Halloween Costume ideas 2015

जिंदा रहने के लिए तेरी कसम...

महाराज दरबारात म्हणजेच आपल्या दिवाणखान्यात व्याघ्रासनावर एकटेच बसले आहेत. तसे तर राजा ज्या आसनावर बसतो त्याला सिंहासन म्हणण्याची प्रथा आहे, पण महाराजांना अनेक जुन्या प्रथा आणि जुने संबंध मोडीत काढण्याची सवय असल्यामुळे तसेच सिंहापेक्षा त्यांना वाघोबा अधिक प्रिय असल्यामुळे त्यांनी आपण ज्या आसनावर बसतो त्याला ‘व्याघ्रासन’च म्हणावे असा आदेश काढलेला आहे. सध्या कोरोनामुळे ‘वर्वâ प्रâॉम होम’ सुरू असल्यामुळे महाराज घरातच असतात. घरातच दरबार भरतो. घरातूनच राज्यकारभार हाकला जातो. सध्या लॉकडाऊनच्या काळात आपणच घराबाहेर भटकायला लागलो तर प्रजेला कोणत्या तोंडाने सांगणार की घरात बसा म्हणून, असा सुज्ञ विचार करून महाराज घरातच बसतात. त्यामुळे अजून एक फायदा होतो, त्यांना लवकरात लवकर घरी बसवावं म्हणून टपून बसलेल्या देवा नानांना तशी संधीच मिळत नाही, कारण महाराज तर कायम घरीच बसलेले असतात!आता घरीच बसलेल्याला परत घरी कसं बसवणार बुवा, हे कोडं काही देवा नानांना सुटता सुटत नाही!
‘कोण आहे रे तिकडे?' महाराजांचा आवाज दुमदुमतो. क्षणार्धात दारावरचा सेवक हात बांधून समोर उभा राहतो.
‘जी. आदेश करावा.’
‘त्या आमच्या नारदला बोलव. ताबडतोब.' आदेश सुटतो.
‘जी.'
थोड्याच वेळात महाराजांचा नारद दोन्ही हात समोर बांधून, मान खाली घालून, चष्म्यातून वर पाहत महाराजांसमोर उभा असतो. त्याच वेळी पाश्र्वभूमीवर, ‘जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम.' हे गाणं वाजत असतं.
‘काय आदेश महाराज?' एरवी वाघासारखी डरकाळी फोडणाऱ्या गळ्यातून चिरका आवाज जेमतेम बाहेर पडतो. ‘आणि हे असं गाणं कसं ऐकताय आपण?'
‘नारदा, तुझा तर सर्वत्र संचार असतो ना? मग आम्हाला जी बातमी कळली ती तुला कशी कळली नाही अजून?' महाराज नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत विचारणा करतात. ‘कोणती बातमी महाराज?' आपल्या बोलण्याकडे महाराजांनी साफ दुर्लक्ष केलं आहे याची जराही खंत न बाळगता नारद विचारतो. ‘अरे, आम्ही या व्याघ्रासनावर ज्यांच्या कृपेने बसलो आहोत ते शरदरावच आमच्यावर नाराज आहेत म्हणे? असं कसं चालेल?चालणारच नाही. किंबहुना आम्ही ते चालवूनच घेणार नाही. काहीतरी कर ताबडतोब. कोणीतरी आमच्या पायाखालची सतरंजी ओढतोय असं वाटतंय आम्हाला. तूच गेला होतास ना शरदरावांकडे आपल्याला सत्ता मिळावी म्हणून? आता परत तूच जा त्यांच्याकडे, आपली सत्ता टिकावी म्हणून. इतक्या खटपटी लटपटी करून मिळवलेली सत्ता इतक्या सहजासहजी जायला नको. जायला नको म्हणजे काय जायलाच नको. ती आपल्यापासून दूर जायला तयार असेल, पण आपण आहोत का तयार तिच्यापासून दूर जायला?'
‘समजलो महाराज. काळजी करू नये. सतरंजी काही फक्त आपल्याच पायाखाली नाहीये. ती प्रत्येकाच्या पायाखाली असते आणि आपल्यालाही ती ओढता येते. लहान तोंडी मोठा घास झाला तर माफ करावे, पण शरदराव फार वेगळे आहेत. त्यांना समजायला दहा जन्म घ्यावे लागतील.'
‘खामोऽऽश! असं बोलतोस आम्हाला? जीभ छाटून हातात दिली जाईल. समजलास?'
‘माफी असावी महाराज. मी आपल्याला नाही त्या विरोधी पक्ष नेत्यांना बोलत होतो.'
‘ठीक आहे.'
‘महाराज, पण शरदराव तर सांगतात की ‘आमच्यात मतभेद नाहीत, सरकार पाच वर्षं टिकेल!’ म्हणून.'
‘ते सर्व ठीक आहे, पण आमचे पिताश्री त्यांच्याबद्दल जे काही बोलायचे ना ते आठवलं की त्यांच्याबद्दल विश्वासच वाटत नाही. आणि काल तर खुद्द वसंतदादासुद्धा स्वप्नात येऊन इशारा देऊन गेलेत.'
‘महाराज आजच बोलतो शरदरावांशी आणि खुंटा हलवून बळकट करून घेतो.'
‘नारदा, फोनवर बोलू नकोस त्यांच्याशी. मी जे गाणं ऐकतोय ना त्याचा अर्थ काळतोय का तुला?प्रत्यक्ष भेट त्यांना. मी तर म्हणेन की, तुझ्या त्या दैनिक हमरीतुमरीसाठी त्यांची एक
मॅरेथॉन मुलाखत घेऊन टाक. आठवडाभर आधीपासून रोज त्या मुलाखतीची जाहिरात कर. सर्वांनी ती मुलाखत वाचावी, ऐकावी आणि बघावी म्हणून जे जे करावं लागेल ते सर्व कर. तुझ्यातली
लांगुलचालनाची जन्मजात कला वापरून त्यांच्या तोंडून माझी स्तुती करवून घे आणि सरकारला, पक्षी माझ्या सत्तेला त्यांच्याकडून अभय मिळवून घे. समजलास? एकदा का ही मुलाखत वर्तमानपत्रांत आली, वाहिन्यांवर दिसली की आपले विरोधकच काय पण मित्रपक्षही गारद होतील. होतील म्हणजे काय होतीलच. किंबहुना मी तर म्हणेन की व्हायलाच हवेत सगळे गारद. निघ आता. कामाला लाग.'
‘निघतो महाराज, पण मुलाखतीची जाहिरात कशी करू?'
‘कर की, एक शरद, एक नारद बाकी सगळे गारद!'

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.: ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget