राज्यामध्ये एक डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडत आहेत. या वेळेस पदवीधर संघाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असून भाजप, राष्ट्रवादी आणि जनता दल सेक्युलर यांनी आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत, हे उघड आहे. या निवडणुकीतही पक्षाव्यतिरिक्त उमेदवाराची जात आणि तो कोणत्या भागातील आहे हा महत्त्वपूर्ण फॅक्टर ठरणार आहे. सुदैवाने किंवा आश्चर्यकारक पद्धतीने म्हणा तिन्ही पक्षांचे उमेदवार ह्यांची जात आणि वास्तव्य एकाच जिल्यातील असल्याने निकालासाठी मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे, हे मात्र निश्चित.
पुणे पदवीधर मतदार संघाची रचना पुणे व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर ह्यांच्याशी निगडीत आहे. याचाच अर्थ पाच जिल्ह्यांतून पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठवणार आहेत. खरे तर पदवीधर मतदार हा सुशिक्षित, सुसंस्कृत आणी स्वतः विचार करून निर्णय घेणारा असल्याने उमेदवारांना मीच कसा योग्य हे स्पष्ट करणे आव्हानात्मक ठरणार आहे.
पुणे पदवीधर मतदार संघातून एकूण ४ लाख २४ हजार ९८३ पदवीधर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १,३६,६११ मतदार असून एकूण मतदार संख्येच्या तब्बल ३२ टक्के प्रमाण पडते. राष्ट्रीयकृत पक्षाचे उमेदवार या जिल्ह्यातील नसल्याने पुण्यातील मतदार विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालतील हे चाणाक्ष मतदारांचा कौल लागल्यानंतरच स्पष्ट होईल. पुण्यानंतर कोल्हापूर (२१ टक्के), सांगली (२० टक्के) सातारा (१४ टक्के) आणि सोलापूर (१३ टक्के) असे मतदार असल्याचे दिसून येते.
या मतदारसंघामध्ये प्रथमच तरुण मतदारांचे मत मोठे निर्णायक ठरणार असून विविध वयोगटातील मतदारांचे प्रमाण हे खालील बाबीवरून स्पष्ट संकेत दर्शवतात.
(१) सर्वाधिक मतदार वय वर्षे २६ ते ४० या वयोगटात तब्बल २२,३७,०९१ असून हे प्रमाण एकूण मतदारांच्या चक्क ५६ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून येते.
(२) त्यानंतर वयोगट ४१ ते ५० यामध्ये २१ टक्के, वयोगट ५१ ते ६० यामध्ये १० टक्के, वयोगट ६१ ते ८० यामध्ये ४.४ टक्के आणि वयोगट ८१ ते १०० यामध्ये ०.१५ टक्के असे प्रमाण असल्याचे आढळते.
(३) वयोगट १०० व त्यावरील २१ मतदार असून या शतकातील सर्वाधिक जुने सुमारे ७५ ते ८० वर्षांपूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी पदवी धारण केली असावी हे उघड आहे. कदाचित त्यांना हा शेवटचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी प्राप्त होणार आहे. (या निवडणुकीद्वारे)
वरील बाबीवरून हे स्पष्ट होते की जे मतदार सध्या सेवानिवृत्ती अथवा वयाची ५० वर्षे ओलांडत आहेत त्या वयोगटापासून पदवीधर होण्याचे प्रमाण हे समाधानकारकरित्या वाढत आहे. या वयोगटाच्या तुलनेत चाळीशी ते पन्नाशी या वयोगटात मतदारांचे प्रमाण दुपटीहून अधिक असल्याचे दिसून येते आणि २६ ते ४० वयोगटाशी तुलना करता हे प्रमाण पाच पटीहून अधिक असल्याचे दर्शवते. याचाच अर्थ १९६० ते १९९५ या कालावधीत जन्मरांचे प्रमाण १० वरून ५६ टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट होते.
यानंतर सर्वांत महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो ‘जात’. अलीकडील काळात प्रत्येक निवडणूक जातीच्या फॅक्टरवरच लढवली आणि जिंकली जाते हे कटू सत्य आहे. अर्थात ही पदवीधर निवडणुकही कशी अपवाद ठरू शकेल? प्रामुख्याने हिंदू समाजातील बहुचर्चिला जाणारा मराठा समाज, ओबीसी, दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण मते असे चित्र निर्माण नाही झाले तरच नवल!
सध्या गाजत असलेले मराठा आरक्षण सर्व मराठी उमेदवार आपल्या मराठी मतदाराला कसे आकृष्ट करतील, यावरच विजय अवलंबून असणार आहे.
खरे तर नावात काय आहे? असे सेक्सपियरने म्हटले होते, परंतु या निवडणुकीत मतदारांची नावे किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे हे खालील बाबीवरून दिसून येते. पुणे पदवीधर मतदारसंघातील ४ लाख २४ हजार ९८३ मतदार यादीत सर्वाधिक पदवीधर असणाऱ्या आडनावांचा शोध घेण्यात आला. त्यात खालील धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत.
सर्वाधिक पदवीधर मतदार ‘पाटील’ या आडनावाचे असून त्याचे प्रमाण एकूण मतदारांच्या चक्क ८५ टक्क्यांहून अधिक आहे. (एकूण पाटील पदवीधर - ३६४०१) त्यानंतर जाधव (१२६५६), शिंदे (९८३२), पवार (८६२५), माने (५७४९) या आडनावांचा क्रम आहे. तर कांबळे बंधुंनी सहाव्या क्रमांकावर येत ५३७२ मतदार असल्याचे दाखून दिले आहे. कुलकर्णी बंधु यादीमध्ये ९व्या क्रमांकावर असून एकूण मतदार ५०८२ (१.१९ टक्के) आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिमांमध्ये शेख बंधुंनी समाजातील सर्वाधिक पदवीधर २४१७ मतदार आणि यादीत २१ वे स्थान पटकावले आहे. अर्थात हे प्रमाण फक्त ०.५ टक्के असे नगण्य आहे.
- असलम जमादार
Post a Comment