक्षा आहे.  एखाद्याला खाली पडलेली वस्तू सापडली तर त्याने आजूबाजूला कोणाची वस्ती आहे, हे पाहून घ्यावे. इस्राईली (ज्यू) लोकांची वस्ती असल्यास दवंडी दिली पाहिजे आणि इतरांची असेल  तर ती वस्तू स्वत:जवळ ठेवली पाहिजे. रिब्बी शमुएल म्हणतो की जर इस्राईली आणि गैरइस्राईलीचा दावा न्यायाधीशाकडे आला तर न्यायाधीशाने आपल्या इस्राईली कायद्यानुसार आपल्या इस्राईली बंधुला वाचविले पाहिजे आणि गैरइस्राईली कायद्याने विजयी करू शकतो तर करावे आणि म्हणावे की हा इस्राईलेतरांचा कायदा आहे. दोन्ही कायदे उपयोगी पडत  नसतील तर कोणतीही चाल खेळून इस्राईली भावाला वाचविले पाहिजे. रिब्बी शमुएल म्हणतो की गैरइस्राईलच्या प्रत्येक चुकींद्वारे फायदा उठविला जावा (तालमुदिक मस्सलेनी, पॉल आयझेक हरशो, लंडन १८८० इ. पृ. ३७, २१०,२२१)

मानवी समाजाचे भविष्य आणि वर्तमान इतिहासातील प्रेरणांच्या आधारे उभे असते. वर्तमान आणि भविष्याच्या गरजेतून इतिहासाचे नवनवे अन्वयार्थ समोर आणले जातात. समाजातील विविध घटक स्वतःच्या वर्गाला आधिक बळकटी देण्यासाठी इतिहासाचा अर्थ त्यांना अनुरुप तसा घेत असतात. भारतामध्ये उजव्या शक्ती इतिहासाच्या एकप्रवाही मांडणीतून मुस्लीम द्वेषाच्या आधारे स्वतःच्या राजकीय भविष्याची वाटचाल सुकर करु पाहताताहेत. इतिहासातील प्रतिकांची मोडतोड करुन त्यांच्या मुल्यांची उभारणी केली जात आहे. अनेक मध्ययुगीन वास्तूंविषयी याच गरजेतून अपसमज निर्माण करण्यात आले आहेत. मागील काही वर्षात देशामध्ये उजव्या प्रेरणांनी उचल खाल्ली आहे. पुरातत्व खात्यावर देखील या प्रेरणांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामूळेच अनेक मध्ययुगीन वास्तूंसमोर चुकीचे फलक उभारुन पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. इसवी सन 1695 नंतर ब्रम्हपुरी येथे औरंगजेबाचे सहा वर्षे वास्तव्य होते. ब्रम्हपूरीच्या शेजारी माचणूर हे छोटेसे गाव आहे. तिथे समतावादी लिंगायत संत सिध्देरामेश्वरांचे मंदिर आहे. या मंदिराला औरंगेजेबाने ब्रम्हपुरी येथील वास्तव्यात देणगी दिली आहे. जी आजही शासनाकडून मिळत असते. मात्र या मंदिराविषयी नव्या तीन संदर्भांना उजव्या बाजूने आकार देण्यात आला आहे.
    देशातील सर्व ऐतिहासिक स्थळे केंद्रीय व राज्याच्या पुरातत्त्व विभागांतर्गत येतात. त्यांची सुरक्षा, त्या स्थळासंबंधी सर्व माहिती संग्रहित करणे, ती पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणे आणि त्या संबधी सर्व ऐतिहासिक माहिती पर्यटकांना देण्याची व्यवस्था करणे ही सर्व कामे या खात्याच्या अखत्यारीत येतात. परंतु तसे न होता जमातवादी इतिहासकारांनी रचलेल्या मनोरंजक आख्यायिका आणि संदर्भहीन माहिती असलेल्या इतिहासाचे फलक त्या ऐतिहासिक ठिकाणांच्या अवतीभोवती भालदार-चोपदाराची भूमिका या पुरातत्व विभागाच्या अप्रत्यक्ष परवानगीने चोखपणे निभावतात. तसेच येणार्या पर्यटकांनादेखील आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवतात. ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची आवड असल्याने, काही दिवसांपूर्वी मी , माझे बंधू सरफराज अहमद यांच्यासमवेत वर्तमानचे घाव झेलत उभ्या असणार्या ऐतिहासिक ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा जि. सोलापूर) येथे भेट दिली.
    निसर्गरम्य हिरवागार परिसर, संथ वाहणारा भीमेचा प्रवाह आणि तिच्या किनारी शतकांपासून उभी असणारी ऐतिहासिक स्थळे, सिद्धेश्वराचे मंदिर आणि ब्रम्हपुरीचा किल्ला. सिद्धेश्वराचे मंदिर विशिष्ट हेमाडपंथी शैलीतील तर ब्रह्मपुरीचा किल्ला तात्पुरत्या वास्तव्यासाठी कच्च्या स्वरूपात बांधलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांना मूठमाती देऊन या ठिकाणाचा इतिहास बदलावण्याचा तुटपुंजा प्रयत्न तथाकथित इतिहासकारांनी केलेला दिसतो. ब्रह्मपुरीत पोहचल्यानंतर आपल्या नाममात्र अस्तित्वाची ओळख जपणार्या भारतीय पुरातत्व विभागाच्या फलकाने या बदलवलेल्या इतिहासाच्या तथाकथित संदर्भ साधनांची सुरुवात होते. तर पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या मूकसंमतीने आपले स्थान घट्ट करणार्या अख्यायिकांनी गच्च भरलेला फलक आहे. हाच फलक ब्रह्मपुरीच्या मूळ इतिहासावर घाव घालत उभा आहे. या निमित्ताने ब्रह्मपुरीच्या या बदलावलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ सापडतात ते कसे आहेत पाहुयात;
    बदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक एक - ब्रह्मपुरीचा ऐतिहासिक मनोरंजन करणारा फलक: आख्यायिका रचून जमातवादी इतिहासकारांनी ब्रह्मपुरीच्या ग्रामस्थांना जतन करावयास लावलेला खोटा इतिहासाच्या फलकावरील मजकूर पुढीलप्रमाणे, माचणूर येथील सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी तटबंदी आहे. सिद्धेश्वर देवस्थान हे  हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले असून ते भिमानदीच्या तीरावर आहे. मंदिराच्या आवारातून थोड्या पायर्या उतरून गेल्यानंतर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दीपमाला दृष्टीस पडतात. एक दीपमाला डाव्या बाजूस आणि बाकीच्या तीन उजव्या बाजूस आहेत. सभा मंडपाला अठरा स्तंभ असून त्यापैकी बरेच भिंतीमध्ये उभे केले आहेत. सभामंडपातून थोडेसे आत गेल्यानंतर शंकराचे लिंग दृष्टीस पडते व समोरच नंदी आहे. दक्षिण व उत्तरेस मराठ्यांच्या हल्ल्याला वैतागून सन. 1695 मध्ये औरंगजेबने प्रचंड फौजेसह तळ ठोकला व प्रमुख कोठाराची उभारणी केली. सभोवताली तटबंधी बांधून तो तेथे दरबार भरवू लागला. अशी अख्यायिका सांगतात की औरंगजेब धर्मवेडा असल्याने त्याने आपल्या काही सरदारांना मंदिरातील लिंग फोडण्याचा आदेश फर्माविला जेव्हा ते लिंग फोडण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा अचानक मधमाशांचे थवेच्या थवे त्या ठिकाणी आले. त्यामुळे त्या सरदारांना पळून जाण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तेव्हा औरंजेबाला हिंदूंच्या देवाची शांतिपूजा करणे गरजेचे वाटू लागले म्हणून त्यांनी गोमांसाच्या नैवेद्याचे ताट पाठविले त्या ताटावर वस्त्र झाकले होते व नैवेद्याचे ताट देवळात नेल्यावर त्यावरील वस्त्र काढताच त्या ताटात पांढरेशुभ्र फुले असल्याचे आढळले आणि त्या ठिकाणाला मासणूर म्हणून ओळखले जाऊ लागले. ही आख्यायीका ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवली आहे. श्री सिद्धेश्वराच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. यात्रेला बहुसंख्येने भाविक येतात महाशिवरात्रीला दर अमावस्या व श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने देवाच्या दर्शनासाठी येतात. आधार- सोलापूर राजपत्र ” औरंगजेबाच्या ब्रम्हपुरी वास्तव्याचे दरबारी फारसी अखबारात मरहूम इतिहाससंशोधक डॉ. सय्यद शाह गाजीउद्दीन यांनी भाषांतरीते केले आहे. या फारसी अखबारात मध्ये किंवा अन्य तत्सम समकालीन साधनांमध्ये कोणताही आधार सापडत नाही. अशा परिस्थितीत शासकीय राजपत्राने मधमाश्यांचा हल्ला, मांसाची फुले होणे अशा दंतकथांना आधार मानून संदर्भनिर्मिती करणे निंदनीय आहे.
बदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक दोन - (औरंगजेब आणि गाझीऊद्दीन खान यांचा  पत्रव्यवहार) 1690च्या दशकात औरंगजेब दख्खनच्या दौर्यावर निघाला होता. या मोहिमेसाठी त्याने जो मार्ग निवडला होता तो मराठ्यांची राजधानी सातारा आणि आदिलशाही राजधानी विजापूरच्या दरम्यानचा होता. या मार्गावरून मोहिमेसाठी पुढे जाताना छावणीच्या थांब्याच्या दृष्टीने तसेच छावणीस लागणार्या सर्व आवश्यक गोष्टींची सोय होईल अशा ठिकाणाचा शोध घेण्याची जबाबदारी औरंगजेबाने त्याचा सरदार गाझीऊद्दीन खानवर सोपविली. या सर्व आदेशातील गोष्टी ध्यानात घेऊन गाझीउद्दीन खान या मार्गावरून अशा ठिकाणाच्या शोधात निघाला. गाझीऊद्दीन खानास छावणीसाठी पूरक अशा ठिकाणाचा शोध ब्रह्मपुरीच्या माध्यमातून लागला. त्यावेळी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि त्याठिकाणी करावयाची व्यवस्था याची माहिती देण्यासाठी गाझीऊद्दीन खानने औरंगजेबास पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहारात गाझीऊद्दीन खानाने ब्रह्मपुरीस छावणीच्या निवारणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचा किल्ला बांधण्याची परवानगी बादशहास मागितली. बादशाहने ती परवानगी दिली. त्यानंतर गाजीउद्दीन खान आणि बादशाहदरम्यान काही पत्रव्यवहार झाले आहेत. सुरुवातीच्या पत्रात गाजीउद्दीन खानने ब्रम्हपुरीचा उल्लेख ब्रम्हपुरी असा केला आहे तर नंतर त्याने ब्रम्हपुरीसाठी इस्लामपुरी हे नाव वापरल्याचे दिसते. उजवे इतिहासकार या पत्रांचा आधार घेउन औरंगेजेबाच्या काळात ब्रम्हपुरीचे नाव धर्मांधतेने बदलले असल्याचे सांगतात. मात्र यासाठी इतिहासातील एका महत्वाच्या संदर्भाचा अनुल्लेख करुन आपल्या सोयीची बाजू तेवढी ते मांडतात. वास्तविकतः गाजीउद्दीन खानाने ब्रम्हपुरीचे नाव बदलल्याचे लक्षात आल्यानंतर औरंगेजबाने स्वतः त्याचे नाव पुर्ववत करण्याची सुचना दिली होती. मात्र या गोष्टींचा उल्लेख सोयीस्कर टाळला जातो.
    औरंगजेब आपल्या सैन्यासह ब्रह्मपुरी या ठिकाणी सहा वर्षे वास्तव्यास होता. या सहा वर्षांमध्ये औरंगजेब आपल्या  साम्राज्याचा राज्यकारभार ब्रह्मपूरीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दरबार भरवून करत होता. तब्बल सहा वर्षे साम्राज्याची राजधानी ब्रह्मपुरी होती. ज्या सिद्धेश्वर मंदिराला या तथाकथित इतिहासकारांनी आपल्या इतिहासाचा विपर्यास करण्याच्या धोरणातील केंद्रबिंदू बनवून औरंगजेबला धर्मवेडा ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, तो वरील संदर्भांच्या कसोटीवर खोटा ठरतो. परंतु मुसलमानी राजवट आणि राज्यकर्त्यांविषयी द्वेषभावना असणार्या इतिहासकारांनी या विषयी उपलब्ध असणार्या ऐतिहासिक संदर्भाकडे डोळेझाक करून एक मनोरंजक आख्यायिका रचून इतिहासाला उजवी किनार जोडली आहे.
बदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक तीन - (सोलापूर गॅझेट आणि ब्रह्मपुरीच्या ऐतिहासिक नोंदी) ब्रह्मपुरीच्या वास्तव्यास असताना औरंजेबाने श्री सिद्धेश्वराच्या मंदिरास वेळोवेळी देणग्या दिल्याचा संदर्भ इतिहासात आढळतो. औरंगजेबाने दिलेल्या या देणग्यांचा उल्लेख सोलापूर गॅझेटमध्येसुद्धा आहे आणि तो सन 1995 पर्यंत व्यवस्थित स्वरूपात होता. परंतु 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपच्या युती सरकारने इतिहासाशी आपल्या विचारधारेला साजेस वर्तन करून मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाबद्दल असणारा आकस बाळगत त्या नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने त्या ऐतिहासिक घटनांची पुनर्नोंदणी केली. ऐतिहासिक संदर्भ तपासल्यावर मुसलमान राज्यकर्त्यांनी आपल्या राजवटीदरम्यान वेळोवेळी  जातीय सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु केवळ मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाचे विपर्यास करण्याच्या धोरणातून अशा आख्यायिका जन्माला घातल्या जातात आणि समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न हे तथाकथित इतिहासकार करत असतात.
    ब्रह्मपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तिन्ही संदर्भ पाहिले असता असे लक्षात येते, की भारतातील मुसलमान राज्यकर्त्यांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न भंपक संदर्भांची निर्मिती करुन केला जात आहे.

- इस्माईल जहीर
अॅड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर

मागच्या काही वर्षांपासून झुंडीद्वारे लोकांना घेरून मारण्याच्या घटनांमध्ये वृद्धी झालेली आहे. विशेषकरून 2014 नंतर जेव्हापासून भाजपा सत्तेत आलेली आहे, गायीच्या नावाने अशा घटनांमध्ये चौपटीने वाढ झालेली आहे. 2010 मध्ये गायीच्या संबंधित 5 टक्क्यांपेक्षा कमी मुद्दे जातीय दंगलीसाठी कारणीभूत होते. 2017 मध्ये त्याच्यात 20 टक्क्यांनी वाढ झाली. ’इंडिया स्पेन्ड’ वेबपोर्टल नुसार 2010 ते 25 जून 2017 पर्यंत गायीच्या नावाने झुंडींनी 60 घटना केल्या त्यात 25 लोक मारले गेले. यातील 97 टक्के घटना भाजपा सत्तेत आल्यानंतर झाल्या. मृत व्यक्तीमध्ये 84 टक्के लोक मुस्लिम तर 16 टक्के लोक दलित किंवा अन्य मागास वर्गातील होते. गोरक्षेसंबंधित हिंसा मॉबलिंचिंगचे प्रमुख कारण राहिले आहे. याशिवाय, मुलं चोरी आणि डायन असल्याचे आरोप लावूनही झुंडींनी काही हत्या केलेल्या आहेत. या प्रकरणात अधिकतर महिलांना मारण्यात आले आहे.
    सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (सीएसएस)ने देशातील जातीय घटनांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळले की 2014 नंतर देशात कुठलीही मोठी जातीय दंगल झालेली नाही. 2014 मध्ये 2013 च्या तुलनेत दंगली कमी झालेल्या आहेत. परंतु, समाजामध्ये जातीयवादी विचारांचा पगडा वाढला. त्याचे प्रमुख कारण सत्ताधारी नेत्यांची घृणा वाढविणारी भाषणे होत. 2015 मध्ये जातीय हिंसामध्ये किंचित वाढ झाली आणि त्यात मरणार्यांची संख्या 90 झाली. त्या तुलनेत 2014 साली 84 लोक मृत्यू पावले होते. वर्तमान सरकार सत्तेत आल्यानंतर जातीयवादी हिंसेच्या स्वरूपामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. आता  मोठ्या जातीयवादी दंगली होत नाहीत. त्याउलट छोट्या छोट्या हिंसक घटना होत राहतात. ज्यात कधी मृत्यू होतात तर कधी होत नाहीत.
    पॉल ब्रॉस (द प्रोडक्शन ऑफ हिंदू-मुस्लिम रॉएट्स इन कंटेम्पोररी इंडिया 2004 ) मध्ये लिहितात की दंगली ह्या संस्थागत दंगाप्रणाली (आयआरएस ः इन्स्टिट्यूशनल रॉयट्स सिस्टम) द्वारे अनुकूल राजकीय परिस्थितींमध्ये भडकावल्या जातात. त्यासाठी नियमित होणार्या मामुली तंट्यांना जातीय रंग देवून त्यांचे स्वरूप मोठे केले जाते. जातीय हिंसेचा नेहमी त्या पक्षाला फायदा होतो जो बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. अर्थात पूर्वी जनसंघ आणि आता भाजपाचा याला फायदा होतो.
    हिंदू श्रेष्ठतावादी आता सत्तेमध्ये आहेत. म्हणून त्यांना आपला प्रभाव वाढविण्यासाठी मोठ्या आणि भीषण दंगली घडविण्याची गरज नाही. ते आपला उद्देश्य साध्य करण्यासाठी घृणा पसरविणारी भाषणे आणि दुष्प्रचार करून आपला हेतू साध्य करू शकतात. अल्पसंख्यांकांना धर्मपरिवर्तन करणारे, आतंकी, पाकिस्तान समर्थक, अलगाववादी आणि राष्ट्रविरोधी म्हणून प्रचारित करून त्यांच्याबाबतीत असेही म्हटले जाते की, ते देशाची पुन्हा फाळणी करण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय, त्यांना लवजिहादच्या माध्यमातून हिंदू महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे आणि गायींची हत्या करणारे म्हणूनही दोषी ठरविले जाते. असेही प्रचारित केले जाते की, त्यांनी भूतकाळात हिंदूंचे दमन केले होते आणि हिंदू मंदिरांना उध्वस्त केले होते. या दुष्प्रचारामुळे जातीय अग्नी हळूहळू प्रज्वलित होत राहतो. मात्र मिडिया आणि अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचे लक्ष त्यांच्याकडे जात नाही. याउलट मोठ्या दंगली आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यास मिडिया आणि मानवाधिकार संघटनांचे तात्काळ लक्ष तिकडे जाते आणि त्यामुळे सरकारची बदनामी होते.
    आयआरएसला जातीय दंगली घडविण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सर्वप्रथम एक जोरदार प्रचार अभियान राबविला जातो. ज्याचा उद्देश्य असतो की, अल्पसंख्यांकांचे दानवीकरण करावे. डॉ. असगर अली इंजिनिअर याला ’समिष्ट स्तर के कारक’ (ऑन डेव्हलपिंग थेअरी ऑफ कम्युनल रॉएट्स) म्हणतात. कोणतीही जातीय दंगल त्याच वेळेस घडवली जाते ज्यावेळेस त्याच्यासाठी समर्पक कारण उपलब्ध असते. अर्थात ज्या समुहावर निशाना साधायचा असतो त्याच्या बाबतीत समाजामध्ये पूर्वग्रह पसरलेले हवेत. त्यानंतर सुक्ष्म स्तरातील कारणांची आवश्यकता पडते. मग हे कारण एखाद्या मस्जिदी समोरून जाणारी हिंदू धार्मिक मिरवणूक असो, कुठला आंतरधार्मिक विवाह असो, एखाद्या मुस्लिम व्यक्तीवर गुलाल फेकण्याची घटना असो, कुठल्या मुस्लिम दुकानदाराद्वारे गाय घेवून जाणारी घटना असो किंवा साबरमती एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आग लावण्याची घटना असो. समर्पक स्तरावरील कारणं अगोदरच दंगलीची वातावरणनिर्मिती करून ठेवतात. नंतर फक्त एक काडी लावण्यासाठी सुक्ष्म स्तरावरील कुठलेही कारण उपलब्ध होवून जाते. मॉबलिंचिंगसुद्धा याच प्रक्रियेमधून होत असते. असं वाटू शकतं की या घटना उत्स्फूर्त स्वरूपाच्या आहेत परंतु, हे खरे नाही. या घटनामागे अनेक वर्षांचा दुष्प्रचार आणि समाजात खोलपर्यंत पेरलेले पूर्वाग्रह असतात.
मॉबलिंचिंग आणि जातीय दंगली
    झुंडीद्वारे केल्या जाणार्या हत्यांना इंग्रजीमध्ये मॉबलिंचिंग असे म्हणतात. अशा घटना आणि जातीय दंगली दोन्हीमध्ये उन्मत्त झुंडींना हिंसेसाठी प्रवृत्त करून रस्त्यावर उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अफवा पसरविली जाते. या अफवा अशा असतात की ज्यामुळे लोक संशयग्रस्त, चिंतीत आणि क्रोधीत होतात. मग त्या साधारण माणसांच्या झुंडींचे रूपांतर रक्तपिपासू झुंडीमध्ये होवून जाते.
    कधी अशी अफवा पसरते की, शहरातील दूध किंवा पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये विषाचे मिश्रण केले गेलेले आहे. अशाने महिला आपल्या मुलांना वरचे दूध पाजविणे बंद करून टाकतात. काही साधे भोळे लोग जे सहजासहजी विश्वास करतात ते पाणीसुद्धा पिणे बंद करून टाकतात. पण शेवटी कोण कितीही वेळ तहानलेला राहू शकतो. साधारणपणे अशाही अफवा पसरविल्या जातात की दूसर्या समुदायाच्या हत्यारबंद झुंडी आपल्यावर हल्ला करण्यासाठी निघालेल्या आहेत. अमुक एका मस्जिदीमध्ये हत्यार गोळा होत आहेत. किंवा अशीही अफवा पसरविली जाते की, अमुक एक विशिष्ट समाजातील महिलांवर बलात्कार केले जात आहे. यापैकी कोणतीही एक किंवा अधिक अफवा ह्या एका समुदायाच्या लोकांना रस्त्यावर उतरून दुसर्या समुदायाच्या लोकांना आणि त्यांच्या संपत्तीला नुकसान पोहचविण्यासाठी पुरेशा असतात.
    शहर असो का गाव, मुलं चोरणारी टोळी फिरत आहे अशी अफवा असो किंवा लोक गाय कापण्यासाठी घेवून जात आहेत, अशी अफवा असो, ती इतर लोकांना हिंसेसाठी प्रेरित करण्यासाठी उपयोगात आणली जाते. हीच पद्धत दंगली भडकविण्यासाठीही अवलंबविली जाते.
    जातीय दंगली आणि झुंडीद्वारे केली जाणारी हत्या यामध्ये दूसरी एक समानता अशी आहे की, ज्यांच्याविरूद्ध असे अपराध घडलेले आहेत त्या लोकांचा न्याय व्यवस्थेच्या क्षमतेवर अविश्वास वाढतो. दंगेखोर आणि हिंसक झुंडी करणार्या लोकांना तात्काळ न्याय हवा असतो. त्यांना आपल्या समोरील व्यक्ती ह्या गुन्हेगार आहेत याचा कुठला पुरावा लक्षात घेण्याची गरज वाटत नाही. ते त्याला तात्काळ आणि त्याच ठिकाणी शिक्षा देवू इच्छितात. आणि तीही जास्तीत जास्त अमानवीय पद्धतीने. वास्तविक पाहता ते न्यायाच्या नावाखाली बदला घेत असतात.
    दंगली आणि झुंडीमधील हिंसेचे वैशिष्ट्य  असेही आहे की, कधी-कधी दोन पिडित समुदायांना एकमेकांसमोर लढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. अनेक दंगलीमध्ये दलितांना मुस्लिमांच्याविरूद्ध तर मुस्लिमांना दलितांविरूद्ध हिंसेसाठी प्रवृत्त केले जाते. याचे उदाहरण म्हणजे कंधमालमध्ये आदिवासींनी दलित ख्रिश्चनांवर हल्ले केले होते. दंगली आणि झुंडींच्या हिंसेमध्ये सापडणारे लोक ’बाहेरील’ लोक असतात. ते दुसर्या धर्माचे, दुसर्या गावाचे किंवा दुसर्या शहराचे असू शकतात.
    मात्र जातीयदंगली आणि झुंडीद्वारे केली जाणारी हिंसा यात थोडे अंतरसुद्धा आहे. जातीय दंगली ह्या एका समुदायाविरूद्ध युद्धाची घोषणा असते. शत्रु समुदायाच्या प्रत्येक व्यक्ती आणि संपत्तीला त्यात नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. दंगलींचा मुख्य उद्देश एका समुदायाला शिक्षा देणे असतो. दंगलीमध्ये कोणताही व्यक्ती शत्रू बनण्यासाठी एवढे पुरेसे असते की तो एका विशिष्ट समुदायाचा सदस्य आहेे. मग तो कितीही सरळ, साधा आणि सभ्य का असेना. त्याला फक्त यासाठी टार्गेट बनविले जाते की, तो त्या समाजाचा सदस्य आहे ज्याला दंडित करावयाचे आहे बस्स. याउलट मॉबलिंचिंगमध्ये हिंसेचे टार्गेट काही विशिष्ट व्यक्ती असतात. ज्यांना झूंडी ह्या विशिष्ट अशा गुन्ह्यासाठी दोषी मानतात. याशिवाय, जातीय दंगली भडकाविण्यासाठी पूर्व तयारी आवश्यक असते. त्यासाठी योजना बनवावी लागते. याउलट मॉबलिंचिंगमध्ये फारशी योजना आणि व्यापक तयारीची गरज नसते.
    गायीच्या मुद्यावर जी हिंसा होत आहे त्यात निशान्यावर प्रामुख्याने मुस्लिम आहेत. अख्लाक, पहेलू खान, अलिमोद्दीन अन्सारी इत्यादी त्याची उदाहरणे आहेत. इंडिया स्पेन्डच्या अहवालानुसार गायीशी संबंधित मुद्दयांवर झुंडीचे लक्ष्य 84 टक्के मुस्लिम होते. यात जनावरांचा व्यापार करणार्या मुस्लिमांवर विशेष करून हल्ले होत आहेत. अन्य मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी बच्चा चोरी किंवा दुधात किंवा पाण्यात विष कालविले आहे, सारख्या अफवांचा उपयोग केला जातो. अशी अफवा पसरविली जाते की, मुलांची चोरी करून त्यांच्या शरिरातील अवयव काढून हे लोक विक्री करून टाकतात. बच्चा चोरीशी संबंधित अफवा पसरविण्यासाठी ज्या चित्रफितींचा उपयोग केला जात आहे. त्यातील काहींमध्ये संशयित म्हणून बुरखानशीन महिलेला दाखविण्यात आलेले आहे. स्पष्ट आहे अशा अफवा पसरविणार्या लोकांना अशी आशा राहिली असेल की या मुद्दयालाही गायीच्या मुद्दयासारखीच प्रसिद्धी मिळेल व हिंसक झुंडीच्या निशान्यावर मुस्लिम लोक येतील. परंतु, त्यांचे हे गणित अलिकडे बिघडले. त्यात त्यांच्या हिंसेला काही मागासवर्गीय आणि मुस्लिमेत्तर अनोळखी लोकही बच्चा चोरीच्या आरोपाखाली आपला जीव गमावून बसले.
राज्यांची भूमिका
    गोहत्येच्या प्रकरणी मॉबलिंचिंगच्या ज्या घटना झाल्या त्यात राज्य सरकारांची भूमिका एकतर्फी राहिलेली आहे. या प्रकरणी जरी काही लोकांचा जीव वाचला तरी त्यांच्यावर गोहत्याप्रतिबंधक कायद्यांतर्गत खटले चालविले जातात. हा कायदा अतिशय कठोर आहे. मात्र मॉबलिंचिंग जो की गोहत्येपेक्षा अधिक गंभीर गुन्हा आहे, च्या आरोपींविरूद्ध कुठलीच कारवाई केली जात नाही. नाईलाजाने करावी लागली तरी अत्यंत ढिसाळपणे केली जाते. पहेलू खानच्या खटल्यात राज्य सरकारने आरोपींच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही उलट जे लोक झुंडीच्या हल्ल्यातून आपला जीव वाचविण्यामध्ये कसेबसे यशस्वी झाले होते त्यांनाच आरोपी बनविले गेले.
    सामान्यपणे पोलीस घटनास्थळावर उशीरा पोहोचतात. तोपर्यंत झुंडी आपले काम फत्ते करून निघून जातात. भाजपाचे नेते आणि मंत्री लिंचिंगच्या आरोपींचा शक्य तेवढा बचाव करतात. अलिमोद्दीन अन्सारीच्या हत्येप्रकरणी ज्या 11 लोकांना न्यायालयाने दोषी ठरविलेले आहे त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळून दिल्याचा श्रेय लाटण्यासाठी झारखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री जयंत सिन्हा यांच्यात स्पर्धा सुरू होती. जयंत सिन्हांनी तर वरील अकरा लोकांचे स्वागतसुद्धा केले. एकंदरित राज्य सरकारे हे अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. असे करून ते कदाचित हा संदेश देवू इच्छितात की झुंडींनी जर आपल्या हिंसेद्वारे मुस्लिमांना मारून टाकले तर त्यात काही चुकीचे नाही.
    आता जेव्हा की झुंडीच्या हिंसेने उग्रस्वरूप धारण केलेले आहे आणि मुस्लिमांबरोबर इतर समाजाचे लोकही त्या हिंसेचे बळी पडत आहेत. तेव्हा कुठे सरकारने या संबंधात पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. धुळ्यात एका फिरस्ती जनजातीच्या पाच व्यक्तींची झुंडीने हत्या करण्यापूर्वी गोसावी समाजाने पोलिसांकडे अशी मागणी केली होती की, त्यांना ओळखपत्रे देण्यात यावीत. मुले चोरीच्या अफवा त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून आधून मधून पसरविल्या जात होत्या. परंतु, प्रशासनाने त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी कुठलेच पाऊल उचललेले नव्हते. जर पोलिसांनी असा स्पष्ट इशारा दिला असता की, बेकायदेशीर कृत्य करणार्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल तर या कदाचित या पाच निरपराधांचा बळी गेला नसता. पण तेव्हा कोणाला माहित होते की या अफवांचे बळी मुस्लिमेत्तर सुद्धा होवू शकतात.
निष्कर्ष
    कोणत्याही सभ्य समाजामध्ये मॉबलिंचिंग कधीही स्विकार्ह असू  शकत नाही. या गोष्टी जंगलराजसारख्या आहेत. इ.स.1877 ते 1950 पर्यंत अमेरिकेमध्ये अनेक काळ्या वंशाच्या लोकांच्या हत्या मॉबलिंचिंगमुळे झाल्या. त्यापाठीमागे समाजामध्ये गोर्यांचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा उद्देश्य होता. काळ्या वंशाच्या लोकांना गौरवर्णीय लोकांसमोर समर्पण करण्यासाठी विवश करणे हा पण उद्देश होता. या सर्व मॉबलिंचिंगच्या घटना अगदी छोट्या-छोट्या कारणांमुळे तर कधी खोटे आरोप लावून घडविण्यात आल्या. गौरवर्णीयांचा असा दावा होता की, अशा प्रकरणांमध्ये खटले भरण्याची गरज नाही. काळ्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झुंडी देत असतील तर ते पूर्णपणे योग्य आहे. अमेरिकेच्या दक्षिणी राज्यामध्ये 4 हजार 84 मॉबलिंचिंगच्या घटना झाल्या आणि अन्य राज्यामध्ये 300. या घटनांमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी खचितच कोणाला शिक्षा झाली असावी. अमेरिकेच्या नागरी अधिकार आंदोलनानंतरच लिंचिंगच्या या घटना बंद झाल्या.
    हिंदूत्ववादी राजकारणाच्या विचारधारेचे प्रमुख चिंतक सावरकर आणि गोळवलकर यांचा असा विचार होता की, मुस्लिम आणि इसाई हे हिंदू राष्ट्राच्या परिघाच्या बाहेर आहेत. आणि हिंदू राष्ट्र या बाहेरच्या लोकांसोबत अविरत युद्धरत आहे. गोळवलकर यांनी आपले पुस्तक, ”वुई आर आवर नेशनहुड डिफाईन्ड’ मध्ये याच गोष्टीचे समर्थन केले होते की, भारतात मुस्लिम आणि ख्रिश्चनांसोबतही तसाच व्यवहार केला जावा, जसा हिटलरच्या जर्मनीमध्ये ज्यू लोकांबरोबर केला गेला.
    मॉबलिंचिंग म्हणजे काही लोकांना संपविणे किंवा काहींना जायबंदी करणे इतपत मर्यादित नाही. मुद्दा लोकशाहीचा आहे. कायदा, शासन आणि न्यायाचा आहे. या प्रकरणांमध्ये पंतप्रधान गप्प असल्यामुळे त्यांच्या सरकारची दिशा स्पष्ट होते. अनेक मंत्री आणि भाजपच्या नेत्यांद्वारे जे काही बोलले जात आहे त्यावरून स्पष्ट आहे की, आपण एक अशा समाजाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत ज्या समाजात जो शक्तीशाली तोच खरा आहे.
    ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे की, राज्य सरकारे तात्काळ मॉबलिंचिंगच्या घटनांना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. तसे करण्यासाठी आपल्या सर्वांना त्यांना बाध्य करावे लागेल. लिंचिंगच्या घटना फक्त त्या समाजाचेच दानवीकरण करत नाही जो निशान्यावर आहे. तर त्या घटना पूर्ण समाजालाच अमानवीय आणि हिंसक बनवून टाकतात. उशीर होण्याअगोदर आपल्या सर्वांना योग्य ती पावले उचलून मानवाधिकार, कायदा, शासन आणि लोकशाही यांचे संरक्षण करावे लागेल.
    (इंग्रजीतून हिंदीत भाषांतर अमरिश हरदेनिया आणि हिंदीतून मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख)

- इरफान इंजिनियर

घरबसल्या टिव्ही चैनल्सवरून पैसे भरून मी पाहिलाय ’इमेजबिल्डींग’चा ’मिठी’चा खेळ! त्यानंतरच्या विश्लेषणांचा सवयीचा सोईस्कर सहेतुक गोंधळ सुद्धा ! मला ही ’भारतीय’ म्हणून बोलण्या-लिहिण्याचा उरला सुरला अधिकार वापरून साधा संवाद साधावा वाटतोय.
    अख्ख्या मिठी, मगरमिठी, गळा मिठी यावरच्या उत्साही, अभ्यासू चर्चेचा पूर आलाच. ट्रोलिंगची कुजकट मिजासी वाढलीच. नेत्रपल्लवीचा खोडकरपणा नजरेत बसला किंवा खुपलाही ! पण या मिठीला प्रतिसाद देणारे छद्मी हास्य, देहबोलीतून व्यक्त होणारा हुकमी घमेंडीचा उन्माद मात्र नजरेत भरला. देशाच्या मूळ समस्यांना बगल देत सर्कशी अभिनय कुशलता पुन्हा भाव खाऊन गेली. 2019 च्या राजकीय जागराची नांदी सर्वसामान्याला गाजर दाखवून झाली.
    एकूण सत्तेचा प्रचंड उन्माद आणि अतिप्रबळतेची दावेदारी सहज केली जात असताना या उन्मादी अवस्थेपर्यंत या व्यवस्थेला आणण्याचं पुरक काम प्रमुख विरोधी पक्षांनी मूकपणे केलंय हे ही दिसत होतं. अगदी सन्माननीय राहूल गांधी यांचे भाषण ऐकताना लक्षात आलेल्या काही मुद्द्यांचा संदर्भ देणे आवश्यक वाटते. ’आम्ही जोडण्याची भाषा करतो’. आपल्या भाषणात ’भारत’ ऐवजी वारंवार ’हिंदुस्थान’ या शब्दाचा उच्चार, उपरोधिकतेचा आभास निर्माण करीत ’मी हिंदू आहे, धर्म समजाविल्याबद्दल आपले आभार’ अशा वाक्याची पुनरावृत्ती म्हणजे एकूण सध्या कालोपयोगी हिंदुत्वाचा, सॉफ्टली काँग्रेसी वावर मान्य असल्याची उघड कबुली दिली.
    पंतप्रधान किंवा शहासाहेब यांना सत्तेशिवाय चैन नाही, त्यासाठी ते वाट्टेल त्या गोष्टी करू शकतात. याकडे निर्देश योग्य पण मिठीचा आग्रह धरून सत्तेची स्वप्नं यांनाही लपवता आली नाहीत. मात्र ’राहूलजी गांधी’ यांनी कोणत्या मुल्यांना नेमके भाव दिलेय याचे तर्कभाव करता येत होते. मिठाचा सत्याग्रह करणारे म. गांधी, राष्ट्रपिता म. गांधी, कट्टरतेतून झालेल्या हत्येचे बळी ठरणारे सहिष्णू गांधी, समतेचे मुल्य प्रस्थापित करत एकता सांगणारे म.गांधी की हे म.गांधी मुल्य त्यांच्या भाषणात अभिप्रेत होतं? की भाजपा प्रणित गांधी अर्थात पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या मुल्यांची जाणते-अजाणते पखरण होत राहिली?
    अशा शंका बावचळत येण्याचे काही साधी कारणे संदर्भात येतात म्हणजे अगदी परवापर्यंत सेक्युलर सेक्युलर म्हणून ओरडत, धर्मकट्टरतेपासून दूर आहोत असे मिरवत राहणारे राजकीय पक्ष, सामाजिक चळवळी (काही दुर्मिळ तुरळक मोजके सन्माननीय अपवाद) केवळ धु्रवीकरणाचा अजेंडा पुढे रेटत आहेत. काँग्रेसच्या मुंबई खासदारांनी साधू-महंत सेल पक्षांतर्गत स्थापन केला. तरी अग्नीवेश हल्ल्यावर बोलणे नाही. अगदी राजीव गांधींच्या स्मरणार्थ राजीव गांधी फौंडेशनचा पुरस्कार 2004 ला सध्याचे प्रधानमंत्री यांना बहाल करण्यात आला होता. म्हणजे 2002 नंतरच्या उन्मादाला हळूहळू जोपासायचे काम कळत-नकळत सुरूच आहे. राजीव गांधींच्या प्रधानमंत्री पदाच्या भाषणामध्ये होणारं पं.उपाध्याय यांचे स्मरण किंवा अदी मानवता एकतेला कलंकित करणार्या ’बाबरी शहादतीं’च्या घटनेनंतर तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी अल्पसंख्यांकाना दिलेला उठवळ वचननामा. खरंतर माफी मागून नव्वदेक दिवसात मस्जिद बांधणीचं अभिवचन सहेतूकपणे स्मृतीभ्रंश करण्यात आले आहे. त्याच दशकातील रथयात्रेने आलेल्या कट्टर धार्मिक ध्रुवीकरण हे आजच्या म्हणजे 2014 नंतर दहशतवादी फॅसिस्ट दंगली, लिंचिंगाच्या निमित्ताने उन्मादी झालेय. हा उन्माद मग कुणी जोपासला? कोणी खतपाणी घातलं?
    संघ आणि संघप्रणित संस्थांना दुषण देत, राष्ट्रवादाचा कानमंत्र त्यांच्याच व्यासपीठावरून देणं हे कशाचं मुल्यभान? असो, उजव्या डाव्या प्रतिमा-प्रतिकांचा कॉम्बोपॅक करून मानवताविघातक संस्थांचे उदात्तीकरण होतेच आहे. आज कुठलाही अल्पसंख्यांक समुह असुरक्षिततेतून भितीच्या कोषात आहे. विशेषतः मुस्लिमांच्या बाबतीत हे रोज कुठेन कुठे घडताना दिसत आहे. रेल्वे/इतर प्रवासात बिनधास्त फिरता न येणं, काय खावं, प्यावं याच्यावरची सेन्सॉरशिप येणं, काय गुणगुणावं किंवा सिनेमा हॉलमध्ये कस वागावं? अशी अलिखित नियमावलींच्या ओझ्याखाली दबला जातोय तो सर्वसामान्य मुस्लिम. लिंचिंगच्या घटनांची प्रचंड वाढ छोट्या धर्मजात समुहाच्या मोर्चे एकत्रीकरणातून उपरे ठरण्याची साशंकता. या प्रश्नांवर राहूल गांधी बोललेच नाहीत. धर्माभिमुख शिक्षणपद्धती, सैलसर वक्तव्यांची दुफळी निर्माण करणारा अजेंडा, हे सगळं बाजूला का राहतं? याचाही विचार करायलाच हवा. संविधान बचावच्या नार्याने एकत्र येणारे सगळेच पक्षपंथ सॅफर्नएज्युकेशनचा साधा विरोध दर्शवित नाहीत. एकूण काय भाजपाने आपल्या आदर्शांत सजवलेले, मान्य केलेले गांधी वेगळे... आणि समता सांगणारे गांधी वेगळेच! ते त्यांच्या प्रतिकांना व्यवस्थित प्रवाहीत करताहेत. राहूल गांधी प्रवाहाविरूद्ध न जाता सामिलकीचा रंग दाखवताहेत.
    मा.राहूलजी आपण कोणत्या गांधीजींच्या मुल्यांना उजाळा द्याल? या उत्तरानेच मानवता-एकता मूल्ये अबाधित राहतील अशी तसूभर खात्री आहे. बाकी या मिठीकहाणीत मा. पंतप्रधानाच्या एकूण मिठ्यांचीही चर्चा मिठास देऊन जाते. आपल्या देहबोलीतून, नकलातूर, प्रगाढ वक्तृत्वातून सर्कशी सेम उत्तरे त्यांनी दिली. बाकी प्रश्न जैसे थे!! उन्माद-अहंकार तसाच. पूर्वापार सोईस्कर पोसत ठेवलेला हा अहंकार आता उन्मादाने भरगच्च भरलाय. त्याला तोडणे संपवणे अवघड होताना ’मिठी’, ’डोळा’ ही भावनिक हत्यारे काम करतील? हा उन्माद वाढत जाईल, जातोय.. पण हा उन्माद आपणच जोपासला, जतन केला हे ही सत्यच! मग तरीही मिठीचा प्रेम संदेश द्यायचाच असेल, मिठी मारायचीच असेल तर ’अलवर’  मधल्या नुकत्याच बळी ठरलेल्या मुस्लिमांच्या घरी जा, रोहितच्या घरी जा, मिठी द्यायचीच असेल नजिबच्या भावाला, मुजिबला द्या! पहलू, अख्लाक, मोहसीन अगदी शाहीद आजमीच्या भावापर्यंत जा.. नजर भिडवायची असेल तर नक्की निर्भया, आसिफा आणि पिडीतांच्या आई-वडिलांशी नजर भिडवा..
    तिकडची अपेक्षा नाहीच.. तुमच्याकडून नाही... पण तुम्ही ’माणसंजोडता’ असं म्हणालात म्हणून..!!
शेवटी रवंथ पुरे!! तुम्हा सार्यांच पॉलीटिकल प्रोजेक्शन आणि पोझिशनिंग सुरूच राहो, जय हो!

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 
9923030668

ऑगस्ट 1941 साली लाहौर येथे जमाअते इस्लामीची स्थापना झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी दुर्देवाने भारताची फाळणी झाली. त्यामुळे मूळ जमाअते इस्लामी पासून विभक्त होवून 16 एप्रिल 1948 रोजी अलाहाबाद येथे 240 सदस्यांच्या उपस्थितीत जमाअते इस्लामी हिंद नावाची नवीन संघटना स्थापन झाली. मूळ संघटनेच्या नावात ’हिंद’ या शब्दाचा समावेश करून जमाअतने आपण अस्सल भारतीय असल्याचा पुरावा जनतेसमोर ठेवला. जमाअते इस्लामी प्रमाणेच जमाअते इस्लामी हिंदने सुद्धा व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनामध्ये इस्लामचा एक जीवन पद्धती म्हणून स्वीकार केला, असे असले तरी जमाअतने भारतीय संविधान आणि भारतातील सर्व कायदे याचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय अगदी स्थापनेच्या दिवशीच केला. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे एक वैशिष्ट्य म्हणजे जमाअतचे सदस्य कायद्याचेच नव्हे तर नैतिकतेचे सुद्धा पालन करतात.
    आज 21 व्या शतकातही बहुतेक भारतीय मुस्लिमांचा असा समज आहे की, इतर धर्माप्रमाणे इस्लामसुद्धा एक धर्म आहे आणि तो विशिष्ट चालीरिती व इबादतीपुरता मर्यादित आहे. त्याचा संबंध माणसांच्या व्यक्तिगत जीवनाशी आहे. सामुहिक व सार्वजनिक जीवनामध्ये तो कदाचित 1438 वर्षापूर्वी रिलेव्हंट (लागू) असेल परंतु, आता नाही. म्हणून बहुतेक मुस्लिमांनी इस्लामला आपल्या व्यक्तिगत इबादतीपर्यंत मर्यादित करून सामुहिक व सार्वजनिक जीवनामध्ये धर्मनिरपेक्षतेचा किंवा साम्यवादाचा जीवनशैली म्हणून स्वीकार केलेला आहे.
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचा सिद्धांत
    जमाअते इस्लामी हिंदचा विचार नेमका याच्या उलट आहे. जमाअतची धारणा व श्रद्धा अशी आहे की, इस्लाम एक ईश्वरीय व्यवस्था आहे. तिचा स्विकार व्यक्तिगत, सामुहिक व सार्वजनिकरित्या केल्याशिवाय या जीवनात तसेच मरणोत्तर जीवनात कोणतीही व्यक्ती यशस्वी होणार नाही. इस्लामचा फक्त मनोमन स्विकार करून आचरणात दूसरीच जीवन पद्धती स्वीकारून जमणार नाही. इस्लामी तत्वांना वैयक्तिक व सामुहिक जीवनामध्ये प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला जमाअते इस्लामीने ”अकामत-ए-दीन” अशी संज्ञा दिलेली आहे.” अकामत हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ विखुरलेल्या वस्तुंना एकत्रित करून त्यांची सुयोग्य मांडणी करणे असा होतो. ’दीन’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक धर्म अन् दूसरी व्यवस्था. जमाअते इस्लामीमध्ये दीन म्हणजे व्यवस्था या अर्थाने वापरला जातो. येणेप्रमाणे अकामत-ए-दीन या शब्दाचा अर्थ इस्लामच्या विखुरलेल्या सिद्धांतांना एकत्रित करून त्यांची सुयोग्य मांडणी करणे व त्यानुसार जीवन जगणे होय. जमाअतची अशी श्रद्धा आहे की, जीवनात इस्लामी तत्वांचा स्विकार केल्याशिवाय, घरात असो की समाजात, शांती, समता व न्यायाची स्थापनाच होवू शकत नाही. म्हणून जमाअतच्या उपक्रमांचा मोठा भाग व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनात इस्लामी तत्वांना लागू करण्यामध्येच खर्ची पडतो.
जमात-ए-इस्लामी हिंदची नियमावली
    1948 साली झालेल्या स्थापनेनंतर जमाअते इस्लामी हिंदने 13 एप्रिल 1956 रोजी स्वतःचे संविधान अर्थात नियमावलीचा लिखित स्वरूपात स्विकार केला. या नियमावलीमध्ये एकूण 75 कलमांचा समावेश केलेला आहे. कलम 3 मध्ये जमाअते इस्लामीच्या मूळ श्रद्धेचा उल्लेख केलेला आहे. या कलमाप्रमाणे जमाअतची श्रद्धा, ” लाईलाहा इल्लललाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह” अशी आहे. याचा अर्थ पूजनीय फक्त अल्लाहाच आहे आणि हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैही व सल्लम त्याचे प्रेषित आहेत.
    कलम 4 मध्ये जमातचा ’नस्बुलऐन’ अर्थात उद्देश जाहीर करण्यात आलेला आहे.    तो म्हणजे, ”अकामत-ए-दिन” ज्याचा अर्थ वर स्पष्ट करण्यात आलेला आहे. व हा उद्देश फक्त अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठीच आहे. दूसर्या कशासाठीही नाही. अर्थात स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी, नेतृत्व, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी नाही. इस्लाम जो की पृथ्वी तलावर अवतरित झालेल्या पहिल्या व्यक्तीपासून (ह.आदम अलै.) प्रेषित मुहम्मद सल्ल. पर्यंत चालत आलेला आहे. हा एकमेव शुद्ध स्वरूपात असलेला दीन आहे. ज्याला की अल्लाहने समस्त मानवजातीसाठी पसंत केलेला आहे. हा दीन माणसाच्या व्यक्तीगत, सामुहिक आणि सार्वजनिक जीवनावर सारखेपणेच लागू होतो. घरात एक, बाहेर एक, पोटात एक, ओठात एक अशी दुटप्पी भूमिका जमाअते इस्लामी हिंदला मान्य नाही. जमाअतची अशी धारणा आहे की, इस्लाम ही जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. एवढेच नव्हे तर या पद्धतीचा स्वीकार न केल्यास माणसाचे जीवन तणावग्रस्त, विकारग्रस्त होवून जाते. शिवाय, जीवनात उत्पन्न होणार्या सर्व समस्यांचे समाधान केवळ इस्लामच देवू शकतो. याचा पुरावा म्हणून मी एका सत्याकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. ते सत्य म्हणजे अनेक मुस्लिम देशांमध्ये ज्या ठिकाणी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा जीवनपद्धती म्हणून स्वीकार केलेला आहे. त्या ठिकाणी एक तर मनोरूग्ण व मनोरूग्णालय तथा वृद्धाश्रम नाहीत किंवा अत्यल्प संख्येत आहेत.
    कलम 5 मध्ये कलम 4 मधील उद्देशाला हस्तगत करण्याची पद्धती दिलेली आहे. त्यात म्हटलेले आहे की, अ) - कुरआन आणि हदिस हाच जमाअते इस्लामीचा पाया आहे. बाकी इतर गोष्टींना तेवढीच मान्यता दिली जाईल जेवढी की कुरआन आणि हदिसच्या प्रकाशात देणे शक्य आहे.
ब)- जमाअत आपले उद्देश्य गाठण्यासाठी अख्लाक (नैतिकता)ची पाबंद राहील. कधीच त्या मार्गाचा अवलंब करणार नाही जो वाकडा, अप्रमाणिक किंवा बेकायदेशीर असेल. ज्यामुळे जातीय घृणा पसरू शकेल किंवा आपसात गटतट पडतील व अशांती माजेल. क) जमात आपल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी सकारात्मक व शांतीपूर्ण मार्गाचाच अवलंब करेल. म्हणून जमाअत-ए-इस्लामी  हिंद इस्लामी मुल्यांचा प्रचार व प्रसार करूनच लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि त्याच दिशेने लोकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करेल. 
    अशा पद्धतीने जमाते इस्लामी हिंदचे कार्य लिखित संहितेनुसार चालते. कोणताही हिंसक मार्ग, भूमिगत चळवळ यावर जमाअतचा विश्वास नाही. सामाजिक क्रांती ही वैचारिक परिवर्तनानेच शक्य आहे, अशी जमातची धारणा आहे. यासंबंधी जमातचे संस्थापक मौलाना मौदूदी रहे. यांचे विचार खालीलप्रमाणे, ” इस्लामी तहेरिक के कारकूनों को मेरी आखरी नसिहत ये है के, उन्हें खुफिया तहेरिकें चलाने और अस्लहे (हथियार) के जरिए इन्क्लाब बरपा करने की कोशिश नहीं करनी चाहिए. ये भी दरअसल बेसब्री और जल्दबाजी की ही एक सूरत है और नतायज के ऐतबार से दूसरी सूरतों की बनिस्बत ज्यादा खराब है. इन्क्लाब (सामाजिक क्रांती) हमेशा अवामी तहेरिक (सामाजिक चळवळ) के जरिये से ही बरपा होती है.” (मक्का येथे अरबी युवकांच्या मेळाव्यास संबोेधित करतानांच्या मौलानांच्या भाषणातील अंश).
    जमाअत-ए-इस्लामी हिंदची रचना
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्य कार्यालय डी-321, दावत नगर, अबुल फजल एन्क्लेव्ह, जामिया नगर, नवी दिल्ली. 110025. येथे आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे कार्य करण्यासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे. 1. केंद्रीय कार्यालय दिल्ली, 2. राज्यस्तरीय कार्यालय. भारताच्या जवळ-जवळ प्रत्येक राजाच्या राजधानीत जमाअतचे राज्यस्तरीय मुख्य कार्यालय आहे. 3. जिल्हास्तरीय कार्यालय.
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचे  आज पावेतो 4 अध्यक्ष झालेले आहेत. त्यांची नावे 1. अबुलैस इस्लाही 2. मुहम्मद युसूफ 3. सिराजुल हसन 4. डॉ. अब्दुल हक अन्सारी. सध्याचे  अध्यक्ष पाचवे असून त्यांचे नाव मौलाना जलालुद्दीन उमरी असे आहे.
जमाअतमध्ये कोणालाही कोणत्याही पदाची लालसा नसते. कोणताही सदस्य जर एखाद्या पदासाठी इच्छुक असेल तर त्याला ते पद कधीच मिळत नाही. प्रत्येक पदासाठी योग्य व्यक्तीची निवड सदस्यांच्या सल्ल्याने होत असते. त्यासाठी योग्यता, समज, त्याग, समर्पण आणि अनुशासन याचा विचार केला जातो. या सर्व गुणांमध्ये जो व्यक्ती योग्य वाटत असेल त्याची निवड पदासाठी केली जाते. म्हणूनच आजपर्यंत जमाअते इस्लामी हिंदमध्ये कधीही नेतृत्वासाठी भांडणे झालेली नाहीत. जमाअतचे कार्य शुराई निजाम म्हणजे सल्लागार मंडळाद्वारे चालते. त्यात अत्युच्च पारदर्शकता असते. नैतिकतेला जमाअतच्या कार्यात अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. नियम 11 अनुसार जमाअतचे अध्यक्ष, प्रतिनिधीसभा, सल्लागार मंडळ व सचिव निवडले जातात. नियम 6 प्रमाणे जमाअतचा सदस्य होण्यासाठी भारताच्या कोणत्याही नागरिकाला चार अटींची पूर्तता करावी लागते. अ) कलमा लाईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह ला चांगल्याप्रकारे समजून घेवून या सत्याचा स्विकार करणे की, हीच माझी धर्मश्रद्धा आहे. (संदर्भ ः कलम- 3). ब) - जमाअतचा उद्देश्य चांगल्या प्रकारे समजून त्याचा स्विकार करणे की हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. (संदर्भ ः कलम -4). क) जमाअतची कार्यपद्धती (संदर्भ ः कलम 5) चा स्वीकार करण्याचा निर्णय करणे. ड) - जमाअतच्या नियमावलीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर हा प्रण करने की, या नियमावलीच्या आधीन राहून मी शिस्तबद्ध पद्धतीने काम करीन. वर नमूद शर्ती पूर्ण करणार्या कोणत्याही भारतीय नागरिकास जमाअते इस्लामीचा सदस्य होता येते. त्यसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शहराध्यक्षाकडे विहित नमून्यात अर्ज करावे लागतो. त्यानंतर त्याला जमाअतच्या उपक्रमांमध्ये सामील करून घेतले जाते. साधारणतः वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ त्याच्या कामाचे व जीवन पद्धतीचे बारकाइने निरिक्षण केले जाते व तो जमाअतला पाहिजे असलेल्या नैतिक पातळीच्या स्तरापर्यंत पोहोचत असेल तर त्याला सदस्यता प्रदान केली जाते. सदस्य झाल्यानंतर त्याच्यावर ज्या जबाबदार्या येतात त्याचा उल्लेख कलम 8 मध्ये केलेला आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होण्यासाठी नैतिकतेचा जो स्तर आवश्यक आहेत त्याचा उल्लेख कलम 9 मध्ये केलेला आहे.
    जमाअत-ए-इस्लामी हिंदची एकंदरित अशी रचना आहे. थोडक्यात इस्लाम एक दीन (व्यवस्था) आहे. हा फक्त इबादतीपुरता सिमित नाही तर मुस्लिमांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनासाठी ही आवश्यक आहे. म्हणून जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होणार्या लोकांनी आधी स्वतःमध्ये शुद्ध इस्लामी आचरणाचा अंगीकार करावा व तद्नंतर इतरांना त्या संबंधीचे मार्गदर्शन करावे अशी जमाअतची भूमिका अगदी सुरूवातीपासूनच राहिलेली आहे. म्हणूनच या जमाअतमध्ये प्रवेश देण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराला शुद्ध इस्लामचे प्रशिक्षण दिले जाते. त्याला वर्ष-दोन वर्षे प्रबोशनवर ठेवले जाते. त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो व तो खरोखरच जमाअतच्या मतलुबा मेआर (अपेक्षित स्तरावर खरा उतरत असेल तरच त्याला प्रवेश दिला जातो. ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होणार्यांची संख्या फार कमी असते म्हणून जमाअतच्या सदस्यांची संख्याही कमी आहे.) 
    काँग्रेसच्या कारकिर्दीत जमाअतवर दोन वेळेस प्रतिबंध लादण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळेस सर्वोच्च न्यायालयाने ते प्रतिबंध रद्द केले. आज देशभरात जमाअतचे काम अनेक क्षेत्रामध्ये चालू आहे. जमाअतच्या कार्याची विभागणी 6 विभागामध्ये केलेली असून, त्याचे कार्य जमाअतच्या सदस्यांनी दिलेल्या निधीतून व देशभरातून गोळा केलेल्या जकात आणि देणग्यांच्या माध्यमातून केले जाते. गोळा झालेल्या सगळ्या निधीच्या पाईपाईचा हिशेब ठेवला जातो. नियमितपणे सीए कडून त्याचे ऑडिट केले जाते. जकातचा पैसा सुरे तौबा आयत क्र. 60 मधील दिलेल्या आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे खर्च केला जातो. कुठेही अनावश्यक खर्च केला जात नाही. विशेषतः दंगलग्रस्त भागातील हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक शैक्षणिक संस्था जमाअत तर्फे देशभरात चालविल्या जातात. अनेक रूग्णालये चालविली जातात. प्राकृतिक आपदांच्या वेळेस जमाअतचे लोक देशातील इतर संस्था, संघटनांच्या खांद्याला खांदा लावून रिलीफ वर्क करीत असतात. जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशीही धारणा आहे की, देशातील विषमतेमुळे जे लोक आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचे मुख्य कारण व्याज आहे. व्याजामुळे गरीबाची प्रगतीच होवू शकत नाही. हफ्ते फेडण्यामध्येच त्याचे आयुष्य निघून जाते. त्यातूनच आत्महत्या होतात. म्हणून जमाअतने देशभरात बिनव्याजी पतसंस्थांचे जाळे विनलेले आहे. त्यातून हिंदू, मुस्लिमांसह सर्व जाती धर्मातील गरजू लोकांना बिनव्याजी अल्प स्वरूपाचे कर्ज दिले जाते. एकट्या महाराष्ट्रामध्ये 11 बिनव्याजी पतसंस्थांमधून मागच्या आर्थिक वर्षात 102 कोटीची आर्थिक उलाढाल झालेली आहे. या पतपेढ्यांमधून कर्ज घेणार्यांना कुठल्याही प्रकारचे तारण ठेवावे लागत नाही. कुठल्याही प्रकारचे छुपे व्याजदर नसतात. कागदपत्रांची गुंतागुंत नसते. याचा लाभ शेकडो लोकांनी घेतलेला आहे व घेत आहेत. शिवाय, जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुद्रण आणि प्रकाशन विभागाकडून हजारो पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. जवळजवळ प्रमुख भाषेमध्ये जमाअतचे साहित्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 800 वर्षे राज्य करून कुरआनचे भाषांतर कोणी केले नाही जमाअततर्फे प्रत्येक प्रमुख प्रादेशिक भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. जमाअत तर्फे इंग्रजीमध्ये रेडियन्स, हिन्दीमध्ये कांती, उर्दूमध्ये दावत व जिंदगी नौ, मराठीमध्ये शोधन, मल्याळममध्ये माध्यम सारखे दैनिक वृत्तमानपत्र, साप्ताहिक आणि मासिके नियमाने प्रकाशित केली जातात. जमाअतचे एकूण 42 उपविभाग असून, त्यांच्या मार्फतीने जनकल्याणाची कामे केली जातात.

- एम.आय. शेख
9764000737

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget