Halloween Costume ideas 2015

स्वातंत्र्य आणि मानव


स्वातंत्र्य ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते. कुठेही राहण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे, हवा तो जीवनसाथी निवडण्याचे, हवे ते वाचण्याचे, लिहिण्याचे, प्रकटीकरणाचे असेही स्वातंत्र्य हवे असते. स्वातंत्र्याची कल्पना कितीही विस्तारता किंवा आक्रसता येते.
माणूस ज्या कुठल्या परिस्थितीत असतो, त्यात तो सतत स्वत:ला घडवत, बदलत राहण्याचा प्रयत्न करतो. हे मनुष्यप्राण्याचे वैशिष्ट्यच आहे. यासाठी त्याला जे पर्याय असतील, त्यातील हवा तो पर्याय निवडता येत असेल, तर तो मनुष्य स्वत:ला स्वतंत्र अथवा मुक्त समजतो. भोवतालची परिस्थिती किंवा अन्य व्यक्ती त्याच्यासाठी पर्याय ठरवत असेल, तर तो स्वत:ला स्वतंत्र किंवा मुक्त समजत नाही. स्वातंत्र्याची कल्पना ही व्यक्तीगणिक वेगळी असते. हजारो वर्षे माणूस म्हणून उत्क्रांत होताना झालेले संस्कार आणि एक व्यक्ती म्हणून समाजात वाढताना, वावरताना होत राहणारे संस्कार यांतून स्वातंत्र्याची कल्पना निर्माण होते. कधी कधी एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र्याची कल्पना हीच अनेक प्रकारचे बंधकत्व दाखवत असते; पण ते त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी म्हणून वावरणारी व्यक्ती म्हणेल, की माझ्या मनावर अमुकच भाजी करण्याचे दडपण नसते; कारण मला आमच्या घरी कुठलीही भाजी करण्याचे स्वातंत्र्य आहे. एखाद्या पिंजऱ्यातील पक्ष्याला आपल्याला पिंजऱ्यात कुठेही बसण्याचे स्वातंत्र्य आहे, असे वाटण्याचे स्वातंत्र्य असू शकतेच की! असे लहानमोठ्या पिंजऱ्यांत माणसे स्वातंत्र्य उपभोगत असतात. एखाद्या व्यक्तीला घरामधे, कामाच्या किंवा इतर ठिकाणी जाणवणारे स्वातंत्र्य आणि बंधकत्व जेव्हा लक्षात येते, तेव्हा तो अंतर्मुख होतो. एका समग्र अशा स्वातंत्र्याचा विचार करू लागतो. त्याच्या लक्षात येते, की दिसण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे बाह्य स्वातंत्र्य जसे आहे, तसेच आपल्या आतही एक स्वातंत्र्य किंवा मुक्ती माणसाला हवी असते. मनातील वेगवेगळ्या प्रकारचे भय, मनाला झालेल्या जखमा, चिंता, दु:ख, काळज्या यांपासूनही मुक्तता हवी असते. यासाठी मानसिक शक्तीची गरज असते. ती कमी पडली, की माणूस गुरू, ईश्वर नाहीतर समुपदेशक अशा कुणाकडे तरी वळतो.
कधी कधी एखाद्या व्यक्तीला स्वत:साठी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नको वाटते. स्वत: घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जाण्याची जबाबदारीही घ्यावी लागते. अशा निर्णय भयातून सुटका करून घेण्यासाठी ती व्यक्ती दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीला आपल्यासाठी निर्णय घ्यायला सांगते. आपल्यासाठी दुसऱ्याने निर्णय घ्यावेत, हा निर्णय त्याच व्यक्तीने घेतलेला असतो. याचा अर्थ निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यापासून सुटका होतच नाही! त्यामुळे अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सार्त्र म्हणतात, 'माणसाला स्वातंत्र्याचा अभिशाप मिळालेला आहे.' जे. कृष्णमूर्तींसारखे तत्त्वज्ञ म्हणतात, 'माणसाला सर्व ज्ञातापासून मुक्त होण्याची गरज आहे.' अर्थात, या गोष्टी समजून घेण्यासाठी अभ्यासपूर्वक चिंतनाची गरज आहे. सर्वसामान्य माणसाकडे बघितल्यावर प्रश्न पडतो, स्वातंत्र्य म्हणजे काय? माणसाला खरेच स्वातंत्र्य हवे आहे का? हवे असेल, तर ते कशापासून आणि कशासाठी हवे आहे? कारण स्वातंत्र्य हवे असते, तर मुळात माणूस संसार, घरदार यांच्या फंदात पडला असता का? माणसाला संसाराचे पाश हवे वाटतात. त्यांच्यासाठी तो धडपड करतो; पण या पाशांचे बंध कधीतरी काचायला लागतात. तो काचही त्याला नको वाटायला लागतो. त्यातून सुटण्यासाठी तो प्रयत्न करतो; त्यामुळे खास स्वत:चे स्वत:साठी असे अवकाश असले, की त्याला पुरेसा मोकळेपणा वाटतो. स्वत:च्या स्वातंत्र्याविषयी जागरुक असणारी व्यक्ती दुसऱ्याच्याही स्वातंत्र्याविषयी तितकीच जागरूक राहिली, तर अनेक प्रश्न सुटतील. त्यासाठी स्वत:चे अवकाश जपायला हवे, तितकाच दुसऱ्याच्या अवकाशाचाही आदर करायला हवा.

लेखक :प्रा.भगवान केशव गावित
ग्रंथपाल
मो.नं.९६०४०११०२६
इमेल-bhagvangavit@gmail.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget