Halloween Costume ideas 2015

नशेचा नाश देशाचा विकास

जमाते इस्लामी हिंद च्या राज्यव्यापी नशा विरोधी अभियानाची सुरुवात दि. 02/10/2018 झाली आहे. आठवडाभर चाललेल्या या मोहीमेद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे नशापान सर्व प्रकारचा व्यसनाधिनता कशी समाज विघातक आहे याबाबत चे प्रबोधन, मार्गदर्शन,समुपदेशन व उपचार केले गेले.
    सर्व प्रकारचे व्यसन हे समाजासाठी फार घातक असल्याचे आज जनसामान्यांच्या लक्षात आलेले आहे. पण नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी काही अहवाल पाहूया.
1) भारत सरकारद्वारे संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की अमली पदार्थांच्या तस्करीत तब्बल 455% ची वाढ झालेली आहे. ही अकड़े वारी फक्त 3 वर्षाची आहे म्हणजे 2011 ते 2013 या दरम्यान अधिकार्‍यांनी 105173 टन अमली पदार्थ जप्त केले आहे 64737 न्यायलयीन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
2) इकॉनोमिक टाइम्स च्या 22 जुलाई 2016 च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य मादक पदार्थ सेवनामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये देशात सगळ्यात अग्रेसर राज्य आहे.
3) अमली पदार्थ सेवन करून करण्यात येणार्‍या आत्महत्या पैकी जवळजवळ 40 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत असतात.
4) इंडियन एक्सप्रेस 25 जुलै 2016 नुसार दर 96 मिनिटात एक भारतीय अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू पावतो.
5) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (थकज) ची एक रिपोर्ट सांगते व्यसनाधीनतेमुळे  होणार्‍या अकाली मृत्यूमध्ये 1 ते 5 या गुणांका मध्ये भारतीय 4 क्रमांकावर येतात.
    असे अनेक धक्कादायक रिपोर्टस आपल्याला ऑनलाईन वाचता येतील.
व्यसनां बाबतीत इस्लामी धोरण :
मदिरा व कुरआन
1) हे श्रद्धावंतांनो, ही दारु आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.  (5:90)
2) शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारु व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?  (5:91)
3) अल्लाह व त्याच्या पैगंबराचे म्हणणे मान्य करा आणि अलिप्त राहा, परंतु जर तुम्ही अवज्ञा केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहचविण्याची फक्त जबाबदारी होती.   (5:92)
मदिरा पैगंबरांच्या दृष्टीने
मदिरेबद्दल पवित्र कुरआनमध्ये जे काही सांगण्यात आले आहे, त्याचे स्पष्टीकरण पैगंबर मुहम्मद (स) यांच्या अनेक कथनांवरुनही होते. पैगंबरोनी सांगितले आहे, प्रत्येक नशा आणणारी मादक वस्तू ख़म्र (दारु) आहे , अशी प्रत्येक वस्तू निषिध्द आहे.
    पैगंबर सल्ल. यांनी आणखी म्हटले आहे, ’नशा आणणारे प्रत्येक पेय निषिध्द आहे आणि प्रत्येक मादक व अंमली वस्तू मी वर्ज्य करतो.’ मद्याचे दुष्परिणाम आणि तिच्यापासून होणार्‍या हानीबद्दल इस्लामच्या दृष्टिकोनाचे अनुमान केले जाऊ शकते, अल्लाहचे पैगम्बर (सल्ल.) यांनी सांगितले की, अल्लाहने धिक्काराचा वर्षाव केला आहे मद्यावर (दारुवर), ते पिणार्‍यावर, प्यायला देणार्‍यावर, त्याची विक्री करणार्‍यावर, ते खरेदी करणार्‍यावर त्याचे उत्पादन करणार्‍यावर, ज्यांच्याखातर त्याचे उत्पादन केले जाते त्यांच्यावर, त्याची वाहतूक करणार्‍यावर आणि ज्याच्याकडे ते आणले जाते त्याच्यावरही. दारुबद्दल इस्लामचा कडकपणा इतका आहे की एकदा एका माणसाने पैगंबर (सल्ल.) यांना प्रश्‍न केला,  औषधामध्ये आणि औषधी स्वरुपात दारुचा वापर करण्याची परवानगी आहे काय? तेव्हा पैगंबरांनी सांगितले,  दारु औषध नाही तर तो एक रोग आहे.’
    व्यसनाधीनता एक मानसिक रोग असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा मान्य केले आहे. त्या अनुषंगाने प्रबोधन मार्गदर्शन समुपदेशन व अध्यात्म या माध्यमांबरोबर वैद्यकीय शास्त्राच्या मदतीने सुद्धा या भस्मासुराचा मुकाबला करणे अनिवार्य झाले आहे. या अनुषंगाने व्यसन मुक्ती केंद्रांमार्फत हे आव्हान पेलण्याचे गतिमान काम महाराष्ट्रात माजी समाजकल्याण मंत्री शिवाजी मोघे साहेबांच्या कालखंडात महाराष्ट्रभरातील जिल्हानिहाय व्यसन मुक्ती केंद्रांनी हाती घेतले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दर्जेदार व्यसन मुक्ती केंद्र येरमाळा येथे आहे. येडाई व्यसनमुक्ती केंद्राद्वारे डॉक्टर संदीप तांबारे व त्यांचे सहकारी अगदी तळमळीने हे सेवा कार्य करत आहेत. त्यांच्याकडून संकलित केलेल्या माहितीची काही ठळक मुद्दे आपल्या समोर मांडत आहे :
    सर्वात आधी व्यसने जडण्याची कारणे  प्रामुख्याने दोन असतात :
1)  माणसाला उत्तेजनाची (स्टीमुलेशन) पावलो-पावली गरज पडत असते अशा वेळी मादक पदार्थांनाच बळी पडण्याची शक्यता जास्त असते
2)  सामाजिक आव्हाने पेलू न शकण्याची तीव्र भावना निर्माण होणे.
    आता व्यसनमुक्तीसाठी च्या काही प्रमुख व निवडक युक्त्या पाहूया.
1) व्यसनांना विरोध असावा पण त्या व्यसनाधीन माणसाचा तिरस्कार, टेहळणी, हेळसांड होता कामा नये कारण तो एक आजारी माणूस आहे.
2) वैद्यकीय शास्त्रात शास्त्रोक्त पद्धती व्यसनांच्या पाशातून मुक्तीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा वापर नातेवाईक व मित्रांनी केला पाहिजे.
3) प्रत्येक व्यसनाधीन माणसाच्या व्यसनमुक्तीसाठी घरातील महिला अतिशय महत्त्वाचा घटक ठरतात. कारण एका स्त्री चा बाप किंवा भाऊ किंवा पती किंवा मुलगा/मुलगी या अशा जिवलग नात्यांशी जिव्हाळ्याचा संबंध असतो. यासाठी महिलांना व्यसनमुक्तीच्या अभ्यासक्रमाचा योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
4) रुग्णाला औषध उपचाराची सुद्धा गरज असते यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात ठराविक काळासाठी रुग्णाला दाखल करावे लागते.
5) व्यसनमुक्त झालेल्या इसमाचा पुनर्वसन हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे जेणेकरून पुन्हा ती व्यक्ती व्यसनाच्या वाटेवर जाऊ नये. ते पुनर्वसन तीन पातळ्यांवर करावं लागतं. सामाजिक, पारिवारिक व आर्थिक.
    पुनर्वसनाच्या कार्यक्रमाचा पूर्ण शास्त्र व्यसनमुक्ती केंद्रात उपलब्ध असतो व तज्ज्ञ मंडळी रुग्णाच्या गरजेनुसार त्याला व परिवारातील सदस्यांना समुपदेशन व योग्य मार्गदर्शन करत असतात. आजच्या घडीला दारु, अमली पदार्थ, वेगवेगळी औषधी, गुटखा, तंबाखू, सिगारेट व बिडी अशा अनेक प्रकारच्या व्यसनांनी समाजाला पछाडले आहे अशा परिस्थितीमध्ये सध्याचे सरकार या मुद्यावर कमालीचे उदासीन असल्याचे दिसते. म्हणून प्रबोधन मार्गदर्शन समुपदेशन व उपचाराचे कार्य माणुसकीला बांधील सामाजिक संस्था व व्यसनमुक्ती केंद्रांनाच करावे लागेल व ते आपण केलेच पाहिजे.
(लेखक जमाते इस्लामी हिंद उस्मानाबादचे सदस्य आहेत.)

- सलीम बशीर मनियार
उस्मानाबाद/ 9763727300

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget