Halloween Costume ideas 2015

शेती आणि शेतकरी हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा


५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितपणे तारुन नेईल, असा विश्वास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे, यावरून शेती आणि शेतकरी हेच आपल्या कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तथापि मायबाप सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे व त्यांच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत अत्यंत सहानुभूतीने व सौहार्दाने लक्ष दिले पाहिजे.

जानेवारी महिना सुरू झाला, सरत्या वर्षाला निरोप देत २०२३ या नवीन वर्षाचा आरंभ झाला आहे. गेल्या दोन चार वर्षात महाराष्ट्राला महापूर, अवकाळी पाऊस आणि कोरोनासारख्या महामारीने पुरते हैराण केले होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी अवघा देश कंबर कसून सज्ज झाला होता. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महाभयानक संकट असले तरी ते भारतासमोर एक मोठे आर्थिक अरिष्ट होते व आहे. या विषाणूंचा संसर्ग थोपवणेसाठी देशभरात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठे प्रबोधन केले गेले. या कोरोंनाच्या महाभयंकर संकटाचे आव्हान आपल्या देशासमोर उभे ठाकले होते, त्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती, सर्व देश स्थानबद्ध झाला होता. एकूणच देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला होता, हे या कोरोनामुळे देशासाठी फार मोठे अरिष्ट आले होते.

या जीवघेण्या संकटांमुळे देशातील अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून पडलेला होता, हे वास्तव नाकारता येणार नाही. या अरिष्टाशी कसा मुकाबला करावा, हा प्रश्र्न देशातील राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह अर्थतज्ज्ञ व विचारवंतांना पडला होता. यापूर्वी भारतात महामारी, प्लेग, देवी, स्वाईन फ्ल्यू, चिकन गुणिया, एड्स या सारख्या रोगांनी थैमान घातले होते, काही अंशी त्या त्या परिस्थितीत आर्थिक संकटेही आ वासून उभी राहिली होती, मात्र त्यातून आपण सहिसलामत बाहेर पडलो होतो, तथापि कोरोनाने जे आर्थिक अराजक निर्माण केले होते, ते न भूतो असे होते. अर्थात हे केवळ आपल्या देशासमोरचे संकट नव्हते तर जागतिक पातळीवरच महाभयानक संकट उभे ठाकले होते, असे असले तरी भारताच्या दृष्टीने हे महाभीषण व महाभयप्रद असे संकट होते. 

या महाभयंकर संकटाची फारशी झळ शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना बसलेली नव्हती. सकल राष्ट्रीय उत्पन्नात १६ टक्के हिस्सा असणारे आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला तारून नेईल, असा विश्वास अनेक अर्थ व कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. आपल्या देशातील आर्थिक विकासासाठी शेती आणि शेतकरी यांचा  महत्वपूर्ण हातभार लागल्याचे दिसून आले आहे.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्था संकटात सापडली, असे चित्र असतांना त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर ही होत होता परंतु लाॅकडाऊनच्या काळात सुध्दा आपल्या देशातील सर्व राज्यांत शेतीची कामे तुलनेने अत्यंत सुरळीत व व्यवस्थित सुरू होती. आगामी काळात देखील शेती क्षेत्राचा विकास दर चांगला राहील आणि शेती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल. असे केंद्र सरकारला तर वाटते आहेच, शिवाय अनेक अर्थतज्ज्ञांचे तसे स्पष्ट मत झाले आहे. कोरोनोच्या संकटाच्या काळात शेतीवर विपरीत परिणाम झाला असला तरी ही २०२०-२१ या आर्थिक वर्षात शेतीचा विकास दर ३ टक्के राहिला आहे, त्यामुळे  अर्थव्यवस्थेच्या विकास दरात भविष्यात ही चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. असे दिसते.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व क्षेत्रांतील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्यामुळे आर्थिक विकासावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.पण अर्थव्यवस्थेला फटका बसला तरी ही त्याचा परिणाम कृषी क्षेत्रातील घटकांवर फारसा बसलेला दिसला नाही.भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा वाटा १६ टक्के आहे आणि देशातील जवळपास ६० टक्के आर्थिक व्यवहार बंद असतांनाही शेती क्षेत्रातील कामे अपवाद वगळता चांगल्या प्रकारे सुरू होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात देशातील कृषी आणि शेतीशी संलग्न असलेल्या क्षेत्रातील विकास दर ३.७ टक्क्यांवर होता. हा विकास दर निश्चितच इतर क्षेत्रांच्या तुलनेत लक्षणीय होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२१-२२ मध्ये अन्नधान्याच्या उत्पादनात दोन टक्के वाढ झाली आहे. सुमारे २९८.३ दशलक्ष टन उत्पादन झाल्यामुळे यंदा ही विकास दर वाढता राहील,असे तज्ज्ञांचे मत आहे. खरीप हंगामात १४९.९२ दशलक्ष टन तर रब्बी हंगामात १४८.४ दशलक्ष टन उत्पादन होईल असा ही विश्र्वास व्यक्त केला जात आहे. पुढच्या हंगामात अन्नधान्य उत्पादनाच्या व्यतिरीक्त तेलबिया आदी पिकांचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व थरातील व्यवहार बंद असल्याने लोकांच्या एकूणच व्यक्तिगत पातळीवर खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली, मात्र त्याचा परिणाम शेती उत्पादनांवर झालेला दिसत नाही. भवितव्यात ही तो होणार नाही.देशात यंदा पर्जन्यमान चांगले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वसाधारण आवश्यक तेवढा पाऊस पडणार असल्याचा ही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितपणे तारुन नेईल, असा विश्वास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे, यावरून शेती आणि शेतकरी हेच आपल्या कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तथापि मायबाप सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे व त्यांच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत अत्यंत सहानुभूतीने व सौहार्दाने लक्ष दिले पाहिजे.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील करवीर काशी साप्ताहिकाचे संपादक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget