कुलभूषण जाधवच्या मृत्यूदंड प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची नाचक्की झाली. पहिल्याच दिवशी सॉलीसिटर हरीश साळवे यांच्या उत्कृष्ट युक्तीवादाने पाकीस्तानने दिलेल्या पुराव्याचे लक्तरे उडविले.
आता आम्ही सर्व भारतीय कुलभूषण जाधवची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्दोष मुक्तता होऊन स्वदेशात परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. तसे पाहता कुलभूषण हा आपला कोणी नातेवाईक नसून देखील आपल्याला या प्रकरणाची एवढी उत्सुकता का? प्रथम कारण जाधव हे भारतीय आहेत आणि दुसरे म्हणजे मानवी स्वभाव हा नेहमीच अन्यायाचा विरोध करीत असतो. किंबहूना अन्याय करणारे देखील त्यांच्यावर अन्याय झाल्यास पेटून उठतात.
एकीकडे कुलभूषण जाधवचे प्रकरण गाजत असताना दुसरीकडे एक मार्मिक बातमी भारतीय वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर येऊन गेली. काश्मिरच्या मोहंमद शाह दार याला अकरा वर्षाच्या कारावासानंतर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. ही ्फक्त एक बातमी नसून एक गंभीर घटना आहे.
एका निर्दोष माणसाला कोणतेही अपराध नसताना एक दोन नही तर अकरा वर्षे तुरुंगात ठेवले जाते. या अकरा वर्षात त्याचे संपूर्ण तारूण्य, त्याचे संपूर्ण जीवन उद्धवस्त केले जाते. पोलीस चौकशीचे टॉर्चर, तुरुंगातील नरकमय यातना आणि ते सुद्धा विनाकारण.आणि शिक्षा फक्त त्यालाच मिळाली नाही, त्याच्याशी संबंधीत प्रत्येक व्यक्तीला तब्बल अकरा वर्षे यातना भोगाव्या लागल्या. पत्नीचे संपूर्ण तारूण्य विराहात, मुलांचे अवहेलनेत, तर म्हाताऱ्या आई वडिलांचे कोर्टाच्या प्रदक्षिणात गेले.झाला असेल तर अशा परिस्थितीत या कुटुंबाने अकरा वर्षे कसे काढले असतील याचा अनुमान देखील आपण करू शकत नाही, आणि यानंतर कोर्ट कचेऱ्याचा अफाट खर्च...!
आज शाह दार जरी निर्दोष सुटका असला तरी त्याच्या उद्धवस्त जीवनाची किंमत कोण देणार? कोण देणार त्याच्या कुटुंबियाच्या अवहेलनाचा मोबदला? कोण परत करणार त्याच्या ऐन तारूण्याची अकरा वर्षे? त्यांनी भोगलेल्या अपार यातना आणि टॉर्चरचे प्रायश्चित्त कोण करणार? आणि कोठुन भरून काढायची आर्थिक सामाजिक व मानसिक मानहानी? दुर्देवाने आपल्या न्यायव्यवस्थेत या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे नाहीत.
खालच्या कोर्टात न्याय न झाल्यास नुकसान भरपाईचे कोणतेच प्रावधान व्यवस्थेत नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणात कोणाच्या चुकीमुळे एका निर्दोष माणसाने जीवन बर्बाद झाले त्याला शिक्षाच काय पण साधी चौकशी देखील होत नसल्यामुळे ही यंत्रणा दिवसेंदिवस बेजबाबदार होत आहे.
Post a Comment