Halloween Costume ideas 2015
April 2021

american army

एकविसाव्या शतकाची सुरुवात होताच जागतिक व्यापार केंद्र आणि पेंटागॉनवर ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे काही तासांतच अफगाणिस्तानचा अल कायदा गट ही कारवाई करण्यात गुंतलेला असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या, मात्र या हल्ल्यांबाबत विविध विरोधाभास असले, तरी कार्पोरेट प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याचाच परिपाक म्हणून अवघ्या काही महिन्यांतच तब्बल ९७ हजार अमेरिकी सैनिक अफगाण भूमीवर जमीन आणि हवाई मार्गाने तेथे उतरले. सोबतीला तब्बल इतर ३० देशांचेदेखील सैनिक अमेरिकेच्या मदतीला तेथे धावून आले. या काळात अफगाणिस्तानात विविध निवडून आलेली सरकारे स्थापन करून बरखास्त करण्यात आली होती, पण तेव्हापासून अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांनी अफगाणिस्तान सोडण्याच नाव घेतले नाही.

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची चर्चा अनेकदा होत असे, पण प्रत्येक वेळी काही अडचण किंवा अडथळे आले होते. गेल्या वर्षी अमेरिकन प्रशासन आणि तालिबान यांच्यातही चर्चा झाली होती आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याची माघार स्वीकारली होती, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा बिडेन यांनी पराभव केला होता. त्यानंतर यावर्षी २० जानेवारीला जो बिडेन यांचा शपथविधी सोहळा पूर्ण होताच आणि त्यांनी अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्य मागे घेण्याबाबत विविध तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता होती. किंबहुना, गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नाही, याचे मुख्य कारण म्हणजे विविध देशांमध्ये तैनात असलेल्या लष्करावर प्रचंड खर्च झाला आहे. त्यावर जगभर उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे. वास्तविक हा निर्णय बायडेन यांचा एकटय़ाचा नव्हे किंवा तो त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचादेखील नव्हे! मागील वर्षी दोहा (कतार) येथे अमेरिकेच्या पुढाकाराने घेतल्या गेलेल्या शिखर परिषदेत तेव्हाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘१ मे २०२१ रोजी आम्ही अमेरिकी सैन्य माघारी घ्यायला सुरुवात करू’ हे कराराद्वारे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता आता बायडेन यांनी करण्याचे ठरवले आहे. सरासरी जगातील दहापैकी नऊ संरक्षणतज्ज्ञांनी बायडेन यांच्या सैन्यमाघारीच्या घोषणेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलेली असून, २००१ मध्ये अफगाणिस्तानची जी अवस्था होती तीच अवस्था सैन्यमाघारीनंतर होऊन तो देश पुन्हा अनिश्चिततेकडे जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

१९८० च्या दशकात रशिया बलवान होता, सोवियेत युनियन शिल्लक होते. अमेरिका येवढा एकच देश सोवियेत युनियनचा प्रतिस्पर्धी होता. आता सोवियेत युनियन नसली तरी पुतीन दंडातल्या बेडकुळ्या दाखवतो आहे. आणि चीन हा एक नवा देश मैदानात उतरला आहे. खरे म्हणजे चीन हा जगातला एक नंबरचा सुपर पॉवर होऊ घातला आहे. चीनने पाकिस्तानात पाय पसरले आहेतच. अफगाणिस्तान हाती आला तर सोन्याहून पिवळे अशी चीनची धारणा आहे. न थिजणाऱ्या बंदरांत तेल पोचवण्याची तेलसमृद्ध देशांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना अफगाणिस्तान ताब्यात हवे आहे. त्यासाठीच तर रशिया आणि नंतर अमेरिकेने अफगाणिस्तान ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने तो सगळा खेळ १९८० नंतर च्या वादळी वातावरणात फसला होता.

अफगाणिस्तानात असलेले उर्वरीत २५००-३५०० अमेरिकन सैनिक ११ सप्टेंबरपर्यंत परत येतील, अशी घोषणा करत सरतेशेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १३ एप्रिल २०२१ रोजी अफगाणिस्तानला “खुदा हाफीज” म्हटले आहे. ब्रिटननेही त्यांच्या उर्वरीत ७५० सैनिकांना मायदेशी परत बोलावले आहे. वीस वर्षांपर्यंत अमेरिकेच्या सैन्याला मोठी किंमत यासाठी मोजावी लागली. पैसे आणि आयुष्य अशा दोन्ही स्वरूपात. या युद्धात अमेरिकेने २४५० सैनिकांचे बलिदान दिले. सोबतच अमेरिकेने या युद्धावर २ ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे १५० लाख कोटी रुपये खर्च केला. तसेच 20,७०० हून अधिक सैनिक जखमी झाले. त्याशिवाय, ब्रिटनच्या ४५० सैनिकांसह इतर देशांचे शेकडो सैनिकही मृत्युमुखी पडले, जखमी झाले. मात्र, सर्वात जास्त नुकसान अफगाणी सैनिकांचंच झाला. त्यांचे ६० हजारांहून अधिक सुरक्षारक्षक यादरम्यान मृत्युमुखी पडले आणि या संख्येच्या दुप्पट नागरिकांचा जीव गेला. अॅक्शन ऑन आर्म्ड फोर्सेस व्हॉयलन्स या संशोधन गटानुसार, २०२० साली जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत स्फोटकांमध्ये मारले गेलेले सर्वाधिक लोक अफगाणिस्तानातील आहेत. अमेरिकेतील डेमोक्रेट व रिपब्लिकन या दोन्ही मुख्य राजकीय पक्षांच्या दृष्टीने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यावर फारसे मतभेद नाहीत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने कोणत्याही युद्धात म्हणावी तशी बाजी मारली नाही, उलट करार करून सन्मानपूर्वक बाहेर पडणे पसंत केले.

वास्तविक १९७९ साली तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने काही महिन्यांच्या आत अफगाण पादाक्रांत केला होता. त्या रशियन सैन्याला तेथून हटविण्यासाठी म्हणून अमेरिकेनेच अफगाण मुजाहिदीन या संघटनेला प्रथम जन्माला घातले, पोसले आणि सर्वतोपरी प्रशिक्षित करून रशियाविरुद्ध लढण्यास उद्युक्तदेखील केले. त्याव्यतिरिक्त खुद्द ‘अल्-कायदा’ ही दहशतवादी अमेरिकेच्या छुप्या आशीर्वादाने कशी फोफावत गेली, हा इतिहास सर्व जगाला ज्ञात आहे.

आजच्या घडीला दोहातील शांती वार्ता आणि सैन्यांच्या परतण्यानंतर तालिबान पूर्ण देशात निर्णायक भूमिका निभावण्यासाठी तयार आहेत. असं असूनही ब्रिटनचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल सर निक निक्टर म्हणतात की, आंतरराष्ट्रीय समूहाने एका सभ्य समाजाची निर्मिती केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, "अफगाणिस्तान २००१ च्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे आणि तालिबान अधिक मुक्त विचारांचे झाले आहे." मात्र ज्या देशाला या पाश्चिमात्य देशांच्या फौजा सोडून जात आहेत, त्या देशाची स्थिती सध्या सुरक्षित नाही. या देशांच्या फौजा 2 दशके तिथेच राहातील असे अनुमान काही लोकांनी ९/११ च्या नंतर लगेचच वर्तवले होते. शांतता चर्चेत तालिबानने कोणताही मोठा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तालिबानने दोहामध्ये झालेल्या चर्चेत अमेरिकेच्या सैन्य माघारीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला. वॉशिंग्टन पोस्टनेही बायडन यांचा सैन्य माघारीचा निर्णय अफगाणिस्तान व शेजारच्या देशांसाठी घातक ठरू शकतो. अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा सर्वात सोपा मार्ग बायडन यांनी निवडला असला तरी त्याचे परिणाम घातक असू शकतात, असेही वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स' व 'वॉल स्ट्रीट जर्नल'नेदेखील असाच सूर लावला आहे. अफगाणिस्तानात ३२५ जिल्हे असून त्यांपैकी ७६ जिल्हे हे तालिबान्यांच्या ताब्यात असून सरकारी फौजांच्या ताब्यात १२७ जिल्हे, तर उरलेले जिल्हे हे तालिबान्यांच्याच २२ विविध टोळ्यांत विभागले गेलेले आहेत. त्यातच अमेरिकेच्या मदतीने अफगाण सैन्याला प्रशिक्षित करण्यात आले असले, तरी त्यांच्या हवाई दलातील वैमानिक आणि त्यातील योद्धे हे मात्र कार्यक्षमतेत कमी पडतात असे मानले जाते.

वास्तविक १९७९ साली तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने काही महिन्यांच्या आत अफगाण पादाक्रांत केला होता. त्या रशियन सैन्याला तेथून हटविण्यासाठी म्हणून अमेरिकेनेच अफगाण मुजाहिदीन या संघटनेला प्रथम जन्माला घातले, पोसले आणि सर्वतोपरी प्रशिक्षित करून रशियाविरुद्ध लढण्यास उद्युक्तदेखील केले. त्याव्यतिरिक्त खुद्द ‘अल्-कायदा’ ही दहशतवादी अमेरिकेच्या छुप्या आशीर्वादाने कशी फोफावत गेली, हा इतिहास सर्व जगाला ज्ञात आहे.

काही वर्षांपासून चीन जसा एक प्रमुख आर्थिक शक्ती बनत चालला आहे आणि जगात आपले वर्चस्व वाढवत आहे आणि दुसरीकडे अमेरिकेतील अर्थकारणाला आता कोणत्याही चांगल्या परिस्थितीत दिसत नाहीत, कारण गेल्या वर्षी अमेरिकेत वांशिक दंगली झाल्या आणि जानेवारीत बिडेन यांच्या शपथविधी समारंभाच्या सुमारे दोन आठवडे आधी अमेरिकेतील कॅपिटॉल हिल येथे ट्रम्प समर्थकांनी आंदोलन केले. या सर्व परिस्थितींच्या अभ्यासातून असे दिसून येते की अमेरिकेला स्वत:च्या देशात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे? या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी बराच वेळ लागतो, हे अमेरिकेच्या जनतेला आणि प्रशासनाला समजते. कदाचित म्हणूनच गेल्या काही वर्षांत अमेरिकन लोकांमध्ये खूप चिंता निर्माण झाली आहे आणि आता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनाही कुठेतरी असे वाटत आहे की, अफगाणिस्तान, इराक इत्यादी जगातील विविध देशांमध्ये अमेरिकेने उघडलेल्या आघाड्यांमुळे ते आपल्या देशाच्या अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

अहमद शाह अब्दाली दुर-ए-दुर्राणीने १८व्या शतकात अफ़गाणिस्तानच्या आपापसात भांडणाऱ्या पश्तुन टोळ्यांना एकत्र आणून पहिल्यांदाच एकसंध अफ़गाणची कल्पना या टोळीवाल्यांच्या मनात जागवली. तेव्हापासून आजतागायतचा इतिहास पाहिला तर कोणतीही केंद्रीय सत्ता केवळ नामधारीच राहिली आहे. दुर्गम भूप्रदेश, स्वयंपूर्ण खेडी, मध्ययुगीन मानसिकतेत टोळ्यांनी जगण्याची जीवनपद्धती यामुळे आधुनिक काळातही अफ़गाण देश भौगोलिक सीमांनी अस्तित्वात असला तरीही राष्ट्र म्हणून कधीही एक होऊ शकला नाही. इराण-ब्रिटिश-सोव्हिएत रशिया यासारख्या एकाहून एक प्रबळ साम्राज्यांना पुरून उरलेला अफ़गाण ‘साम्राज्यांचे कब्रस्तान’ या टोपण नावाने ओळखला जातो. शीतयुद्धच्या काळात सोव्हिएत रशियाच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेनेच उभे केलेले मुजाहिद्दीन पुढे तालिबानच्या रूपात राज्यकर्ते बनले. तेव्हाही १९९६ ते २००१, केंद्रात असलेली तालिबानी सत्ता काबूल, कंदहार, हेरातसारख्या शहरी भागांपुरती मर्यादित होती. गावखेड्यात तालिबानचा काही अंशी शिरकाव झाला असला तरीही स्थानिक टोळीप्रमुखांचेच प्राबल्य होते. ९/११रोजी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला व्हायच्या दिवशीच काही वेळापूर्वी अहमद शाह मसूद तालिबानी हल्ल्यात मारला गेला. अमेरिकेने तालिबानची केंद्रीय सत्ता उखडून टाकल्यानंतर अहमद शाह मसूदला सहिष्णू इस्लाम, लोकशाही आणि अनेक आधुनिकतेकडे झुकणाऱ्या मूल्यांचा पुरस्कर्ता म्हणून मरणोत्तर राष्ट्रीय आदर्शच्या रूपात उभे केले गेले. 

काही ट्रिलियन डॉलर्स प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष युद्धावर खर्च होऊनसुद्धा आणि तालिबानमधील बडे नेते व अल-कायदाचा म्होरक्या लादेन मारला गेला असतांनाही अमेरिकेला तालिबान्यांचा पुरता बिमोड करता आलेला नाही. आज पुन्हा जवळपास ७०%हून अधिक भागावर तालिबान्यांचा एकतर कब्जा आहे किंवा मग सरकारसोबत सशस्त्र सत्तासंघर्ष सुरू आहे, तेही अमेरिका आणि नाटोचे सैन्य तिथे असताना. केवळ नेतृत्व संपून युद्ध संपणार नाही आणि तालिबान हा नाकारता न येणारा घटक आहे हे ध्यानात आल्यानेच नाईलाजास्तव अमेरिकेला त्यांची चर्चेसाठी मनधरणी करावी लागली. अफ़गाणिस्तानात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्या अमेरिका व नाटोइतर देशांमध्ये भारत, पाकिस्तान, इराण आणि चीन हे प्रमुख देश आहेत. भारताने अफ़गाणिस्तानमध्ये आजवर केलेली गुंतवणूक काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तिथली संसद भारताने सदिच्छा भेट म्हणून बांधून दिली आहे. हेरात प्रांतात उभारलेलं ‘सलमा’ धरण भारत-अफ़गाणिस्तान मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. शिक्षण, आरोग्य इत्यादी अनेक मानवतावादी कामांसाठी भारत अफ़गाणिस्तानात कार्यरत आहे. पण त्याच सोबत २८५ सैनिकी वापरासाठीची वाहने, एमआय-२५ आणि ३५ सारखी लढाऊ हेलिकॉप्टर भारताने अफ़गाणिस्तान सैन्याला सहकार्य म्हणून दिली आहेत. मात्र इतकी वर्षे अफ़गाणिस्तानकडे दुर्लक्ष करणारा चीन तिथे हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. मेस ऐनकमधील तांब्याच्या खाणीचं कंत्राट, अमु दरियामधील तेल उत्खननाचे कंत्राट इत्यादी रूपाने प्रचंड चिनी गुंतवणूक अफ़गाणिस्तानमध्ये होणार आहे. चीन-इराणला जोडणारी रेल्वे आता अफ़गाणिस्तानातून जाणार आहे.

अमेरिकेच्या दबावापोटी जागतिक व्यापारी निर्बंधांना तोंड देणाऱ्या इराणशी खुलेआम व्यापार करायचं धाडस दाखविणाऱ्या चीनला आणि इराणला जोडणारी ही रेल्वे सामरिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. अफ़गाणिस्तानमध्ये विविध प्रकल्पांच्या नावाखाली पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चीन काही अब्ज डॉलर्स ओतणार आहे. चीनच्या सैनिकी तुकड्या या गुंतवणुकीच्या सुरक्षेचे कारण देऊन लागोपाठ येतीलच. कारण विकसनशील-गरीब देशांना प्रचंड गुंतवणूक आणि कर्जाच्या जाळ्यात अडकवून मिंधं बनवायचं आणि तिथं “गुंतवणुकीच्या सुरक्षे”च्या नावाखाली सैनिकी तळ उभा करायला परवानगी मिळवायची, नागरी वापरासाठी उभारलेल्या आस्थापनांना अलगद ताब्यात घेऊन प्रसंगी सैनिकी कारणांसाठी वापर करण्याहेतूने पावले टाकायची हे चिनी धोरण आता लपून राहिलेलं नाही. अशा अस्थिर परिस्थितीत भारताला अफ़गाणिस्तानातील स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करून भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अफ़गाणिस्तानात पाय रोवून उभे राहणे आवश्यक आहे.

अफगाणिस्तानची तुर्की, कतारसारख्या देशांसोबत परिषद होणार आहे. त्यात तुर्कीची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तुर्की नाटोचाही भागीदार आहे. सद्य:स्थितीत अतिशय शक्तिशाली मानले जाते. तुर्कीच्या भूमिकेवर अफगाणमधील स्थिती स्पष्ट होणार आहे. गृहयुद्धाची शक्यता मात्र कमी आहे. सैन्य मायदेशी गेल्यानंतर अमेरिकेची भूमिका काय असेल यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील. तालिबानने हालचाली केल्यास अमेरिका हवाई हल्ल्यासारखी कारवाई करू शकते. पण त्याचा आशियातील शांततेवर काही परिणाम होणार नाही. संयुक्त राष्ट्रांकडून (UN) मिळालेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रसंघ, तुर्की आणि कतर या महिन्यात अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्या प्रतिनिधींमध्ये एक उच्चस्तरीय आणि सर्वसमावेशक परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेचे उद्दीष्ट न्याय्य व राजकीय तोडगा काढण्यासाठी सध्याच्या अफगाण चर्चेला गती देणे हे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) सांगितले की तुर्की येथे २४ एप्रिल ते ४ मे या कालावधीत ‘अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेवर इस्तंबूल परिषद’ आयोजित करण्यात येईल ज्यामध्ये अफगाणिस्तान व तालिबानचे प्रतिनिधी सहभागी होतील. संयुक्त राष्ट्र संघाने (UN) म्हटले आहे की या परिषदेचे सह-आयोजक हे सार्वभौम, स्वतंत्र आणि अखंड अफगाणिस्तानासाठी वचनबद्ध आहेत.


- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४


ramzan eid

भारत हा गीतांचा, गझलांचा देश आहे. असं म्हटल्यास ते वावगं नाही ठरणार. कारण इथं प्रत्येक घटनेवर, प्रसंगावर गीत, गझला आहेत. मानवी जीवनातील सुख-दुःख लग्न-विघ्न, जन्म-मरण यासारखा कोणताही प्रसंग असो अथवा दिवाळी असो वा होळी. रमजान असो वा श्रावण. प्रत्येक सणावारावर देखील गाणीच गाणी, गझलाच गझला वाचायला, ऐकायला मिळतात ज्या विषयावर काव्यरचना नाही असा विषय शोधूनही नाही सापडणार. इतक्या विपुल प्रमाणात इथं काव्यरचना आढळून येतात. हे खरोखरच आपल्या देशाचं सुरेल वैशिष्ट्य आहे.

रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा पवित्र सण आहे. या सणावर मुस्लीम गझलकारांबरोबरच अन्य धर्मीय गझलकारांनीदेखील गझला लिहून आपल्या चतु:रस्त्र प्रतिभेचा अनोखा अविष्कार घडविलाय्. ही बाब राष्ट्रीय एकात्मता अन् सामाजिक सलोखा वाढीस लागण्याच्या दृष्टीनं नितांत निकडीची आहे.

रमजान महिन्याचं वैशिष्ट्य असं की याच महिन्यात प्रेषित मुहम्मद (स.) यांना त्यांच्या खडतर तपश्चर्येचं फळ मिळालं. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ त्यांच्यावर 'वही' द्वारा उतरून पूर्ण झाला. कुरआन मधील सारे आदेश, आज्ञा अवतीर्ण झाल्या. या महिन्याला पावित्र्य प्राप्त झालं. तीस दिवस निरंक उपवास करून जगन्नियंत्याचं स्मरण, चिंतन, मनन अन् नियमित कुरआनाचं पठण करायचं असतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रमजान हा मन:शांतीचा दिलासा घेऊन येणारा महिना आहे. हा संदेशही प्रेषितांमार्फत देण्यात आला. म्हणूनही रमजानचं महत्त्व अधिक ठळक होतं. मुहम्मद पैगंबरांवर सुरेश भट यांनी गझलेच्या आकृतिबंधात न-आत शरीफ लिहिलीय्.

उजाड वैराण वाळवंटी

खळाळणारा झरा मुहम्मद

जगातल्या दीनदु:खितांचा

अखेरचा आसरा मुहम्मद

रमजान ईद सर्वार्थानं मनोमीलनाचा सण आहे. मित्र असो वा शत्रू असो, जातीचा असो वा परजातीचा असो, ईदच्या आनंदात सर्वांना सामील करून घ्यायचं असतं. सगळ्यांच्या सहभागानंच ईदचा आनंद द्विगुणीत होत असतो. क्रोध अन् द्वेषाला फाटा देऊन गोडीगुलाबीनं प्रत्येकाची गळाभेट घेतल्यानंतर शीरखुर्मा पाजायचा असतो. बंधुप्रेमाची, निखळ स्नेहाची साक्ष देणारी रमजान ईद आपापसात भाईचारा निर्माण करण्याचं काम करते. मानवतेचा दिव्य संदेश देणारी अशी ईद म्हणजे हृदयाहृदयांना जोडणारी जणू दोरी आहे. शुभ अन् कल्याणकारी विचारांना विकसित करणं हाच ईदचा नितळ उद्देश असतो. नेमका हाच भाव प्रकट करणारा शेर एजाज शेख असा लिहितात.

हिंदु, मुस्लीम बौद्ध किंवा शीख, इसाई

जो मला भेटेल त्याची ईद होते

रमजान ईद माणसांच्या अंतरंगाबरोबरच आचार-विचारांचं शुद्धीकरण करून त्यांच्या ठायी चांगुलपणाची, प्रामाणिकपणाची रुजवण करत असते. वाईट कृत्यापासून, वाममार्गापासून, वासनेपासून माणसाला शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना आहे. बंद्यांच्या प्रत्येक कृत्यांवर अल्लाहची करडी नजर असते. अल्लाह बंद्यांच्या कोणत्याही कृतीपासून अनभिज्ञ नाही राहू शकत. तो प्रत्येक गोष्ट जाणून असतो त्यामुळेच तर बंदे अल्लाहची भीती मनात बाळगून सत्याची, भल्यापणाची कास धरतात. यातूनच आयुष्याला विधायक वळण लागतं. समाजात वावरताना दुसऱ्यांविषयी मनात सद्भावना ठेवून सद्व्यवहार करणं, आपल्याकडून न कळतही कोणाची फसगत नाही होणार. आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळं कुणाचं मन  नाही दुखावणार. याची काळजी बंदे घेतात. अशुभ विचारांना दूर ठेवणं म्हणजेच सद्गुणांची जीत असते. दुर्गुणांचा नाश करणं हीच रमजान ईदची शिकवण असते. अशा आशयाची मांडणी संदीप वाकोडे त्यांच्या शेरातून करतात.

अंतरीच्या दुर्गुणांचा नाश करते

सद्गुणांची जीत म्हणजे ईद आहे

रमजानमध्ये मनातील विषविकृती झटकून प्रत्येकांशी माणुसकीनं, सौजन्यानं वागत माणसा-माणसांच्या मनात बंधुत्वाची भावना जागवायची असते. सौजन्यातूनच चैतन्य निर्माण होत असते. प्रेमाची, बंधुत्वाची भावनाच तर सामुदायिक जगण्याचा आधार असतो. भांडण तंटे, बखेडे यातून वैरत्व वाढीस लागते. प्रेमाच्या प्रदेशातूनच शांतीचा मार्ग जात असतो. जिथं संयम दृढ असतो तिथचं शांतता प्रस्थापित होते. अशा ठिकाणीच समृद्धी नांदते. जिव्हाळ्यातून उत्पन्न झालेल्या आनंदाला सीमा नसते. या सगळ्या मूलभूत अन् सामाजिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अंगीकार करूनच रमजान ईदची तयारी करायची असते. शिवाजी जवरे यांचा शेरही या गोष्टीचं स्मरण करून देतो.

बंधुत्व जागवाया सौजन्य वाढवाया

सारे करू तयारी रमजान ईद आली

युक्तीपेक्षा कृतीवर भर असायला हवा, कथणी अन् करणी यामध्ये तफावत असता उपयोगाचं नाही. आपलं बोलणं माणसाला तोलताही आलू पाहिजे. नुसत्या वरपांगी ईदच्या शुभेच्छा देऊन, बोलबच्चन करून भागत नसते. आधी मनाची मस्जिद स्वच्छ करायला हवी. त्यात कुविचारांचा केरकचरा साचता कामा नये. माणसाच्या मनाची मस्जिद तर स्वच्छ असली पाहिजे. त्याचबरोबर ती आबादही ठेवायला हवी. त्यात दुसऱ्यांविषयी दया, करुणा, कणव, परोपकार, माया, प्रेम या उदात्त मूल्यांची गर्दी असायला हवी. दिखावा, दांभिकता, ढोंग या समाजाला पोखरणाऱ्या दुर्गुणांपासून, दूर्वर्तनापासून अलिप्त राहणं गरजेचं आहे. आबादीआबाद हवी असेल तर मनाची पाकिजगी अपरिहार्य ठरते. याकडं अजीज खान पठाण यांचा शेर इशारा करतो.

तू मनाच्या मस्जिदीला पाक कर आबाद कर ना

हो मुबारक ईद इतके बोलण्याने भागते का?

आपल्या प्रियतमेचं आपल्याजवळ असणं, तिचं दिसणं, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना नेहमीच या गोष्टीचं मोठं अप्रूप वाटत आलंय्. ती काही क्षण जरी नजरेआड राहिली तर मनाची अवस्था अगदीच सैरभैर होऊन जाते. एखाद्याविषयी अंत:करणात जिव्हाळा निर्माण झाला की असंच घडत राहतं. मनाची दुनिया अंधाराच्या गर्तेत बुडून जाते. डोळ्यांना काहीच दिसेनासं होतं. मग कशातच रस वाटेनासा होतो. त्याच्यासाठी सगळे क्षण गुमसुम होऊन जातात. तिचं भेटणं तर वेगळीच गोष्ट असते. ती नुसती दिसली तरी ईद  भासते. ईद असल्यासारखाच आनंद होतो. ईद आनंदाचे प्रतीक आहे. तिला पाहणे हाच ईदचा आनंद उत्सव होऊन जातो. अशीच मंदार खरे यांची मनोधारणा आहे. त्या धारणेचा शेर पाहा.

अंधारते तू नसल्यावर

ईद भासते तू दिसल्यावर

जीवनातला स्वार्थीपणा, कद्रूपणा सोडून मनाला विशाल बनविण्याचे महान पर्व म्हणजेच रमजान मास होय. सामाजिक नात्यालाही महत्त्व आहेच. याचा अव्हेर करुन नाही चालत. सामाजिक नातं कोणत्याही परिस्थितीत जपावं लागतं. समाजरूपी नावेला छिद्रं पाडून कसं बरं चालेल. सार्‍या समाजाला त्याचा धोका पोहोचू शकतो. हे नातं सदैव अबाधित ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणं यावरूनच खरा कस लागतो. या मासात नमाज, रोजांनी अल्लाहला तर भजायचं तर असतंच. शिवाय फितरा, जकात, सदका आदी दानधर्म करून हक्कही अदा करायचे असतात. त्याचप्रमाणं ईदच्या दिवशी 'इदगाह' मध्ये जाऊन सामुदायिकरित्या नमाज पठण करायचे असते. धर्मगुरूंचे रमजानची थोरवी विशद करणारे प्रवचन होते. प्रार्थना अन् प्रवचनातून जगाच्या कल्याणासाठी दुवा मागण्यात येते. तसेच अपराध्यांच्या पापमुक्तीसाठी, त्यांच्या मन:शांतीसाठी भावनाविवश होऊन अल्लाहला स्मरून प्रार्थना करण्यात येते. हे देखील ईदचे विशेष लक्षणीय आहे. रज्जाक शेख यांच्या शेतातून याच प्रार्थनेचा निश्चय व्यक्त होतोय.

दे पापमुक्ती, शांती अल्ला या अपराध्यांना

हीच एक प्रार्थना करुया आज ईद आहे

ईदचा आनंददायी सोहळा वर्णनातीत आहे. रमजान ईद सगळ्यांची आहे. यात भेदभावाला मुळीच थारा नाही. भाईचारा हेच तिचं अधिष्ठान आहे. ईदमीलनासारखे उपक्रम याचीच साक्ष देतात. रमजान महिना ईश्वर भक्तीबरोबरच सहिष्णुतेचीही शिकवण देतो. रमजान ईदचं हे महात्म्य त्याचं महत्त्व गझलकारांनी त्यांच्या शेरांतून सांगितलंय्.

- बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३


zakat

ईश्वराने मानवीय समुहाच्या भल्यासाठी सर्व नियमावली आखून दिलेली आहे. तिचे जर तंतोतंत पालन केले गेले तर मानवी समूहाचे जगणे सुसह्य होईल. मात्र असे होताना दिसत नाही. ईश्वराला मानणारा वर्ग मोठा आहे परंतु ईश्वराची न मानणारा वर्ग कितीतरी मोठा आहे. प्रत्येकाला ईश्वरासमोर नतमस्तक व्हायला आवडते परंतु ईश्वराने जी व्यवस्था मानवी समुहाच्या भल्यासाठी आखून दिलेली आहे तिचा अंगीकार करायला लोक तयार नाहीत. त्यामुळे आपल्याला आपत्तीच्या वेळेस ईश्वराची अधिक आठवण येते आणि आपल्याला मदत मिळेनाशी झाली की आपण हताश होतो आणि ईश्वर कुठे आहे, काय करायला आहे, त्याला दिसत नाही एवढे सगळी महामारी आहे, अशे नानातऱ्हेचे प्रश्न विचारून स्वतःच्या बुद्धीचे अविचारी तारे तोडत असतो.

आज कोविड-19 महामारीने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. प्रत्येकजण मरणाची धास्ती घेऊन जगत आहे. थोडाफार खोकला, सर्दी, ताप आला की बेंबीच्या देठापासून दवाखान्याची दारे ठोठावत आहे. येथेही त्याचे समाधान होईनासे झाले आहे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, औषधी सगळेच तोकडे पडत आहे. सामान्यांची बिकट अवस्था तर श्रीमंतांची पैसे असूनही हतबलता पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या जगण्याकडे आणि ईश्वराने घालून दिलेल्या व्यवस्थेबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. ही अवस्था आपल्या चुकीमुळे येवून ठेपली आहे का? की ईश्वराने आपल्यावर लादली आहे? मी जेव्हा याबद्दल विचार करतो तेव्हा मला तर मानवी चूकच दिसून येते. तरीपण ईश्वर आपल्या चुकांना माफ करून आपल्याला सुधारण्याची संधी देत आहे. तेव्हा या संधीचा आपल्याला लाभ उठविता आला पाहिजे. जर आपण यातूनही बोध घेतला नाही तर आपला ऱ्हास अटळ आहे आणि त्याची जबाबदारी स्वतः आपल्यावर आहे. 

मित्रानों! आज आम्ही ’वाईटाचा तिरस्कार आणि चांगल्याचा स्विकार’ करणे विसरलो आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मग ते शासन, प्रशासन असो की आमचं स्वतःच जगणं असो. नैसर्गिक साधन संपत्ती, निसर्गाचे संवर्धन या सर्वांबद्दल आमचं नातं नितीमान पद्धतीने, न्याय भावनाने निभावतो का ते बघावे लागेल. आम्ही आपल्या शासनाची निवड काय बघून करतो, आपले प्रशासन कोणत्या दिशेने जात आहे आणि आम्ही त्याच्याशी कसे नाते जोडत आहोत, आपलं जगणं कसं असलं पाहिजे आणि आपण कसं जगत आहोत. या सर्व बाबींचा विचार केला तर आपल्याला निश्चितच स्वतःची चूक दिसून येईल. ईश्वराने आपली पकड करायचं ठरवलं तर वर्षभरात मानवजात या पृथ्वीवर शिल्लक राहील का नाही, हे सांगणे कठीण आहे. 

तर मित्रानों ! आजच्या लेखात मी आपल्याला ईश्वरीय जकात व्यवस्थेबद्दल माहिती देत आहे. ज्याचे सविस्तर वर्णन कुरआनच्या सुरे तौबा आयत नं. 60 मध्ये केलेले आहे. प्रत्येक ऐपतदार व्यक्तीने जकात काढली तर समाजातील गरीबी दूर तर हटू शकते. शिवाय, आमची सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक प्रगती करू शकतो. आम्हाला कसल्याही आपत्तीत कोणासमोर हात पसरवायची गरज भासणार नाही. या व्यवस्थेतून आम्ही एक शुद्ध समाजाची आणि शुद्ध मनाची निर्मिती करू शकतो एवढं मात्र खरे. 

इस्लामच्या पाच अनिवार्य कार्यांपैकी एक जकात आहे. जकात आपल्या मालाचे शुद्धीकरण करते. जर आम्ही जकात सामुहिकपणे काढली तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम पहायला मिळतात. जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये  द्यावा लागतो. मग एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते.

जकात कोणाला देते येते?

सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे दान तर खऱ्या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता  आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.’’

1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वतःच्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. विशेषतः लॉकडाउनच्या काळात अशा लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देउन या निधीतून त्यांची मदत केली जाउ शकते. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणतः याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.

सध्याचं वर्ष पाहिलं तर कोविड-19 च्या साथीने अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. गोरगरीबांचा जगण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे. अशा परिस्थितीत लोकांना शासकीय मदत मिळणे तर दूर जे नियमानं शासनाने वैद्यकीय सुविधा पुरविल्या पाहिजेत त्यातही शासन कमी पडत आहे.  अशा वेळेस जकातीचा काही निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी खर्च करण्यात यावा. 

जकात एक ईश्वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात. या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5 टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा अनेक सधन मुस्लिम स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही आपल्यासाठी मान उंचावणारी आणि संतोषजनक बाब आहे. मात्र या व्यवस्थेला लागू करण्यासाठी सर्व समाजघटकातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. ही व्यवस्था इस्लामी आहे म्हणून तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्यापेक्षा या व्यवस्थेचा किती मोठा फायदा समाजाला होतो, याचा विचार झाला पाहिजे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की, आपल्या या देशाला समृद्ध करण्यासाठी ईश्वरीय व्यवस्थेचा प्रत्येकाने अंगीकार करून आपलं जगणं सुसह्य करून ऐहिक आणि पारलौकिक जीवन समृद्ध करावं. ईश्वर आम्हा सर्वांना जकात काढून गरजूंच्या सेवेची सद्बुद्धी दे. आमीन.

- बशीर शेख

उपसंपादक


greetings

’’अल्लाह कोणत्याही जनसमुहाच्या स्थितीत परिवर्तन करत नाही जोपर्यंत तो (जनसमूह) स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही.’’ (सुरे अलरात आयत क्र. 11).

केवळ भौतिक प्रगतीने कोणताही जनसमूह महान बणून राहू शकत नाही हे कोविडने अमेरिकेमध्ये सिद्ध केलेले आहे. भारतामध्येही कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थेची जी दानादान उडालेली आहे त्यावरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की, आपणही संतुलित आणि समग्र प्रगती साध्य करू शकलेलो नाही. 

अनितीमान राजकारणी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराने देशाच्या सरकारी वैद्यकीय व्यवस्थेला जर्जर करून टाकलेले आहे. आज सरकारी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटरची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाला हे शोभणारे नाही. भारतीय राजकारण कायम जातीवर टिकून राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले लोक मग ते कोणत्याही जातीचे असो योग्य ठिकाणी नियुक्त न केले गेल्यामुळे देश आज या स्थितीला येऊन पोहोचलेला आहे. शासनाच्या नीति निर्धारणांमध्ये जरी अल्पसंख्यांकांचा फारसा वाटा नसला तरी अशा परिस्थितीत सर्वात मोठा अल्पसंख्यांक जनसमूह म्हणून आपण आपले आत्मपरीक्षण करावे, यासाठी हा लेखन प्रपंच. 

भारतीय मुस्लिम

इस राज को एक मर्दे फिरंगी ने किया फाश

हर चंद के दाना इसे खोला नहीं करते

जम्हूरियत एक तर्जे हुकूमत है के जिसमें 

सरों को गिना करते हैं तोला नहीं करते

भारतात मुस्लिम जनसमुहा एवढा धर्मनिरपेक्ष जनसमुह दुसरा नाही, कारण गेल्या 73 वर्षांपासून मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा बळी देऊन  आपले नेतृत्व बहुसंख्य बांधवांच्या सुपूर्द केलेले आहे. पण एवढे करून पुरेसे नाही, हे आता सिद्ध झालेले आहे. म्हणून मुस्लिमांना आपल्या राजकीय धोरणामध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. देशातील सर्वच संस्था वाईट आहे. राजकारणी भ्रष्ट आहेत, प्रशासन अनितीमान लोकांच्या हातात गेलेले आहे, एकटा मी चांगले वागून काय साध्य होणार आहे? आता असा विचार करून जमणार नाही. आता सकारात्मक विचार करावा लागेल. स्वतःचे लहान-लहान राजकीय पक्ष काढण्यापेक्षा मोठ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करून इस्लामी मुल्याधारित प्रामाणिक राजकारण करावे लागेल. राष्ट्रनिष्ठा जोपासत आपल्या नितीमान आचरणाने पक्षाला प्रभावित करावे लागेल. भ्रष्टाचारापासून जाणीवपूर्वक दूर रहावे लागेल. तेव्हा पक्ष नेतृत्व आपोआप आपण सांगितलेल्या गोष्टी करण्यासाठी विवश होईल. आपण अल्पसंख्यांक आहोत आपल्याला पक्षात कोणी विचारणार नाही, हा विचार चुकीचा आहे. कारण एका दिव्याने हजारो दिवे पेटविता येतात, हे लक्षात ठेवावे लागेल. जरी पक्ष भ्रष्ट असतील, पक्षातील नेते भ्रष्ट असतील तरी त्यांच्यासमोर भ्रष्टाचारमुक्त चारित्र्याचा नमुना ठेवल्यास त्याची दखल पक्षाला घ्यावीच लागेल. कारण ही नैसर्गिक बाब आहे. लक्षात ठेवा मित्रानों ! स्पेनमध्ये भ्रष्ट राजकारण्यांच्या कारभाराला कंटाळून तेथील जनतेने जेव्हा इस्लामी खिलाफतीकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली तेव्हा खलीफाच्या आदेशावरून  ह. तारीक बिन जियाद हे फारसे मोठे लष्कर न घेता स्पेनमध्ये दाखल झाले आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने इस्लामी चारित्र्याच्या बळावर स्पेनची सत्ता हस्तगत केली व मुल्याधिष्ठीत सरकार स्थापन करून तेथील नागरिकांची मने जिंकली. न्याय सर्वांना सहज मिळेल अशी व्यवस्था केली. परिणामी स्पेनमध्ये 800 वर्षापर्यंत मुस्लिमांनी शासन केले. त्या दरम्यान त्या काळी स्पेनने जगात सर्वात जास्त भौतिक प्रगती केली होती. मात्र ती भौतिक प्रगती त्यांच्या कामी आली नाही. जेव्हा त्यांच्यामध्ये इस्लामी चारित्र्याचा सामुहिक ऱ्हास झाला तेव्हा त्यांना रडत- रडत स्पेन सोडावा लागला. 

इतिहासाच्या या दाखल्यावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की, शासन हे भौतिक प्रगती किंवा शक्तीच्या बळावर नव्हे तर नैतिक नेतृत्वाच्या बळावर केले जाऊ शकते. भौतिक प्रगतीच्या बळावर सत्ता ताब्यात ठेवता आली असती तर डोनाल्ड ट्रम्पला सत्तेतून बेदखल व्हावे लागले नसते, कारण त्यांच्या कालावधीत अमेरिकेने बऱ्यापैकी भौतिक प्रगती साध्य केली होती. परंतु नैतिकतेच्या बाबतीत ट्रम्प हे कोणत्याही निकषावर खरे उतरू शकले नाहीत. परिणामी दंडी-मुडपी करून सुद्धा त्यांना सत्तेत राहता आले नाही. जो जनसमूह भूतकाळाकडून बोध घेत नाही वर्तमानकाळ त्याला शिक्षा देतो. 

अडचणी आणि मुस्लिम

तू मर्द-ए-मोमीन है पैगाम अमल दे

उठ और जमाने के मुकद्दर को बदल दे

मुस्लिमांचाचा जेव्हा-जेव्हा बिगर मुस्लिम शक्तींशी सामना झालेला आहे तो त्यांच्यापेक्षा मोठ्या शक्तींंशीच झालेला आहे. अडचणी मुस्लिमांच्या पाचवीला पुंजलेल्या आहेत. आपल्यासमोर भारतीय राज्यघटनेच्या रूपाने किमान एक सुरक्षित कवच तरी उपलब्ध आहे. सातव्या शतकात जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अरबस्थानाच्या भ्रष्ट आणि रानटी जनसमुहासमोर उभे राहिले त्यावेळेस तर कुठलीच घटना अस्तित्वात नव्हती. परंतु आपल्या नैतिक बळाच्या जोरावर त्यांनी अशक्यप्राय असे बदल अरबी जनसमुहामध्ये घडवून आणले. एरवी एखाद्या देशात क्रांती झाली म्हणजे सत्ता बदलते मात्र अरबस्थानामध्ये जेव्हा प्रेषित सल्ल. यांनी क्रांती घडवून आणली तेव्हा केवळ सत्ताच बदलली नाही तर जनसमूह ही बदलले व रानटी अरब सभ्यतेचे आंतरराष्ट्रीय इमाम झाले. 

हा इतिहास बहुसंख्य मुस्लिम विसरलेले आहेत. किंबहुना अनेकांना या तेजस्वी इतिहासाची जाणच नाही. पाश्चात्यमूल्यांचा अंगीकार करतांना ज्याप्रमाणे बहुसंख्य बंधूंनी आपल्या धर्माची नाळ तोडून टाकलेली आहे अगदी त्याचप्रमाणे बहुसंख्य मुस्लिमांनीही धर्मद्रोह करून पाश्चात्य मुल्यांचा स्वीकार केलेला आहे. मुळात या मुल्यांचा अंगीकार करतांना इस्लामी मुल्यांची मुळे तुटणार नाहीत याची काळजी त्यांना घ्यायला हवी होती. ती न घेतली गेल्यामुळे आज 20 कोटी असूनसुद्धा समुद्राच्या बुडबुड्यांसारखी आपली अवस्था झालेली आहे. आकाराने मोठे पण आतून पोकळ. 

सबबी सांगणे हा पुरूषार्थ नाही

आदमी नहीं सुनता आदमी की बातों को

पैकरे अमल बनकर गैब की सदा बन जा

सबबी सांगणे हा पुरूषार्थ नाही. उलपब्ध संसाधनांचा योग्य उपयोग करून प्राप्त परिस्थितीशी मेळ घालून इस्लामी मूल्यांवर आधारित प्रयत्न जोपर्यंत केले जाणार नाहीत तोपर्यंत परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. लक्षात ठेवा मित्रानों ! नैतिक मुल्यांच्या न्यायालयात तटस्थता एक अपराध आहे. तुम्हाला कोणाचा तरी पक्ष घ्यावाच लागणार आहे. एक तर तुम्हाला प्राप्त भ्रष्ट व्यवस्थेमध्ये सामील व्हावे लागेल जसे की आज बहुतेक मुस्लिम सामील झालेले आहेत. किंवा तुम्हाला स्वतःचे मुल्याधारित चारित्र्य दाखवून द्यावे लागेल. तुम्ही प्रेमाची निवड केली नाही तर आपोआप घृणा तुमची निवड करते. जर तुम्हाला स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि प्रेमाच्या बाजूने उभे राहता आले नाही तर सर्व मृतप्राय तर्क देऊनसुद्धा तुम्ही या मुल्यांच्या विरोधी समुहामध्ये सामील व्हाल एवढे नक्की. 

व.पु. काळे म्हणतात, केवळ स्वादिष्ट भोजनाची कल्पना केल्याने पोट भरत नाही. गाडी समोर नारळ फोडल्याने गाडी चालत नाही. क्रोसीन क्रोसीन म्हटल्याने ताप जात नाही. अंधारावर टिका केल्याने अंधार जात नाही. कोणीतरी उठून दिवा लावावा लागतो आणि अंधःकार क्षणार्धात पळून जातो. हा दिवा लावण्याची जबाबदारी भारताचा एक जबाबदार नागरिक समूह म्हणून बहुसंख्यांकांसोबत अल्पसंख्यांकांचीही आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. 

मुस्लिमांची प्रत्यक्ष भूमिका?

मेरी जिंदगी का मक्सद के मैं सबके काम आऊं

मै चरागे रहेगुजर हूं मुझे शौक से जलाओ

जमाअते इस्लामीचे उपाध्यक्ष एस. अमिनुल हसन यांच्या मते ईश्वराने मुस्लिमांचे नशीब या देशाशी जोडले आहे. तुम्हाला उठावे लागेल. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हाच या देशाचे नशीब सुधरू शकेल. तुम्हाला उठावे लागेल. तुम्हाला स्वतःला उत्कृष्ट बनवावे लागेल, मिस्टर एक्सलंट व्हावे लागेल. तुम्हाला या गोष्टींची काळजी करण्याची बिल्कुल आवश्यकता नाही की मीडिया तुमची प्रतीमा कशी तयार करतोय? तुम्हाला इतकं चांगलं वर्तन ठेवावं लागेल की तुम्हाला पाहून लोकांनी म्हणायला पाहिजे की मीडिया खोटं बोलतोय. मुस्लिम तर तसेच नाहीत. तुमचे चारित्र्य, तुमचे वागणे, तुमचे बोलणे, तुमचा व्यवहार, देशबांधवांप्रती तुमची बांधिलकी, प्रेम, दया, करूणा या गोष्टी तुमच्यात आहेत या इतर लोकसमुहांना जाणवायला हव्यात. एका प्ल्युरल सोसायटी (संयुक्त समाज) मध्ये राहण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.’’

या संदर्भात कुरआनचे मार्गदर्शन 

हमने सीखा है अजाने सहर से ये उसूल 

लोग ख्वाबीदा सही हमने सदा देनी है. 

एस. अमिनुल हसन यांच्या अपेक्षेला सार्थ करण्यासाठी मुस्लिमांना सर्वप्रथम जे काम करावे लागेल ते म्हणजे कुरआनच्या मार्गदर्शनाला समजून घ्यावे लागेल. कुरआन म्हणतो की, ’’अल्लाह कोणत्याही जनसमुहाच्या स्थितीत परिवर्तन करत नाही जोपर्यंत तो (जनसमूह) स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही.’’ (सुरे अलरात आयत क्र. 11). 

कुरआनच्या या आयातीवरून एक बोध हा मिळतो की, सर्व प्रथम आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याचा निश्चय करावा लागेल. आपल्याशी होणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराला विसरून न्यायपूर्ण व्यवहार करावा लागेल. तसे करतांना जी हानी सोसावी लागणार आहे ती सोसावी लागेल. आपल्याला सर्वोत्तम व्यवहार करावा लागेल. प्रसिद्ध तुर्की सुफी संत ताब्दुक अ‍ॅम्रे म्हणतात की, ’’ईश्वराने आपल्याला प्रयत्नांच्या हवाली केलेले आहे.’’ याचा अर्थ प्रयत्न चांगले असतील तर परिणाम चांगले येतील प्रयत्न वाईट असतील तर परिणाम वाईट येतील. आज जाणून बुजून चांगले प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हे आता आपल्याला ओळखावे लागेल. 

कुरआनमध्ये एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल.! भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. (मग) तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते तो तुमचा जीवलग मित्र बनलेला आहे.’’ (सुरे हामीम सज्दा आयत नं. 34)

या आयातीतून मुस्लिमांना एका गोष्टीची स्पष्ट जाणीव करून देण्यात आलेली आहे की, आपल्याशी इतरांचे व्यवहार कसेही असो, आपल्याला सर्वोत्तम असेच व्यवहार करावे लागतील. 

अलिकडच्या काळात मुस्लिमांनी कोरोना काळात सर्व भेद विसरून बहुसंख्य समाजाची जी मदत केली विशेषतः मृत हिंदू बांधवांच्या पार्थिवावर ज्या धाडसाने मुस्लिम तरूणांनी त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून एक अत्यंत चांगले उदाहरण देशासमोर ठेवले आहे. अशीच अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या बहुसंख्य बांधवांच्या पुढे ठेवावे लागतील. तेव्हा कुठे जातीयतेचे विष हळूहळू उतरेल. स्वातंत्र्यानंतर नवखालीमध्ये लगेच सुरू झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या दरम्यान एक हिंदू व्यक्ती महात्मा गांधीकडे आली आणि तिने सांगितले की, तिचा एक लहान मुलगा मुस्लिमांच्या हिंसक जमावाने मारून टाकलेला आहे. तेव्हा मला एका मुस्लिम मुलाला मारण्याची परवानगी द्या. तेव्हा महात्मा गांधींनी सांगितले की, ’’असा बदला घेतल्याने तुला समाधान मिळणार नाही. तू एक काम कर अशा मुस्लिम मुलाला दत्तक घे ज्याच्या पित्याला प्रक्षोभक हिंदू समुहाने मारून टाकले आहे’’ 

एवढा उदात्त विचार जोपर्यंत समाजामध्ये रूजणार नाही देश महासत्ता होणार नाही कारण पुन्हा सांगतो केवळ भौतिक प्रगतीने कोणताही देश महान होत नाही. नैतिक आणि भौतिक दोन्ही प्रगतीची सांगड घालून जो जनसमूह प्रगती करतो शेवटी तोच यशस्वी होतो. त्यालाच खरी प्रगती म्हणतात आणि तोच जनसमूह महासत्ता होण्याच्या लायकीचा असतो. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’हे अल्लाह! भारतीय संयुक्त समाजात राहण्याचे इस्लामी शिष्टाचार जोपासण्याची आम्हाला जाणीव आणि शक्ती दे.’’ आमीन. 

- एम.आय.शेख


vaccination

कोरोना संसर्गाच्या त्सुनामीमुळे जग तब्बल एका शतकानंतर महासाथीचा पुन्हा अनुभव घेत आहे. हा अनुभव जगाला अनेक अंगांनी विद्ध करणारा आणि काही बाबतींत समृद्ध करणाराही आहे. यापूर्वी बरोबर 102 वर्षापूर्वी जग ‘स्पॅनिश फ्लू’च्या महासाथीला सामोरे गेले होते. या दोनही साथींमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. या दोनही साथी विषाणूजन्य, म्हणजे व्हायरसमुळे होणाऱ्या आणि श्वसनसंस्थेतून बाहेर पडणाऱ्या द्रावांना चिकटलेल्या विषाणुंमुळे, ड्रॉपलेटट ट्रान्समिशनमुळे पसरणाऱ्या आहेत.

पहिली साथ, पाच एक कोटी लोकांचा बळी घेऊन, दोन वर्षांनी, लस न येताच बहुधा विषाणूचा नैसर्गिक विलय होत गेल्याने थांबली. त्यावेळची जगाची लोकसंख्या होती सुमारे 130 कोटी. या विषाणूने तेव्हाच्या जगाची 5% लोकसंख्या संपवली. त्यावेळीही जगातील कोट्यवधी लोक मुखपट्या (मास्क) लावून हिंडत होते, सतत हात धुवत होते, वाफारा, गुळण्या करीत होते. कारण त्या काळीही हा विषाणू आणि त्याच्या संसर्गाचे मार्ग, परिणाम याचे ज्ञान जगाला होते. त्याच विषाणूचे भावंड असणारा हा ‘नवा कोरोना विषाणू’(नॉव्हेल कोरोना व्हायरस) थोडा अधिक हिंस्र आहे. तो माणसाच्या फक्त श्वसन संस्थेलाच पकडत नाही तर प्रतिकार यंत्रणेला भडकावून प्रतिकार रसायनांचे वादळ निर्माण करतो, रक्तात गुठळ्या निर्माण करतो आणि थोड्या लोकांमध्ये फुफ्फुसाला कायमची इजा (पल्मोनरी फायब्रॉसीस) करून जातो. पण एका शतकानंतर जग वैद्यकीयदृष्टया खूपच पुढे गेलेले असल्याने या विषाणूच्या हिंस्र रूपाला वेसण घालण्याची बऱ्यापैकी ताकदही जगाकडे आलेली आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वीच्या जगापेक्षा सध्याच्या जगाचे रूप खूप आधुनिक असले तरी ते लोकसंख्येच्या विस्फोटाचे, सामाजिक गुंतागुंतीचे, धावपळीचे, वेगवान दळणवळणाचे, महागडे, इन्टरनेटच्या जाळ्यामार्फत ज्ञानाबरोबर अज्ञानही क्षणार्धात पसरवण्याचे, खऱ्यापेक्षा खोट्याचा अधिक प्रसार करण्याच्या क्षमतेचे आहे.

शतकापूर्वी स्वप्नातही नसणारी थर्मलगन, पल्स-ऑक्सिमिटर, डिजिटल बीपी अ‍ॅपॅरेटस आणि ग्लुकोकोमिटर अशी अनेक वैद्यकीय उपकरणे आता घरांचा अविभाज्य भाग बनली आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारापाशी थर्मल गन आणि सॅनिटायझर द्वारपाल म्हणून उभे आहेत. मुखपट्टी बरोबर, फेस शिल्ड, पी.पी.ई.कीट, हँडग्लोज, टेबलावर काचेच्या भिंती उभी केलेली कार्यालये, लॉकडाऊन, कर्फ्यू, निर्बंध हाही जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. झूम मीटिंग, गुगल मीट, वेबिनार यांचा समावेश दैनंदिन जीवनात झाला आहे. सामुदायिक कार्यक्रम, परिषदा, व्याख्याने, शिक्षण, वैद्यकीय सल्ले ऑनलाईन झाले आहेत. कोरोना विषाणू, मानवी जीवन निष्ठुर समतेने, कोणताही भेदभाव न करता घुसळत आणि उसवत आहे. फाटलेल्या आकाशाला शिवण्याचे काम जम्बो कोव्हीड केंद्रे, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर, रेम्डेस्वीर, स्टीरॉइडस्, अ‍ॅस्पिरीन इ. उपचार

अव्याहत करीत आहेत. मदतीला क, ड जीवनसत्त्वे, झिंक वगैरे आहेत. ही आयुधे घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील सर्वचजण निर्भय योद्ध्यांसारखे आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. आजवर जगातील सव्वा दोनशे देशांमधील पावणे बारा कोटी लोकांना संसर्ग झालापण मृत्यूचे प्रमाण अडीच कोटी एवढेच आहे, म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या अर्धा ट्न्नयापेक्षा कमी. आपला देश सव्वा कोटी बाधित आणि दीड लाखापेक्षा अधिक मृत्यू घेऊन अमेरिकेच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर उभा आहे. अर्थात आपल्या देशाची ही आकडेवारी साफ फसवी आहे. कारण भारतात एकहजार लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी चाचण्या केल्या जातात, तर अमेरिकेत त्या पाचपट केल्या जातात. भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या पाचपट आहे आणि अमेरिकेचे क्षेत्रफळ आपल्या देशाच्या तिप्पट आहे. याचा अर्थ आपल्या देशाची बाधितांची आणि मृत्यूची आकडेवारी प्रत्यक्षात काही पटींनी अधिक आहे. 

एकमात्र निश्चित की अतिसूक्ष्म अशा या विषाणूने जगाची चांगलीच दमछाक केली. हा विषाणू नैसर्गिक विलयाकडे जाण्याची चिन्हे दिसत असतानाच, जनजीवन जरापूर्ववत होताच त्याने पुन्हा उचल घेतली. सर्वच विषाणूंमध्ये आपली जनुकीय रचना बदलण्याची (जेनेटिकम्युटेशन) अभूतपूर्व अशी क्षमता असते, ती या विषाणूमध्येही आहेच. जगाला आता दोनच गोष्टी वाचवू शकतात, एक- संसर्गाची लाट जगभर पसरत जाऊन निर्माण झालेली ‘सामुहिकप्रतिकार शक्ती’ (हर्ड इम्युनिटी) आणि दुसरी- लस (व्हॅक्सीन). पहिल्या शक्यतेत संसर्गाच्या लाटेबरोबर त्या पटींमध्ये मृत्यू होणार हे गृहीत धरावे लागते. म्हणून जगाचे परिणामकारक आणि अत्यंत वेगाने केलेले ‘लसीकरण’ (मास व्हॅक्सिनेशन) हीच गोष्ट जगाला खऱ्या अर्थाने वाचवू शकते. जग कोरोनावरील लसीची चातकासारखी वाट बघत असताना, संशोधकांच्या अविरत प्रयत्नांनी ऐतिहासिक वेगाने अनेक लसी जगात अवतरल्या आणि लसीकरण वेगाने सुरू झाले. पण आत्ताही जगातील 130 देशांमध्ये लस पोहोचलेली नाही. आपल्याकडेच देशातच लस निर्माण झाली पण आपल्या देशातील वय वर्षे 18 वरील, सुमारे 78 कोटी लोकांना सध्याच्या वेगाने ती मिळण्यास किमान दोन वर्षे लागतील. यातील गरोदर स्त्रिया आणि काही वैद्यकीय कारणाने लस घ्यायला परवानगी नसणाऱ्यांची लोकसंख्या वगळली तरी हे वास्तव फारसे

बदलणार नाही. समजा, प्राधान्यक्रम ठरवून 60 वर्षे वयाच्या लोकांना ही लस प्रथम देण्याचे ठरविले तरीही सुमारे 26 कोटी लोकांना ती सध्याच्या वेगाने देण्यास सहा महिने लागतील. वय

वर्षे 40 ते 60ची लोकसंख्या लसीच्या छत्राखाली आणायची असेल तर यामध्ये किमान 25 एक कोटी लोकांची भर पडेल.

ज्येष्ठांना लस सर्वात आधी दिली पाहिजे हे योग्यच आहे पण वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू हे कोणत्याही देशाला परवडणारे नसतात. देशातील किमान 50 कोटी जनतेचे लसीकरण युद्ध पातळीवर 3 ते 4 महिन्यांमध्ये केले तरच कोरोना महासाथीला थांबवण्यात आपण यशस्वी होऊ. लस एकदा घेऊन भागणार नाही, या लसीचा दुसरा डोस 4 आठवड्यांनी घेणे अत्यावश्यक आहे. हे वेळापत्रक पाळणे हे दुसरे मोठे आव्हान आहे. यासाठी सध्या दिवसाला 15 लाख डोस देण्याचे नियोजन किमान 6 पट वाढवावे लागेल. सध्या उपलब्ध असणाऱ्या दोन लसी, कोव्हीशिल्ड निर्माण करणारी सिरमइंडिया आणि कोव्हॅक्सीन निर्माण करणारी भारत बायोटेक यांच्या प्रतिदिवस डोस पुरवण्याच्या क्षमता विचारात घ्याव्या लागतील. नाहीतर जगातील इतर कंपन्यांसाठी दारे उघडावी लागतील. ही आव्हाने समोर असताना स्वत:ची पाठथोपटून घेण्यासाठी लाखो डोस ब्राझीलसारख्या देशाला पाठविणे आक्षेपार्ह आहे. देशात तयार होणारा लसीचा प्रत्येक डोस हा देशवासीयांसाठी न वापरता बाहेरील देशांना देणे हे राष्ट्रद्रोहाचे कृत्य आहे. पण फक्त लसीचे डोस वाढवून हा प्रश्न सुटणारा नाही. ती देण्याची यंत्रणा उभी करणे हे आणखीन मोठे आव्हान आहे. या लसींचे तापमान साठवणूक करताना आणि वाहतूक करताना राखणे ही गोष्टही महत्त्वाची आहे. आपल्या देशात उपलब्ध असणाऱ्या दोन्ही लसींसाठी हे तापमान 2 ते 8 डिग्री सेंटिग्रेड लागते. जे राखणे सहज शक्य आहे. ही गोष्ट सोडता ती देणे हे दंडात देण्याचा कोणत्याही साध्या इंट्रामस्कुलर इंजेक्शनसारखे आहे. त्यामुळे ही लस कोणताही सामान्य डॉक्टर, परिचारिका देऊ शकतात. हे सर्व युद्धपातळीवर करण्यासाठी केंद्राने लसीकरण स्वत:च्या हातात ठेवण्याचा प्रयत्न न करता राज्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल.

आपल्या देशात 70% जनता खाजगी वैद्यकीय यंत्रणेचा आधार घेते कारण आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. अशी यंत्रणा, भारतासारख्या खंडप्राय देशातील जनतेचे लसीकरण सक्षमपणे करू शकेल हे शक्य नाही. म्हणून खाजगी आरोग्य यंत्रणेला यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. भंपक ‘एअर स्ट्राईक’ पेक्षा कोरोनावरील स्ट्राईक अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाने दीड वर्षात आपल्या देशात दीड लाखापेक्षा अधिक बळी घेतले आणि अद्यापही त्याची भूक संपलेली नाही. स्वतंत्र भारतातील सर्व युद्धे आणि अतिरेकी हल्ले यांमध्ये बळी गेलेल्यांपेक्षा हा आकडा खूप मोठा आहे. यासाठी सरकारला ‘मिशन कोरोना - व्हॅक्सीन स्ट्राईक’ असे नाव देऊन मोहीम जाहीर करता येईल. मोदींना आणखीन एक घोषणा

म्हणून याचा उपयोगही करता येईल. पण हा हल्ला ‘गोदी माध्यमां’साठी सनसनाटीची आणि टी.आर.पी.ची बातमी होऊ शकत नाही. अर्णव गोस्वामीला भुंकण्याची संधी मिळणार नाही. निवडणुका जिंकण्यास त्याचा उपयोग होणार नाही. देशातील जनतेला वाचविण्याची प्रामाणिक भावना असणारा कोणताही राज्यकर्ता न्यूज व्हॅल्यूसारख्या गोष्टींची पर्वा न करता खऱ्या आव्हानांना भिडत असतो. भावनिक आणि बनावट अशा सनसनाटी घटनांचा आपले स्थान बळकट करण्यासाठी सतत वापर करण्यापेक्षा खऱ्या आव्हानांना भिडण्याची हीच वेळ आहे. ही हिम्मत नसेल तर अदानी आणि अंबानी यांच्यावर देशातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी सोपवावी. 

या लसीबद्दल जनतेच्या मनात अनेक गैरसमज आहेत. गरोदर स्त्रिया, स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया, प्रतिकार शक्ती कमी करणारे आजार असणारे वा प्रतिकार शक्ती कमी करणारी

औषधे घेणारे, गंभीर अवस्था असणारे आणि नुकताच कोरोनाचा संसर्ग झालेले (गेल्या दीडमहिन्यात) रुग्ण वगळता वय वर्षे 18 वरील सर्वांनी ही लस घ्यायला हरकत नाही. एखाद्या औषधाची अ‍ॅलर्जी आहे याचा अर्थ या लसीला अ‍ॅलर्जी येईलच असा नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा हे आजार आणि स्थूलता हे कोरोना संसर्गाला पूरक ‘को-मॉर्बिडीटीज’ म्हणून ओळखले गेल्याने या आजाराच्या रुग्णांनी ही लस प्राधान्याने घ्यायला हवी. ज्यांना रक्त पातळ होणाऱ्या गोळ्या उदा. अ‍ॅस्पिरीन, क्लोपिडोग्रेल, टिकॅग्रेलॉल, प्रासुग्रेल किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवणाऱ्या गोळ्या वा इंजेक्शने, ज्यांना अँटीकोयॅग्युलंट असे म्हटले जाते, उदा. वॉर्फेरीन, अ‍ॅसिक्युमॅरॉल, रिव्हारॉक्सॅबॅन, हेपारीन इ., अधिक खबरदारी म्हणून लस घेण्यापूर्वी दोन दिवस बंद करावीत आणि लस घेतल्यावर दुसऱ्या दिवशी सुरू करावीत. लस घेण्यापूर्वी आपल्या रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि अँटीकोयॅग्युलंट घेणाऱ्यांनी रक्ताची पी.टी. आय.एन.आर. चाचणी करून आकडे ठीक आहे ना हे पाहावे. लस घ्यायला जाताना खाऊन जावे. फक्त2-3% लोकांना लस घेतल्यावर तीन दिवसांपर्यंत कसकस, अशक्तपणा, ताप, अंगदुखी अशी लक्षणे जाणवू शकतात. त्यासाठी साधी पॅरॅसिटॅमॉलसारखी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. थोड्या लोकांना मळमळ जाणवू शकते वा उलट्या होऊ शकतात. बाकी बहुसंख्य लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. लस घेतल्यावर व्यक्ती गंभीर होणे ही अत्यंत दुर्मीळ, म्हणजे लाखातील एक घटना असते. अनेक वेळा लस हे निमित्त ठरते. मात्र लस हा अमरपट्टा नाही किंवा बेफिकीरीने वागण्याचा परवाना नाही.  

भारतीय लसींच्या परिणामकारकतेचा दावा फक्त70% चा आहे. याचा अर्थ ती घेऊनही 30% लोकांना संसर्ग होऊ शकतो. कोरोनाने रूप बदलले तर ती तेवढीच परिणामकारक राहील का याचे निश्चित उत्तर जगाकडे नाही, पण बहुतेक राहील. लस घेतल्यावर ‘प्रतिपिंड’ तयार व्हायला लागण्याचा कालावधी 15 दिवसांचा असू शकतो. म्हणजे या काळात संसर्ग होऊ शकतो. थोडक्यात कोरोना विषाणू आपल्या लीला थांबवेपर्यंत आपल्याला सर्व खबरदाऱ्या आणि प्रतिबंधक उपाय तसेच चालू ठेवले पाहिजेत. 

कोरोनाची लस नव्याने जगात प्रवेशत असलीतरी लस ही गोष्ट जगाला नवी नाही. भारतातील बुद्ध भिख्खू सर्पविष पिऊन सर्पदंशावर प्रतिकार मिळवीत. चीनमध्ये इ.स. 1 हजारमध्ये अत्यंत प्राथमिक अवस्थेतील देवीच्या लसीचा प्रयोग करण्यात येत असे. गायीच्या आचळाला देवी सदृश आजार (काऊपॉक्स) झाल्यावर त्याचे द्राव निरोगी व्यक्तीच्या त्वचेतील छेदावर लावले जात. पण एडवर्ड जेन्नर ने 1796 मध्ये काऊपॉक्सच्या द्रावांचा देवीची लस म्हणून पहिला यशस्वी प्रयोग केला. पुढील दोन शतकांमध्ये त्याचेच बोटधरून अनेक सुधारणा करीत आधुनिक वैद्यकीय शास्त्राने जगातून देवीचे उच्चाटन केले. लुई पाश्चरने 1885 मध्ये श्वान दंशावर लस शोधली. अलेक्झांडर ग्लेनी ने 1923 मध्ये धनुर्वातावरील लस शोधली. त्याच्याच तंत्राचा वापर करून 1926 मध्ये घटसर्पावर आणि 1948 मध्ये डांग्या खोकल्यावर लस शोधण्यात आली. पुढे तंत्रात प्रगती झाल्यावर पुढील काही दशकांमध्ये पोलिओच्या तोंडावाटे देण्याच्या लसीचा शोध लागला आणि दुसरी क्रांती झाली. क्षयरोग, कॉलरा, गोवर, कांजिण्या, पित्तज्वर, मेंदूज्वर, फ्लू, न्युमोनिया, हेपॅटायटीस अशा अनेक लसींचे शोध लागत गेले आणि मानवी जीवन अनेक आजारांपासून मुक्तहोत गेले.

कोणताही सूक्ष्म जंतू माणसाच्या शरीरावर हल्ला करतो तेव्हा शरीरातील प्रतिकार यंत्रणा त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारते. या युद्धात बहुसंख्य वेळा माणसाचा विजय होतो पण काही वेळा माणसाचा पराजय होतो. माणूस हे युद्ध जिंकतो ते आपल्या प्रतिकार यंत्रणेने शरीरात निर्माण केलेल्या प्रतिपिंडांच्या (अँटीबॉडीजच्या) मदतीने. आधुनिक वैद्यकीय शास्त्राने सूक्ष्म जंतूंच्या रचनेचा सखोल अभ्यास करून हे शोधून काढले की आपल्या शरीरात सूक्ष्म जंतूंच्या रचनेतील काही घटक (जंतूचे प्रथिनयुक्त आवरण, जनुकीय घटक, आर.एन.ए. वाडी.एन.ए.) जे स्वतंत्रपणे माणसाला आजार निर्माण करू शकत नाहीत किंवा विशिष्ट प्रक्रियेने निष्क्रिय केलेले जंतू यांचा वापर करून प्रतिपिंड (अँटीबॉडीज) निर्माण करता येतात. या ज्ञानातून लस तयार करण्यात येऊ लागली. पण ही लस माणसामध्ये वापरण्यास सुरक्षित आहे किंवा परिणामकारक आहे हे कसे कळणार? यासाठी प्रथम तिचे प्रयोगशाळेत प्राण्यांवर प्रयोग केले जातात. प्राण्यांच्या संपूर्ण शरीरावर होणाऱ्या परिणामांचा बारकाईने अभ्यास केला जातो. याला ‘प्री क्लिनिकल’ किंवा ‘अ‍ॅनिमल ट्रायल्स’असे म्हटले जाते. या चाचण्यांमध्ये सुरक्षिततेची खात्री पटल्यावरच मानवी चाचण्या, ‘ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स’ सुरूकेल्या जातात.‘फेज वन’मध्ये पूर्ण निरोगी असे 100 पेक्षा कमी स्वयंसेवक, ‘फेज टू’मध्ये, विविध वयोगटातील विविध आजार असणारे 100 पेक्षा अधिक स्वयंसेवक, ‘फेज थ्री’मध्ये ठिकठिकाणचे हजारो स्वयंसेवक अशा टप्प्यांमधून यशस्वीपणे गेल्यावर लसीला वैद्यकीय वापराची परवानगी मिळते. सिरम इंडियाच्या लसीने हे टप्पे पार पाडले आहेत पण भारत बायोटेकच्या लसीने फेज थ्री पूर्ण केलेली नाही. लस एकदा जनतेसाठी खुली झाली (उर्वरित पान 7 वर)

की ‘फेज फोर’ अंतर्गत लस दिलेल्या लोकांमध्ये काही दुष्परिणाम आढळले तर त्याचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारणपणे एखादी लस तयार होण्याचा कालावधी किमान 10 वर्षाचा असतो. कोव्हीडची लस सर्व कंपन्यांनी वर्षभरात तयार केली आहे. लस संशोधन प्रक्रियेचा खर्च 1 ते 3 हजार कोटी रुपये इतका असतो. असे असूनही भारतातील कंपन्यांनी ही लस अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून दिली आहे. पण आपली गरज मोठी आहे आणि त्यामुळे कदाचित बाहेरील राष्ट्रांकडून त्यांच्याकडील लस उपलब्ध झाल्यास ती घ्यावी लागेल. 

स्वत:ची लस विकसित केलेला विकसनशील देश फक्तभारतच आहे. बाकी अविकसित आणि विकसनशील देशांना लस कशी उपलब्ध होणार हा प्रश्न आहे. या महासाथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोजक्याच देशांचे लसीकरण होऊन भागणार नाही. जगाला लस उपलब्ध करून देण्यात लसीचे तापमान इ.काही तांत्रिक अडचणी राहतील. पण मुख्य अडचण राहील ती डब्ल्यू.टी.ओ., वर्ल्ड ट्रेेड ऑर्गनायझेशन (जागतिक व्यापार संघटना) अंतर्गत अनेक राष्ट्रांंनी 1995 साली ट्रिप्स (ट्रेड रिलेटेड इनटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस्)खाली बौद्धिक संपदेबाबत जे करार केले आहेत ते. या करारामुळे विकसित देश या कराराच्या नावाखाली इतर देशांकडून या लसीची भरमसाठ किंमत मागू शकतात. कोरोना लसीला वैश्विक मानवहितासाठी या करारातून मुक्त केले पाहिजे. साऱ्या जगाने एकमुखाने ही मागणी केली पाहिजे. जग संकटात असतानाही भांडवलशाही आपला स्वार्थ साधणे थांबवत नसते. उलट संकट ही एक अधिकाधिक पैसे कमावण्याची संधी मानत असते. पण कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. ही परिस्थिती कोरोनाचा संसर्ग थांबून जग पूर्ववत पळू लागल्याशिवाय बदलणार नाही. अल्पकालीन नफ्याच्या हव्यासात गुंतण्याचा मोह विकसित राष्ट्रांनी सोडून जगाला या संकटातून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे. हे घडले तर  अनेक अर्थव्यवस्था पुन्हा धावू लागतील. दीर्घकालीन फायदा भांडवलदारांचाच होईल. विज्ञान समजून घेऊन मानवतेसाठी राजकारण आणि अर्थकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे.

- डॉ. अभिजित वैद्य

puja.monthly@gmail.com

(लेखक : मासिक पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आहेत.)



(६७) कोणत्याही नबीसाठी हे उचित नाही की त्याच्याजवळ कैदी असावेत जोपर्यंत तो पृथ्वीतलावरील शत्रूंना पुरेपूर ठेचून काढत नाही. तुम्ही लोक या जगाच्या लाभाची इच्छा करता, वास्तविकत: अल्लाहच्या दृष्टीसमोर पारलौकिक जीवन आहे; आणि अल्लाह प्रभुत्वसंपन्न आणि बुद्धिमान आहे.

(६८) जर अल्लाहचे लिखित यापूर्वीच लिहिले गेले नसते तर जे काही तुम्हा लोकांनी घेतले आहे त्यापायी तुम्हाला मोठी शिक्षा दिली गेली असती.

(६९) तर जो काही माल तुम्ही हस्तगत केला आहे तो खा कारण की तो वैध व शुद्ध आहे आणि अल्लाहचे भय बाळगून असा.४९ नि:संशय अल्लाह  क्षमाशील  आणि  दया  दाखविणारा  आहे.

(७०) हे नबी (स.), तुम्हा लोकांच्या ताब्यात जे कैदी आहेत त्यांना सांगा, जर अल्लाहला कळून आले की तुमच्या हृदयात काही चांगुलपणा आहे तर तो तुम्हाला त्यापेक्षा वरचढ देईल जे तुमच्याकडून घेण्यात आले आहे, आणि तो तुमचे अपराध माफ करील. अल्लाह क्षमाशील व दयाळू आहे.

(७१) परंतु ते जर तुझ्याशी विश्वासघाताचा मानस ठेवत आहेत तर यापूर्वी त्यांनी अल्लाहशी प्रतारणा केलेली आहे. म्हणून त्याचीच अल्लाहने शिक्षा त्यांना दिली की ते तुझ्या ताब्यात आले. अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे.

(७२) ज्या लोकांनी ईमान स्वीकारले आणि स्थलांतर केले आणि अल्लाहच्या मार्गात आपले प्राण पणाला लावले व आपली मालमत्ता खर्च केली व ज्या लोकांनी स्थलांतर करणाऱ्या लोकांना आश्रय दिला व त्यांना मदत केली; ते खरोखर एकमेकाचे वाली आहेत. उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा तर ठेवली परंतु ज्यांनी स्थलांतर केले नाही त्यांच्याशी पालकत्वाचे तुमचे काहीही संबंध नाहीत जोपर्यंत ते स्थलांतर करून येत नाहीत.५० परंतु जर ते धर्माच्या बाबतीत तुमच्याकडून मदत मागतील तर त्यांना मदत करणे तुमचे कर्तव्य होय; परंतु अशा कोणत्याही जनसमुदायाविरूद्ध नव्हे की ज्यांच्याशी तुमचा करार झालेला आहे.५१ जे काही तुम्ही करता ते अल्लाह पाहतो. 


४९) या आयतच्या तपशीलासाठी टीकाकारांनी कथने दिली आहेत. ते म्हणजे बदर युद्धात कुरैश सैन्यातील जे लोक कैद झाले होते त्यांच्याविषयी नंतर ठरले की त्यांच्याशी कशाप्रकारचा व्यवहार केला जावा. माननीय अबू बकर (रजि.) यांचे मत होते की प्रतिदान (फिदीया) घेऊन सोडून दिले जावे. माननीय उमर (रजि.) यांनी सांगितले की मृत्यूदंड दिला जावा. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अबू बकर (रजि.) यांचे मत स्वीकारले आणि प्रतिदानविषयी निश्चित केले. यामुळे अल्लाहने रोष व्यक्त करण्यासाठी या आयती अवतरित केल्या. परंतु भाष्यकार आयतच्या या वाक्याचे उचित स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ``जर अल्लाहचे लिखित पूर्वीच लिहिले गेले नसते.'' ते म्हणतात की याचा अर्थ अल्लाहने बनविलेले भाग्य आहे  िंकवा हे की अल्लाहने पूर्वीच हा इरादा केला होता की मुस्लिमांसाठी युद्धसंपत्ती वैध करील. परंतु हे स्पष्ट आहे की जोपर्यंत वैधानिक रूपाने दिव्यप्रकटनाद्वारा एखाद्या वस्तूची परवानगी दिली गेली नाही तोपर्यंत त्याचे घेणे वैध ठरत नाही. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) सहित पूर्ण इस्लामी जमात या व्याख्येच्या प्रकाशात अपराधी ठरते आणि काही कथनकारांद्वारा उल्लेखित कथनावर भरोसा ठेवून अशा व्याख्येचा स्वीकार करणे एक जबाबदारीचे काम आहे. माझ्या मते ह्याची खरी व्याख्या ही आहे की बदर युद्धापूर्वी कुरआनच्या सूरह ४७ मध्ये युद्धासंबंधी जे सुरवातीच्या सुचना दिल्या होत्या त्यात हे संकेत दिले होते, ``म्हणून जेव्हा या शत्रूंशी मूठभेड झाली तर पहिले काम मुंडके उडविणे आहे येथपर्यंत की त्यांची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली जावी. कैद्यांना मजबूत बांधा, यानंतर (तुम्हाला अधिकार आहे) तुम्ही त्यांच्या वर उपकार करा िंकवा अर्थदंड करावे. जोपर्यंत युद्ध संपत नाही.'' (४७ :४) या आयतमध्ये युद्ध कैद्यांपासून अर्थदंड वसूल करण्याची परवानगी दिली गेली. परंतु अट ही घातली की प्रथम शत्रूच्या शक्तीला नष्ट केले जावे आणि नंतर युद्ध कैदी केले जावेत. या आदेशानुसार मुस्लिमांनी जे कैदी बदरच्या युद्धात कैद केले आणि त्यांच्याशी अर्थदंड वसूल केला त्यासाठी परवानगी दिली गेली होती परंतु चूक ही झाली होती की, ``शत्रुच्या शक्तीला नष्ट करण्याची'' जी अट टाकली होती तिला पूर्ण करण्यात दिरंगाई केली गेली. युद्धात कुरैश सैन्य पळत होते तेव्हा मुस्लिमांचा एक मोठा गट युद्धसंपत्ती गोळा करण्यात आणि युद्ध कैदी बांधण्यात गुंतले होते आणि अति अल्पप्रमाणात काही मुस्लिम शत्रुचा पाठलाग करीत होते. मुस्लिमांनी पूर्ण शक्तीनिशी शत्रूचा पाठलाग केला असता तर कुरैशच्या शक्तीचा अंत त्याच दिवशी झाला असता. याच कारणाने अल्लाह रुष्ट झाला होता आणि हा रोष पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर नाही तर मुस्लिमांवर होता. ईश आदेशाचा हेतु आहे की तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मिशनला अद्याप चांगल्या प्रकारे समजून घेतलेले नाही. पैगंबरांचे हे कार्य नाही की अर्थदंड आणि युद्धसंपत्ती गोळा करून तिजोरी भरत राहावी. त्यांचे मूळ लक्ष म्हणजे कुप्रâ (अनेकेश्वरत्व) ची शक्ती नष्ट व्हावी. परंतु तुमच्या लोकांवर सतत भौतिक हित प्रभावित होते. प्रथम शत्रुच्या मूळ शक्तीवर प्रहार करण्याऐवजी काफिल्यावर हल्ला करणे निवडले. शत्रुचे डोके तुडविण्या ऐवजी युद्धसंपत्ती गोळा करण्यात आणि युद्ध कैद्यांना बंदिस्त करण्यात मग्न होते आणि नंतर युद्धसंपत्ती विषयी भांडू लागले होते. जर आम्ही अर्थदंड वसूल करण्याची परवानगी अगोदर दिली नसती तर कडक शिक्षा दिली असती. आता तुम्ही जे काही घेतले ते खा. परंतु पुढे भविष्यात असे करू नका जे अल्लाहजवळ अप्रिय आहे.'' मी या मतावर पोहचलो होतो की इमाम जस्सासचा ग्रंथ `अहकामुल कुरआन' पाहून मला अधिक संतोष झाला कारण इमाम जस्साससुद्धा या अर्थाशी सहमत होते. नंतर `सीरत इब्ने हिशाम' ग्रंथात हे कथन आहे की ज्यावेळी इस्लामचे सैन्य युद्धसंपत्ती गोळा करण्यात आणि युद्धबंदी करण्यात मग्न होते, तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पाहिले की साद बिन मुआज यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले, ``हे साद, लोकांची ही कार्यवाही तुम्हाला आवडली नाही.'' त्यांनी सांगितले, ``होय, अल्लाहच्या पैगंबर! ही पहिली लढाई आहे ज्यात अल्लाहने अनेकेश्वरवाद्यांना पराजित केले. यावेळी त्यानी युद्धबंदी बनविण्या ऐवजी त्यांना नष्ट करून टाकले असते.'' (भाग २ पृ. २८०-८१)

५०) ही आयत इस्लामच्या संवैधानिक नियमांची एक महत्त्वपूर्ण धारा आहे. यात हा नियम दाखविण्यात आला आहे की `विलायत' (संरक्षक मित्र) चा संबंध केवळ मुस्लिमांच्या मध्येच असेल जे इस्लामी राज्याचे निवासी िंकवा बाहेरून आले तर हिजरत (स्थलांतर) करून आलेले असतील. इतर मुस्लिम जे इस्लामी राज्याच्या सीमेबाहेर आहेत, त्यांच्याशी धार्मिक बंधुभाव अवश्य स्थापित होईल. परंतु `विलायतचे' संबंध असणार नाही. याचप्रमाणे त्या मुस्लिमांशीसुद्धा `संरक्षक मित्र' (विलायत) चे संबंध असणार नाही जे हिजरत करून आलेले नाहीत तर दारूल कुप्रâ (कुप्रâराज्य) चा नागरिक म्हणून `दारुल इस्लाम' मध्ये आले आहेत. विलायतचा शब्द अरबी भाषेत समर्थन, सहाय्यता, मदतगारी, मित्रता, संरक्षण नातेसंबंध आणि याच्याशी मिळत्या-जुळत्या अर्थाने वापरला जातो. या आयतच्या संदर्भात स्पष्टता तो नातेसंबंध जे एक राज्याचे आपल्या नागरिकांशी आणि नागरिकांचा आपल्या राज्याशी असतो आणि नागरिकांमध्ये आपापसात असतो. म्हणून ही आयत `संवैधानिक आणि राजनैतिक विलायत'ला राज्याच्या भौगोलिक सीमेपर्यंत सीमित ठेवते आणि या सीमेबाहेरच्या मुस्लिमांना या विशेष नातेसंबंधाशी वेगळे करते. या `विलायत'च्या न होण्याचे कायदेशीर परिणाम व्यापक होतात ज्यांचे स्पष्टिकरण देण्यास येथे वाव नाही. उदाहरण देण्यासाठी फक्त इतका इशारा पुरेसा आहे की एखाद्याची `विलायत' न होण्याने `दारुल कुप्रâ' आणि `दारुल इस्लाम' मधील मुस्लिम एक-दुसऱ्याचे वारस बनू शकत नाही. कायदेशीर पालक बनू शकत नाहीत आणि आपापसात लग्न करू शकत नाहीत. तसेच `दारूल कुप्रâ' मध्ये असलेल्या मुस्लिमाला अधिकाराचे पद `दारुल इस्लाम'मध्ये मिळू शकत नाही ज्याने `दारूल कुप्रâ' पासून नागरिकतेचे संबंध तोडले नसेल. याव्यतिरिक्त ही आयत इस्लामी राज्याच्या विदेशनीतीवर प्रभाव टाकते. यानुसार इस्लामी राज्याचे दायित्व त्या मुस्लिमांपर्यंत सीमित आहे जे त्याच्या सीमेअंतर्गत राहातात. बाहेरच्या मुस्लिमांसाठी दायित्वाचे ओझे येत नाही. अशाप्रकारे इस्लामी कायद्याने त्या भांडणाचे मूळ कापले आहे जे आंतरराष्ट्रीय तणावाचे कारण बनते. जेव्हा एखादे शासन आपल्या सीमेबाहेर राहणाऱ्या अल्पसंख्याकांची जबाबदारी आपल्यावर घेते तेव्हा असा तणाव निर्माण होतो, त्यांना युद्धनीतीनेसुद्घा सोडविता येत नाही.

५१) वरील आयतमध्ये `दारूल इस्लाम'च्या बाहेर राहणाऱ्या मुस्लिमांना `राजनैतिक विलायत'च्या संबंधाने वेगळे केले होते, आता ही आयत या गोष्टीला स्पष्ट करीत आहे की या नात्याशी वेगळे होण्याने ``धार्मिक बंधुता'' नात्याशी ते वेगळे नाहीत. जेव्हा कोठे त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर इस्लामी बंधुतेच्या आधारावर ते `दारुल इस्लाम'च्या शासनाला आणि नागरिकांना मदतीची हाक देऊ शकतात. अशा वेळी त्यांचे कर्तव्य बनते की पीडित बंधुंची सहाय्यता करावी. यानंतर अधिक स्पष्ट करून सांगितले गेले आहे की त्या धार्मिक बंधुच्या सहाय्यतेचे कर्तव्य अंधाधूंद पद्धतीने पार पाडले जाऊ शकत नाही. तर आंतरराष्ट्रीय दायित्व आणि नैतिक मर्यादांना डोळयांसमोर ठेवूनच पार पाडले जाऊ शकते. अत्याचारी राष्ट्राशी `दारूल इस्लाम'चे करार झाले असेल तर अशा स्थितीत तेथील पीडित मुस्लिमांची कोणतीच अशी सेवा केली जाणार नाही जी त्या संबंधाच्या नैतिक जबाबदारीच्या विरुद्ध असेल. ``अशा राष्ट्राविरुद्ध नाही ज्याच्याशी तुमचा करार झाला आहे.'' याने स्पष्ट माहीत होते की `दारूल इस्लाम'च्या सरकारांनी मैत्रीपूर्ण संबंध एखाद्या मुस्लिमेतर राज्याशी स्थापित केले आहेत ते फक्त दोन राज्यांचेच संबंध नाहीत तर दोन लोकसमुदायांचे संबंध आहेत. त्यांच्या नैतिक दायित्वात मुस्लिम शासनासह मुस्लिम जनतासुद्धा संमिलीत आहे.

५१अ) म्हणजे `दारूल इस्लाम'चे मुस्लिम एक-दुसऱ्यांचे मित्र (वली) बनले नाहीत आणि घरेदारे सोडून (हिजरत) `दारूल इस्लाम' मध्ये न येणारे तसेच `दारूल कुप्रâम'ध्ये निवास करणारे मुस्लिमांना `दारूल इस्लाम'च्या मुस्लिमांनी आपल्या राजनैतिक विलायती पासून त्यांना वेगळे समजू नये. बाहेरच्या पीडित मुस्लिमांची मदत मागितल्यावर त्यांची मदत केली गेली नाही आणि या नियमांचे पालनसुद्धा केले जाऊ नये की ज्या देशाशी इस्लामी राज्याचा समझौता आहे त्याच्याविरुद्ध मुस्लिमांची मदत केली जाणार नाही आणि जगात मुस्लिमांनी काफिरांशी (ईशद्रोही) `मवालात'चा (संरक्षक मित्राचा) संंबंध समाप्त् केला नाही तर धरतीवर उपद्रव आणि मोठा बिघाड माजेल.

 

अल्लाहची उपासना, आराधना करण्यासाठी कोणत्या मध्यस्थांची गरज नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःच उपासना करू शकतो. तसे पाहता माणूस जर कुरआनच्या मार्गदर्शनानुसार आपले सबंध जीवन व्यतीत करत असेल तर त्याचे उभे आयुष्य उपासनाच असते. यासाठी कोणत्या विशिष्ट धर्मविधींची गरज नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे असे की “माझ्यासाठी संपूर्ण धरती मशीद बनवली आहे.” कोणत्याही स्वच्छ जागी नमाज अदा करता येते. प्रवास करताना, गाडीत बसून असो की हवेत, नमाजची वेळ झाली की कसल्याही स्वच्छ जागी, कुठेही नमाज अदा करता येते. प्रेषितांच्या काळात त्यांचे काही अनुयायी सतत दिवसभर रोजे ठेवायचे आणि रात्रभर नमाज अदा करायचे. ही गोष्ट जेव्हा प्रेषितांना कळली त्यांनी त्या लोकांना बोलावून घेतले आणि म्हटले, “पाहा, मी तुमच्यापेक्षा जास्त अल्लाहची भीती बाळगत आहे. पण तुम्ही जसे करता तसे मी करत नाही. उपासनाही करतो आणि खातो-पितो. रात्री नमाज अदा करतो, झोपतोदेखील. मी कौटुंबिक व वैवाहिक संबंधही जपतो.” प्रेषितांनी ताकीद दिली होती की “रमजान महिन्यात फक्त महिनाभराचे रोजे ठेवायचे. इतर दिवसांत फार तर २-३ दिवसांचे रोजे ठेवणे पुरे आहेत. तुमच्या तुमच्या मुलाबाळांचे, तुमच्या पत्नींचे, मातापित्यांचे तुमच्यावर अधिकार आहेत. त्यांची देखभाल करणे, त्यांच्या खाण्यापिण्याची, इतर सुविधांची पूर्तता करणे हेदेखील नमाज आणि इतर उपासनांसारखेच तुमच्यावर विहित केले गेले आहेत. तुम्ही जर अल्लाहचे अधिकार पूर्ण केले नाहीत, म्हणजे नमाज आणि इतर उपासना जसे हज, रोजे वगैरे पूर्ण केले नाहीत तर अल्लाह तुम्हाला क्षमा करू शकतो, पण जर आपल्या कुटुंबाचे, समाजबांधवांचे, दीनदलितांचे हक्काधिकार अदा केले नाहीत तर अल्लाह तुम्हाला क्षमा करणार नाही.”

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी १५०० वर्षांपूर्वी ही घोषणा केली की सारे मानव एकसमान आहेत. याच समतेच्या तत्त्वावर त्यांनी मानवी समाजाची रचना केली. समताम्हणजे सारे मान एकसमान आहेत. एवढेच नव्हे तर ते एकमेकांचे बांधव आहेत. असे त्यांनी सांगितले आहे. मशिदीत नमाज अदा करणारे मुस्लिम तुमचे भाऊ आहेत, असेही ते म्हणतात. आपल्यासाठी जे पसंत करतो तेच आपल्या भावासाठी कुणी पसंत करीत नसेल तर तो मुस्लिम होऊ शकत नाही. जो आपल्या शेजाऱ्याला त्रास देत असेल तो मुस्लिम होऊ शकत नाही. जो स्वतः पोटभर जेवतो आणि त्याचा शेजारी उपाशी असेल तर अशी व्यक्तीदेखील मुस्लिम नाही. कुणाशी वाईट बोलू नका. शुभ शुभ बोला अन्यथा गप्प राहा. जो सर्वांत जास्त चारित्र्यवान तोच सर्वोत्तम मुस्लिम. प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या अनुयायांना विचारले की सर्वांत दरिद्री कोण हे तुम्हाला माहीत आहे काय? प्रेषितांनी स्वतःच उत्तर देत म्हटले की जो कयामतच्या दिवशी माझ्याकडे नमाज, रोजे, हज इत्यादी घेऊन येईल पण जर त्याने कुणाला अपशब्द वा अर्वाच्च बोलला असेल, कुणावर बिनबुडाचे आरोप केले असतील, कुणाचा माल हडप केला असेल, कुणाचे विनाकारण रक्त सांडले असेल, तर अशा सर्व पापांसाठी त्याला शिक्षा दिली जाईल, ती म्हणजे त्याने केलेल्या सगळ्या चांगल्या कर्मांचा मोबदला त्याला न देता ज्या ज्या लोकांना त्याने त्रास दिलेला असेल त्यांना दिला जाईल आणि त्याच्या पदरात कोणतीच चांगली कर्मे नसतील. या अर्थाने तो सर्वांत दरिद्री माणूस असेल.

- सय्यद इफ्तिखार अहमद



नाशिक महानगरपालिकेतील जाकिर हुसैन रुग्णालयात २१ एप्रिल २०२१ रोजी ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी मदत पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र रुग्णालयात १५० रुग्णांपैकी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ निष्पाप कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सीजनच्या टॅंक लिकेज झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. कधी कोव्हिड रुग्णालयाला आग लागते. तर कधी कोव्हिड रुग्णालयातील ऑक्सिजन लिक होतो. या सगळ्या घटनांना जबाबदार कोण? भंडारा, मुंबईच्या जळीतकांडानंतरही सरकारने काही धडा घेतला नाही का? नागपूरमध्ये खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव रूग्णांचा मृत्यू होतो. भांडूपमध्ये 10 रुग्णांचा जळून मृत्यू होतो. कोव्हिड रुग्णालयात महिलांचा विनयभंग होतो. रुग्णालयातच रुग्ण सुरक्षित नसतील तर त्यांनी कुठे जायचे. त्यातच या घटना वारंवार घडत असताना या घटनांमधून आपण काही धडे घेणार आहोत का? अशा घटना पुन्हा घडूच नयेत, यासाठी योग्य पावलं उचलण्यासात ठाकरे सरकार हात कोणी रोखले आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई होणे गरजेचे तर आहेच. त्याचबरोबर कोव्हिड रुग्णालयात घडणाऱ्या घटनांबाबत संबंधीत राजकीय नेत्यांना देखील याबाबत प्रश्न विचारणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णालये उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांचा घरातच मृत्यू होत आहे. रेमडेसिवीरसाठी दिवस-दिवस रांगेत थांबून हाती काहीच नाही. शेवटी आता आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? अशा संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. कोणी बेड देता का? प्लाझ्मा मिळेल का? रेमडेसिवीर आहे का? अशा अनेक मागण्यांचा समाज माध्यमांवर पूर लोटल्याचे पाहायला मिळते. यातून अख्ख्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे समोर आली आहेत. गृह विलगीकरणाच्या नावाखाली रुग्णांची जबाबदारी झटल्यानंतर आता घरामध्ये रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे ही कसली आरोग्य यंत्रणा? घरामध्ये एखादा व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या दहशतीखाली येत आहे. या रुग्णांची व्यवस्था करता करता घरातील अन्य व्यक्ती बाधित झाल्याचे कळते आणि सर्वांचाच धीर सुटतो. निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागताना उमेदवार दारोदारी जाऊन नागरिकांसमोर हात पसरतात. आता याच लोकप्रतिनिधींची सक्षम आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी राज्य सरकारवर दबाब आणण्याची गरज आहे. मात्र काही लोकप्रतिनधी केवळ राजकारणामध्ये व्यस्त आहेत. माणसांच्या जीवापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटत आहे. एकीकडे असा गोंधळ आणि भीतीचे वातावरण असतानाच, दुसरीकडे जगातील सर्वांत श्रीमंत मानली जाणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात इंडियन प्रीमियर लीग बंद मैदानांमध्ये कुठल्याही क्रिकेट रसिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना सुरूच आहेत आणि तेही रोज. दुसरीकडे, ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत, तिथे हजारो लोक आपापल्या नेत्यांच्या सभांमध्ये उपस्थित राहत आहेत, हिंदू धर्मियांच्या कुंभमेळ्यातही सहभागी होत आहेत. परंतु तबलिगी जमात हा एक बेजबाबदार गट म्हणून रंगवला गेला आणि कार्पोरेट मीडियाच्या एका भागाने आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही ठिकाणी साथीने पसरलेल्या रोगाचा दोष दिला. यामुळे देशातील विविध भागांतील मुस्लिमांविरूद्ध जातीयवादी स्वरूपाचा प्रतिकार झाला; मुस्लिम भाजी विक्रेत्यांना हकलले आणि अत्याचार केले गेले आणि टीव्ही चॅनेल्स “कोरोना जिहाद”सारख्या अर्वाच्च आणि अपमानास्पद मथळे झळकवण्यात आली. एका वर्षानंतर, भारताची कोविड -१९ ची परिस्थिती तबलिगी जमात कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा कितीतरी वाईट आहे (त्यावेळी तेथे काही शंभर सक्रिय लोक उपस्थित होते; आज तिथे 1.2 दशलक्षाहून अधिक आहेत). आणि तरीही, बरेच मोठे धार्मिक कार्यक्रम सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत - आणि निजामुद्दीनमध्ये सर्व मुस्लिमांना “कोरोनव्हायरस पसरवणारा” म्हणून रंगविणारे टीव्ही चॅनेल्स किंवा निजामुद्दीनमध्ये आरोप-प्रत्यारोप करणारे भाजप नेते किंवा त्यांचे बोलघेवडे मूग गिळून गप्प आहेत. भारताने ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका लशीची निर्यात काही काळासाठी थांबवलीय. कारण देशांतर्गत लशीला आधी प्राधान्य देण्याचे भारताने ठरवले आहे. शिवाय, परदेशी लशीची आयात करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. किंबहुना, आता ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी बहुधा तेही आयात करण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी पत्रकबाजीशिवाय विरोधकांनी काय केले. सत्ताधार्‍यांना धारेवर धरत प्रत्येक नागरिकाला बेड मिळाला पाहिजे यासाठी कोणी रस्त्यावर आल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे माणसाचा मृत्यू स्वस्त झाला आहे, असेच म्हणावे लागणार आहे. सध्या संपूर्ण देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या अभ्यासांतून हे निष्पन्न झाले आहे की, पौष्टिक आहाराच्या सेवनामुळे लसीची परिणामकारकता वाढण्यास मदत होते तसेच तिच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. जनतेनेच स्वतःच्या आरोग्याचे रक्षण काळजीपूर्वक केले पाहिजे अन्यथा व्यवस्थेचे हे कोरोना बळी आणखीनच वाढत जाण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

-शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना लॉकडाउन करायचे की नाही, कडक निर्बंध का सैल, की सगळी सूट द्यावी, लॉकडाउनचे नाव घ्यायचे की बिन नावाचे लॉकडाउन लावायचे असे या न त्या प्रश्नात गेले महिनाभर राज्य सरकार गुंतलेले होते. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापलेल्या सरकार, नेत्यांना, मंत्र्यांना असे सूचत नसेल की या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांना अडकून ठेवणारे तेच लोक आहेत ज्यांनी कोट्यावधींना मानसिक गुलाम बनवून ठेवले होते. वाटल्यास त्यांना विरोधी पक्ष म्हणू शकता. 

इतकी साधी सरळ गोष्ट म्हणा की षडयंत्र सत्ताधारी नेत्यांना मंत्र्यांना समजली नसेल तर त्यांना काय बोलावं. जे काही निर्बंध 5 एप्रिल पासून लावण्यात आले तसेच निर्बंध एक महिना अगोदर लावले असते तर आज कदाचित कोरोनाला नियंत्रणात आणण्यात मदत झाली असती. विरोधी पक्षाने लपाछुपी केली नाही. त्यांनी उघड भूमिका घेतली लॉकडाउन नको. कारण त्यामुळे महामारीवर खरे नियंत्रण आणले गेले असते तर ते सरकारच्या बाजूने गेले असते. विरोधकांना कोरोना रोखायचा नाही त्यास वाढवू द्यायचा आहे; मरणारे मरतील. भिडेंनी सांगितलेच आहे की, ’’जे जे जगण्याच्या लायकीचे नाहीत ते मरतील’’ आता कोण लायकीचे नाही हे विरोधी पक्ष ठरवणार. कोरोना महामारी सध्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. ती आणखीन बाहेर गेली तर हे सरकार पाडायला त्यांना सोनेरी संधी मिळणार आहे. कोरोनाशी काही देण घेणं या विरोधी पक्षाचे नाही. त्यांना हे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी हे निरंतर झटत आहेत. फडणवीसांच्या हाताखाली सगळे मराठे, बहुजन एकवटले आहेत. कसेही करून फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवायची संधी त्यांना मिळावी म्हणजे गंगेत न्हाल्यासारखे होईल.

एक महिन्याचा कालावधी काही थोडा नसतो. हाच निर्णय (कडक-सैल-लॉकडाऊनचा) महिनाभर आधी घेतला गेला असता तर किती लोकांचे प्राण वाचले असते. पण नाही, चर्चा बैठका, विरोधकांना उत्तरे देणं. त्यांनी रोज एक समस्या समोर ठेवणं आणि हे सरकार त्या समस्येत गुंतून जाणं. 

सचिन वाझेला कोठडीत घेऊन आणखी काय-काय त्याच्याकडून बाहेर काढतील आणि कुणा-कुणाचे मंत्रीपद पणाला लागतील हे या सरकारला माहित नाही. याचे नियोजन केंद्राकडे केले जाते. जोवर वाझे जेलमध्ये आहे तोवर ह्या सरकारचा जीव धोक्यात असणार आहे. त्यात या सरकारचे नेतेमंडळी स्वतःची कातडी वाचवायच्या प्रयत्नात दिसते. त्यांना आपलं सरकार वाचवण्याची चिंता दिसत नाही आणि ह्याच वृत्तीमुळे हे सरकार आज ना उद्या, दोन महिने वर्षांनी कोसळले तर यात नवल नसणार.

ज्या सरकारला लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावण्याचा निर्णय घ्यायला महिना दीड महिना लागतो. त्याच्याकडून कोरोनावर नियंत्रण आणण्याची कशी आशा केली जावू शकते. ह्या सरकारनं लक्षात ठेवावे विरोधी पक्षाला कोरोना वाढवायचा आहे. त्या द्वारेच सरकार पाडायचे आहे. दोन समस्या संपतील सरकार आणि जे जगण्याच्या लायकीचे नाहीत. 

कडक निर्बंध लावायला विरोधी पक्षाला आणखीन समाधान आणि आनंद वाटावा यासाठी रमजानचा शुभ अवसर गाठला गेला. त्या आधी गुढी पाडवा, कुंभमेळा, निवडणुका, आंबेडकर जयंती सर्व काही साजरे झाले. आता रमजानचे काय ते पुढच्या वर्षी येईलच. पण रमजानला लॉकडाऊनची भेट विरोधकांना देण्यास आपण सत्तेत असू की नाही हे कोणाला माहित म्हणून ही रमजानचा शुभप्रसंग.



‘‘जो कुरआनच्या मार्गदर्शनाशिवाय वर्तन करतो तो असा आहे जणू गंतव्य (मंजील) निश्चित न करता प्रवासावर निघालेला प्रवासी’’ - (हसन बसरी रहे.)

ल्यहीन आणि कर्करोगाच्या पेशींसारख्या अमर्याद विस्तारलेल्या भौतिक प्रगतीने मानवी आचरणामध्ये अनेक नकारात्मक बदल घडविले आहेत. त्यातील एक बदल लोकांची भाषा बदललेली आहे. ती वाईट झालेली आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पाश्चिमात्य जगातील  लोकांमध्ये ’फ्नक’ हा लैंगिक क्रियेकडे संकेत करणारा शब्द संवाद करतांना सर्रास वापरला जातो. भारतीय समाजामध्ये शिवीगाळ सामान्य बाब झालेली आहे. राजकारण जी की, समाजाला दिशा देणारी संस्था आहे त्यामध्ये सुद्धा देशाच्या पंतप्रधानाला ’फेकू’ विरोधी पक्षनेत्याला ’पप्पू’ म्हणून हाक मारली जाते आणि त्याचे कोणालाच वाईट वाटत नाही. ही बाब समाजाच्या नैतिकतेची सामुहिक पातळी किती खालच्या दर्जाला पोहोचली आहे, याची निदर्शक आहे. 

टी.व्ही.वरील डिबेट्स हा समाजामध्ये विचार मंथन करण्याचा प्रभावशाली मार्ग आहे. त्यात होणाऱ्या डिबेट्सचा दर्जा कसा आहे हे सर्वविदीत आहे. अशा या संवादावर अंकुश बसविण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाही. म्हणून मुद्दामहून हा विषय आज हाती घेतलेला आहे. कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनों, अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि नेहमी सत्य व रास्त बोला.’’ (संदर्भ  सुरे अलअह्जाब आयत नं. 70). या आयातीच्या संदर्भात तफसीर (कुरआनचे स्पष्टीकरण) इब्ने कसीर मध्ये म्हटलेले आहे की, ’’संवाद एकदम स्वच्छ, सरळ, खरा आणि चांगला करा. जेव्हा मनामध्ये ईश्वराचे भय असेल आणि जीभेवर खरेपणा असेल तर त्याच्या मोबदल्यात ईश्वर आपल्या भक्तांना पुण्यकर्म करण्याची सद्बुद्धी देतो.’’ 

तफसीर सिरातुल जनानमध्ये मुफ्ती अबु सालेह मोहम्मद कासीम यांनी, ’’चांगल्या संवादाची’’ व्याख्या करताना  लिहिलेले आहे की, ’’श्रद्धावंतांना ईशभय बाळगण्या आणि खरे बोलण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. फरमाविले गेले आहे की, तुम्ही ईश्वराचे आणि त्याच्या भक्तांचे अधिकार देण्यामध्ये भीती बाळगत रहा. आणि सरळ, खरा आणि न्यायपूर्ण संवाद करत चला. 

आपल्या जीभेची आणि आपल्या वाणीची जपणूक करा. हीच गोष्ट सर्व चांगुलपणाची जननी आहे.’’ यावरून लक्षात येते की, जीभेवर नियंत्रण न ठेवणे, खोटे बोलणे, चहाडी  करणे, शिवीगाळ करणे या वाईट गोष्टी असून, यापासून स्वतःचा बचाव करणे ही स्वतःच्या हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण की, ईश्वराने ईशभय बाळगण्याच्या आदेशानंतर जीभेला आवरण्याचा आदेश दिलेला आहे. 

लक्षात ठेवा मित्रानों! हेच कारण आहे की, इतर कामं करण्यासाठी ईश्वराने मानवाला प्रत्येकी दोन-दोन अवयव दिलेले आहेत. बोलण्यासाठी मात्र फक्त एकच जीभ दिलेली आहे. तिलाही दोन ओठांचे फाटक लावून बंद करून ठेवलेले आहे. एवढेच नव्हे तर 32 दातांची नेमणूक तिच्या संरक्षणासाठी केलेली आहे. थोडक्यात ईश्वराने जीभ घसरणार नाही याची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. म्हणूनच माझे तर म्हणणे स्पष्ट आहे की, किमान ज्यांचा कुरआनवर विश्वास आहे त्यांनी या आयातीचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या जीभेवर कायम नियंत्रण ठेवावे. जेव्हा केव्हा आपल्याला इतरांशी संवाद करण्याची वेळ येईल त्यावेळेस खरे बोलावे, सरळ बोलावे, स्पष्ट बोलावे, नम्रतेने बोलावे. मग संवाद हरला तरी चालेल. लोकांची मनं जिंकायला हवीत. खोटे नाटे बोलून, विकृत अंग विक्षेप करून आक्रमक शैलीत बोलून संवाद जरी जिंकला मात्र त्याबदल्यात लोकांची मनं हरली तर इस्लामच्या दृष्टीने त्याला शुन्य किंमत आहे. उलट तो एक मोठा नैतिक अपराध आहे, ज्याचा हिशोब असे घृणित संवाद करणाऱ्यांना ईश्वरासमोर द्यावाच लागेल. 

प्रसिद्ध इस्लामिक विद्वान इमाम गजाली यांचे संवादा संबंधीचे मत अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ’’ तोच व्यक्ती जिभेच्या वाईटपणापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो जो तिला शरीयतचा लगाम लावून नियंत्रणात ठेऊ शकतो. जिभेचा चांगला वापर त्याला या जगात आणि मरणोपरांत नफा देऊ शकते. मानवाला प्रदान केलेल्या अवयवांपैकी जीभ सर्वात जास्त अवज्ञाकारी आहे. कारण तिला वापरण्यासाठी काहीच श्रम लागत नाहीत. तिच्याद्वारे येणारे संकट आणि पथभ्रष्टतेपासून वाचण्याकडे साधारणपणे लोक दुर्लक्ष करतात. जीभेद्वारे फेकल्या जाणाऱ्या मोहक जाळ्यामध्ये अडकण्यापासून साधारण लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत. हे माहित असतांनासुद्धा की जीव्हा ही सैतानाचे सर्वात प्रमुख अस्त्र आहे.’’ (संदर्भः अह्या उलूमुद्दीन).

        आजकाल एक विचित्र प्रकार समाजामध्ये रूढ झालेला आहे. काही लोक जिभेचा सुंदर, गोड आणि उत्कृष्ट वापर तेव्हा करतात जेव्हा ते दुसऱ्यांशी बोलतात पण जेव्हा ते घरातील इतर सदस्यांशी बोलतात तेव्हा त्यांची जीभ आणि देहबोली कमालीची वाईट असते.  

      दुसऱ्या ठिकाणी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’लोकांशी चांगला संवाद करा.’’ (संदर्भ : सुरे अलबकरात, आयत नं. 83).  कुरआनच्या भाष्यकारांनी या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेले आहे की, सर्वांची आर्थिक मदत करणे शक्य नसते पण सर्वांशी चांगला संवाद करणे, नम्रतेने आणि गोड बोलणे सहज शक्य आहे. म्हणून या ठिकाणी ईश्वराने सर्व लोकांना आदेश दिलेला आहे की, लोकांशी चांगला संवाद करा आणि हे काम अतिशय सोपे आहे. लोकांशी स्वच्छ, सरळ आणि नम्रतेने संवाद करण्यासाठी एक रूपयाही खर्च होत नाही. खरं तर ईश्वराने लोकांना दिलेला हा एक असा आदेश आहे की जो सर्वात सोपा आणि सार्वत्रिक आहे. चांगला संवाद करण्यासाठी कुठल्या एखाद्या विशिष्ट वर्गाची उदा. नातेवाईक, शासनकर्ते वगैरेंची निवड करण्यात आलेली नाही. सर्वांशी नम्रतेने बोला असे म्हटलेले आहे. यावरून या आदेशाची महत्ता लक्षात येण्यास काहीच हरकत नाही. लोकांशी चांगले बोलणे आणि चांगले वागणे (खुश कलामी और खुश अख्लाकी से मिलना) सहज शक्य आहे. पण त्यासाठी ईशभय असणे आवश्यक आहे. भाष्यकारांनी पुढे असेही म्हटले आहे की, सर्वांशीच नम्रतेने बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, जे गर्विष्ट लोक आहेत त्यांच्याशी नम्रतेने बोलण्यामुळे त्यांचा गर्व वाढण्याची शक्यता आहे, अशी साधारण शक्यता असेल तरच त्यांच्याशी नम्रतेने संवाद करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याशी संवाद टाळणे बेहतर. 

सर्व मुस्लिमांनी कुरआनच्या या आदेशाचे निश्चयपुर्वक अंमलबजावणी केली तर फक्त आपले आपसातच संबंध सुरळीत होणार नाहीत तर आपल्या देशबांधवांशी सुद्धा संबंध अत्यंत मधूर होतील. याची आज अत्यंत गरज आहे. कारण टी.व्ही. डिबेट्स आणि समाज माध्यमावरील सर्वसामान्य मुस्लिमांची भाषा पाहिली, त्यांच्या संवादाची पद्धती पाहिली तर  तिच्यात आणि अश्रद्धावान यांच्यात फरक करता येत नाही. याचे कारण संवाद साधणाऱ्या मुस्लिमांपैकी अनेक लोकांना संवादाचे इस्लामी शिष्टाचारच माहित नाहीत हे होय. 

असेही म्हटले जाते की, खरे बोलणे हे कडवट असते. त्यासाठी मराठी भाषेत, ’’कटू सत्य’’ हा शब्दप्रयोगसुद्धा रूढ झालेला आहे. वास्तविक पाहता हा समज खोटा आहे. सत्य हे मानवी प्रवृत्तीच्या अनुकूल असते. म्हणून ते सर्वांनाच आवडते. संवादामध्ये सर्वात श्रेष्ठ संवाद सत्य संवाद होय. मात्र संवाद करणाऱ्यांपैकी दुसऱ्या पक्षाकडे सत्य ऐकण्याची इच्छाशक्ती नसते. त्यात पुन्हा सत्य बोलणे म्हणजे आक्रमक बोलणे असा एक गैरसमज समाजात रूढ आहे. मी खरं बोलतोय म्हणून जोरात बोलतोय, असाही सात्विक आव सत्य बोलणारे आणत असतात. त्यामुळे सुद्धा संवादामध्ये दोन्ही पक्षामधील ओलावा नष्ट होतो. सत्य बोलणे आवश्यक आहे मात्र ते आक्रमकपणे शारीरिक अर्विभावासहीत बोलणे कुरआनने आवश्यक केलेले नाही, हे किमान मुस्लिमांनी तरी लक्षात ठेवल्यास संवाद सहज जिंकता येतो आणि काही कारणामुळे संवाद जरी हरला तरी प्रतीपक्षाचे व संवाद ऐकणाऱ्या कोट्यावधी लोकांची मने जिंकता येतात. त्यामुळे मुस्लिमांनी साम, दाम, दंड, भेद, येन,केन प्रकारेन संवाद जिंकण्याच्याच अट्टाहासाने कधीच संवाद करू नये. कित्येकवेळा असे होते की, अनेक लोकांच्या वर्षानुवर्षे जोपासलेल्या चुकीच्या धारणा जेव्हा तार्किकदृष्ट्या खोडल्या जातात तेव्हा ते त्यांना सहन होत नाही आणि असे लोक मुद्दे सोडून गुद्यावर येतात. त्यांच्या त्या मानसिकतेचा लिहाज (सहानुभूतीपूर्वक विचार) करणे गरजेचे असते. अशा वेळेस आपण सत्यावर असतांनासुद्धा संवाद हरला तर उशीरा का होईना समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते की त्याने आपला मान राखत सत्य असतानाही माघार घेतलेली आहे. ही गोष्ट त्याच्या नजरेमध्ये तुमच्या संबंधीचा आदर वाढविण्यास कारणीभूत ठरते. 

डिबेटमध्ये सहभागी अनेक लोकांचे हितसंबंध व्याज, दारू, अश्लील साहित्य, फॅशन, कॉस्मेटिक्स आणि चित्रपटसृष्टीशी जुळलेले असतात. अशा लोकांना इस्लाम आवडत नाही. इस्लाम हा शब्द उच्चारताच त्यांच्या उरात धडकी भरते. त्यांना आपले उद्योग संकटात दिसू लागतात आणि मग ते मिळेल त्या मार्गाने तुमच्यावर कडी करण्याचा प्रयत्न करून डिबेट जिंकण्याचा प्रयत्न करतात. यात अँकरही सामील असतात. मुस्लिम संवादकर्त्याने अशा लोकांची आर्थिक अपरिहार्यता सुद्धा लक्षात घेतले पाहिजे आणि संवाद करतांना त्यांना ओशाळल्यासारखे होणार नाही, अशा पद्धतीने संवाद करावा.  

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इस्लामने सत्य बोलण्याला एक पॉलिसी म्हणून स्विकारण्याचा आदेश दिलेला नसून एक श्रद्धा म्हणून स्वीकारण्याचा आदेश दिलेला आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या तत्त्वाचा जे लोक स्वीकार करतात ती त्यांची पॉलीसी असते श्रद्धा नसते म्हणून जरासा स्वार्थ आडवा आला की ते ऑनेस्टी (प्रामाणिक) सोडून देतात. अशी शेकडो उदाहरणे रोज आपल्या अवतीभोवती घडत असतात. आज तर परिस्थिती त्याच्याही पलिकडे गेलेली आहे. खोटे इतक्या ताकदीने आणि वारंवारितेने बोलले जात आहे की, खोटेच खरे वाटायला लागलेले आहे आणि त्याचा सामाजिक मानसिकतेवर इतका वाईट परिणाम होत आहे की, छोट्या-छोट्या कारणामुळे जमाव हिंसक होवून मॉबलिंचिंग सुद्धा करू लागला आहे. यावरून सत्य बोलण्याला किती महत्व आहे ते वाचकांच्या लक्षात येईल. शेवटी गुलबर्गाचे द्नखनी कवी  सुलेमान खतीब यांच्या नज्मच्या काही ओळी विरंगुळा म्हणून वाचकांच्या कोर्टात सादर करून रजा घेतो. सर्व देशबांधवांना रमजानच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ईश्वर करो की आपला देश लवकर कोरोनामुक्त होवो आमीन. 

बात हिरा है बात मोती है

बात लाखों की लाज होती है

बात कांटों का ताज होती है

बात फुलों का बाग होती है

बात कहते हैं रब्बे अरनी को

बात उम्मुल किताब होती है

बात बोले कलीम हो जाए

सुननेवाला नदीम हो जाए

बात खंजर की काट होती है

बात शाहीं उकाब होती है

बात हर बात को नहीं कहते

बात मुश्किल से बात होती है.


- एम. आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget