Halloween Costume ideas 2015
Latest Post


खरे तर हैद्राबादच्या निजामशाहीचा विलय शांतीपूर्ण व्हायला हवा होता मात्र दुर्दैवाने तो रक्तरंजीत झाला. तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाच्या मनात आले असते तर हा विलय शांतीपूर्ण झालाही असता. परंतु हैद्राबादच्या मुस्लिम शासक आणि मुस्लिम जनतेला धडा शिकवायचा होता म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या विलया दरम्यान मुस्लिमांवर मोठे अत्याचार केले. ते इतके भयानक होते की, त्या काळात उस्मानाबाद जिल्हा हा तर मुस्लिम विधवांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध झाला होता. पंडित सुंदरलाल कमीशनच्या अहवालाप्रमाणे त्यावेळी उस्मानाबाद शहरातील मुस्लिमांची संख्या 10 हजार होती ती या नरसंहारानंतर तीन हजार उरली होती. गुलबर्गा येथे 5 ते 8 हजार, नांदेड येथे 2 ते 4 हजार मुस्लिमांची हत्या झाली होती. यावरून या नरसंहाराच्या तीव्रतेचा अंदाज आल्याने गृहमंत्री पटेल यांनी तो अहवाल प्रसिद्धच होऊ दिला नाही. मात्र प्रमोद मंदाडे संपादित, ’’हैद्राबाद संस्थानातील पोलिस अ‍ॅ्नशन नंतरच्या हिंसाचारावरील दोन दस्ताऐवज’’ नावाचे एक पुस्तक नुकतेच बाजारात आलेले असून, यात सुंदरलाल कमिटीचा अहवाल दिलेला आहे. या पुस्तकाची किंमत 150 रूपये असून, 9067035653 किंवा 7385521336 या नंबरवर संपर्क करून हे पुस्तक मागविता येईल. 

ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने

लम्हों ने खता की थी सदियों ने सज़ा पायी

17  सप्टेंबर 2023 ला आसफजाही शासनाचे भारतात विलीनीकरण होऊन 75 वर्षे पूर्ण होतील. हे विलीनीकरण सोपे नव्हते. यामागे एक रक्तरंजित इतिहास दडलेला आहे, म्हणून त्याचा मागोवा घेणे अनुचित होणार नाही कारण अन्याय व अत्याचार यांची येथोचित प्रसिद्धी करावी लागते, तसे केले गेले नाही तर अत्याचार झालाच नाही असा सर्वांचा समज होतो. विशेष म्हणजे भूतकाळात ज्यांच्यावर अत्याचार झाला होता त्यांची पुढची पिढी सर्व विसरून जाते, याचे उत्कृष्ट उदाहरण ’13 ते 17 सप्टेम्बर 1948 दरम्यान झालेले हैदराबाद चे मिलिटरी ऍक्शन’ होय, पाच दिवसांत 224 वर्ष जुनी आसफिया राजवट खालसा केली गेली ज्यात 40000 हजार मुस्लिमांना ठार मारण्यात आले होते व कोट्यवधींची त्यांची संपत्ती जाळण्यात आली होती. विशेष म्हणजे या मुस्लिमकुश नरसंहारादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी स्वतः ही सगळी परिस्थिती पाहिली होती व व्यथित होऊन पंडित सुंदरलाल कमिशनचे गठन केले होते. या कमिशनचा अहवाल 65 वर्षानंतर म्हणजे 2013 साली जाहीर झाला, त्यात त्या काळात मुस्लिमांवर जे अनन्वित अत्याचार झाले होते त्याची कबुली खालील शब्दात देण्यात आलेली आहे. मात्र या नरसंहारामध्ये ही अनेक हिंदू बांधव असे होते ज्यांनी अनेक मुस्लिम कुटुंबासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता मदत केली होती, त्यांचे रक्षण केले होते.

निझाम शाही

’निजाम’ म्हणजे व्यवस्था, ’शाही’ म्हणजे राज्य. हैद्राबाद राज्याला निजामशाही म्हणण्याचा प्रघात आहे मात्र या सल्तनतेचे अधिकृत नाव ’आसफजाही सल्तनत’ होते. आकार आणि श्रीमंतीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या या सल्तनतीला ’हैद्राबाद स्टेट’ म्हणूनही ओळखले जायचे. निजामशाहीची स्थापना चिनकुलीखान मीर कमरूद्दीन सिद्दीकी यांनी केली. ते तातार म्हणजे मुगल वंशाचे व समरकंदचे राहणारे होते. 1773 मध्ये मोगलांनी त्यांना दक्कनचा सुभेदार नेमला होता. 1707 मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी 1724 मध्ये ’आसिफजाह’ या पदनामाने हैद्राबाद येथे आपली आसिफजाही सल्तनत कायम केली. ’आसिफ’ म्हणजे योग्य मंत्री आणि ’जाह’ म्हणजे सन्मान. म्हणजेच मोठ्या सन्मानाचा योग्य मंत्री असा आसिफजाह या शब्दाचा अर्थ होतो.

या सल्तनतचे क्षेत्रफळ 82 हजार 686 स्क्वेअर माईल्स एवढे प्रचंड म्हणजे ब्रिटन आणि आर्यलंड पेक्षाही मोठे होते. 1941 च्या जनगणनेप्रमाणे या सल्तनतमध्ये  1 कोटी 60 लाख 34 हजार लोक राहत होते. त्यातील 80 टक्के हिंदू तर बाकी 20 टक्क्यांमध्ये इतर धर्माचे लोक होते.

निजामच्या सात पिढ्यांनी हैद्राबादवर राज्य केले. त्यांची नावे खालीलप्रमाणे - मीर कमरूद्दीन सिद्दीकी, मीर निजाम अली खान, मीर अकबरअली खान, मीर नसिरूद्दौला फरकुंद अलीखान, मीर तहेनियत अली खान, मीर महेबूब अली खान आणि शेवटचे निजाम मीर उस्मानअली खान.

विकास कामे

निजाम काळात सरकारी संपत्ती विकण्याचा किंवा गहाण ठेवण्याचा प्रघात नव्हता. उलट या सल्तनतीने त्या काळातील सर्वात मोठी विकासकामे केली होती. काही ठळक विकास कामांचा उल्लेख या ठिकाणी करणे उचित होईल. त्यांच्या काळात जामिया निजामिया, निजाम इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, उस्मानिया विद्यापीठ, उस्मानिया युनानी हॉस्पिटल, निजाम जनरल हॉस्पिटल, निजाम क्लब, निजाम चॅरिटेबल ट्रस्ट, चिरान पॅलेस, चौमहल्ला पॅलेस, किंग कोठी, फलकनुमा पॅलेस (आजचे ताज-कृष्णा हॉटेल), दिल्ली येथे हैद्राबाद हाऊस, मक्का येथे रूबात, कलकत्ता, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नाईस शहरात कोठ्या. सिकंदराबाद कॅन्टोनमेंटचे बांधकाम, लकडीका पुलचे बांधकाम, रेल्वे, स्वतंत्र डाक-तारची व्यवस्था, स्वतःची मुद्रा, 1941 साली स्टेट बँक ऑफ हैद्राबादची स्थापना, हुसेन सागर, निजाम सागर धरण,स्टेट बँक ऑफ हैदराबाद ची स्थापना इत्यादी प्रमुख कामे होत.

याशिवाय, माहूरच्या रेणुकादेवी संस्थान, नांदेडचा गुरूद्वारा तसेच रियासतीमधील अनेक मंदिर, मस्जिद, दर्गाह इत्यादींना इनामी जमीनी, देशमुख, देशपांडे, माली पाटील, पोलीस पाटील इत्यादी पदांची निर्मिती व त्यांच्या मार्फतीने चोख महसुली व्यवस्था इत्यादी महत्त्वाची कामे निजामच्या काळात झाली. निजामचे स्वतःचे पोलीस दल, आर्मी, दोन विमाने, एक युद्ध पोत ज्याची निर्मिती ऑस्ट्रेलियामध्ये अर्धवट झाली होती वगैरे निजामच्या पदरी होती. 1930 साली निजामकडे 11 हजार कर्मचारी सेवेमध्ये होते. 

देशासाठी योगदान

1962 आणि 1965 च्या युद्धानंतर देशाची परिस्थिती हलाकीची झाल्यानंतर 1967 साली चीनने पुन्हा सिक्कीमवर हल्ला करून भारतीय प्रदेशात घुसण्याचा प्रयत्न चालविला होता. तेव्हा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी रेडिओवरून श्रीमंत लोकांना भारतीय सेनेला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी विशेष अशा ’भारतीय रक्षा कोष’ची स्थापना करण्यात आली. *शास्त्रीजींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानअली पाशा यांनी आपले 5 टन सोने या कोषमध्ये दान दिले होते. आजपर्यंत सुद्धा एका हाती एवढे मोठे दान कोणीही कोणाला दिलेले नाही. हा भारताचा इतिहास आहे. तो किमान आजच्या पिढीने समजून घ्यावयास हवा. 

हिंदू-मुस्लिम एकता

224 वर्षांच्या त्यांच्या शासन काळात त्यांच्या राज्यात एकही हिंदू-मुस्लिम दंगल झाली नाही. निजाम हे आपल्या हिंदू आणि मुस्लिम प्रजेला आपल्या दोन डोळ्याची उपमा देत. एवढे असतांनासुद्धा निजाम शाहीला जुल्मी निजाम असे संबोधण्याची आपल्याकडे पद्धत आहे. निजाम जर जुल्मी होते तर 224 वर्षे त्यांनी शासन कसे केले? याचा साधा विचारही कोणी करत नाही. ज्यांनी 224 वर्षे एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाला जोडून ठेवले ते आधुनिक लोकशाहीला 70 वर्षे सुद्धा जोडून ठेवता आले नाही. शेवटी 2014 साली आंध्रापासून विलग करून स्वतंत्र तेलंगना राज्याची स्थापना करावी लागली.

हैद्राबादला खालसा करण्याची कारणे

पहिले कारण - म्हणजे मुळात विसाव्या शतकात जगभरात लोकशाहीचे वारे वाहत होते. निजामांचे शासन कितीही चांगले असले तरी लोकांना लोकशाही हवी होती व स्वतःचे भविष्य स्वतः घडविण्याचे स्वातंत्र्य हवे होते. हैद्राबाद रियासतीमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांना प्रतिबंध असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेच्या लोकांनी आर्य समाज आंदोलनाच्या मार्फतीने ’मराठवाडा मुक्ती संग्राम’ नावाची चळवळ सुरू केली. तर काही निजामशाही च्या समर्थक मुस्लिमांनी एमआयएमच्या माध्यमाने  निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

दूसरे कारण - म्हणजे रोहिल्या पठाणांचा  व्याजाचा व्यवसाय. मुळात अफगानिस्तान मधून रोहिल्या पठाणांना रियासतीच्या संरक्षणासाठी खास पाचारण करण्यात आले होते मात्र त्यांनी येथे येताच व्याजाचा धंदा सुरू केला. जबरी वसुली करण्यामध्ये त्यांचा हतकंडा होता. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम अशी दोन्ही जनता त्यातून भरडून निघत होती. रोहिल्यांकडून  वसुलीसाठी केल्या जाणार्या अत्याचारामुळे सामान्य जनता अधिकच आक्रमक झाली होती. हे सुद्धा निजामशाहीच्या अंताचे एक कारण ठरले.

तीसरे कारण - म्हणजे साम्यवादी चळवळ. त्या काळात रशियाला जावून आलेले कट्टर कम्युनिस्ट कवि मक्दूम मोहियोद्दीन यांच्या नेतृत्वात निजाम यांची ’बुर्जूवा’ अर्थात सरंजामशाही सरकार उलथून टाकण्या साठी एक साम्यवादी आंदोलनही सुरू झाले होते. त्यात हिंदू, मुस्लिम, दलित सर्वांचाच समावेश होता. विशेषकरून शेतमजूरांचा याच्यात मोठा भरणा होता. हे ही कारण निजामशाहीच्या अस्तासाठी कारणीभूत ठरले.

रझाकार आंदोलन

चौथे कारण -  म्हणजे रझाकार आंदोलन. ’रझा’ म्हणजे संमती आणि ’कार’ म्हणजे काम. अर्थात स्वयंसमतीने जे लोक निजामशाही वाचविण्यासाठी प्रयत्नशील होते त्या स्वयंसेवकांना रझाकार असे संबोधले जात असे. यात मोठ्या प्रमाणात जरी मुस्लिम होते तरी अल्प प्रमाणात का होईना हिंदू आणि दलित बांधवसुद्धा होते. 

ही मिलीशिया निजामाचे शासन कायम ठेवण्यासाठी आग्रही होती. मुळात या रझाकार आंदोलनाचे वयच एक ते सव्वा वर्षाचे होते. त्यांच्या बाबतीत करण्यात येणारे अत्याचारांचे आरोप अतिरंजीत स्वरूपाचे असल्याचे आजही काही ज्येष्ठ मंडळीकडून सांगण्यात येते. रझाकारांचे प्रमुख मूळचे लातूर येथील राहणारे व हैद्राबाद येथे स्थायीक झालेले अ‍ॅड. कासीम रिजवी होते. त्यांच्याशिवाय, यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅड. इक्रामुल्लाह, मुहम्मद इब्राहीम अरबी, अख्लाक हुसेन, अ‍ॅड. जुबैर, हसन मुहम्मद यावर, मीर कलीमुद्दीन अलीखान, अ‍ॅड. सय्यद अहेमद नहरी, अ‍ॅड. उमरदराज खान, अ‍ॅड. इसा खान, सेठ गाजी मोहियोद्दीन, सेठ अकबरभाई, हाफिज मुहम्मद, अनिसोद्दीन, मुहम्मद कमरूद्दीन, काजी हमीदोद्दीन, अ‍ॅड. मीर मेहरअली कामील व अ‍ॅड. अब्दुल गणी यांचा समावेश होता.  

मराठवाडा मुक्तीसंग्राम

मराठवाडा मुक्ती संग्रामचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थकडे होते. या मुक्ती संग्रामामध्ये सामील असलेल्या इतर प्रमुख व्यक्ती म्हणजे गोविंदभाई श्राफ, अनंत भालेराव, शंकरराव चव्हाण, पी.व्ही. नरसिम्हाराव, विजयेंद्र काबरा, फुलचंद गांधी,  मुल्ला अब्दुल कय्युम खान, सय्यद अखील (संपादक दास्ताने हाजीर) हे होत. 

भारतात विलीन होण्यास का नकार दिला?

त्या काळी इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंड जी की ब्रिटनची रिझर्व बँक होती. तिच्या भांडवलातील मोठा हिस्सा निजाम उस्मानअली पाशा यांचा होता. 1942 साली झालेल्या ’चलेजाव’ चळवळीनंतर मीर उस्मान अली पाशा यांच्या लक्षात आले की आता इंग्रज भारतावर फार काळ सत्ता गाजवू शकणार नाहीत. तेव्हा त्यांनी इंग्रजांवर दबाव आणण्यासाठी इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंडला नोटिस देऊन आपले भांडवल परत देण्यास सांगितले. याची बातमी ब्रिटिश जनतेला कळाल्याबरोबर लोकांनी घाबरून आपापल्या ठेवी परत मागण्यास सुरूवात केली. तेव्हा बँक डबघाईला या भितीने इंग्लंडच्या राणीने स्वतः हैद्राबादला येवून त्यांची रियासत व त्यांचे भांडवल दोन्ही सुरक्षित राहतील याची हमी दिली. यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे जून 1947 मध्ये निजामने आपण भारतात विलीन होणार नसल्याची अधिकृत घोषणा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी बॅ.जिन्नांकडे मदतीची याचना केली जी की त्यांनी नाकारली. निजामने पोर्तुगालशी संपर्क करून गोवा बंदरामधून युरोपातून हत्यार आणण्यासाठी आपला सेनापती सय्यद अहेमद हबीब अल् एद्रुस याला युरोपमध्ये पाठविले होते. परंतु हैद्राबाद रियासत स्वतंत्र राष्ट्र नसल्याने त्यांना शस्त्रास्त्र मिळविण्यात अपयश आले. शिवाय राष्ट्रकुल संघटनेचे सभासदत्व मिळविण्यासाठीही निजामने प्रयत्न केला. मात्र एटली सरकारने त्यासही नकार दिला. इतके होऊनही निजाम यांच्या हालचाली चालूच होत्या. त्यांनी इंग्लंडमधील हैद्राबाद राज्याचे प्रतिनिधी मीर नवाज जंग यांच्या मार्फतीने सीडनी कॉटन या हत्यार विक्रेत्याशी ऑस्टेलियामध्ये संपर्क करून हत्यारांची मागणी केली. त्यात त्यांना होकार मिळाला. सिडनी कॉटन हा जहाजाने हैद्राबादला शस्त्रास्त्रे पाठविणार आहे, याची बातमी मिळाल्याने गृहमंत्री सरदार पटेलांनी ते जहाज भारतात पोहचणार नाही याची व्यवस्था केली. शेवटी कश्मीरसारखेच विदेश निती, रक्षा व संचार विभाग सोडून आपल्याला स्वायत्तता द्यावी, यासाठीही निजामने लॉर्ड माऊंटबेटन यांच्याकडे प्रयत्न केले. यात तडजोड होऊन काहीतरी मार्गही निघाला असता आणि हैद्राबाद रियासतीचे भारतात शांतीपूर्ण विलीनीकरणही झाले असते, पण यासाठी अ‍ॅड. कासीम रिझवी तयार झाले नाहीत. म्हणून ही शांती वार्ताही पूर्णत्वास येवू शकली नाही. एकंदरीत या घडामोडी 1947 ते 1948 या एका वर्षाच्या काळातच घडल्या. याच काळात रझाकारही निजामाचे शासन वाचविण्यासाठी आक्रमक झाले. त्यांनी अनेक ठिकाणी हिंसक कारवाया केल्या. गंगापूर रेल्वे स्टेशनवर ट्रेन जाळली आणि प्रवाशांना उतरवून मारहाण करण्यात आली. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आणि भारत सरकारवर दबाव वाढला. 

ऑपरेशन पोलो

यातूनच जनरल करीअप्पा यांना बोलावून सरदार पटेल यांनी हैद्राबाद खालसा करण्यासाठी योजना तयार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ऑपरेशन ’पोलो’ची आखणी करण्यात आली. त्या काळात हैद्राबाद शहरामध्ये पोलो खेळण्याचे 8 मैदान होते. त्यावरून हे सांकेतिक नाव या ऑपरेशनला देण्यात आले. 13 सप्टेंबर 1948 साली सोलापूरहून भारतीय सेनेचे पथक मेजर जनरल जयंत-नाथ चौधुरी यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबादकडे रवाना झाले व 17 सप्टेबरला सकाळी 9 वाजता बेगमपेठ विमानतळावर निजाम मीर उस्मानअली पाशा यांनी त्यांचे सेनाप्रमुख सय्यद हबीब एद्रुस यांच्यासह शरणागती पत्करली. येणेप्रमाणे 224 वर्षाच्या निजामशाहीचा अंत झाला.

या संदर्भात उल्लेखनीय गोष्ट अशी की, जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी लाहोरहून एक पत्र हैद्राबाद जमाअत-ए-इस्लामी हिंद चे स्थानिक अध्यक्ष युसूफ यांच्या मार्फतीने निजाम यांना देऊन वेळीच सावध केले होते. त्यांनी निजाम यांना काही अटी शर्तींवर युनियन ऑफ इंडियामध्ये सामिल होण्याचा दूरदर्षी सल्ला दिला होता. परंतु अ‍ॅड. कासिम रिझवी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे केंद्र सरकारला मिलिट्री अ‍ॅक्शन करून हैद्राबाद राज्य खालसा करावे लागले आणि त्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना तसेच आंध्र सिमेलगत राहणाऱ्या लाखो मुस्लिमांना देशोधडीस लागावे लागले. या सर्व घडामोडींची पंडित सुंदरलाल कमिटी मार्फत चौकशी करण्यात आली. 2014 साली समितीचा अहवाल क्विंट या संकेतस्थळावर पीडीएफ रूपाने उपलब्ध करण्यात आला. त्यात 40 हजाराहून अधिक लोक या आंदोलनात मरण पावल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र आजही त्याकाळातील जे काही जुने लोक जीवंत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व प्रकरणामध्ये किमान 2 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात बहुसंख्येने मुस्लिम होते. हैद्राबाद राज्याचे भारतात शांतीपूर्ण विलीनीकरण झाले असते तर कदाचित ही मनुष्यहानी टळली असती.

- एम. आय शेख



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे म्हटले आहे की जोपर्यंत समाजात विषमता आहे तो पर्यंत आरक्षण सुरूच रहावे. काही वर्षापूर्वीच त्यांनी आरक्षणाच्या तरतुदींची समीक्षा करण्याचे सांगितले होते. पण त्यांचे आताचे वक्तव्य कोणत्या संदर्भात आहे हे सर्वांना माहित आहे. त्याचा उल्लेख करायची आवश्यकता नाही. त्यांनी हे विधान नागपूर येथील एका कार्यक्रमात केले आहे.

ते म्हणतात की, आमच्या समाजात सामाजिक विषमतेचा भला मोठा इतिहास आहे आणि त्या लोकांचे जीवन पशुप्राणी सारखे झाले होते तरी देखील आम्हाला काही वाटले नाही आणि हे मागील 2000 वर्षांपासून चालत आलेले आहे. म्हणूनच जोपर्यंत हा भेदभाव चालू राहील तोपर्यंत आरक्षणाचे प्रयोजन चालूच असावे. ते पुढे असेही म्हणाले आहेत की, ’’हो गेली 2000 वर्षांपासून सामाजिक भेदभाव प्रचलित आहेत आणि हो गेले 2000 वर्षांपासून सामाजिक विषमता आम्ही रूजविलेली आहे.’’ यावर कर्नाटकाचे मंत्री प्रयांक खरगे यांनी प्रश्न केला की आम्ही म्हणजे कोण?

भारतीय सभ्यतेला भलामोठा इतिहास आहे. कोणतेही सभ्यतेचे मापदंड असतात यात सर्वात महत्त्वाचा मापदंड म्हणजे त्या-त्या सभ्यतेत माणसा- माणसांमधील संबंधाचे काय, कोण व कोणत्या आधारावर सामाजिक भेदभाव होतो हे आहे. जात, रंग, वंश भेद, पारंपरिक भेदभावांना धर्माचे अधिष्ठान असते, अशावेळी त्याला धर्माच्या शिकवणीचा अभ्यास केला जातो. काही परंपरांना धार्मिक कक्षेत ठेवले जातात. काही परंपरा मात्र धार्मिक श्रद्धांचा भाग असतो, अशा वेळी कोणत्याही समुहात सामाजिक भेदभाव विषमतेला जर धर्माची मान्यता असेल तर ते नष्ट केले जावू शकत नाही. केवळ भारतीय समाजात सभ्यतेतच सामाजिक विषमता नाही तर जगातल्या साऱ्या सभ्यतांमध्ये हे भेदभाव प्रचलित आहेत. पाश्चात्य संस्कृतीने मानवी जीवन मूल्यांशी निगडित नवनवीन विचारसरणी मांडल्या आहेत. सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आधुनिक विचारधारेवर आधारित भलेमोठे साहित्य संपादन केले तरी देखील काळा आणि गोरा वाद त्या देशांमध्ये आजही प्रचलित आहे. दरवर्षी कोणत्या न कोणत्या सामाजिक कलहांची निर्माण होतच असतात आणि वंश परंपरेला त्या सभ्यतेतून नाहीसे करणे असंभवच आहे. इस्लामपूर्व अरबस्थानात देखील सामाजिक भेदभाव होतो. तसेच इतर सभ्यता, संस्कृतीमध्ये देखील उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ हे भेदभाव आहेतच. भारतात देखील आहेत. याची कबुली स्वतः सरसंघचालकांनी पहिल्यांदाच दिली आहे. पण त्यांनी नष्ट कराव लागेल असे त्यांनी सध्यातरी सांगितलेले नाहीत. पण एकदा एक गोष्ट मान्य केली की त्यावर विचार विनिमय होणार ही आशा बाळगण्यात काही गैर नाही. 2000 वर्षांची परंपरा नष्ट करण्यासाठी काळ लागणार. पण त्याची सुरूवात झाली तर किती काळ लागणार याचा अंदाज आज तर केला जावू शकत नाही. 

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, संघ सध्या मंडलची गोष्ट करत आहे, कारण देशात सध्या निवडणुकीचे पर्व आहे. निवडणूक म्हणजेच सत्ता. तेव्हा हे संघाचे मनपरिवर्तन आहे की परिस्थितीजन्य व्यावहारिक ’’मत परिवर्तन’’ आहे असे प्रश्न अनेजकजण विचारत आहेत. याला कारण असे की 2015 साली संघाने आरक्षणाविषयी फेरविचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुका अगोदर हे मत मांडले होते. याचा परिणाम असा झाला होता की, भाजपच्या त्यावेळच्या बिहार विधानसभा निवडणुकांत पराभव झाला होता. म्हणून आता आरक्षण चालू राहावे, असे विधान केल्याने देशातील चार राज्य आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा मिळावा ही रणनीति आहे का?



मी मूळची पुसेसावळी गावची रहिवाशी. लग्नानंतर गाव सुटले व पुण्यात स्थायिक झाले पण गावाशी जुळलेली नाळ कधीच तुटली नाही. ही नाळ इतकी घट्ट असण्याचं कारण अर्थातच गावातील गोड राहिवाशी, शेजारी व मित्रगण... येणं-जाणं कमी झालं तरी सुट्टीत आवर्जून जुने शेजारी मित्रमैत्रिणी यांच्या गाठीभेटी होत असतात. खूप अभिमान वाटायचा मला माझ्या गावाचा. हिंदू - मुस्लिम दरी दूरवरूनही कुठे जाणवली नाही. एकमेकांच्या सण समारंभात आवर्जून भाग घेणे, एकमेकांना सुख-दुःखात न बोलावता धावून येणं हे सगळं आपसूखच होतं.

गावात आठवडभर रंगणारा हरिनाम सप्ताह- यातील पहिलं जेवण मुसलमानांकडून असतं, आज ही आहे. गावातून प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना मुस्लिम लोक उन्हात उभे राहून पाणी व प्रेमाचा खाऊ देतात. ईद चा शीरखुर्मा आम्हाला आमच्या हिंदू बांधवा शिवाय कधीच गोड वाटला नाही. ईदच्या दिवशी आवर्जून आमचे हिंदू बांधव घरी येऊन शीरखुर्मा व मांसाहारी पदार्थ आवडीने खातात.

गावात मुस्लिमांची घरे मोजकीच, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी, बाकी सगळे हिंदूच.... पण हे मोजण्याची वेळ कधी आलीच नाही.

पण परवा 10 सप्टेंबर ला झालेल्या घटनेमुळे मन हेलावून गेले. धर्मनिरपेक्ष म्हणून ख्याती असलेल्या आमच्या गावात धर्माच्या नावाखाली रक्त सांडले गेले, हत्या झाली, कित्येक मुस्लिमांना जखमी केले गेले. मस्जिद ची तोडफोड झाली. मुस्लिमांच्या घरावर दगडफेक केली गेली, त्यांची दुकाने फोडली, टपऱ्या, हातगाडे जाळले, गाड्या तोडल्या. ती भयाण रात्र मुलं व महिलांनी जीव मुठीत धरून काढली. ज्यांचे नुकसान झाले ती सर्व हातावरचे पोट असणारी सर्वसामान्य कुटुंबे होती.

ज्या मुस्लिम मुलाचे अकाऊंट हॅककरून विकृत पोस्ट   इंस्टाग्राम टाकल्यामुळे हा प्रकार घडला, त्या मुलाचा त्या पोस्टशी काहीच संबंध नव्हता. मात्र अशा पोस्ट करणे किती घातक आहे हे या घटनेवरून लक्षात येते. ही घटना खरच निंदनीय आहे. 

कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही महापुरुषाची  अशी विटंबणा करणे चूकीचेच आहे. अशा कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्हायलाच हवा. या घटनेच्या अनुषंगाने काही प्रश्न मी इथे उपस्थित करत आहे, ज्यावर भारताच्या प्रत्येक नागरिकाने विचार करावा व सरकारने याची उत्तरे द्यावीत, कारण शिंतोडे  राज्य सरकावरच उडत आहेत की- हा सगळा प्रकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व येणारी निवडणूक जिंकण्यासाठी जाणूनबुजून घडवण्यात आला आहे?

1. ज्याने कोणी अशी बदनामी कारक पोस्ट केली किंवा जर इतर कोणी अकाउंट हॅक करून ही पोस्ट केली असेल तर त्याला शिक्षा होणार का?

2. 15 ऑगस्ट ला घडलेली अश्याच एक घटनेचा संदर्भ इथे देत आहे, जिथे गुन्हेगार हिंदू युवक होता व आरोप मुस्लिम युवकावर लावण्यात आला होता. त्यावेळी मा. उदयनराजे भोसले महाराज यांनी हे प्रकरण खूप संवेदनशिलपने हाताळले, ते चिघळू दिले नाही . ही गोष्ट कौतुकास्पद आहे. सातारा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट केल्यासंबंधी व त्यानंतर दंगल उसळल्यासंबंधी जी प्रेसनोट दिली आहे ती खालीलप्रमाणे -

सातारा शहर पोलीस ठाणेस दिनांक 15/08/2023 रोजी गुरनं. 648/2023 भा.द.स कलम 595अ, 153, 504 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobiww_70 या इंस्टाग्राम अकाउंटवरून छ. शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) प्रसारीत झालेबाबत नमुद केले होते. सदर गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा (उखण यूनिट) सातारा यांचे पथकाने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख nobiww_70 या इंस्टाग्राम अकाऊंटबाबत तांत्रिक माहिती इंस्टाग्राम यांचेकडुन प्राप्त करुन घेतली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर माहितीमधुन अमर अर्जुन शिंदे (राहणार मु.पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा) याची माहिती निष्पन झाली आहे.

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने संशयीत अमर शिंदे यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता अमर शिंदे हा त्याचे इंस्टाग्राम अकाऊंटवरून मैत्रिणीसोबत चॅटिंग करीत होता. सदर मैत्रिण हि विधीसंघर्ष बालक नाम अरमान राजासाब शेख याचेसोबत देखील इंस्टाग्रामवर संपर्कात होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने इंस्टाग्रामावर या मुलीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून सदर अकाऊंटवरुन विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे सोबत चॅटिंग करू लागला. सदर अकाऊंटवरुन चॅटिंग करत असताना आरोपीने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचा विश्वास संपादन करुन त्याचेकडुन त्याचे nobiww_70 या इंस्टाग्राम अकाऊंटचा आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेतला. त्यानंतर आरोपी नामे अमर शिंदे याने विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख यास लोकांनी शिवीगाळ करावी, त्याची बदनामी व्हावी, त्यास शिक्षा मिळावी व तो त्याचे मैत्रिणीपासुन दुर व्हावा या हेतुने दिनांक 15/08/2023 रोजी छ. शिवाजी महाराज यांचे नावाने आक्षेपार्ह पोस्ट (इंस्टाग्राम स्टोरी) nobiww_70 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून प्रसारीत केली.

सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करीत असताना विधीसंघर्ष बालक नामे अरमान राजासाब शेख याचे nobiww_70 या नावाचे इंस्टाग्राम अकाऊंट हे आरोपी नामे अमर अर्जुन शिंदे राहणार मु. पो. हिवरे ता. कोरेगांव जिल्हा सातारा हा वापरत असलेबाबत माहिती इंस्टाग्राम व मोबाईल कंपनी यांनी दिलेले माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन प्राप्त झाली आहे. यासाठी सातारा पोलिसांचे अभिनंदन. पण

3-कायदा हातात घेऊन, निर्दयपणे निष्पाप माणसांना मारण्याचा अधिकार या टोळक्यांना कोणी दिला? कायदा हातात घेण्याचं धाडस लोकांना येतच कुठून, कोणाचा छुपा सपोर्ट असतो अशा टोळक्यांना? याचं उत्तर सत्तेत असणार्यांनी द्यायला हवं कारण हा तुमच्या व्यवस्थेचा फोलपणा आहे आणि जनसुरक्षेची पायमल्ली आहे.

4- नूरहसन शिकलगार या युवकाचा जमावाने जीव घेतला त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. तो नमाज पठणासाठी मशीदित आला होता. त्याचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे.जगात येण्याआधीच अनाथ झालेल्या त्या बाळाचे भाविष्य काय? या व्यक्तीच्या कुटुंबाला सरकार नुकसान भरपाई देणार का? जे जखमी आणि गंभीर जखमी आहेत त्यांना शासन आर्थिक भरपाई देणार का?

5- या दंग्यात सहभागी टोळक्यात मोठा टक्का बाहेरच्या लोकांचा होता. गावामध्ये इतक्या संख्येने टोळकी जमा होताहेत तेव्हा पोलीस यंत्रनेणे खूप सतर्क राहणे आवश्यक होते. जादा पोलीसी सुरक्षा मागवणे आवश्यक होते. हे सर्व का केले गेले नाही? काहींच्या म्हणण्यानुसार ती इंस्टाग्राम पोस्ट पडायच्या आधीच ही टोळकी गावात यायला सुरूवात झाली होती. मग मनात प्रश्न येतो की  हे सगळ षडयंत्र तर नव्हते?

6. ज्या गरीब लोकांची दुकानें, घरे, गाड्या तोडली गेली, टपऱ्या हातगाडे जाळले गेले, हे सगळे हातावरचे पोट असणारे सर्वसामान्य नागरिक आहेत. यांची परिस्थिती जेमतेम आहे. अशा वेळी तोडफोड करणाऱ्या अपराध्याची शहाणीशा करून त्यांच्या कडून ही सर्व भरपाई केली जाणार का? की बुलडोझर न्याय एकतर्फीच आहे?

7. गावात सध्या बाहेरील जातीयवादी गट येऊन भाषणे, घोषणा देत आहेत. हिंदू बांधवांच्या मनात मुस्लिमांविरोधी विष भरत आहेत, फलक लावत आहेत. अशा  लोकांना अंकुश का नाही लावण्यात येत? आवाहन करायचेच असेल तर शांती, बंधुता, सदभावना याचे व्हायला हवे, जातीयवादाचे न्हवे. तरुणांची माथी भडकवणाऱ्या अशा लोकांविरुद्ध काय अ‍ॅ्नशन घेतली जाणार?

8. गावातील मुस्लिम समुदाय सध्या दडपणा खाली आहे. मुले व महिला यांना असुरक्षित वाटत आहे. यांना यापुढे सरकार सुरक्षेची हमी देईल काय?

शेवटी पुसेसावळी च्या माझ्या सर्व ग्रामस्थाना आवाहन आहे की आधीसारखे मिळुनमिसळून रहा. सरकारे येतील जातील, सत्ता पालटतील. गावातील धार्मिक प्रकरणे निराकरण करण्यासाठी वडीलधाऱ्या मंडळीनी एकत्र येऊन एक ’सदभावना मंच’ स्थापन करा, ज्यामध्ये सर्व जातींचे सदस्य असतील, महिला सदस्य ही असतील. जेणेकरून गावातल्या समस्यांचे निराकरण गावातच आपापसातच होईल. बाहेरच्या कुनीतीला थारा देऊ नका.कारण शेवटी दिसणार...

तुमच्या हातात काठ्या 

त्यांच्या हातात सत्ता व 

त्यांच्या मुलांच्या हातात पदव्या. 

दंगे करणाऱ्यानो या मुद्याकडे 

तुम्ही कधी लक्ष द्याल?


- मिनाज शेख, 

मुळ रहिवाशी, पुसेसावळी.



पैगंबर मुहम्मद सल्ल. यांचे जीवन चरित्र वाचतांना आणि ते समजून घेताना ईश्वराच्या अस्तित्वाची श्रद्धा असणे आवश्यक आहे, कारण निर्मात्याच्या अस्तित्वावर विश्वास नसेल, तर मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी आणि कल्याणासाठी त्याने नियुक्त केलेल्या पैगंबरांचे महत्व, त्यांचे कार्य आणि त्याची गरज कशी कळणार? याबरोबर हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की विश्व निर्मितीनंतर एकमेव ईश्वर, अल्लाहने कधीही सृष्टीकडे दुर्लक्ष केले नाही. तसेच मार्गदर्शनाच्या बाबतीतही माणसांना कधीही वंचित राहू दिले नाही. प्रत्येक युगात आणि प्रत्येक राष्ट्रात माणसांसाठी माणसांतूनच संदेशवाहक निवडले आणि त्यांच्यावर आपले मार्गदर्शन अवतरित करून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविला. जेणेकरून सृष्टीची व्यवस्था त्याने घालून दिलेल्या तत्त्वांनुसार चालत राहावी आणि मानवजातीने पैगंबरांवर अवतरित झालेल्या मार्गदर्शनाखाली आपल्या निर्मात्या, स्वामीवर विश्वास ठेवत सन्मार्गाने व शांततेने जगावे. मार्गदर्शनपर असलेल्या या पैगंबरीय मालिकेचे अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) हे आहेत. त्यांच्या पुर्वीही जगभरात अनेक पैगंबरांनी विविध ठिकाणी आपले कार्य पूर्ण केलेत. त्यांमध्ये एक पैगंबर आदरणीय मुसा(अ) हे होते. ज्यांचा काळ आजपासून जवळपास 3 हजार 300 वर्षांपूर्वीचा होता आणि त्यांची कार्यभुमी मुख्यतः इजिप्त होती. 

आदरणीय मुसा(अलै.) यांना पैगंबरांमध्ये मोठे स्थान असून त्यांना ’कलीमुल्लाह’ ही खूप मोठ्या मानाची उपाधी मिळाली, म्हणजे या संसारातच त्यांना अल्लाह तआलाशी वार्तालाप करण्याची संधी मिळाली. ते विश्वनिर्मात्याशी प्रत्यक्षपणे बोलत असत. पैगंबरीय पदग्रहण करण्यापूर्वीच त्यांना दुःख व संकटांना सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म झाला तेव्हा क्रूर राजापासून त्यांचा जीव वाचवण्यासाठी खुद्द त्यांच्या आईने नवजात बालकाला आपल्यापासून दूर केले. अल्लाहचे सामर्थ्य पहा, ज्या टोपलीत मुलाला ठेवून नदीत सोडून दिले होते, ती टोपली वाहत वाहत त्याच क्रूर राजाच्या महालाजवळ पोहोचली आणि मुलाचे निरागस रूप पाहून निपुत्र राजा-राणी मोहित झाले. त्यांनी त्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. शाही राजवाड्यात वाढलेले आदरणीय पैगंबर (अलै.) यांनी जेव्हा तारुण्यात प्रवेश केला तेव्हा इजिप्तमधील इस्त्रायली समाजबांधवांची परिस्थिती त्यांच्यासाठी खूप दुःखदायक होती. ’किब्ती’ समाजाच्या वर्चस्वाखाली इस्त्रायली समाजबांधव गुलामगिरीत जखडले गेले होते. कामात क्षमतेपेक्षा खूप जास्त भार सोसूनही ते वाईट वागणूकीला तोंड देत होते. आदरणीय मुसा(अ) यांच्याही आयुष्यात एकदा अशी घटना घडली की त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. अशा परिस्थितीत त्यांनी तातडीने इजिप्त सोडण्याचा निर्णय घेतला. प्रवासाची कोणतीही तयारी न करता, कोणत्याही साधनसामग्री शिवाय त्यांनी ’मदयन’च्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. निर्जल आणि ओसाड वाळवंटी प्रदेश, लांबचा प्रवास, सोबतीला कोणी मार्गदर्शक नाही कि सहप्रवासी नाही. तिब्यानुल्-कुरआनच्या लेखकाने प्रसिद्ध विद्वान आदरणीय कुरतुबी(र) यांचा संदर्भ देत लिहिले आहे की आदरणीय पैगंबर(अ) झाडाची पाने खाऊन प्रवास करत होते. अशा प्रवास मार्गात आणि निर्जन रस्त्यात खाण्यायोग्य पानं व फळांशिवाय आणखी काय मिळणार?

पहिला मुक्काम व उद्बोधक घटना 

अनेक दिवस प्रवास करून मदयनला पोहोचल्यावर त्यांना एक विहिर दिसली. जिथे गुराखी आपल्या गुरा-ढोरांना पाणी पाजत होते. त्या घाटापासून काही अंतरावर दोन मुली त्यांच्या जनावरांना धरून उभ्या होत्या. जनावरं पाण्यासाठी तगमग करत होती आणि त्या दोन्ही मुली त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. हे पाहून आदरणीय पैगंबरांना(अ) आश्चर्य वाटले. त्यांनी पुढे जाऊन विचारले, तुम्हा दोघींचं काय प्रकरण आहे? म्हणजे तुम्ही पुढे जाऊन या गुरांना पाणी का पिऊ देत नाहीत? वरील प्रश्नाच्या शैलीवरून आणि त्याच्या शब्दरचनेवरून हेही विचारण्याचा हेतू दिसून येतो की सभ्य घराण्यातील तरुण मुली सामान्यत: गुराखीचे काम करीत नाहीत. हे काम तर पुरुषांचे आहे. मग तुम्ही त्यासाठी का उभ्या आहात? मुलींनी उत्तर दिले की, या गर्दीत जनावरांना पाणी घालणे आम्हाला शक्य नाही. गर्दीत घुसून आणि बळाचा वापर करून पुरुषांसारखे वागणे योग्य नसल्याची जाणीव आम्हाला होते. या कामासाठी बाहेर पडणे आमची मजबुरी आहे कारण आमचे वडील खूप वृद्ध आहेत. ते हे काम करू शकत नाहीत आणि आम्हाला भाऊही नाही म्हणून हे काम आम्हालाच करावे लागते. यावरून असे दिसून येते की, त्या काळातही स्त्री आणि पुरुषांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे मानले जात होते आणि स्त्रियांना काही अत्यावश्यक गरजेपोटी पुरुषांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारची कामे करावीच लागली तर तीही अत्यंत काळजीपूर्वक, सन्मानाने आणि शक्य तितक्या देखभालीने केली जायची. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा भिडवून, एकत्रितपणे मिळून मिसळून काम करण्याची पद्धत नव्हती. आदरणीय पैगंबर मुसा(अ) खूप बलवान होते. त्यांच्या पुरुषी अभिमानाला त्या मुलींची असहाय्यता सहन झाली नाही. ते विहिरीच्या दिशेने गेले आणि सर्व गुराख्यांना मागे खेचत त्या मुलींच्या जनावरांना पाणी पाजण्याची व्यवस्था केली. त्यानंतर मुली आपल्या जनावरांना घेऊन निघून गेल्या आणि आदरणीय पैगंबर(अ ) सावलीत जाऊन बसले.

आता पुढे काय? 

ऐषोआरामात वाढलेल्या, राजेशाही थाटात जगलेल्या व्यक्तीला अचानक सर्व काही मागे सोडून, रिकाम्या हाताने, जीव मुठीत धरून, अनोळख्या ठिकाणी एकटेच जावे लागले. अनेक कष्ट आणि त्रास सहन करत सिनाईचा वाळवंट पार करावा लागला. अशा ठिकाणी यावे लागले जिथे डोक्यावर छप्पर नाही आणि उदरनिर्वाहाचे साधन नाही. जिथे कुणीही त्यांना ओळखणारा नाही कि विचारणारा नाही. कुणाला सांगावी इथे आपली मन की बात? आपल्या चिंता, समस्या कोण ऐकणार इथे?

कोई चारह नहीं दुआ के सिवा

कोई सुनता नहीं खुदा के सिवा

( हफीज जालंधरी.rekhta.org )

बस्स! मनातल्या चिंता स्वाभाविकपणे तोंडाद्वारे बाहेर पडल्या. 

 रब्बी इन्नी लिमा अन्जल-त इलय्य मिन खयरिन फकीरुन. 

(28 अल्-कसस : 24)

अनुवाद 

 हे माझ्या पालनकर्त्या! जे काही भले तू माझ्यावर अवतरशील, खरंच! त्याचा मी अत्यंत गरजू आहे. 

अत्यंत गरजेच्या वेळी खूप विवशतेने केलेली प्रार्थना आहे ही! नेहमी लक्षात राहणारी व अत्यंत गरजेच्या वेळी कामी येणारी. ज्यामध्ये आदरणीय पैगंबर मुसा(अ) यांच्या कठीण परिस्थितीचे चित्र ’फकीर’ या शब्दातून दिसून येते.

ही प्रार्थना केल्यानंतर थोड्याच वेळात त्या दोनपैकी एक मुलगी लाजत त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, चला! तुम्ही पाणी दिल्याबद्दल बक्षीस देण्यासाठी माझे वडील तुम्हाला बोलावत आहेत. आदरणीय पैगंबर (अ) अत्यंत गरजू आणि संकटात असल्याने ते त्यांच्या घरी गेले आणि मुलींच्या वडीलाला सर्व हकीकत सांगितली. शेख सगळी हकीकत ऐकून म्हणाले, घाबरण्यासारखे काही नाही. अल्लाहने तुम्हाला अत्याचारी लोकांपासून वाचवले आहे. त्यानंतर आदरणीय मुसा(अ) आणि शेख यांच्यात असा करार झाला की जर मुसा(अ) यांनी आठ वर्षे शेखची सेवा केली तर शेख आपल्या मुलींपैकी एका मुलीचा निकाह आदरणीय मुसा(अ) यांच्याशी करतील. आदरणीय मुसा(अ) यांनी आठ वर्षे पूर्ण केल्यानंतर आणखी दोन वर्षे स्वखुषीने शेख यांची सेवा चालू ठेवली. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह इजिप्तला परत जाण्यास निघाले. याच प्रवासात अल्लाहने त्यांना पैगंबरपदाचा मान बहाल केला.

माणसाच्या असंख्य गरजा असतात. त्या पुर्ण होण्यासाठी आणि खासकरून कठीण प्रसंगी पवित्र कुरआनातील वरील प्रार्थना जरूर करावी. प्रवासात, एकांतात, जिथे ओळख नसते अशा ठिकाणी ही दुआ खूप आनंदी परिणाम देते. याशिवाय प्रार्थना स्विकृत होण्याच्या काही खास वेळा असतात. अशा वेळी पूर्ण विश्वासाने आणि तळमळीने केलेली प्रार्थना निर्मात्याच्या दरबारात क्षणभरात मंजूर होते आणि माणसाला जे काही हवे असते ते निर्मात्याकडून समोर प्रस्तुत केले जाते. हा अनुभव आहे.

........................... क्रमशः


अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


ईद-ए-मिलादची वेळ किंवा पैगंबर मुहम्मद (स.) यांचा २८ सप्टेंबर हा वाढदिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा अनेक मुस्लिम संघटनांनी हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार व मरीन लाइन्स येथील प्रतिष्ठित इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष अॅड. युसूफ अब्राहमी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली 'पैगंबर सर्वांसाठी' अभियान सुरू करण्यात आले आहे. जे पैगंबर (स.) यांचा सार्वत्रिक संदेश आणि त्यांच्या मानवतावादी मूल्यांचा प्रसार करण्यासाठी एक अनोखी मोहीम आहे.

इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष आणि मोहिमेचे प्रमुख अॅडव्होकेट युसूफ अब्राहमी म्हणाले, "हे कुणाचे धर्मांतर करण्यासाठी किंवा इस्लामचा प्रचार करण्यासाठी नाही. पैगंबर (स.) यांचा संदेश बिगर मुस्लिमांपर्यंत पोहोचविणे आणि इस्लामविषयीचे गैरसमज दूर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे." गेल्या वर्षी झालेल्या अशाच प्रकारच्या प्रयोगामुळे कोअर ग्रुपला प्रोत्साहन मिळाले असून, आतापर्यंत बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी,  कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांना सहभागी करून घेत समाजातील विविध घटकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवला जात आहे. आमचा टार्गेट ग्रुप बहुसंख्य समाजाचे सदस्य असून आम्ही एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम सुरू केली आहे."

असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स (एएमपी) चे अध्यक्ष आणि पैगंबर फॉर ऑल कोअर कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अमीर इद्रिसी म्हणाले की, मोहिमेचा प्रत्येक सदस्य जबाबदार आहे  आणि ही मोहीम कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा एका संघटनेचे काम नाही. जास्तीत जास्त बिगर मुस्लिम मित्रांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना आपले लाडके पैगंबर (स.) कोणत्या मूल्यांसाठी उभे राहिले हे सांगणे हे आमचे ध्येय आहे."

सामाजिक कार्यकर्ते आणि या मोहिमेचे आणखी एक सदस्य सईस खान यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेला ‘पैगंबर सर्वांसाठी’ म्हणतात कारण आमचे पवित्र पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी दया (रहमतुल लिल-आलमीन)  म्हणून पाठवले होते.  त्याऐवजी आम्हाला जगाला सांगायचे आहे की, आपले पैगंबर (स.) कोणत्या संदेशासाठी उभे राहिले." या मोहिमेसंदर्भात विविध घटकांना काम करण्यास सांगण्यात आले आहे.  त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी काही व्यक्तींवर सोपविण्यात आली आहे, तर काही व्यक्तींचे काम मुस्लिमेतरांच्या गटांना मशिदींना भेटीवर घेऊन जाण्याचे असेल.

या मोहिमेचा एक मनोरंजक पैलू म्हणजे मुस्लिमेतरांना मुस्लिमांच्या घरी आमंत्रित करणे, त्यांना जेवण, शरबत, चहा आणि कॉफी देणे आणि कुरआन आणि हदीस (पैगंबरांचे वचन) यांचे महत्त्व समजावून सांगणे होय.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात  २८  सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबर ला ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे.  कोणताही त्रास होऊ नये म्हणून गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी  म्हणजेच २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची मिरवणूक काढावी, असे सुचविण्यात आले आहे. मुस्लिम संघटनांनी २९ सप्टेंबररोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे."

भायखळ्यातील ऐतिहासिक खिलाफत हाऊसयेथे मुस्लिम गटांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे ज्येष्ठ आध्यात्मिक नेते मौलाना मोईन अशरफ कादरी (मोईन मियाँ) म्हणाले की, २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय नेत्यांनी एकत्रितपणे घेतला आहे.

बैठकीला उपस्थित असलेले समाजवादी पक्षाचे नेते व आमदार रईस शेख यांनी २९ मे रोजी सुट्टी असून त्याच दिवशी मिरवणुका काढणे भिवंडी या यंत्रमाग नगरीसाठी चांगले आहे कारण शुक्रवार आहे आणि शुक्रवारी यंत्रमाग बंद असतात. भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शेख यांनी २९ सप्टेंबररोजी सुट्टी जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू, असे आश्वासन याआधीच दिले होते.

माहीम दर्गाहचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खांडवानी यांनीही आपली इच्छा व्यक्त केली होती आणि राज्य सरकारला २९  मे रोजी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती जेणेकरून मुस्लिम ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत सहभागी होऊ शकतील.

- शाहजहान मगदुम

01 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यव्यापी अभियान सुरू


मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस अँड वेलफेअर ही संघटना सामाजिक कार्यात आपले मोठे योगदान देत आहे. रेशन योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक मुला-मुलींच्या वसतिगृह आदींबाबत आंदोलन करून शासन दरबारी पाठपुरावा करते, वेळप्रसंगी न्यायालयीन लढा लढून न्याय देण्याचा संघटनेने प्रयत्न केला आहे. त्यात संघटनेला पूर्णपणे यशही मिळाले आहे. संघटनेने आता अनाथांच्या हक्कासाठी पुढाकार घेतला आहे. 

कोरोना काळात राज्यभरात अनाथ बालकांसह विधवा महिलांची संख्या वाढली आहे. एमपीजे या सर्वांचे सर्व्हेक्षण करून बालसंगोपन योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यात 435 मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात एमपीजेला यश आले आहे. लातूर जिल्ह्यात एवढी संख्या आहे तर राज्यात किती असेल, यासाठी एमपीजेने सर्व्हेक्षण करून बालकांना मोफत अर्ज भरून देऊन त्यांना मार्गदर्शन करत आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत एका मुलाला 2250 रूपये महिन्याला मिळतात. ही रक्कम त्यांच्यासाठी फार मोठी आहे.

महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत 0 ते 18 वयोगटातील खालील प्रकारचे बालकांना प्रति बालक दरमहा रू.2250/- परिपोषण अनुदानाची तरतुद आहे. योजनेचा फॉर्म भरून संबंधित जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावेत.

योजनेसाठी पात्र लाभार्थी :- अनाथ / एक पालक बालक / घटस्फोट / कुटूंब वाद / विभक्तीकरण / परित्याग / कॅन्सर / कुष्ठरुग्ण / एच. आय. व्ही. ग्रस्त व इतर दुर्धर आजार / शिक्षा - तुरुंगवास / दोन्ही पालक 40% पेक्षा अधिक दिव्यांग या पालकांचे पाल्य तसेच तीव्र मतीमंद / एच. आय. व्ही. ग्रस्त / कॅन्सरग्रस्त / 40% पेक्षा अधिक दिव्यांग व इतर दुर्धर आजार असलेली बालके. 

(टीप : अर्ज मंजूर झाल्यानंतर दरवर्षी संबंधीत कार्यालयात जाऊन अर्ज नुतनीकरण करणे आवश्यक राहील.) 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तीन प्रतीत  द्यावीत:- 1) रहिवासी दाखला : (तलाठी / ग्रामसेवक / नगर सेवक / सरपंच यांचेकडून निर्गमित दाखला).

2 ) आधार कार्ड : बालक व आई/वडील/ पालकाचे. 3) वार्षिक उत्पन्नाचा दाखला : आई/वडील/पालकाचे. (तहसिलदार यांचा, अडीच लाखापेक्षा कमी)

4) योजनेस पात्रतेसाठी पुरावा : आई/वडीलाचे मृत्यु प्रमाणपत्र / घटस्फोट / कुटूंब वाद / परित्याग / दुर्धर आजाराबाबत वैद्यकीय अहवाल / 40% पेक्षा अधिक दिव्यांग दाखला / इतर.

5) कुटूंब फोटो : बालक व पालक / आई / वडील यांचे समवेत घरासमोरचा फोटो. 6) बोनाफाईड सर्टिफिकेट व जन्म तारखेचा दाखला. (बालकाचा )

7) बँक पासबुकची छायांकित प्रत : बालक / आई/वडील/पालकाचे. (बालक व पालक यांचे संयुक्त बँक खाते). 

शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जातात मात्र त्यांची सामान्य माणसांना माहिती नसल्याने पात्रताधारक असून देखील लाभ मिळत नाही. शासकीय योजनांची माहिती सार्वजनिक केली जात असली तरी देखील गरजवंतांना त्यांची माहिती भेटून सांगितल्याशिवाय कळत नाही. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस अँड वेलफेअरने बालसंगोपन योजनेची राज्यभर जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे 30 सप्टेेंबर नंतर याची खरी आकडेवारी समोर येणार आहे. 

प्रेषित मुहम्मद सल्ल. अनाथाबद्दल सांगतात...

खरे तर गरजवंतांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे मोठे पुण्याचे काम आहे. अनाथासंबंधी तर पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले आहे की, अनाथांचे पालन पोषण करणारे जन्नतमध्ये प्रेषित सल्ल. यांच्या निकट राहतील आणि हा शुभ समाचार केवळ अनाथांच्या पालकांसाठी नाही तर त्या प्रत्येक माणसासाठी आहे जो लाचार, अगतिक व असहाय लोकांचे पालन पोषण करतो. 

प्रेषित सल्ल. यांनी असे सांगितले की, मुस्लिमांच्या घरामध्ये सर्वात चांगले घर ते आहे, ज्यात एखादे अनाथ बालक असावे आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले जात असावे आणि मुस्लिमांचे सर्वाधिक वाईट घर ते आहे ज्यात एखादा अनाथ असावा आणि त्याच्याशी वाईट वर्तन केेले जात असावे. (संदर्भ ः इब्ने माजा अबु हुरैरा रजि.)

एका माणसाने प्रेषित सल्ल. यांच्या जवळ आपल्या हृदयाची कठोरता व सक्तीचा उल्लेख केला. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, अनाथांच्या डोक्यावर स्नेह, प्रेमाचा हात फिरवा आणि दीन दुबळ्यांना खाऊ घाला. (मिश्कात, अबु हुरैरा रजि.)

या हदीस वचनाने हे ज्ञात झाले की, जर कोणी आपल्या पाषाण हृदयतेचा इलाज करू इच्छित असेल तर त्याने स्नेह दया पूर्ण कृत्य करायला सुरूवात करावी. गरजवंत आणि निराधार लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि त्यांच्या कामात त्यांना मदत करावी तर असे केल्याने त्याचे पाषाण हृदय, दया करूणा पूर्ण हृदयात परिवर्तीत होईल. 

मित्रांनो! वरील काही हदीस वचनांवर आपण विचार केला तर कळेल की अनाथ, निराधार, गरजवंतांशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे. 

एमपीजेद्वारे मानवकल्याणाच्या हितार्थ जे कार्य सुरू आहे त्यात आपणही सहभाग नोंदवून बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र असणार्‍या बालकांना लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण प्रयत्न करावा व पुण्याईच्या या सत्कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन एमपीजेचे राज्य अध्यक्ष मोहम्मद सिराज यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, शासन योजना आखत असते मात्र त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एमपीजेची मोहिम 30 सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र बालसंगोपन योजनेचे फार्म वर्षभर कधीही भरू शकता. या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा एमपीजे लातूरचे जिल्हा सचिव रजाउल्ला खान 9326080740 यांच्याशी संपर्क करू शकता. तसेच योजनेशी संबंधित शासन निर्णय, अर्ज, माहिती पत्रिकासाठी वरील क्रमाकांवर व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवावा.


- बशीर शेख

उपसंपादक


सोशल मीडियावर पसरविल्या गेलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे साताऱ्यातील पुसेसावळीमधे दंगल भडकली. यात दोघांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. परिस्थिती आवरण्यासाठी काहींना अटक करण्यात आली, तसंच इंटरनेटही बंद करण्यात आलं. हे सगळं भीषण आहे. साताऱ्यासारख्या सर्वसमावेशकतेचा इतिहास असलेल्या शहरात दंगे घडवून कोणीतरी आपला डाव साधू पाहताहेत. याचं भान तातडीनं यायला हवंय. विशिष्ट समाजातील निरपराध मुलांचा मोबाइल नंबर हॅक करून त्यावरून आपत्तीजनक मेसेज पाठवणं आणि दंगली घडवणं हे आता कोल्हापूर, सांगली, सातारा या भागतील असामाजिक तत्त्वांच्या अंगवळणी पडल्यासारखं वाटतं.

त्याचप्रमाणे आपल्याकडे एक शिक्षिका आहे जी तिच्या संपूर्ण वर्गाला दुसऱ्या समाजातील लहान मुलाला थप्पड मारण्यास सांगते. आमच्याकडे एक रेल्वे सुरक्षा कर्मी आहे जो ट्रेनमधून फिरतो आणि एका विशिष्ट समुदायातील असल्यानं जमेल त्या सर्वांना गोळ्या घालतो. दिल्लीच्या सीमेवर असलेल्या गुरुग्राममध्ये जमावानं एका समुदायाची घरं, दुकानं आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले चढवले आहेत. समाजाबद्दल का बोलायचं; सशक्त वर्गांबद्दल बोलू या- एका फेडरेशनचा अलीकडचा प्रमुख महिला खेळाडूंना पळवून नेतो आणि मुक्त होतो, मात्र पुरस्कारप्राप्त खेळाडूंना खेचून नेलं जातं आणि ताब्यात घेतलं जातं. तलवारी आणि त्रिशूल बाळगणाऱ्यांना काही दिवसांतच जामीन मिळतो, तर काही जण महिने, तर कधी वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात. 

हरयाणातील नूहमध्ये स्थानिक प्रशासनानं बुलडोझरचा वापर करून ४५ व्यावसायिक दुकाने पाडली आणि आरोप केला की अडीच एकर जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामं केली गेली आहेत. या सगळ्या हिंसाचारात आणि विध्वंसातही वेगवेगळ्या समाजातील एक जोडी अबाधित राहिली आणि त्यांची मैत्री घट्ट राहिली. एक शास्त्री आणि दुसरा जुबेर अजूनही बाहेर फिरत आहेत- लक्ष्यित हिंसाचारामुळे समुदायांमधील तणावाची पर्वा न करता ते दररोज दुचाकीवरून खरेदीसाठी जातात. त्यांना जगण्यासाठी एकटं सोडावं, एवढीच त्यांची मागणी आहे. “याचा आम्हाला त्रास होत नाही. हे सर्व राजकीय आहे,” असे एका शेतकऱ्यानं सांगितलं. मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही की शांत होऊ दिलं नाही.

राजकारण हा सर्वात सडलेला प्रकार आहे. नवे राजकीय नायक केवळ सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी निर्लज्ज असहिष्णुता आणि सरसकट बेशिस्त कारवाया करत नाहीत, तर ते सर्वस्वी अराजकतेचाही अवलंब करताहेत; इतकं की एका वर्गाला धाडसानं टार्गेट केलं जातंय. त्यांना खाली खेचण्यासाठी आणि त्यांना विभक्त करण्यासाठी आणि शारीरिक शत्रुत्व भडकावण्यासाठी. 

अनेकदा राजकारणामुळे समाजात विविध प्रकारची हिंसा आणि अमानुष गोष्टी आपण पाहतो. यामुळे राजकारण हे रक्त पिण्याचं व्यसन आहे, अशी प्रतिमा समाजात निर्माण झालीय. राजकारण ही आपल्या भारताला आकार देणारी गोष्ट आहे. राजकारण ही स्वातंत्र्यलढ्याला आणि क्रांतीला जन्म देणारी गोष्ट आहे. राजकारण ही शाहू, फुले, आंबेडकर यांना जन्म देणारी गोष्ट आहे. आणि दुर्दैवानं, राजकारण हीच गोष्ट आहे ज्यानं हिटलर आणि मुसोलिनीला जन्म दिला जो सर्व काळातील सर्वांत क्रूर हुकूमशहा म्हणून उदयास आला. 

या दोन्ही बाबतीत राजकारणानेच क्रांती घडवून आणली आणि राज्यकर्ते आणि शासनव्यवस्था बदलून टाकली. पण जर्मनी आणि इटलीमध्ये त्याचा परिणाम हुकूमशाहीत झाला, तर माझ्या महान भारतात लोकशाही राष्ट्र निर्माण झालं.

असे का आहे? या देशांच्या राजकारणात काय फरक पडला?

या परिस्थितीचे आणि घटनांचे समीक्षक विश्लेषण केल्यास असे उत्तर मिळेल की, कोणीतरी जनहित आणि माणुसकीसाठी राजकारण केलं आणि लोकशाही झाली. तर दुसरे म्हणजे हुकूमशाहीत बदललेल्या काही व्यक्ती आणि समुदायांचं राजकारण. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने चिंतन आणि सखोल चर्चा केल्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो म्हणजे "नाही, राजकारणाला  रक्ताचे व्यसन नाही,  स्वार्थी राजकारणाला रक्त पिण्याचे व्यसन आहे."

एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर किंवा विशिष्ट समाजावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राजकारणाला रक्ताचं व्यसन आहे. सामान्य भाषेत आपण याला घाणेरडे राजकारण म्हणतो. सर्वसमावेशक आणि अविभाज्य असलेले राजकारण कधीही रक्त मागत नाही. हे केवळ मानवतेच्या कल्याणाचे आवाहन करते.

आपल्याला आपला सन्मान वाचवावा लागेल. यापुढं अनुचित घटना घडू देऊ नयेत याकडं खात्रीनं लक्ष दिलं पाहिजे. दिल्लीतल्या ऐतिहासिक संमेलनावर इतका वेळ आणि निधी गुंतवून सरकार अगदी क्षुल्लक आणि गंभीर पातळीवर गोष्टींवर लक्ष ठेवून होतं, ज्यात जिवंत आणि कधीकधी खेदजनक सोशल मीडियाचा समावेश आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सेव्हिंग-फेस होतं, जे या विशेष जी-20 सप्ताहात आवश्यक होतं. 

जी-20 बैठकीनंतर देशांतर्गत पातळीवर आपल्या सर्व व्यवस्था, समुदाय आणि अगदी आपल्या चळवळीतही गोष्टी समान पातळीवर आणल्या जातील याची काळजी घ्यावी लागेल. ज्या महान देशात आपण जन्माला आलो त्या महान देशात कायद्याचे राज्य, संवेदनशीलता आणि धैर्य टिकून आहे, हे सिद्ध करण्यासाठी तोंडात आणि इतरत्र काजू घेऊन चुकीच्या जोकरांना शिक्षा होणं गरजेचं आहे. इतिहास साक्षी आहे- तो शांतपणे सर्व काही पाहतोय, परंतु गोष्टी कशा बदलल्या आणि जेव्हा बदल किंवा अराजकता घडली तेव्हा कोण आघाडीवर होते हे सांगण्यासाठी अनेक दशके लागतात. मग खरे अपराधी निर्दोष सुटतात किंवा ते न्यायालयात शिक्षेस पात्र ठरत नाहीत. 

घाणेरड्या राजकारणाला कुलीनशाही हवी असते. कुलीनवर्ग म्हणजे काही लोकांचं सरकार. किंवा काही बाबतीत त्याला राजेशाही हवी असते जी राजा किंवा राणीनं चालवलेलं सरकार असते. आणि हे रक्तरंजित राजकारण लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे जनतेचं सरकार आहे. कारण लोकशाही प्रत्येक आवाजहीनांना आवाज देते आणि रक्तानं माखलेल्या या नेत्यांना आपण आवाज उठवावा असं वाटत नाही. आता प्रश्न असा पडतो की, जर असे असेल तर ते रक्त कशाला मागते? याचं उत्तर मानवी मानसशास्त्रावर आधारित आहे. मानवी मानसशास्त्र सामान्यत: भीती आणि लोभ या दोन गोष्टींवर आधारित असते. त्यामुळे आपला लोभ पूर्ण करण्यासाठी हे रक्तपीपासू नेते तुमच्या मनात भीती निर्माण करतात. आणि सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी रक्तपात हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. म्हणूनच हे रक्तपेढीचं राजकारण रक्ताची मागणी करते. ते दंगलींना जन्म देतात. तुमचा आवाज दाबण्यासाठी आणि तुमच्यात भीती निर्माण करण्यासाठी ते दहशतवादी हल्ले करवितात. फक्त भोळ्या-भाबड्या लोकांमध्ये काही अतार्किक समजुती पसरवून आणि निरपराध लोकांचा भावनिक वापर करून. जेव्हा हे रक्ताचे व्यसन मर्यादा ओलांडते तेव्हा तो एक भयानक धोका बनतो आणि यामुळे विशिष्ट समुदाय किंवा लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. असुरक्षिततेमुळे बंडखोरी होते आणि परिस्थिती करो या मरो बनते. 

रक्ताच्या आहारी गेलेल्या राजकारणाची ही संपूर्ण व्यवस्था अशीच चालते आणि ती लवकरात लवकर थांबवण्याची गरज आहे. कारण तो मानवतेला सर्वात मोठा धोका आहे आणि माणुसकी सर्व बाबतीत सर्वोच्च आहे.

- शाहजहान मगदुम

8976533404

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget