Halloween Costume ideas 2015
Latest Post


एखाद्या व्यक्तीला प्रत्येक माणसाच्या कार्यपद्धतीत वाईट विचार आढळतात. कुणाच्याही कार्यवद्धतीत त्याला प्रामाणिकपणा आणि कार्यकुशलता आढळत नाही. दुसऱ्या माणसाकडून जे घडले नाही त्यासाठी त्याला दोषी ठरवतो. दुसऱ्या माणसांना जेव्हा अशा माणसाचा स्वभाव समजतो तेव्हा ते अशा माणसापासून दूर जाऊ लागतात. यामुळे आपसात द्वेष आणि शत्रुत्व उत्पन्न होते. म्हणूनच अल्लाहने माणसांना अशा वृत्तीपासून स्वतःला वाचवण्याची ताकीद दिली आहे. “हे श्रद्धावंत लोकहो, कुणाविषयी चुकीच्या विचारांपासून स्वतःला वाचवा. कारण काही चुकीच्या धारणा गुन्हा असतात.” प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जेव्हा चुकीच्या धारणांपासून मनाई केली तेव्हा त्याचबरोबर शत्रुत्व, ईर्ष्या आणि दुसऱ्याची हेरगिरी करण्यापासून देखील त्यांना मनाई केली. कारण त्या गोष्टी चुकीच्या धारणेचे कारण असतात. तुम्ही स्वतःला इतराविषयी चुकीच्या धारणांपासून वाचवा, दुसऱ्याच्या बाबतीत वैयक्तिक माहितीच्या मागे लागू नका. तसेच एकमेकांशी वरचढ असण्याचे प्रयत्न करू नका, आपसात ईर्ष्या, द्वेष करू नका, एकमेकांपासून अलिप्त राहू नका. आणि हे अल्लाहचे भक्तहो, आपसात बंधुत्वाचे व्यवहार करा. (मुस्लिम, अबू दाऊद, तिर्मिजी)

जर एखादा माणूस असे कोणत्या कार्यात व्यस्त असेल ज्यामुळे इतरांना चुकीचे विचार यावेत तर अशा माणसाने तो जे काही करत आहे त्याची हकीकत लोकांना सांगावी, जेणेकरून इतर माणसं त्या माणसाविषयी चुकीचे विचार बाळगणार नाहीत. याचे उदाहरण स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत केले. एकदा प्रेषित (स.) एकांतात (मशिदीत एकाग्र अवस्थेत) बसले असताना त्यांच्या पत्नी त्यांना भेटायला आल्या होत्या. प्रेषित (स.) आपल्या पत्नींना परत घरी सोडण्यासाठी निघाले. तेवढ्यात समोरून दोन अन्सार व्यक्ती येत होत्या, त्यांनी प्रेषितांना एखाद्या स्त्रीबरोबर पाहिले आणि ते परत निघाले, तेवढ्यात प्रेषितांनी त्यांना हाक दिली आणि म्हटले की “ह्या माझ्या अमुक पत्नी आहेत.” त्या माणसांनी उत्तर दिले की “हे अल्लाहचे प्रेषित (स.)! आम्ही आपल्या बाबतीत कोणतातरी चुकीचा विचार मनात कसा अणू शकतो?” प्रेषितांनी उत्तर दिले, ”सैतान माणसामध्ये त्याच्या रक्तात मिसळून वहात असतो.” 

पवित्र कुरआनात म्हटले आहे की “अल्लाहला कुण दुसऱ्याच्या बाबतीत त्याचे वाईट वर्ण करणं पसंत नाही. परंतु ज्याच्यावर अन्याय-अत्याचार झाला असेल (त्याची गोष्ट वेगळी), अल्लाह सर्वकाही ऐकतो आणि जाणतो.” (पवित्र कुरआन, ४:२१)

म्हणून कुणा दुसऱ्या माणसाविषयी लोकांना सांगत राहावे, पण अत्याचारपीडिताला अधिकार आहे की त्यैने स्वतःवर झालेला अत्याचार लोकांना सांगावा आणि अत्याचारीच्या कृत्यांची सर्वांना माहिती द्यावी.

(शिबली नोमानी, सगद सुलैमान नदवी, सीरतुन्नबी)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


येथपावेतो की तो आपल्या तारुण्यापर्यंत पोहचेल. वचनाचे पालन करा, नि:संशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल. 

(३५) मापाने द्याल तेव्हा पूर्ण भरून द्या आणि वजन कराल तेव्हा तराजूने ठीक व रास्त वजन करा ही चांगली पद्धत आहे आणि परिणामाच्या दृष्टीनेदेखील हीच उत्तम आहे. 

(३६) एखाद्या अशा गोष्टीमागे लागू नका जिचे तुम्हाला ज्ञान नसेल.१६ निश्चितच डोळे, कान व हृदय या सर्वांच्याकडे जाब विचारला जाईल.

(३७) जमिनीवर घमेंडीत चालू नका, तुम्ही जमिनीला फाडूही शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला गाठू शकत नाही.

(३८) या गोष्टींपैकी प्रत्येकाचा वाईट पैलू तुझ्या पालनकर्त्याजवळ अप्रिय आहे.१७ या त्या विवेकाच्या गोष्टी आहेत ज्यांना तुझ्या पालनकर्त्याने तुझ्यावर दिव्य प्रकटन केले आहे.

(३९) आणि पाहा! अल्लाहबरोबर कोणी दुसर्‍याला ईश्वर बनवू नकोस नाहीतर तू जहन्नममध्ये घातला जाशील, धिक्कारलेला आणि प्रत्येक चांगुलपणापासून वंचित होऊन,१८ (४०) किती चमत्कारिक बाब आहे की तुमच्या पालनकर्त्याने तर तुम्हाला पुत्रसंततीने उपकृत केले आणि आपल्या स्वत:साठी दूतांना मुली बनविल्या? मोठे असत्य आहे जे तुम्ही लोक उच्चारता. 


१६) असे फरमाविण्यामागील आशय असा की लोकांनी आपल्या व्यक्तिगत अथवा सामूहिक जीवनात ग्रह आणि कल्पनाऐवजी ‘ज्ञाना’चे अनुसरण करावे. 

१७) म्हणजे या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा जर भंग केली गेली तर ते अप्रिय आहे.

१८) या फरमानचे संबोधन प्रत्येक माणसाला आहे. अर्थ असा की हे मानवा, तू हे काम करू नकोस.


वो जिसने अक्ल अता की है सोंचने के लिये

उसी को छोडके सबकुछ सुझाई देता है

जेंव्हा माणसाचा आत्मविश्वास गडबडून जातो तेव्हा त्याची सारासार विवेकबुद्धी बाधित होते. देशाच्या पंतप्रधानांना हे माहित नसणे अशक्य आहे की त्यांच्याच सरकारने जारी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार भारतीय मुस्लिमांची प्रजनन क्षमता कमी झालेली आहे. दै. लोकसत्ताच्या पंतप्रधानांच्या ’ज्यादा बच्चे पैदा करनेवाले लोग’ या वाक्याच्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये खालीलप्रमाणे वस्तुस्थिती मांडली आहे - ’कोणी किती अपत्य जन्मास घातले याचे प्रमाण एकूण जननदर (टोटल फर्टिलिटी रेट)’ या घटकावरून निश्चित करता येते. म्हणजे एखादी महिला किती अपत्यांस जास्तीत जास्त जन्म देते त्याचे प्रमाण. केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार हे प्रमाण मुसलमानांमध्ये 2.61 इतके आहे. पण हिंदु या मुद्यावर फार मागे आहेत असे नाही. हे प्रमाण हिंदुमध्ये 2.12 इतके आहे. ही सरासरी झाली. पण हा जननदर देशपातळीवर एक आहे असेही नाही. तो आर्थिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी घटकानुसार बदलतो. केरळात जननदर सर्वात कमी म्हणजे 1.56 इतका आहे. तर बिहारमध्ये तो सर्वाधिक 3.41 इतका आहे. केरळातील साक्षरतेचा विचार केल्यास या तपशीलाचा अर्थ लागेल. वास्तविक बिहारप्रमाणे केरळातही मुसलमानांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण म्हणून धर्मानुसार जननदर वाढला असे दिसत नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 नुसार हिंदूंमध्ये जननदर अंदाजे 1.59 आहे. तर मुस्लिमांमध्ये 2.4 आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या म्हणजे 1951 सालच्या जनगणनेपासून अलिकडच्या म्हणजे 2011 साली झालेल्या जनगणनेपर्यंत हिंदु आणि मुसलमान यांच्या लोकसंख्येतील अंतर प्रत्यक्ष वाढले आहे. या काळात मुसलमानांची संख्या 13.6 कोटीने वाढली तर हिंदूंच्या लोकसंख्येत 76.6 कोटीने वाढ झाली. हा फरक साधारण 4 ते 5 पटीचा आहे. त्यानंतर 2021 साली जनगणना झालेलीच नाही. त्यास कोरोनाचे कारण मिळाले. पण कोरोना संपून 4 वर्षे झाली तरी अजून जनगणनेतील ’ज’ देखील काढण्यास सरकार तयार नाही. तेव्हा मुसलमानांचे प्रमाण वाढते आहे हा तपशील पंतप्रधानांस कळाला कसा हा प्रश्न. अर्थात आपल्याकडे अशी काही विधाने करण्यासाठी वास्तव आणि तपशीलाची गरज लागत नाही हे ही खरे’.

19 एप्रिल 2023 रोजी संयुक्त राष्ट्राने एक अहवाल जारी करून म्हटले होते की, भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून पुढे निघून जाईल. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल. जगात आजमितीला 800 कोटी लोक राहतात. याचाच  अर्थ लवकरच पृथ्वीवरील प्रत्येक पाचवा माणूस भारतीय असेल. प्रसिद्ध ब्रिटिश विद्वान थॉमस माल्थस यांनी असे म्हटलेले आहे की, लोकसंख्येची गती गुणाकार पद्धतीने वाढते तर संसाधनही बेरजेप्रमाणे वाढतात. 

भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1950 साली संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 35.7 कोटी होती. आपल्या देशात लोकसंख्येमध्ये जी वाढ झालेली आहे ती जगाच्या कुठल्याही देशाच्या तुलनेत जास्त झालेली आहे, यात दुमत नाही. मात्र मागच्या काही वर्षांपासून आपल्या देशातील लोकसंख्या वाढीचा सर्वधर्मीय दर कमी आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेंच्या अहवालात म्हटलेले आहे की, 1992 ते 2020 दरम्यान, देशातील प्रजनन दरामध्ये घट होऊन तो 2 एवढा झालेला आहे. पूर्वी हा दर 3.4 होता. थोडक्यात पूर्वी एक भारतीय महिला सरासरी 3 मुलं जन्माला घालत होती तर आज दोन मुलांना जन्म घालत आहे. संयुक्त राष्ट्राच्याच अहवालानुसार 2019 नंतर दरवर्षी भारतात 1.2 टक्के मुलं जन्माला आलेली आहेत. याचाच अर्थ मागच्या 20 वर्षात लोकसंख्या जरी वाढली तरी प्रजनन दर घटत चाललेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास लवकरच भारताची लोकसंख्या सुद्धा उताराला लागेल.

लोकसंख्येच्याबाबतीत गोंधळ

संयुक्त राष्ट्राचा हा अहवाला येताच प्रसारमाध्यमामध्ये वाढत्या लोकसंख्येला घेऊन प्रचंड चिंता व्यक्त करणारे लेख, व्हिडीओ आणि मीम्सचा पाऊस पडण्यास सुरूवात झाली होती. लोकसंख्येच्या बाबतीत सरकार असो का जनता सर्वांच्याच मनामध्ये गोंधळाची परिस्थिती पहिल्यापासून आहे. वाढती लोकसंख्या हाच भारताचा जणूकाही मुलभूत प्रश्न आहे. अशा थाटात या प्रश्नावर मतं व्यक्त केली जातात. पंतप्रधानांनीही तेच केले आहे. 

संघाचा प्रिय मुद्दा

मुळात लोकसंख्या हा संघाचा प्रिय मुद्दा आहे. पण त्यांच्यातही एकमत नाही. कधी ते दोन मुलावर थांबण्याचा सल्ला देतात तर कधी त्यांच्यातीलच काही जण हिंदूंना जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचा संदेश देतात. काँग्रेसही या बाबतीत गोंधळलेली आहे. मुळात कुटुंबनियोजन ही काँग्रेसची मूळ भूमिका होती. नेहरूंनी 1951 सालच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपूर्वीच छोट्या कुटुंबाची संकल्पना मांडली होती. 1975 मधील आणीबाणी मध्ये तर या धोरणाचा अतिरेक झाला होता. खरे तर इंटरनॅशनल डिक्लेरेशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट 1994 वर भारताने सही केलेली आहे. त्यात किती मुलं जन्माला घालावीत? याचा अंतिम निर्णय कुटुंबप्रमुखाच्या विवेकावर ठेवण्यात आलेला आहे. असे असतांनासुद्धा अधुनमधून सरकार दोन अपत्यांच्या धोरणाला रेटत असते. 

लोकसंख्या ही खरी समस्या नाही

भारतात वाढती लोकसंख्या ही खरी समस्या नसून भ्रष्टाचार आणि आर्थिक विषमता ह्या खऱ्या समस्या आहेत. घटनेच्या मार्गदर्शक तत्व क्रमांक 39 (ब) मध्ये असे म्हटलेले आहे की, काही लोकांच्या हातात संपत्ती एकवटणार नाही, याकडे सरकारे लक्ष देतील? लोकसंख्येशी सरळ संबंध असलेल्या या मार्गदर्शक तत्वाची तर कोणत्याच सरकारने दखल घेतलेली नाही. उलट अंबानी आणि अडाणी सारख्या उद्योगपतींच्या हातात देशाची आर्थिक सुत्रे देण्यापर्यंत या सरकारने मजल मारलेली आहे. सरकारांनी अनुच्छेद क्रमांक 39 (ब) ची दखल घेतली असती आणि संपत्तीचे वितरण न्याय पद्धतीने झाले असते तर गेल्या 75 वर्षात लोकांचे जीवनमान सुधारले असते, तरूणांच्या हातांना काम मिळाले असते, हे तर झालेले नाही उलट 47 वर्षातील सर्वात मोठ्या बेकारीच्या दारात आज तरूण उभे आहेत. त्यांना राष्ट्रहिताच्या नावावर शांत ठेवले जात आहे. मोठे लोक बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लावत आहेत. बँका डबघाईला आलेल्या आहेत. यातून अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडलेली आहे.

चुकीचे आर्थिक धोरण

आज देशात चुकीचे आर्थिक धोरण अवलंबिले गेलेले आहे ज्याचा परिणाम म्हणून श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहेत, ते सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे. गॅस आणि पेट्रोलसारखी खनिज संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती एका कुटुंबाच्या मालकीची कशी होऊ शकते? याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही.

लोकसंख्या वाढ आणि मुसलमान

साधारणपणे देशामध्ये असा समज रूजविण्यात संघ आणि संघप्रणित मीडियाला कमालीचे यश प्राप्त झालेले आहे की, भारताची लोकसंख्या मुस्लिमांमुळे वाढते आहे म्हणून हिंदूंनीही आपली संख्या वाढवावी, अन्यथा हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र होऊन जाईल, हे संघाचे आवडते समीकरण आहे, जे की मिथक आहे. अधून मधून अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात येते की, हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घालावीत. साक्षी महाराजांनी सांगितले आहे की, हिंदूंनी किमान 4 तर उत्तर प्रदेशातील आ. सुरेंद्र सिंग यांनी सांगितले की हिंदूनी किमान 5 मुलं जन्माला घालावित.

 जन्म-मृत्यू दर नैसर्गिक असावा

समाजामध्ये जन्म आणि मृत्यूची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू असते. त्यात कृत्रिमरित्या ढवळाढवळ केली गेली तर त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतात हे विसाव्या शतकात अनेक देशात सिद्ध झालेले आहे. रिप्लेसमेंट लेवल स्थिर ठेवण्यासाठी कोणत्याही देशात जन्मदर किमान 2.1 असावा लागतो. हा दर साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक जननक्षम दाम्पत्याने किमान 3 मुलं जन्माला घालावीच लागतात. असे न झाल्यास जपानसारखी अवस्था होते. देश वृद्ध होऊन जातो. लहान मुलांपेक्षा आजी आजोबांची संख्या वाढते. एकदा का जनतेला कमी मुलं जन्माला घालण्याची सवय लावली तर मग कितीही सांगा ते मुलांची संख्या वाढवित नाहीत. या संबंधी चीनचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. जपानमध्ये आवो ई होशी आणि ई ता सातू या दोघा मुलांचे वय 15 वर्षे असून, ते जपानच्या फुकुशिमा प्रि फॅक्चर शाळेचे अंतिम दोन विद्यार्थी असून, ते पास आऊट होताच ही 75 वर्षापूर्वीची शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद झालेली आहे.

 भारतातील जननदरातील वैविध्य

भारतात उत्तर प्रदेश 3.1 आणि बिहार 3.4 ही दोन राज्य वगळता बाकी राज्यात आपण स्थिर लोकसंख्येच्या लेवलला अधीच पोहोचलेले आहोत. देशातील 618 जिल्ह्यांपैकी 331 जिल्ह्यात हिंदू तर 217 जिल्ह्यात मुस्लिम हे स्थिर जननदराला अधिच पोहोचलेले आहेत, असे 2011 च्या जनगणनेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. असे असतांना दोन मुलांची सक्ती नागरिकांवर का? याचे उत्तर सरकार कधीच देणार नाही, याचा विचार प्रत्येकाने स्वतः करावा.

आदर्श लोकसंख्या किती?

जननक्षम दाम्पत्यांनी मुलं जन्माला घालण्यापूर्वी एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवावी की, कोणत्याही देशासाठी आदर्श लोकसंख्या किती? व ती कशी टिकवून ठेवावी याचा निर्णय कोणत्याच शास्त्राप्रमाणे कोणालाच ठामपणे करता येत नाही. त्यात पुन्हा सार्स आणि कोरोनासारखे साथीचे रोग फैलावले आणि त्यात अचानक अनेक लोग दगावले तर तात्काळ नवीन लोक कोठून आणणार? देशाचा गाडा कसा हाकणार? देशाची सुरक्षा कशी सुनिश्चित करणार? याचा विचार प्रत्येक समजूतदार नागरिकाने स्वतः करावा.

ज्या लोकसमुहामध्ये तीन पेक्षा कमी अपत्य जन्माला घालण्याची पद्धत रूढ होऊन जाते त्या समुहाचा हळूहळू ऱ्हास होऊन जातो. 100 ते 150 वर्षांमध्ये अशा समाजामध्ये वृद्धांची संख्या वाढते व तरूणांची कमी होते. संयुक्त राष्ट्राच्या दोन वर्षापूर्वी आलेल्या एका अहवालानुसार 2018 मध्ये जगात अशी स्थिती निर्माण झाली होती की, 65 वर्षे वयाच्या वृद्धांची संख्या 5 वर्षांच्या वयाच्या मुलांपेक्षा जास्त झालेली होती. आजमितीला जगात 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या 70.5 कोटी आहे तर 5 वर्षे वयापेक्षा कमी मुलांची संख्या 68 कोटी आहे. आणि ही चिंताजनक स्थिती आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालामध्ये असेही नमूद आहे की, हीच स्थिती राहिली तर 2050 पावेतो 0 ते 4 वयोगटाच्या प्रत्येक मुलामागे 65 वर्षे वयोगटाची दोन वृद्ध  माणसे असतील.

इतर देशांचा वाईट अनुभव

मागच्या शतकामध्ये वाढत्या गरीबीसाठी वाढत्या जनसंख्येला जबाबदार धरून जनसंख्या कमी करण्याचे प्रयत्न जगातील बहुतेक देशात झालेले आहेत. रशिया आणि चीन ह्या दोन राष्ट्रांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो आणि ही दोन्ही राष्ट्रे आता आपल्या नागरिकांना मुलं जन्माला घाला म्हणून हात जोडून विनविन्या करत आहेत. पण जनता काही तयार नाही.

कुटुंब नियोजनाच्या आक्रमक जाहिरातींना बळी पडून जवळ-जवळ सर्वच मुस्लिम देशांनी देखील त्यात आपला सहभाग नोंदविला होता. भारतामध्ये सुद्धा सुरूवातीला धार्मिक कारणांमुळे कमी मुलं जन्माला घालण्याच्या नीतिचा मुस्लिमांनी विरोध केला परंतु काही वर्षातच अनाहुतपणे कुटुंब नियोजनाचा मार्ग स्वीकारला. आजमितीला भारतीय मुस्लिमांच्या प्रजननक्षम दाम्पत्यांमध्ये एक किंवा दोन मुलांवर थांबणाऱ्या दाम्पत्यांची संख्या जास्त आहे. तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असणारे मुुस्लिम दाम्पत्य अपवादानेच आढळते आणि ते ही निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या गरीब असते. या संदर्भात भारतीय मुस्लिमांनी नैसर्गिकरित्या मुलं जन्माला घालण्याच्या कुरआनच्या आदेशाची सामुहिक पायमल्ली केली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जय हिंद


- एम.आय.शेख, लातूर


लातुरात बुद्धीवादी, पुरोगामी चळवळीतील नागरिकांचे पत्रकारपरिषदेत आवाहन


लोकसभा 2024 ची निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. गेल्या 10 वर्षात जातीयवादी प्रवृत्तींनी थैमान घातले आहे. लोकशाही व संविधानात्मक संस्था ज्यात नियोजन आयोग, निवडणूक आयोग, विश्वविद्यालय आयोग (यु.जी.सी.), रिझर्व बँक, सीबीआय, ईडी ईत्यादींचा दुरूपयोग व काही संस्था मोडीत काढल्या आहेत. भाजप, आर.एस.एस. सरकार संविधान बदलाची भाषा वारंवार करीत आहे. या पक्षाचा ईतिहास संविधान बदलण्याच्या बाजूने राहिलेला आहे. हे लक्षात घेतल्यास देशातील संविधान आणि लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. तेंव्हा संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आपण ’इंडिया’ महाविकास आघाडीच्या  उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रक व पत्रकार परिषद घेऊन लातूर शहरातील बुद्धीवादी नागरिकांनी जनतेला आवाहन केले आहे. यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ. सोमनाथ रोडे, माजी न्यायाधीश आर. वाय. शेख, माधव बावगे, नरसिंग घोडके, पी. जी. भिसे, अ‍ॅड. उदय गवारे, डॉ.असद पठाण, बरकत काझी, प्रा. अर्जुन जाधव, उमाकांत धावारे यांची उपस्थिती होती. यावेळी बुद्धीवादी नागरिकांनी काढलेल्या पत्रकात शेकडो नागरिकांची नावे आहेत. 

हुकुमशाही स्वतः प्रस्थापित होण्यासाठी लोकशाही मार्गानेच सत्तेवर येत असते. हिटलर देखील लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता. अशा प्रकारे लोकांना विश्वासात घेऊन त्याने लोकांचा विश्वासघात केला. हा मुद्दा मतदारांनी गांभिर्याने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाला धोका निर्माण केला आहे. त्यामुळे लातूर शहरातील बुद्धीवादी, पुरोगामी चळवळीतील नागरिकांनी मतदारांमध्ये जागृती करण्याचे अभियान सुरु केले आहे. यावेळी नागरिकांनी भूमिका व्यक्त करताना म्हटले की, राजकीय व्यासपीठावर आम्ही कधी आलो नाही, परंतू, आज देशाची परिस्थिती बिकट आहे. म्हणून रस्त्यावर आलो असून आम्ही सर्व बुद्धीजिवींनी ’इंडीया आघाडी’ला पाठींबा दिला आहे, असे नमुद करुन डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. उलट लोकशाही आणि संविधानाला धोका कसा निर्माण होईल, असे निर्णय घेतले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करण्याबाबत जनजागृती करीत असल्याचे ते म्हणाले. उपस्थित सर्व बुद्धीवादी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन 29 एप्रिल रोजी केले.



’ फ्री पॅलेस्टाईन’ सारख्या घोषणा देणारे विद्यार्थी पोलिसांकडून बेदम मारहाण होत असतानाही नवीन राजकीय नकाशा तयार करत आहेत. त्या नकाशाच्या आत पूर्व जेरुसलेम आहे जेथे अल-अक्सा मशीद उभी आहे, गाझा विभक्त भिंतीशिवाय आणि वेस्ट बँक व्यापलेल्या घरांशिवाय आहे. आंदोलकांनी घातलेला काफिया हे राजकीय चिन्ह आहे.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून सुरू झालेले पॅलेस्टाइन समर्थक आंदोलन पाश्चिमात्य देशांतील महाविद्यालये आणि शहरांमध्ये पसरत आहे. गाझामधील इस्रायलचा नरसंहार थांबविण्यास संयुक्त राष्ट्र संघ किंवा अन्य कोणतीही आंतरराष्ट्रीय यंत्रणा सक्षम नाही, याची जाणीव झाल्याने हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. माणुसकी ज्या अन्यायाबाबत उदासीन आहे, हे आंदोलन एकट्या अमेरिकेतील 20 हून अधिक कॅम्पसमध्ये पसरले आहे. काही ठिकाणी दीक्षांत समारंभ थांबवावे लागले. कोलंबिया विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास,  युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये पोलिसांनी क्रूर कारवाई केली आहे. ब्रिटीश व ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे, तसेच जर्मनीची राजधानी बर्लिनमधील विद्यापीठांसह फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रमुख इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्सेसमध्येही मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने या निदर्शनांना पाठिंबा दर्शवला आहे.

अमेरिकन सरकारकडे हे विद्यार्थी तीन प्रमुख मागण्या करत आहेत. अमेरिकेने इस्रायलला  दिलेला बिनशर्त पाठिंबा थांबवावा. विद्यापीठांनी इस्रायली प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे थांबवावे. आक्रमक तंत्रज्ञान युद्धभूमीवर आणून प्रचंड नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या संशोधन कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही आंदोलकांकडून केली जात आहे.

सन 2005 मध्ये पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांनी सुरू केलेले बीडीएस (बॉयकॉट, डिव्हेस्टमेंट आणि सॅन्क्शन) आंदोलन हा या विद्यार्थी आंदोलनाचा पाया आहे. इस्रायलवर बहिष्कार टाका, तिथली गुंतवणूक रोखा आणि इतर राष्ट्रांवर निर्बंध आणण्यासाठी दबाव टाका. बीडीएस चळवळ या दिशेने खूप पुढे जाऊ शकली आहे. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी इस्रायलच्या शैक्षणिक उपक्रमांवर टाकलेला बहिष्कार हे या यशाचे उत्तम उदाहरण आहे. अनेक कंपन्यांनी इस्रायलमध्ये गुंतवणूक करण्यास टाळाटाळ केली आहे. चळवळीच्या उपक्रमांमुळे इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा मार्गही मोकळा झाला. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्धचा लढा या सर्व प्रकारच्या आंदोलनाची प्रेरणा आहे.

आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या पलीकडच्या कारणासाठी तरुण कसे एकत्र आले आहेत हे अद्वितीय - सकारात्मक युगानुरूप आहे. टिकटॉक पिढीवर होणाऱ्या टीकेनंतर ते निष्फळ भूमिका घेत नाहीत, हे सर्वांसमोर स्पष्ट आहे. याच कॅम्पसमध्ये अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धाविरोधात 1968 साली झालेल्या निदर्शनांची आठवण अनेकांना झाली आहे. 1970 च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधातील ‘सोवेटो उठाव’, 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात चीनमधील ‘तियानमेन स्क्वेअर आंदोलन’, 2019 मध्ये भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या (सीएए) विरोधातील निदर्शने - विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी जागतिक राजकारणाला आकार दिला आहे. प्रत्येक वेळी राज्ये, विरोधक आणि टीकाकार जरी मोठे असले तरी त्यांना आपली सहनशक्ती ओळखावी लागली आहे. विद्यापीठांवर हल्ले करून आपल्याच मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त करत असले, तरी अमेरिकेतील संपत्ती आणि सत्ताधारक ते हल्ले करण्यास तयार आहेत, कारण त्यांना त्यांच्याच मुलांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा धोका वाटतो. त्यांना स्वत: निर्माण होत असलेल्या भविष्याची भीती वाटते: कायमस्वरूपी युद्ध, जागतिक उष्णता आणि इकोसाइड आणि ग्रहांच्या वर्णभेदाचे. विशेषत: स्वत:च्या मुलांकडून त्यांच्या दांभिकपणाची आणि हिंसेची आठवण करून देणे त्यांना आवडत नाही.स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठीची चळवळ ही इस्रायलला नष्ट करण्याची आणि ज्यूंना हद्दपार करण्याची चळवळ नाही.

स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी विद्यार्थी चळवळ दडपण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. ती खूप मोठी आणि खूप विस्तारलेली आहे. न्यायासाठीच्या जागतिक लढ्याचा हा एक भाग आहे. ही ‘कामगार आणि गरीब जनतेची चळवळ’ आहे. ही ‘वर्णद्वेषविरोधी चळवळ’ आणि ‘स्त्रीवादी चळवळ’ आहे. ही एक ‘वसाहतवादविरोधी चळवळ’ आहे, जी युरोपियन साम्राज्ये आणि अमेरिकन साम्राज्याविरुद्धच्या प्रदीर्घ लढ्याशी संबंधित आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळी आणि ही ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ चळवळीसारखीच आहे.

स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीच्या लढ्यात आम्हीच आमचे नेते आहोत, हे विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनेकदा दाखवून दिले आहे. याआधीही अनेकदा यशस्वी ठरल्याप्रमाणे चळवळीला होणारा विरोध श्रीमंत आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये केंद्रित आहे. पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्याला विरोध करणे, पॅलेस्टाइनसमर्थक भाषणांवर बंदी घालण्यासाठी विद्यापीठांवर दबाव आणणे आणि अहिंसक विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना आळा घालण्याचा प्रयत्न करणे यात श्रीमंत देणगीदारच सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात.

विशेष म्हणजे 7 ऑक्टोबरपूर्वीसुद्धा विद्यापीठांवर सातत्याने हल्ले होत होते. विद्यापीठे ही समाजातील सर्वांत मध्यवर्ती संस्थांपैकी एक असतात. श्रीमंतांच्या, लोकशाहीविरोधी सरकारांच्या आणि राजकीय पक्षांच्या, वर्णद्वेषी आणि लिंगभेदी सत्तारचनेच्या आणि दडपशाही धर्माधारित गटांच्या नियंत्रणाखाली त्यांना अद्याप प्रभावीपणे आणता आलेले नाही. कारण विद्यापीठे अशा संस्था आहेत जिथे ज्ञान आणि संस्कृती निर्माण होते, जिथे लोकशाही वाद-विवाद होतात, जिथे भूतकाळातील शहाणपण जपले जाते आणि अभ्यास केला जातो आणि जी तरुणांना त्यांचे विचार आणि कौशल्ये विकसित करण्यास सक्षम असतात. पॅलेस्टाइनमधील स्वातंत्र्याची चळवळ आपल्याला वेगळे भविष्य कसे दिसते हे दर्शवते. या चळवळीत इस्रायली युद्धसामर्थ्यापासून आणि इस्रायली वर्णभेदापासून विद्यापीठ वेगळे करण्याची मागणी करण्यात आली आहे. इस्रायलने गाझामधील प्रत्येक रुग्णालय आणि आरोग्य सुविधा उद्ध्वस्त केल्याने अमेरिकेचे डॉक्टर आणि परिचारिका त्यांच्या पॅलेस्टिनी समकक्षांना पाठिंबा देत आहेत. इस्रायलने गाझामधील सर्व विद्यापीठे नष्ट केली आहेत आणि वेस्ट बँकमधील जवळपास सर्व शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत, त्यामुळे अमेरिकन शिक्षक पॅलेस्टिनी विद्वान आणि शिक्षकांना पाठिंबा देत आहेत. अमेरिकेत जे लोक आपल्या धर्माचा वापर राजकीय मुद्दे मांडण्यासाठी करण्याऐवजी गांभीर्याने घेतात. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याची चळवळ अखेरीस जागतिक स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय प्रवाह म्हणून उदयास आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील कृष्णवर्णीय स्वातंत्र्य चळवळीने जागतिक स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले, वसाहतवादविरोधी चळवळी आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीने साथ दिली, त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या चळवळीने आज या लढ्याच्या नेतृत्वात स्थान घेतले आहे. ज्यू विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुस्लिमांप्रमाणेच त्रास दिला जातो; केवळ इस्लामोफोबियाच नाही तर अमेरिकेत अँटीसेमेटिझम देखील आहे, विशेषत: ख्रिश्चन उजव्या भागात जिथे कुरआनची विटंबना केली जाते आणि रेव्ह हॅगी हिटलरची स्तुती रॅप्चरचा अवतार म्हणून करतात.पॅलेस्टाईनमधील स्वातंत्र्याची चळवळ ही नव्या प्रकारची चळवळ आहे, कारण ती संकुचित नाही. पॅलेस्टाईनमधील स्वातंत्र्याचे समर्थन करणारे विद्यार्थी पॅलेस्टिनींकडून शिकले आहेत. पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठीची विद्यार्थी चळवळ आपल्याला शिकवते की जगातील लोक मध्य-पूर्वेसह सर्वत्र सामाजिक न्यायाची मागणी करतात. सामूहिक हत्येने कशाचेही निराकरण होत नाही. हे कॅम्पस आंदोलन जगभर पसरण्याची शक्यता आहे आणि या आंदोलनाचा बिडेन यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याच्या शक्यतांवरही परिणाम होईल, असा अंदाज आहे. तसे झाल्यास हे आंदोलन पॅलेस्टिनी प्रश्नाकडे जगाचा दृष्टिकोन बदलणारी चळवळ ठरेल.

- शाहजहान मगदूम



एका व्यक्तीने मला लिखित प्रश्न विचारला की, ‘‘ मी एक डॉक्टर असून, माझे पूर्ण खानदान इस्लामी मुल्यांच्या शीतल छायेखाली आहे. मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवू इच्छितो. परंतु, माझ्या सासुरवाडीचे लोक या गोष्टीला विरोध करीत आहेत. शरीयत प्रमाणे मुलींना वैद्यकीय शिक्षण घेणे चूक आहे काय?’’ यावरून मी त्यांना खालीलप्रमाणे उत्तर दिले. आपल्या सासुरवाडीच्या लोकांचा वैद्यकीय शिक्षणाला विरोध कदाचित या गोष्टीला असावा की, डॉक्टर झाल्यानंतर मुलीला महिलांबरोबर पुरूषांचाही इलाज करावा लागेल. जर हे कारण असेल तर त्यांचा विरोध योग्य नाही. शरियतमध्ये महिला डॉक्टर पुरूष रूग्णांवर उपचार करू शकते. 

इमाम बुखारी यांनी आपल्या पुस्तकात अशा अनेक प्रेषित वचनांना संग्रहित केलेले आहे की, ज्यातून स्पष्ट होते की, महिलांच्या मार्फतीने पुरूषांवर वैद्यकीय उपचार केले गेले आहेत. अशा प्रेषित वचनांचा एक भागच इमाम बुखारी यांनी आपल्या पुस्तकात सामील केलेला आहे. 

1. इस्लामी न्याय शास्त्रामध्ये इथपर्यंत लिहिलेले आहे की, वैद्यकीय उपचारा दरम्यान पुरूष डॉक्टर महिला रूग्णांच्या शरिराच्या त्या भागाचीही तपासणी करू शकतात जे शरीयतमध्ये सहसा परदा ठेवण्याचा आदेश दिला गेलेला आहे. तसेच महिला वैद्यकीय अधिकारीसुद्धा पुरूषांच्या लपविण्यायोग्य अवयवांना वैद्यकीय गरजेपोटी तपासू शकते. 

हा कसला इस्लामी खानदान आहे ज्यात मुलीच्या वैद्यकीय शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत आहे. ही विचित्र बाब आहे की मुस्लिम घराण्यातील लोक आपल्या महिलांचा उपचार पुरूष डॉक्टरकडून करणे गरजेेचे असेल तर करून घेतात. मात्र अशा महिला डॉक्टर तयार करत नाहीत जे त्यांच्या महिलांचा उपचार करू शकतील. 

क्रमशः


- डॉ. रजिउल इस्लाम नदवी

दिल्ली


पुस्तक : मेमारे जहाँ तू है

भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे



पवित्र कुरआन मानवजातीला एकमेव ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याची आणि फक्त त्याचीच भक्ती करण्याची आज्ञा देतो. याबरोबर ईश-आज्ञेविरुद्ध जगणाऱ्या लोकांना या सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही शिक्षेची चेतावणी देतो. मरणोत्तर जीवनातील परिणाम माणसासमोर असेल तर ईश-आज्ञेनुसार जगणे सोपे जाते. पवित्र कुरआनने एकेश्वरत्व आणि मरणोत्तर जीवनाचे वेगवेगळे पुरावे दिले आहेत. जे माणसाला धार्मिक जीवन जगण्यास प्रवृत्त करतात. मरणोत्तर जीवनात कयामत म्हणजे न्यायाच्या दिवशी परिस्थिती किती गंभीर असेल याकडे पवित्र कुरआन वारंवार लक्ष वेधतो. त्या दिवशी कुणीही कुणालाही मदत करू शकणार नाही. आईवडीलांना आपल्या मुलांची चिंता नसेल आणि मुलेही आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकणार नाहीत कारण त्या दिवशी प्रत्येकाला फक्त स्वतःच्या मुक्तीची चिंता असेल. त्या परिस्थितीचे वर्णन करताना कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की,

या’अय्युहन्नासुत्-तकू रब्बकुम् वख्शव् यव्-मल्-ला यज्जी वालिदुन अंव्-वलदिही, वला मव्-लूदुन हुव जाजिन अंव्-वालिदिही शयअन, इन्न वअ्-दल्लाहि हक्कुन फला तगुर्रन्नकुमुल्-हयातुद्-दुन्या, वला यगुर्रन्नकुम् बिल्लाहिल्-गरूर.

अनुवाद :- लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा आणि त्या दिवसाचे भय राखा ज्या दिवशी कोणताही बाप कोणत्याही प्रकारे आपल्या मुलाच्या कामी येणार नाही, ना कोणता मुलगा आपल्या बापाच्या कामी येईल, अल्लाहचे वचन पक्के आहे, यात मुळीच शंका नाही, तेव्हा या सांसारिक जीवनाने तुम्हाला धोक्यात टाकू नये, आणि तो मोठा धोकेबाज अल्लाहच्या बाबतीत तुमची फसवणूक अजिबात करता कामा नये. ( 31 लुक्मान : 33 )

जगात सर्वात जवळचे नाते हे आईवडील आणि मुलांचे असते, पण कयामतच्या दिवशी परिस्थिती इतकी गंभीर असेल की मुलाला शिक्षा झाली तर बाप पुढे येऊन म्हणणार नाही की त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मला द्या. वडील संकटात सापडल्यास पुत्राला हे सांगण्याचे धाडस होणार नाही की त्यांच्याऐवजी मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत इतर नातेवाईक, मित्रमंडळी व नेत्यांकडून काय अपेक्षा उरते? म्हणून, अज्ञानी आहे तो जो दुसऱ्यांच्या सांसारिक फायद्यासाठी पाप आणि चूकीचा मार्ग स्वीकारतो आणि आपले नशीब खराब करतो. आई-वडिलांची सेवा करणे हे निश्चितच मुलांचे कर्तव्य आहे पण त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांना अनुसरून चुकीच्या मार्गावर चालत जाणे योग्य नाही.

सांसारिक जीवनाच्या बाबतीत लोकांचे बरेच गैरसमज आहेत. कुणाला वाटते की जगणे व मरणे हे फक्त या जगापुरतेच आहे, त्यानंतर दुसरे जीवन नाही, म्हणून जे काही प्राप्त करायचे आहे ते इथेच करा. कुणी आपली संपत्ती, शक्ती व सुखसमृद्धीच्या नशेत आपला मृत्यू विसरतो. त्याला वाटते की आपल्या संपत्तीचा ऱ्हास होणार नाही किंवा तो कधीही सत्तेपासून पाय उतार होणार नाही. काही लोक आध्यात्म व नैतिकतेला विसरून केवळ भौतिक लाभ आणि सुखालाच आपले ध्येय बनवतात. परिणामी माणुसकीचा दर्जा कितीही घसरला तरीही ’राहणीमान’ उंचावण्याखेरीज ते इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाहीत. यांसारख्या अनेक गैरसमजूतींचा समावेश या आयतीमध्ये उल्लेखित सांसारिक जीवनातील धोक्यात होतो.फसवणूक करणारा मोठा धोकेबाज म्हणजे कोण? तो सैतान असू शकतो जो सतत मनात वाईट विचार पेरत असतो. वाईट मार्गाला लावणाऱ्या व्यक्ती किंवा समूहही असू शकतात. कधी खुद्द माणसाचा जीव मोठा धोकेबाज ठरतो जो  ईश-आज्ञेविरुध्द आपल्या मागण्या पूर्ण करवतो. याशिवाय लोकांच्या गैरसमजुतींची वेगवेगळी कारणे असतात. जीवनाची दिशा योग्य मार्गापासून चुकीच्या दिशेने जो वळवतो तोच माणसासाठी धोकेबाज ठरतो. एकमेव ईश्वर, अल्लाहच्या बाबतीत ’फसवणूक’ हा शब्दही खूप व्यापक आहे. ज्यात फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. कुणाला हा विचार पटतो की ईश्वर अजिबात अस्तित्वात नाही. कुणाची समजूत अशी आहे की हे जग ईश्वरानेच निर्माण केले पण आता जगाच्या भल्या-वाईट गोष्टींशी त्याला काही देणे घेणे नाही. काहींची अशीही दिशाभूल केली जाते की काही जन ईश्वराला प्रिय आहेत. त्यांच्याशी तुम्ही जवळीक साधा मग तुम्हाला हवं ते करा, तुमची मुक्ती निश्चित आहे. कुणाचा असा गैरसमज होतो की ईश्वर खूप दयाळू आहे, क्षमाशील आहे, आपण कितीही पाप केले तरीही तो दयावंत आपल्याला क्षमा करेल. अशा वेळी क्षमाशील, दयावंत हे ईश-गुण माणसाच्या लक्षात राहतात पण ईश्वर न्यायी सुध्दा आहे हे माणूस विसरतो. येथेच माणसाची वैचारिक फसवणूक होते. याशिवाय जगात गुन्हेगारांची पकड न होणे ही ईश्वराने माणसाला दिलेली ढीलही असू शकते. तरीही कधी कधी अशी काठी पडते ज्याला आवाज नसतो आणि ती इतरांना दिसतही नाही. हेही होऊ शकते की एखाद्याला या जगात कोणतीही शिक्षा होणार नाही पण कयामतच्या दिवशी त्याला सर्व पापांची शिक्षा एकत्रित भोगावी लागेल. त्यामुळे सर्व प्रकारचे धोके आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याची काळजी घेणे आणि सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनाचा योग्य दृष्टिकोन बाळगणे हे अत्यावश्यक आहे. माणूस जितक्या फसव्या आणि चुकीच्या विचारात अडकतो त्यांचे विश्लेषण केल्यास शेवटी हेच दिसून येते की सर्व प्रकारचे पाप, अपराध, गैरव्यवहार व अनैतिक वर्तनाच्या मुळाशी अनेक गैरसमज काम करताना दिसतात. ज्यामध्ये ईश्वराचे अस्तित्व आणि त्याच्या गुणवैशिष्ट्यांशी संबंधित अनेक गैरसमज प्रामुख्याने आहेत. ते दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराने अवतरित केलेला ग्रंथ पवित्र कुरआन आणि त्यानुसार असलेले पैगंबरांचे जीवन चरित्र यांचा सखोल अभ्यास करणे होय.

................ क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget