Halloween Costume ideas 2015

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकरी दुर्लक्षित

लोकशाही समाजव्यवस्था स्विकारली की, ठराविक कालावधीनंतर घटनेतील तरतुदीनुसार निवडणूका ह्या घ्यायलाच लागतात. निवडणूक म्हंटले की, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे  आलेच.शिवाय प्रचाराचे रणकंदनच जणू माजलेले असते.२०१४ नंतर यंदा २०१९ ला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आरोप प्रत्यारोप सुरू  झाले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजेच राहूल गांधी यांच्या वर टीका करताना भारतीय जनता पक्षाचे नेते राहूल गांधी यांना पप्पू म्हणून हिणवत होते, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीठ चौकीदार चोर है असे म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राफेलचा घोटाळा, फसलेली नोटा बंदी,जी.एस.टी., मल्ल्या,आदाणी, अंबानी,धीरज मोदी यांचा  कर्जबुडवेपणा, महागाई, बेकारी हे मुद्दे काँग्रेसकडून चर्चेत आले, तर काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना झालेल्या घोटाळ्यांची चर्चा व ६० वर्षे सत्तेवर राहून ही देश पिछाडीवर नेला, तसेच काँग्रेसमधील घराणेशाही याविषयी भाजपने अक्षरश: रणकंदनच माजविले. हे सर्व होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील मागच्या सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे ३५  शेतकऱ्यांनी कंटाळून अखेर आत्महत्यां केल्या आहेत, याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षांनी गंभीर दखल घेतलेली दिसली नाही. निवडणूक प्रचारात आणि धामधुमीत शेतकरी आणि शेतमजूर, तसेच त्यांच्या आत्महत्यां दुर्लक्षित राहिल्या आहेत.
शासकीय पातळीवर अधिकारी व इतर कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त असल्याने व कडक आचारसंहिता असल्याने आत्महत्या करणारे शेतकरी पात्र-अपात्र ठरविण्यासाठी  शासकीय अधिकारी यांची बैठकच मार्च व एप्रिल महिन्यात झाली नाही, असे समजते.त्यामुळे आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब मदतीपासून वंचित राहिल्याचे दिसून येते आहे. निवडणुकीच्या पूर्वी विरोधी पक्ष नेते आत्महत्यां केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देत होते. सत्ताधारी पक्षांवर तुटून पडण्यासाठी या शेतकरी आत्महत्यांचे  मोठे भांडवल करून सत्ताधारी पक्षाला नामोहरम केले जायचे. सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी व नेते डोळ्यात उसने अश्रू आणून आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीयांना भेटून आपणच  शेतकर-यांचे तारणहार आहोत असे दाखवायचे.मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात या आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विरोधी व सत्ताधारी पक्षाचे  कोणीही गेले नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पहापळ या गावातील धनराज बळिराम नव्हते या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून भाजप सरकारचा धिक्कार करीत  काँग्रेस सरकार चांगले होते असे लिहून ठेवले आहे.पण असे असले तरीही सत्ताधारी भाजप चे नेते दूरच राहिले, पण सातत्याने किमान शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बाजूने गळे  काढणारे काँग्रेसचे नेते सुध्दा त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी फिरकले ही नाहीत. ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीच्या काळात गुढीपाडव्याच्या रात्री राळेगाव तालुक्यातील वडगाव येथील श्रीजित हाते या तरुण शेतकऱ्यांने झाडाला फास लावून आत्महत्या केली.तर याच तालुक्यातील किन्ही  जवादे या गावातील मधुकर तातू निगुरे या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.शेतात काम नसल्याने तो गावाजवळ असलेल्या कालव्याच्या कामावर गेला होता,त्याच ठिकाणी  त्याने आत्महत्या केली.घाटंजी तालुक्यातील मानोली येथील सुभाष नामदेव लेनगुरे या शेतकऱ्याने निवडणूक प्रचाराच्या रणधुमातच आत्महत्या केली,मात्र या आत्महत्यांकडे ना सरकारने  लक्ष दिले,ना विरोधी पक्षांनी.ह्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दबून गेल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने भाजपशी युती केली आहे असे  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराच्या भाषणात सातत्याने सांगत होते. यवतमाळ जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी आत्महत्या  केलेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला,मात्र गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे, यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील  २ हजार ४८ गावातील खरीपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ टक्के असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत मदत मिळाली पाहिजे,नव्हे नव्हे ती आवश्यक ही आहे,पण  प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत, आचारसंहिता असल्याने याचा विचार करायला वेळ नाही, आणि राजकीय नेते मतदानाची आकडेवारी करण्यात  गुंतलेले दिसत आहेत.त्यामुळे आज तरी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या कडे पहायला कुणाला ही वेळ नाही, निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकरी राजा खरोखरच दुर्लक्षित राहिला  आहे,असे दिसुन येते आहे. हा देश कृषीप्रधान देश आहे, शेतकरी राजाला बळीराजा म्हणतात, शेतकरी टीकला तर देश टिकणार आहे, असे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कुणीच  मनापासून प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाहीत.

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२

(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget