Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१०१) तो तर आकाशांचा व पृथ्वीचा आविष्कारक आहे, त्याची कोणी संतती कशी असू शकेल  ज्याअर्थी त्याची कोणीही जीवनसाथी नाही? त्याने प्रत्येक वस्तू निर्माण केली आहे व त्याला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.
(१०२) हा आहे अल्लाह तुमचा पालनकर्ता, कोणीही ईश्वर त्याच्याव्यतिरिक्त नाही, प्रत्येक वस्तूचा निर्माता. म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती करा आणि तो प्रत्येक वस्तूचा रक्षणकर्ता आहे. (१०३) दृष्टी त्याला पाहू शकत नाही पण तो दृष्टीला पाहत असतो. तो अत्यंत सूक्ष्मदर्शी आणि जाणकार आहे.
(१०४ ) पाहा, तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून डोळे उघडणारा प्रकाश आला आहे आता जो डोळसपणे कार्य करील तो आपलेच भले करील आणि जो आंधळ्याप्रमाणे करील तो स्वत:चे नुकसान करून घेईल. मी तुमच्यावर काही पहारेकरी म्हणून नव्हे!६९
(१०५) अशाप्रकारे आम्ही आमचे संकेत वरचेवर विविध प्रकारे विशद याकरिता करतो की या लोकांनी म्हणावे, ‘‘तुम्ही एखाद्याकडून शिकून आला आहात.’’ आणि ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांच्यावर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी.७०
(१०६) हे पैगंबर (स.), त्या ‘वह्य’ - दिव्य अवतरणाचे अनुसरण करीत जा जे तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरले आहे कारण त्या एका पालनकर्त्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही. आणि त्या अनेकेश्वरवादींच्या पाठीमागे लागू नका.
(१०७) जर अल्लाहने इच्छिले असते तर या लोकांनी अनेकेश्वरत्व (शिर्क)केलेच नसते. तुम्हाला आम्ही त्यांच्यावर संरक्षक नेमलेले नाही की रखवालदारदेखील नाही.७१ आणि (हे मुस्लिमांनो),
(१०८) हे लोक अल्लाहशिवाय ज्याचा धावा करतात त्यांचा उपहास करू नका, एखादे वेळेस असे होऊ नये की ते अनेकेश्वरत्वा (शिर्क)च्या पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाहचा उपहास करू लागतील.७२


६९)    हे वाक्य अल्लाहचे बोल (कलाम) आहेत परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारा अदा होत आहे. ज्याप्रमाणे कुरआनचा अध्याय अल् फातिहा अल्लाहची वाणी आहे, परंतु दासांच्या मुखाने म्हटली जाते. कुरआनमध्ये संबोधित लोक सतत बदलत असतात. ते संबोधन कधी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी होते तर कधी श्रद्धावंतांशी (ईमानधारकांशी) होते. कधी ग्रंथधारकांशी, तर कधी विद्रोहीशी कधी अनेकेश्वरवादींशी संबोधन होते. कधी कुरैश लोकांशी तर कधी अरबांशी तर कधी समस्त मानवांशी संबोधन होते. परंतु मूळ उद्देश मात्र संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शन व मानवकल्याण हाच असतो, त्याच प्रकारे संबोधन करणारेसुद्धा अनेकदा बदलत राहतात. कधी संबोधन करणारा अल्लाह तर कधी दिव्य प्रकटन आणणारे फरिश्ते (देवदूतांचा समुदाय) तर कधी पैगंबर मुहम्मद (स.) आणि कधी श्रद्धावंत लोक तरीसुद्धा या सर्व संबोधनात वाणी ही एकच असते आणि ती म्हणजे अल्लाहची वाणी आहे. ``मी तुमच्यावर निरीक्षक (पहारेकरी) म्हणून नियुक्त नाही.'' म्हणजे माझे काम फक्त एव्हढेच आहे की या ज्ञानप्रकाशाला तुमच्यासमोर ठेवावे. यानंतर डोळे उघडून पाहाणे अथवा न पाहाणे तुमचे काम आहे. माझी ही जबाबदारी नाही की ज्यांनी स्वत:हून डोळे बंद केले आहेत त्यांचे डोळे बळजबरीने मी उघडावे आणि ते जे पाहू इच्छित नाही ते त्यांना सक्ती करून मी दाखवावे.
७०)    हेच सूरह २ (अल्बकरा) आयत २६ मध्ये सांगितले गेले आहे. मच्छर (डास) आणि कोळी इ. उदाहरणे ऐकून सत्यशोधक तर त्या सत्याला प्राप्त् करतात जे अशी उदाहरणे देऊन सांगितले जाते. परंतु जे नकारावर दृढ आहेत पक्षपाती आहेत. ते उपरोधाने म्हणतात की अल्लाहच्या वाणीत या तुच्छ वस्तूंचा उल्लेख करणे काय कामाचे? हाच विषय येथे वेगळया शैलीत सांगितला गेला आहे. सांगायचा  उद्देश  म्हणजे  ही  वाणी  लोकांसाठी  कसोटी  बनली  आहे. ज्याद्वारा  खोट्या  व  खऱ्या उपदेशाची शिकवण यात दिली गेली आहे त्यापासून लाभान्वित होतात. या विपरीत दुसऱ्या प्रकाराची माणसे आहेत जे अल्लाहच्या वाणीला ऐकून व वाचून बोध घेण्याऐवजी संभ्रमात पडतात. त्यांना वाटते की या पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असे लिखाण आणले कोठून? आणि ज्याअर्थी विरोध व पूर्वग्रहदूषितपणा पूर्वीपासूनच यांच्या मनात भरलेला असल्याने हा कुरआन अल्लाहकडून अवतरित झाल्याचे मान्य न करता इतर सर्व कपोलकल्पित कुभांडे रचतात आणि अशा प्रकारे पटवून देतात की जणूकाही त्यांनी या ग्रंथाच्या स्त्रोताचा शोध लावला आहे.
७१)    म्हणजे तुम्हाला निमंत्रक (दायी) आणि प्रचारक बनविले आहे कोतवाल नव्हे. तुमचे काम फक्त हेच आहे की लोकांच्या समोर या ज्ञानप्रकाशाला ठेवावे आणि सत्याला प्रकट करण्याच्या कर्तव्याला पार पाडण्यात आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करण्यात कसर ठेऊ नका. याउपर या सत्याला कोणी स्वीकारत नसेल तर नसो, लोकांना सत्यवादी बनवूनच सोडावे या कामावर तुम्हाला मुळीच लावलेले नाही. तुमच्या जबाबदारीत आणि उत्तरदायित्वात याचा समावेश नाही की तुमच्या कार्यक्षेत्रात एकही असत्यवादी राहाता कामा नये. म्हणून आंधळयांना कसे डोळस बनवावे आणि जे डोळे उघडून पाहू इच्छित नाही त्यांना कसे दाखवावे या चिंतेत तुम्ही आपल्या मनाला विनाकारण त्रस्त करू नका. जगात कोणीच असत्यवादी राहाता कामा नये असे अल्लाहला अपेक्षित असते तर हे काम तुमच्याकडून करून घेण्याची काय आवश्यकता होती? काय तो एका संकेतात सर्व मानवांना सत्यवादी बनवू शकला नसता? त्याचा हा उद्देश मुळातच नाही. उद्देश हा आहे की मनुष्याला सत्य व असत्याला निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. सत्यप्रकाश त्याच्यासमोर ठेवून त्याची परीक्षा घेतली जावी की दोघांपैकी तो कोणता मार्ग निवडतो? म्हणून तुमच्यासाठी योग्य हेच आहे की जो सत्यप्रकाश (इस्लामी जीवनपद्धती) तुम्हाला दाखविण्यात आला आहे, त्याच्या प्रकाशात सरळमार्गावर स्वत:चालावे आणि दुसऱ्यांना या सरळमार्गाचे आवाहन करत राहावे. जे सत्य आवाहनाला कबूल करतील त्यांना आपलेसे करा आणि त्यांची साथ कदापि सोडू नका. मग असे लोक जगाच्या दृष्टीने कितीही तुच्छ का असेनात. जे याला कबूल करणार नाहीत त्यांच्यामागे मुळीच लागू नका. ज्या विनाशाकडे ते स्वत: जाऊ इच्छितात व जाण्यास आग्रही आहेत त्यांना त्यांच्या विनाशाकडे जाऊ द्या. ७२) हा उपदेश पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांचे अनुसरण करणाऱ्यांना दिला आहे. आपल्या प्रचारकार्याच्या त्वेषात अतिउत्साहित होऊन त्यांनी अनियंत्रित बनू नये यामुळे शास्त्रार्थ व वादविवाद सीमेपलीकडे जाऊन मुस्लिमेतरांच्या श्रद्धेवर तीव्र आक्रमण करणे व धर्मगुरूंना व उपास्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत जातो व यामुळे ते सत्याकडे न येता त्यापासून अतिदूर जातील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget