या आठवड्यात अरमेनिया आणि अजर बैजान या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये सरळ युद्ध सुरू झाले असून, दोन्हीकडील अनेक माणसे यात मरण पावलेली आहेत. या युद्धाचे प्रमुख कारण नागोरनो-काराबास नावाचा तो पहाडी इलाका आहे ज्याला अजरबैजान आपला म्हणतो. या पूर्वीही 1990 च्या दशकामध्ये याच इलाख्यावरून दोघात युद्ध झाले होते. 1994 साली संपलेल्या त्या युद्धात या इलाख्यावर अरमेनियाचा कब्जा झाला. या युद्धामध्ये 30 हजार पेक्ष जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर 10 लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते. या भागात गॅस आणि तेलाच्या पाईपलाईन या जमिनीखालून गेलेल्या आहेत. युद्ध जर थांबले नाही तर या पाईपलाईनला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. असे झाल्यास इराण, तुर्की आणि रशिया या युद्धात सामील होउ शकतात आणि युद्धाची व्याप्ती वाढू शकते.
अरमेनिया आणि अजर बैजान हे दोघेही सोव्हिएत संघाचे सदस्य राहिलेले आहेत. सोव्हिएत संघाच्या स्थापनेच्या पूर्वीसुद्धा कॉकेशस इलाख्यातील या पहाडी भूमीला सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्व असल्यामुळे अजरबैजान आणि अरमेनियामध्ये लढाया झालेल्या आहेत. अजरबैजान एक मुस्लिम राष्ट्र असून, तेथील लोक तुर्क वंशाचे आहेत. म्हणूनच तुर्कीने यात अजरबैजानची बाजू घेउन अरमेनियावर युद्ध सुरू केल्यचा आरोप लावलेला आहे. अरमेनिया हा ख्रिश्चन बहुल देश असल्यामुळे यात मुस्लिम विरूद्ध ख्रिश्चन असाही कोन निर्माण झालेला आहे. अरमेनियाच्या पाठीशी रशिया असून, अजरबैजानच्या पाठीशी तुर्कस्तान आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे अजरबैजानशी सुद्धा सौहार्दाचे संबंध असल्यामुळे जरी ते अरमेनियाची बाजू घेत असले तरी त्यांनी युद्धविराम करण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू केलेले आहेत. जोपर्यंत संयुक्त राष्ट्र यात पुढाकार घेउन हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत अधुनमधून अजरबैजान आणि अरमेनियाचे हे युद्ध सुरूच राहणार आहे. जागतिक शांतीच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्राने यात तात्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
Post a Comment