Halloween Costume ideas 2015

सावधानः आत्महत्या वाढत आहे!

खुदा जाने ये बदमस्तीयाँ नया रंग लायेंगी
कहां तक और बिगडेगा अभी अपना चलन साकी’’
माहितीने समृद्ध जग लोकांची लक्ष देण्याची योग्यता आणि एकाग्रता हिरावून घेईल’’ असे विधान नोबेल लॉरेट हरबट सीमान यांनी केले होते. आज ते विधान मूर्त स्वरूपात  आपल्यासमोर उभे आहे. आपल्यातील बहुसंख्य लोकांच्या पाठांतराची क्षमता कमालीची कमी झालेली आहे. अगदी जवळच्या लोकांचे मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला पाठ नाहीत.  चंगळवादाने समृद्ध झालेल्या जीवन शैलीने आपल्यामध्ये कमालीचे बदल घडवून आणलेले आहेत. आता आपण रात्री उशीरापर्यंत जागतो आणि दिवसा उशीरापर्यंत झोपतो. कित्येक लोक  तर असे आहेत की ज्यांनी गेल्या कित्येक वर्षे सूर्य उगवताना पाहिलेला नाही.
चुकलेल्या या जीवनशैलीमुळे अनेकांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. या नवीन जीवन पद्धतीमध्ये पैसा आणि वस्तूंनी लोकांचे जीवन व्यापून टाकलेले आहेत. पैसा किती कमवावा आणि कसा कमवावा, यासाठी असलेली पारंपारिक नैतिक चौकट उध्वस्त होऊनही बराच कालावधी लोटलेला आहे.
परिणामी एकाग्रता, सत्य, समर्पण, प्रेम, त्याग आणि माणुसकी यासारख्या मुल्यांचा ऱ्हास झालेला आहे. प्रेम ही संज्ञा फक्त लैंगिक संबंधापूर्ती उरलेली आहे. स्त्री-पुरूषांचे नाते नर आणि मादी या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. बाकीच्या नातेसंबंधातील प्रेमभावना सुगंध नसलेल्या टवटवीत फुलासारख्या झालेल्या आहेत. त्यामुळे वरून जरी समाज सुदृढ आणि  संपन्न दिसत असला, लोक सुंदर, गुटगुटीत आणि सभ्य दिसत असले तरी, वाढत्या आत्महत्यांनी त्यांच्या संपन्नतेतील फोलपणा उघडकीस आणलेला आहे.
दारिद्रयामुळे लोक आत्महत्या करतात असा सिद्धांत मांडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येंचे उदाहरण पुरावा म्हणून पुढे केले जात असले तरी हा सिद्धांत खोटा आहे हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. हे खरे असते तर शेतकऱ्यांपेक्षाही जास्त गरीब असलेल्या मुस्लिम समाजात आत्महत्येंचे प्रमाण नगण्य का आहे? या प्रश्नाचे उत्तर या सिद्धांत मांडणाऱ्यांकडे नाही.
शिवाय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत, स्त्रीयांपासून पुरूषांपर्यंत, मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व प्रकारचे लोक नियमितपणे का आत्महत्या करीत आहेत? याचा शोध घेणे मनोरंजक  ठरेल.
चुकीची जीवनशैली सारासार नियंत्रणही नाकारणारे व्यक्ती स्वातंत्र्य, जीवनमान सतत उंचावत ठेवण्यासाठी व्याजी कर्ज घेण्याची सवय, ऐपतीपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी, रात्रंदिवस मनोरंजनात व्यग्र राहणे, अति लैंगिक सक्रीयता, वस्तूंमध्ये आनंद शोधण्याची मानसिकता, पती-पत्नीच्या नात्याला क्षीण करणाऱ्या साधनांचा विपूल उपयोग, चंगळवादी जीवनशैलीचा अंगीकार, व्याजाला नफा समजण्याची घोडचूक या सगळ्या गोष्टी आजच्या समाज जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. या गोष्टी जरी जीवनात असतील तरी  जीवन कुठल्याही क्षणी आत्महत्येच्या टोकापर्यंत जाऊ शकते.
या कृत्रिम जीवन शैलीमुळे उत्पन्न होणाऱ्या स्ट्रेसमुळे मधूमेह, र्नतदाब, ब्रेन अटॅक (पक्षाघात) किंवा हार्टअटॅक (हृदयघात) सारख्या व्याधी मागे लागू शकतात. भारतीय नागरिकांमध्ये या  आजारपणाची सातत्याने होणारी वाढ ही चिंताजनक स्तरावर पोहोचलेली आहे. असामाधानी आणि कृत्रिम जीवनशैलीचे फलित आत्महत्या किंवा अकाली मृत्यूमध्ये होत असल्यास त्याचे  नवल ते काय?
उपाय
वल नफ्स रागेबत अज अरगबतहा
व अज इरतेदाली खलील तख्नआ
अरबी भाषेमधील वरील शेरचा अर्थ असा की जो आपल्या जीवाचे जेवढे चोचले पुरवील तेवढे ते वाढतच जातात. त्यांना अंत नसतो व जो आपल्या जीवाचे चोचले पुरविण्यास ठामपणे नकार देतो तर त्याचा जीव तो देईल तितक्यात समाधानी राहतो. इस्लामी जीवनशैलीचे हेच वैशिष्ट्ये आहे. प्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीत ही ’ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू  द्यावे समाधान’ ही शिकवण माणसाच्या जीवनास समृद्ध करण्यासाठी पुरेशी होती. पण हिंदू आणि मुस्लिम दोहोंतील बहुसंख्यांनी आपापल्या धर्मातील मूळ शिकवणी विसरून चंगळवादी,  भांडवलशाही आणि असभ्य जीवनशैलीचा अंगिकार केल्यामुळे जीवन स्ट्रेसफुल (तणावग्रस्त) तर मृत्यू हा अचानक आणि वेदनादाई होत आहे.
गुंतागुंतीच्या जीवन शैलीमुळे होणाऱ्या आत्महत्याचे वर्णन करण्यासाठी भय्यूजी महाराजांसारख्या व्यक्तीची आत्महत्या व त्यामागील उघडकीस आलेल्या कारणांएवढे स्पष्ट उदाहरण दूसरे  असूच शकत नाही. कोट्यावधी रूपये धर्मादाय कार्यात खर्च करणारे अनेक राज्यातील सरकारे बनविण्यात मोलाची भूमिका बजावणारे, अनेक व्हीआयपींचे धर्मगुरू असणारे, भय्यूजी  किती कृत्रिम जीवन जगत होते हे जर का लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.
लक्षात ठेवा मित्रानों! कठीण परिस्थितीत जो धर्म माणसाला नैतिकतेवर टिकून राहण्यास मदत करतो तो इस्लाम आहे. भारतात सर्वाधिक गरीब मुस्लिम समाज आहे. हे सत्य  न्यायमूर्ती सच्चर यांच्या अहवालाद्वारे अधोरेखित झाले आहे. भारतीय मुस्लिम म्हणजे गरीबीचे मूर्तीमंत उदाहरण. दाटीवाटीने उभी असलेली मोहल्ल्यातील कच्चीपक्की घरे, कल्तानी  पोत्यांचे दारावर असलेले मळकट पडदे, निळ्या पॉलीथीनचे आडोसे, उघडी गटारे, त्यातून वाहनारा मैला, त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी, त्यातून डासांची उत्पत्ती, कुपोषणामुळे वाढ  खुंटलेली मुले, कमी एच.बी. (ह्युमोग्लोबिन) असल्या कारणाने पिवळ्या पडलेल्या कृष महिला, शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्याने तासन्तास वॉटस्अप आणि  फेसबुकमध्ये मुंडके घालून बसलेले तरूण, आपल्या मुलींच्या खर्चिक निकाहसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याचा आणि प्रतिष्ठेचा विचार न करता सातत्याने श्रम  करणारे मध्यम वयीन पुरूष, भूमीहीन आणि सरकारी सुविधांपासून वंचित असणाऱ्या व त्यामुळे अत्यंत दयनीय स्थितीमध्ये जगणाऱ्या या समाजाकडे डोळस नजरेने पाहिले की, एक  सत्य लक्षात आल्यावाचून राहत नाही की, केवळ मजबूत इस्लामी जीवनशैलीमुळेच हे लोक अशा या आभाळाएवढ्या अडचणींवर मात करूनही जगत आहेत.
म्हणून असे म्हणावे लागेल की, गरीबी नव्हे तर चुकीच्या जीवनशैलीमुळे भारतात आत्महत्या वाढत आहेत.

इस्लामची मुलभूत शिकवण
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’जरी इब्ने आदम (मानव) कडे एका डोंगराएवढे सोने असेल तरी त्याला वाटेल की असा आणखीन एक डोंगर असायला हवा होता.’ या  हदीसमध्ये माणसाच्या संपत्तीविषय लालसेचे अत्यंत मार्मिक असे उदाहरण देउन स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. डोंगराएवढे सोने असल्यास खरे तर माणसाला दूसऱ्या कशाचीच  इच्छा करण्याची गरज भासू नये. मात्र माणूस इतका लालची असतो की थडग्याच्या मातीनेच त्याची लालसा समाप्त होते. याच लालसेमुळे माणसाचे सुख आणि चैन नष्ट होत असते.  आरोग्य आणि प्रतिष्ठा नष्ट होत असते. आश्चर्य म्हणजे तारूण्यामध्ये लाभलेल्या आरोग्याची वाट लावून माणसं धन कमावतात आणि त्याच धनाने, धन कमावताना नष्ट झालेल्या आरोग्याला पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. यासारखा दूसरा वेडेपणा नाही. इस्लाममध्ये नशीबावर विश्वास ठेवण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे सातत्याने कर्म केल्यानंतरही मनासारखी धनप्राप्ती करता आली नाही तरी मुस्लिम या अपयशाला आपले नशीब समजून गप्प बसतो. आहे त्या पैशामध्ये संतुष्ट होउन जीवन जगतो. अल्लाहची आठवण सातत्याने ठेवतो. पाच वेळेसच्या नमाजातून त्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. त्यातून त्याला आत्मीक आनंदाची अनुभूती मिळते आणि जगण्याची उमेद कायम  राहते. या शिवाय, रोजा, जीक्र इत्यादी प्रार्थनांमधून मिळालेल्या प्रेरणेमुळे तो मोठ्यातले मोठे अपयश सुद्धा पचवू शकतो. सातत्याने होणाऱ्या जातीय दंगलींमध्ये सर्वकाही जळून राख  झाल्यावर सुद्धा नव्याने पुन्हा अ,ब,क पासून जीवनाची सुरूवात करण्याची भारतीय मुस्लिमांची जिद्द फिन्निस पक्षाची आठवण करून देणारी आहे.
मुफ्ती मुहम्मद शफी उस्मानी म्हणतात,
’’ खुदा की याद और उसकी इताअत से मुसलमानों को ऐसी रगबत
होती है जैसे के, मता-ए-हयात-ए-दुनिया (जगातील जीवन
जगण्याच्या वस्तू) से काफिर (अल्लाह आणि प्रेषित सल्ल.
यांचा इन्कार करणारा) को होती है.’’
याचा अर्थ जीवनाला समृद्ध करणाऱ्या वस्तूंबद्दल जेवढे प्रेम मुस्लिम्मेत्तरांना असते तेवढेच प्रेम मुस्लिमांना अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताच्या वचनांविषयी असते. लोक आज वस्तूंमध्ये  समाधान शोधत आहेत. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की, वस्तू असल्या की समाधान आपोआप मिळते. घरात सामान, ऑफिसमध्ये सामान, सोबत सामान, गाड्या, बंगले, बँक  बॅलन्स, वाहने या गोष्टी माणसाला शारीरिक सुख तर देऊ शकतात मात्र आत्मिक समाधान देऊ शकत नाहीत. यांच्या आधारे कोणीही संतुष्ट जीवन जगू शकत नाही. म्हणून लोक  आत्महत्या करतात.
माणसांच्या गरजा कधीच संपत नाहीत. ती एक हवस असते जी कधीच पूर्ण होत नाहीत. दुसऱ्या एका ठिकाणी प्रेषित सल्ल. यांनी म्हटले आहे की, ’’ वो कामियाब हो गया जिसने  इस्लाम कुबूल किया और उसे बकद्रे जरूरत रोजी मिल गई और उसीपर अल्लाह तआला ने उसको किनात नसीब फरमा दी’’(संदर्भ : मुस्लिम : 2473) म्हणजे ती व्यक्ती यशस्वी  झाली जिन्हें जाणून बुजून इस्लामचा स्विकार केला व त्याला अल्लाहने जगण्यापूर्ती संसाधनं दिली आणि संतुष्टी प्रदान केली. एका ठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले की,  ’’तुम्हें अगर कोई भी परेशानी लाहक हो जाए तो नमाज की तरफ रूजू करो.’’ (संदर्भ : हदीस नं. अबु दाऊद 1321)
एकंदरित आत्महत्यापासून दूर रहावयाचे असल्यास पूर्वग्रह दुषित न ठेवता सहज जगण्याची प्रेरणा देणाऱ्या दिव्य इस्लामचा सर्वांनी खुल्या मनाने अभ्यास करावा व आपल्या जीवनाला  समृद्ध करावे. कारण सुखी जीवन जगण्याचा दूसरा मार्गच उपलब्ध नाही. तपासून पाहा, अनुभव घेऊन पाहा, दुसऱ्यांच्या जीवनाचे अवलोकन करून पाहा, कसेही पहा,
देअर इज नो वे बट इस्लाम. 

- एम.आय.शेख
8459538348

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget