बशीर शेख
जीवनाची वाटचाल सत्यावर आधारित व्यवस्थेवर नसेल तर ती कुठल्याही क्षणी ढासळू शकते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे़ आज जगात प्रामुख्याने भांडवलशाही आणि साम्यवादी व्यवस्थेचे वर्चस्व आहे़ या दोन्ही व्यवस्थेत मानवी जीवनाला सुखाच्या अभासी दुनियेत घेऊन जाऊन सोडले जाते़ या व्यवस्थेत अकांठ बुडालेल्या व्यक्तीला बाहेर निघण्यासाठी दोनच पर्याय उरतात़ एक तर सत्यावर आधारित व्यवस्थेत जगण्यासाठी प्रारंभी मरणयातना सहन करत नियमांचे पालन करून बाहेर पडावे लागते़ तर दूसरे आत्महत्या केल्याशिवाय समोर पर्यायच दिसत नाही़ अशीच काहीशी परिस्थिती सुशांतसिहच्या प्रकरणाचा धांडोळा घेतल्यानंतर समोर येते़
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भांडवलशाही व्यवस्थेने अंथरलेल्या मुलायम बिछान्यात किती टोकदार काटे आहेत, हे दिसून आले़ नशा ही जीवनाची दुर्दशा असते, हे सर्व बॉलीवुडमधील उच्चविद्याविभूषित कलाकारांना माहित आहे़ चंदेरी दुनियेत वावरणार्या जगातील अधिकतर कलाकारांचे आयुष्य हे ड्रग्ज सेवनात बुडालेले असल्याचे दिसून येते़ त्यामुळे या कचाट्यातून बॉलीवुड तरी कसे सुटणार? सोबत या ड्रग्जच्या दुनियेला राजकीय, प्रशासकीय प्रणालीचे पाठबळ असल्याशिवाय ते फोफावत नाही हे ही तेवढेच खरे़ माणसाच्या जीवनाला पोखरून टाकणार्या नशेच्या सर्वच वस्तूंवर प्रतिबंध लागला पाहिजे़ परंतु शासकीय यंत्रणेत पसरलेल्या भ्रष्टाचारामुळे यावर प्रतिबंध असूनही प्रतिबंध लावला जात नाही़ त्यामुळे नशेपासून देशमुक्त करण्याचे स्वप्न भांडवलशाही व्यवस्थेत कधीही पूर्ण होऊ शकत नाही़ नशेला प्रोत्साहन देणे म्हणजे एकप्रकारे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखे आहेे़ आतंकवाद्यांचे, नक्षलवाद्यांचे मन परावर्तीत करण्यात सरकारला मोठे यश येताना दिसून येते़ मात्र नशेत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी व्यवस्थेचा चक्क पराभव होताना दिसून येतो़ आतंकवाद्यांत, नक्षलवाद्यांत अशिक्षित लोकांचा अधिक भरणा दिसून येतो़ मात्र नशेच्या गर्तेत अडकलेल्यांमध्ये सर्वाधिक सुशिक्षितांचा भरणा दिसून येतो़ त्यामुळे आयुष्यभर शिक्षण-शिक्षण म्हणत आई-वडिलांनी मुलांना उच्चविद्याभूषित करण्यासाठी अपार कष्ट उपसलेले असतात़ मात्र मोठे झाल्यानंतर ते अकांठ नशेत बुडालेले दिसतात़ भांडवलशाही आणि साम्यवादी व्यवस्थेला पर्याय ईश्वरीय व्यवस्थाच ठरू शकते, जी की कुरआनमध्ये सांगितलेली इस्लामी व्यवस्था आहे़ यामध्येच मानवकल्याणाचे हित आहे़ ही व्यवस्था मानवी जीवनावर परिणाम करणार्या सर्व प्रकारच्या नशेवर प्रभावी प्रतिबंध घालते़ आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक घटकांत नैतिकतेला प्रोत्साहित करते़ मानवकल्याण हा इस्लामी व्यवस्थेचा मूळ पाया आहे़ त्यामुळे या व्यवस्थेला समजून घेण्यासाठी प्रत्येकाने याचा अभ्यास करणे गरजेचे आहे़
ड्रग्जमधील पुरूषी मक्तेदारी संपुष्टात; महिलांचा खांद्याला खांदा
नशेचे पदार्थ सेवनावर नेहमी पुरूषांची मक्तेदारी असायची़ मात्र सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्राच्या समोर आले की, इथे महिलाही काही कमी नाहीत़ बॉलीवुडमधील आजच्या पिढीतील मुख्य फळीच्या अभिनेत्री ड्रग्जसेवन करत असल्याचे समोर आले आहे़ पेज 3 दुनियेतील महिला सुरक्षित नसल्याचे या प्रकरणाने समोर आणून दिले आहे़ त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल नेमक्या कोणत्या दिशेने होत आहे, हे सांगण्यापेक्षा समजून घेतलेलेच बरे़
माध्यमे, तपास यंत्रणा आणि सुशांतसिंह प्रकरण
लोकशाहीत माध्यमांची तिसरा स्तंभ म्हणून ओळख आहे़ त्यामुळे निश्चितच माध्यमांबद्दल लोकांत आदरयुक्त भावना निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र माध्यमांचे काहीं वर्षांपासूनचे वर्तन पाहता त्यांच्याबद्दल लोकांत नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. माध्यमांनी खासकरून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आपली समाजातील पत गमावलेली आहे. स्पर्धेच्या नादात आणि चापलुसीच्या गर्तेत मीडिया अडकलेली आहे. काही माध्यमे वगळता अधिकतर माध्यमे आपली मुख्य भूमिका विसरलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची पत्रकारिता पाहता पेड पर्व चालवित असल्याचे दिसून येत आहे. लोकांना तिटकारा येईल असे कार्यक्रम आणि ब्रेकिंग न्यूज दाखविल्या जात आहेत. सुशांतसिह प्रकरणात तर माध्यमांनी आपली होती नव्हती तेवढी लाज गमाविलेली असल्याचे दर्शकांनी सांगितले.
तपास यंत्रणावर लगाम घातला पाहिजे
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी लोकमत यूट्यूबवरच्या ‘ग्राऊंड झिरो’ मुलाखतीत म्हटले आहे की, कायदा व सुव्यवस्था राखणार्या सीबीआय, ईडी सारख्या संस्थांनी निवडक माहिती माध्यमांना देण्यामागे काही तरी अजेंडा आहे. कोणाला तरी बदनाम करायचे आहे किंवा या गुन्ह्यातून जे निष्पन्न होईल त्याच्याशी त्यांचे सोयरसुतक नसेल; असाच याचा अर्थ निघतो. पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धीचा रोग जडला आहे. तपासातील बारकावे प्रसार माध्यमांना दिले जातात. माध्यमं म्हणतात की, आमच्या सोर्सनी ही माहिती दिली. ईलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तुलनेत प्रिंट मीडियाला हा रोग नाही. ते भानावर आहेत. ईलेक्ट्रॉनिक मीडिया गुन्ह्याच्या साक्षीदारांना पॅनलवर बोलावतात, त्यांची मुलाखत घेतात. तपास यंत्रणेला त्या साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि विविध चॅनलला दिलेला जबाब यात तफावत असते. यातून फायदा आरोपीचा होतो. मग आरोपी उलट तपासणीत असे दाखवून देतो की, त्या साक्षिदारांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जबाब दिले आहेत. न्यायालयात ते पटवून देतात आणि अमूक साक्षिदाराची साक्ष अविश्वसनीय मानावी असा युक्तिवाद होतो. या तपास यंत्रणांना दोन खडे बोल सुनवायला सरकार का मागे पुढे पाहते, याचे उत्तर मला सापडले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर वेळीच लगाम घातला पाहिजे, असेही अॅड. निकम म्हणाले.
Post a Comment