Halloween Costume ideas 2015

मुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया

हर मक्तल से बहेरहाल गुजरना होगा
हम बच गए तो किसी और को मरना होगा
अगली नस्लों को तबाही से बचाने के लिए
जो भी करना है इसी नस्ल को करना होगा
स्लिम अनेक गटा-तटामध्ये विभागलेले आहेत, ही काही लपलेली गोष्ट नाही. ह्याच कारणामुळे स्वातंत्र्यानंतर देशात कुठलेही सर्वसमावेशक असे मुस्लिम नेतृत्व उभे राहू शकलेले नाही. वास्तविक पाहता इस्लाम हाच मुस्लिमांना एकसंघ ठेऊ शकतो, मात्र खरा इस्लाम कोणाचा? यावरूनच जेव्हा मतभेद होतांना दिसतात, तेव्हा मुस्लिम एकात्मतेचा ठोस पाया काय असावा? यावर विचार होणे गरजेचे होऊन जाते. हा विचार करण्याअगोदर आपण हे जाणून घेऊया की, मुस्लिमांमध्ये एकात्मता का नाही?
    मुस्लिमांमध्ये मतभेदांचे सर्वात मोठे कारण मसलकी इख्तेलाफ (पंथीय मतभेद) असून याशिवायही छोटे-मोठे वैचारिक मतभेद असलेले अनेक गट आपसात नेहमीच श्रेष्ठत्वाच्या कारणावरून आपसात भांडत असतात. माझे तर असे स्पष्ट मत आहे की, या पंथीय मतभेदांना गाढून मुसलमान सद्यातरी एकसंघ होतील, अशी शक्यता नाही. मात्र मतभेदांसहीत एक अशी गोष्ट आहे ज्यावर हा समाज एकसंघ होऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे ’कलमा-ए-तौहिद’. अर्थात अल्लाहला एक मानने व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांना अल्लाहचा प्रेषित मानने, यावर कोणत्याही गटाचे मतभेद नाहीत. ही एवढी ठोस बाब आहे की, यावर सर्व मुस्लिम एकसंघ होऊ शकतात.
    जगातील प्रत्येक देशात अनेक सामाजिक गट अनेक मतभेदासहीत कुठल्या ना कुठल्या ’कॉमन मिनीमम प्रोग्राम’वर एकत्र येवून एकमेकांचा विकास घडवून आणतात ही सामान्य बाब आहे. आम्हालाही कलमा हाच कॉमन मिनीमम प्रोग्राम समजून एकत्र यावे लागेल. तेव्हाच आपसातील तक्रारी संपतील आणि समाजाचा विकास होऊ शकेल. चला तर या तत्वाला थोड्या विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
    एकात्मतेत विकास तर मतभेदामध्ये विनाश, हे नैसर्गिक तत्व आहे. ज्या समाजामध्ये एकात्मता असते तो समाज दुभंगलेल्या समाजाच्या तुलनेत अधिक मजबूत असतो. तो समाज हातात घेईल त्या कामात यशस्वी होतो. या उलट ज्या समाजामध्ये आपसात एकात्मता नाही तो समाज  कमकुवत असतो, हातात घेईल त्या कामात अशस्वी होतो. मुस्लिमांना एकत्रित येण्यामध्ये कलम्याशिवायही अनेक गोष्टी अशा आहेत की त्या त्यांच्या एकात्मतेला ठोस शक्ती प्रदान करू शकतात. उदा. कुरआनवर कोणाचेच मतभेद नाहीत. शरियतवर कोणाचेच मतभेद नाहीत. असतील तरी ते अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहेत. अशा वेळेस एकात्मतेसाठी या दोन गोष्टींचाही उपयोग करून घेता येईल.
    प्रत्येक मुस्लिमाची ही मनातून इच्छा असते की, मुस्लिम समाज हा एकसंघ असावा. मात्र प्रत्यक्षात ती एकसंघता साकारत नाही. फक्त भारतातच नव्हे तर सार्‍या जगात हीच परिस्थिती आहे. मुस्लिम कधीच एकसंघ होत नाहीत. पंथीय मतभेदाशिवाय, दोन मोठे अन्य कारणेही अशी आहेत की, जे मुस्लिमांच्या एकात्मतेच्या मार्गामध्ये अडथळा उत्पन्न करत  आहेत. एक तर मुस्लिम समाजातील एक मोठा भाग ’जहेनी इर्तेदाद’ अर्थात बौद्धिकदृष्ट्या धर्मभ्रष्ट किंवा अर्धधर्मभ्रष्ट झालेला आहे. त्यांच्या डोक्यात वहेदत, रिसालत आणि आखिरत या इस्लामच्या तीन मुलभूत तत्वांविषयीच शंका निर्माण झालेली आहे. दूसरे कारण असेे की, ज्यांना दीनदार तबका (धार्मिक गट) मानले जाते त्यांच्यामध्ये सुद्धा ती वैशिष्ट्ये आढळून येत नाहीत जी दीनदार मुस्लिमांमध्ये असायला हवीत. या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम असा होत आहे की, इस्लामसंबंधी आधुनिक तरूणांच्या मनामध्ये बेयकीनी (अविश्‍वास)ची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळेच ते आपल्या जीवनाला यशस्वी करण्यासाठी पाश्‍चिमात्य सभ्यतेकडे आशेने पाहत आहेत. इस्लामपासून दूर जात आहेत. पाश्‍चिमात्य सभ्यता ज्यामध्ये धर्माला कुठलेच स्थान नाही, नैतिकतेला थारा नाही, केवळ चंगळवाद, मनोरंजन, नशा, स्पर्धा, अवैध नातेसंबंध आणि व्याज यावर या सभ्यतेचा डोलारा उभा आहे. म्हणून मुळात हा लेख त्याच लोकांसाठी आहे जे लोक इस्लामी विचारधारेमध्ये विश्‍वास ठेवतात, नव्हे इस्लामला एक स्वयंपूर्ण जीवन पद्धती मानतात. आपल्या प्रत्येक समस्येचे निराकरण इस्लामी शरीयत करू शकते, यावर ज्यांचा ठाम विश्‍वास आहे.
इतर महत्त्वाचे मुद्दे
    मुद्दा क्रमांक 1 - अल्लाहने कुरआनमध्ये फरमाविले आहे की, ”सर्वजण मिळून अल्लाहच्या दोरीस घट्ट धरून रहा आणि आपसांत फाटाफूट होऊ देऊ नका. अल्लाहच्या त्या उपकाराची आठवण ठेवा, जो त्याने तुम्हावर केला आहे. तुम्ही एकमेकांचे शत्रू होता, त्याने तुमची मने जोडली आणि त्याच्या मेहेरबानी व कृपेने तुम्ही बंधूजन झालात. तुम्ही अग्नीने भरलेल्या एका खड्डयाच्या तोंडावर उभे होता, अल्लाहने तुम्हाला त्यापासून वाचविले. अशा प्रकारे अल्लाह आपली संकेतचिन्हे तुमच्यासमोर प्रकाशित करतो. कदाचित यामुळे तुम्हाला आपल्या कल्याणाचा सरळ मार्ग दिसेल.” (सुरे आले इमरान आयत नं.103).
    या संदर्भात या ठिकाणी एक घटना नमूद केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ती घटना अशी की, एकदा मदिना शहरामध्ये मुहाजिर आणि अन्सार यांच्यामध्ये कुठल्याशा कारणामुळे तीव्र मतभेद उत्पन्न झाले होते. इतके की, दोन्ही गट आपसात भिडण्यासाठी तयार झाले होते. या संदर्भात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना माहिती देण्यात आली, तेव्हा प्रेषित सल्ल. तात्काळ त्या ठिकाणी आले आणि दोन्ही गटांना या आयातीची आठवण करून दिली की ते इस्लाम स्विकारण्यापूर्वी किती जाहील (अज्ञानी) होते आणि अल्लाहने त्यांना मुस्लिम करून त्यांच्यावर किती मोठे उपकार केले? त्यांना अज्ञानाच्या खड्डयातून बाहेर काढले. मतभेदांवरून हाणामारी करणे हा कधीही सभ्य समाजाचा मार्ग होऊ शकत नाही. चर्चेने कितीही मोठे मतभेद मिटविता येतात. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की, अल्लाहने तुम्हाला आपसात भाऊ-भाऊ बनविले आहे. प्रेषित सल्ल. यांचा हाच तर्क आज आपल्या सर्वांवर तसाच लागू होतो जसा सातव्या शतकात त्या भांडण करणार्‍या मुस्लिमांच्या दोन गटांवर लागू होत होता.
    सुरे आले इमरानच्या या आयात क्रमांक 103 मध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा आहे की, बुद्धीमान माणसांचा कोणताही गट त्यापासून हिदायत घेऊन आपसातले मतभेद चर्चेने मिटवू शकतो.
    मुद्दा क्र. 2 - दुसर्‍या ठिकाणी कुरआनमध्ये अल्लाहने फरमाविले आहे की, ”आणि जर श्रद्धावंतांपैकी दोन गट परस्परांशी लढलेच तर त्यांच्या दरम्यान समेट घडवून आणा, मग जर त्यांच्यापैकी एका गटाने दुसर्‍या गटाची आगळिक केली तर आगळिकी करणार्‍याशी लढा, येथपावेतो की तो अल्लाहच्या आदेशाकडे परत येईल, मग जर तो परत आला तर त्यांच्या दरम्यान न्यायाने समेट करा आणि न्याय करा, अल्लाह न्याय करणार्‍यांना पसंत करतो.” (संदर्भ ः सुरे अलहुजरात आयत नं. 9)
    आज आपण पाहतो की, मुसलमान आपसात भांडत असतात मात्र त्यांच्यामध्ये समेट करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नाही. सीरियाची स्थिती पाहा, सुन्नी जनता आणि शिया शासक, दोहोंच्या लढाईमध्ये देश उध्वस्त झालेला आहे. जगात 56 मुस्लिम देश आहेत पण कोणीही समेट करायला पुढे येत नाही. उलट अनेक मुस्लिम देश कोणी अमेरिकेबरोबर तर कोणी रशियाबरोबर होऊन सीरियावर चढाई करत आहेत.
    आपसातल्या लढाईने होणारी हानी बाहेरच्या आक्रमणापेक्षा कधीही जास्त असते. म्हणून वैयक्तिक असो का सामुहिक, आपसातील मतभेदांना कधीच जास्त वाढू न देणे हेच श्रेयस्कर असते. खरे पाहता प्रत्येक मुस्लिमाचे हे कर्तव्य आहे की, दोघांना भांडत असतांना पाहून तात्काळ हस्तक्षेप करावा आणि त्यात जो पीडित आहे, त्याची मदत करावी.
    मित्रांनोें ! जरा विचार करा. खरच जर प्रत्येक मुस्लिम व्यक्ती कुरआनच्या वर नमूद सुरे हुजरातच्या आयत क्र. 9 ची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करेल तर आपसात किती लवकर एकात्मता उत्पन्न होईल! समाजामध्ये सुख, शांती येईल. कुरआनची ही आयत सुद्धा मुस्लिमांना एकसंघ करण्यामध्ये ठोस भुमिका बजावू शकते.
    मुद्दा क्रमांक 3 - कुरआनमध्ये पुन्हा अल्लाह तआला फरमावितो की, ”श्रद्धावंत तर एकमेकांचे भाऊ आहेत, म्हणून आपल्या भावांच्या दरम्यान संबंध सुरळीत करा आणि अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल.” (संदर्भ ः सुरे अलहुजरात आयत नं. 10). ही आयत स्वयंस्पष्ट आहे. यावर अधिक भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
    मुद्दा क्रमांक 4- कुरआनमध्ये पुढे अल्लाह तआला फरमावितो की, ”हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, पुरूषांनी दुसर्‍या पुरूषांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील आणि स्त्रियांनीसुद्धा दुसर्‍या स्त्रियांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील. आपापसांत एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका. श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारांत नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे. जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत.”
    ”हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अधिक शंका घेण्यापासून दूर रहा कारण काही बाबतीत कुतर्क करणे हे पाप आहे. हेरगिरी करू नका. आणि तुमच्यापैकी कुणीही कुणाची चहाडी करू नये. काय तुमच्यापैकी एखादा असा आहे की जो आपल्या मृत भावाचे मांस खाणे पसंत करील? पहा, तुम्हा स्वतःला याची घृणा वाटेल, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा, अल्लाह मोठा पश्‍चाताप स्वीकारणारा आणि परम कृपाळू आहे. (संदर्भ ः सुरे अलहुजरात आयत नं. 11-12)
    वरील आयातींचा एकत्रित विचार केला तर यात दिलेले तर्क मुस्लिमांच्या आपसातील एकात्मतेचा ठोस पाया बनू शकतात. इतपत त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे. तसेही कुरआनमध्ये अनेक ठिकाणी एकात्मतेवर जोर देण्यात आलेला आहे. एका लेखामध्ये त्या सर्व गोष्टींचा समावेश करणे शक्य जरी नसले तरी वरील चार मुद्दे एवढे मजबूत आहेत की, त्यावर मुस्लिम समाजाने जर का गांभीर्याने विचार केला तर समाज निश्‍चितच एकसंघ होईल, यात माझ्या मनामध्ये तरी किमान शंका नाही.
    मुत्तहिद होंगे तो बदलोगे निजामे आलम
    मुन्तशीर होंगे तो किस्तों मे सफाया होगा
    शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, मुस्लिमांमध्ये वरील मुद्यांचा विचार करून एकसंघ होण्याची आम्हाला सद्बुद्धी दे आमीन.

-एम.आय.शेख-9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget