Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांची आर्थिक वर्तणूक


ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा नियम आहे. 

संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत.


जफर आदमी उसको न जानीएगा

हो वो कितना ही साहेबे फहम व जका

जिसे ऐश में यादे खुदा न रही 

जिसे तैश में खौफ-ए-खुदा न रहा

आजकाल ’’मानवी गरजां’’मध्ये लोकांच्या ’इच्छा-आकांक्षा’ ही सामील झाल्याने लोकांचे आर्थिक वर्तन बिघडले आहे. यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या असून, अनेक लोकांना अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा जणू मॅनिआच झालेला आहे. त्यामुळे बाजारात कृत्रिम मागणी वाढते आहे. रात्रंदिवस जाहिरातींचा मारा करून अशी मागणी सातत्याने वाढत राहील, याची काळजी कार्पोरेट जगताकडून घेतली जात असल्यामुळे आदर्श आर्थिक वर्तन कसे असावे, यावर विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

संपत्ती गोळा करण्याची इच्छा 

मुफलिसी हिस-ए-लताफत को मिटा देती है

भूक आदाब के सांचे में ढल नहीं सकती

प्रत्येक माणसाला संपत्ती गोळा करण्याची नैसर्गिक इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो. त्यातून प्राप्त केेलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यासाठी तो स्वतंत्र असतो. यातूनच माणसाचे आर्थिक वर्तन ठरत असते. मात्र वर म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात, ’’गरज’’ या शब्दात चंगळवादी इच्छा आकांक्षांची सरमिसळ झाल्यामुळे बाजाराचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित सातत्याने बिघडत आहे. श्रीमंत माणसे वाट्टेल ती किंमत देऊन त्यांच्या मनाला येईल त्या वस्तू मग गरज असो की नसो खरेदी करत असतात. त्यामुळे गरजेच्या अनेक वस्तू विनाकारण महाग होत जातात. याचा परिणाम कमी उत्पन्न गटातील लोकांवर होतो. त्यांच्यापर्यंत त्या वस्तूही पोहोचणे दुरापास्त होवून जातात ज्या जीवनावश्यक असतात. जी गत वस्तूंची तीच गत अत्यावश्यक सेवांची. उदा. शिक्षण किंवा आरोग्य सेवा. संपत्ती कमावण्यावर कुठलेही नैतिक बंधन नसल्याकारणाने व कायदेशीर बंधन झुगारण्याजोगे असल्याकारणाने अनेक लोक भ्रष्ट मार्गाने अमाप संपत्ती कमावतात व त्यातून दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा खरेदी करतात. साहजिकच मग या दोन्ही जीवनावश्यक सेवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या हाताबाहेर जातात आणि ’आहे-रे’ आणि ’नाही-रे’ या दोन सामाजिक गटातील दरी अधिकाधिक रूंद होत जाते. 

भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या विषमतेवर उपाय नाही. म्हणूनच जगात दिवसागणिक विषमता वाढत आहे. श्रीमंतांची डोळे दिपवणारी आर्थिक वर्तणूक पाहून गरीबांची मानसिक स्थिती  बिघडत आहे. त्यातूनच गुन्हेगारीचा जन्म होत आहे. म्हणूनच आज संघटितरित्या केली जाणारी गुन्हेगारी आधुनिक जगाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. ’गन कल्चर’ वाढत आहे. माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जात आहेत. नैतिकता रसातळाला जाऊन पोहोचली आहे. अमाप संपत्तीतून राजकीय पदे व प्रसंगी न्याय खरेदी करून स्वतःला मजबूत करण्यात श्रीमंतांना यश मिळत असल्याने लायक परंतु गरीब लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. 

आर्थिक वर्तणुकीचे इस्लामी नियम

भूक में इश्क की तहेजीब भी मिट जाती है

चाँद आकाश में थाली की तरह लगता है

नवश्रीमंतांच्या चमकदार चंगळवादी जीवन शैलीपासून  नैसर्गिकरित्या गरीबांना इर्ष्या होत असते. त्या इर्षेतून जागतिक स्तरावर गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक वर्तन बिघडल्या कारणाने सर्वत्र आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झालेले आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये यावर उपाय नाही. उलट हे आर्थिक वर्तन बिघडण्यासाठी हीच व्यवस्था कारणीभूत असल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. माणसाची आर्थिक वर्तणूक नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक व्यवस्था कुरआनमध्ये दिलेली आहे. परंतु  हा एवढा दुर्लक्षित विषय आहे की, बहुसंख्य मुस्लिम लोकांमध्ये  सुद्धा यासंबंधीची पुरेशी जागरूकता नाही. 

कुरआनच्या शिकवणींचा सार असा आहे की, पृथ्वीच नव्हे तर सर्व सौर मंडलाचा मालक ईश्वर आहे. त्यातील सर्व संपत्तीचा मालक ईश्वर आहे. माणसं जन्माला येतात आणि आपल्या ईश्वरदत्त कौशल्यातून त्या ईश्वरीय संपत्तीचा काही भाग हस्तगत करतात त्याचा वापर करतात व सर्व संपत्ती येथेच ठेवून मरून जातात. कुरआनने माणसाच्या संपत्ती कमावण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत व खर्च करण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत. हे प्रतिबंध, ’’हलाल आणि हराम’’ या सज्ञेच्या माध्यमातून जगाला परिचित आहेत. कुरआनमध्ये हराम गोष्टी कोणत्या आहेत याची यादीच दिलेली आहे. त्या वगळता बाकी सर्व गोष्टी हलाल आहेत. इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा हा पहिला नियम आहे. कुरआनमध्ये असे म्हटलेले आहे की, ’’आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले आणि तुमच्यासाठी तेथे जीवनसामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता.’’  (सुरे आराफ : आ.क्र.10)

या आयातीच्या शब्दरचनेवर गांभीर्याने विचार केला असता खालील गोष्टींचा बोध होतो. यात सुरूवातीलाच ईश्वराने मानवाला संबोधित करत म्हटलेले आहे की, आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले. याचा अर्थ मूळ अधिकार माणसाचे नसून ते ईश्वराने प्रदान केलेले आहेत. स्पष्ट आहे मुळात अधिकार ज्याने प्रदान केलेले आहेत त्याच्याच मर्जीप्रमाणे त्या अधिकारांचा वापर केला जावा. तसा तो केला जात नसेल तर यात माणसाचा कृतघ्नपणा दिसून येतो. म्हणून आयातीच्या दूसऱ्या भागामध्ये ईश्वर म्हणतो की आम्ही तुम्हाला अधिकार दिले पण तुम्ही लोक माझ्याप्रती कमी कृतज्ञ आहात. म्हणजे या ठिकाणी ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. फार महत्त्वाचे मत नोंदवितात ते खालीलप्रमाणे,

’’ इन्सान को दुनिया में जिंदगी बसर करने के लिए जिस हिदायत व रहेनुमाई की जरूरत है, अपनी और कायनात की हकीकत और अपने वजूद की गर्ज व गायत समझने के लिए जो इल्म उसे दरकार है, और अपने अख्लाक (चांगल्या सवयी), तहेजीब (सभ्यता), मुआशरत (सामाजिक) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिए जिन उसूलों का वो मोहताज है, उन सबके लिए उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहेनुमा तस्लीम करना चाहिए और सिर्फ उसी हिदायत की पैरवी (अनुसरण) इख्तीयार करनी चाहिए जो अल्लाहने अपने रसूलों के जरीये से भेजी है. अल्लाह को छोडकर किसी दूसरे रहेनुमा की तरफ हिदायत के लिए रूजू करना और अपने आपको उसके रहेनुमाई के हवाले कर देना इन्सान के लिए बुनियादी तौर पर एक गलत तरीकेकार है. जिस का नतीजा हमेशा तबाही के सूरत में निकला है और हमेशा तबाही की सूरत ही में निकलेगा.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन : खंड 2, पान क्र . 7, अनुच्छेद क्र. 4).

या आयातीचा अर्थ असाही घेतला जाऊ शकतो की, जीवन जगण्यासाठी ईश्वराने मानवाला जे अधिकार आणि वस्तू प्रदान केलेले आहेत ही त्याची केवळ, ’’कृपा’’ आहे. म्हणून त्यांचा वापर आवश्यक तेवढा व न्याय पद्धतीने करावा, असे केल्यास कोणालाच कधीही कसल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. परंतु भ्रष्ट पद्धतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी जी पद्धत जागतिक स्तरावर रूढ झालेली आहे व भांडवलशाही ने त्या पद्धतीला वैधता प्रदान केेलेली आहे त्यातून माणसाचे आर्थिक वर्तन बिघडले असून, त्याची शिक्षा माणसाला या जीवनातही मिळणार व मरणोपरांतही मिळणाार एवढे नक्की. चुकीच्या सामाजिक आणि आर्थिक वर्तनातून जगामध्ये जी अव्यवस्था माजलेली आहे त्यामुळे, ’’नाही रे ची’’ जी हानी होत आहे तिची भरपाई संसाधनांचा दुरूपयोग करणाऱ्यांनाच करावी लागणार आहे. म्हणूनच आपण पाहतो भ्रष्ट मार्गाने अनेकजण गडगंज संपत्ती कमवूनही समाधानी व आरोग्यदायी जीवन जगताना दिसून येत नाहीत. उलट मृत्यूपरांत जीवनामध्ये सुद्धा त्यांना ईश्वरासमोर खजील व्हावे लागेल. तो त्रास वेगळाच. कारण ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा दूसरा नियम आहे. न्याय एक असा ईश्वरी गुण आहे ज्याला माणसाच्या प्रवृत्तीमध्येच ईश्वराने सामील केलेले आहे. म्हणूनच माणसाला न्याय आवडतो व अन्यायाची चीड येते. यावरूनच वाचकांच्या लक्षात एक गोष्ट येईल की जगात चुकीचे आर्थिक व सामाजिक वर्तन करून ज्यांनी संपत्तीच्या बळावर येथून कशीबशी सुटका जरी करून घेतली तरी मरणोपरांत त्यांची गाठ ईश्वराशी आहे, हे सत्य कोणालाच नाकारता येण्यासारखे नाही. कारण जीवनापेक्षा जास्त शास्वत सत्य मृत्यू आहे.

आर्थिक वर्तणुकीचा तीसरा सिद्धांत वैध मार्गाने संपत्ती कमाविणे आहे. हे प्रत्येकावर फर्ज (अनिवार्य) आहे. त्यामुळे योग्यता असूनही जर कोणी वैध मार्गाने काम न करता निरूद्देश जीवन जगत असेल तर तो ही ईश्वराच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि आपल्या, ’’योग्यते’’चा दुरूपयोग करून भ्रष्ट पद्धतीने जीवन जगत असेल तर तो ही गुन्हेगार आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’ मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.’’ (सुरे जुमआ : आयत नं. 10) 

या ईश्वरीय आदेशातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक अजानची आवाज झाल्याबरोबर मुस्लिमांनी आपल्या सर्व व्यावसायिक गतीविधी तात्काळ थांबवायला हव्यात व नमाजसाठी मस्जिदीकडे जावयास हवे. याचा अर्थ व्यावसाय करणे आवश्यक आहे मात्र नमाज सोडून व्यावसाय करणे प्रतिबंधित आहे. जरी यात शुक्रवारचया नमाजाचा विशेष उल्लेख आहे तरी अजान होताच व्यवसाय थांबविण्याचा हा आदेश सर्वच नमाजांसाठी लागू असल्याचे मत इस्लामी विद्वानांचे आहे. हा आर्थिक गतीविधींचा चौथा सिद्धांत आहे. आपल्या कुवतीप्रमाणे संपत्ती गोळा करण्यासाठी काम धंदा करणे, व्यावसाय करणे हे प्रत्येकावर अनिवार्य करण्यात आले आहे. याचा दूसरा अर्थ असा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा त्याग करणे (संन्यास घेणे) हराम आहे. तसेच जीवनावश्यक संसाधने गोळा करण्यामध्ये कुचराई करणे हे सुद्धा ईश्वराला नापसंत आहे. म्हणून मुस्लिमांमधील एक वर्ग जो जीवनावश्यक आर्थिक गतिविधींपेक्षा धार्मिक गतिविधींनाच अधिक महत्त्व देतो. त्याचे वर्तनही या आयातीमध्ये नमूद ईश्वरीय आदेशाविरूद्ध आहे. थोडक्यात माणसाची आर्थिक वर्तणूक ही संतुलित असावी. आर्थिक संसाधने गोळा करताना ईश्वर आणि त्याच्या आदेशांची हर हाल जपणूक केली जावी. संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत. हा इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा पाचवा नियम आहे. थोडक्यात आर्थिक वर्तणुकीच्या ईश्वरीय नियमांचा परिचय देशबंधू तसेच बिगर इस्लामी जगाला करून देण्याची मुख्य जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे. दुर्दैवाने मुस्लिम समाजातील बहुतेकांचे स्वतःचेच आर्थिक वर्तन या नियमांउलट असल्याने एवढ्या सुंदर व्यवस्थेचा परिचय आज जगाला नाही. म्हणून ही योग्य वेळ आहे, आता मुस्लिमांनी आपल्या वर्तनात सुधारणा करून ईश्वराला अपेक्षित आर्थिक वर्तणुकीच्या नियमांचा सर्वांना परिचय करून द्यावा. त्याशिवाय, आर्थिक शिस्त राखली जाणार नाही व आर्थिक शोषण कमी होणार नाही. पर्यायाने ’नाही रे’ गटातील शोषण असेच सुरू राहील. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आमचे आर्थिक धोरण तुला आवडत असलेल्या नियमांप्रमाणे सुधारण्याची व जगाला त्याचा परिचय करून देण्याची संधी व शक्ती प्रदान कर.’ आमीन. 


- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget