Halloween Costume ideas 2015

राम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्याशी केली जाऊ शकेल काय?

Modi
5 ऑगस्ट रोजी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या स्थानावर राममंदिरच्या बांधकामाचे भूमीपूजन केले जेथे 28 वर्षाअगोदर बाबरी मस्जिदला उध्वस्त करण्यात आले होते. पंतप्रधानांनी एका धर्मनिष्ठ हिंदूच्या वेशभूषेमध्ये यजमान या नात्याने एक दीर्घ पूजा केली. यावेळेस संघाचे प्रमुख उपस्थित होते. संघ ती संस्था आहे जी धर्मनिरपेक्ष विविधवर्णी आणि बहुलतावादी भारताला हिंदू राष्ट्र बनवू पाहते.
    पूजेनंतर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी असा दावा केला की, या 5 ऑगस्टची तुलना 15 ऑगस्टशी केली जाऊ शकते, ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला. ते म्हणाले, ” भारताच्या स्वातंत्र्याची लढाई लढतांना अनेक पिढ्यांनी आपले सर्वस्व बलिदान केले होते. 15 ऑगस्ट आपल्याला त्या लाखो लोकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. त्याचप्रमाणे राम मंदीर शेकडो वर्षाच्या संघर्षाचा साक्षीदार आहे.” ज्याप्रमाणे समाजातील सर्व वर्गातील लोक महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली एकवटून देशाला स्वतंत्र करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती त्याचप्रमाणे दलित, आदिवासी आणि सर्व अन्य वर्गांनी राममंदिराचा पाया रचण्यासाठी आपापले योगदान दिलेले आहे. भगवान रामाचे अस्तित्व मिटविण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र शेवटी राम जन्मभूमी विनाश आणि पुनर्जीवनाच्या चक्रातून मुक्त झाली. भारतातील कोट्यावधी लोकांना अनेक शतकांपासून या घटिकेची वाट पाहिली होती. त्यांची इच्छा आज फलद्रुप झाली.”
    स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या पक्षांपैकी फार कमी लोकांनी पंतप्रधानांच्या या कथनावर आपत्ती दर्शविली आहे. मात्र कोणीही पंतप्रधानांना हेे निदर्शनास आणून दिलेले नाही की, स्वातंत्र्याची तुलना राम मंदिराच्या भूमीपूजनशी करणे व्यर्थ आहे. भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा सत्य, अहिंसा आणि सर्वसमाविशकतेवर आधारित आणि लोकतांत्रिक संघर्ष होता. ते जगातील सर्वात मोठे जनआंदोलन होते. ज्यामुळे भारतातून उपनिवेशकवाद संपला. तर जगाच्या पाठीवरील अनेक देशातील उपनिवेशाविरूद्ध मुक्तीसंघर्षाला प्रेरणा दिलेली आहे.
    या आंदोलनाने ब्रिटिश शासकांच्या लुटमार करून वर्चस्व कायम करण्याच्या वर्तनाविरूद्ध औपनिवेशिक भारताची आवाज बुलंद केली होती. या आंदोलनाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मुल्यांना रेखांकित केले होते. ज्या दिग्गज नेत्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली त्यांनी उच्चमुल्यांचे रक्षण केले होते. सर्वांसोबत न्याय हा या स्वातंत्र्य संघर्षाचा मूलमंत्र होता. या संघर्षामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकासाठीही स्थान होते. यात दलित, महिला आणि आदिवासींनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कठीण प्रयत्नामुळे देशाच्या विभिन्न भागांमध्ये राहणार्‍या लोकांमध्ये एकता आणि बंधुत्वाची भावना रूजली होती.
    15 ऑगस्ट 1947 ला हा संघर्ष फळाला आला. त्या दिवशी जो देश अस्तित्वात आला त्याची श्रद्धा धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर होती. जी राज्यघटना घटनाकारांनी बनविली त्यात भारताला आधुनिक राष्ट्र-राज्याच्या सिद्धांतांवर उभे करण्याची कल्पना केली होती. स्वातंत्र्यानंतर भारताने औद्योगिकरण आणि आधुनिक शिक्षणाचा मार्ग चोखाळला. त्यावेळी अनेक वैज्ञानिक संस्थांची पायाभरणी करण्यात आली आणि वैज्ञानिक विचारांना वेग दिला. धर्मनिरपेक्षतेला देशाच्या राजनैतिक, सामाजिक व्यवस्थेचा आधार घोषित केले. देशाने उद्योग, कृषी आणि शिक्षण इत्यादी क्षेत्रात आशेपेक्षा जास्त प्रगती केली.
    राममंदिर आंदोलन त्या सर्व मुल्यांना नाकारणारे आंदोलन होते ज्या मुल्यांवर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा पाया रचला गेला होता. या आंदोलनाचा आधार ना सत्य होता ना अहिंसा होती. हे संपूर्ण आंदोलन या एका अवधारनेवर आधारित होते की, भगवान राम यांचा जन्म ठीक त्याच ठिकाणी झाला ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभी होती. इ.स.1950 मध्ये रामललांच्या मूर्त्यांची तेथे स्थापना केली गेली. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद उध्वस्त केली गेली. या दोन्ही घटना अवैध, बेकायदेशीर आणि फौजदारी दखलपात्र गुन्ह्याच्या होत्या. न्यायपालिकेने अगोदर विवादित भूमीचे तीन भाग करून ते वाटून दिलेले होते. त्यातील एक तृतीयांश भाग मुस्लिमांना दिला होता. मात्र नंतरने संपूर्ण जमीन हिंदूंना देण्यात आली. आश्‍चर्य म्हणजे न्यायालयाने हे स्वीकार केले की, मस्जिदीला उध्वस्त करणे एक अपराधिक कृत्य होते. न्यायालयाने असेही मत मांडले की भगवान रामाचा जन्म नेमका त्याच ठिकाणी झाला काय हे नक्की सांगता येत नाही.
    स्वातंत्र्याच्या आंदोलना विपरित राममंदीर आंदोलनाचा आधार मिथक, अपराध आणि हिंसा होती. रथयात्रेच्या दरम्यान आणि तद्नंतर जी हिंसा झाली त्यात हजारो लोक मारले गेले. बाबरी मस्जिदच्या विध्वंसानंतरही देशभरात जबरदस्त रक्तपात झाला. एकीकडे स्वाधिनता आंदोलनाचे चरित्र सर्वसमावेशी होती. दुसरीकडे या आंदोलनाने अल्पसंख्यांंकांना इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचविले की, मुस्लिमांचा एक मोठा गट आपल्या मोहल्ल्यांपुरताच अंकुचित झाला. याउलट स्वातंत्र्यसंग्रामाने हिंदू आणि मुसलमांनांना एकमेकांच्या जवळ आणले होते.
    राममंदिर आंदोलन उच्चनीच आणि अंधश्रद्धेच्या मुल्यांना पुनर्जिवीत करणारे आंदोलन होते. या आंदोलनाने अंधश्रद्धेला वाढविले. या उलट स्वातंत्र्याच्या आंदोलनाने वैज्ञानिक दृष्टीकोणाला बळ दिले होते. राममंदिर आंदोलनामुळे केवळ इतिहासातील घटनांना गौरवशाली बनविण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळाले आहे. निसंदेहपणे प्राचीन भारतात चिकित्सा विज्ञान, गणित आणि आंतरिक्ष विज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली होती. परंतु याचा अर्थ असा नाही की आधुनिक विज्ञानातील सर्व आविष्कारांना आपण प्राचीन भारतीय ऋषी-मुनींचे काम असल्याचे श्रेय देऊ.
    पंतप्रधान यांनी जो काही दावा केला आहे तो एकीकडे परंतु, राममंदिर आंदोलन शेकडो वर्ष जुने नाही. यासंबंधी काही घटना 19 व्या शतकाच्या शेवटपर्यंत घडत राहिल्या. एकंदरित हे आंदोलन काही दशकापुरते जुने आहे. याची सुरूवात लालकृष्ण आडवाणींनी भाजपाच्या राजनैतिक अजेंड्यामध्ये राममंदिरला सामील करून केली होती.
    हे सर्व माहित असतांनासुद्धा जाणून बुजून 5 ऑगस्टची तुलना 15 ऑगस्टशी का केली जात आहे. याचे कारण हे आहे की, जे लोक राममंदिरचे कर्ता-धर्ता आहेत त्यांच्या वैचारिक पूर्वजांची स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कुठलीच भूमिका नव्हती. म्हणून कसे तरी करून हे लोक जनतेमध्ये आपली स्वीकार्हता वाढवू इच्छित आहेत. त्याच उद्देशाने ते या आंदोलनाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडून भारताने केलेल्या प्रगतीला कमी करून दाखवित आहेत. आणि म्हणूनच ते या विघटनकारी राम मंदिर आंदोलनाची तुलना सर्वसमावेश स्वाधीनता आंदोलनाशी करीत आहेत. स्वाधिनता आंदोलनामध्ये निहित धर्मनिरपेक्षतेने आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका वठविलेली आहे. राममंदिर आंदोलनामधील निहित सांप्रदायिकतेने आम्हाला भारतीय राज्यघटनांच्या मुल्यांपासून दूर, पुनरूत्थानवाद आणि अंधश्रद्धेच्या अंधारलेल्या बोळींमध्ये ढकलेले आहे.

- राम पुनियानी
 (मूळ इंग्रजी लेखाचे हिंदीत रूपांतर अमरिश हरदेनिया यांनी केले तर हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget